उल्हास दादा पवार, जैन उद्योग समूह व पी एन पाटील यांचा शानदार कार्यक्रमात पुरस्काराने सन्मान
संगमनेर (प्रतिनिधी)–राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या विचारातून प्रेरणा घेऊन स्वातंत्र्य सेनानी सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात व डॉ अण्णासाहेब शिंदे यांनी स्वातंत्र्यप्राप्तीसाठी व स्वातंत्र्य नंतर जीवनभर कार्य केले. सहकारातून शेतकऱ्यांच्या जीवनात समृद्धी निर्माण करणारे सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात व डॉ शिंदे यांचे सहकारासह देश उभारणीत मोठे योगदान असल्याचे गौरवोद्गार कर्नाटक राज्याचे मुख्यमंत्री नामदार सिद्धरामय्या यांनी काढले आहे.
जाणता राजा मैदान येथे जयंती महोत्सव समितीच्या वतीने पुरस्कार वितरण सोहळा कार्यक्रमाचे बोलत होते. यावेळी अध्यक्षस्थानी महाराष्ट्राची माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण होते. तर व्यासपीठावर महाराष्ट्र काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्नीथला, कर्नाटकचे मंत्री एच के पाटील, माजी मंत्री राष्ट्रवादीचे नेते आमदार जितेंद्र आव्हाड, शिवसेनेचे नेते माजी मंत्री भास्करराव जाधव, काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते आमदार बाळासाहेब थोरात, माजी मंत्री मधुकरराव चव्हाण, माजी मंत्री डॉ विश्वजीत कदम , आमदार रवींद्र धंगेकर, आमदार झिशन सिद्दकी ,आमदार सत्यजित तांबे, माजी आमदार डॉक्टर सुधीर तांबे, मा. खासदार भाऊसाहेब वाकचौरे, सौ कांचन ताई थोरात, सौ दुर्गाताई तांबे, बाजीराव पा. खेमनर ,रणजीत सिंह देशमुख, इंद्रजीत भाऊ थोरात, आमदार शिरीष दादा चौधरी ,आमदार राजेश राठोड, माजी आमदार मोहन जोशी, माजी आमदार नामदेवराव पवार, आमदार हिरामण खोसकर, आमदार लहू कानडे, आदींसह राज्यभरातील आजी-माजी मंत्री काँग्रेसचे आमदार, प्रदेश काँग्रेसचे पदाधिकारी आदींसह विविध मान्यवर उपस्थित होते.
यावेळी बोलताना नामदार सिद्धरामय्या म्हणाले की, भाऊसाहेब थोरात यांनी सहकार चळवळीतून ग्रामीण भागात आर्थिक समृद्धी निर्माण केली. तर डॉ अण्णासाहेब शिंदे यांनी हरितक्रांतीमध्ये योगदान दिले. भारतात अन्नधान्याच्या बाबत स्वयंपूर्ण आहे तो फक्त काँग्रेसमुळेच. सहकार चळवळ ही ग्रामीण भागाला सशक्त बनवते. मात्र केंद्र सरकार सहकार चळवळ मोडीत काढून पाहत आहे.राज्याचे सर्व अधिकार त्यांनी ताब्यात घेतले आहेत. भारतीय जनता पार्टी ही भ्रष्ट पार्टी असून कर्नाटक मध्ये 40% कमिशन घेत होते. त्यामुळे जनतेने त्यांचा मोठा पराभव केला. राज्यात पाच कलमी विकास योजना निवडणुकीपूर्वी जाहीर करावी .संपूर्ण देशात काँग्रेसमय वातावरण असून भाजपची हुकूमशाही रोखण्यासाठी सर्वांनी एकत्र येणे गरजेचे आहे.
देशाच्या स्वातंत्र्यप्राप्तीसाठी काँग्रेस पार्टी लढली असून आत्ताचे सत्ताधारी त्यावेळेस कुठेही नव्हते. मागील सत्तर वर्षातील प्रगती ही काँग्रेस मुळे झाली असून लोकशाही व संविधान धोक्यात असून भाजपा वसाहतवाद योजना आणत आहे ही देशाच्या दृष्टीने अत्यंत घातक असल्याची टीका करताना आमदार बाळासाहेब थोरात यांनी भाऊसाहेब थोरात यांच्या रचनात्मक कार्याचा वारसा जपला असल्याचेही ते म्हणाले.
तर माजी मंत्री भास्करराव जाधव म्हणाले की संगमनेरच्या सहकार, शिक्षण ,नम्रता ही राज्यासाठी दिशादर्शक आहे. भाऊसाहेब थोरात यांच्या संस्कारातून बाळासाहेब थोरात काम करत असून प्रगतशील तालुका ही ओळख राज्यात नव्हे .तर देशासाठी मार्गदर्शक आहे. स्वातंत्र्य सेनानी भाऊसाहेब थोरात व डॉ अण्णासाहेब शिंदे या दोन विभूतींनी हा परिसर सुजलाम सुफलाम केला. थोरात यांच्या नेतृत्वाखाली संगमनेर हे सहकाराची पंढरी ठरली आहे. सध्या एकनिष्ठता राहिली नसून सत्तेसाठी लोक पक्ष बदलत आहेत. देशांमध्ये दोघेजण हुकूमशाहीतून देश हातात घेत आहेत .खोटा इतिहास सांगत आहेत. 2014 ला स्वातंत्र्य मिळाले असे म्हणतात. मग 1947 ला स्वातंत्र्य मिळाले ते काय होते. ब्रिटिशांविरुद्ध लढताना त्यावेळी अनेकांनी प्राण्यांची आहुती दिली. तुरुंगवास भोगला. त्यांची तुम्ही थट्टा करत आहात असा टोलाही भाजपला लगावला
तर माजी मंत्री आमदार जितेंद्र आव्हाड यांनी राम कृष्ण हरी म्हणत आपल्या भाषणाची सुरुवात केली, आपण कायम गांधीवादी विचार जपला असून जिवंत आहे तोपर्यंत हा विचार आपण सोडणार नाही. असे सांगताना देशाचा कोणताही पंतप्रधान दुसऱ्या देशात जातो तेव्हा महात्मा गांधी यांचेच नाव सांगतो. संगमनेर मध्ये शेतकऱ्यांसाठी अत्यंत चांगले काम सहकाराच्या माध्यमातून झाले असून येथे निष्ठा जपली आहे .मी ही कायम निष्ठा जपली असून बापाला घरी बसा असे सांगणारे काही लोक आहेत. शरद पवार हे कायम पुरोगामी विचारांची ताकद राहिली असून मरण आहे तोपर्यंत मी या विचारांची बांधील असल्याचे ठाम मत त्यांनी व्यक्त केले.. तर माजी मंत्री आमदार थोरात म्हणाले की, हे वर्ष सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात यांची जन्मशताब्दी वर्ष असून त्यानिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन केले आहे. एकनिष्ठता व पुरोगामी विचारांचे पाईक असणारे सर्व मान्यवर राज्यभरातून या ठिकाणी उपस्थित असल्याचे ते म्हणाले. यावेळी अशोकराव जैन यांनीही आपले मनोगत व्यक्त केले याप्रसंगी इंद्रजीत भाऊ थोरात, उत्कर्षा रुपवते ,उल्हास लाटकर, जिल्हाध्यक्ष राजेंद्र नागवडे, बाबा ओहोळ, शंकरराव खेमनर, राजवर्धन थोरात, काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे, सचिन सावंत ,राजू वाघमारे, डॉ शोभाताई बच्छाव, संजय फड आदींसह जिल्ह्यातील व संगमनेर तालुक्यातील विविध संस्थांचे पदाधिकारी व मान्यवर उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे स्वागत माजी आमदार डॉ सुधीर तांबे यांनी केले प्रास्ताविक काँग्रेसने आमदार बाळासाहेब थोरात यांनी केले तर कॅन्सरतज्ञ डॉ जयश्रीताई थोरात यांनी आभार मानले. याप्रसंगी नागरिक, युवक ,महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.
उल्हास दादा पवार ,जैन उद्योग समूह व आ. पी एन पाटील यांचा सन्मान
साहित्य सहकार समाजकारण व पर्यावरण क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल ज्येष्ठ गांधीवादी नेते मा. आमदार उल्हास दादा पवार यांना स्वातंत्र्यसैनिक भाऊसाहेब थोरात पुरस्कार देऊन गौरविण्यात आले .तर कृषी संशोधन व शिक्षण क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दलचा हरितक्रांतीचे प्रणेते डॉ अण्णासाहेब शिंदे स्मृती पुरस्कार जैन उद्योग समूह जळगाव यांना देण्यात आला. अमृतवाहिनी शिक्षण संस्थेच्या वतीने एक लाख रुपये रोख सन्मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. तर भाऊसाहेब थोरात सेवाभावी संस्थेच्या वतीने आमदार पी एन पाटील यांना गौरविण्यात आले.
भाऊसाहेब थोरात यांच्या पुतळ्याच्या अनावरण
2024 हे सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात यांची जन्मशताब्दी वर्ष असून या निमित्त विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे याचबरोबर कारखान्याच्या नवीन प्रशासकीय इमारती समोर सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात यांच्या पुतळ्याचे अनावरण सर्व मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.