विद्यार्थी साहाय्यक समितीच्या पहिल्या ‘युवा साहित्य संमेलना’चे उद्घाटन
पुणे, ता. १५ : “तरुणाईची ऊर्जा घेऊन भरभरून, मनमुक्त जीवनाचा आस्वाद जरूर घ्या; पण विवेक कधीच सोडू नका. कुठल्या ना कुठल्या रूपात स्वतःला साहित्याशी जोडून घ्या”, असा सल्ला प्रसिद्ध लेखक, कवी, संवादक आणि दंततज्ज्ञ डॉ. आशुतोष जावडेकर यांनी विद्यार्थ्यांना दिला. सहज संवाद, मनमोकळे वातावरण आणि दिलखुलास शैली, यामुळे डॉ. आशुतोष यांनी विद्यार्थ्यांना अक्षरशः मंत्रमुग्ध केले. औपचारिक भाषणानंतरचा प्रश्नोत्तर स्वरुपातील खुला संवाद त्यामुळे विलक्षण रंगला.
विद्यार्थी साहाय्यक समिती पुणे आणि महाराष्ट्र साहित्य परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित पहिल्या ‘युवा साहित्य संमेलना’चे अध्यक्ष म्हणून ते बोलत होते. तीन दिवसांच्या या साहित्य संमेलनाचे उद्घाटन दीपप्रज्वलन आणि सरस्वतीपूजनाने करण्यात आले. याप्रसंगी संमेलनाध्यक्ष डॉ. आशुतोष जावडेकर, मसापचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी, मसापच्या प्रमुख कार्यवाह सुनीताराजे पवार, विद्यार्थी साहाय्यक समितीचे कार्यकारी विश्वस्त तुषार रंजनकर, मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत कुलकर्णी, विद्यार्थी विकास केंद्राच्या अध्यक्ष सुप्रिया केळवकर आदी मान्यवर उपस्थित होते.
डॉ. आशुतोष जावडेकर म्हणाले, “नवी पिढी वाचत नाही, हा आरोप मला मान्य नाही. तरुणाई वाचते, फक्त ती निवडक वाचते. पुस्तकांची पानेच नाही, तर स्क्रीनवर वाचते. तंत्रस्नेही युवा पिढीची माध्यमे बदलली आहेत. काम, कर्तव्य, मैत्र, क्रीडा आणि बौद्धिक-सामाजिक आणि राजकीय अशा पाच प्रेरणा कार्यरत असतात, फक्त त्यांचा स्वीकार करताना विवेक असला पाहिजे. प्रवाहपतित करणाऱ्या, तरुणाईचा ‘वापर’ करू पाहणार्या मार्केटिंगमध्ये अडकू नका आणि कुठल्याही अयोग्य व्यसनांपासून सदैव दूर राहा, असा सल्ला त्यांनी दिला.
समाजमाध्यमांचा अवश्य वापर करा, पण तिथेही विवेक जागृत ठेवा, पुस्तकांची साथ सोडू नका. पुस्तके तुम्हाला नकाराचा स्वीकार करायला शिकवतील, सावरतील, आधार देतील, असेही ते म्हणाले.
समितीचे कार्यकारी विश्वस्त तुषार रंजनकर यांनी मनोगत मांडताना, विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाचे व त्यासाठी युवकांचे सक्षमीकरण, हा समितीचा उद्देश असल्याचे स्पष्ट केले.
प्रा. मिलिंद जोशी म्हणाले, ‘युवावस्था म्हणजे केवळ भावनांचा कल्लोळ नसून, पाठ्यपुस्तकाबाहेरचे अधिक व्यापक विश्व जाणून घेण्यासाठीची संधी आहे. कुठल्याही क्षेत्रात कार्यरत असले तरी युवकांची साहित्याशी नाळ जुळलेली राहणे, हा साहित्य परिषदेचा या संमेलनाच्या आयोजनातील सहकार्याचा हेतू आहे. वाचनाचा छंद जीवनाची गुणवत्ता उंचावत नेणारा असतो. प्रतिकूलतेवर मात करत यशाची शिखरे कशी गाठता येतात, हे पुस्तके शिकवतात. यासाठी वाचन ही तुमची शैली बनवा, पुस्तकांशी मैत्री करा. पुस्तकांशी दृढ नाते जोडा आणि तंत्रज्ञानासह तत्त्वज्ञानाचाही अंगिकार करा, असा सल्ला त्यांनी दिला.
विद्यार्थी साहाय्यक समितीच्या कार्याची माहिती देणारी चित्रफीत प्रारंभी दाखवण्यात आली. पल्लवी पवार आणि श्रद्धा विभूते यांनी ईशस्तवन सादर केले. ग्रंथाली देशमुख हिने सूत्रसंचालन केले तर स्नेहल कुलकर्णीने आभार मानले.