मुंबई- राज्यात लॉकडाऊन किती दिवसांचा करायचा यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज कोरोना टास्क फोर्ससोबत बैठक घेतली. मात्र, यामध्ये टास्क फोर्सच्या सदस्यांनी कमीतकमी दोन आठवड्यांचा कडक लॉकडाऊन करण्याचा सल्ला दिला आहे. यावर उद्या पुन्हा सकाळी 11 वाजता टास्क फोर्सच्या सदस्यांसोबत मुख्यमंत्री ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची बैठक होणार असून यामध्ये लॉकडाऊनचा निर्णय घेण्यात येणार असल्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी स्पष्ट केले आहे.
कोरोनाची लाट रोखण्यासाठी आणि चेन तोडण्यासाठी कमीतकमी 14 दिवसांच्या लॉकडाऊनची गरज असल्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी म्हटले आहे. तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत सुरु असलेल्या कोरोना टास्क फोर्सच्या बैठकीत सदस्यांनी देखील 14 दिवसांचा लॉकडाऊन गरजेचा असल्याचे म्हटले होते.