विधान परिषदेच्या निकालानंतर काँग्रेसचा अंतर्गत कलह वाढला असून काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांच्याकडून विधिमंडळ पक्षनेते पदाचा राजीनामा सादर करण्यात आल्याची माहिती दिल्लीतील काँग्रेस सूत्रांकडून मिळत आहे. नाशिक पदवीधर निकालाच्या दिवशी नाराजी व्यक्त करतानाच राजीनामा दिल्याचीही माहिती मिळत आहे. आता दिल्ली हायकमांड याबाबत काय निर्णय घेणार? थोरातांचं मन वळवणार की, नवा बदल घडवणार? असे प्रश्न उपस्थित होत आहेत नाशिक पदवीधरमध्ये सत्यजित तांबेंच्या उमेदवारीवरून प्रदेश काँग्रेसच्या दोन बड्या नेत्यांमधील वाद चव्हाट्यावर आलाय. सत्यजित तांबेंच्या वतीनं आता त्यांचे मामा बाळासाहेब थोरात दंड थोपटून मैदानात उतरलेत. नाना पटोले यांच्या विरोधातली नाराजी त्यांनी बोलून दाखवली. नाशिक पदवीधर मतदारसंघातून निवडून आल्यानंतर अपक्ष आमदार सत्यजित तांबे यांनी पत्रकार परिषद घेऊन निवडणुकीवेळी पक्षाने दिलेल्या चुकीच्या एबी फॉर्मवरून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यावर टीका केली होती. याशिवाय बाळासाहेब थोरात यांनी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांना पत्र पाठवून प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यासोबत काम करणे अशक्य असल्याचेही स्पष्ट केल्याच्या बातमीने राजकीय वर्तुळात चर्चेला उत आला.