Home Blog Page 98

मिळकत कर,पाणीपुरवठा, सांडपाणी व्यवस्थावरुन प्रशासनाला धरले धारेवर…

LIVE – पुणे महापालिका मुख्य सभा 18 फेब्रुवारी 2026

पुणे महापालिका प्रशासनाने पुणेकरांवर लादलेली ५ टक्के मिळकतकरातील वाढ आज झालेल्या सर्वसाधारण सभेत सर्वपक्षीय नगरसेवकांनी एकमुखाने फेटाळून लावली. प्रशासनाने उत्पन्नवाढीसाठी करवाढ करण्यापेक्षा नागरिकांना चांगली वागणूक द्यावी, त्यांची कामे वेळेत केले तरी उत्पन्न वाढेल अशा शब्दात नगरसेवकांनी प्रशासनानेच कान टोचले.
महापालिकेच्या मिळकतकर विभागाने १० टक्के कर वाढीचा प्रस्ताव स्थायी समितीपुढे ठेवला होता. त्यावरून प्रशासनावर टीकेची झोड उठल्याने प्रशासनाने १० टक्के ऐवजी ५ टक्के कर वाढ करण्याचा निर्णय स्थायी समितीच्या बैठकीत घेतला होता. यामध्ये सर्वसाधारण करात ३ टक्के आणि पथ करात २ टक्के वाढ सुचविण्यात आली होती. यावर २० फेब्रुवारीच्या आत निर्णय घेणे बंधनकारक होते. त्यानुसार आज सर्वसाधारण सभेत यावर निर्णय घेतला.

दरम्यान भाजपची महापालिकेत सत्ता आल्यानंतर पहिल्याच सर्वसाधारण सभेत मिळकतकर वाढीबाबत निर्णय घ्यावा लागणार होता. म्हणून पुणेकरांना भाजप करवाढीचा धक्का देणार का याकडे लक्ष लागले होते. पण भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, शिवसेना (युबीटी) या सर्वच पक्षाच्या नगरसेवकांनी यास विरोध केला. उपसूचना देऊन हा प्रस्ताव फेटाळून लावण्यात आला.

या प्रस्तावावर बोलताना सर्वपक्षीय नगरसेवकांनी मिळकत कर विभागात नागरिकांना होणाऱ्या त्रासाबद्दल अधिकाऱ्‍यांना धारेवर धरले. मिळकतकरातील वाढ रद्द केली हे चांगले झाले. अनेक नागरिक क्षेत्रीय कार्यालयामध्ये कर लावून द्यावा यासाठी येतात, पण त्यांची कामे अधिकारी करत नाहीत. अनेकदा पैशाची मागणी केल्याच्या तक्रारीही येतात. त्यामुळे प्रशासनाने कामात सुधारणा करावी.

मिळकतकराचा प्रश्न आपण गांभीर्याने घेतो, पण प्रशासन गांभीर्याने घेत नाही. बिल्डरने भोगवटा प्रमाणपत्र घेतल्यानंतर त्याने न भरलेली रक्कम ग्राहकाला भरावी लागते. त्यामुळे प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. यावर ठोस निर्णय घेतला पाहिजे.

अधिकारी नागरिकांचा छळ करत आहेत. ४० टक्के सवलतीचे अनेक प्रस्ताव प्रलंबीत आहेत. असे मुद्दे नगरसेवकांनी सर्वसाधारण सभेत मांडले. वर्षा अधतापकीर, अजय खेडेकर, सचिन दोडके, अर्चना पाटील, सुभाष नाणेकर, अजित घुले, अरविंद शिंदे, काका चव्हाण, नीलेश निकम आदींनी यावेळी भूमिका मांडली.

समाविष्ट गावांसाठी विशेष सभा

महापालिकेत समाविष्ट झालेल्या समाविष्ट ३२ गावांमध्ये मिळकतकराच्या आकारणीवरून पेच निर्माण झालेला आहे. त्यावरून नगरसेवकांनी सर्वसाधरण सभेत मुद्दा उपस्थित केला. त्यावर सभागृहनेते गणेश बिडकर यांनी भूमिका मांडली. ”शासनाकडून आलेले आदेश आणि महापालिकेच्या कर आकारणीची पद्धत यावरून वाद निर्माण झालेला आहे.

त्यामुळे या विषयाची सर्व माहिती सर्वसाधारण सभेला मिळाली पाहिजे. त्यामुळे प्रशासनाने शासनाचे आदेश, महापालिकेचा कायदा, वस्तुस्थिती याबाबतचा आदेश महापौरांकडे द्यावा, तो अहवाल सर्व नगरसेवकांना दिला जाईल. या विषयावर विशेष सभा आयोजित करून त्‍यात चर्चा करून निर्णय घेऊयात,असे बिडकर यांनी सांगितले. त्यास सर्व नगरसेवकांनी अनुमोदन दिले.
पाणी रे पाणी…
शहराच्या काही भागांमध्ये मागील अनेक दिवसांपासून सुरु असलेल्या पाण्याच्या समस्यांच्या जोरदार पाढा वाचत नगरसेवकांनी पहिल्याच सर्वसाधारण सभेमध्ये प्रशासनास धारेवर धरले. १०-१५ दिवसांपासून अपुरा तसेच कमी दाबाने येणारे पाणी, अनेक भागांमध्ये होणारा दूषित पाण्याचा पुरवठा आणि अनियमित पाणी पुरवठा, अशा प्रकारे तक्रारी मांडत संताप व्यक्त केला.जुन्या नगरसेवकांबरोबरच पहिल्यांदाच निवडून आलेल्या नगरसेवकांनीही आपल्या भागातील प्रश्‍नावर आवाज उठविला.

शहराच्या वेगवेगळ्या भागात जानेवारीपासूनच पाणी समस्या सुरु झाली आहे. त्याचे पडसाद बुधवारी झालेल्या महापालिकेच्या पहिल्याच सर्वसाधारण सभेमध्ये उमटले. कोंढवा परिसरामध्ये १० ते १५ दिवसांपासून पाणी पुरवठा होत नसल्याची तक्रार नगरसेवक हाजी गफूर पठाण यांनी केली.

महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागाकडे दररोज पाठपुरावा करूनही प्रशासन दखल घेत नाही. रमजान महिना व शिवजयंतीच्या काळातही नागरिकांना पाणी मिळत नसल्याबद्दल पठाण यांनी प्रशासनावर नाराजी व्यक्त केली. त्यापाठोपाठ नगरसेविका वैशाली बनकर यांनी सासवड रोड परिसरामध्ये जलवाहिनीमध्ये सांडपाणी जात आहे.

या दूषित पाण्यामुळे नागरिकांचे आरोग्य बिघडले आहे, प्रशासनाकडे वारंवार तक्रार करूनही प्रशासन त्याची गांभीर्याने दखल घेत नसल्याचा आरोप बनकर यांनी केला. नगरसेविका अश्‍विनी लांडगे, नगरसेवक विशाल मलके यांनी येरवडा परिसरातील दूषित पाण्यामुळे नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्रास होत असल्याचे सांगितले.

दरम्यान, ताडीवाला रोड परिसरात पहाटे २ ते ३ या वेळेत पाणी सुटते, कष्टकऱ्यांनी पाणी भरायचे केव्हा ? असा सुमय्या नदाफ यांनी प्रश्‍न उपस्थित केला. तसेच पाणी सोडण्याच्या वेळेत बदल करण्याची मागणी केली. दरम्यान, नगरसेवक प्रशांत जगताप यांनीही वानवडी, कोंढवा परिसरातील पाणी पुरवठा विस्कळीत झाल्याचे सांगून हा पाणी पुरवठा पुर्ववत करण्याची मागणी केली.

नगरसेवकांकडून पाणी प्रश्‍नावर आवाज उठविला जात असतानाही प्रशासनाकडून खुलासा होत नसल्यामुळे नगरसेवकांनी संताप व्यक्त केला. त्यानंतर पाणी पुरवठा विभागाचे प्रमुख नंदकिशोर जगताप यांनी पाणी समस्येवर खुलासा केला.

‘काही परिसरामध्ये जलवाहिन्यांच्या दुरुस्तीचे काम केले जात असल्यामुळे तसेच काही ठिकाणी नवीन जलवाहिनी टाकली जात आहे. त्यामुळे पाणी पुरवठा करताना विस्कळीतपणा आला आहे. ड्रेनेज विभागाकडून वर्गीकरणाद्वारे काही निधी उपलब्ध करून दिला आहे, त्यातून कोंढवा, महमदवाडी, हडपसर व अन्य परिसरातील पाणी प्रश्‍न सोडविण्यासाठी तातडीने काम केले जाईल, काही ठिकाणी पाण्याच्या टाक्‍या बांधल्या आहे.

मात्र जलवाहिन्या टाकण्याची कामे सुरु आहेत. दूषित पाणी येत असलेल्या ठिकाणी भेटी देऊन हा प्रश्‍न तातडीने सोडविला जाईल, असे जगताप यांनी स्पष्टीकरण दिले. दरम्यान, महापौर मंजूषा नागपुरे यांनी नगरसेवकांच्या तक्रारींची दखल घेत क्षेत्रीय कार्यालय स्तरावर बैठका घेऊन पाणी प्रश्‍न तातडीने सोडविण्याचे आदेश प्रशासनास दिले.

सांडपाणी वाहिन्यांच्या कामांवरूनही प्रशासनावर टिका

जनता वसाहतीमध्ये सांडपाणी वाहिन्यांची कमतरता असून त्या खराब झाल्या आहेत. त्यामुळे सांडपाणी रस्त्यावर येऊन नागरिकांना चालणे मुश्कील होत आहे. जनता वसाहत व सिंहगड रस्ता परिसरात जाण्यासाठी नागरिकांकडून कॅनॉल रस्त्याचा वापर केला जातो. या प्रश्‍नाकडेही प्रशासन दुर्लक्ष करत असल्याचा आरोप नगरसेविका प्रिया गदादे, नगरसेवक सुरज लोखंडे यांनी केला.

कोंढव्यामध्येही सांडपाणी वाहिन्यांची समस्या गंभीर आहे, वाहिन्या जुन्या झाल्या असून त्या तातडीने बदलण्याची गरज असल्याची मागणी नगरसेवकांनी केली. त्यावर मलनिःसारण विभागाचे जगदीश खानोरे यांनी सांडपाणी वाहिन्यांसंबंधी तक्रारी असणाऱ्या ठिकाणी पाहणी करून हा प्रश्‍न सोडविला जाईल, असे सभेत सांगितले.

प्रसिद्ध कथक नर्तक डॉ.नंदकिशोर कपोते यांच्या दिनदर्शिकेचे मोती बागेत प्रकाशन

पुणे : संस्कार भारती पश्चिम प्रांत पिंपरी चिंचवड समिती आणि नंदकिशोर कल्चरल सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमाने दिनदर्शिका प्रकाशन सोहळा नुकताच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मुख्य कार्यालय, मोती बाग येथे संपन्न झाला. पद्मविभूषण पं बिरजू महाराजजी ह्यांच्या संकल्पनेतून सुरू झालेल्या ह्या दिनदर्शिकेचे हे चौथे वर्ष आहे. दरवर्षी वेगवेगळे विषय घेऊन दिनदर्शिका काढली जाते. या वेळी विविध घराण्यातील नामवंत गुरू व भारतातील पुरुष कथक नर्तक हा विषय घेऊन दिनदर्शिका काढण्यात आली आहे. तसेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे हे शताब्दी वर्ष असल्यामुळे मोती बागेतच या दिनदर्शिकेचे प्रकाशन करण्याची इच्छा होती असे विचार संस्कार भारती पश्चिम प्रांत पिंपरी-चिंचवडचे अध्यक्ष डॉ नंदकिशोर कपोते ह्यांनी आपल्या भाषणात मांडले. प्रमुख अतिथी प्रांत कार्यवाह डाॅ.प्रविण धबडगाव ह्यांनी दिनदर्शिकेचे प्रकाशन करुन डाॅ. नंदकिशोर कपोते ह्यांचे अभिनंदन केले. डाॅ. धबडगाव आपल्या भाषणात म्हणाले ” अनेक वर्षांच्या खडतर प्रवासातून निरंतर नृत्य कलेची सेवा करुन शास्त्रीय नृत्यास प्रतिष्ठा मिळवून देण्याचे काम डाॅ. कपोते यांनी केले. त्यांच्या अनेक शिष्यांनी कथक नृत्य कलेत प्राविण्य मिळविले आहे, सर्व नृत्य कलाकारांनी संग्रही ठेवावी अशी ही दिनदर्शिका आहे “. यावेळी प्रांताचे अखिल भारतीय दृश्य कला सहसंयोजक सतीश कुलकर्णी, महामंत्री प्रशांत कुलकर्णी, पश्चिम प्रांताचे संपर्क मंत्री मिलींद भोळे हे मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन लिना आढाव ह्यांनी केले.
या प्रसंगी उपाध्यक्ष प्रफुल्ल भिष्णूरकर, सचिव लीना आढाव, संपर्क प्रमुख गणेश आढावमंचिय कला संयोजक भावना सामंत, छायाचित्र समन्वक नरेंद्र घोडकेप्रसार व प्रसिध्दी समन्वयक अनुष्का सामंत उपस्थित होते

वित्तीय समिती रद्द करा नगरसेवकांची पहिल्याच सभेत मागणी

पुणे – आज पुणे महापालिकेची पहिली सर्वसाधारण सभा आयोजित करण्यात आली होती, पहिल्याच सभेत वित्तीय समिती रद्द करा अशी मागणी भाजपचे शहराध्यक्ष धीरज घाटे व नगरसेवक पृथ्वीराज सुतार यांनी केली.यावर महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी सांगितले कि,वित्तीय समितीमुळे शहराचे काही नुकसान झाले असेल तर समिती रद्द करायला हरकत नाही. समितीच्या कामाचा अहवाल पुढील सभेसमोर ठेवला जाईल.

सुतार म्हणाले कि, प्रशासनाचा कल विकास कामे करण्यापेक्षा अडवण्याकडे जास्त आहे. त्यामुळे प्रशासनाने वित्तीय समिती, निविदा समिती अशा समित्या तयार केल्या आहेत.अशा सगळ्या गोष्टी मुळे विकासावर परिणाम होतो आहे अनेक विकासकामे रेंगाळत आहेत. त्यामुळे प्रशासनाने खुलासा करावा. अशी मागणी सुतार यांनी  केली. त्यानंतर धीरज घाटे म्हणाले कि, वित्तीय समिती कोविड काळात तयार करण्यात आली होती. सद्यस्थितीत समितीची आवश्यकता नसेल तर निर्णय करून बरखास्त करावी. राष्ट्रवादी कॉंग्रेस चे नगरसेवक बाबुराव चांदेरे म्हणाले,  प्रशासक काळात वित्तीय समिती होती. मात्र आता स्थायी समिती आणि मुख्य सभा अशा दोनच कराव्यात. कॉंगेस नगरसेवक अरविंद शिंदे म्हणाले, स्थायी समिती असताना वित्तीय समितीची काय आवश्यकता आहे? हा स्थायी समितीला समांतर समिती करणे हा स्थायी समितीचा अपमान आहे.

यावर महापालिका आयुक्त नवल किशोर राम म्हणाले, वित्तीय समिती बाबत मी स्वतः अभ्यास करून काही नुकसान झाले का यावर विचार करतो. स्थायी समितीत प्रशासनाचे डॉकेट जाते. वित्तीय समिती मुळे विकासकामे कशी करायचे ते कळते. त्यानुसार आम्हाला काम करण्याची दिशा मिळते. मात्र समितीमुळे शहराचे नुकसान होत असेल तर समिती बरखास्त करू. समिती असण्याचा आम्ही आग्रह धरत नाही. शहराचे नुकसान होत असेल तर समिती रद्द करायला हरकत नाही. याबाबत आम्ही पुढील मुख्य सभेत समितीने केलेल्या कामाचा अहवाल देतो.

जगदाळे कुटुंबासह खासदार मेधा कुलकर्णी यांनी घेतली उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट

पुणे: पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील पीडित जगदाळे कुटुंबातील प्रगती जगदाळे व त्यांची कन्या आसावरी जगदाळे यांच्यासमवेत राज्यसभा खासदार प्रा. डॉ. मेधा कुलकर्णी यांनी मुंबईत राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट घेऊन आसावरी यांना शासकीय सेवेत समाविष्ट करण्याबाबत सविस्तर चर्चा केली.

एकनाथ शिंदे व चंद्रशेखर बावनकुळे या दोघांनीही या विषयाची संवेदनशीलता लक्षात घेत तात्काळ मुख्यमंत्री कार्यालयातील सचिव श्रीकर परदेशी, गृहनिर्माण विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव असीमकुमार गुप्ता यांच्याशी दूरध्वनीवर चर्चा केली. तसेच पुणे महानगरपालिका आयुक्त नवलकिशोर राम यांना शासनाकडे प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना दिल्या. दोघांनीही या विषयात तत्परतेने लक्ष घालून कार्यवाही करण्याचे निर्देश दिल्याबद्दल जगदाळे कुटुंबीय व मेधा कुलकर्णी यांनी त्यांचे आभार व्यक्त केले.

प्रा. डॉ. मेधा कुलकर्णी म्हणाल्या, “स्वर्गीय संतोष जगदाळे यांच्यावर पहलगाम येथे केवळ हिंदू असल्यामुळे झालेला हल्ला ही अत्यंत वेदनादायी आणि अस्वस्थ करणारी घटना होती. त्या दुःखद प्रसंगी महाराष्ट्रातील अनेक मान्यवर नेत्यांनी आसावरी यांना शासकीय सेवेत संधी देण्याचे आश्वासन दिले होते. या आश्वासनाला दहा महिने उलटल्यानंतर या विषयाची तातडीने दखल घ्यावी यासाठी, माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिले, तसेच गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेऊन निवेदन दिले होते. त्यानंतर आता या दोन्ही नेत्यांची भेट घेऊन चर्चा केली आहे. या प्रकरणाला आता गती मिळताना दिसत असून, ही दिलासा देणारी बाब आहे.

श्रीमती प्रगती आणि त्यांची कन्या आसावरी यांना दिलेले आश्वासन सरकार लवकरात लवकर पूर्ण करेल, असा मनापासून विश्वास आहे. कारण हा केवळ एका कुटुंबाचा प्रश्न नसून न्याय, संवेदना आणि सामाजिक जबाबदारी यांचा विषय आहे. आसावरी उच्चशिक्षित असून, एमबीए केलेले आहे. त्यामुळे महानगरपालिकेत तिला प्रशासकीय पदावर किंवा वर्ग दोन श्रेणीतील नोकरी मिळावी, यासाठी प्रयत्नशील आहे, असेही प्रा. डॉ. मेधा कुलकर्णी यांनी नमूद केले.

बुधवार पेठेत 11 बांगलादेशी तरुणी ताब्यात:बनावट आधार आणि रेशनिंग कार्डावर रहिवास; आठवडभरात दुसरी मोठी मोहीम

पुणे पोलिसांनी बुधवार पेठेतील वेश्यावस्तीत मोठी कारवाई करत ११ बांगलादेशी तरुणींना ताब्यात घेतले आहे. आठवडभरातील ही दुसरी मोठी मोहीम असून, बेकायदेशीर वास्तव्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली. प्राथमिक तपासात ताब्यात घेतलेल्या २२ तरुणींपैकी ११ जणी बांगलादेशी नागरिक असल्याचे समोर आले आहे.
फरासखाना आणि खडक पोलिसांच्या पथकाने बुधवार पेठेत संयुक्तपणे ही कारवाई केली. पोलिसांनी येथील कुंटणखान्यांची तपासणी केली असता, संशयावरून २२ तरुणींना ताब्यात घेण्यात आले. चौकशीदरम्यान, ११ तरुणींनी त्यांची ओळखपत्रे आणि नागरिकत्वाची कागदपत्रे सादर केली, तर उर्वरित ११ तरुणींनी आपण बांगलादेशी असल्याचे सांगितले. कागदपत्रांच्या तपासणीतही त्यांची बांगलादेशी नागरिकता उघड झाली.

यापूर्वीही बुधवार पेठेत पोलिसांनी कारवाई करत दोन बांगलादेशी तरुणींना ताब्यात घेतले होते. त्यावेळी अमली पदार्थ बाळगणाऱ्या एकाला अटक करून चरस आणि इंजेक्शन जप्त करण्यात आली होती. आता ताब्यात घेतलेल्या बांगलादेशी तरुणी पुण्यात कशा आल्या, त्यांना कोणत्या दलालांनी आणले, याचा तपास पोलिस करत आहेत. दलालांच्या नेटवर्कची खातरजमा करण्याची प्रक्रिया सुरू आहे. आठवड्याभरापूर्वी पोलिसांनी बुधवार पेठेत ७०० जणांची चौकशी केली होती.

पुणे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांसह फरासखाना पोलिस ठाण्याला भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला. ज्या कुंटणखान्यांमध्ये बांगलादेशी तरुणी आढळल्या, ते सील करण्याचा प्रस्ताव पाठवण्यात येणार आहे. अनैतिक मानवी वाहतूक व्यापार प्रतिबंध कायद्यान्वये संबंधितांवर गुन्हे दाखल केले जातील, असे आयुक्तांनी सांगितले. यापुढे बुधवार पेठेत नियमितपणे कारवाई केली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

शेतकरी,\बेरोजगार, महिला, कायदा सुव्यवस्थेच्या प्रश्नावर काँग्रेस रस्त्यावर उतरून सरकारला जाब विचारणार: रमेश चेन्नीथला.

0
  • स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत सत्ताधारी पक्षाकडून लोकशाहीची हत्या, विपरित परिस्थितीत काँग्रेस कार्यकर्ते निर्धाराने लढले.
  • काँग्रेसच्या पॉलिटिकल अफेयर्स कमिटीच्या बैठकीत राजकीय, सामाजिक मुद्द्यांवर सविस्तर चर्चा.

मुंबई -काँग्रेस पक्ष राज्यात आगामी वर्ष संघटन बांधणीवर भर देत गावपातळीपर्यंत नियुक्त्या करण्याबरोबर सेल,विभाग,सेवादलही मजबूत करणार आहे. केंद्र व राज्यातील भाजपा सरकार विकासाच्या नावावर केवळ राजकारण करत असून शेतकऱ्यांचे प्रश्न गंभीर आहेत, आमहत्या वाढल्या आहेत. बेरोजगारी वाढली आहे, महिला अत्याचाराचे प्रमाण वाढले असून कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर बनला आहे. जनतेचे हे प्रश्न हाती घेऊन काँग्रेस पक्ष विविध आंदोलने व मोर्चांच्या माध्यमातून सरकारला जाब विचारेल, असे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला म्हणाले..

महाराष्ट्र काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्नीथला यांच्या उपस्थितीत व प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या अध्यक्षतेखाली प्रदेश काँग्रेसच्या पॉलिटिकल अफेयर्स कमिटीची बैठक टिळक भवन मध्ये पार पडली. या बैठकीला विधिमंडळ पक्षनेते विजय वडेट्टीवार, विधान परिषदेतील काँग्रेस पक्षाचे गटनेते सतेज उर्फ बंटी पाटील, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, ज्येष्ठ नेते काँग्रेस वर्किंग कमिटीचे सदस्य बाळासाहेब थोरात, विधानसभेचे माजी अध्यक्ष नाना पटोले, वर्किंग कमिटाचे सदस्य नसीम खान, गोव्याचे प्रभारी माणिकराव ठाकरे, खासदार चंद्रकांत हांडोरे, माजी मंत्री डॉ. नितीन राऊत, यशोमती ठाकूर, अमित देशमुख, शिवाजीराव मोघे, आ.अस्लम शेख, आ. अमीन पटेल, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव कुणाल चौधरी, रेहाना चिस्ती, खासदार कल्याण काळे, खासदार शोभा बच्छाव, प्रदेश काँग्रेसचे खजिनदार अभय छाजेड, उपाध्यक्ष ॲड. गणेश पाटील,मोहन जोशी, मुजफ्फर हुसेन, महिला काँग्रेस अध्यक्षा संध्या सव्वालाखे, युवक काँग्रेस अध्यक्ष शिवराज मोरे, सेवादलाचे प्रदेशाध्यक्ष विलास औताडे, एनएसयुआय अध्यक्ष सागर साळुंखे, वरिष्ठ प्रवक्ते अतुल लोंढे आदी उपस्थित होते.

बैठकीनंतर प्रसार माध्यमांशी बोलताना रमेश चेन्नीथला पुढे म्हणाले की, राज्यात नुकत्याच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पार पडल्या. या निवडणुकीत सत्ताधारी भाजपा महायुतीने प्रशासकीय यंत्रणेचा मोठ्या प्रमाणावर गैरवापर केला. प्रचंड प्रमाणात पैसा वापरला, हा पैसा आला कुठून, असा प्रश्न विचारून सत्ताधारी पक्षाने लोकशाहीची हत्या केली असे चेन्नीथला म्हणाले. विपरित परिस्थितीत काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते दडपशाहीला न भिता निर्धाराने लढले व चांगले यश मिळवले. भाजपा सरकार घोटाळेबाज असून राज्यात गुंतवणूक येत नाही, ती शेजारच्या गुजरात राज्यात जात आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना राज्याच्या विकासाकडे लक्ष देण्यास वेळ नाही, ते राजकारण करण्यात व अतंर्गत वादातच गुंतले आहेत.

चंद्रपूर महापौर निवडणुकीसंदर्भात विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना रमेश चेन्नीथला म्हणाले की, चंद्रपूरमध्ये महापौरपदासाठी मविआचा घटक पक्ष उबाठा शिवसेनेने काँग्रेसने पाठिंबा द्य़ावा यासाठी चर्चा झाली होती पण त्यांनी ऐनवेळी भाजपाला पाठिंबा दिला पण काँग्रेस पक्षाने मात्र भाजपाला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी परभणीत उबाठाला पाठिंबा दिला. चंद्रपूरमध्ये काँग्रेस पक्षात कोणतेही अंतर्गत वाद नाहीत, सर्वांशी चर्चा झाली होती. काँग्रेसने चंद्रपूरचा बदला परभणीत घेतला नाही. लोकशाही व संविधान वाचवण्यासाठी मविआ व इंडिया आघाडीची स्थापना झालेली आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघातावर बोलताना रमेश चेन्नीथला म्हणाले की, ही घटना अत्यंत दुःखद आहे. अजित पवार यांच्या कुटुंबातील लोकांनी सीबीआय चौकशीची मागणी केली असेल तर केंद्र सरकारने तशी चौकशी केली पाहिजे, असे रमेश चेन्नीथला म्हणाले.

राज्यसभा निवडणुकीसंदर्भात अद्याप काँग्रेस पक्षाशी कोणीही संपर्क साधलेला नाही. जेव्हा तशी विचारणा होईल तेव्हा पक्षश्रेष्ठींशी बोलून निर्णय घेऊ, असेही रमेश चेन्नीथला म्हणाले.

लोहगाव–वाघोली रस्त्यावरील कंपनीला भीषण आग;

पीएमआरडीए अग्निशमन दलाच्या तत्परतेमुळे अनर्थ टळला!

पुणे : लोहगाव–वाघोली रस्त्यावरील त्रिमूर्ती लॉन्स परिसरातील एका कंपनीला बुधवारी दुपारी भीषण आग लागली. आगीचे स्वरूप पाहून परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र, पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (पीएमआरडीए) अग्निशमन दलाने दाखवलेली तत्परता आणि सात बंबांच्या मदतीने केलेल्या प्रभावी कारवाईमुळे मोठी जीवितहानी टळली असून आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले आहे.
लोहगाव–वाघोली रस्त्यावरील ‘मेडार्थ लॅब्ज प्रायव्हेट लिमिटेड’ या कंपनीत दुपारी एक वाजण्याच्या सुमारास अचानक आग भडकली. कंपनीच्या आवारात मोठ्या प्रमाणावर ऑइल, ग्रीस आणि अन्य ज्वलनशील साहित्य साठवलेले होते, ज्यामुळे आगीने रौद्ररूप धारण करून शेजारील फर्निचर मॉललाही विळखा घातला. मॉलमधील फर्निचर आणि दोन भरलेल्या गॅस सिलिंडरपर्यंत आग पोहोचल्याने परिस्थिती अत्यंत स्फोटक बनली होती. आगीची माहिती मिळताच, पीएमआरडीएच्या वाघोली अग्निशमन केंद्राचे दोन बंब काही मिनिटांतच घटनास्थळी दाखल झाले. आगीची तीव्रता लक्षात घेऊन पुणे महानगरपालिकेचे पाच बंबही मदतीसाठी पाचारण करण्यात आले. ऑइल आणि ग्रीसमुळे आग वेगाने पसरत असताना जवानांनी जीवाची बाजी लावत पाण्याचा मारा केला, तसेच ऑइलची आग विझवण्यासाठी ‘फोम’चा वापर केला. गॅस सिलिंडरपर्यंत आग पोहोचलेली असतानाही अग्निशमन दलाच्या जवानांनी अत्यंत शिताफीने परिस्थिती हाताळत संभाव्य मोठा स्फोट टाळला.

सुदैवाने, आग लागताच कंपनीतील कर्मचारी आणि परिसरातील नागरिकांनी तातडीने सुरक्षित ठिकाणी स्थलांतर केल्यामुळे कोणतीही जीवितहानी झाली नाही. आगीवर पूर्णपणे नियंत्रण मिळवण्यात आले असून, त्यानंतर कुलिंगचे (थंड करण्याचे) काम सुरू करण्यात आले. आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. या आगीत मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान झाले असून, पोलीस आणि अग्निशमन विभागाकडून पंचनामा करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

आगीची माहिती मिळताच आमचे पथक तातडीने रवाना झाले. ऑइल आणि ज्वलनशील पदार्थांमुळे आग वेगाने पसरत होती; मात्र वेळीच केलेल्या हस्तक्षेपामुळे शेजारील वस्ती वाचवता आली आणि मोठी हानी टळली.”

देवेंद्र पोटफोडे, मुख्य अग्निशमन अधिकारी, पीएमआरडीए

विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांची लंडनमधील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाला भेट; बाबासाहेबांच्या स्मृतीला केले वंदन.

0

पुणे : महाराष्ट्र विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे या सध्या १५ ते २१ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत महाराष्ट्र विधिमंडळाच्या माननीय पीठासीन अधिकाऱ्यांच्या ईंग्लड अभ्यास दौऱ्यावर असून, या दौऱ्यादरम्यान त्यांनी आज लंडन येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाला भेट दिली.

भेटीदरम्यान डॉ. गोऱ्हे यांनी महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या शिल्पाला पुष्पहार अर्पण करून त्यांच्या पवित्र स्मृतीला वंदन केले. तसेच केंद्र सरकारच्या नेहरू सेंटरचे श्री. रवींद्रचंद्रन यांनी डॉ. नीलम गोऱ्हे यांचा सत्कार केला. यावेळी, लंडन महाराष्ट्र मंडळाचे अध्यक्ष वृषाल खांडके, वैभव खांडगे , केंद्र सरकारच्या नेहरू सेंटरचे श्री. रवींद्रचंद्रन, स्मारक व्यवस्थापक श्री. फहद, उद्योजिका अनुश्री चौगुले उपस्थित होते.

डॉ. गोऱ्हे यांनी सांगितले की, बाबासाहेबांनी हिवाळ्यात हिटर नसतानाही कडाक्याच्या थंडीत विद्या अभ्यास करून शिक्षण पूर्ण केले. महाराष्ट्र शासनाने या निवासस्थानाला शासकीय दर्जा दिला असून, येथील व्यवस्था शासनाच्या तर्फे उत्तम राखली जात आहे. तरीही स्मारकाची देखभाल, सुशोभीकरण अधिक समृद्ध करण्यासाठी आणि येथील कर्मचारी वर्गास मान्यता देण्यासाठी पाठपुरावा करणार असल्याचे त्यांनी सांगितले.या स्मारकाकडे ना. देवेंद्र फडणवीस , ना.एकनाथ शिंदे , समाजकल्याण मंत्री ना.संजय शिरसाट , व केंद्रीय समाज कल्याण मंत्री खा.रामदास आठवले ,निवृत्त सरन्यायाधीश मा.भुषण गवई यांचे सतत लक्ष असल्याचे नीलमताई गोर्हे यांनी अधोरेखित केले.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स (LSE) मध्ये शिक्षण घेत असताना १९२१-२२ या काळात ज्या घरात वास्तव्य केले होते, ते घर आता ‘डॅा. बाबासाहेब आंबेडकर हाऊस’ म्हणून ओळखले जाते. महाराष्ट्र शासनाने २०१५ मध्ये हे घर खरेदी करून स्मारकात रूपांतरित केले आहे. हे स्मारक किंग हेन्रीज रोड, कॅम्डन, लंडन येथे आहे. येथे बाबासाहेबांच्या जीवनातील छायाचित्रे, काही वैयक्तिक वस्तू आणि त्यांच्या कार्याचे प्रदर्शन आहे.

या भेटीमुळे बाबासाहेबांच्या आंतरराष्ट्रीय वारशाची ओळख पुन्हा ठळक झाली आहे. डॉ. गोऱ्हे यांनी डॉ. आंबेडकर यांच्या स्मारकाचे महत्व अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले.

कात्रजजवळ अपघाताचा थरार!:5 वाहनांना उडवून डंपर जळून खाक, भीषण अपघातात 4-5 प्रवासी गंभीर जखमी

पुणे-सातारा महामार्गावरील जांभुळवाडी बोगद्याजवळ डंपर चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने भीषण अपघात झाला असून, या अनियंत्रित डंपरने समोरील चार ते पाच वाहनांना अक्षरशः उडवल्याने मोठी खळबळ उडाली. या धडकेचा वेग इतका प्रचंड होता की अपघातानंतर अवघ्या काही क्षणातच डंपरने पेट घेतला, ज्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत बचावकार्य आणि वाहतूक सुरळीत करण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. या अपघातात वाहनांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून, त्यातील 4 ते 5 प्रवासी जखमी झाले आहेत. त्यांना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात हलवले आहे.

जांभूळवाडी बोगदा, नवले ब्रिज आणि वडगाव ब्रिज हा पट्टा आता अपघातांचे भीषण केंद्र बनला असून, प्रशासनाच्या उदासीनतेमुळे प्रवाशांमध्ये संतापाची लाट आहे. काही दिवसांपूर्वीच नवले ब्रिजवर झालेल्या कंटेनर-कारच्या भीषण धडकेत 7 जणांचा बळी गेल्याची घटना ताजी असतानाही, रोजच्या वाढत्या अपघातांवर आळा घालण्यासाठी कोणतीही ठोस पावले उचलली जात नसल्याचे चित्र आहे. आज झालेल्या अपघातामुळे महामार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली असून, पोलिस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

हरित ऊर्जा क्षेत्रात राज्यात मोठी गुंतवणूक, हरित ऊर्जेमुळे वीजदरात कपात; महावितरणचे अध्यक्ष लोकेश चंद्र यांचे प्रतिपादन

0

मुंबई – राज्यातील वीजवापरामध्ये नवीकरणीय अथवा हरित ऊर्जेचे प्रमाण सध्याच्या 13 टक्कयांवरून 2030 पर्यंत 52 टक्क्यांवर नेण्यात येणार असून हरित ऊर्जेवर भर दिल्यामुळे आगामी पाच वर्षांसाठी विजेचे दर कमी करणे शक्य झाले आहे. राज्यात हरित ऊर्जा क्षेत्रात मोठ्या प्रमाणात खासगी गुंतवणूक येत आहे, असे प्रतिपादन महावितरणचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांनी बुधवारी मुंबई येथे केले.

मुंबई एनर्जी वीकच्या अंतर्गत महाराष्ट्रातील हरित ऊर्जा क्षेत्रातील गुंतवणूक या विषयावरील चर्चासत्रात मुख्य भाषण करताना ते बोलत होते.

त्यांनी सांगितले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी निश्चित केलेल्या नेट झिरोच्या उद्दीष्टानुसार नवीकरणीय ऊर्जेच्या वापराचे प्रमाण 2030 पर्यंत 50 टक्क्यांपर्यंत वाढविणे आवश्यक आहे. महाराष्ट्राने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात अंमलात आणलेल्या ऊर्जा परिवर्तन आराखड्यामुळे राज्यातील नवीकरणीय ऊर्जावापराचे प्रमाण या कालावधीत 52 टक्क्यांवर जाईल. मा. पंतप्रधानांनी देशाच्या अर्थव्यवस्थेच्या विकासासाठी जे स्वप्न पाहिले आहे त्यानुसार मा. मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वात महाराष्ट्राची अर्थव्यवस्था एक ट्रिलिअन डॉलर्सची करण्यात येणार आहे. अर्थव्यवस्थेचा झपाट्याने विस्तार होत असताना राज्याची ऊर्जेची गरज किती वाढेल, हे ध्यानात घेऊन संसाधन पर्याप्तता आराखडा तयार केला आहे.

आगामी पाच वर्षात राज्यात ऊर्जा परिवर्तन आराखड्यासाठी 3.3 लाख कोटी रुपयांची गुंतवणूक अपेक्षित आहे. त्यापैकी 75 टक्के गुंतवणूक ही खासगी गुंतवणूकदारांकडून होत आहे. ऊर्जा परिवर्तनामध्ये हरित ऊर्जेवर भर देण्यात येत आहे. या क्षेत्रात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक येत असून ती योग्य धोरणांचे निदर्शक आहे. हरित ऊर्जा स्वस्तात मिळत असल्याने महावितरणची आगामी पाच वर्षात वीज खरेदीमध्ये मोठ्या प्रमाणात बचत होणार असून त्यामुळेच कंपनीला राज्यात पाच वर्षांसाठी वीजदर कपातीचा प्रस्ताव मांडता आला आहे, अशी माहिती त्यांनी दिली.

ते म्हणाले की, राज्यामध्ये इलेक्ट्रिक वाहनांचे प्रमाण वाढत असून त्यांच्या चार्जिंगसाठी मोठ्या प्रमाणात सुविधांची गरज भासेल. राज्यात मोठ्या प्रमाणात डेटा सेंटर उभारण्यात येत आहेत. तसेच हरित हायड्रोजनचे प्रकल्पही उभारण्यात येणार आहेत. या सर्वांसाठी मोठ्या प्रमाणात वीज लागेल व त्याची तरतूद महावितरणने केली आहे.

त्यांनी सांगितले की, दिवसा तयार झालेल्या सौर ऊर्जेचा वापर सायंकाळी विजेच्या सर्वाधिक मागणीच्या कालावधीत करण्यासाठी बॅटरी स्टोरेज प्रकल्प उभारण्यात येत आहेत. तसेच सर्वाधिक मागणीच्या वेळी जलविद्युतचा वापर करता यावा, यासाठी पंप स्टोरेज प्रकल्पांवर भर देण्यात येत आहे. बॅटरी स्टोरेज, पंप स्टोरेज आणि ग्रीन हायड्रोजन या क्षेत्रात राज्यात आगामी काळात खूप मोठी गुंतवणूक होणार आहे.

प्रशासनाचा 5 टक्के करवाढीचा प्रस्ताव भाजपने फेटाळला.

  • पुणेकरांनी भाजपला मोठ्या विश्वासाने साथ दिली,नागरिकांच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही – सभागृह नेते गणेश बिडकर

पुणे : पुणे महानगरपालिका प्रशासनाकडून मिळकतकरात प्रस्तावित करण्यात आलेली ५ टक्के करवाढ आजच्या सर्वसाधारण सभेत ठामपणे फेटाळण्यात आली. सत्ताधारी भाजपने पुणेकरांच्या हिताला प्राधान्य देत मिळकतकर धारकांवर कोणत्याही प्रकारचा अतिरिक्त आर्थिक बोजा टाकू नये,अशी स्पष्ट व ठोस भूमिका सभागृहात मांडली. परिणामी पुणेकरांवरील संभाव्य करवाढीचे संकट टळले आहे.

सभागृह नेते गणेश बिडकर यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की,“पुणेकरांनी भाजपला मोठ्या विश्वासाने साथ दिली आहे.त्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही. प्रशासनाने सुचविलेला करवाढीचा प्रस्ताव आम्ही फेटाळला असून १ टक्काही करवाढ होऊ दिलेली नाही.त्यामुळे सध्या कोणतीही करवाढ लागू होणार नाही.”

शहरातील विकासकामांना गती देताना नागरिकांवर कर वाढविण्याऐवजी महापालिकेच्या उत्पन्नाचे पर्यायी स्त्रोत मजबूत करण्यावर भर दिला जाईल, समाविष्ट गावांच्या करवाढीचा मुद्दा विशेष सभेद्वारे मार्गी लावण्यात येईल,अशी ग्वाहीही यावेळी बिडकर यांनी दिली आहे.

उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांची लंडनमध्ये उच्चायुक्त विक्रम दोराईस्वामी यांच्याशी भेट

0

यूके अभ्यासदौऱ्यात महत्त्वपूर्ण चर्चा

मुंबई, दि. १७ फेब्रुवारी २०२६ : विधान परिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे या सध्या १५ ते २१ फेब्रुवारी २०२६ दरम्यान आयोजित महाराष्ट्र विधिमंडळाच्या माननीय पीठासीन अधिकाऱ्यांच्या यूके अभ्यास दौऱ्यावर आहेत. यादरम्यान आज त्यांनी ब्रिटनमधील भारताचे उच्चायुक्त विक्रम दोराईस्वामी यांची भेट घेतली. या भेटीत महाराष्ट्र विधानमंडळाचे कामकाज, तसेच Commonwealth Parliamentary Association (CPA) च्या बार्बाडोस येथे झालेल्या परिषदेमधील मुद्द्यांवर सविस्तर चर्चा झाली.

डॉ. गोऱ्हे यांनी सांगितले की, लंडनमधील महाराष्ट्र मंडळ लंडन यांना महाराष्ट्र शासनाने जाहीर केलेल्या मदतीच्या प्रत्यक्ष अंमलबजावणीसाठी विशेष सहकार्य करण्याची विनंती त्यांच्या समवेत असलेल्या महाराष्ट्र मंडळ , लंडनचे वैभव खांडगे आणि वृषाल खांडके यांनी उच्चायुक्तांकडे केली.

या भेटीत भारतीय दूतावासात सुरक्षा जबाबदारी सांभाळणारे वरिष्ठ अधिकारी किरण भोसले (मुंबई पोलीस) यांच्याशीही संवाद झाला. मध्यंतरी उद्भवलेल्या प्रश्नांमध्ये तिरंगा ध्वजाचे प्रभावी संरक्षण करण्यात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. तसेच मुंबईवरील दहशतवादी हल्ल्याच्या काळातही त्यांचे योगदान उल्लेखनीय राहिले असल्याचे डॉ. गोऱ्हे यांनी नमूद केले.

दरम्यान, महाराष्ट्र विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांचेही आगमन झाले असून, पुढील कार्यक्रम आणि इतर प्रलंबित प्रश्नांबाबत चर्चा करण्यात आली.
ब्रिटनमधील काही विषयांवर पुढील पाठपुरावा करण्यात येणार असल्याचेही डॅा. नीलमताई गोर्हे यांनीच सांगितले.

कविता हाच माझा कर्मयोग : प्रभा सोनवणे

कै. तिलोत्तमा निफाडकर स्मृती कर्मयोगिनी पुरस्काराने प्रभा सोनवणे यांचा गौरव

पुणे : शेतकरी कुटुंबातून आलेल्या मला गृहिणी व्हायचे होते पण कवयित्री झाले. कविता हा माझा जगण्याचा आता अविभाज्य भाग झाला असून कविता हाच माझा कर्मयोग आहे, असे भावपूर्ण उद्‌गार ज्येष्ठ कवयित्री प्रभा सोनवणे यांनी व्यक्त केले. कवितेमुळे आयुष्य सुसह्य झाल्याचे त्यांनी आवर्जून नमूद केले.

कै. सौ. तिलोत्तमा प्रकाश निफाडकर यांच्या स्मरणार्थ दिल्या जाणाऱ्या कर्मयोगिनी पुरस्काराने प्रभा सोनवणे यांचा गौरव करण्यात आला. सत्काराला उत्तर देताना त्या बोलत होत्या. पुरस्काराचे वितरण तनुजा चव्हाण आणि नितीन चव्हाण यांच्या हस्ते झाले. ज्येष्ठ कवयित्री मृणालिनी कानिटकर-जोशी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होत्या. रंगत-संगत प्रतिष्ठानचे अध्यक्ष ॲड. प्रमोद आडकर यांची प्रमुख उपस्थिती हाती. सदाशिव पेठेतील अक्षरवेल सभागृहात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

पुरस्कार सोहळ्याच्या माध्यमातून संस्काराची शिदोरी पुढे नेली जात आहे, असे सांगून मृणालिनी कानिटकर-जोशी म्हणाल्या, प्रभा सोनवणे यांच्या बोलण्यात ऋजुता असून त्या सौंदर्यप्रेमी आहेत. त्यांच्या विचारात प्रगल्भता आहे तर त्यांची कविता चित्रमय आहे.

ॲड. प्रमोद आडकर म्हणाले, कविता जगण्याला उभारी देण्याचे काम करते. अनुभव संपन्नतेतून काव्य फुलते हे प्रभा सोनवणे यांच्या काव्यातून दिसून येते. त्यांची कविता समृद्धतेच्या मार्गाने जात आहे.

पुरस्कार वितरण सोहळ्यानिमित्त निमंत्रितांचे काव्यसंमेलन आयोजित करण्यात आले होते यात अंजली कुलकर्णी, मंजुषा आचरेकर, जयंत भिडे, वासंती वैद्य, प्रमोद खराडे, वैजयंती आपटे, माधव हुंडेकर, ऋचा कर्वे, स्वाती यादव, चैतन्य दीक्षित यांचा सहभाग होता.

प्रास्ताविकात तनुजा चव्हाण यांनी पुरस्कारामागील भावना ‘सांगा कधी शब्दांमध्ये मांडता येते का आई;

मांडू शकेन इतका कुणी गुणवंत नाही’ अशा शब्दात विशद केल्या. सूत्रसंचालन शिल्पा देशपांडे यांनी केले तर आभार नितीन चव्हाण यांनी मानले.

चंद्रपूर शहरातील श्री विठ्ठल मंदिर देवस्थानास ‘ब’ वर्ग दर्जा प्रदान करण्यात यावा

0

आ सुधीर मुनगंटीवार यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

चंद्रपूर शहरातील श्री विठ्ठल मंदिर देवस्थानास ‘ब’ वर्ग दर्जा प्रदान करण्याची मागणी आ सुधीर मुनगंटीवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.

मुख्यमंत्र्यांना पाठवलेल्या पत्रात आ. मुनगंटीवार यांनी म्हटले आहे की चंद्रपूर शहराला सुमारे ८०० हून अधिक वर्षांचा समृद्ध ऐतिहासिक वारसा लाभलेला आहे. गोंड राजवटीपासून भोसलेकालीन परंपरेपर्यंत या शहराने सांस्कृतिक, धार्मिक व सामाजिक दृष्ट्या उल्लेखनीय प्रगती साधलेली आहे. किल्ले, प्राचीन वास्तू व विविध देवस्थाने ही या शहराची ओळख ठरली आहेत. माता महाकाली, श्री अंचलेश्वर आणि भगवान श्री विठ्ठल ही या शहराची आराध्य आहेत.

चंद्रपूर शहरातील श्री विठ्ठल मंदिर हे अत्यंत प्राचीन व ऐतिहासिक देवस्थान असून, अनेक दशकांपासून भाविकांच्या श्रद्धेचे केंद्र राहिले आहे. मंदिर परिसरात वर्षभर विविध धार्मिक कार्यक्रम, कीर्तन, भजन व उत्सव आयोजित केले जातात.

दरवर्षी आषाढी व कार्तिकी एकादशीच्या निमित्ताने मंदिरातून भव्य रथयात्रा काढण्यात येते. हा रथ संपूर्ण शहरातून मार्गक्रमण करतो. या वेळी हजारो भाविक मोठ्या श्रद्धेने सहभागी होतात. शहरातील विविध भागांतून नागरिक, महिला मंडळे, वारकरी संप्रदायाचे अनुयायी मोठ्या संख्येने उपस्थित राहतात. ही परंपरा अनेक वर्षांपासून अखंडितपणे सुरू असून, शहराच्या सांस्कृतिक जीवनाचा अविभाज्य भाग बनली आहे.विठू नामाचा गजर करत भाविक सतत या मंदिरात येतात.

दरवर्षी भाविकांची संख्या लक्षणीयरीत्या वाढत आहे. उत्सव काळात कायदा-सुव्यवस्था, स्वच्छता, पाणीपुरवठा व इतर मूलभूत सुविधांची आवश्यकता भासते. मंदिरास ‘ब’ वर्ग दर्जा प्राप्त झाल्यास शासन स्तरावरून आर्थिक व प्रशासकीय सहाय्य उपलब्ध होऊन सदर कामे अधिक सक्षमपणे करता येईल. हे मंदिर चंद्रपूर शहरातील नागरिकांचा भावनिक ठेवा आहे असेही आ मुनगंटीवार यांनी म्हटले आहे.
श्री विठ्ठल मंदिर देवस्थानास शासनाच्या नियमानुसार ‘ब’ वर्ग दर्जा प्रदान करण्यात यावा यासाठी चंद्रपूर जिल्हा नियोजन समितीचा ठराव आ. मुनगंटीवार यांच्या विनंती नुसार पारित करण्यात आला आहे.

टीओडी वीजमीटरमुळे पुणेकरांना मिळाली साडेआठ कोटींची सवलत

पुणे, दि. १७ फेब्रुवारी २०२६- टीओडी वीजमीटर बसविणाऱ्या वीज ग्राहकांना सकाळी ९ ते सायंकाळी ५ या काळातील दिवसा वीजवापरावर ८० पैसे प्रतियुनिट सवलत दिली जाते. या सवलतीपोटी जुलै २०२५ ते जानेवारी २०२६ ह्या कालावधीत  पुणेकरांना ८ कोटी ६० लाखांचा फायदा झाला असून, त्यांच्या दरमहाच्या वीजबिलात ही सवलत जमा झाली आहे. स्मार्ट/टीओडी वीजमीटर मोफत बसविले जात असून, ग्राहकांनी मीटर बसविण्यासाठी सहकार्य करावे असे आवाहन महावितरणकडून केले जात आहे.

महावितरण पुणे परिमंडलात वीजग्राहकांची संख्या ३९ लाख ७१ हजार इतकी असून, त्यापैकी ९ लाख ८४ हजार ग्राहकांना अत्याधुनिक टीओडी वीजमीटर बसविण्यात आले आहे. तर उर्वरित ग्राहकांना हे अत्याधुनिक मीटर लवकरच बसविले जात आहे. वीजमीटर बसविण्याची सुरुवात महावितरणने स्वत:पासून केली. महावितरणच्या सर्व आस्थापना व कर्मचारी वसाहतींना हे मीटर लावण्यात आले आहे. त्यापाठोपाठ सर्व सरकारी कार्यालये, शासकीय वसाहती आदींनाही हे मीटर बसविले आहे. हे मीटर पूर्णत: मोफत असून, त्यासाठी महावितरणकडून कोणतेही शुल्क आकारले जात नाही.

सवलत का दिली जाते ?

महावितरणला लागणाऱ्या विजेत दिवसेंदिवस सौरऊर्जेचा वाटा वाढत आहे. ही वीज दिवसा मिळत असून, इतर विजेच्या तुलनेत स्वस्त आहे. ह्या स्वस्त्‍ विजेचा फायदा महावितरण ग्राहकांना आकारल्या जाणाऱ्या वीज दरावर प्रतियुनिट ८० पैसे प्रमाणे देते. पुढील काळात ही सवलत १ रुपया प्रति युनिटपर्यंत जाणार आहे. ह्या सवलतीसाठी ग्राहकाकडे टीओडी मीटर असणे क्रमप्राप्त आहे.

कोणत्या मंडलामध्ये जास्त फायदा ?

पुणे परिमंडलात गणेशखिंड शहर मंडल, रास्तापेठ शहर मंडल व पुणे ग्रामीण मंडल अशी तीन प्रमुख कार्यालये आहेत. त्यापैकी गणेशखिंड शहर मंडलात ३ लाख ६६ हजार ८६७ टीओडी मीटर आहेत. रास्तापेठ शहर मंडल दुसऱ्या क्रमांकावर असून या मंडलात ३ लाख ६३ हजार ७४२ टीओडी मीटर ग्राहक आहेत. तर पुणे ग्रामीण मंडलामध्ये २ लाख ५४ हजार ३५३ टीओडी मीटर/ग्राहक आहेत. या मंडलांतील टीओडी मीटर वापरणाऱ्या ग्राहकांना सात महिन्यांमध्ये अनुक्रमे गणेशखिंड- ३ कोटी ६९ लाख ३४ हजार २ रुपये, रास्तापेठ- ३ कोटी ५३ लाख ६२ हजार ६५९ रुपये तर पुणे ग्रामीण- १ कोटी ३७ लाख ७५ हजार ५६० रुपये सवलत मिळाली आहे.

वीजबिल जास्त येत नाही- काकडे

काही ठिकाणी नविन मीटरचे फायदे समजून न घेता ते बसविण्यापूर्वीच अनाठायी विरोध केला जात आहे. विजेचे बिल जास्त येत नाही तर ते अचूक असेल. ग्राहकांनी ऐकीव किंवा सोशल मिडीयावर आलेल्या अफवांना बळी पडू नये. मीटर बसविण्यासाठी येणाऱ्या कर्मचाऱ्यांना सहकार्य करावे.

सुनील काकडे,मुख्य अभियंता, महावितरण पुणे परिमंडल

मंडलएकूण ग्राहकटीओडी ग्राहकसवलत (रुपये)
गणेशखिंड शहर मंडल१४७२२२३३६६८६७३,६९,३४,०७२
रास्तापेठ शहर मंडल१५०३२२५३६३७४२३,५३,६२,६५९
पुणे ग्रामीण मंडल९९६४१५२५४३५३१,३७,७५,५६०
पुणे परिमंडल एकूण३९७१८६३९८४९६२८,६०,७२,२९१