पुणे: मोदींनी जनतेला गॅस, पेट्रोल, डिझेलच्या किंमती कमी करू,महागाई रोखू, रोजगार देऊ, भ्रष्टाचार हटविण्याची कामगिरी करू असे सांगून जनतेला खोटी आमिषे दाखवून, फसवून निवडणुका जिंकल्या आणि 10 वर्षे सत्ता काबीज केली. एका बाजूला ज्यांनी ज्या कुटुंबाने अनेक वर्षे स्वातंत्र्याआधी आणि नंतर देशाची सेवा केली असे गांधी, नेहरू या कुटुंबातील व्यक्तींच्या हातात सत्ता द्यायची आहे कि फसव्या आणि देशातल्या माणसा- माणसात, जाती-जातींमध्ये, धर्मा- धर्मामध्ये, भाषे-भाषेमध्ये एक प्रकारचा दुरावा आणि अंतर वाढवण्यासाठी सत्तेचा वापर ज्यांनी केला त्यांच्या हातात सत्ता द्यायची आहे.याचा निर्णय आता मतदारांना घ्यायचा आहे असे येथे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी म्हटले आहे.
बारामतीच्या इंदापूर येथे अप्पासाहेब जगदाळे, भरत शेठ शहा व त्यांच्या सहकाऱ्यांच्या पक्ष प्रवेश सोहळ्यात उपस्थितांना पवार यांनी मार्गदर्शन केले. ते म्हणाले “आजचा दिवस इंदापूर तालुक्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा दिवस आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष याच्यामध्ये गेली अनेक वर्षे इंदापूर तालुक्यातील जनतेची सेवा ज्यांनी अतिशय प्रामाणिकपणाने केली आणि ज्यांचा सहकारी संस्थेमध्ये अतिशय चांगला लौकिक आहे, असे आपल्या भागातील ज्येष्ठ नेते अप्पासाहेब जगदाळे त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. त्यांच्याबरोबर शंकररावजी पाटील, सहकारी साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमन भरत शेठ शहा, ज्यांचे घर गेल्या अनेक वर्षांपासून आम्हाला अतिशय परिचित आहे त्याचबरोबर निरा भीमा साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमन कांतीलाल झगडे, त्याचबरोबर कृषी बाजार समिती इंदापूर याचे चेअरमन विलासराव माने, प्रतापराव पालवे, इंदापूर तालुका खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष ज्यांची या ठिकाणी भाषणे झाली ते सगळे सहकारी येथे उपस्थित आहेत. सबंध देशामध्ये लोकसभेच्या निवडणुका आल्या आहेत. देशाची सत्ता ही कोणाच्या हातामध्ये द्यायची? हा निकाल आपल्याला घ्यायचा आहे. एका बाजूला ज्यांनी ज्या कुटुंबाने अनेक वर्षे स्वातंत्र्याआधी आणि नंतर देशाची सेवा केली असे गांधी, नेहरू या कुटुंबातील व्यक्तींच्या हातात सत्ता द्यायची आहे कि तर देशातल्या माणसा- माणसात, जाती-जातींमध्ये, धर्मा- धर्मामध्ये, भाषे-भाषेमध्ये एक प्रकारचा दुरावा आणि अंतर वाढवण्यासाठी सत्तेचा वापर ज्यांनी केला त्यांच्या हातात सत्ता द्यायची आहे.
पवार पुढे म्हणाले, मी अनेक राज्यांमध्ये हिंडत असतो, महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात जात असतो. मी बघतोय की यावेळी लोकांशी मनस्थिती ही एका वेगळ्या दिशेने आहे. काल मी साताऱ्याला होतो. शशिकांत शिंदे एक कामगार नेता, माथाडी कामगारांच्यात काम करणारा त्याचा फॉर्म भरायचा होता आणि मी बघितलं मी की पंधरा ते वीस हजार लोक भर उन्हामध्ये रस्त्याने चालत होते आणि या तरुणाच्या पाठीमागे त्यांनी आपली शक्ती उभी केली. ही स्थिती महाराष्ट्रात सगळीकडे आहे, त्याचे कारण हे आहे की, लोकांना आता लक्षात आलं आहे की या देशाची सत्ता आता पुन्हा मोदींच्या हातात द्यायची नाही. मोदी हे देशाचे प्रधानमंत्री आहेत. त्यांनी बारामतीला एकदा येऊन भाषण केलं, त्यांनी भाषणात सांगितलं की शरद पवार यांचे बोट धरून मी राजकारणात आलो. मोठी गमतीची गोष्ट आहे, देशाचा प्रधानमंत्री माझे बोट धरून येतो, कसा विश्वास ठेवायचा? अनेक गोष्टी त्यांनी सांगितल्या, अनेक आश्वासने दिली. आज ते सांगतात ज्याचा उल्लेख एका वक्त्याने भाषणात केला की शेतकऱ्यांच्या खिशात ६ हजार रुपये मी टाकले. एका बाजूला ६ हजार रुपये शेतकऱ्यांच्या खिशात टाकायचे, दुसऱ्या बाजूला खतांचे भाव वाढवायचे, तेलाचे भाव वाढवायचे, विजेचे दर वाढवायचे, दुसऱ्या बाजूला ती रक्कम काढून घ्यायची.
तुम्ही या ठिकाणी हजारोंच्या संख्येने आलात. तुम्ही मोटरसायकलवर आला असाल, कोणी चार चाकी गाडीने आलं असेल, कोणी दोस्ताच्या गाडीतून आलं असेल हा प्रवास ज्या वाहनांनी तुम्ही करता, त्याला पेट्रोल लागतं. मोदी साहेबांनी २०१४ ला सत्तेत आल्यानंतर त्यांनी सांगितलं की पेट्रोलचा दर आज ७१ रुपये लिटर आहे, २०१४ ला. ५० दिवसांमध्ये मी याचा दर ५० टक्क्यांनी कमी करतो. लोकांना वाटलं चांगलं आहे, आजचा पेट्रोलचा दर तो जो होता तो ५० दिवसात हे कमी करतात. आज काय झालं आहे? २०१४ ला मोदींनी घोषणा केली की पेट्रोलचा भाव, डिझेलचा भाव ५० टक्के कमी करतो त्याला आज ३ हजार ६५० दिवस झाले. ३ हजार ६५० दिवसांपूर्वी मोदींचे हे आश्वासन होते, झाले का ५० टक्के भाव? आज पेट्रोलचा भाव काय आहे १०६. म्हणजे ते आणणार होते ५० टक्के कमी तर त्याचा भाव किती वाढलेला आहे.
आमच्या आया बहिणी इथे बसल्या आहेत, स्वयंपाक करायला गॅसचा सिलेंडर वापरतात. २०१४ ला मोदींनी सत्ता हातात घेतली तेव्हा सिलेंडरची किंमत ४१० रुपये होती. आज किती आहे? आज १ हजार १६० झाली. ४१० वरून १ हजार १६० सिलेंडरची किंमत कसा विश्वास ठेवायचा यांच्यावर? मोदींनी सांगितलं २०१४ ला या देशातील बेकारी आम्ही घालवणार आणि त्यासाठी दरवर्षी २ कोटी मुलांना रोजंदारी देणार असं आश्वासन दिलं. आज काय दिसतंय, आज हिंदुस्थानामध्ये जे एकंदर तरुण आहेत, बेकार आहेत, त्या शंभरातल्या बेकार तरुणांपैकी ८७ तरुणांना आज नोकरी नाही. आज अनेक गोष्टी सांगता येतील. त्यांनी सांगितलं की या देशामध्ये काळा पैसा आणि नोटबंदी मी करणार.२०१६ रोजी ८ नोव्हेंबरला एका रात्री मोदींनी एक धोरण जाहीर केलं, ते धोरण काय होतं? नोटबंदी. १०० रुपये, ५०० रुपये आणि १ हजार रुपयांच्या नोटा रद्द झाल्या आणि सांगितलं की काळा पैसा संपेल. नुसता काळा पैसा संपणार नाही तर गरिबांच्या खिशात आम्ही त्या ठिकाणी १५ लाख रुपये जमा करणार. घडलं काय? १५ लाख सोडा, पण १५ रुपये सुद्धा गरीब माणसाच्या खिशामध्ये पडलेले नाही. आणखीन एक गोष्ट त्यांनी सांगितली की मला सत्ता द्या, मी भ्रष्टाचार संपवतो. आज देशामध्ये झालंय काय? जे भ्रष्टाचारी आहेत त्यांना जवळ घेतात, मोदींच्या पक्षात घेतात आणि त्यांना स्वच्छ करतात. आज मोदींचे सरकार भ्रष्टाचार स्वच्छ करण्याचं क्लिनिंग मशीन झालंय. जसा सदरा क्लिनिंग मशीन मध्ये टाकतात मळका आणि तो बाहेर येतो तसं भ्रष्टाचारी, त्याला या क्लिनिंग मशीन मध्ये टाकला आणि बाहेर काढला आणि सांगितलं आता स्वच्छ झाला. भ्रष्टाचार नाही संपला मग केलं काय यांनी?
पवार म्हणाले,मला अतिशय आनंद आहे की आज या ठिकाणी अप्पासाहेब आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी अतिशय महत्त्वाचा निकाल घेतला. मी त्यांच्या निर्णयाचं स्वागत करतो. एक विधायक काम करणारा नेता आज या ठिकाणी आल्यानंतर त्यांनी काही मागितलं नाही, पद मागितलं नाही. त्यांनी एकच गोष्ट सांगितली की गरीब माणसाला आजारी पडल्यानंतर कमी किमतीमध्ये आरोग्य सेवा ही मिळावी आणि ती मिळण्यासाठी सगळ्यांना विश्वासात घेऊन हॉस्पिटल काढत असाल तर त्यासाठी दोन एकर जमीन मी स्वतःची द्यायला तयार आहे. हे आज या ठिकाणी त्यांनी सांगितलं. याचा अर्थ हा आहे की आज राष्ट्रवादीमध्ये येणारे नेते जनतेची सेवा करण्यासाठी येतात, जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी येतात आणि त्यासाठी प्रसंगी स्वतःच्या खिशाला झळ द्यायची ही सुद्धा त्यांची तयारी आहे. आज इंदापूर मध्ये दोन अडीच एकर जमीन घ्यायची याचा अर्थ त्याची किंमत काय, हे मी तुम्हाला सांगण्याची गरज नाही. एवढं समाजासाठी काम करू पाहणारा नेता आज या ठिकाणी आला आहे, तुम्ही आणि मी त्यांचे सन्मानाने या ठिकाणी स्वागत केले पाहिजे. मी एवढेच सांगू इच्छितो.
आम्ही लोकांनी निकाल घेतला आहे, आतापर्यंत आम्ही लक्ष देत नव्हतो. मारामारी नको, मतभेद नको ही भूमिका होती. आता हे ठरवलंय की जसं बारामती असेल, महाराष्ट्राची अनेक मोठी गाव असतील तिथे अनेक कार्यक्रम आम्ही राबवली, अनेक धोरण राबवली, अनेक संस्था उभ्या केल्या. हाच दृष्टिकोन मला इंदापूर तालुक्यामध्ये घ्यायचा आहे. इथे काही लोकांना मदत केली. हल्लीच्या सरकारमध्ये राष्ट्रवादीच्या वतीने एका माणसाला तिकीट दिलं, त्याला निवडून आणलं, त्याला मंत्री केलं. अपेक्षा ही होती की सत्ता मिळाल्यानंतर त्या सत्तेचा वापर इंदापूर तालुक्यातल्या गोरगरीब जनतेच्या आणि तरुणांच्या हितासाठी ते वापरतील, पण हे काम त्यांनी केले नाही. केंद्र सरकार असो, राज्य सरकार असो त्यांच्या योजना आणि त्यांचा लाभ हा व्यक्तीश: कसा घेता येईल? असा प्रयत्न या ठिकाणी केला गेला आणि याच्याबद्दलची नाराजी आज इंदापूरकरांच्या मनात आहे. ते दुरुस्त करायचं असेल तर या लोकांना त्यांचे स्थान दाखवले पाहिजे आणि त्याची सुरुवात उद्याच्या लोकसभेच्या निवडणुकीतून झाली पाहिजे.
आज या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये याच्या आधी ३ वेळेला तुम्ही लोकांनी सुप्रिया सुळे यांना निवडून दिलं. देशामध्ये जे एकंदर खासदार आहेत, त्या खासदारांमध्ये पहिले २ खासदार जे नित्याने हजर असतात, संसदीय चर्चेमध्ये भाग घेतात, लोकांच्या प्रश्नांची मांडणी करतात, त्या पहिल्या ३ आणि ३ मध्ये सुप्रिया सुळे यांचे नाव हा संबंध हिंदुस्थानामध्ये आहे आणि म्हणून देशाचे काम ते करतात. कशाचीही अपेक्षा करत नाही, कसलाही डाग विरोधकांनी सुद्धा कधी अंगावर टाकला नाही असं स्वच्छ काम करणारी व्यक्ती पुन्हा एकदा आज निवडणुकीच्या रूपाने तुम्हा सर्वांसमोर उभी आहे. या वेळेला त्यांची खूण बदलली त्यांची खूण आज तुतारीची आहे. माझी खात्री आहे की हा तुतारीचा आवाज महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये प्रत्येकाच्या कानात जाईल त्याच्यातून तो जागृत होईल, त्या जागृतीच्या जोरावर जे काही परिवर्तन करायचं आहे ते परिवर्तन तुमच्या पाठिंब्याने आपण नक्की करू एवढाच विश्वास या ठिकाणी बाळगतो आणि या सगळ्या कामाला अप्पासाहेब आणि त्यांच्याबरोबर आलेले सगळे सहकारी या सगळ्यांच्या मागे पूर्ण ताकतीने मी स्वतः उभा राहील ही खात्री या ठिकाणी देतो असे ते म्हणाले.