पुणे – देशाच्या तिंरंगा झेंड्यालाएक राष्ट्रव्यापी ऐतिहासिक महत्व आहे. विद्यामान मोदी सरकार, त्यांचा पक्ष एकाच रंगाची पेरणी करण्यासाठी नवे फंडे काढत आहे. देशाच्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या निमित्ताने तिरंगा घर घर तिरंगाच्या माध्यमातून तिरंगा झेंड्याचे वाईट पद्धतीने भांडवल केले आहे. देशाच्या झेंड्या इतकीच देशाच तिरंगा इतकेच महत्वाचे असलेले देशाचे संविधानही घर घर पोचवलेले नाही. तरीही यातूनच देश उभा रहात असल्याचे भासवून एक दु:चित्र उभं केलं जात आहे. याबद्दल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी जागरूक राहिले पाहिजे असे प्रतिपादन साहित्या संमेलनाचे माजी अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांनी आज येथे केले.
स्वतंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त शहर काँग्रेसच्या वतीने “स्वातंत्र्याचे समर” १८८५ ते १९४७ पर्यंतच्या स्वातंत्र्य लढ्याचा चित्रमय इतिहास या प्रदर्शनाचे आयोजन सारसबागेजवळच्या बाळासाहेब ठाकरे कलादालनात केले आहे. या प्रदर्शनाचे उदघाटन डॉ. सबनीस यांच्या हस्ते आणि ज्येष्ठ गांधीवादी नेते उल्हासदादा पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत आज झाले. त्यावेळी डॉ.सबनीस बोलत होते. “स्वातंत्र्याचे समर” या प्रदर्शनाचे संयोजन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस अभय छाजेड आणि काँग्रेसचे शहराध्यक्ष अरविंद शिंदे यांनी केले आहे. या प्रसंगी माजी मंत्री बाळासाहेब शिवरकर, काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष,माजी गृहराज्यमंत्री रमेश बागवे, माजी आमदार अनंतराव गाडगीळ, महापालिकेतील गटनेते आबा बागूल, संजय बालगुडे, नीता रजपूत, यासीन शेख यांच्यासह अनेक कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.
डॉ. सबनीस म्हणाले, देशाचा तिरंगा जशी शान आहे, तसेच संविधान हे कागदावर लिहिण्यापुरते मर्यादित नाही तर संविधान हे जीवन जगण्याचे अनुभवण्याचा विषय आहे. असे हे संविधान या निमित्ताने घरघर पोचवलेले नाही कारण त्यांचा कारभारच संविधानाची मोडतोड करून सुरू आहे.देशाच्या स्वातंत्र्यासाठी हौतात्म्य स्वीकारणा-यां देशभक्तांना जातीच्या संकुचित परिघात अडकरवण्याचे काम सध्या सुरू आहे. खर तर गांधी, नेहरूपासून ते सावरकर, भगतसिंग, सुभाषचंद्र बोस, मौलाना अब्दुल कलाम अशा सर्वांच्या राष्ट्रभक्तीची तुलना करण्याची गरज नाही. या सर्वांची राष्ट्रभक्ती ही सत्याची, ज्ञानाची, हौतात्म्याची आहे. काँग्रेसचा इतिहास हाच खरा देशाच्या स्वातंत्र्याचा इतिहास आहे हे न मान्य करणारे मोठी गल्लत करत आहेत. महात्मा गांधीजींनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी सत्याचा आग्रह धरला मात्र आज त्यांचे नाव घेणारे सत्यासाठी नव्हे तर सत्तेसाठी आग्रही असून त्यासाठी महात्मांचे नाव वापरत आहेत. हेच “स्वातंत्र्याचे समर” १८८५ ते १९४७ पर्यंतच्या स्वातंत्र्य लढ्याचा चित्रमय इतिहास या प्रदर्शनातून अधोरेखीत होत आहे.
उल्हास पवार म्हणाले, ज्यांनी स्वातंत्र्य चळवळीच्या काळात तिरंगा झेंडा हाच देशाचा झेंडा मानण्यास नकार दिला, त्याला पायदळी तुडवले, तिरंग्याचा अपमान केला तेच लोक आज घर घर तिरंगा म्हणत आहेत हाच महात्मा गांधीच्या आणि काँग्रेसच्या चळवळीचा विजय आहे. महात्मा गांधींची हत्या झाली ती एक मोठी चूक होती हे दहा बारा वर्षापूर्वी संघाचे प्रवक्ते मा. गो. वैद्य यांनी जाहीरपणे मान्य करणे हाच काँग्रेसच्या चळवळीचा विजय आहे. गांधी – नेहरू यांच्या व्देष करणा-या आज जगात फिरताना नाईलाजाने त्यांचा स्वीकार करावा लागत आहे. गाडगीळ वाड्यात झालेली काँग्रेस वर्किंग कमिटीची बैठक, संपूर्ण स्वातंत्र्याचा लाहोर अधिवेशनात 1929 साली केलेला ठराव, त्यापूर्वी महर्षि विठ्ठल रामजी शिंदे यांनी 1917 च्या अधिवेशनात अस्पृश्यता निवारणासाठी कायदा करण्याची मागणी करणारा मांडलेला ठराव असे स्वातंत्र्य चळवळीतील अनेक टप्पे या प्रदर्शनाच्या निमित्ताने आपल्या समोर येतात. हे सर्व टप्पे तरूण पिढीसमोर येणे गरजेचे होते तसा प्रयत्न या प्रदर्शनाच्या माध्यामातून होत आहे. काँग्रेसचा प्रत्येक कार्यकर्ता हा 1947 पासून दरवर्षी स्वातंत्र्य दिनी तसेच प्रजासत्ताक दिनी तिरंगा झेंडा फडकवत असल्याने आमच्यासाठी यावर्षी तिरंगा फडवणे नविन नाही. ज्यांनी आजपर्यंत कधी तो फडकवला नाही त्यांनाच त्याचे अप्रूप आहे.
प्रास्ताविक करताना प्रदर्शनाचे मुख्य संयोजक अभय छाजेड म्हणाले, दादाभाई नवरोजी, लोकमान्य टिळकांनी लोकांच्या मनात पेटवलेली स्वतंत्र्याची ज्योत महात्मा गांधीनी सत्याग्रह, असहकार, अहिंसा, सविनय कायदेभंग अशा पद्धतीने पुढे नेत भारतीयांच्या मनाची स्वातंत्र्यासाठी मशागत करून स्वातंत्र्यासाठी लोकांची मानसिकता तयार केली. सरकारने या अमृत महोत्सवाच्या निमित्ताने तिरंगा घरोघर नेताना या सरकारला महात्मा गांधी, पंडित नेहरू, लोकमान्य टिळक, मौलाना आझाद, सरदार पटेल, सुभाषचंद्र बोस अशा सर्वांच्या विसर पडावा ही शोकांतिका आहे.
“स्वातंत्र्याचे समर” १८८५ ते १९४७ पर्यंतच्या स्वातंत्र्य लढ्याचा चित्रमय इतिहास या प्रदर्शनाची संकल्पना अभय छाजेड यांची आहे. या प्रदर्शनात छायाचित्रे, त्या खाली इतिहासातील महिती देण्यात आली आहे. काँग्रेसची स्थापना, अधिवेशने, आंदोलने, बारडोलीचा सत्याग्रह, मीठाचा सत्याग्रह ते चले जाव चळवऴ अशा आंदोलनांच्या दुर्मिळ छायाचित्रांचा यात समावेश आहे. हे प्रदर्शन मंगळवार दि.१६ ऑगस्टपर्यंत नागरीकांसाठी सारसबागे जवळच्या ठाकरे कलादालनात खुले रहाणार आहे.