फुलरटन हॉल मध्ये स्वामी विवेकानंद यांचा पुतळा बसविण्याचा संकल्प
पुणे, दि. २४ एप्रिल : “भारतीय तत्वज्ञान हे त्याग, भक्ती, आपुलकी आणि सद्भावना यावर आधारित आहे. परंतु दुर्देवाने जगभरात उच्च प्रगत शैक्षणिक प्रणालीमुळे या पैलूला बगल दिली गेली आहे. ११ सप्टेंबर १८९३ रोजी जागतिक धर्म संसदेत भारताचे महान सुपुत्र स्वामी विवेकानंद यांनी उद्गारलेले भविष्यसूचक शब्द केवळ विज्ञान आणि धर्म/अध्यात्म यांचे एकत्रिकरणच मानवजातीत सुसंवाद घडवून शांती निर्माण करेल.” असे विचार एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे संस्थापक अध्यक्ष विश्वधर्मी प्रा.डॉ. विश्वनाथ दा. कराड यांनी व्यक्त केले.
अमेरिकेच्या ऑर्ट इन्स्टिट्यूट ऑफ शिकागो येथील फुलरटन हॉल ज्या ठिकाणी स्वामी विवेकानंद यांनी जागतिक धर्म संसदे दरम्यान विज्ञान, धर्म आणि अध्यात्म या भूमिकेचे सार आणि तत्वज्ञान सांगितले त्या ठिकाणी शिकागो येथील मराठी मंडळातर्फे आयोजित कार्यक्रमात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.
यावेळी अभ्यासक, विचारवंत, तत्वज्ञ, शास्त्रज्ञ आणि एमआयटीचे माजी विद्यार्थ्यी व अन्य नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
त्याच प्रमाणे नागपूर विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ एस.एन.पठाण, एमआयटी डब्ल्यूपीयूचे कुलगुरू डॉ. आर.एम.चिटणीस, प्र कुलगुरू डॉ. मिलिंद पांडे, प्रा.मिलिंद पात्रे व डॉ. महेश थोरवे उपस्थित होते.
यावेळी विश्वधर्मी प्रा.डॉ विश्वनाथ दा. कराड यांनी फुलरटन हॉल मध्ये स्वामी विवेकानंद यांचा पुतळा बसविण्याचा संकल्प घेतला. त्याला उपस्थितांनी अनुमोदन केले.
प्रा.डॉ. विश्वनाथ दा. कराड म्हणाले,“ पृथ्वीवर सतत वाढत जाणारी अराजकता, रक्तपात , भीषण हिंसाचार आणि दहशतवाद तसेच प्राणघातक कोरोना विषाणूमुळे होणारे मृत्यू त्याबरोबरच आण्विक जैविक आणि रासायनिक अस्त्रांच्या प्रसारामुळे २१व्या शतकाचा शेवट मानवाला दिसेल का नाही याची भिती वाटते. त्यामुळे जगात शांतता नांदायची असेल तर अध्यात्माबरोबरच मन आणि आत्म्याचा अभ्यास होणे गरजचे आहे. तसेच, मनाचे रसायनशास्त्र आजपर्यंत कोणालाही कळलेली नाही. त्यासाठी आजच्या शिक्षण पद्धतीमध्ये मनाच्या शास्त्राचा समावेश करावा.”
सकारात्मक मानसिकता विकसित करण्यात आणि जगात शांतता संस्कृतीला चालना देण्यासाठी विज्ञान आणि धर्म यांची नेमकी भूमिका समजून घेणे आवश्यक आहे. विज्ञानाची व्याख्या ही एकात्मता शोधणे आणि पदार्थाची अंतिम स्थिती तर धर्माची व्याख्या ही विश्वाचे अंतिम वास्तव समजून घेणे आहे.
शारीरिकदृष्ट्या तंदुरुस्त, मानसिकदृष्टया सजग, बौद्धिकदृष्ट्या तीक्ष्ण आणि आध्यात्मिक दृष्टया उन्नत असावे जेेणे करून जागतिक समाज कल्याणासाठी मोठे योगदान देऊ शकतील. मानवी मूल्ये रूजवण्याच्या बाबतीत आधुनिक शिक्षण पद्धतीची कमतरता आहे. मानवाला नैतिक आधार आणि नैतिक मूल्ये प्रदान करण्याचे अध्यात्म एक शास्त्र आहे. त्यातच संपूर्ण जगात शांततेची संस्कृती प्रस्थापित करण्यासाठी भारताकडे पाहिले जात आहे.
यावेळी उपस्थितांनी सांगितले की शिकागोच्या फुलरटन हॉल मध्ये १३० वर्षानंतर पुन्हा विज्ञान आणि अध्यात्माच्या समन्वयाचा उदघोष झाला आहे.