श्री जंगली महाराज देवस्थान ट्रस्ट आयोजित श्री जंगली महाराज १३४ वा पुण्यतिथी उत्सव
पुणे : रामायण हे आपल्या देशामध्ये प्रत्यक्ष घडले होते, ते केवळ मिथक नव्हते, याचे अनेक पुरावे आजही उपलब्ध आहेत. रामायण ही केवळ एक कथा नसून ते एक महाकाव्य आहे. या महाकाव्याचा देशाच्या नागरिकांवर संस्कार झालेला आहे. अयोध्येतील राम मंदिर म्हणजे केवळ एक वास्तू नव्हे तर सशक्त राष्ट्र निर्माण करण्यामधील एक महत्त्वाचे कार्य आहे, असे मत ज्येष्ठ अभिनेते राहुल सोलापूरकर यांनी व्यक्त केले.
श्री जंगली महाराज देवस्थान ट्रस्ट, पुणेच्या वतीने आयोजित सद्गुरु श्री जंगली महाराज यांच्या १३४ व्या पुण्यतिथी उत्सवात ‘अयोध्या राम मंदिर इतिहास राष्ट्र मंदिराचा’ या विषयावर आयोजित करण्यात आलेल्या व्याख्यानामध्ये राहुल सोलापूरकर बोलत होते
राहुल सोलापूरकर म्हणाले, आज ज्या ठिकाणी प्रभू श्रीराम चे भव्य मंदिर बांधण्यात आले आहे, त्या ठिकाणी इसवी सन १०० म्हणजेच सुमारे दोन हजार वर्षांपूर्वी राम मंदिर बांधण्यात आले होते. याचे कार्बन फुटप्रिंट पुरावे आजही उपलब्ध आहेत. हे मंदिराचे निर्माण नऊ वेळा करण्यात आले होते हे उत्खननामध्ये सिद्ध झालेले आहे. शरयू नदीच्या वाळूमुळे या ठिकाणी उत्खनन करणे अवघड जात असताना ७२ फूट खोल खनन केल्यानंतर त्या ठिकाणी ५४ खांबांचे मंदिर असल्याचे सिद्ध झालेले आहे.
रामायणाच्या कथा देशातील अनेकांनी ऐकल्या आणि वाचल्या आहेत. रामायणाचे संस्कार देशातील ठराविक नागरिकांवर किंवा समाजावर झालेले नाही तर संपूर्ण हिंदुस्तान वर रामायणाचा प्रभाव आणि संस्कार आहे. रामायणाच्या मुल्यांचा हिंदुस्थानची पायाभरणी करण्यामध्ये महत्त्वपूर्ण योगदान आहे. त्यामुळेच हिंदुस्तानची संस्कृती ही जगातील सर्वश्रेष्ठ संस्कृतींपैकी एक मानली जाते, असेही राहुल सोलापूरकर यांनी यावेळी सांगितले.
रामायण हे केवळ पुस्तकांमध्ये न ठेवता हे विविध माध्यमातून आजच्या तरुण पिढीपर्यंत पोहोचवणे गरजेचे आहे. तसेच रामायण आणि त्यातील मूल्य ही आपल्या जीवनामध्ये कशी अंगीकारता येतील याकडे आपण लक्ष दिले पाहिजे. जीवन कसे जगावे याचे धडे आपण रामायणातून आपल्या तरुण पिढीला देऊ शकतो, त्यामुळे प्रत्येकाने रामायण अभ्यासणे अत्यंत गरजेचे आहे.
रामायण कथेमुळे केवळ आजची तरुण पिढीच सुसंस्कृत होणार नाही, तर एक बलशाली आणि समृद्ध हिंदुस्तान निर्माण करण्यासाठी ज्या मूल्यांची आवश्यकता आहे, ती मूल्ये आपण तरुणांमध्ये रुजवून एक समृद्ध हिंदुस्तान घडवू शकतो ही रामायणाची ताकद आहे.