श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टतर्फे स्वागत व सन्मान
पुणे : भारतामध्ये धर्मासाठी मोठ्या प्रमाणात कार्य सुरु आहे. अयोध्येमध्ये देखील चांगले काम झाले आहे आणि अजून होणे बाकी आहे. आणखी जे राहिलेले काम आहे, ते पूर्ण होण्यासाठी आपल्याला श्री गणेश यांच्याकडे प्रार्थना करायची आहे, असे श्री श्री श्री जगद्गुरू कांची कामकोटी पीठाधीश्वर शंकर विजयेंद्र सरस्वती स्वामी यांनी सांगितले.
श्री श्री श्री जगद्गुरू कांची कामकोटी पीठाधीश्वर शंकर विजयेंद्र सरस्वती स्वामी महाराज यांनी श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचे दर्शन घेतले व महाआरती देखील केली. यावेळी श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळातर्फे विश्वस्त, पदाधिकारी यांनी शंकराचार्याचा यशोचित स्वागत सन्मान केला.
यावेळी ट्रस्टचे उपाध्यक्ष सुनील रासने, कोषाध्यक्ष महेश सूर्यवंशी, सरचिटणीस हेमंत रासने, सहचिटणीस अमोल केदारी, सुवर्णयुग तरुण मंडळाचे अध्यक्ष प्रकाश चव्हाण, राजाभाऊ घोडके, ज्ञानेश्वर रासने, विलास रासकर आदी उपस्थित होते.
शंकर विजयेंद्र सरस्वती स्वामी म्हणाले, कन्याकुमारीपासून ते काश्मीर पर्यंत व इतर देशांमध्ये गणपतीचे पूजन केले जाते. महाराष्ट्रामध्ये गणपतीची मुख्य उपासना केली जाते. पुण्यातून देशभक्ती व देवभक्तीचा उगम झाला. त्यामध्ये दगडूशेठ गणपती मंदिराचे मुख्य स्थान आहे. देशामध्ये सध्या होणा-या विकासाप्रमाणे आपल्या धार्मिक मूल्यांचे संवर्धन व रक्षण करणे गरजेचे आहे. असे कार्य श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टतर्फे सुरु आहे, आता धर्म, सेवा व संस्काराचे केंद्र होण्याच्या दिशेने मंदिर वाटचाल करीत आहे, असेही त्यांनी सांगितले. यापूर्वीच्या शंकराचार्यानी गणपती मंदिराला भेट दिली होती. हीच परंपरा शंकर विजयेंद्र सरस्वती स्वामी यांनी आज गणरायाचे दर्शन घेत सुरु ठेवली आहे.