माळशिरस-काँग्रेसवाले संधी मिळाल्यास तुमची संपत्ती हिसकावून घेईल असे संपत्ती हिसकवणारे सरकार तुम्हाला सत्तेवर हवे का?, असा सवाल माळशिरसमध्ये देखील बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उपस्थित केला आहे. इथले मोठे नेते कृषीमंत्री असताना ऊसाचा FRP 200 रुपये होता, असा टोला नरेंद्र मोदी यांनी शरद पवारांचे नाव न घेता लगावला आहे. 60 वर्षांत यांना जे जमले नाही ते आम्ही 10 वर्षांत करुन दाखवले, असे म्हणताना अनेक वर्षे रखडलेले प्रकल्प आम्ही पूर्ण केले, असे मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केले आहे.
माढा लोकसभेसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आज माळशिरस येथे सभा आयोजित करण्यात आली. महायुतीचे उमेदवार रणजित सिंह निंबाळकर हे येथून निवडणूक लढवत आहेत. हायव्होल्टेज लढतीसाठी प्रचार करण्यासाठी पंतप्रधान मोदी मैदानात उतरले आहेत. या सभेत त्यांनी पुन्हा एकदा शरद पवार यांच्यावर टीका केली. 60 वर्षांत काँग्रेस जे करू शकले नाही ते आम्ही करून दाखवले. 25 कोटी लोकांना गरिबीतून मुक्त केले असे मोदींनी सांगितले.15 वर्षांपूर्वी एक मोठा नेता निवडणूक लढवण्यास आले होते. इथे दुष्काळाने प्रभावित क्षेत्रात पाणी पोहोचवू, अशी शपथ त्यांनी तेव्हा मावळत्या सूर्याच्या साक्षीने घेतली होती. त्यांनी पाणी दिले का ? आता त्यांना शिक्षा देण्याची वेळ आली आहे, असे ते म्हणाले. आज त्या नेत्याची इथून निवडणूक लढण्याची हिंमत नाही, अशा शब्दांत त्यांनी शरद पवार यांचे नाव न घेता त्यांच्यावर टीका केली आहे.
विकासित भारतासाठी मी मत मागायला आलो आहे. मी वेळेत येतो, दूरवरून येणाऱ्या लोकांची गैरसोय होते, त्यामुळे मला क्षमा करा. काही राजकीय नेत्यांनी सभेला उशीरा येण्याची फॅशन केली होती. काही लोक अजूनही येत आहेत, त्यांची मी माफी मागतो. पण, मला पुढील सभेसाठी जायचे असल्याने मी वेळेत आलो आहे, मला माफ करा, या शब्दांत मोदींनी उशिरा येणाऱ्या लोकांची माफी मागितली.
मराठवाडा, विदर्भाला पाण्यासाठी यांनी त्रासवले आहे. काँग्रेसला जनतेने 60 वर्षे राज्य करण्याची संधी दिली. मात्र, काँग्रेस शेतकऱ्यांच्या शेतापर्यंत पोणी पोचवू शकली नाही. जवळपास 100 योजना अनेक वर्षांपासून प्रलंबित होत्या. त्यातील 26 योजना महाराष्ट्रातील होत्या. एवढा मोठा धोका त्यांनी महाराष्ट्राला दिला आहे. सर्वांना पणी देण्याची माझी योजना आहे. सिंचन योजना पूर्ण करण्यासाठी मी संपूर्ण ताकद लावली आहे. आतापर्यंत 36 योजना पूर्ण झाल्या आहेत. नीळवंडे धरण आम्ही पूर्ण केले आहे, गोसे खुर्दसाठी काम चालू आहे, असेही मोदी यांनी नमूद केले.