पुणे-राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वड्डेटीवार यांनी अनलॉकची घोषणा केली, नंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ती परत घेतली. यावरुन राज्यात प्रचंड गोंधळ उडाला. याच मुद्द्यावरुन शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी काँग्रेसला टोला लगावला.
संजय यांची नुकतीच पुण्यात पत्रकार परिषद पार पडली. यावेळी त्यांनी राज्यात अनलॉकसंदर्भात झालेल्या गोंधळावर भाष्य केले आहे. तसंच अनलॉक होतेय ही चांगली गोष्ट असल्याचे संजय राऊत यांनी म्हटले. यावेळी संजय राऊतांनी काँग्रेसला टोला लगावला. ते म्हणाले की, स्थानिक पातळीवर आघाडीने एकत्र लढावे यासाठी आमचे प्रयत्न आहेत. नाना पटोले स्वबळावर लढणार असतील तो त्यांचा निर्णय असेल. पण मग केंद्रातही स्वबळावर निवडून यावे आम्ही पाठिंबा देऊ, असे संजय राऊत म्हणाले.
विरोधकांवर निशाणा
यावेळी संजय राऊतांनी विरोधकांवरही निशाणा साधला आहे. राऊत यांनी फडणवीस यांचे नाव न घेता अप्रत्यक्षपणे त्यांना टोमणा मारला आहे. प्रभाग तोडफोडीचा आरोप करणाऱ्या भाजपने गेल्यावेळी पुण्यात तेच केले, असे म्हणत पाठीत खंजीर खूपसणं ही सेनेची संस्कृती नाही, असे राऊत म्हणाले. तसेच चंद्रकांत दादा म्हणजे काही वसंतदादा पाटील नाहीत त्यांनी बोलताना भान ठेवावे, असा सल्लाही राऊतांनी चंद्रकांत पाटील यांना दिला आहे.