पुणे, : निसर्गाला बोलता येतं आणि आपणही निसर्गाशी बोलू शकतो. निसर्गसंवाद हेच पर्यावरणाचं सूत्र आहे. हा संवाद वाढविण्यासाठी पर्यावरणाच्या चिंतन आणि चित्रणाबरोबरच कृतीही केली पाहिजे, त्यासाठी ब्रह्मतत्त्वाच्या निरुपणाप्रमाणे पर्यावरणाचंही निरुपण सातत्यानं करणं महत्त्वाचं आहे, असं मत संत साहित्याचे ज्येष्ठ अभ्यासक आणि पर्यावरणस्नेही साहित्य संमेलनाचे अध्यक्ष रामचंद्र देखणे यांनी व्यक्त केलं.
11 व्या किर्लोस्कर वसुंधरा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या निमित्तानं, महाराष्ट्र साहित्य परिषद आणि स.प.महाविद्यालयाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ‘पर्यावरणस्नेही साहित्य संमेलना’त ते बोलत होते. स.प.महाविद्यालयात झालेल्या या कार्यक्रमात उद्घाटक डॉ. विकास आमटे, महाविद्यालयाचे प्राचार्य दिलीप शेठ, महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी, प्रमुख कार्यवाह प्रकाश पायगुडे, कोषाध्यक्ष सुनिताराजे पवार, वसुंधरा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे संयोजक विरेंद्र चित्राव उपस्थित होते.
“ज्या काळी पर्यावरणाची हानी फार झालेली नव्हती, प्रदूषणाचा प्रश्नही निर्माण झाला नव्हता, त्या काळी संतांनी पर्यावरणाची दृष्टी दिली. हे संत वाङ्मयाचे विशेष आहे. ही दृष्टी असूनही आमच्याकडे पर्यावरणाची समस्या मोठ्याप्रमाणावर आहे. ही समस्या सोडवायची असेल तर निसर्गाच्या पावलांनी चालण्याशिवाय कोणताही पर्याय आपल्यासमोर नाही. अशा संमेलनातून पर्यावरणविषयक दृष्टी बदलण्यास आणि पर्यावरणाशी भावनिक नातं जोडण्यास मदत होईल”, असे सांगून देखणे यांनी संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, समर्थ रामदास, बहिणाबाई यांच्या काव्यात आलेले पर्यावरण उलगडवून दाखविले.
जोशी म्हणाले, “आर्थिक उदारीकरणामुळे बाह्य पर्यावरण बदलत आहे. मूल्यव्यवस्थेसह सगळ्याच क्षेत्रात सपाटीकरणाला सुरुवात झाली आहे. यामुळं पर्यावरणर्हासापासून ते पुतळे उद्ध्वस्त करण्यापर्यंत आपली मजल गेली आहे. विवेकाचा जागर करणे, हाच या सपाटीकरणावरचा एकमेव उपाय आहे.”
यावेळी प्राचार्य दिलीप शेठ, विरेंद्र चित्राव यांनीही मनोगते व्यक्त केली. निवेदन प्रा. विलास करपे आणि आभार प्रा. कविता बारस्कर यांनी केले.
साहित्य संमेलनाच्या दुसर्या सत्रात पर्यावरणतज्ज्ञ अनिरुद्ध चावजी यांचे ‘रामायणातील पक्षीजीवन’ या विषयावर व्याख्यान व ज्येष्ठ कवी अशोक नायगावकर आणि रमजान मुल्ला यांची काव्यमैफल आदी कार्यक्रम झाले. समारोपाच्या सत्रात स.प.महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी पर्यावरण रक्षणाचे ठराव मांडले आणि ते मंजूर करण्यात आले.
—————-
चौकट
मी भंगाराचा ठेकेदा : डॉ. विकास आमटे
पर्यावरणस्नेही साहित्य संमेलनात डॉ. मंदार परांजपे यांनी समाजसेवक आणि पर्यावरणतज्ज्ञ डॉ. विकास आमटे यांची मुलाखत घेतली. त्यावेळी आमटे म्हणाले,“पर्यावरण म्हणजे केवळ पाऊस, वारा, झाडं नव्हे. सामाजिक पर्यावरण हाही त्यातला महत्त्वाचा भाग आहे. ज्यांचं सामाजिक पर्यावरण उद्ध्वस्त झालं आहे, अशा कुष्ठरोग्यांसाठी आनंदवनाची उभारणी केली. आनंदवन बंद करणं, हीच बाबा आमटे यांची पहिल्या दिवसापासूनची धारणा होती. ते आनंदवनाला तुरुंग म्हणायचे. मी या तुरुंगाचा जेलर आहे.” असं सांगून वॉटर बँक, बायोगॅस बँक, सोमनाथ प्रकल्प, गवताची शेती, आनंदवन डेअरी, टायर वापरून केलेले बंधारे, प्लॅस्टिकच्या वापरातून उभी केलेली घरे.. अशा आनंदवन परिसरातील विविध प्रकल्पांची माहिती आमटे यांनी दिली. “बाबांनी पर्यावरणाची चळवळ पहिल्यांदा आनंदवनात सुरू केली. भारतातील पहिलं ‘स्मार्ट व्हिलेज’ म्हणून या गावाची घोषणा आम्ही केली आहे. तुम्ही फेकलेली माणसं, वस्तू, टायर्स या सगळ्यांतून इथं हे काम आकाराला आलं आहे. मी या सगळ्या ‘भंगाराचा’ ठेकेदार आहे” असेही आमटे यांनी सांगितले.