पुणे : “शौर्यदिनानिमित्त विजयस्तंभास अभिवादन करण्यासाठी येणाऱ्या भीमसैनिकांना सोयीसुविधा उपलब्ध व्हाव्यात, यासाठी लवकरात लवकर विकास आराखड्याची अंमलबजावणी होणे गरजेचे आहे. यासंदर्भात केंद्र सरकारकडून, तसेच माझ्याकडून सर्वतोपरी मदत केली जाईल. विजयस्तंभाचा हा परिसर नव्या वर्षाच्या पहिल्याच दिनी प्रेरणा देणारा आहे. त्यामुळे शासनाने या परिसराच्या विकासासाठी पुरेसा निधी उपलब्ध करून द्यावा,” अशी मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे (आठवले) नेते आणि केंदीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केली.
शौर्यदिनानिमित्त (दि. १) भीमा कोरेगाव येथील विजयस्तंभास अभिवादन केल्यानंतर पेरणे फाटा येथे झालेल्या अभिवादन सभेला संबोधित करताना रामदास आठवले बोलत होते. यावेळी राष्ट्रीय उपाध्यक्ष काकासाहेब खंबाळकर, प्रदेश सरचिटणीस राजाभाऊ सरोदे, प्रदेश सचिव बाळासाहेब जानराव, रिपब्लिकन नेते डॉ. सिद्धार्थ धेंडे, पश्चिम महाराष्ट्र युवक आघाडीचे अध्यक्ष परशुराम वाडेकर, शहराध्यक्ष अशोक शिरोळे, संपर्कप्रमुख अशोक कांबळे, महिला आघाडीच्या चंद्रकांता सोनकांबळे, जिल्हाध्यक्ष सूर्यकांत वाघमारे, पश्चिम महाराष्ट्र सरचिटणीस असित गांगुर्डे, शहर युवक अध्यक्ष शैलेंद्र चव्हाण, अल्पसंख्याक आघाडीचे अध्यक्ष अयुब शेख, कार्याध्यक्ष बसवराज गायकवाड, संजय सोनावणे, शहर सचिव महिपाल वाघमारे, प्रसिद्धी प्रमुख शाम सदाफुले आदी उपस्थित होते.
रामदास आठवले म्हणाले, “शौर्यदिनाच्या निमित्ताने आपण सर्व २०० वर्षांपूर्वी लढलेल्या शूरवीरांना अभिवादन करतो. त्यांच्या शौर्यातून आपण प्रेरणा घेऊन भविष्यातील वाटचाल केली पाहिजे. समाजाला उन्नतीकडे घेऊन जाणे आवश्यक आहे. गेल्या महिन्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शेतकऱ्यांसाठी कर्जमाफीची घोषणा केली असली, त्याचा शेतकऱ्यांना लाभ होणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे त्यांनी शेतकऱ्याचा सातबारा कोरा करण्यासंदर्भात ठोस भूमिका घ्यावी. त्याचप्रमाणे राज्य सरकारच्या विविध मागासवर्गीय महामंडळांचीही कर्जमाफी त्वरित करावी. मागासवर्गीय समाजाच्या विकासासाठी महामंडळाना निधी उपलब्ध करून द्यावा.”
“नागरिकत्व दुरुस्ती कायद्यावरून (सीएए, एनआरसी) देशभर मुस्लिमाना भडकवले जात आहे. मात्र, या कायद्यामुळे मुस्लिमांच्या अस्तित्वाला कोणताही धोका नाही. राजकीय हेतूने नागरिकांची दिशाभूल केली जात आहे. आपल्या देशात हिंसक आंदोलन होणे योग्य नाही. आयोध्येच्या निर्णयावर दोन्ही धर्मांकडून शांतता राखण्यात आली होती. अमित शहानी विधेयक पारित होत असताना देशातील मुस्लिमाना कोणताही त्रास होणार नाही असे सांगितले होते. भविष्यात मुस्लिमाना धोका असल्याचे जाणवले, तर पूर्णपणे मुस्लिम समाजाच्या पाठीशी उभे रिपब्लिकन पक्ष ताकदीने उभा राहील,” असेही आठवले यांनी नमूद केले. राजाभाऊ सरवदे, बाळासाहेब जानराव यांच्यासह इतरांनीही उपस्थितांना संबोधीत केले. संजय सोनावणे यांनी सूत्रसंचालन केले. आभार अशोक कांबळे यांनी मानले.