मुंबई- पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यातील खाजगी चर्चेच्या वृत्तानंतर मनसेच्या संदीप देशपांडे यांच्या ट्वीट ने राजकीय चर्चेचा धुराळा उडविला आहे. ‘आजच्या वैयक्तिक आणि बंद खोलीतल्या बैठकीत पंतप्रधान पद अडीच-अडीच वर्षे वाटून घ्यायचा निर्णय तर झाला नाही ना? झाला असेल तर आत्ताच सांगा नंतर कटकट नको .’ असे संदीप देशपांडेंनी ट्विट केले आहे.
मुख्यमंत्री आणि पंतप्रधानांच्या या भेटीदरम्यान अजित पवार आणि अशोक चव्हाणांचीही उपस्थिती होती. मात्र या भेटीनंतर उद्धव ठाकरे आणि नरेंद्र मोदी यांची वैयक्तिक भेट झाल्याचे वृत्त आहे. आता या भेटीवरुन मनसेने मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना खोचक टोला लगावला आहे.
‘ती ‘भेट राजकीय नव्हती– अशोक चव्हाण
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यातही वैयक्तिक भेट झाल्याची माहिती समोर आली. दोघांमध्ये जवळपास अर्धातास चर्चा झाली. याबाबत राज्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री अशोक चव्हाण यांना विचारण्यात आलं असता त्यांनीही दोन्ही नेत्यांमध्ये वैयक्तिक भेट झाल्याच्या चर्चेला दुजोरा दिला. पण या भेटीत कोणतीही राजकीय चर्चा झालेली नसल्याचं ते म्हणाले.
“पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यातील भेट राजकीय नव्हती. मुख्यमंत्र्यांनी स्वत: त्याबाबत स्पष्टीकरण दिलं आहे”, असं अशोक चव्हाण म्हणाले आहेत.