जालना–
लोकसभा निवडणुकीत मनोज जरांगे पाटील हे प्रत्येक जिल्ह्यात अपक्ष उमदेवार उभे करणार होते, त्यासाठी त्यांनी विविध जिल्ह्यामधून मराठा समाजबांधवांकडून अहवाल देखील मागविला होता. या अहवालानंतर मनोज जरांगे पाटील यांनी मोठी घोषणा केली आहे. या लोकसभा निवडणुकीमध्ये मी कोणालाही पाठिंबा देणार नाही. कोणताही अपक्ष उमेदवार देखील उभा करणार नाही, ज्यांना ज्या उमेदवाराला पाडायचं त्यांनी त्या उमेदवाराला पाडावं, पराभूत करावं. पण समाजाच्या मागण्यांसाठी मी निवडणुकीच्या आडून राजकारण करू इच्छित नाही, अशी घोषणा मनोज जरांगे पाटील यांनी केली आहे. ते आंतरवाली सराटीमध्ये आयोजित मराठा समाजबांधवांच्या बैठकीत बोलत होते.मराठा आरक्षणासाठी राज्यभर रानं पेटवणारे मनोज जरांगे पाटील हे या लोकसभा निवडणुकीत काय भूमिका घेणार याकडे संपूर्ण मराठा समाजाचे लक्ष लागून होते. यासंदर्भात 24 मार्च रोजी आंतरवाली सराटी या ठिकाणी बैठक देखील झाली. त्यानंतर गावागावाच जाऊन उमेदवार उभा करायचा का, एकच अपक्ष उमेदवार उभा करायचा याची विचारपूस करावी, असे आवाहन जरांगे पाटील यांनी केले. त्यानंतर आज शनिवारी पुन्हा मराठा समाजाबांधवांची एकत्र बैठक पार पडली. या ठिकाणी लोकांनी आणलेल्या अहवालानंतर चर्चा झाली. अखेर मराठा समाजबांधवांनी आणलेल्या अहवालानंतर जरांगे पाटील यांनी आपली भूमिका स्पष्ट केली.
जरांगे म्हणाले की, लोकसभा असो किंवा अन्य कोणतीही निवडणूक हा आपला प्रांत नाही. निवडणुकीच्या आडून मी मायबाप समाजाचे नुकसान होऊ देणार नाही. ज्यांना ज्यांना ज्या उमेदवाराला पाडायचं, सपोर्ट करायचा हा ज्याचा त्याचा व समाजाबांधवांचा प्रश्न आहे. यात कोणाचाही पाठिंबा मी देणार नाही कोणालाही मदत करणार नाही. अशी भूमिका त्यांनी घेतली. तसेच आपण अपक्ष उमेदवार देखील देणार नाही, अशी घोषणा जरांगे पाटील यांनी घेतली.
जरांगे पाटील व प्रकाश आंबेडकर यांची भेट
दरम्यान, वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी मनोज जरांगे पाटील यांची बुधवारी रात्री भेट घेतली. आंतरवाली सराटीमध्ये मध्यरात्री बाराच्या सुमारास प्रकाश आंबेडकर हे आंतरवाली सराटी मध्ये दाखल झाले. यावेळी मनोज जरांगे पाटील आणि प्रकाश आंबेडकर यांच्यात तासभर चर्चा झाल्याची माहिती मिळत आहे. या भेटीमुळे राजकीय वर्तुळात चर्चा रंगल्या आहेत. तर या भेटीसंदर्भात दोन्ही नेत्यांनी बोलणे टाळले. ही केवळ सदीच्छा भेट होती, असे आंबेडकर म्हणाले. तर प्रकाश आंबेडकर साहेब यांनी अचानक घरी भेट दिली. ते ज्येष्ठ नेते आहेत, ते भेटायला आले त्यांचे मनापासून स्वागत केले, असे मनोज जरांगे पाटील म्हणाले होते.