पुणे – सुश्रुत ज्यांना फादर ऑफ सर्जरी असे म्हटले जाते, त्यांनी मूळव्याधीवर क्षारकर्म सारखी उपचार पद्धती सांगितली आहे. जी आज कालबाह्य होताना दिसते. क्षार कर्म ही एक अतिशय सुलभ उपचार पद्धती असून या उपचारांमध्ये आजही मोठ्या प्रमाणामध्ये आधुनिकीकरण होणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन डॉ. कुणाल कामठे यांनी केले.
पारुल युनिव्हर्सिटी बडोदा येथे देश पातळीवरील परिषदेमध्ये ‘क्षारकर्म मिनिमल इंवसिव पाईल्स ट्रीटमेंट’ हा शोधनिबंध डॉ. कामठे यांनी सादर केला. डॉ. कामठे हे पुण्यातील एकमेव डॉक्टर होते, ज्यांचा शोध निबंध या परिषदेमध्ये निवडण्यात आला होता.
डॉ. कुणाल कामठे म्हणाले, मूळव्याध हा आजार अतिशय सर्वसामान्य झालेला आहे. प्रत्येक घरामध्ये एखाद्या व्यक्तीस मूळव्याधीचा त्रास होताना दिसतो, परंतु आजही लोकांच्या मनामध्ये अनेक समज आणि गैरसमज दिसून येतात.
मूळव्याधीवर क्षारकर्म उपचार हे कसे साध्य ठरतात व विना उपद्रव कशा पद्धतीने केले जातात, याबद्दलचे संशोधन त्यांनी या परिषदेमध्ये सादर केले. आयुर्वेदशास्त्र अतिशय मोलाचे शास्त्र आहे, यात दिलेली प्रत्येक उपचार पद्धती ही अतिशय रामबाण आहे. परंतु तिचा उपयोग योग्य निदानपूर्वक व आधुनिकीकरणाची जोड देऊन करणे, हे या काळामध्ये अतिशय लाभदायक ठरते, असे त्यांनी यावेळी सांगितले.
पारुल विद्यापीठ ,बडोदा येथे शृतायु या देशपातळीवरील परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. जामनगर विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. मुकुल पटेल यांच्या हस्ते या परिषदेचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी देशाच्या वेगवेगळ्या भागातील तज्ञांनी त्यांचे संशोधन व नाविन्यपूर्वक मूळव्याध भगंदर फिशर यावरील उपचारात्मक पद्धती सादर केल्या गेल्या.