पुणे–कल्याणीनगर अपघात प्रकरणात विशेष न्यायाधीश एस. पी. पोंक्षे यांनी पबचालकांना चांगलेच फटकारले आहे . गरज पडल्यास मद्यधुंदांच्या राहण्याची व्यवस्था मालकांनी पबमध्ये करावी, असे त्यांनी सुनावले आहे. विशेष न्यायाधीश एस. पी. पोंक्षे म्हणाल्या, ‘‘पब चालवणे म्हणजे मजा नाही. मद्यपान करणारे ग्राहक सुरक्षितपणे घरी पोहोचतील याची खात्री करणे ही पबमालकांची जबाबदारी आहे. मद्यधुंद व्यक्तीवर लक्ष ठेवण्यासाठी गेटच्या बाहेर एक व्यक्ती तैनात करायला हवी. मद्यधुंदांना गाडी चालवून देऊ नका. गरज पडल्यास त्यांची राहण्याची व्यवस्था तेथेच करा.’’
‘ब्लॅक’मधील कामगारांनी अल्पवयीन मुलांना टेबलवर मद्य पुरविल्याचेही पोलीस तपासातून पुढे आले आहे. बेदरकारपणे कार चालविणाऱ्या मुलासह इतर अल्पवयीन मुलांना पबमध्ये मद्य पुरविल्याप्रकरणी दोन्ही पब मालकांसह व्यवस्थापकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यातील तिघांना काल अटक करण्यात आली.
कोझी पबचे मालक नमन प्रल्हाद भुतडा (वय २५, रा. ए ७, पद्म विलास एन्क्लेव्ह, वानवडी), व्यवस्थापक सचिन अशोक काटकर (वय ३५, रा. साईसदन ए २, तुकाईदर्शन, हडपसर) आणि ब्लॅक पबचे मालक संदीप रमेश सांगळे (वय ३५, रा. ऑस्कर शाळेसमोर, फ्लॅट नं. १०७, पद्मावती हाईट्स, केशवनगर, मुंढवा) असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. आरोपींना अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस. पी. पोंक्षे यांच्या न्यायालयात हजर करण्यात आले होते. गुन्ह्याच्या अनुषंगाने तपास करण्यासाठी आरोपींना सात दिवसांची पोलीस कोठडी देण्याची मागणी सरकार पक्षाकडून करण्यात आली.
‘ब्लॅक’ पबमधील कामगारांनी अल्पवयीन मुलांना टेबलवर मद्य पुरविल्याचे पोलीस तपासात सांगितले आहे. पोलिसांकडे प्राप्त झालेल्या सीसीटीव्ही फुटेजवरून आरोपींनी त्यांच्या पबमध्ये अल्पवयीन मुलगा व त्याच्या मित्रांच्या वयाची खात्री करता मद्य पुरविल्याचे दिसते. तसेच हॉटेलमध्ये दर्शनी भागावर कोठेही बाल न्याय अधिनियम कलम ७७ प्रमाणे नोटीस किंवा सूचना लावलेली नसल्याने आरोपींनी गुन्हा केल्याचे सिद्ध होत असल्याचे सरकारी वकील विद्या विभूते आणि योगेश कदम यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले.अल्पवयीन मुलांना पबमध्ये दारू देणे हा अदखलपात्र गुन्हा आहे. तर मोटार वाहन कायद्यानुसार दाखल कलमांबाबतची कारवाई योग्य नाही. कारण आरोपी मोटारीचे मालक नाहीत. तसेच त्या अनुषंगाने त्यांचा गुन्ह्यात काहीच सहभाग नाही. त्यामुळे अटकेची कारवाई बेकायदेशीर आहे, असा युक्तिवाद अॅड. जैन यांनी केला.