– महाराष्ट्र ऊस तोडणी मशीन मालक संघटना बोरगाव सातारा यांच्याकडून इशारा
– मशीन तोडणी दर हा ७०० रुपये करावा
– लोकसभा निवडणुकीत मतदानावर बहिष्कार टाकण्याचाही इशारा
– साखर संकुल येथे साखर आयुक्त श्री पुलकुंडवार साहेब यांना निवेदन सादर
पुणेः संपूर्ण राज्यात मशिन तोडणीचे दर एक समान केले जात नाहीत, आणि वाहतूक दरात दरवाढ जाहीर होत नाही तोपर्यंत सर्व ऊस तोडणी मशीन बंद ठेवण्याचा इशारा, महाराष्ट्र ऊस तोडणी मशीन मालक संघटनेतर्फे अध्यक्ष संजय साळुंखे यांनी दिला आहे. तसेच मागण्या मान्य न झाल्यास येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत मतदानावर बहिष्कार टाकण्याचाही इशारा संघटनेचे अमोलराजे जाधव यांनी दिला आहे. “कृषी क्षेत्रातील प्रोत्साहनपर योजनांमुळे कृषी यांत्रिकीकरणात गतीने वाढ झाली. सध्या महाराष्ट्रात जवळपास १२०० ऊस तोऊणी मशीन कार्यरत आहेत. त्या सर्व शेतकरी कुटुंबातील सुशिक्षित तरुणांनी शेतीसाठी पूरक व्यवसाय जोडधंदा म्हणून शेती व घरावर कर्ज काढून घेतल्या आहेत. मात्र राजकिय सोयासाठी सर्व पुढाऱ्यांनी या तरुणांचा फक्त वापर करुन घेतला असून वेळोवेळी फसवी आश्वासने देत राष्ट्रीय कृषी विकास योजनेविषयी आम्हा मशीन मालकांची फसवणूक केली आहे,” असा आरोप संघटनेचे अध्यक्ष संजय साळुंखे यांनी केला आहे. साखर संकुल येथे साखर आयुक्त श्री पुलकुंडवार साहेब यांना संजय साळुंखे यांच्यासह अमोलराजे जाधव, गणेश यादव, किशोर जगदाळे, निलेश बगते यांच्या हस्ते याबाबत निवेदन देण्यात आले. यावेळी महाराष्ट्र राज्य ऊस वाहतूकदार संघटना राज्य अध्यक्ष राजगोंडा पाटील उपस्थित होते.
साळुंखे यांनी दिलेल्या माहितीनुसार, “इतर सर्व राज्यांत चालू असणारी ही योजना आपल्या राज्यात बंद करण्यात आली. गेल्या दोन वर्षांपासून फक्त जीआर काढणे व गप्प राहणे एवढेच करुन तरुणांना झुलवत ठेवले गेले आहे. सध्या 2023-24 चा गळीत हंगाम अंतिम टप्प्यात आला आहे.ऊस तोडणी मजुरांची अवस्था बिकट आहे. परंतु त्यांच्या साठी काम करणाऱ्या संघटनांनी बंद पुकारुन दबाव आणुन त्यांचे तोडणी दर वाढवुन घेतले. आज हात तोडणीचे दर कमीशन सह 380 रुपये डोकी सेंटर 439/- रु. गाडी सेंटर 490/- रु. असे जाहिर झाले आहेत व सर्व कारखानदारांना मान्य आहे.आम्ही 2020 पासुन उस तोडणी दर वाढी साठी पाठपुरावा करतोय पण आमची कोण दखलच घेत नाही.मशीन डीझेलवर चालते आजचे उस तोडणीचे दर वेगवेगळया ठिकाणी वेगवेगळे आहेत. ते 380 रु, पासुन 475 ते 500 रु. प्रती टन असे आहेत. पण यात मशिन व दोन इनफिल्डर असे मिळुन एक युनिट चालते. त्याचा डिझेलचा खर्च प्रतिटन 2.75 ते 3 लिटरचे पुढे जातो. भौगोलिक परिस्थितीनुसार त्याचा ऑपरेटिंग खर्च ऑपरेटर – १, इनफिल्डर ड्रायव्हर – २, हेल्पर १ असा प्रती टन ८० रु., स्पेअर पार्ट/ देखाभाल, ऑईल, ग्रीस आणि दुरुस्ती याचा खर्च प्रती टन १०० रु. होतो.”
“म्हणजे डीझेल 285, ऑपरेटींग 80, दुरुस्ती 100 असा एकुण 465 रु खर्चच होतात. म्हणजे घसार आणि बँक व्याज मालक नफा बाजुलाच राहतो. म्हणुन यात कमीत कमी 200 रु. वाढ होणे अपेक्षित आहे. कारण लेबर कमी झाले कि कारखाना दर वाढवुन 500/600 द्यायला तयार असतात. हात तोडणीचे दर सन 2014 साली 180 रु. होते. ते आज 380 रु झाले म्हणजे दुप्पट. तोच नियम लागु केला तर सन 2014 घा मशिन तोडणी. दर 325 /350 चा मशिन उस तोडणी दर दुप्पट केल्यास 700/650 होतो. मशिनचा मुख्य भाग डीझेल खर्च हाच आहे. त्यामुळे मशिन तोडणी दर हा 700 रु. करावा. त्याच बरोबर वहातुक करणेसाठी वापरले जाणारे ट्रक / ट्रक्टर यांच्याही दरात दुपटीनेच वाढ करावी,” अशी मागणी साळुंखे यांनी केली आहे.
साळुंखे म्हणाले, “आज बैलगाडी व मिनी गाडीसाठीचे निश्चित दर 132 रु. प्रति टन व पुढील 1 कि.मी. 20 रु. प्रमाणे दर वाढ जाहीर झालेली आहे. परंतु इतर वाहने लांबुन वाहतुक करतात पण त्यांचा दर 30 कि.मी पर्यंत 5 कि.मी. नी त्यापुढील 4 ते 4. 50 किमी अशी वाढ वहातुक दारांना दिली जाते. त्यांचा दर हा 5/6 वर्षापुर्वी पासुनचा आहे. सध्या हाताने तोडणी आणि बैलगाडी व मिनी ट्रॅकर गाडी यांचीच दरवाढ केली आहे. एका विशिष्ट समुहास समोर ठेवुन इतरावर हा अन्यायच झालेला आहे. यासाठी साखर आयुक्तांनी सर्व कारखानदार /राजकिय नेते/प्रशासन यांच्याशी चर्चा करून सकारात्मक तोडगा काढावा अन्यथा २० जानेवारीपासून पासून सर्व महाराष्ट्रातील उस तोडणी मशिन बंद ठेवणार आहोत.”