पुणे : “प्लास्टिक स्वस्त आणि वापरण्यास सोयीचे असल्याने त्याचा सर्रास वापर केला जातो. बंदीनंतर पुण्यासह इतर ठिकाणी प्लास्टिक मोठ्या प्रमाणात वापरले जाते. भविष्यातही प्लास्टिकचा वापर कमी होणार नाही. त्यामुळे बंदी घालण्यापेक्षा प्लास्टिक कचऱ्याचे विघटन कसे करता येईल किंवा त्याचा पुनर्वापर करण्यावर अधिक संशोधन व्हायला हवे,” असे मत डॉ. राजीव बासर्गेकर यांनी व्यक्त केले.
मराठी विज्ञान परिषद पुणे विभागातर्फे नवी पेठेतील एस. एम. जोशी सभागृहात ‘पॉलीमर आणि प्लास्टिक’ या विषयावर आयोजित व्याख्यानात डॉ. राजीव बासर्गेकर बोलत होते. यावेळी विज्ञान परिषदेचे विनय र. र., शशी भाटे यांच्यासह विज्ञानप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्लास्टिक बंदी व त्यानंतर पुण्यातील चित्र, मानवी जीवनात प्लास्टिकचे महत्त्व अशा मुद्यांवर यावेळी चर्चा झाली.
डॉ. राजीव बासर्गेकर म्हणाले, “आजघडीला प्लास्टिकइतकी स्वस्त आणि सोयीस्कर दुसरी वस्तू बाजारात उपलब्ध नसल्याने प्लास्टिक्सचा वापर टाळला जात नाही. प्लास्टिकचे जैवविघटन होत नाही. परंतु, त्यातून दूषित पदार्थ तयार होत नाही किंवा प्रदूषणही होत नाही. प्लास्टिकचा कचरा मात्र होतो. परंतु, या कचऱ्याचा पुनर्वापर करणे शक्य आहे. त्यासाठी संशोधन, प्रशिक्षण आवश्यक आहे. पण अजूनतरी तसे संशोधन किंवा प्रशिक्षण भारतात विकसित झालेले नाही. चीन जगातील ५०% प्लास्टिक कचरा विकत घेतो आणि त्याचा पुनर्वापर करतो. आपल्याकडेही त्याप्रमाणे विघटन आणि पुनर्वापर यावर भर दिला पाहिजे.”
“सांडपाणी प्रक्रिया संयंत्रेप्रमाणे घनकचरा व्यवस्थापनाच्या यंत्रणा निर्माण करणे गरजेचे आहे. समुद्रात प्लास्टिक न जाण्यासाठी उपाययोजना करणे आवश्यक आहे. त्याचबरोबर नागरिक आणि स्थानिक स्वराज्य संस्था यांच्या जबाबदार वर्तणुकीशिवाय प्लास्टिक कचऱ्याची तात्कालीन अडचण दूर होणे अवघड आहे. त्यासाठी सर्वानी एकत्रित येत प्रयत्न करायला हवेत.”
विनय र. र. यांनी अध्यक्षीय समारोप केला. शशी भाटे यांनी प्रास्ताविक केले व आभार मानले.