Home Blog Page 98

कोथरुडमधील ‘मिसिंग लिंक’च्या कामाला गती,चंद्रकांतदादा पाटील यांच्या पाठपुराव्याला यश

बालेवाडी-वाकड पूल रस्ता भूसंपादनाची अधिसूचना जारी

पुणे: कोथरुड मतदारसंघातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी केलेल्या पाठपुराव्याला मोठे यश आले आहे. बाणेरमधील कस्पटे वस्ती परिसरातील ‘मिसिंग लिंक’च्या कामाला गती देण्यासाठी, बालेवाडी-वाकड पूल रस्ता जमीन अधिग्रहणाची अधिसूचना जिल्हाधिकारी कार्यालयाकडून अखेर जारी करण्यात आली आहे.

कोथरुड विधानसभा मतदारसंघातील सर्व प्रकारची वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी राज्याचे उच्च व तंत्र शिक्षणमंत्री आणि विधानसभा मतदारसंघाचे आमदार चंद्रकांतदादा पाटील सातत्याने आग्रही आहेत. त्यांच्या प्रयत्नांमुळेच बुधवारी ही अधिसूचना जारी करण्यात आली असून, आता कस्पटे वस्ती येथील रस्त्याच्या कामाला प्रत्यक्ष गती मिळणार आहे. या अधिसूचनेनुसार, बाणेर-वाकड पुलासाठी बाणेर भागातील विकास योजनेतील (DP) ३० मीटर रुंदीच्या रस्त्यासाठी जमीन अधिग्रहण करण्याचे निर्देशित करण्यात आले आहे.

हे संपादन महाराष्ट्र महापालिका अधिनियम कलम २०५ अन्वये आरक्षित केलेल्या जागेसाठी होणार आहे. तसेच, विकास आराखड्यानुसार हा रस्ता ३० मीटर रुंद असणार आहे, ज्यामुळे भविष्यातील वाढती वाहतूक विचारात घेऊन तिथे सुसज्ज पदपथ आणि सायकल ट्रॅकचेही नियोजन करण्यात आले आहे.

“बाणेर ते वाकड परिसरातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी बालेवाडी-वाकड उड्डाणपूल अत्यंत महत्त्वाचा आहे. हा मार्ग लवकरात लवकर खुला व्हावा यासाठी आमचे प्रयत्न सुरू होते. आता अधिसूचना निघाल्याने कामाला वेग आला असून, या मार्गाचे काम पूर्ण झाल्यानंतर परिसरातील नागरिकांची वाहतूक कोंडीतून कायमस्वरूपी मुक्तता होईल,” असा विश्वास ना. चंद्रकांतदादा पाटील यांनी व्यक्त केला.

या रस्त्यामुळे हिंजवडी आयटी पार्कमध्ये जाणाऱ्या हजारो कर्मचाऱ्यांसाठी हा ‘शॉर्टकट’ ठरणार आहे. यामुळे मुंबई-बेंगळुरू महामार्गावरील राधा चौक आणि भुजबळ चौक येथील वाहतूक कोंडीचा भार ५० टक्क्यांनी कमी होण्याची शक्यता आहे.

देशात १२ वर्षापासून मोदींच्या सहभागानेच देशाची लूट सुरु: हर्षवर्धन सपकाळ

मुंबई युवक काँग्रेसच्या न्याय सत्याग्रह आंदोलनाला भेट देऊन काँग्रेस प्रदेशाध्यक्षांनी केले मार्गदर्शन

मुंबई, दि. ८ एप्रिल २०२६

नरेंद्र मोदी यांनी २०१४ साली मोठी आश्वासने देऊन सत्ता मिळवली. वर्षाला २ कोटी रोजगार देणार, शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करणार, १०० स्मार्ट सीटी बनवणार, विकास करणार अशा घोषणा दिल्या. ना खाऊंगा ना खाने दुंगा, अशी राणाभीमदेवी थाटात गर्जना केली पण मोदी फुसका बार निघाले. १२ वर्षापासून देशात अक्षरशः लुट सुरु आहे, दोन गुजराती देश विकत आहेत तर दोन गुजराती खरेदी करत आहेत. देशात जे सुरु आहे तेच महाराष्ट्रातही सुरु आहे, ‘बडे मियां तो बडे मियां, छोटे मियां भी सुभानल्ला’, अशी परिस्थिती आहे, असा घणाघाती हल्लाबोल काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केला आहे.

मुंबई युवक काँग्रेसच्या अध्यक्षा झीनत शबरीन यांच्या नेतृत्त्वाखाली सुरु असलेल्या न्याय सत्याग्रह आंदोलनाला उपस्थिती लावून काँग्रेस प्रदेशाध्यक्षांनी युवक काँग्रेसच्या कामाचे कौतुक केले, या संघर्षात युवक काँग्रेसच्या पाठीशी खंबीरपणे उभे असल्याचे सांगत हर्षवर्धन सपकाळ यांनी भाजपा सरकारवर तोफ डागली.
यावेळी ते म्हणाले की, भारत हा कृषीप्रधान देश आहे पण भाजपाच्या राजवटीत देशातील अन्नदाता देशोधडीला लागला आहे. सत्तेत येण्यापूर्वी शेतकऱ्यांना दिलेली आश्वासने मोदी सरकारने पूर्ण केली नाहीत. शेतमालाला दुप्पट भाव तर मिळत नाहीच उलट शेतीसाठी लागणारा खर्च मात्र दुप्पट, तिप्पट वाढला आहे. नरेंद्र मोदींनी दबावाखाली अमेरिकेशी व्यापार करार केला असून ट्रम्पच्या धमकीला मोदी घाबरतात. या करारामुळे शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. देशातील तरूण, कामगार, कष्टकरी, शेतकरी, सर्वांची नरेंद्र मोदी यांनी फसवणूक केली आहे. विकासाचा दावा करणारे मोदी सरकार देशाला विनाशाकडे घेऊन जात आहे.

पुलवामा अतिरेकी हल्लात आपले जवान शहीद झाले या हल्ल्यात वापरलेले ३०० किलो आरडीएक्स कुठून आले त्याचा अद्याप तपास लागलेला नाही. पहलगावमध्ये सीमेपासून ३०० किमी आत येऊन अतिरेक्यांनी २६ लोकांची हत्या केली पण आजही हे अतिरेकी मोदी सरकारला सापडले नाहीत. ऑपरेशन सिंदूरच्या वेळी भारतीय सैन्य दमदार कामगिरी करत असताना डोनाल्ड ट्रम्पने एक फोन केला आणि नरेंद्र सरेंडर झाले. इंदिराजी गांधी यांनी पाकिस्तानला गुडघे टेकायला लावले आणि शिमला करार केला पण नरेंद्र मोदी मात्र अमेरिकेसमोर झुकले आहेत, अमेरिका सांगते तसे त्यांना करावे लागते, देशाचा स्वाभिमान मोदींनी गहाण ठेवला आहे. भारत पाकिस्तानच्या प्रश्नावर आता डोनाल्ड ट्रम्प मध्यस्थी करतात, आपल्या पंतप्रधानाला सरेंडर म्हणाले लागते हे दुर्दैवी आहे असे सपकाळ म्हणाले..

विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली देशात संविधान, लोकशाही व संस्कृती वाचवण्याची लढाई सुरु आहे. जुलुम व अन्यायाच्या विरोधात काँग्रेसचा हा लढा सुरुच राहणार आहे. देश वाचवण्याची ही लढाई म्हणजे स्वातंत्र्याची दुसरी लढाईच असून आपण सर्व मिळून ही लढाई लढू व विजयी होऊ, असा आत्मविश्वासही काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला. यावेळी मुंबई युवक काँग्रेसच्या अध्यक्ष झीनत शबरीन, प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस ॲड. संदेश कोंडविलकर, भूषण पाटील, शाह आलम शेख, मुंबई युवक काँग्रेसचे संघटन सरचिटणीस तेजस चंदूरकर यांच्यासह युवक काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

समरजितसिंह घाटगे यांचा असंख्य कार्यकर्त्यांसह भाजपात प्रवेशभाजपा प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी केले स्वागत

कागल येथील राष्ट्रवादी काँग्रेस(शरद पवार गट) पक्षाचे नेते आणि शाहू उद्योग समूहाचे अध्यक्ष राजे समरजितसिंह घाटगे, त्यांचे पुत्र राजे अखिलेश सिंह, राजे विरेंद्रसिंह घाटगे, पंचायत समितीच्या सभापती सौ.सुवर्णा पाटील, उपनगराध्यक्ष जयंत रावण यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी बुधवारी भाजपामध्ये प्रवेश केला. भाजपा प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी या सर्वांचे पक्षात स्वागत केले. भाजपा प्रदेश कार्यालयात झालेल्या या कार्यक्रमाला उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील, खा.धनंजय महाडिक, राजवर्धन नाईक निंबाळकर, ज्येष्ठ नेते प्रकाश आवाडे, भाजपा माध्यम विभाग प्रमुख नवनाथ बन आदी उपस्थित होते.
यावेळी प्रदेशाध्यक्ष श्री. चव्हाण यांनी सांगितले की, समरजितसिंह घाटगे यांच्या प्रवेशामुळे कोल्हापूर जिल्ह्यात भारतीय जनता पार्टीची ताकद आणखी वाढणार आहे. भाजपाची विचारधारा गावखेड्यात नेण्यासाठी पोषक वातावरण आहे. घाटगे यांच्या नेतृत्वाखाली यापुढील काळात सर्वांनी एकदिलाने काम करायचे आहे. ज्या विश्वासाने त्यांनी भाजपामध्ये प्रवेश केला आहे त्याला तडा जाऊ देणार नाही, अशी ग्वाही श्री. चव्हाण यांनी दिली. यावेळी समरजितसिंह घाटगे म्हणाले की यापुढे पक्ष सांगेल त्यानुसार चालायचे असे आम्ही ठरवले आहे. पक्षाकडून जी काही जबाबदारी सोपवली जाईल ती पार पाडण्यासाठी आम्ही जोमाने काम करून पक्षाची विचारधारा गावागावात, घराघरात पोहचवू.
यावेळी जिल्हा परिषद सदस्या सौ. शिवानी विजयसिंह भोसले, पंचायत समिती सदस्य अनिलकुमार हेगडे, सौ. रंजना बापू अस्वले, नगरसेवक दीपक मगर, सभापती शिक्षण समिती अरुण गुरव, महिला बालकल्याण समिती सौ. सारिका बारड, नगरसेविका सौ. साधना विष्णू पाटील, नगरसेवक सुशांत कालेकर, उमेश सावंत, बाळासाहेब माळी, सौ. मेघा गजानन माने, आनंदा पसारे, विजय राजगिरे, कोल्हापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती कृष्णात पाटील, हमिदवाडा साखर कारखान्याचे संचालक कैलाश जाधव, सरपंच संभाजी फराकटे यांनीही भाजपात प्रवेश केला.

बड्या अनधिकृत बांधकामांकडे दुर्लक्ष अन किरण दगडे पाटलांनी केलं हातगाडी,पथारीवाल्यांना ‘लक्ष्य’ ?

पुणे- आपल्या भागात असंख्य अनधिकृत आणि नियमबाह्य बांधकामे आहेत, अनेकांनी फ्रंट,साईड मार्जिन मध्ये,पार्किंगच्या जागेमध्ये अनधिकृत बांधकामे केलीत.५ कुटुंबांची घरे होती तिथे ५० हून अधिका सदनिकांच्या इमारती उभ्या राहिल्या असे असताना या साऱ्या बड्या बिल्डरांच्या अनधिकृत बांधकामांचे सर्वेक्षण करून नियमात असलेलीच बांधकामे ठेवावीत,नियमबाह्य तातडीने काढून टाकावीत असा आग्रह धरण्या ऐवजी प्रभाग क्रमांक १० मधील अंडा-भुर्जी गाड्या,टपऱ्या,हातगाडी वाले यांना नगरसेवक किरण दगडे पाटलांनी का लक्ष्य करावे ? असा सवाल आता याभागातील पथारीवाले, टपरीवाले आणि हातगाडीवाले करू लागलेत. एक तर काही राजकीय आशीर्वाद असलेली मंडळे आहेत त्यांचे काही म्होरके देखील या व्यावसायिकांना त्रास देत असतात एवढेच काय इमारतीतील दुकानदार आपल्या दुकानापुढे पथारी,टपरी हातगाडी लावायची असेल तर अशा हातावरचे पोट असणाऱ्यांना भाडे मागतात.पुन्हा अतिक्रमण वाले आहेतच अशा स्थितीत पोट भरायला रस्त्यावर आलेली हि मंडळी काकुळतीला आलीत आणि एक मोठ्ठा चित्रपट निर्माता असलेल्या आणि बडे बडे दिग्दर्शक,स्टार घडवलेल्या दगडे पाटलांनी अशा सामान्य लोकांच्या पोटावर पाय द्यावे हे काहीना पटेनासे झालेय तर रस्त्यावर अतिक्रमणे नको,त्यामुळे खूप त्रास होतो अशी भूमिका असलेले काही जन त्यांच्या या कृतीचे स्वागत देखील करत आहेत.

दगडे पाटलांनी आपले असे म्हणणे समाज माध्यमातून मांडले आहे कि ,प्रभाग क्रमांक १० मधील वाढते अतिक्रमण,अनधिकृत तसेच आर.एम.सी. प्लांट यामुळे नागरिकांना मोठ्या प्रमाणावर त्रास सहन करावा लागत होता. यासंदर्भात वारंवार प्रशासनाकडे पाठपुरावा करूनही कोणतीही ठोस कारवाई होत नसल्याने कोथरूड-बावधन क्षेत्रीय कार्यालय येथे तीव्र आंदोलन करावे लागले. या आंदोलनादरम्यान प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी प्रतीकात्मक स्वरूपात अनधिकृत टपऱ्या व हातगाडे आम्ही आणले होते.प्रभागातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या आंदोलनाला जोरदार पाठिंबा दिला.अतिक्रमणावर तातडीने कारवाई न झाल्यास कोथरूड-बावधन क्षेत्रीय कार्यालयाला कुलूप लावून कामकाज ठप्प करण्यात येईल,असा इशारा देण्यात आल्यानंतर प्रशासनही सतर्क झाले आहे.सहाय्यक आयुक्त जाधव यांनी तात्काळ दखल घेत बांधकाम विभागासह संबंधित सर्व विभागांची बैठक बोलावली असून, पुढील ७ दिवसांत अतिक्रमण,अनधिकृत टपऱ्या,हातगाडे, अंडा-भुर्जी गाड्या तसेच आर.एम.सी.प्लांट हटविण्याची कार्यवाही केली जाईल,असे आश्वासन दिले आहे.नागरिकांच्या हक्कांसाठी उभे राहणारे हे आंदोलन निर्णायक ठरणार असल्याची भावना प्रभागात व्यक्त होत आहे असाही दावा दगडे पाटलांनी केला आहे.

सिमेंटच्या पलीकडील पायाभूत बांधणी: पाटसची एक कहाणी

0

ऑगस्ट 2024 पासून अवघ्या दीड वर्षांच्या कालावधीत, अदाणी पेन्ना सिमेंटने पाटस ग्रामपंचायतीसोबत केलेल्या सहकार्यामुळे आसपासच्या गावांतील दैनंदिन जीवनात शांतपणे पण ठोस बदल घडवून आणला आहे. काही लक्ष केंद्रित उपक्रमांपासून सुरू झालेला हा प्रवास आज भागीदारी, विश्वास आणि तळागाळातील प्रभाव यांची व्यापक कहाणी बनला आहे.

या प्रयत्नांच्या केंद्रस्थानी एक साधा विश्वास आहे—पायाभूत सुविधा म्हणजे फक्त संरचना उभारणे नव्हे, तर समुदायांना सक्षम बनवणे होय.

या प्रवासाची सुरुवात कांगाव गावात ग्रामपंचायतीची दीर्घकालीन मागणी असलेल्या समुदाय भवनाच्या उभारणीने झाली, ज्यासाठी एकूण ₹17 लाखांचा खर्च करण्यात आला. ही फक्त एक भौतिक जागा नसून—समारंभ, चर्चा आणि सामूहिक निर्णय प्रक्रियेसाठी एक समान व्यासपीठ बनली असून, गावाच्या सामाजिक संरचनेला बळकटी देत आहे.

पर्यावरणीय जबाबदारीची जाणीव ठेवून, चालू आर्थिक वर्षात सिमेंट प्रकल्पाच्या टीमने स्थानिक हितधारकांच्या सूचनांच्या आधारे भीमा नदीकाठ आणि घाट सुधारणा कामे हाती घेतली आहेत. सुमारे ₹60 लाखांच्या या उपक्रमामुळे नदीकाठाची उपलब्धता वाढेल तसेच सुरक्षित आणि शाश्वत वापरासही चालना मिळेल.

शिक्षण आणि सुरक्षितता हे हस्तक्षेपाचे मुख्य आधारस्तंभ मानून, येडे बस्ती शाळेत सुरक्षित आणि सक्षम शिक्षण वातावरण निर्माण करण्यावर भर देण्यात आला. येथे कंपाउंड वॉल उभारण्यात आली तसेच शैक्षणिक भित्तीचित्रे तयार करण्यात आली—ज्यामुळे शाळाच एक सजीव शिक्षण साधन बनली आहे. यासोबतच पिण्याचे पाणी आणि मूलभूत सुविधांसाठी सातत्याने प्रयत्न सुरू आहेत.

शिक्षणासाठी आणखी एक पाऊल पुढे टाकत, बेटवाडी शाळेला 40 हून अधिक बाके आणि टेबल्स देण्यात आली, ज्यामुळे विद्यार्थ्यांना सन्मानपूर्वक आणि सोयीस्कर वातावरणात शिक्षण घेता येईल—जे ग्रामीण भागात अत्यंत महत्त्वाचे आणि परिवर्तन घडवणारे ठरते.

नवीनगर येथील आणखी एका शाळेत शाळेचा प्रवेशद्वार (गेट) इत्यादी सुधारणा कामे करण्यात आली आहेत. अदाणी फाउंडेशन आणि ग्रामपंचायत यांचे हे सहकार्य पुढील काळात सुरक्षित पिण्याचे पाणी, सुरक्षा कॅमेरे बसविणे आणि एकूणच पायाभूत सुविधा उन्नतीकरण यासाठी सक्षम ठरणार आहे. या प्रयत्नांमुळे केवळ स्वच्छता आणि सुरक्षितता सुधारली नाही, तर विद्यार्थी, पालक आणि शिक्षक यांच्यात विश्वासही दृढ झाला आहे.

प्रकल्पांपासून उद्दिष्टाकडे

या सर्व उपक्रमांमध्ये विशेष ठळक बाब म्हणजे केवळ विविधता नव्हे, तर कार्यपद्धती—समुदायासाठी नव्हे तर ग्रामपंचायतीसोबत मिळून काम करणे. प्रत्येक उपक्रम स्थानिक गरजांवर आधारित असून संवादातून आकार घेतो आणि जबाबदारीने पूर्ण केला जातो.

अनेक दृष्टींनी पाहता, ही एक व्यापक तत्त्वज्ञानाची झलक आहे—जिथे विकास केवळ प्रमाणावर नाही, तर लोकांच्या दैनंदिन जीवनावर होणाऱ्या परिणामांच्या खोलीवर मोजला जातो.

कारण कधी कधी, सर्वात मजबूत पाया तो नसतो जो आपण सिमेंटमध्ये बांधतो—तर तो असतो जो आपण समुदायांमध्ये घडवतो.

कोकणातील कातळशिल्पांवर आंतरराष्ट्रीय दर्जाचा माहितीपट तयार करण्यास मान्यता- मंत्री ॲड.आशिष शेलार

मुंबई, दि. ८ : कोकणातील रत्नागिरी विभागातील कातळशिल्पांवर आंतरराष्ट्रीय दर्जाचा माहितीपट तयार करण्यास प्रशासकीय मान्यता देण्यात आली असल्याची माहिती सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड.आशिष शेलार यांनी दिली.

महाराष्ट्र शासनाच्या पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागामार्फत या महत्त्वाकांक्षी प्रकल्पासाठी सुमारे १४.५० कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. रत्नागिरी परिसरातील सुमारे ३०० कि.मी. लांबीच्या किनारपट्टीपैकी २५ कि.मी. क्षेत्रात २००० हून अधिक कातळशिल्पे आढळून आली आहेत. या कातळशिल्पांमुळे प्रागैतिहासिक मानवजीवन, संस्कृती व परंपरांचा अमूल्य वारसा उलगडण्यास मदत होते. या पार्श्वभूमीवर त्यांच्या ऐतिहासिक, सांस्कृतिक व वैज्ञानिक महत्त्वाचे जागतिक स्तरावर दस्तऐवजीकरण करण्याचा शासनाचा हा महत्त्वाचा उपक्रम असल्याचे मंत्री ॲड.शेलार यांनी सांगितले.

माहितीपट निर्मितीसाठी दिग्दर्शक व सहाय्यक दिग्दर्शकांची नियुक्ती, सर्वेक्षण, अत्याधुनिक उपकरणे, वाहतूक व निवास व्यवस्था, तसेच स्टुडिओमधील एडिटिंग, साउंड आणि व्हिज्युअल इफेक्ट्स आदी कामांसाठी निधी मंजूर करण्यात आला आहे. याशिवाय ड्रोन फुटेज, सिनेमॅटिक शॉट्स, उच्च-गुणवत्तेचे छायाचित्रण आणि ‘बिहाइंड द सीन’ (BTS) सामग्री तयार करण्यावर विशेष भर दिला जाणार आहे.

या प्रकल्पातून मिळणाऱ्या दृश्यसामग्रीच्या आधारे सोशल मीडियासाठी स्वतंत्र कंटेंट तयार करण्यात येणार असून, कातळशिल्पांच्या वैभवाचे दर्शन घडविणारा एव्ही कंटेंट बँकही उभारण्यात येणार आहे. यासाठी आंतरराष्ट्रीय दर्जाच्या दिग्दर्शकांची निवड करून शासन निर्णयानुसार करार करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.

कातळशिल्पांचे विविध ऋतूंमध्ये, प्रकाशछटांमध्ये आणि स्थानिक लोकजीवनाशी असलेले नाते सांगणारे चित्रीकरण करण्यात येणार असून हा माहितीपट युनेस्कोच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार तयार होणार असून प्रकल्पाची जबाबदारी पुरातत्त्व व वस्तुसंग्रहालय संचालनालयाकडे सोपविण्यात आली आहे.

या निर्णयामुळे कोकणातील कातळशिल्पांना आंतरराष्ट्रीय स्तरावर ओळख मिळण्यास मदत होईल तसेच पर्यटनवाढीस चालना मिळेल, असा विश्वास मंत्री ॲड.शेलार यांनी व्यक्त केला आहे.

प्रगत इंटरकनेक्टिव्हिटी आणि बँडविड्थ वाढविण्याची क्षमता शासनासाठी उपयुक्त ठरणार -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

इक्विनिक्स एमबी ३ डेटा सेंटरचे उद्घाटन

मुंबई, दि. ८: विविध शासकीय योजनांच्या ऑनलाईन अंमलबजावणीदरम्यान बँडविड्थची कमतरता ही मोठी अडचण ठरत होती. विशेषतः शेतकऱ्यांसाठी ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरू केल्यावर अचानक वाढणाऱ्या इंटरनेट ट्रॅफिकमुळे प्रणाली कोलमडण्याची समस्या निर्माण होण्याची शक्यता असायची. अशा परिस्थितीत डेटा सेंटरमधील प्रगत इंटरकनेक्टिव्हिटी आणि तत्काळ बँडविड्थ वाढविण्याची क्षमता शासनासाठी अत्यंत उपयुक्त ठरणार आहे, असे  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.मुख्यमंत्री फडणवीस हस्ते वर्षा निवासस्थानी इक्विनिक्स (Equinix) कंपनीच्या एमबी ३ डेटा सेंटरचे उद्घाटन करण्यात आले. त्यावेळी मुख्यमंत्री फडणवीस बोलत होते. यावेळी उद्योग विभागाचे प्रधान सचिव पी.अन्बळगन, मुख्य आर्थिक सल्लागार कौस्तुभ धवसे तसेच एपीएसी (APAC) चे अध्यक्ष सायरस अडग्रा, इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक मनोज पॉल, व्ही.पी. ग्रोथ अँड इमर्जिंग मार्केटचे मॅक्स पॅरी, आयबीएक्सचे वरिष्ठ संचालक गणेश पवार, पब्लिक पॉलिसी अँड गव्हर्नन्सच्या संचालक एलिजाबेथ हर्नांडेझ उपस्थित होते.

इक्विनिक्स एमबी ३ डेटा सेंटर

इक्विनिक्स ही जगातील सर्वात मोठी डेटा सेंटर आणि इंटरकनेक्शन सेवा देणारी कंपनी असून, ३६ देशांतील ७७ महानगरांमध्ये २८० डेटा सेंटर्सचे जाळे कंपनीकडे आहे. भारतातील इक्विनिक्सचे पूर्णतः स्वतःच्या मालकीचे आणि नव्याने उभारलेले एमबी ३ हे पहिले डेटा सेंटर आहे.  या प्रकल्पासाठी सुमारे ३.७ एकर जागेवर उभारणी करण्यात आली असून, एकूण गुंतवणूक सुमारे ७५० दशलक्ष अमेरिकन डॉलर (सुमारे ६,००० कोटी रुपये) इतकी आहे. पूर्ण क्षमतेने कार्यान्वित झाल्यानंतर येथे ४,२०० हून अधिक कॅबिनेट्सची क्षमता उपलब्ध होणार आहे. एमबी ३ डेटा सेंटर अत्याधुनिक तंत्रज्ञानाने सुसज्ज असून, कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आधारित सेवांसाठी सक्षम आहे. तसेच, हायब्रिड मल्टी-क्लाउड इंटरकनेक्शन सुविधेद्वारे जगभरातील इक्विनिक्सच्या डेटा सेंटर्सशी तसेच ११ हजाराहून अधिक ग्राहकांशी जोडणी शक्य होणार आहे.

ऊर्जा शाश्वततेच्या दृष्टीने यवतमाळ येथे उभारण्यात आलेल्या २६.६ मेगावॅट क्षमतेच्या सौर प्रकल्पातून या डेटा सेंटरसाठी आवश्यक ऊर्जेचा मोठा भाग उपलब्ध करून देण्यात येत आहे. सध्या मुंबईतील इक्विनिक्स डेटा सेंटर्समध्ये वापरल्या जाणाऱ्या उर्जेपैकी सुमारे ६० टक्के ऊर्जा या सौर प्रकल्पातून मिळते.

कर्करोग उपचार क्षेत्रात बीव्हीजी लाइफ सायन्सेसचे आशादायी संशोधन : ‘संयुग ७’ची प्रभावी कामगिरी – डॉ. श्रीकांत माने

पुणे : कर्करोगावर अधिक परिणामकारक आणि कमी दुष्परिणाम असलेले उपचार विकसित करण्याच्या दिशेने बीव्हीजी लाइफ सायन्सेस लिमिटेडने महत्त्वपूर्ण पाऊल उचलले असून ‘संयुग ७’ या नव्या फायटो-औषध आधारित संयुगाने कर्करोगाविरुद्धच्या लढ्यात आशादायी परिणाम दर्शवले आहेत.

जनुकशास्त्र आणि अचूक उपचारपद्धती क्षेत्रातील आंतरराष्ट्रीय कीर्तीचे तज्ज्ञ, येल विद्यापीठ (अमेरिका) येथील प्राध्यापक डॉ. श्रीकांत माने यांनी या संयुगाच्या कार्यक्षमतेबाबत माहिती दिली. ते यशदा, पुणे येथे आयोजित कर्करोग विषयक विशेष शास्त्रीय कार्यक्रमात प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते. हा कार्यक्रम बीव्हीजी लाइफ सायन्सेस लिमिटेड आणि श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आला होता.

या कार्यक्रमास बीव्हीजी समूहाचे संस्थापक हणमंतराव गायकवाड, ट्रस्टचे अध्यक्ष सुनील रासने, बीव्हीजी लाइफ सायन्सेसच्या संचालिका डॉ. जयश्री द्रविड यांच्यासह प्रख्यात गॅस्ट्रोएन्टेरोलॉजिस्ट डॉ. विनय थोरात, युरोलॉजिस्ट डॉ. सुरेश पाटणकर आणि विविध वैद्यकीय महाविद्यालयांचे विभागप्रमुख उपस्थित होते. डॉ. प्रतापराव गोळे हे खास साताऱ्यावरून या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिले. एकूण २५० डॉक्टरांनी या कार्यक्रमात सहभाग नोंदवला.

डॉ. माने यांनी सांगितले की, ‘संयुग ७’ कर्करोग पेशींची वाढ रोखते, त्यांच्या हालचालींवर नियंत्रण ठेवते आणि त्यांचा शरीरातील इतर भागांमध्ये प्रसार (मेटास्टेसिस) होण्यास प्रतिबंध करते. तसेच, हे संयुग शरीराच्या रोगप्रतिकारक शक्तीला बळकटी देत कर्करोगविरोधी लढा अधिक प्रभावी बनवते. प्राथमिक निष्कर्षांनुसार, हे संयुग कर्करोग पेशींवर प्रभावीपणे परिणाम करते, तर सामान्य पेशींवर त्याचा अत्यल्प किंवा नगण्य परिणाम आढळतो.

या संशोधनातून ‘संयुग ७’ कर्करोगाच्या वाढीशी संबंधित विविध जैविक प्रक्रियांवर प्रभाव टाकत असल्याचेही स्पष्ट झाले आहे. त्यामुळे सुरक्षित, लक्ष्यित आणि अधिक प्रभावी उपचार विकसित करण्याच्या दृष्टीने हे महत्त्वाचे पाऊल ठरू शकते.

यावेळी हणमंतराव गायकवाड यांनी सांगितले की, बीव्हीजी लाइफ सायन्सेस गेल्या दशकभरापासून फायटो-औषध संशोधन क्षेत्रात कार्यरत असून सातत्यपूर्ण प्रयत्नांतून कर्करोगासह इतर अनेक आजारांवर प्रभावी औषधे विकसित करण्यात यश मिळाले आहे. या संशोधनामुळे देशातील कर्करोग रुग्णांना नवी आशा मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बीव्हीजी वेलनेस ओपीडीच्या सल्लागार डॉ. अर्चना शिंदे यांनी केले. संशोधन व विकास उपक्रमांची माहिती विल्यम रणनवरे यांनी दिली, तर डॉ. जयश्री द्रविड यांनी काही महत्त्वपूर्ण केस स्टडीज सादर केल्या.

उपस्थित सर्व डॉक्टरांनी यकृत, हृदय, मधुमेह आणि पार्किन्सन यांसारख्या विविध आजारांवरील बीव्हीजीच्या संशोधनाधारित औषधांचे कौतुक केले. तथापि, कार्यक्रमाचा मुख्य भर कर्करोग उपचारावर होता.

हिमंता बिस्वा सरमा यांच्या वक्तव्याच्या निषेधार्थ युवक काँग्रेसची निदर्शने

पुणे, दि. ८ एप्रिल २०२६ — भारतीय जनता पक्षाचे आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी काँग्रेस अध्यक्ष तथा देशातील वरिष्ठ दलित नेते मल्लिकार्जुन खर्गे यांच्याविषयी केलेल्या अत्यंत अपमानजनक व असंवेदनशील वक्तव्याच्या निषेधार्थ महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस व पुणे शहर युवक काँग्रेसच्या वतीने आज स्वारगेट चौक येथे तीव्र आंदोलन करण्यात आले.

या आंदोलनामध्ये युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवत “संविधान बचाव”, “दलितांचा अपमान सहन करणार नाही” अशा जोरदार घोषणा दिल्या. आंदोलनादरम्यान हिमंता बिस्वा सरमा यांच्या वक्तव्याचा निषेध म्हणून प्रतीकात्मक “जोडे मारो” आंदोलन करण्यात आले तसेच त्यांच्या पुतळ्याचे दहन करण्याचा प्रयत्न करण्यात आला.
या वेळी परिस्थिती तणावपूर्ण बनल्याने पोलिस प्रशासनाने तात्काळ हस्तक्षेप करत प्रतिबंधात्मक कारवाई केली आणि आंदोलनात सहभागी झालेल्या युवक काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांना व कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले.
युवक काँग्रेसच्या वतीने स्पष्ट करण्यात आले की, हिमंता बिस्वा सरमा यांनी केलेले वक्तव्य हे केवळ एका व्यक्तीवर केलेला अपमान नसून संपूर्ण दलित समाजाच्या स्वाभिमानावर झालेला थेट आघात आहे. भाजप व RSS च्या मनुवादी आणि प्रतिगामी विचारसरणीचे हे जिवंत उदाहरण असून अशा वक्तव्यांमुळे समाजात द्वेष आणि विषमता पसरवण्याचा प्रयत्न केला जात आहे.
तसेच, अखिल भारतीय काँग्रेसचे प्रवक्ते पवन खेडा यांना बेकायदेशीररीत्या राज्याबाहेर नेऊन अटक करण्याचा प्रयत्न हा लोकशाही मूल्यांवर गंभीर आघात असून, विरोधकांचा आवाज दडपण्याचा हा प्रकार असल्याचेही युवक काँग्रेसने नमूद केले.

युवक काँग्रेसने इशारा दिला आहे की, दलित समाजाचा अपमान आणि लोकशाहीविरोधी कृत्ये सहन केली जाणार नाहीत. अशा घटनांविरोधात आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल.

देशातील सर्वात जेष्ठ दलित नेत्याच्या बद्दल भाजपा मुख्यमंत्री हेमंता बिस्वसरमा यांनी केलेली टिप्पणी ही भाजपा संस्कृती दाखवते, मुख्य भ्रष्टाचाराच्या विषयाला बगल देत दुर्लक्षित करण्याचा प्रयत्न केला आहे असा सवाल यावेळी पुणे शहर युवक काँग्रेसचे अध्यक्ष मा सौरभ अमराळे यांनी केला.

यावेळी महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष मा. प्रथमेश अबनावे, पुणे शहर युवक काँग्रेसचे अध्यक्ष मा सौरभ अमराळे, प्रदेश महासचिव महेश म्हेत्रे, प्रदेश महासचिव दिलीपसिंह देशमुख,भूषण रानभरे, प्रदेश सचिव निखिल मलके,विश्वजित जाधव, प्रदिप मेहकरे, अविनाश साळुंखे, अर्थव सोनार, पुणे शहर युवक काँग्रेस अभिजित चव्हाण उपाध्यक्ष सद्दाम शेख, कुणाल काळे, पर्वती विधानसभा मतदारसंघ अध्यक्ष पुष्कर आबनावे, शिवाजीनगर विधानसभा युवक काँग्रेस अध्यक्ष विक्रांत धोत्रे, रेहान बाबुर्डे, हर्षद हांडे, यश कोलते पाटील, सागर धावडे, विशाल कामेकर, पुणे जिल्हा युवक काँग्रेस सचिव भूषण पाटोदकर व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

महाराणी ताराराणी या छत्रपती शिवाजी महाराजांच्या नंतरच्या उत्तम महिला प्रशासक- शरद पवार

पुणे दि ८ एप्रिल: संधी मिळाली तर कोठल्याही क्षेत्रात जाऊन सोने करण्याची महिलांची क्षमता आहे. त्या कुठेही पुरुषांपेक्षा कमी नाही. याचा अनुभव मी वेळोवेळी घेतला आहे. म्हणूनच राज्य कारभार असो कि प्रशासन, साहित्य, कला , संस्कृती आणि लष्करातही महिलांची कामगिरी हि देशाला अभिमान वाटावी अशीच आहे. असे उदगार देशाचे माजी कृषी मंत्री तसेच राज्यसभा खासदार शरद पवार यांनी ११ व १२ एप्रिल २०२६ रोजी दिल्ली येथे होणाऱ्या पहिल्या महिला शासकीय अधिकाऱ्यांच्या मराठी साहित्य संमेलनाच्या संकेतस्थळाचे अनावरण करताना काढले. या प्रसंगी संयोजन समितीतील डॉ. शैलेश पगारिया, शैलेश वाडेकर, अनुज नहार, कविता वानखेडे, निर्मला नलावडे, डॉ. संगीता शिंदे, मनीषा वाडेकर, सुजाता गोळे, गीता खोत, पल्लवी पासलकर, सोनाली निवंगुणे, निलेश भिंगारे, हर्षवर्धन पासलकर, प्रीतम पानसरे, अवेस शेख आणि सरहद संस्थेचे अध्यक्ष संजय नहार तसेच लक्ष्मीकांत खाबिया उपस्थित होते

https://sahityasammelan.sarhad.in/ या संकेतस्थळाचे अनावरण करून हे साहित्य रसिकांसाठी खुले करण्यात आले. या संकेत स्थळावर दिल्लीला होणाऱ्या कार्यक्रमांची माहिती उपलब्ध असणार आहे.

आज देशात छत्रपती घराण्याचा मोठा सन्मान आहे. त्याच घराण्याच्या छत्रपती महाराणी ताराराणी यांच्या ३५१ व्या जयंती वर्षानिमित्त त्यांना अभिवादन करण्यासाठी सरहद संस्थेच्या पुढाकाराने होणारे हे शासकीय तसेच प्रशासकीय महिलांचे साहित्य संमेलन पुढच्या पिढ्यांना प्रेरणादायी ठरेल याबद्दल माझ्या मनात शंका नाही. महाराणी ताराराणी या छत्रपती शिवाजी महाराजांच्या नंतरच्या उत्तम महिला प्रशासक म्हणून त्यांची ख्याती आहे. त्यांच्या नावाने होणाऱ्या या संमेलनात त्यांच्या प्रशासकीय कौशल्याची आणि प्रतिकूल परिस्थितीत राज्यकारभार सांभाळण्याची हातोटी याची आठवण या निमित्ताने केली जाईल. हि महाराष्ट्रासाठी अभिमानास्पद बाब ठरणार आहे.

आता महिलांना संसदेत 33 टक्के आरक्षणाचे बिल येणार आहे. या संधीची सुरुवात मी मुख्यमंत्री असताना महाराष्ट्रातून केली आणि महिलांना संपत्तीत मिळणारा वाटा असो कि प्रशासकीय किंवा राजकीय नेतृत्व असो महिला कुठेही मागे नाही हे आता सिद्ध झाले आहे. हे धोरण आणणारे महाराष्ट्र हे पहिलेच राज्य आहे याचा मला अभिमान वाटतो. या धोरणानंतर महिला सर्वच क्षेत्रांमध्ये यशस्वीपणे नेतृत्व करताना दिसतात. म्हणूनच या शासकीय अधिकाऱ्यांच्या साहित्य संमेलनातून होणारे विचारमंथन समाजासाठी आणि देशासाठी अत्यंत महत्वाचे असणार आहे. या संमेलनाला माझ्या अंत करणपूर्वक शुभेच्छा.

MPSC राज्य सेवा 2024 चा अंतिम निकाल जाहीर: विजय लामकाने राज्यात प्रथम, तर आरती जाधव महिलांमध्ये पहिली

मुंबई–महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) राज्य सेवा मुख्य परीक्षा २०२४ चा बहुप्रतीक्षित अंतिम निकाल बुधवारी (८ एप्रिल २०२६) अधिकृतरीत्या जाहीर झाला आहे. यंदाच्या निकालात सोलापूर जिल्ह्याने राज्यात आपली निर्विवाद मोहोर उमटवली आहे. सोलापूरच्या विजय नागनाथ लामकाने याने सर्वसाधारण आणि मागासवर्गीय गटातून राज्यात पहिला क्रमांक पटकावला आहे. तर, महिला वर्गातून सोलापूरचीच आरती परमेश्वर जाधव हिने राज्यात प्रथम क्रमांक मिळवून जिल्ह्याच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला आहे.

विजय लामकाने याने राज्य सेवा मुख्य परीक्षेत ६२४ गुण मिळवत राज्याच्या गुणवत्ता यादीत अव्वल स्थान मिळवले. त्याला उपजिल्हाधिकारी हे प्रतिष्ठेचे पद मिळाले आहे. दुसरीकडे, आरती जाधव हिने ६०१ गुणांसह महिलांच्या गटातून राज्यात पहिला क्रमांक पटकावला आहे. ३१ ऑक्टोबर रोजी या परीक्षेचा निकाल जाहीर झाला होता, त्यानंतर आज मुलाखतीअंती आयोगाने अंतिम निकालाची अधिकृत घोषणा केली.

एमपीएससीतर्फे २७ ते २९ मे २०२५ या कालावधीत राज्य सेवा (मुख्य) परीक्षा-२०२४ चे आयोजन करण्यात आले होते. आयोगाच्या अधिकृत संकेतस्थळावर आज प्रसिद्ध करण्यात आलेल्या निकालानुसार एकूण २० विविध संवर्गांतील ४६१ पदांसाठी पात्र उमेदवारांची शिफारस करण्यात आली आहे. आयोगाने निकालासोबतच प्रत्येक प्रवर्गातील शिफारसपात्र शेवटच्या उमेदवाराचा ‘कट-ऑफ’ (सीमांकन गुण) देखील जाहीर केला आहे.
समांतर आरक्षणासह विविध मुद्द्यांवर न्यायालयात प्रलंबित असलेल्या प्रकरणांतील अंतिम निर्णयाच्या अधीन राहूनच हा निकाल जाहीर करण्यात आला आहे. तसेच दिव्यांग, अनाथ आणि खेळाडूंसाठीच्या आरक्षित पदांवरील शिफारशी सक्षम प्राधिकरणाच्या तपासणीनंतरच अंतिम मानल्या जातील, असे आयोगाने स्पष्ट केले आहे.

‘लव्ह जिहाद’ नंतर आता ‘कॉर्पोरेट जिहाद’:IT कंपन्यांत उच्चशिक्षित मुलींवर नियोजनबद्ध लैंगिक अत्याचार, गोपीचंद पडळकर यांचा दावा

पुणे-आयटी कंपन्यांमध्ये कार्यरत असणाऱ्या उच्चशिक्षित मुलींवर नियोजनबद्धपणे लैंगिक अत्याचार होत असल्याचा गंभीर आरोप भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी केला आहे. सध्या ‘लव्ह जिहाद’ सारखाच ‘कॉर्पोरेट जिहाद’ समोर आला आहे. त्यात आयटी कंपन्यांत कार्यरत असणाऱ्या उच्चशिक्षित मुलींना लक्ष्य करून त्यांच्यावर नियोजनबद्धपणे लैंगिक अत्याचार होत आहे. त्यामुळे मुलींनी सतर्कता बाळगणे गरजेचे आहे, असे ते म्हणालेत.

गोपीचंद पडळकर यांनी आज पुण्यात एका पत्रकार परिषदेला संबोधित केले. त्यात त्यांनी उपरोक्त खबळजनक आरोप केला. ते म्हणाले, नाशिक हे आयटी हब नसले तरी तिथे काही आयटी कंपन्या आहेत. पुणे हे मोठे आयटी हब आहे. आयटी कंपन्यांमध्ये काही गैरप्रकार घडत असल्यास संबंधित कंपनी अधिकाऱ्यांनी त्याची पडताळणी करणे आवश्यक आहे. नाशिक येथील एका कंपनीत एका तरुणाचा धर्मांतराचा प्रकारही समोर आला आहे.

नाशिकमधील एका नामांकित मल्टीनॅशनल कंपनीत मुलींना लक्ष्य करून त्यांचे लैंगिक शोषण केले जात असल्याचा दावाही पडळकर यांनी यावेळी केला. ते म्हणाले, सदर कंपनीत १३० कर्मचारी काम करतात. लैंगिक अत्याचारामुळे अनेक मुलींनी नोकऱ्या सोडल्या. पण त्यातील नऊ पीडित मुलींनी धाडस दाखवून पुढे येत पोलिसांकडे तक्रारी दाखल केल्या आहेत. मागील दोन ते तीन वर्षांपासून हा प्रकार सुरू असून हे प्रकरण अतिशय गंभीर आहे.

राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशाने भोंदू अशोक खरात प्रकरण बाहेर आले. त्यानंतर नाशिक पोलिसांनी आणखी एक प्रकरण शोधून काढले आहे. सरकारने या प्रकरणाच्या तपासासाठी एसआयटी (विशेष तपास पथक) नेमली आहे. कॉर्पोरेट कंपनीच्या संदर्भात टीम लीडर्सना टास्क ठरवून दिला जात असे. ते मुलींची मुलाखत घेऊन नोकरीसाठी शिफारस करत आणि त्यानंतर त्यांच्यावर दबाव टाकत. नोकरी कोणी लावली हे सांगणे, सुट्टी देण्यासाठी दबाव टाकणे, तसेच विविध रिसॉर्टमध्ये सुट्टीच्या दिवशी फिरावयास घेऊन जाणे असे प्रकार घडत होते.

इमॅजिका येथे कंपनीतील मुलींना फिरण्यास घेऊन जाण्याच्या बहाण्याने एका तरुणीला जाळ्यात ओढून तिच्यावर तिघांनी नियोजनबद्ध लैंगिक अत्याचार केल्याचा प्रकारही उघडकीस आला आहे. या प्रकरणात आरोपींवर मकोका कायद्यानुसार गुन्हा दाखल करावा, अशी मागणी आमदार गोपीचंद पडळकर यांनी केली.

करिअरची भीती दाखवून मॅनेजरकडून तरुणींचे लैंगिक शोषण:नाशिकच्या आयटी कंपनीतील 5 अधिकाऱ्यांना अटक

नाशिक-कॉर्पोरेट जगताची मान शरमेने खाली घालायला लावणारा एक संतापजनक प्रकार येथे उघडकीस आला आहे. नाशिकमधील एका नामांकित बहुराष्ट्रीय आयटी (IT) कंपनीत कामाला असलेल्या १८ ते २५ वयोगटातील तरुणींचे लैंगिक आणि मानसिक शोषण करण्यात आल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी मुंबई नाका पोलिस ठाण्यात आतापर्यंत ९ गुन्हे दाखल करण्यात आले असून, पोलिसांनी ६ आरोपींविरुद्ध कारवाई करत ५ जणांच्या मुसक्या आवळल्या आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित कंपनीतील टीम मॅनेजर आणि त्याच्या काही सहकाऱ्यांनी आपल्या पदाचा गैरवापर करून हा किळसवाणा प्रकार केला. करिअरमध्ये अडथळे आणण्याची किंवा नोकरीवरून काढून टाकण्याची भीती दाखवून या तरुणींना जाळ्यात ओढले जात होते. कामाच्या ठिकाणी महिलांच्या सुरक्षेसाठी असलेले नियम पायदळी तुडवत या तरुणींचा विनयभंग आणि मानसिक छळ करण्यात आला. धक्कादायक बाब म्हणजे, यामध्ये पीडितांच्या धार्मिक भावना दुखावल्याचेही गंभीर आरोप करण्यात आले आहेत.

या प्रकरणाचे गांभीर्य आणि व्याप्ती लक्षात घेता, नाशिक पोलिस आयुक्तांनी तातडीने संदीप मिटके यांच्या नेतृत्वाखाली विशेष तपास पथकाची (SIT) स्थापना केली आहे. प्राथमिक अंदाजानुसार, या शोषणाचे बळी ठरलेल्या मुलींची संख्या २० ते २५ च्या घरात असण्याची शक्यता आहे. याप्रकरणी एकूण ६ आरोपी निष्पन्न झाले असून, त्यात ५ पुरुष आणि एका महिलेचा समावेश आहे. पोलिसांनी ५ पुरुषांना अटक केली असून, एक महिला आरोपी अद्याप फरार आहे. अटक केलेल्या पाचही आरोपींना आज न्यायालयात हजर करण्यात आले आहे.नाशिक पोलिसांनी पीडित तरुणींना धीर देत आवाहन केले आहे की, अशा प्रकारच्या छळाला ज्या मुली बळी पडल्या असतील त्यांनी संकोच न बाळगता तक्रार करण्यासाठी पुढे यावे. तक्रारदार तरुणींची ओळख पूर्णपणे गुप्त ठेवली जाईल आणि त्यांना योग्य तो न्याय मिळवून दिला जाईल, अशी ग्वाही पोलिस प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

राष्ट्रवादीच्या पिंपरी चिंचवड शहर-जिल्हा निरीक्षकपदी सुनील माने

पुणे ता. ८ : राष्ट्रवादी कॉँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या पिंपरी चिंचवड शहर व जिल्हा निरीक्षक पदावर पक्षाचे प्रदेश सरचिटणीस व प्रवक्ते सुनील माने यांची नियुक्ती झाली आहे. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी याबाबत आज पत्र सुनील माने यांना मुंबई येथे दिले. यावेळी प्रदेश सरचिटणीस रवींद्र पवार उपस्थित होते.

पिंपरी चिंचवड शहर, तालुका व जिल्हयातील ग्रामीण प्रभाग व बूथ पातळीवर पक्षाचा आढावा घेणे, जिल्ह्यातील सर्व फ्रंटल व विभागाच्या संघटनेच्या पदावरील नियुकत्यांचा आढावा घेणे, संघटनात्मक मजबूती, कार्यकर्ता सक्रियता व बुथ समित्या कार्यान्वयित आहेत का याचा सातत्याने आढावा घेणे, पक्षशिस्त व संघटनेमध्ये एकसंघता ठेवण्यासाठी कार्यरत राहणे. कोणतीही गटबाजी, अनुशासन भंग, पक्षविरोधी वक्तव्य किंवा कृती आढळल्यास त्यावर तत्काळ हस्तक्षेप करून प्रदेश कार्यालयास अहवाल सादर करणे, स्थानिक प्रश्न, जनभावना व राजकीय परिस्थितीचा निष्पक्ष अहवाल सादर करणे, प्रदेश कार्यालयाकडून देण्यात येणारे विविध कार्यक्रम, आंदोलने याचा आढावा घेऊन त्याबाबत प्रदेश कार्यालयास कळवणे, निवडणूक पूर्वतयारी, संभाव्य उमेदवारांचे मूल्यमापन, स्थानिक परिस्थिती लक्षात घेऊन संघटनात्मक रणनिती सुचवणे, मासिक प्रगती अहवाल नियमितपणे प्रदेश कार्यालयास सादर करणे, जिल्हा संघटना वरिष्ठ नेतृत्व यांच्यात समन्वय साधने आदि जबाबदऱ्या निरीक्षक म्हणून सुनील माने यांना सांभाळाव्या लागणार आहेत.

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता सप्ताहाचा शुभारंभ

पुणे विभागात विविध कार्यक्रमाचे आयोजन; अधिकाधिक नागरिकांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा-प्रादेशिक उपायुक्त वंदना कोचुरे

पुणे, दि. ८: सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्यावतीने ८ एप्रिल ते १४ एप्रिल २०२६ या कालावधीत ‘भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता सप्ताहानिमित्त पुणे विभागातील पुणे, सातारा,सोलापूर, कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यात विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे, या कार्यक्रमाचा अधिकाधिक नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन समाज कल्याण विभागाच्या प्रादेशिक उपायुक्त वंदना कोचुरे यांनी केले आहे.

प्रादेशिक कार्यालयात प्रादेशिक उपायुक्त वंदना कोचुरे यांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून सप्ताहाचा शुभारंभ झाला. यावेळी सहायक संचालक (वित्त व लेखा) अनिल गिते , सहायक आयुक्त विशाल लोंढे, माधुरी वाघमोडे, ज्ञानेश्वर जावळे, समाज कल्याण अधिकारी उपस्थित होते. यावेळी आयोजित पत्रकार परिषदेत सप्ताहाची माहिती देण्यासोबतच भारतीय संविधानाच्या उद्देशिकेचे वाटप करण्यात आले.

या सप्ताहाच्या माध्यमातून सामाजिक समता, महापुरुषांचे विचार आणि शासकीय योजना तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचवल्या जाणार आहेत. या सप्ताहाच्या नियोजनाबाबत पुणे व‍िभागातील जिल्हा स्तरावर शहरी व ग्रामिण भागात सहाय्यक आयुक्त समाज कल्‍याण पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, व कोल्‍हापूर या कार्यालयाने आपापल्या कार्यक्षेत्रात जय्यत तयारी केली असून, या सात दिवसांत खालीलप्रमाणे विशेष कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे.

दिनांक ९ एप्रिल रोजी युवा संवाद कार्यक्रमाअंतर्गत महाविद्यालये व शासकीय वसतिगृहांमध्ये महाड चवदार तळे सत्याग्रह शताब्दी वर्ष, संत गाडगे महाराज यांची १५० वी जयंती आणि आंबेडकरी विचार या विषयांवर व्याख्याने व वक्तृत्व स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे.

दिनांक १० एप्रिल रोजी योजना प्रबोधन कार्यक्रमाअंतर्गत समता दूतांमार्फत पथनाट्ये व लघुनाटिका सादर करून शासकीय योजनांचे प्रबोधन करण्यात येणार आहे. तसेच ‘मार्जिन मनी’ योजनेच्या लाभार्थ्यांसाठी विशेष कार्यशाळेचे आयोजन करण्यात येणार आहे.

दिनांक ११ एप्रिल रोजी महात्मा फुले जयंतीनिमित्त महात्मा ज्योतिबा फुले यांच्या द्विशताब्दी जयंतीनिमित्त त्यांच्या सामाजिक कार्यावर आधारित विविध गौरवपर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे.

दिनांक १२ एप्रिल रोजी संविधान जागर व महिला मेळाव्याअंतर्गत संविधानातील मूलभूत अधिकार व कर्तव्यांवर व्याख्याने आयोजित केली असून, महिलांच्या सक्षमीकरणासाठी विशेष महिला मेळावा घेण्यात येणार आहे.

दिनांक १३ एप्रिल २०२६ रोजी सामाजिक बांधिलकी उपक्रमाअंतर्गत ज्येष्ठ नागरिक मेळावा, रक्तदान शिबीर आणि स्वच्छता अभियानाद्वारे सामाजिक सेवेचे व्रत जोपासले जाईल. तसेच कोल्‍हापूर औद्योगिक संस्‍था मार्गदर्शनपर कार्यशाळा आयोजि‍त केली जाईल

दिनांक १४ एप्रिल रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करून जयंती साजरी केली जाणार असून व्याख्याने आणि चर्चासत्रांनंतर या सामाजिक समता सप्ताहाचा समारोप होणार आहे.