पुणे- शहरातील स्वस्त धान्य दुकानातून निकृष्ट दर्जाचे धान्य वाटप होतेय ,काला बाजार होतोय एक तर तुम्ही लक्ष घाला अन्यथा आम्हाला लक्ष घालू द्यात असा थेट इशारा अन्नधान्य वितरण व उपजिल्हाधिकारी सचिन ढोले व अन्नधान्य आस्थापना विभाग पुणे शहराचे तहसिलदार हाणमंत कोळेकर यांना भेटून संभाजी ब्रिगेड ने दिला आहे .यावेळी संभाजी ब्रिगेड’चे महाराष्ट्र प्रदेश संघटक संतोष शिंदे, महानगराध्यक्ष शिवश्री. अविनाश मोहिते, अॕड. विकास शिंदे, जिल्हा उपाध्यक्ष शिवश्री. महादेव मातेरे, खडकवासला विधानसभा अध्यक्ष शिवश्री स्वप्निल रायकर आदी उपस्थित होते.
दिवाळी काही दिवसावर आलेली असताना सुद्धा सणासुदीच्या काळात पुणे शहरात निकृष्ट दर्जाचा तांदूळ आणि गहू वितरीत केला जात आहे बऱ्याच शहरातील रेशन दुकानात अन्न धान्याचा काळाबाजार सुरू आहे, तो त्वरित थांबला पाहिजे. कुठेही निकृष्ट दर्जाचे धान्य वाटप करू नये. दिवाळी सणासाठी प्रति मानसी 5 किलो वाढीव धान्य उपलब्ध करून द्यावे. म्हणजेच साखर, तेल, गहू, ज्वारी, बाजरी, तांदूळ, तूरडाळ, मूगडाळ, मिळावे ही प्रमुख मागणी आहे. म्हणून पुणे शहरात निकृष्ट दर्जाच्या तांदूळ आणि गहू पुरवठ्याबाबत स्वस्त धान्य वितरण विभागास संभाजी ब्रिगेड पुणे शहराध्यक्ष अविनाश मोहिते यांनी इशारा दिला आहे.
कोरोना महामारी च्या काळात सर्वसामान्य नागरिक हालअपेष्टा सहन करून जीवन जगत आहेत. अन्न, वस्त्र,निवारा या माणसाच्या मूलभूत गरजा असल्याकारणाने आपण गोर गरिब, कष्टकरी, वंचितांना, स्वस्त धान्य लाभार्थ्यांना, केसरी कार्ड धारकांना, योजनांपासून बाजूला ठेवू नये. भारताच्या प्रत्येक नागरिकाला कायद्याने (संविधानाने) एक प्रकारचा हा अधिकारच दिलेला आहे. कोणीही उपाशी पोटी राहू नये. हा भारत सरकारचा नियम आहे. जो शिधापत्रिकेचा लाभार्थी आहे त्याच्यापर्यंत अन्नधान्याची सुविधा पोहोचली पाहिजे अशी आमची प्रामुख्याने मागणी आहे.
पुणे शहरातील झोपडपट्टीतील, रहिवाशांनी संभाजी ब्रिगेड’कडे मोठ्या प्रमाणात तक्रारी केल्या आहेत. त्यांच्या प्रभागातील अन्नधान्य सुविधा केंद्रे चालविणारे दुकानदार लोकांशी अरेरावीची भाषा करतात. त्यांना निकृष्ट दर्जाचे धान्य वाटप करतात. जे अन्न खाण्याच्या लायकीचे सुद्धा नसते प्राणी सुद्धा या धान्याला तोंड लावत नाहीत. असे अन्न गरिबांच्या माथी मारले जाते. दुकानदार सतत मनमानी कारभार करतात.अन्नधान्याचा काळाबाजार करतात अशी लोकांची तक्रार आहे प्रधानमंत्री गरीब कल्याण योजना अंतर्गत प्रति लाभार्थी प्रतिमहिना पाच किलो धान्याची योजना असून सुद्धा त्याचा लाभ मात्र बहुतांश लोकांना मिळत नाही.
पुणे शहरातील केशरी रंगाच्या कार्डधारकांना सुद्धा धान्य दिले जात नाही. कोविड काळात मोठ्या प्रमाणात गरिबांची हेळसांड झालेली आहे. लॉक डाऊन मध्ये कित्येक लहान मुलं वयस्कर माणसे भुकमरी ने दगावली गेलेली आहेत. याची दखल शासनाने गांभीर्याने घ्यायला पाहिजे होती. पण शासन लोकांच्या प्रति गंभीर नाही. गरिबांचा कैवारी या देशात आहे की नाही असाच प्रश्न मनात निर्माण झाल्याशिवाय राहत नाही. पुणे शहरात कित्येक स्वस्त धान्याची दुकाने बंद पडलेली आहेत. केरोसीन व साखर वाटप कधीच बंद केले आहे. ते पुन्हा त्वरित सुरू करावी अशी संभाजी ब्रिगेडची मागणी आहे. अन्न सुरक्षा योजना व अंत्योदय योजना यासारख्या महाराष्ट्र शासनाच्या प्रमुख योजना बंद पडलेले आहेत. त्या त्वरित चालू केल्या पाहिजेत. बंद केलेली दुकाने अन्नधान्य विभागाकडून पुन्हा चालू केली गेली पाहिजेत. पुणे शहरामध्ये 1276 स्वस्त दुकानांचे परवाने देण्यात आले होते. त्यापैकी 827 दुकाने आज रोजी सुरू आहेत.विविध कारणांमुळे सुमारे 449 दुकाने बंद झालेले आहेत. महाराष्ट्र रेशन व केरो सीन परवानाधारक संघटनेचे अध्यक्ष गणेश डांगी यांनाही वेळोवेळी संभाजी ब्रिगेडने निवेदन दिलेले आहेत. परंतु त्याचा काहीच उपयोग झालेला नाही. पुणे शहर अन्न वितरण अधिकारी व इतर कक्ष यांना संभाजी ब्रिगेड तर्फे विनंतीपूर्वक इशारा व निवेदन देत आहे. लोकांच्या न्याय्य हक्कासाठी इथून पुढच्या काळामध्ये संभाजी ब्रिगेड स्वस्त अन्नधान्य वितरण अधिकारी कार्यालयावर ती धडक मोर्चाचे आयोजन करणार आहे. लोकांच्या भावना तीव्र असल्या कारणाने होणाऱ्या नुकसानीस व त्रासास अन्नधान्य वितरण विभाग जबाबदार राहील याची नोंद घ्यावी. असा इशारा संभाजी ब्रिगेडचे महानगराध्यक्ष अविनाश मोहिते यांनी दिलेला आहे.