मुंबई- सत्ताधारी भाजपची युती गद्दारांची आहे. या गद्दारांच्या युतीचा पराभव करण्यासाठी महाविकास आघाडीचा विजय होणे महत्त्वाचे आहे. यासाठी कुणीही एमआयएम व वंचित बहुजन आघाडीला मतदान करू नये, असे आवाहन महात्मा गांधी यांचे पणतू तुषार गांधी यांनी केले आहे. त्यांच्या या आवाहनावर वंचित बहुजन आघाडीने तीव्र आक्षेप घेत त्यांची टीका फेटाळून लावली आहे. वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांची महाविकास आघाडीसोबतची जागावाटपाची चर्चा निष्फळ ठरली. त्यामुळे त्यांनी एकला चलो रेची भूमिका घेत स्वतंत्रपणे निवडणूक लढवण्याची घोषणा केली. त्यांनी मविआविरोधात उमेदवारही दिले. आता त्यांच्या निर्णयावर तुषार गांधी यांनी टीकेची झोड उठवली आहे. तुषार गांधी एका मराठी वृत्तवाहिनीशी बोलताना म्हणाले की, भाजपची युती ही गद्दारांची युती आहे. तिचा पराभव झाला पाहिजे. यासाठी मतदारांनी एमआयएम व वंचित बहुजन आघाडीला मतदान करू नये. महाविकास आघाडीला मतदान करावे, असे ते म्हणाले.
यापूर्वी जी चूक झाली तीच पुन्हा होण्याची भीती आहे. त्यामुळे आमची कितीही चांगली मैत्री असली तरी चुकीला चूक म्हणण्याची वेळ आला आली आहे. कारण, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे संविधान वाचवण्याची ही शेवटची संधी आहे, असे तुषार गांधी म्हणाले.
वंचित बहुजन आघाडीचे प्रत्युत्तर
दुसरीकडे, तुषार गांधी यांच्या या टीकेला वंचित बहुजन आघाडीने सडेतोड प्रत्युत्तर दिले आहे. वंचितचे मुख्य प्रवक्ते सिद्धार्थ मोकळे म्हणाले की, प्रस्थापित पक्ष व त्या पक्षांच्या राजकारणाला मदत करणाऱ्या सहयोगी घटकांची शोषित व वंचितांचे राजकारण उभे राहू नये अशी इच्छा आहे. त्यामुळे ते सातत्याने असे प्रयत्न करतात. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनाही असाच विरोध झाला. त्यांच्यावरही इंग्रजांचे हस्तक असल्याचे आरोप झाले. तेच नरेटिव्ह आता प्रकाश आंबेडकर यांच्याविषयी वापरले जात आहे. प्रकाश आंबेडकर लोकशाहीचा वास न पोहोचलेल्या पालापर्यंत समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचा प्रयत्न करत आहेत. ते येथील प्रस्थापितांना सहन होत नाही, असे ते म्हणाले.
तुषार गांधींचे भाजपमधून काँग्रेसमध्ये आलेल्या व काँग्रेसमधून भाजपत गेलेल्या पलटूरामांवर काय विचार आहेत? महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांपैकी एखादा पक्ष उद्या भाजपसोबत जाणार नाही याची खात्री त्यांना देता येईल का? आम्हाला बी टीम म्हणणे सोपे आहे. पण यांच्याकडील नेते कधी जातील हे सांगता येत नाही. तुषार गांधी ज्या काँग्रेसच्या बाजूने नेहमी बोलतात, त्या काँग्रेसचा एक प्रवक्ता परवा शिंदे गटात गेला. त्यावर तुषार गांधींचे काय म्हणणे आहे? माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण भाजपमध्ये जातात आणि एकनाथ खडसे निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादी सोडून पुन्हा भाजपत जातात यावरही त्यांचे काय विचार आहेत? अशा विविध प्रश्नांचा भडिमार सिद्धार्थ मोकळे यांनी या प्रकरणी तुषार गांधी यांच्यावर केला.