समितीच्या संकुलात तंत्रज्ञानाधारित कृषी प्रकल्पाचे उद्घाटन; ॲग्रीकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्ट आणि रोबोटिक्स यांच्याशी सामंजस्य करार
पुणे: युवकांचे आपल्या गावाशी, तेथील मातीशी असलेले नाते कायम राहावे आणि मातीतून आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने मोती पिकवता यावेत, या उद्देशाने विद्यार्थी सहायक समिती आणि ॲग्रीकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्ट, बारामती तसेच डिजिटेक रोबोटिक्स इंजिनिअरिंग, यांच्यामध्ये दोन विशेष सामंजस्य करार करण्यात आले. या करारान्वये कृषी आणि अत्याधुनिक तंत्रज्ञान, यांची सांगड घालून युवकांसाठी अधिकाधिक संधी निर्माण करण्याचा उद्देश असल्याचे समितीच्या वतीने सांगण्यात आले.
विद्यार्थी सहायक समितीच्या शिवाजी हौंसिंग सोसायटी येथील लतिका गायतोंडे वसतिगृहाच्या संकुलातील २० गुंठे जागेवर कृषी प्रकल्पाचे उद्घाटन करण्यात आले. प्रसंगी समितीचे अध्यक्ष पद्मश्री प्रतापराव पवार हे यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी बारामती कृषी विज्ञान केंद्राचे विशेषज्ञ संतोष करंजे, बारामती कृषी व संलग्न महाविद्यालयाचे प्राचार्य आशिष रासकर, बारामती कृषी महाविद्यालयाचे उद्यानविद्या विभागाचे प्रा. मच्छिंद्र आगळे, डिजिटेक रोबोटिक्सचे प्रमुख अजीत गटे, समितीचे कार्यकारी विश्वस्त तुषार रंजनकर, वीएसएस फाऊंडेशन अमेरिकाच्या अध्यक्ष अंजली अंतूरकर, समितीच्या विश्वस्त डाॅ. ज्योती गोगटे, समितीच्या स्टूडंट्स वेलफेअर असोसिएशनच्या संचालक सुप्रिया केळवकर आणि संचालक राजीव भागवत, प्रकल्प समन्वयक रत्नाकर मते, कृषी प्रकल्प समन्वयक सचिन खांडेकर, खजिनदार संजय अमृते, विश्वस्त तुकाराम गायकवाड, मनोज गायकवाड, मुख्य विकास अधिकारी चंद्रकांत कुलकर्णी, विद्यार्थी प्रतिनिधी कुलदीप देशपांडे आदी यावेळी उपस्थित होते.
ॲग्रीकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्टचे विशेषज्ञ संतोष करंजे यांनी तीन वर्षांच्या काळात ट्रस्टतर्फे ग्रामीण पार्श्वभूमी असलेल्या विद्यार्थ्यांना समितीच्या प्रयोगशाळेत आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून शेती करण्याचे प्रशिक्षण देण्यात येणार असल्याचे सांगितले. माती परीक्षणापासून ते थेट कृषी विपणनापर्यंत प्रत्येक टप्प्यावर तंत्रज्ञानाचा वापर कसा करायचा आणि छोट्या आकाराच्या जमिनीतूनही अधिक उत्पन्नस्रोत कसे मिळवायचे, याचे मार्गदर्शन केले जाईल. एआय तंत्रज्ञानाचा वापर करून विद्यार्थ्यांनी आपल्या ज्ञानाचा प्रसार करावा, आपल्या गावाकडील शेतीत तंत्रज्ञानाधारित माडेल उभारावीत, असे ते म्हणाले.
रोबोटिक्स सेंटरविषयी अजीत गटे व सुप्रिया केळवकर यांनी माहिती दिली. समितीच्या संकुलात या केंद्रासाठी साडेतीन हजार स्क्वेअर फूट जागेत पायाभूत सुविधा निर्माण केल्या जात आहेत. येथील प्रशिक्षण अल्प, मध्यम व दीर्घ मुदतीच्या त्रिस्तरीय ट्रेनिंगच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना दिले जाईल. यशस्वी विद्यार्थ्यांना प्लेसमेंटची संधी मिळेल. समितीच्या विद्यार्थ्यांप्रमाणेच हे ट्रेनिंग इतर विद्यार्थ्यांसाठीही खुले असेल, असे त्यांनी स्पष्ट केले.
“युवकांसाठी कृषी उद्योजकता आणि कौशल्य विकास प्रकल्प, हाच करारामागील उद्देश आहे. ‘फार्म फाॅर द फ्यूचर’ हे ध्येय ठेवून उद्योजकीय मानसिकतेतून युवा सक्षमीकरणाकडे वाटचाल अपेक्षित आहे. उच्च शिक्षण घेताना विद्यार्थ्यांची शेतीची आवड कमी होते. मात्र, अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या साह्याने शिक्षण आणि शेती, यातील दरी कमी करण्याचा प्रयत्न म्हणून या प्रकल्पाकडे बघता येईल. विषमुक्त शेतीबरोबरच तंत्रज्ञानाचा अधिक वापर करून उत्पन्नात वाढ करण्याचे कौशल्य आत्मसात करणे, हे या प्रकल्पातून शक्य होईल. यातून विद्यार्थी प्रगत शेतकरीच नव्हे तर उद्योजकतेच्या मार्गावरचा आधुनिक प्रवासी होईल.”
– प्रतापराव पवार, विद्यार्थी सहायक समितीचे अध्यक्ष

