पुणे- शिरूर लोकसभा मतदार संघात शिवाजीराव आढळराव पाटील हेच घड्याळ चिन्हावर लढतील, ते सामान्य जनतेच्या कामाला येणारे नेते आहेत , अमोल कोल्हे हे अभिनेते आहेत , ते छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका केल्याचे सांगतात पण त्यांनी नथुराम गोडसेची देखील भूमिका केलीय .. कॉंग्रेस वाल्यांना असे चालणार आहे काय ?असा सवाल करत आज अजित पवार यांनी आढळराव पाटील यांच्या राष्ट्रवादीत प्रवेशाच्या वेळी मोदी शहांचे भरभरून कौतुक करत आढळरावांची उमेदवारी जाहीर केली आणि अमोल कोल्हे यांच्यावर टीका केली .
‘सध्याचा खासदार डायलॉगबाजी करण्यात वस्ताद आहे. लोकांचे प्रश्न सोडविण्यासाठी घाम गाळावा लागतो. चित्रपट, मालिका तेवढ्यापुरते पाहू; पण सर्वसामान्य लोकांचे प्रश्न सोडविण्यासाठी आणि त्यांच्या हाकेला धावून जाणारा माणूस खासदार म्हणून निवडून द्यावा लागतो,’ अशा शब्दांत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शिरूरचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्यावर मंगळवारी टीकास्त्र सोडले.राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांना पवार यांनी शिरूर लोकसभेची उमेदवारी जाहीर केली.मंचर येथील कार्यक्रमात शिवसेनेचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील आणि शेकडो कार्यकर्त्यांचा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते आणि ‘राष्ट्रवादी’चे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील, आमदार दिलीप मोहिते पाटील, अतुल बेनके यांच्या उपस्थितीत ‘राष्ट्रवादी काँग्रेस’मध्ये प्रवेश झाला.’आढळरावांची घरवापसी झाली आहे. कोल्हे यांना मी शिवसेनेतून ‘राष्ट्रवादी’त आणून खासदार केले. त्यांची घरवापसी करायची झाली, तर शिवसेना, मनसे असे अनेक पक्ष शोधावे लागतील, असा टोला पवार यांनी लगावला. ‘नेता पराभूत होत नसेल, तर कलाकाराला समोर उभे करावे लागते. याचप्रमाणे मी कोल्हे यांना आढळरावांच्या विरोधात उभे केले. आढळरावांचा पराभव करताना आमच्या तोंडाला फेस आला होता,’ अशी कबुली देऊन आता त्याच आढळरावांना पुन्हा निवडून आणण्याचे आवाहन पवार यांनी केले.