मुंबई- पावसात तुंबली की, शिवसेनेचे सत्ता असल्याचे सांगितले जाते.आता याच वर्षी पुणे कसे तुंबले ? गेल्या पाच वर्षांत पुण्यात जे कामे झाली कि नुसतीच झाल्याचे दाखविले? त्याची चौकशी व्हावी. दोष देण्यासाठी नव्हे पण हे का झाले कसे झाले ते समजायला हवेच ना. असा हल्लाबोल करत युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी भास्कर जाधवांच्या घरावर झालेल्या हल्ल्याचा समाचार देखील घेतला आहे.
भास्कर जाधव यांच्या घरावर हल्ला झाला. काल रात्री अकरा वाजेच्या आसपास त्यांची स्थानिक सुरक्षा काढण्यात आली. त्यानंतर दोन तासांनी त्यांच्या घरावर हल्ला झाला. हा भ्याड हल्ला आहे. यामागे राजकीय पाठबळ आहे का? यामागे यंत्रणा आहे का? याची सखोल चौकशी करावी, अशी मागणी युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी केली आहे.सरकार घटनाबाह्य असून यंत्रणेचा दुरुपयोग केला जात असल्याची टीकाही त्यांनी यावेळी केली. ते मुंबईत माध्यमांशी बोलत होते.
आदित्य ठाकरे म्हणाले, घरावर हल्ले होणे ही चुकीची गोष्ट आहे. राजकीय जीवनात आरोप प्रत्त्यारोप, टीका टीप्पणी होत असतात. पण घरावर आणि व्यक्तीशः हल्ले करणे योग्य नाही. पोलिस संरक्षण काढून घेणे म्हणजे कुठेतरी यंत्रणेचा गैरफायदा आणि दुरुपयोग करणे असा त्याचा अर्थ आहे.आदित्य म्हणाले, वेदांता फाॅक्सकाॅनबाबत मी बोललो तर चौकशी लावू असे सांगितले गेले. म्हणजे महाराष्ट्रावर आणि सामान्य माणसांवर जो बोलतोय, महागाईवर प्रश्न विचारणाऱ्यांना दरडवण्याचा आणि त्यांच्यावर कारवाई करण्याचा, धाक दाखवण्याचा प्रकार राज्यात सुरू आहे.
आदित्य म्हणाले, मिरवणुकीत गोळीबार होते, लोकप्रतिनिधींचे कार्यालय तोडले जाते, पण ते तोडणाऱ्या आमदारांवर गद्दारांवर कारवाई होत नाही. या राज्याचे राजकारण एवढ्या खालच्या पातळीवर कधीही गेले नव्हते. पण सध्या घटनाबाह्य सरकार असल्यामुळे हे सर्व होत आहे. राज्य सरकारकडून आम्हाला अपेक्षा नाही. ते घोषणा सरकार झाले आहे. रिकामटेकड्या होर्डिंग आणि बॅनरवर खर्च केला जात आहे, पण शेतकऱ्यांना फारशी मदत केली जात नाही.