मुंबई-उपराष्ट्रपती जगदीप धनखड आज मुंबईत श्रीमद राजचंद्र जयंती – ‘आत्मकल्याण दिना’ निमित्त आयोजित कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून सहभागी झाले आणि श्रीमद राजचंद्रजींच्या प्रतिमेचे अनावरण केले. या कार्यक्रमाला संबोधित करताना धनखड म्हणाले की, येथे येऊन मी धन्य झालो आहे. गुरुदेव राकेश जी यांचे आशीर्वाद सदैव माझ्या स्मरणात राहतील.
उपराष्ट्रपती म्हणाले की, गेल्या शतकातील महापुरुष महात्मा गांधी होते आणि या शतकातील युगपुरुष नरेंद्र मोदी आहेत. महात्मा गांधींनी सत्याग्रह आणि अहिंसेच्या माध्यमातून आपल्याला इंग्रजांच्या गुलामगिरीतून मुक्त केले होते आणि भारताचे यशस्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अनेक शतकांपासून आपल्याला देशाला ज्या मार्गावर बघायचे होते त्या मार्गावर आणले आहे. ते पुढे म्हणाले की, राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी या दोन महान व्यक्तींमध्ये एक साम्य आहे,आणि ते साम्य म्हणजे या दोघांनाही श्री राजचंद्रजींचा मनापासून आदर आहे. राजचंद्रजीं सारखे महत्त्वाचे व्यक्तिमत्त्व इतिहासात सापडणे कठीण आहे.
ते पुढे म्हणाले की, श्रीमद राजचंद्र मिशन लाखो लोकांचे जीवन सुखकर करत आहे, लोकांचे जीवन बदलत आहे, हे मिशन मानव कल्याणाचे स्तुत्य कार्य करत आहे यात शंका नाही. भारत ही शतकानुशतके महापुरुषांची जननी आहे. भारत हे जागतिक संस्कृतीचे केंद्र आहे. भारतीय संस्कृती 5000 वर्षांहून अधिक जुनी आहे. जगात असा कोणताही देश नाही की ज्याची संस्कृती आपल्या देशाइतकी प्राचीन आणि समृद्ध आहे. ते म्हणाले की, आजच्या दिवसाचे वैशिष्ट्य बघा , श्रीमद राजचंद्रजींची जयंती, कार्तिक पौर्णिमा आणि प्रकाश पर्व,या तिन्ही गोष्टी एकाच दिवशी आल्या असून आपल्या संस्कृतीचे वैभव दर्शवतात.
आध्यात्मिक ज्ञान आणि संस्कृती ही आपली ताकद आहे, जगातील मोठमोठ्या देशांमधून लोक शांततेच्या शोधात आपल्या देशात येतात आणि हे पाहून खूप समाधान वाटते. अनेक शतकांपासून भारत हा संस्कृती आणि सभ्यतेचा केंद्रबिंदू आहे. ते म्हणाले की, पृथ्वी ही केवळ मानवांसाठी नाही, ही पृथ्वी सर्व प्राणिमात्रांसाठी आहे, वसुधैव कुटुंबकमचे ब्रीदवाक्य एक पृथ्वी, एक कुटुंब, एक भविष्य यामध्ये ते अंतर्निहित आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राबविलेल्या स्वच्छता अभियानाचा आणि महिलांना दिलेल्या आरक्षणाचा संदर्भ देत उपराष्ट्रपती म्हणाले की, राजचंद्रजी आणि महात्मा गांधीजी आज प्रत्यक्ष उपस्थित असते तर त्यांनीही या कार्यक्रमांची प्रशंसा केली असती. महिला आरक्षणामुळे समाजात सकारात्मक बदल घडून त्यांना त्यांचे हक्क मिळतील, असे ते म्हणाले.
देशाच्या स्वातंत्र्यासाठी ज्यांनी बलिदान दिले, त्याग केला त्या सर्वांची दखल घेऊन, त्यांना शोधून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमृत काळात महान कार्य केले आहे, असे उपराष्ट्रपती धनखड म्हणाले. भारताची आज जगात एक वेगळी ओळख आहे, भारत हा 140 कोटी लोकसंख्येचा प्रतिभावान देश आहे, ते म्हणाले.
धनखड यांनी वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांना इशारा देताना सांगितले की, शिक्षण, समानता आणि चांगल्या वागणुकीमधून देशात बदल घडून येतो. रस्त्यावरील आपली वागणूक कायद्याचे पालन करणारी असेल तर भारत बदलल्याचे जगाला दिसेल, असे सांगून ते पुढे म्हणाले की, मुंबई शहर रस्त्यांवरील शिस्तीसाठी ओळखले जाते.
उपराष्ट्रपती म्हणाले की, लोकशाहीच्या ज्या मंदिरांमध्ये वाद-विवाद, चर्चा आणि विचारमंथन यांच्या परंपरेने भरभराट व्हायला हवी, तिथे गोंगाट आणि व्यत्यय येतो. संविधान सभेचा उल्लेख करून उपराष्ट्रपती म्हणाले की, संविधान बनले तेव्हा संविधान सभेत तीन वर्षे चर्चा झाली, मतभेदाचे मुद्दे होते, पण कोणत्याही प्रकारचा गदारोळ झाला नाही, कोलाहल झाला नाही, कोणीही हौद्यात उतरले नाही, की कोणीही फलक झळकावले नाहीत.
आज भारत जगात वेगाने विकसित आहे, जागतिक अर्थव्यवस्थेत भारताने पाचवे स्थान मिळवले आहे, ब्रिटन आणि फ्रान्सला मागे टाकले आहे आणि 2030 पर्यंत जपान आणि जर्मनीलाही तो मागे टाकेल.
ते पुढे म्हणाले की, आज भारतातील लोक जगभरातील 20 मोठ्या कॉर्पोरेट कंपन्यांमध्ये महत्त्वाच्या पदांवर कार्यरत आहेत. भारत जलद गतीने विकास साधत आहे. जमिनीवर, सागरात आणि नभात तिन्ही ठिकाणी वेगाने प्रगती करत आहे. ते म्हणाले की, एखादा देश किंवा व्यक्ती खूप पुढे जाते, तेव्हा काही लोक विरोधात येतात, काही शक्ती आपल्या देशाचा विकास थांबवतात, काही शक्तींना आपल्या देशाचा विकास पचवता येत नाही, देशात कुठलेही चांगले काम झाले की ते वेगळ्याच दिशेने जातात, असे होता कामा नाही, अशा परिस्थितीत तुमच्यासारख्या सुज्ञ लोकांनी गप्प बसता कामा नाही. हे संकट फार मोठे आहे, ते छोटे नाही, त्याचा फटका देशाला सहन करावा लागत आहे.
देशात असे वातावरण निर्माण करण्याची आवश्यकता आहे, आपण एक अशी संस्कृती विकसित करूया ज्यामध्ये सर्वजण राष्ट्र सर्वोच्च स्थानावर ठेवतील.आपण भारतीय असल्याचा अभिमान बाळगायला हवा, आपल्या ऐतिहासिक कामगिरीचा आपल्याला अभिमान हवा,आपण ज्या गोष्टींची कधी कल्पनाही केली नव्हती अशा गोष्टी आज वास्तवात साकारल्या आहेत. श्रीमद राजचंद्र मिशनद्वारे चालवण्यात येणाऱ्या कल्याणकारी कार्याची प्रशंसा करत आभार व्यक्त करून उपराष्ट्रपतींनी संबोधनाचा समारोप केला.
यावेळी महाराष्ट्राचे राज्यपाल रमेश बैस,महाराष्ट्राचे कॅबिनेट मंत्री मंगल प्रभात लोढा,श्रीमद राजचंद्र मिशन धरमपूरचे प्रमुख गुरुदेव राकेश जी , मिशनचे उपाध्यक्ष आत्मर्पित नेमीजी, महाराष्ट्राचे पोलीस आयुक्त यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.