‘७ वाजले की रिमोट आम्हाला हवाय. आजपासून आमच्या झीच्या सीरिअल्स पुन्हा सुरू होत आहेत’…घरातल्या पुरुष मंडळींना सासूबाईंनी तंबी देऊन ठेवली आणि पावणेसात वाजताच रिमोटचा ताबा घेतला. कारण ७ वाजता पहिली सीरिअल सुरू होणार होती ‘मिसेस मुख्यमंत्री’. अगदी टायटल साँगपासून काही काही चुकायला नको म्हणून आम्ही दोघीही टीव्हीसमोर ठाण मांडून बसलो. प्राईम टाइम सीरिअलची सुरुवातच मुळात गुढीपाडव्याच्या प्रसंगाने ‘मिसेस मुख्यमंत्री’नी केली आणि नवउत्साहाच्या चैतन्याची तिकडेच नांदी झाली. बघताबघता राणादा आणि अंजलीबाई कधी भेटीला आले ते कळलंच नाही. १ तास होऊन गेला होता, मधूनच जाहिरातींच्या माऱ्यात कुकर लावून झाला होता. एव्हाना घरच्यांच्या लक्षात आले होते की या दोघी काही टीव्ही समोरून हटणार नाहीत. ८ वाजले आणि ‘माझ्या नवऱ्याची बायको’ सीरिअल सुरू झाली. सुरूवात नुसती पळापळीने झाली. सेकंदभर काही बोध झाला नाही पण मग रिकॅप दाखवल्यावर आठवले. जवळजवळ ३ महिने सीरिअल बंद…त्यामुळे शेवटच्या भागात नक्की काय झाले होते ते आठवणे थोडे अवघडच होते. ‘माझ्या नवऱ्याची बायको’ने ते ओळखून फ्लॅशबॅक दाखवला. या सीरिअलमध्ये सुखद धक्का होता तो जुनी शनाया परत आल्याचा! तिला पाहण्यासाठी घरातील बाकी मंडळी टीव्हीसमोर बसली. वेंधळ्या-बावळट शनायाला बघणे हा पुनरागमनाचा धक्का म्हणजे ‘जोर का झटका धीरे से लगा’ होता. सीरिअलमधील हॉटेलचा प्रसंग बघताना लक्षात आले की शूटिंगचे लोकेशन बदलले आहे; कारण ते ठाण्या-मुंबईतील हॉटेलऐवजी कुठले तरी कँटीन वाटत होते. साडेआठ वाजले नि शुभ्रा व आसावरी नेहमीप्रमाणे स्वयंपाकघरात भेटीला आल्या. आपलेही जेवण उरकायचे आहे याची आठवण झाली खरी, पण सीरिअलच्या नादात दुर्लक्ष केले. टीव्हीचा व्हॉल्युम थोडा वाढवूनच सीरिअल बघायला बसलो. शुभ्रा, आसावरी पाठोपाठ दाढी वाढवलेल्या अभिजीत राजेंची एंट्री झाली. दाढीमध्ये सुद्धा अभिजित राजे इतके हँडसम दिसत होते की केवळ प्रज्ञाच काय पण कितीतरी जणी त्यांच्या प्रेमात पडतात ते उगाच नाही. बबड्या कुठे दिसत नाही, असं मनात म्हणत असतानाच तोही हजर झाला. सीरिअल बघताना आमच्या लक्षात आलं की हे घर तर वेगळं आहे. मग आमची चर्चा सुरू झाली हे आसावरीचं घर आहे की अभिजित राजेंचं. घराचा प्रशस्त दरवाजा पाहून वाटलं की हे राजेंचं घर असावं…म्हणजे शुभ्रा आणि बबड्या आता यांच्याकडे राहायला आले की काय…पण घराचे पडदे तर साडीचे आहेत, म्हणजेच आसावरीचं घर. अरे हो, आता त्यांनी कदाचित लॉकडाऊनमध्ये सगळ्यांना सोयीस्कर म्हणून शूटिंगचे लोकेशन बदलले असणार. आसावरीची साडी, शुभ्राचा प्लेन ड्रेस आणि प्रिंटेड ओढणी एवढंच काय तर बबड्याचा फुलाफुलांचा प्रिंटेड टीशर्टही तोच होता. घर आणि घरातले इंटेरिअर बदलेले गेले होते, फक्त साडीचे पडदे सोडून. तात्पर्य काय, सीरिअलवाल्यांनो…प्रेक्षक फक्त सीरिअल्स बघत नाहीत पण आजूबाजूच्या सगळ्याच गोष्टींकडे बारकाईने नजर ठेवूनअसतात बरं का !
एकामागोमाग एक सीरिअल्समुळे ९.३० कधी वाजले ते कळलंच नाही. घड्याळाचा काटा जेवण आणि ‘चला हवा येऊ द्या’कडे नेमका बोट दाखवत होता. सीरिअल बघता बघता जेवूया असा प्रस्ताव एकमताने मान्य झाला.
‘चला हवा येऊ द्या’ची सुरुवातच रंगदेवतेची पूजा करून ‘नटरंग उभा ललकारी नभा स्वरताल जाहले दंग’…’नटरंग’मधील या गाण्यानं झाली. स्टुडिओ सॅनिटाईझ करण्यापासून, डॉ. निलेश साबळेंनी केलेली कॅमेऱ्याची पूजा, पीपीई किट घालून मेकपक आर्टिस्टने केलेली पूजा या आणि बॅकग्राउंडला ‘नटरंग’मधील त्या सिच्युएशनला साजेशा समर्पक गाण्याने झाली. तू चाल पुढं गड्या रे तुला भीती कशाची… निलेश साबळेंनी ठेवणीतले स्मितहास्य करून रंगमंचावर त्याच आत्मविश्वासाने एंट्री केली. ‘करोनाची भीती मनातून काढून टाकून आता परत हास्याचा झरा वाहू देत’ हेच त्यांना सांगायचं होतं. नेहमीचाच जिव्हाळ्याचा प्रश्न – कसे आहेत सगळे? हसताय ना सगळे…हसायलाच पाहिजे…टेन्शन अनलॉक करण्यासाठी. यानंतर तमाम प्रेक्षकांच्या चेहऱ्यावर किती तरी दिवसांनी हास्य उमटले असणार हे नक्की.
रसिकांच्या दुःखावर हास्याचा सॅनिटाईझर फिरून पुन्हा त्यांच्या चेहऱ्यावर आनंद येऊ रे महाराजा…असे झीच्या कलाकारांबरोबर देवाला साकडे घालून कार्यक्रमाची सुरुवात झाली. इतके दिवस ताणतणावात असलेले चेहरे हळूहळू खुलायला लागले होते.
हातावर सॅनिटाईझर लावायलाच पाहिजे तरच हातावरची आयुष्यरेषा वाढेल मंडळी’ हा प्रेमळ आरोग्य सल्लाही करोनापासून बचाव करण्यासाठी डॉ. निलेश साबळेंनी दिला.
या वेळी ‘लॉक डॉन अवॉर्ड्स २०२०’ ही थीम होती. लॉकडाऊन ते लॅचडाऊन…असे एक एक पंच घेत शो पुढे सरकत होता. हळूहळू वातावरणात हास्याचा गारवा जाणवू लागला.
पुरस्काराचे नॉमिनेशन जाहीर झाले. ते देण्यासाठी शांताबाईंची म्हणजेच भाऊ कदमची नेहमीच्या रॅपोमध्ये फुल्ल टू एनर्जीने एंट्री झाली. भाऊचा शांताबाईचा परफॉर्मन्स नेहमीच भाव खाऊन जातो, यावेळीही तो झक्कास झाला.
दहा वाजत आले होते. गेले ३ महिने आईला फोन करायची सवय होती. ब्रेकमध्ये लगेच आईला फोन केला…’आई, तुझ्याशी ‘चला हवा येऊ द्या’ संपले की बोलते गं.’ आईचाही तडक रिप्लाय…’अगं, मीही तुला तेच सांगणार होते! आम्ही सगळे तेच बघतो आहोत.’ लगेच फोन कट केला कारण ब्रेक संपला होता.
त्यानंतर सासरा-सून अशी कुशल बद्रीके आणि आपल्या सर्वांचीच लाडकी श्रेया बुगडे यांची जोडी पुढील पुरस्कार द्यायला आली. वो बुलाती हे मगर, जाने का नही उधर…या गाण्यावर भन्नाट नाच करत कुशलने धम्माल उडवून दिली. वर्क फ्रॉम होम पुरस्कार, आत्मनिर्भर पुरस्कार, सर्वोत्कृष्ट मास्क डिझाईन पुरस्कार… लॉकडाऊनमधील समस्यांना विनोदाची फोडणी देऊन त्या उत्तम प्रकारे मांडल्या होत्या. सरतेशेवटी कार्यक्रम संपला तो प्रेक्षकांना टेन्शनमधून बाहेर काढून. खूप महिन्यांनी घरोघरी हास्याची कारंजी फुलली असणार. मंगळवारचा एपिसोडही असाच भन्नाट असणार यात शंकाच नव्हती.
मार्चच्या शेवटच्या आठवड्यात पहिला लॉकडाऊन जाहीर झाला, त्यापाठोपाठ साधारण एप्रिलच्या पहिल्या आठवड्यानंतर सीरिअल्सही बंद झाल्या. शूटिंगसाठी त्यांनाही अडचणी आल्या असतील. कारण बरेच कलाकार लांबून येतात आणि ट्रेनही बंद झाल्या होत्या. मग चॅनलवाल्यांनी रिपीट एपिसोड दाखवायला सुरुवात केली. काही दिवस बरे गेले पण नंतर कंटाळवाणं वाटलं. बाहेरही कुठे जात येत नव्हते. घरी बसून करोनाच्या भयावह बातम्या बघून वीट आला होता आणि टेन्शनही वाढत चालले होते. घरातल्या गृहिणींना आणि वयस्क माणसांना टीव्हीच्या सीरिअल्स हे एकमेव मनोरंजनाचे साधन असते. ही सगळी मंडळी पुन्हा एकदा सीरिअल्स कधी चालू होतात याकडे डोळे लावून बसली होती. ५ जूनला पहिला अनलॉक जाहीर झाला आणि त्याचबरोबर थोड्याच दिवसात तमाम वहिनींचे लाडके आदेश भावोजी परत भेटीला आले-होम मिनिस्टर घरच्या घरी. उरलेल्या सीरिअल्सही लवकरच चालू होतील याच्या आशा पल्लवित झाल्या. …आणि आम्ही येत आहोत लवकरच आपल्या भेटीला…अशी बातमी आली. अखेरीस १३ जुलै तारीख जाहीर झाली आणि प्रतीक्षा संपली एकदाची. मराठी मनोरंजनाचा शुभारंभ पुन्हा एकदा नव्या जोमाने, उत्साहाने झाला. झी मराठी बरोबरच, स्टार प्रवाह आणि सोनी मराठीनेही आपापले शो सुरू केले.
झीच्या प्राईम टाइमची सुरुवातच ‘नमन नटवरा’ या नांदीने झाली. एका पाठोपाठ एक सीरिअल बघण्यात पुनश्च घरोघरी उत्साहाचे चैतन्य पसरले. ‘चला हवा येऊ द्या’ने त्यात चार चाँद लावले. हा कार्यक्रम बघून प्रेक्षकांनीही नक्कीच झीला प्रतिक्रिया दिल्या असणार की आज आम्ही इतक्या दिवसांनी रिलॅक्स झालो. गेले तीन महिने रोज रात्री आवर्जून १० च्या बातम्या बघणार्यांनाही ‘चला हवा ये येऊ द्या’ च्या हास्यात बातम्यांचा नक्की विसर पडला असणार.
निलेश साबळेंनी आपल्या कार्यक्रमातून तमाम रसिक प्रेक्षकांना सांगितले- आता सर्वांनी सुरक्षिततेची काळजी घेत धैर्याने करोनाशी दोन हात करायचे आहेत. आणि आम्ही पुन्हा आलो आहोत, तुम्हा सर्वांचे टेन्शन दूर करून पुन्हा हसवायला.
तेव्हा आता-
कसे आहात सगळे ?
काय हसताय ना…
चला आता हसू येऊ द्या…
करोनाचे टेन्शन नको…
हसू येऊ द्या…
चला आता हसू येऊ द्या…
© पूर्णिमा नार्वेकर
पुष्पक अपार्टमेंट, ब्लॉक नं 203,
भिकाजी लाड मार्ग,
दहिसर फाटक जवळ,
दहिसर (प.),
मुंबई – 400068