पुणे : देशहितासाठी कार्य करणार्या संस्थांवरच ताबा मिळवून विरोधकांना ब्लॅकमेल करण्याचे काम भाजप करीत आहे. त्यांच्या विरोधात लाट पसरत असल्याची त्यांना जाणीव झाली आहे. त्यामुळे या निवडणूका शांततेत पार पडतील की नाही याबाबत शंका वाटते. अशी भिती माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी सोमवारी व्यक्त केली.
लोकशाहीवादी संघटनांचा निर्धार मेळावा टिळक वाड्यातील लोकमान्य सभागृहात पार पडली. त्यावेळी चव्हाण बोलत होते. यावेळी ज्येष्ठ गांधीवादी नेते डॉ. कुमार सप्तर्षी, कामगार नेत्या मुक्त मनोहर, कॉमे्रट अजित अभ्यंकर, माहिती अधिकार कार्यकर्ते विश्वंभर चौधरी, पी. ए. इनामदार, भटक्या विमुक्तांच्या नेत्या सुषमा अंधारे, प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस अभय छाजेड, डॉ. रोहित टिळक, शहराध्यक्ष रमेश बागवे, आघाडीचे उमेदवार मोहन जोशी, अन्वर राजन, अंकुश काकडे, रविंद्र माळवदकर, डॉ. सतीश देसाई, ज्येष्ठ नेते उल्हास पवार, इंटकचे सुनील शिंदे, विरेंद्र किराड, गोपाल तिवारी, नरेंद्र व्यवहारे, नगरसेवक रविद्र माळवदकर, सुजाता शेट्टी, हनुमंत गायकवाड यांच्यासह राष्ट्रसेवा दल, अध्दश्रद्धा निर्मुलन समिती, शेतकरी कामगार पक्ष, भीम आर्मी, मतदान जागृती अभियान, संभाजी ब्रिगेड, लोकायत, स्वाभिमानी शेतकरी संघटना, शाहु, फुले, आंबेडकर विचार मंच दलित पँथर, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया गवई गटाचे पदाधिकारी कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.
चव्हाण म्हणाले, सर्व शासकीय यंत्रणेचा सत्तेसाठी वापर केला जात आहे. त्यांच्या मार्फत कारवाई करून ब्लॅकमेल केले जात आहे. अशा परिस्थितीत लोकशाही वाचविण्यासाठी आपअपसातले मतभेद विसरून भाजपाविरोधात एकत्र निवडणूक लढली पाहिजे. तरच आपण मोदींचा पराभूत करू शकू. संविधान वाचविण्यासाठी म्हणून जनतेनीच ही निवडणूक हातात घेतली आहे. म्हणूनच ही निवडणूक काँग्रेस भाजपापुरती मर्यादित राहिली नाही, तर पक्षीय परिघाच्या बाहेर गेली आहे. त्यामुळेच या निवडणूकीत भाजपचा पराभव निश्चित असल्याचेही चव्हाण यांनी नमुद केले.
मोदीं ही निवडणूक व्यक्ती केंद्रीत करण्याचा प्रयत्न करीत आहेत. मात्र काँग्रेससह सर्वांनी मिळून या गोंधळात न आडकता ही निवडणूक मु्द्यांवर आणली पाहिजे. महाआघाडीतल सर्व पक्षाने अशीच एकी टिकवून ठेवल्यास भाजपा आणि आरएसएसच्या विचारणीचा पराभव करणे सहज शक्य असल्याचा आत्मविश्वासही चव्हणांनी व्यक्त केला.
अजित अभ्यंकर म्हणाले, निवडणुकीच्या प्रचारात देशातील रोजगाराचा प्रश्न ऐरणीवर आणणे गरजेचे आहे. राष्ट्रीय सुरक्षेची काळजी आणि राष्ट्रवादाचा मक्ता केवळ भाजपलाच आहे, असा गैरसमज त्या पक्षाचा झालेला आहे. राष्ट्रीय सुरक्षा कुणामुळे धोक्यात आली आहे, हे भाजप नेत्यांनी स्पष्ट करावे. त्यांनी उपस्थित केलेले मुद्दे त्यांच्यावरच उलटणारे आहेत. या निवडणुकीत भाजप पक्षाचा पराभव होणे गरजेचे आहे.
मुक्ता मनोहर म्हणाल्या, देश 2014 ते 19 या कालावधीत देश खूप मागे गेला आहे. देशावर कार्पोरेट पद्धतीचा प्रभाव आहे. जे संविधा व समानता माणतात, जे पुरोगामी आहेत, त्यांची एकमुठ बांधणे आज काळाची गरज आहे. रोजगार, शिक्षण, याचे प्रश्न देशात खूप गंभीर झाले आहेत. कंत्राटी पद्धत सर्वच क्षेत्रात आणली जात आहे. विरोधात बोलले की देशद्रोही म्हंटले जाते. गरीब-श्रीमंतामधील दरी कमी करण्याचा प्रयत्न काँग्रेसच्या जाहीरनाम्यात आहेत. आज देश एका वळणावर आहे, अशा वेळी देशाला सावरण्याची जबाबदारी काँग्रेसने स्विकारावी.
सुषमा अंधारे म्हणाल्या, आज देशात निर्माण झालेल्या परिस्थीतीमुळे चळवळीतील लोकांना राजकीय भूमिका घ्यावी लागत आहे. पूर्वी चळवळीत काम करणार्यांना लष्कराच्या तीनही दलाचे प्रमुख राष्ट्रपती आहेत. दलित, अल्पसंख्यांकांना असुरक्षित केले जात आहे. मुलभुत हक्कांवर गदा आणला जात आहे.
डॉ. कुमार सप्तर्षी म्हणाले, मोदींचे हाथ रक्ताने माखलेले आहेत. त्यांचे नेतृत्वच दंगलीमधून निर्माण झालेले आहे. अशा या व्यक्तीचे राज्य गेली पाच वर्षात आपणास सहन करावे लागत आहे. देशातील नागरिक आज प्रजा झाली आहे. हे चित्र बदलण्याची संधी आपणास या निवडणुकीच्या माध्यमातून मिळाली आहे. ही लढाई केवळ काँग्रेसची नाही तर प्रत्येक नागरिकाची आहे. लष्कर धर्मनिरपेक्ष ठेवणे गरजेचे आहे. लष्कराच्या तीनही दलाचे प्रमुख राष्ट्रपती आहेत. मात्र, मोदी ते ताब्यात घेण्या प्रयत्न करत आहेत, असेही सप्तर्षी म्हणाले.
विश्वंभर चौधरी म्हणाले, आज लोक बोलतंच नाहीत. ही लढाई मोदी विरूद्ध राहुल गांधी अशी राहिलीच नाही. ती मोदी विरूद्ध देशातील सामान्य नागरिक अशी झाली आहे. खोटा राष्ट्रवाद पसरवण्याचे काम केले जात आहेत. विरोधात बोलणार्यांना जा पाकीस्तानात असे म्हणतात. जणू काय भाजप नेते व्हीजाच घेऊन बसले आहेत. राहुल गांधींची न्याय ही योजना क्रांतीकारी आहे.
निरंजन टकले, नीरज जैन यांनी मनोगत व्यक्त केले. लोकायतच्या कार्यकर्त्यांनी ‘क्या हुआ तेरा वादा‘ हे गीत सादर केले. लोकायतच्या पदाधिकार्यांनी काँग्रेसला पाठिब्यांचे पत्र दिले.