पुणे :
‘द्वेषाचे राजकारण नाशाकडे नेते, पाकिस्तान हे त्याचे उदाहरण आपल्या जवळचे आहे,हे विसरता कामा नये. त्यामुळे विविधतेत एकता मानणाऱ्या भारताला द्वेषाच्या मार्गाने नाशाकडे नेण्याचे प्रयत्न यशस्वी होवू देता कामा नयेत. प्रेम, सद्भावना वाढवणाऱ्या कार्यक्रमांना पाठिंबा दिला पाहिजे ‘, असे आवाहन ज्येष्ठ विचारवंत डॉ. राम पुनियानी यांनी रविवारी केले.
विचारवेध असोसिएशन, युवक क्रांती दल आणि महाराष्ट्र गांधी स्मारक निधी यांच्या वतीने आयोजित विचारवेध संमेलनातील दुसऱ्या दिवशीच्या सत्रांना ७ जानेवारी रोजी सकाळी गांधी भवन येथे प्रारंभ झाला. यावेळी डॉ. राम पुनियानी बोलत होते.
डॉ. पुनियानी म्हणाले, ‘आधीच्या लढाया टोळ्यांमधील,राजा राजांमधील, सत्तांमधील असायच्या. तरीही आज तो इतिहास बदलताना त्यांना हिंदू- मुस्लीम लढायांचे रुप दिले जात आहे. भाजप सत्तेवर आल्यावर हे प्रयत्न वाढले.या लढायांकडे धर्माच्या चष्म्यातून पाहिले जात आहे. द्वेष वाढविण्यासाठी हा प्रचार वाढविला जात आहे.भारतीय संस्कृती ही बंधूभाव, सद्भाव मानणारी ‘ मिली जुली ‘ अशी संस्कृती आहे.भारतीय आणि भारताबाहेरील पदार्थांचा मिलाफ झालेला आहे. अनेक शब्द, पेहराव इथे स्वीकारले आहेत.हिंदी सिनेमातील सुंदर भजने लिहिणाऱ्या , गाणाऱ्या नावात मुस्लीम गायक, कलाकार आहेत.त्यांना आपण भारतीय म्हणूनच ओळखतो’.
‘ धर्माच्या नावावर द्वेष वाढविला जात आहे. संघाच्या शाखेपासून सोशल मीडियापर्यंत जाणीवपूर्वक या गोष्टी होत आहेत. प्रत्यक्षात भारत हा विविधतेत आनंद मानणारा देश आहे. भारतात बाहेरुन विविध लोक येत राहिले आहेत.भारतीय स्वातंत्र्य लढ्यात हिंदू मुस्लिम आणि सर्व जण एकत्रित लढत होते. धर्माच्या नावावर लढणारे मात्र स्वातंत्र्य लढ्यात नव्हते. आपण मिळवलेले स्वातंत्र्य आपल्याला जपायचे आहे. म्हणून,इथुन पुढे संवैधानिक मूल्य रक्षणासाठी आपण सर्वांनी प्रयत्न केले पाहिजेत’,असेही डॉ. राम पुनियानी म्हणाले,
*मारहाणीच्या प्रयत्नांना प्रभावी उत्तर द्या : निरंजन टकले*
निरंजन टकले म्हणाले, ‘ संघापासून लोकशाहीला धोका आहे. बनारस हिंदू विद्यापिठातील विद्यार्थ्यानी केलेला सामूहिक बलात्कार हा राजकीय हत्यार म्हणून केलेला बलात्कार आहे. त्यामागे बलात्कार हे हत्यार म्हणून वापरण्याचे सावरकरांचे विचार आहेत.सावरकरांचे जाणीवपूर्वक उदात्तीकरण केले जात आहे. संवेदनशीलता संपवली जात आहे’.
‘पुणे विद्यापीठात विद्यार्थ्यांना मारहाण होते. पोलिसांची गाडी कायमस्वरूपी ठेवली जाते. हे विद्यापीठ आहे की दगडी चाळ ? असा प्रश्न टकले यांनी विचारला.आजच्या कालानुरुप आणि कल्पक आंदोलने केली पाहिजे. मारहाणीच्या प्रयत्नाना प्रभावी उत्तर दिले पाहिजे. कारण आपण गांधीजींचे वारस आहोत, तसेच भगतसिंग यांचेही वारस आहोत.युरोप, कॅनडात खून करण्याचे प्रयत्न होत असतील, तर भारतात खूनाचे प्रयत्न झाले नसतील का ? या मुद्यावर पुन्हा न्या.लोया यांच्या संशयास्पद मृत्यूकडे पाहिले पाहिजे’,असेही ते म्हणाले.
*’सावित्रीच्या लेकी ‘ पुरस्कार*
या संमेलनात भारत जोडो आंदोलनाच्या वतीने निरंजन टकले यांच्या हस्ते ‘सावित्रीच्या लेकी ‘ पुरस्कार मंगला पाटील, अरुंधती गडाळे, प्रतिभा भोसले, त्रिवेणी गव्हाळे यांना देण्यात आला.यावेळी आनंद करंदीकर,हरीश सदानी उपस्थित होते.
*दोन दिवस विचारांचा वेध आणि वेधक विचार*……………………
‘लोकशाहीच्या संरक्षणासाठी लोकांचा जाहीरनामा ‘ ही या संमेलनाची संकल्पना असून विविध आंदोलनातील कार्यकर्ते तसेच विचारवंत सहभागी झाले .यावर्षी लोकसभा निवडणूक होण्याची शक्यता असल्याने नागरिकांना पुरेशा माहितीवर आधारित, विचारपूर्वक आणि निर्भय मतदान करता येणे ,हे लोकशाहीच्या बळकटीकरणासाठी आवश्यक आहे. लोकशाही रक्षणाच्या तातडीच्या प्रश्नावर विचार करण्यासाठी हे विचारवेध संमेलन आयोजित करण्यात आले . ६ जानेवारी रोजी पहिल्या दिवशी योगेंद्र यादव, तुषार गांधी आदींनी तर डॉ. राम पुनियानी, डॉ.कुमार सप्तर्षी, निरंजन टकले, हरीष सदानी, सुनीती सु.र., अजित रानडे, संदीप बर्वे आणि अन्य मान्यवरांनी दुसऱ्या दिवशी विविध सत्रात मार्गदर्शन केले.
रविवार, ७ जानेवारी या संमेलनाच्या दुसऱ्या दिवशी सव्वादहा वाजता समूहगीतांनी प्रारंभ झाला. साडेदहा वाजता ‘सद्भावना मिशन’ या विषयावर डॉ.राम पुनियानी यांनी मार्गदर्शन केले. ‘लोकशाही रक्षण’ या विषयावर निरंजन टकले यांचे व्याख्यान झाले. १२ वाजता ‘स्त्रीवादाच्या संदर्भांत लैंगिक हक्क संरक्षण’ या विषयावर हरीश सदानी यांनी संवाद साधला. पाऊण वाजता ‘संविधान प्रचार चळवळीचा अनुभव’ विषयाची माहिती संदीप बर्वे यांनी दिली. दुपारी सव्वा दोन वाजता ‘स्थानिक स्वराज्य संस्थातील महिला प्रतिनिधींचे सक्षमीकरण’ या विषयावर भीम रासकर यांनी माहिती दिली. पावणे तीन वाजता याच विषयवार नीती दिवाण हिंदीतून माहिती दिली. सायंकाळी ४ वाजता ‘लोकशाही बळकटीकरणासाठी सामाजिक सलोखा’ या विषयावर अजित रानडे यांचे व्याख्यान झाले. सव्वा पाच वाजता ‘लोकशाही रक्षणाच्या लढ्याची दिशा’ विषयावर डॉ.कुमार सप्तर्षी यांनी मार्गदर्शन केले. सहा वाजता सरिता आवाड यांनी संमेलनाचा समारोप केला.