मुंबई-महाविकास आघाडीमधील काही राजकीय नेत्यांची फोन टॅपिंग प्रकरणात वादग्रस्त ठरलेल्या रश्मी शुक्ला यांची अखेर राज्याच्या पोलिस महासंचालकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. 1988 च्या बॅचच्या आयपीएस असलेल्या रश्मी शुक्ला यांची कारकीर्द मोठ्या वादात सापडली होती.
केंद्रीय लोकसेवा आयोगाने शुक्रवार 29 डिसेंबर रोजी बैठक घेतली. यावेळी महासंचालक पदासाठी 3 अधिकाऱ्यांच्या नावांची यादी त्यांनी पाठवली. यामध्ये सर्वात आधी नाव रश्मी शुक्ला यांचे नाव होते. त्यावर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना निर्णय घ्यायचा होता. अखेर आज शासनाने शुक्ला यांच्या नियुक्तीचा आदेश जारी केला आहे.
शुक्ला यांच्यावरती पुणे आणि मुंबई या दोन ठिकाणी वेगवेगळे दोन गुन्हे देखील दाखल करण्यात आले होते. पुढे दोन्ही गुन्हे कोर्टाने रद्द केले. नाना पटोले, संजय काकडे, संजय राऊत यांच्यासह महाविकास आघाडी मधील अनेक नेत्यांची फोन टॅपिंग प्रकरणाची शुक्ला यांच्यावर आरोप होते.
रश्मी शुक्ला यांनी यापूर्वी पुण्याचे पोलिस आयुक्त, डीआयजी (प्रशासन), नागपूरच्या एसपी आणि सोलापूरचे डीसीपी अतिरिक्त महासंचालक (वाहतूक), महानिरीक्षक (कायदा व सुव्यवस्था), म्हणून काम पाहिले आहे. पण राज्य गुप्तचर विभागाच्या आयुक्तपदाचा त्यांचा कार्यकाळ चांगलाच वादग्रस्त ठरला होता.
फोन टॅपिंग प्रकरणी चर्चेत
काय आहे प्रकरण?
रश्मी शुक्ला यांच्यावर बेकायदा फोन टॅपिंग केल्याचा गंभीर आरोप होता. त्यानंतर तत्कालीन पोलिस महासंचालक संजय पांडे यांची समिती स्थापन करण्यात आली होती. या समितीने अहवाल सादर केल्यानंतर शुक्ला यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा फोन टॅप केल्याप्रकरणी पुण्याच्या बंडगार्डन पोलिस ठाण्यात, तर शिवसेना खासदार संजय राऊत आणि राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांचे फोन टॅप केल्याप्रकरणी मुंबईतील कुलाबा पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले होते.