▪️आषाढीवारीच्या काळात सर्व संबंधित विभागाने समन्वय ठेवून काम करावे-मुख्य कार्यकारी अधिकारी
पुणे, दि. 2: आषाढी वारी ही महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि आध्यात्मिक परंपरेचा अमूल्य वारसा आहे. लाखो वारकऱ्यांच्या आरोग्याचे संरक्षण, सुरक्षितता आणि मुलभूत सुविधांची प्रभावी अमलबजावणी ही प्रशासनाची सर्वोच्च जबाबदारी आहे. प्रत्येक विभागाने परस्पर समन्वय ठेवून जबाबदारीने काम करावे, वारकऱ्यांच्या सेवेमध्ये हलगर्जीपणा करु नका, प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करावेत, अशा सूचना मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील यांनी दिल्या.
श्री क्षेत्र देहू येथून जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज व श्री क्षेत्र आळंदी येथन संतश्रेष्ठ श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखीसोबत प्रस्थान करणाऱ्या लाखो वारकऱ्यांना सुरक्षित, स्वच्छ आणि गुणवत्तापूर्ण आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी जिल्हा प्रशासनाने व्यापक स्वरुपात नियोजन पूर्ण केले असून, त्याकामांची कामांची जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील यांनी पाहणी पालखी मार्गावर जावून प्रत्यक्ष स्थळ पाहणी केली.
यावेळी दौंड, बारामती, इंदापूर, जिल्हा परिषद गटनेते, सदस्य व पंचायत समितीचे सभापती, उपसभापती, सदस्य यांच्यासह अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकात वाघमारे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रामपंचायत) भूषण जोशी, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. रामचंद्र हंकारे, ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता अमित पाथरवटकर यांच्यासह उप विभागीय अधिकारी उत्तम दिघे, तहसीलदार, गटविकास अधिकारी, ग्रामविकास, आरोग्य, सार्वजनिक बांधकाम, महसूल, पोलीस, स्वच्छता, नगरपालिका विभागांचे अधिकारी-कर्मचारी, स्थानिक लोकप्रतिनिधी उपस्थित होते.
या पाहणीदौऱ्यावेळी पालखी मार्गावरील पिण्याच्या पाण्याच्या स्रोतांची स्वच्छता आणि नियमित क्लोरीनेशन. हॉटेल, भोजनालये व अन्नविक्री केंद्रांमधील अन्नसुरक्षा आणि स्वच्छतेची तपासणी, धूर फवारणी, डास नियंत्रण आणि संसर्गजन्य आजार प्रतिबंधक उपाययोजनांचा आढावा, वारकऱ्यांसाठी उभारण्यात येणारी तात्पुरती आरोग्य केंद्रे, आयसीयू सुविधा, जर्मन हँगर, चरणसेवा केंद्रे आणि वैद्यकीय पथकांची तयारी. १०८ व १०२ रुग्णवाहिका सेवा तसेच एएलएस व बीएलएस रुग्णवाहिकांची उपलब्धता, मुक्कामस्थळी औषधसाठा, प्रशिक्षित आरोग्य कर्मचारी आणि आपत्कालीन उपचार व्यवस्थेची तयारी, सार्वजनिक व तात्पुरत्या शौचालयांची स्वच्छता, कचरा व्यवस्थापन आणि पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, नियंत्रण कक्ष, आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा आणि विभागनिहाय कृती आराखड्याची अंमलबजावणी,[ पालखी मार्गावरील रस्त्याची स्थिती, स्वच्छता आणि वारकऱ्याऱ्यांसाठी उपलब्ध नागरी सुविधांची प्रत्यक्ष आदी बाबींची पाहणी केली.
“वारकऱ्यांची सेवा हीच विठ्ठल सेवा” या भावनेतून इंदापूर, दौंड आणि बारामती तालुक्यांतील सर्व यंत्रणा पूर्ण क्षमतेने कार्यरत असून, आषाढी वारी सुरक्षित, स्वच्छ, सुव्यवस्थित आणि निरोगी वातावरणात पार पडण्यासाठी पुणे जिल्हा प्रशासन सज्ज असल्याचा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.

