पुणे-सलग सहा वेळा निवडून येत असतानाही पक्षातील अंतर्गत राजकारणात डावलले जात असेल तर कधीपर्यंत सहन करायचे. दरवेळी तुम्ही गप्प का बसायचे? मग कार्यकर्त्यांची दखल कोण घेणार, त्यांना कधी न्याय मिळणार अशी प्रश्नांची सरबत्ती करताना तुमची प्रगती नाहीतर शहराचीही नाही आणि कार्यकर्त्यांचीही नाही. शासकीय नोकऱ्यांमध्ये पदोन्नती, इन्क्रिमेंट असते.ती राजकारणात का नाही अशा भावना एकनिष्ठ कार्यकर्त्यांनी मांडल्या.
माजी उपमहापौर आबा बागुल यांच्या समर्थनार्थ सहकारनगर येथील श्री लक्ष्मीमाता मंदिर येथे एकनिष्ठ कार्यकर्त्यांचा मेळावा पार पडला. त्यावेळी या भावना कार्यकर्त्यांनी व्यक्त केल्या. यावेळी माजी उपमहापौर आबा बागुल, संरक्षण विभागातून निवृत्त झालेले घनःश्याम सावंत,अनिल जाधव तसेच रमेश भंडारी, नंदकुमार बानगुडे,द.स.पोळेकर,गुलाब नेटके आदींसह पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी घनःश्याम सावंत म्हणाले, शासकीय नोकऱ्यांमध्ये दर दहा वर्षांनी पदोन्नती नाहीतर इन्क्रिमेंट तरी असते. पण राजकारणात चांगले कार्य करणाऱ्या व्यक्तीला तेही मिळत नाही. हेच आबा बागुल यांना यंदाच्या लोकसभा निवडणुकीत डावलल्यामुळे अधोरेखित झाले आहे. मग असे असेल तर किती काळ आपण गप्प बसायचे.त्यामुळे तुम्ही गप्प बसले तरी आता आम्ही गप्प बसणार नाही. किती काळ अन्याय सहन करायचा याकडे त्यांनी लक्ष वेधले.
संरक्षण विभागातील निवृत्त अधिकारी अनिल जाधव म्हणाले, लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेस पक्षाचे नक्की निकष काय ? काय पाहून उमेदवारी दिली जाते हाच मोठा प्रश्न आहे. जर निवडून येण्याची क्षमता असेल तर आबा बागुल यांच्यात ती क्षमता मोठी आहे आणि ते सहजरित्या विजय संपादन करू शकतात यात कुणाचेही दुमत नाही ;पण काँग्रेसमध्ये नुकत्याच आलेल्या व्यक्तीला उमेदवारी दिली जाते मग काँग्रेस पक्षाच्या एक व्यक्ती,एक पद या धोरणाला काय अर्थ? असा सवालही त्यांनी केला. एकीकडे राहुल गांधी देशभर न्याय यात्रा काढून फिरत असताना अशाप्रकारे काँग्रेसच्या एक व्यक्ती,एक पद या धोरणाला राज्यात हरताळ फासणाऱ्यांचा राहुल गांधी यांना कायम भ्रमंती करायला भाग पडायचा हेतू आहे का ? हा संशयही बळावत आहे. राहुल गांधी यांच्या देश भ्रमंती प्रमाणे अन्य पक्षातून ‘भ्रमंती’ करणारे राज्यातील काँग्रेस नेतृत्वांना दिसत असेल तर आबा बागुल यांच्या सारखा एकनिष्ठ कधी दिसणार ? याकडे त्यांनी लक्ष वेधले.
आई वडिलांची सेवा हीच ईश्वर सेवा हे तत्व कायम पाळणारे आबा बागुल यांनी दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणले . गुन्हेगारी , व्यसनापासून मुलांना दूर ठेवण्यासाठी हरवलेले संस्कार मालिका सुरु केली.नगरसेवक पदाच्या माध्यमातून प्रभागच काय संपूर्ण शहराच्या विकासाला दिशा दिली. मग तुमचीच प्रगती होणार नसेल तर आमची कधी होणार अशा व्यथा यावेळी कार्यकर्त्यांनी मांडताना आबा बागुल यांच्यात खासदार व्हायची क्षमता आहे आणि तरच शहराची प्रगती होईल. त्यामुळे तुम्ही आता गप्प बसायचे नाही आणि आम्ही गप्प बसणार नाही लोकसभेसाठी नाही परंतु आता येणाऱ्या विधानसभेत आपण आमदार म्हणून जाण्यासाठी अशी आडकाठी आम्ही कदापि सहन करणार नाही. अशी भूमिकाही मांडली.
यावेळी माजी उपमहापौर आबा बागुल म्हणाले, जेंव्हा त्यांना कळेल तेंव्हा ;पण आपण आपले काम सुरूच ठेवायचे.हीच आपली भूमिका आहे. आपला ‘हात’ कणखरच ठेवायचा मात्र त्या हातात कधीच ‘कमळ’ येणार नाही. न्याय कधी ना कधी तरी मिळेल. राजकारणच म्हणजेच सर्व काही नाही. समाजकारण हेच महत्वाचे आहे. त्यामुळे निराश होऊ नका. उलट मन प्रफुल्लित ठेवा. उशीर झाला तरी आपण थेट सर्व काही मिळवू असा आशावाद आबा बागुल यांनी व्यक्त करताना पुढच्या बैठकीत रूपरेषा ठरवू असेही त्यांनी स्पष्ट केले. या वेळी शहरातील विविध भागांतील महिला व पुरुष एकनिष्ठ कार्यकर्ते उपस्थित होते. प्रास्ताविक अमित बागुल यांनी केले.