पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मजमोजणीनंतर लक्षात येईल की, ही भटकती आत्मा नसून, ही भारताची आणि खास करून महाराष्ट्राची आत्मा आहे. महाराष्ट्राचा आत्मा म्हणून शरद पवार यांच्याकडे आज उभा महाराष्ट्र बघतो आहे, असे शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी म्हटले आहे. जयंत पाटील म्हणाले की, प्रत्येक निवडणुकीपूर्वी आणि नंतर वेगवेगळे अनुभव आपण घेतले आहेत. पण, यंदाची निवडणूक ही वेगळी आहे. भाजप आणि त्यांच्या मित्र पक्षांनी साम-दाम-दंड भेद वापरून सत्तेवर यायचे ठरवले आहे. त्यांचा भारतभर फिरणारा अश्वमेधाचा वारू हा महाराष्ट्राता शरद पवार यांनी अडवला आहे. त्यामुळे रात्रंदिवस पंतप्रधान मोदी शरद पवार यांच्यावर टीका करतात.
जयंत पाटील म्हणाले की, नरेंद्र मोदी महाराष्ट्रात आल्यावर केवळ पवार साहेबांवरच बोलणे त्यांच्यावर टीका करणे, याशिवाय देशाच्या पंतप्रधानांना काही बोलताच येत नाही. आम्ही पंडित जवाहरलाल नेहरूंपासून अटल बिहारी वाजपेयी यांच्यापर्यंत अनेकांची भाषणे ऐकली. मात्र, विरोधकांवर नाहक टीका करण्याचे काम आजवरच्या कोणत्याही पंतप्रधानांनी केले नव्हते. मोदींचा 400 पारचा नारा आता बंद झाला आहे. आता भाजप 200 पारही जाणार नाही. मोदी आणि शहा यांनी मराठी माणसाने तयार केलेले दोन पक्ष फोडले. याची शिक्षा मराठी माणूस त्यांना मतदानातून देणार आहे. अमित शहा यांनी गुजरातमध्ये केलेले एक काम सांगावे, अशी टीका जयंत पाटील यांनी केली आहे.
नरेंद्र मोदी काय म्हणाले होते ?
मी जे काही बोलेल ते कोणी व्यक्तिगत घेऊ नये असे सुरुवातीलाच सांगून मोदी म्हणाले, ज्यांची इच्छा पूर्ण होत नाहीत त्यांचा आत्मा भटकत असतो. ज्याचे स्वत:चे काम होत नाही ते दुसऱ्याचेही काम बिघडवतात. महाराष्ट्र अशाच एका अतृप्त आत्म्याचा शिकार झालाय. 45 वर्षांपूर्वी इथल्या एका मोठ्या नेत्याने आपल्या महत्त्वाकांक्षेसाठी या खेळाला सुरुवात केली. तेव्हापासून महाराष्ट्र अस्थिरतेकडे ओढला गेला. यानंतर अनेक मुख्यमंत्री कार्यकाळ पूर्ण करू शकले नाहीत. हा आत्मा केवळ विरोधकांचा नव्हे, तर आपल्या पक्षालाही अस्थिर करतो. आता कुटुंबातही असेच करत आहे. 1995 मध्ये राज्यातील शिवसेना- भाजपच्या सरकारलाही या आत्म्याने अस्थिर करण्याचे काम केले होते. त्यानंतर 2019 मध्ये त्यांनी जनादेशाचा इतका मोठा अपमान केला, जे महाराष्ट्राची जनता जाणून आहे. आज तर हा आत्मा देशात अस्थिरता निर्माण करण्याचा खेळ करत आहे. त्यामुळे अशा भटकत्या आत्म्यापासून देशाला वाचवा, असे आवाहन मोदींनी केले.