मुंबई दि. १८ जानेवारी – आपल्या खूप मोठा पल्ला गाठायचा आहे. तुम्ही जिजाऊ… सावित्रीबाईच्या लेकी आहात… छत्रपती शिवाजी राजांनी रयतेचे राज्य तयार केले तर सावित्रीबाईंनी महिलांसाठी पहिली शाळा सुरू केली. यांची प्रेरणा घेऊन नवीन मुलींना… तरुण पिढीला बरोबर घेऊन पुढे जायचे आहे. त्यांनी दिलेला वारसा जपायचा आहे असे आत्मविश्वास निर्माण करणारे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी महिला मेळाव्यात केले.
आज राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्यावतीने ‘निर्धार नारी शक्तीचा’ हे घोषवाक्य वापरत राज्यस्तरीय भव्य मेळावा षण्मुखानंद सभागृहात आयोजित करण्यात आला होता.
शेती, शिक्षण व इतर अनेक क्षेत्रांमध्ये महिला, युवती आपले कर्तृत्व सिद्ध करत आहेत. मी राजकीय व सामाजिक जीवनात काम करत असताना एसटीमध्ये वाहकाबरोबर आता चालकही महिला बनल्या आहेत. वैमानिक बनल्या आहेत. महिलांची रित आहे जे काम करायचे ते चोख करतात अशा शब्दात महिलांचे कौतुक अजितदादा पवार यांनी केले.
प्रत्येक क्षेत्रात निर्विवाद महिला पुढे आल्या आहेत. आता ५० टक्क्यापेक्षा जास्त महिला स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये काम करत आहेत. आज पुरुषांच्या बरोबरीने नव्हे तर काकणभर सरस काम करतात. त्यांच्यापाठी जिजाऊ आणि सावित्रीबाईंचा वारसा आहे हेही आवर्जून अजितदादा पवार यांनी सांगितले.
राज्यातील भौगोलिक परिस्थिती वेगळी आहे. त्यामुळे राज्याचे महिला धोरण सादर करत असताना कोणत्याही त्रुटी त्यामध्ये राहता कामा नये असे काम महिला धोरण आणताना अदिती तटकरे केले आहे अशा शब्दात महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांचे कौतुक केले .
महिलांना सुरक्षित वाटले पाहिजे. यासाठी कायदा केला त्याला राष्ट्रपतींची अद्याप परवानगी मिळाली नाही त्यासाठी अदिती आपल्याला दिल्लीला जावे लागेल. त्यांना पटवून सांगावे लागेल तेही काम करुया. सत्तेत असताना आपण महिला विकासासाठी भरीव काम केले आहे. मविआमध्ये असताना शक्ती कायदा आणण्याचा प्रयत्न केला असेही अजितदादा पवार म्हणाले.
आपल्याला तिसर्यांदा नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान करायचे आहे. महिलांनी जास्तीत जास्त मतदान केले त्यामुळे पाच राज्यात भाजपची सत्ता आली आहे. त्यामुळे येणाऱ्या महायुतीच्या माध्यमातून निवडणूकीला सामोरे जायचे आहे.त्यापध्दतीने कामाला लागा. फेब्रुवारीनंतर आचारसंहिता लागेल असेही अजितदादा पवार यांनी सांगितले.
शाहू – फुले – आंबेडकर यांचे विचार घेऊन आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा वारसा घेऊन आपण पुढे जात आहोत. एका वेगळ्या विचाराने… राज्याच्या विकासासाठी सत्तेत सहभागी झालो आहोत. राज्यात ज्या ज्या वेळी अनेक प्रश्न निर्माण होतात त्या – त्या वेळी आपण सोडविण्यासाठी प्रयत्न करत आहोत. नुसते भाषणात सांगून फायदा नाही तर कृतीत आणण्याचा प्रयत्नही आम्ही करत आहोत असेही अजितदादा पवार यांनी ठणकावून सांगितले.
आपला देश पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली वेगाने विकास करत आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली पुढे जात आहोत. त्याच पद्धतीने आपला महाराष्ट्र पुढे त्यांच्या बरोबरीने गेला पाहिजे असे काम करायचे आहे हेही अजितदादा पवार यांनी स्पष्ट केले.
महिलांमध्ये आर्थिक सुबत्ता आणण्याचा आमचा प्रयत्न आहे. महामानवांच्या विचारावर आपल्या राष्ट्रवादीची वाटचाल सुरू आहे. त्यात कुठेही यत्किंचितही बदल होणार नाही असा शब्दही अजितदादा पवार यांनी दिला.
मी शब्दाचा पक्का आहे… माझं काम रोखठोक असतं… काम होणार की नाही हे तुम्ही दिलेल्या पत्रातील मजकूर वाचल्यावर समजते त्यामुळे काहींना वाईट वाटते मात्र मी वार्यावर कुणाला सोडत नाही. एकदा निर्णय घेतला की त्यापासून बाजूला जायचे नाही. सर्व घटकांना बरोबर घेऊन वाटचाल करायची आहे. आपला निर्णय पक्षाच्या हिताचा… राज्याच्या विकासासाठी असून राज्याचा अजेंडा तुमच्यासमोर ठेवला आहे. ज्यांना आरक्षण मिळाले आहे त्यांना धक्का न लावता इतरांना आरक्षण द्यावे अशी पक्षाची भूमिका आहे हेही अजितदादा पवार यांनी स्पष्ट केले.
आपल्याला राज्यात सामाजिक सलोखा राखायचा आहे. सुसंस्कृत महाराष्ट्र अशी आपल्या महाराष्ट्राची ओळख आहे. प्रक्षोभक भाषणांना बळी पडू नका… वाचाळवीरांची संख्या वाढली आहे… त्यांना महत्त्व देऊ नका… आपल्याला विकासाला महत्त्व द्यायचे आहे. एक सुसंस्कृत चेहरा आपल्याला राज्याला द्यायचा आहे. वंचित… दुर्बलांचा विचार करणारा आपला पक्ष आहे अशा शब्दात अजितदादा पवार यांनी महिला मेळाव्यात मार्गदर्शन केले.
ही ताकद निवडणूकीपुरती न राहता हा आपला परिवार आहे. हलक्या कानाचे राहू नका… तुमच्याबद्दल मला आदर आहे. या महिला योग्य पध्दतीने काम करतात हे चित्र निर्माण करा… पक्षाची बदनामी होता कामा नये याची काळजी घ्या. राष्ट्रवादीचे अनेक कार्यक्रम पाहिले परंतु आज महिलांचे हे आजचे वादळ पहिल्यांदा पाहिले. तुम्हाला भेडसावणाऱ्या प्रश्नांसाठी हाक द्या असा शब्दही अजित पवार यांनी दिला.१० जून रोजी पक्षाची स्थापना झाली तेव्हापासून आम्ही पक्षात काम करत आहोत परंतु आजचा महिलांचा जो उत्साह पहिल्यांदा पाहिला. अवधुत गुप्ते याने गीत सादर केले त्याने एक चैतन्य आले असेही अजितदादा पवार म्हणाले.
घड्याळाची टिकटिक घराघरात वाजण्यासाठी तयारीला लागा -सुनिल तटकरे
आपल्या घड्याळाची टिकटिक घराघरात वाजण्यासाठी तयारीला लागा असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांनी भव्य महिला मेळाव्यात केले.
आज अजितदादांच्या नेतृत्वाखाली महिलांची प्रचंड शक्ती उभी राहिली आहे हे यश भविष्यात असेच कायम मिळेल असा विश्वासही सुनिल तटकरे यांनी व्यक्त केला.
दादांच्या नेतृत्वाखाली जो निर्धार केला आहे त्याच्या पाठीमागे तुम्ही महिला खंबीरपणे उभ्या राहिल्या आहात. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची राजधानी रायगडावर उभी केली. तोच छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार इथे रुजवण्याची गरज आहे असेही सुनिल तटकरे म्हणाले.
अल्पसंख्याक समाज दादांनी घेतलेल्या निर्णयाच्या पाठीशी ठाम उभा राहिलेल्या पहायला मिळत आहे. आजपासून तुम्ही नवा विचार घेऊन काम करायला सज्ज झाला आहात. पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा देशात काम करत आहेत तर राज्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजितदादा काम करत आहेत. त्यामुळे राज्यात वेळ नवी पहायला मिळत आहे असाही आशावाद सुनिल तटकरे यांनी व्यक्त केला.
अदिती तटकरे हिने महिलांचे चौथे धोरण आणले आहे. हेच महिला धोरण २४ – २५ वर्षात महिलांसाठी आवश्यक ठरणार आहे. त्यामुळे राज्यसरकारची ताकद महिलांच्या बाजूने उभी केली जाईल असा विश्वासही सुनिल तटकरे यांनी महिलांना दिला.
लोकसभा, विधानसभा निवडणुका येतील. आता एक नवे अजित पर्व उभे राहिले आहे. त्यामुळे आपली राजकीय परीक्षा घेणारा पुढचा काळ असेल.अजितदादा आवाहन करतील त्या त्या वेळी पंचायत समिती, जिल्हा परिषद ,नगरपालिका, नगरपरिषदांमध्ये आवश्यक ते बहुमत मिळवून द्यायचे आहे असे आवाहन सुनिल तटकरे यांनी केले.
दादांच्या नेतृत्वाखाली हा मेळावा घेतलात व महिलांचे बळ किती उभे आहे हे दाखवून दिल्याबद्दल सुनिल तटकरे यांनी महिला प्रदेशाध्यक्षा रुपालीताई चाकणकर यांना धन्यवाद दिले.
जिजाऊं… सावित्रीबाई… रमाबाई यांच्यासारखं तुम्हाला तेवढं मोठं होता येणार नाही पण पाऊल तर टाकावे लागेल – छगन भुजबळ
निर्धार माँ जिजाऊने छत्रपती शिवाजी महाराजांना घडवण्याचा केला… निर्धार सावित्रीबाईंनी स्त्री शिक्षणाचा केला … अहिल्यादेवी होळकरांनी केला … निर्धार रमाबाईंनी केला… निर्धार रकमाबाई राऊत यांनी केला… ठीक आहे तुम्हाला तेवढं मोठं होता येणार नाही मात्र पाऊल तर टाकावे लागेल अशा शब्दात अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ महिलांमध्ये आत्मविश्वास निर्माण केला. त्यासाठी सर्व समाजातील घटकाला घेऊन पुढे जावे लागेल असेही स्पष्ट केले.
हा पक्ष अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखालील मोठा आहे. निवडणूकीतून त्याचे मोजमाप होणार आहे.. आपण कुठे आहोत हे ठरणार आहे. मागील ग्रामपंचायत निवडणूकीत भाजपनंतर दोन नंबरचा पक्ष अजितदादा पवार यांचा होता हे राज्यात ग्रामपंचायत निवडणूकीत दाखवून दिले आहे. परंतु ताकद अजून वाढवावी लागेल असेही छगन भुजबळ म्हणाले.
तुम्ही सर्वांसाठी काम करा असे सांगत छगन भुजबळ यांनी संत कबीरांचा दोहा ऐकवला … बुरा सोचना, बुरा देखना… लेकीन दिल मे खोजा तो बुरा ना कोय… असे यातून स्पष्ट होते त्यामुळे कुणाबद्दल वाईट बोलू नका स्वतः ला तपासा असे स्पष्ट केले.
जिंदगी जिंदादाली का नाम है… मुर्दा दिली का नही… जो जिंदा आहे तो लढेल… तुमचं दिलच मुर्दा बनले असेल तर तुम्ही कसे लढणार त्यामुळे तुम्ही लढत रहा असे आवाहन छगन भुजबळ यांनी केले.
राज्यातील मुलींच्या सक्षमीकरणासाठी ‘लेक लाडकी योजना
मुलींच्या जन्मापासून ते १८ वर्षे होईपर्यंत तिच्या संगोपनासाठी टप्प्याटप्प्याने १ लाख रुपये मिळणार असून अशा सुमारे अडीच लाख मुलींना त्याचा लाभ मिळणार आहे अशी माहितीही अदिती तटकरे यांनी दिली.
ग्रामपंचायत सदस्य, सरपंच, जिल्हा परिषद सदस्य, सभापती, अध्यक्ष, आमदार, खासदार, मंत्री अशा प्रत्येक ठिकाणी असलेल्या महिलेला आज हा विश्वास आहे की, अजितदादा त्यांच्यासोबत आहेत. हीच दादांची खरी ताकद आहे. आज महाराष्ट्रातल्या गावखेड्यात काम करणारी प्रत्येक महिला निडर होऊन राजकारणात काम करू शकते कारण, अजितदादांसारखे खंबीर नेतृत्व त्यांच्या पाठिशी आहे.सर्वसामान्य महिलेला राजकारणात आणि समाजकारणात काम करण्याची संधी आणि स्वाभिमान एकाच पक्षात मिळतो ज्याचं नाव आहे, राष्ट्रवादी काँग्रेस असेही अदिती तटकरे यांनी सांगितले.
महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून नारी निर्धार मेळाव्याला आलेली प्रत्येक भगिनी हे सांगायला आली आहे की, ती काल, आज, उद्या आणि सदैव अजितदादांसोबत आहे. चांद्यापासून बांद्यापर्यंत महाराष्ट्रातील प्रत्येक महिला भगिनीचा विश्वास…अजितदादा आहे असेही अदिती तटकरे म्हणाल्या.
अजितदादांनी आजवर घेतलेल्या कित्येक निर्णयांमुळे महाराष्ट्रातील महिलांचे जगणे सुकर झाले आहे. महाराष्ट्राची प्रत्येक महिला – भगिनी आपल्या अजितदादाच्या पाठीशी खंबीर उभी आहे. अजितदादांमुळे आज गावखेड्यात असंख्य महिला स्वावलंबी आणि आत्मविश्वासाचे जीवन जगत आहेत. हीच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची ताकद आहे अशा शब्दात महिला व बालविकास मंत्री अदितीताई तटकरे यांनी महिलांच्या पंखात बळ भरण्याचे काम केले.
जिंदगी आसान नही होती वो आसान करनी होती है… अशा शब्दात महिलांच्या कर्तृत्वाला महिला प्रदेशाध्यक्षा रुपालीताई चाकणकर यांनी सलाम केला.
दादांचे नेतृत्व मान्य करून आज नारी शक्तीचा हा मेळावा महत्त्वाचा आहे असे सांगतानाच दादा तुमच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आम्ही जमलो आहोत हेही रुपालीताई चाकणकर यांनी स्पष्ट केले.
सहा महिन्यात षण्मुखानंद सभागृहात आपण मेळावा घेऊ शकतो तर येत्या काळात वानखेडे स्टेडियमवरही घेऊ शकतो असा शब्दही रुपालीताई चाकणकर यांनी दिला.
आज इथे उपस्थित असणारा लाल रंग हा नवचैतन्याचा, मातृत्वाचा, अन्यायाच्या विरोधात सळसळणाऱ्या रक्ताचा, उगवणाऱ्या नवीन दिवसाचा आहे. दादांनी जो निर्णय घेतला आहे त्याला ही मातृशक्ती तुमच्यासोबत आहे हे दाखवण्यासाठी आम्ही आज सर्व इथे उपस्थित आहोत. येणाऱ्या काळात राज्याचे मुख्यमंत्री व्हावे त्यासाठी ही महिला शक्ती तुमच्या पाठिशी उभी आहे असा विश्वासही रूपालीताई चाकणकर यांनी व्यक्त केला.
अर्धा तिकीटावर आज माझ्या महिला एसटीतून फिरत आहेत. महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे महिलांसाठी चांगले काम करत आहेत. लेक माझी लाडकी या योजनेतून महिलांना सन्मान दिला आहे त्याबद्दल रुपालीताई चाकणकर यांनी धन्यवाद दिले.महिलांना आत्मविश्वास देण्याचे काम दादा आपण करत आहात. आपल्या विचारातून मातृत्वाचा सन्मान करताय त्याबद्दलही रुपालीताई चाकणकर यांनी धन्यवाद व्यक्त केले.बारा जिल्हयातून आलेल्या युवतींनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा वेगवेगळ्या जिल्हयातील पारंपरिक वेशभूषेच्या पद्धतीने सत्कार केला.यावेळी सर्व महिलांना शपथही देण्यात आली.प्रसिद्ध गायक अवधुत गुप्ते यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नवीन गीत ‘अजिंक्य भगिनी… अजित भगिनी’… यावेळी सादर केले. या गीताचे प्रकाशन ‘वन्स मोअर’ ने महिलांनी केले.भव्य नारी शक्ती निर्धार मेळाव्याला राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे, अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, अन्न व औषध प्रशासन मंत्री धर्मारावबाबा आत्राम, महिला व बालविकास मंत्री अदितीताई तटकरे, महिला प्रदेशाध्यक्षा रुपालीताई चाकणकर, विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, मदत व पुनर्वसन मंत्री अनिल भाईदास पाटील, मुंबई विभागीय अध्यक्ष समीर भुजबळ, आमदार बाबासाहेब पाटील,मुख्य प्रवक्ते उमेश पाटील, सुरेखाताई ठाकरे, प्रदेश सरचिटणीस लतिफ तांबोळी, आदींसह राज्यातून आलेल्या महिला पदाधिकारी व कार्यकर्त्या मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.