महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ, वंचित विकास यांच्या वतीने महिलांसाठी ‘उद्योजकता विकास कार्यशाळा’
पुणे : “देशाच्या प्रगतीत महिलांचे योगदान मोठे आहे. सन्मानाने जगण्यासाठी महिलांनी आर्थिक सक्षम होणे गरजेचे आहे. महिलांमध्ये उपजत नियोजन, समन्वय व जबाबदारीचे भान असते. त्यामुळे त्यांच्यातील उद्यमशीलतेला प्रोत्साहन दिले, तर त्या चांगल्या रीतीने उद्योग-व्यवसाय उभारू शकतील,” असे मत महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी नित्यानंद पाटील यांनी व्यक्त केले.
महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ आणि वंचित विकास यांच्या संयुक्त विद्यमाने महिला उद्योजकांसाठी एकदिवसीय उद्योजकता विकास प्रशिक्षण कार्यशाळेत कर्ज प्रस्ताव व पुरवठा या विषयावर नित्यानंद पाटील बोलत होते. नारायण पेठेतील वंचित विकासच्या केंद्र कार्यालयात ही कार्यशाळा झाली. प्रसंगी वंचित विकासच्या कार्यवाह मीना कुर्लेकर, संचालक सुनीता जोगळेकर, समन्वयक तेजस्विनी थिटे आदी उपस्थित होते.
सरकारी योजना व संधी यावर जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी सतीश खरात, व्यवसायासाठी लागणाऱ्या कागदपत्रांविषयी व अर्थसहाय्य याविषयी जनता सहकारी बँकेचे सहायक महाव्यवस्थापक संजय गायकवाड, पतपुरवठा व अर्थसहाय्य योजनेविषयी कॉसमॉस बँकेच्या सहायक महाव्यवस्थापक प्रियांका सुमंत, विक्री व्यवस्थापनावर योगेश गोगावले यांनी मार्गदर्शन केले.
मीना कुर्लेकर म्हणाल्या, “सुरुवातीपासूनच महिला सबलीकरणाच्या कार्यात अग्रेसर वंचित विकास संस्थेने नोव्हेंबर २०२३ मध्ये खादी ग्रामोद्योग मंडळाच्या सहकार्याने महिला उद्योजिकांचे प्रदर्शन भरवले होते. त्याचाच पुढील भाग म्हणून उद्योग करताना येणाऱ्या अडचणी सोडवण्यासह उद्योगासाठी आवश्यक गोष्टींचे मार्गदर्शन करण्यासाठी ही कार्यशाळा उपयुक्त ठरली. उद्योग करू पाहणाऱ्या महिलांना सल्ला व मार्गदर्शन पुरवण्यासाठी संस्थेमध्ये स्वतंत्र केंद्र सुरु केले आहे.”