मुंबई–आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला यांचे महाराष्ट्रात पुनरागमन होण्याची शक्यता आहे. त्यांना राज्याचे पोलिस महासंचालकपद मिळण्याची शक्यता आहे. केंद्रीय लोकसेवा आयोगाने त्यांची निवड करण्यासाठी ग्रीन सिग्नल दिला आहे. मात्र याबाबत अंतिम निर्णय हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे घेणार असल्याची माहिती आहे.
केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या बैठकीत शुक्ला यांचे नाव
केंद्रीय लोकसेवा आयोगाने शुक्रवार 29 डिसेंबर रोजी बैठक घेतली. यावेळी महासंचालक पदासाठी तीन अधिकाऱ्यांच्या नावांची यादी त्यांनी पाठवली. यामध्ये सर्वात आधी रश्मी शुक्ला यांचे नाव आहे. मात्र त्यांना महासंचालकपद दिले जाणार की मुंबई पोलिस आयुक्त म्हणून त्यांची वर्णी लागणार याबाबतचा निर्णय मुख्यमंत्री आणि गृहमंत्री मिळून घेणार आहेत.
विद्यमान पोलिस महासंचालक रजनीश सेठ निवृत्त होणार
विद्यमान पोलिस महासंचालक रजनीश सेठ यांचा कार्यकाळ संपत असल्याने ते निवृत्त होणार आहेत. त्यामुळे शुक्ला यांची महासंचालक पदावर निवड होण्याची शक्यता आहे. मात्र तोपर्यंत डीजीपी पदाचा अतिरिक्त पदभार हा मुंबई पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर यांच्याकडे देण्याचे आदेश मुख्यमंत्री शिंदे यांनी दिले आहेत
फोन टॅपिंग प्रकरणी चौकशी
रश्मी शुक्ला या 1988 बॅचच्या आयपीएस अधिकारी आहेत. 2019 च्या विधानसभा निवडणुकीच्या काळातील कथित फोन टॅपिंग प्रकरणी महाविकास आघाडी सरकारने शुक्ला यांची चौकशी सुरू केली होती. एकनाथ खडसे, संजय राऊत, नाना पटोले, आशिष देशमुख आणि बच्चू कडू यांचे फोन टॅप करण्यात आल्याची माहिती तत्कालीन गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी विधानसभेत देखील दिली होती.
त्यामुळे रश्मी शुक्ला वादाच्या भोवऱ्यात सापडल्या होत्या. अनेकांनी त्यांच्या कार्यपद्धतीवर आक्षेप घेत प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते . दरम्यान, राज्यात सत्तांतर झाल्यानंतर फोन टॅपिंगच्या प्रकरणातील त्यांच्या विरोधातील चौकशी बंद झाली होती. मुंबई हायकोर्टाने रश्मी शुक्लांच्या विरोधातील फोन टॅपिंग प्रकरणातील याचिका फेटाळून लावल्या होत्या.