‘एआयटी’मध्ये रौप्यमहोत्सवी पदवीप्रदान समारंभ
पुणे: “पदवी मिळवणे हा प्रत्येकाच्या आयुष्यातील महत्वाचा टप्पा असतो. अभियांत्रिकी विविध शाखांशी परस्परसंबंधी होत असल्याने इतरांच्या अभ्यासाच्या विषयाचा आदर व्हावा. जीवनात काम करताना पैसे कमवण्यासोबतच एकोप्याने काम करणेही तितकेच महत्वाचे आहे. पैशासह आपल्यातील माणुसकी जपत पर्यावरणाचा समतोल राखणे प्रत्येकाची जबाबदारी आहे,” असे प्रतिपादन टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसच्या अनॅलिटीक्स अँड इनसाइट विभागाचे ग्लोबल हेड दीनानाथ खोळकर यांनी केले.
दिघी येथील आर्मी इन्स्टिटयूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या (एआयटी) विद्यार्थ्यांचा २५ वा पदवीप्रदान समारंभ संस्थेच्या कॅम्पसमध्ये पार पडला. त्यांच्या हस्ते २०१८-१९ च्या बॅचच्या पदवीप्राप्त विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. प्रसंगी ‘एआयटी’चे संचालक ब्रिग्रेडिअर (निवृत्त) अभय भट, प्राचार्य डॉ. बी. पी. पाटील, प्रा. पी.बी. करंदीकर आणि प्रा. विजय कर्रा, टीसीएसचे विविध पदाधिकारी, विविध शाखांचे विभागप्रमुख व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
माहिती तंत्रज्ञान आणि संगणक अभियांत्रिकी शाखेचा १००% निकाल लागला, तर मेकॅनिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन शाखांचा निकाल अनुक्रमे ९८.३९% आणि ९४.०२% इतका लागला. परीक्षेला बसलेल्या २९९ विद्यार्थ्यांपैकी २२० विद्यार्थ्यांना डिस्टींक्शन मिळाले. माहिती तंत्रज्ञान शाखेमध्ये अंकित पाठक आणि संगणक अभियांत्रिकी शाखेमध्ये संदीप सिंग, मेकॅनिकल शाखेमध्ये अनामिका शुक्ला आणि इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन शाखेमध्ये श्रिया नागरथ यांनी पहिला क्रमांक पटकावला.
दीनानाथ खोळकर यांनी पर्यावरणीय बदलांचा उल्लेख करून व्यावसायिक अभियंत्यांनी पर्यावरण बदलाच्या प्रश्नांवर काम करण्याची गरज व्यक्त केली. खोळकर म्हणाले, “विद्यार्थ्यांनी मुठा नदी स्वछता अभियान आणि स्मार्ट सिटी यावर काम करावे. एक व्यावसायिक म्हणून काम करताना नफा, आपल्या सभोवतालची माणसे आणि पर्यावरण यांच्यातील समतोल साधायला हवा. शैक्षणिक, कृषी आणि आरोग्य या क्षेत्रात योगदान देण्याचा प्रयत्न करावा. कोणाकडून काहीतरी घेण्यापेक्षा कोणाला काय देऊ शकतो याचा विचार करणे महत्वाचे आहे.”
अभय भट यांनी यांनी संस्थेच्या विद्यार्थ्यांनी रौप्यमहोत्सवी बॅचच्या विद्यार्थ्यांनी केलेल्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल माहिती दिली. शैक्षणिक क्षेत्रातील उत्कृष्ट कामगिरीबरोबरच विद्यार्थ्यांनी कला, क्रीडा आदी क्षेत्रांतही उल्लेखनीय यश मिळवले आहे. संस्थेच्या विद्यार्थ्यांनी देशभरातील जवळपास सर्व तांत्रिक स्पर्धां एकहाती जिंकल्याचे त्यांनी सांगितले.