मुंबई-काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी पक्षाला सोडचिठ्ठी देणाऱ्या माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्यावर सडकून टीका केली आहे. अशोक चव्हाण दबावामुळे किंवा स्वार्थापोटी भाजपत गेलेत. पक्षाने त्यांना खूपकाही दिले. पण आता काँग्रेसच्या तत्वज्ञानात असा कोणता दोष निर्माण झाला की त्यामुळे थेट काँग्रेसच सोडण्याचा निर्णय घेतला, असे ते म्हणालेत.
अशोक चव्हाण यांनी मंगळवारी भाजपमध्ये प्रवेश केला. त्यांच्या राजीनाम्यामुळे अवघा काँग्रेस पक्ष ढवळून निघाला आहे. त्यांच्यासोबत महाराष्ट्र काँग्रेसमधील अन्य काही नेतेही पक्ष सोडण्याच्या विचारात असल्याची माहिती आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला यांच्या नेतृत्वात काँग्रेसच्या महत्त्वाच्या नेत्यांनी आज बैठक घेऊन पक्षातील पडझडीवर विचारमंथन केले. त्यानंतर पत्रकारांशी संवाद साधताना बाळासाहेब थोरात यांनी अशोक चव्हाण यांच्या पक्ष सोडण्याच्या निर्णयावर तिखट हल्ला चढवलाअशोक चव्हाण भाजपमध्ये गेलेत. त्यांचा तिकडे जाण्याची टायमिंग पाहिली तर दिल्लीत शेतकऱ्यांवर लाठीमार व अश्रूधूर सुरू असताना ते भाजपत गेले. काँग्रेसने अशोक चव्हाण यांच्या वडिलांना खूप काही दिले. त्यांना अनेक संधी दिल्या. त्यानंतर त्यांचे सुपुत्र म्हणून पक्षाने अशोक चव्हाण यांनाही खूपकाही दिले. आता काँग्रेसच्या तत्वज्ञानात असा कोणता दोष निर्माण झाला की त्यामुळे त्यांना थेट काँग्रेसच सोडावी लागली? असा सवाल बाळासाहेब थोरात यांनी चव्हाण यांच्यावर निशाणा साधताना उपस्थित केला. अशोक चव्हाण यांच्यावर काहीतरी दबाव होता का? ते एखाद्या दबावाने किंवा स्वार्थापोटी भाजपमध्ये गेलेत, असेही ते यावेळी म्हणाले.