पुणे, ता. ६ – स्वत:च्या जीवावर उदार होऊन समाजासाठी कर्तव्य भावनेने अविरत कार्य करणार्या सेवाव्रती कर्मचार्यांच्या कुटुंबांना आर्थिक मदत करण्याच्या उद्देशाने दीर्घकालिन योजना करण्याची आवश्यकता असल्याचे मत भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केले.
हेमंत रासने मित्र परिवाराच्या वतीने दोन हजार स्वच्छता कर्मचारी आणि चारशे वर्तमानपत्र वितरकांच्या कृतज्ञता सन्मान कार्यक्रमात पाटील बोलत होते. स्थायी समितीचे अध्यक्ष हेमंत रासने, आमदार मुक्ता टिळक, भाजपचे शहर संघटन सरचिटणीस राजेश पांडे, नगरसेवक राजेश येनपुरे, अजय खेडेकर, मृणाल रासने, प्रमोद कोंढरे, उदय लेले या वेळी व्यासपीठावर उपस्थित होते.
पाटील म्हणाले, प्रासंगिक कार्यक्रमांतून आपण विविध वंचित घटकांना मदत करीत असतो. बेताच्या पगारामुळे त्यांना घर चालविणे अवघड असते. या कुटुंबांचा अभ्यास करून त्यांच्या गरजेनुसार शिक्षण, आरोग्य, ज्येष्ठांना मदत, मूलभूत सुविधा भागविण्यासाठी कायमस्वरूपी योजना केली पाहिजे. त्यांचा आर्थिक भार कमी झाला तर ते ही आर्थिक बचत करू शकतील. त्यासाठी सरकारबरोबर विविध संस्था आणि कार्यकर्त्यांनी काम करण्याची गरज आहे.
रासने म्हणाले, शहरामध्ये दररोज सतराशे मेट्रिक टन कचर्याचे संकलन दहा हजारहून अधिक स्वच्छता कर्मचारी करीत असतात. कोविडच्या काळात स्वत:चा जीव धोक्यात घालून आणि कुटुंबाच्या आरोग्याची तमा न बाळगता या कर्मचार्यांनी सामाजिक भावनेतून सेवाभावी वृत्तीने समाजाची सेवा केली. तशाच प्रकारचे काम वृत्तपत्र वितरकांनी घरोघरी वर्तमानपत्र पोहोचवून केले. पुणेकरांच्या वतीने या सर्वांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी कृतज्ञता सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला होता. समाजातील शेवटचा माणूस सुखी होण्यासाठी अन्न, सुरक्षा, आरोग्य आणि रोजगार निर्मितीसाठी आम्ही कटिबद्ध आहोत.
हेमंत रासने यांनी प्रास्ताविक, प्रमोद कोंढरे यांनी सूत्रसंचालन आणि राजेंद्र काकडे यांनी आभार प्रदर्शन केले. अनिल बेलकर, सौरभ रायकर, विनायक रासणे, किरण जगदाळे, नीलेश कदम, परेश मेहेंदळे, छगन बुलाखे, अश्विनी पांडे, अमित कंक यांनी संयोजन केले.
*चौकट*
डॉक्टर, नर्स, सरकारी कर्मचारी, पोलीस, बॅंक कर्मचारी, दुकानदार आदी दहा समाज घटकांनी कोरोना काळात काम केले नसते तर समाज उद्धस्त झाला असता. या घटकांनी खर्या अर्थाने समाजाला वाचवले आणि आपण कोविडमधून बाहेर पडलो. दोन लसीकरणांमुळे समाजाच्या मनातील कोविडची भीती संपली. याचे श्रेय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जाते. त्यांनी कणखरपणा दाखवला त्यामुळे आपण लस निर्मिती करू शकलो. नुसती लस निर्माण केली नाही तर ६० देशांना लसीचे डोस पुरविण्याची स्थिती निर्माण केली. असे मत ही पाटील यांनी व्यक्त केले.
*दिवाळी फराळाला सर्व क्षेत्रांतील मान्यवरांची उपस्थिती*
या कार्यक्रमानंतर आयोजित करण्यात आलेल्या दिवाळी फराळाला सर्व क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थिती लावली. अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात राजकीय आणि सामाजिक विषयांवर चर्चा झाल्या. महापालिकेची आगामी निवडणूक, प्रभाग रचना, आरक्षण, निवडणुका वेळेवर होतील का, प्रचाराची रणनीती, निवडणुकीची तयारी या विषयांवर चर्चा झाल्या. कोरानानंतरची स्थिती, बाजारपेठेतील उलाठाल, या पुढील आव्हाने यावर मते व्यक्त करण्यात आली. एकमेकांची आपुलकीने विचारपूस करण्यात येत होती.
खासदार गिरीश बापट, खासदार श्रीरंग बारणे, भाजपचे शहराध्यक्ष जगदीश मुळीक, आमदार भीमराव तापकीर, सुनील टिंगरे, माजी मंत्री दिलीप कांबळे, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप, अंकुश काकडे, दीपक मानकर, अभय छाजेड, आबा बागूल, धीरज घाटे, श्रीनाथ भिमाले, डॉ. सतीश देसाई, लता राजगुरू, पृथ्वीराज सुतार, विशाल धनावडे, अर्चना पाटील, राहूल भंडारे, भीमराव साठ्ये, ग्राहक पेठेचे सूर्यकांत पाठक, व्यापारी असोसिएशन महेंद्र पितळिया, केमिस्ट असोसिएशनचे संजय शाह, चेतन शाह, संजय कुंजीर, ॲड प्रताप परदेशी, डॉ. मिलिंद भोई, तुळशीबाग मंडळाचे विवेक खटावकर, नितीन पंडित, तुळशीबाग व्यापारी असोसिएशनचे राजेश बारणे यांच्यासह सामाजिक, राजकीय, व्यापार, सहकार, प्रशासन, आरोग्य, पत्रकारिता, गणेश मंडळे आदी क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते.