मुंबई:-मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम रखडले असतानाच नव्याने बांधण्यात आलेल्या रस्त्याचीही काही ठिकाणी चाळण झाली आहे. अनेक भागांत रस्त्यांवर खड्डे पडल्याचे निदर्शनास येताच मुंबई उच्च न्यायालयाने आज राज्य सरकार तसेच राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाला यावरून खडसावले. महामार्गाच्या नवीन बांधकामांवर खड्डे कसे पडले? असा सवाल करत हायकोर्टाने खड्डय़ांबाबतचा प्रगती अहवाल सादर करण्याचे आदेश दिले.
कोकणात जाण्यासाठी सोयिस्कर ठरणाऱया मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम हाती घेण्यात आले असून अनेक वर्षे उलटूनही हे काम अद्याप पूर्ण झालेले नाही. मुंबई-गोवा महामार्ग क्र. 66 वर पडलेल्या खड्डय़ांमुळे अॅड. ओवीस पेचकर यांनी मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली आहे. या महामार्गाचे काम लटकल्याने वाहनचालकांना त्याचा मनस्ताप सहन करावा लागत आहे. त्यामुळे हे काम लवकरात लवकर पूर्ण करण्यात यावे अशी मागणी अॅड. पेचकर यांनी केली आहे.
या याचिकेवर आज मुख्य न्यायमूर्ती दीपांकर दत्ता आणि न्यायमूर्ती गिरीश कुलकर्णी यांच्या खंडपीठासमोर सुनावणी घेण्यात आली. त्यावेळी न्यायमूर्तींनी खड्डय़ांबाबत विचारणा केली असता महाधिवक्ता आशुतोष पुंभकोणी यांनी सांगितले की, मुसळधार पावसामुळे टारद्वारे बांधकाम करण्यात आलेल्या रस्त्यावर खड्डे पडले आहेत. हे खड्डे लवकरच बुजवले जातील. दरम्यान, एका पंत्राटदाराने मागील तीन महिन्यांत आरवली-कांठे -वाकड या पट्टय़ात केवळ एक टक्का काम पूर्ण केल्याची बाब खंडपीठाच्या निदर्शनास आली. याची दखल घेत न्यायालयाने नाराजी व्यक्त करत प्रशासनाला झापले तसेच पंत्राटदार उर्वरित काम कधी पूर्ण करणार? अशी विचारणा केली. दरम्यान, महामार्गालगत बॅरिकेड, शहराच्या ठिकाणी स्पीडब्रेकर तसेच ग्रामस्थांसाठी महामार्गालगत सर्व्हिस रोड बांधण्याकडे लक्ष देण्याच्या सूचना खंडपीठाने देत सुनावणी ऑगस्टपर्यंत तहकूब केली.
पळस्पे ते इंदापूर कामासाठी 200 कोटींची कमतरता
पळस्पे ते इंदापूरदरम्यान 82 किमी रस्त्याचे चौपदरीकरण सुप्रीम इन्फ्राटेकमार्फत करण्यात येणार आहे. या कामासाठी मात्र 200 कोटी रुपयांच्या निधीची कमतरता पडत आहे अशी माहिती राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने आज खंडपीठाला दिली. या निधीसाठी एसबीआयकडे विचारणा करण्यात आल्याचेही सांगण्यात आले.
मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम धिम्या गतीने
गेल्या अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम धिम्या गतीने सुरू असून 38 टक्के काम अद्याप रखडले आहे. इंदापूर ते झाराप या 355 किमी टप्प्यातील 148 किमी रस्त्याचे चौपदरीकरण अपूर्ण असून या कामाच्या दिरंगाईसाठी प्रशासनाने कोविड व मुसळधार पावसाचे कारण पुढे केले आहे. तसे प्रतिज्ञापत्रच बांधकाम विभागाने मुंबई उच्च न्यायालयात दाखल केले आहे.
कोकणात जाण्यासाठी सोयिस्कर ठरणाऱ्या मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम हाती घेण्यात आले असून अनेक वर्षे उलटूनही हे काम अद्याप पूर्ण झालेले नाही. मुंबई-गोवा महामार्ग क्र. 66 वर पडलेल्या खडय़ांमुळे अॅड. ओवीस पेचकर यांनी मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली आहे. या महामार्गाचे काम लटकल्याने वाहन चालकांना त्याचा मनस्ताप सहन करावा लागत आहे. त्यामुळे हे काम लवकरात लवकर पूर्ण करण्यात यावे अशी मागणी अॅड. पेचकर यांनी केली आहे. या याचिकेप्रकरणी सार्वजनिक बांधकाम विभागाचे एक्झिक्युटिव्ह इंजिनीअर श्रीकांत बांगर यांनी उच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र सादर केले आहे. त्यात त्यांनी असे म्हटले आहे की, इंदापूर-चिपळूण-हातखंबा-झाराप-पत्रादेवी या 471 किमी महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम 10 टप्प्यांत होणार असून इंदापूर ते झाराप या 355 किमीपैकी 206 किमीचे काम पूर्ण झाले आहे. 62 टक्के चौपदरीकरणाचे काम पूर्ण झालेल्या या महामार्गावरून सुरळीत वाहतूक होत आहे उर्वरित काम प्रगतिपथावर असून 30 डिसेंबर 2022 पर्यंत ते पूर्ण होणार आहे.
महामार्गाचे काम पूर्ण होईपर्यंत टोल नाही
महामार्गाचे काम जोपर्यंत पूर्ण होत नाही तोपर्यंत वाहन चालकांकडून टोल आकारणार नाही असे प्रतिज्ञापत्रात नमूद करण्यात आले आहे. याशिवाय महामार्गावर खड्डे नसल्याचा दावा प्रशासनाने केला असून वशिष्ठी नदीवरील नवीन पुलाचे काम ऑगस्टपर्यंत पूर्ण होणार आहे. या पुलावरील केवळ दोन लेन वाहन चालकांसाठी सुरू ठेवण्यात येणार आहेत अशी माहिती प्रतिज्ञापत्रात देण्यात आली आहे.