Home Blog Page 99

पुणे पोलीस दलात १७६६ जागांवर भरती सुरु, अर्ज आले १ लाख ३९ हजार

पुणे-
पुणे शहर पोलीस दलात १६३३ + १३० पदांसाठीची भरती प्रक्रिया १६ फेब्रुवारी २०२६ पासून सुरू झाली असून या भरतीसाठी १,३९,००० उमेदवारांनी अर्ज केले आहेत.
या भरतीत पोलीस मुख्यालय, शिवाजीनगर येथे सुरु असलेल्या पोलीस शिपाई भरतीमध्ये महिला उमेदवारांची शारिरीक व मैदानी चाचणी १६ फेब्रुवारी २०२६ पासून सुरु झालेली आहे. त्यामध्ये भरती प्रक्रियेमध्ये सहभागी होणा-या महिला उमेदवारांपैकी लहान बाळ सोबत असणा-या महिला उमेदवारांची शारिरीक व मैदानी चाचणी प्रथम प्राधान्य देवून लवकरात लवकर प्रक्रिया पूर्ण करण्याची व्यवस्था केलेली आहे.असे अपर पोलीस आयुक्त (प्रशासन) संजय पाटील यांनी कळविले आहे.

गतिमान विकासाद्वारे पुणे कोंडीमुक्त ,प्रदूषण मुक्त पुणे करण्याचा निर्धार

पुणे- शहरातील शहरी गतिशीलता सुधारण्यासाठी अल्पकालीन उपाय, बिग डेटा वापर, स्वच्छ हवा व TOD आधारित सर्वसमावेशक धोरणावर भर देऊन पुणे कोंडीमुक्त ,प्रदूषण मुक्त पुणे करण्याचा निर्धार आज येथे व्यक्त करण्यात आला .दिनांक १७ फेब्रुवारी २०२६ रोजी पुणे शहरातील Urban Mobility (शहरी गतिशीलता) या अत्यंत महत्त्वाच्या विषयावर एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन बालगंधर्व रंगमंदिर येथे करण्यात आले. ही कार्यशाळा पुणे महानगरपालिकेचे आयुक्त श्री नवल किशोर राम यांच्या आदेशानुसार घेण्यात आली असून पुणे महानगरपालिकेतील विविध विभागांचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या कार्यशाळेला महापौर मनीषा नागपुरे, उपमहापौर, सभागृह नेते श्री गणेश बिडकर तसेच विरोधी पक्षनेते श्री निलेश निकम यांनी उपस्थिती दर्शवून आपले मनोगत व्यक्त केले. त्यांनी येत्या काळात पुणे शहरातील नागरिकांचा प्रवास अधिक सुरक्षित, जलद व सुलभ करण्यासाठी प्रशासनाने ठोस पावले उचलावीत, असा आग्रह धरला.

पुणे महानगरपालिकेचे आयुक्त यांनी सांगितले की, सन २०२६ साठी रस्ते विकास व वाहतूक सुधारणा यासाठी पुणे महानगरपालिका इतर शासकीय विभागांसोबत समन्वयाने काम करणार आहे. वाहतूक व्यवस्थापन अधिक प्रभावी करण्यासाठी वाहतुकीशी संबंधित बिग डेटा (Big Data) चा वापर करून ट्रॅफिक पॅटर्न, गर्दीची ठिकाणे आणि समस्या ओळखून उपाययोजना केल्या जातील. तसेच भविष्यातील भांडवली खर्चिक (capital intensive) प्रकल्प रणनीतीपूर्वक व दीर्घकालीन दृष्टीने राबविण्याची आवश्यकता असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

कार्यशाळेत शहर अभियंता अनिरुद्ध पावसकर यांनी येत्या वर्षात व पुढील काळात पुण्यातील वाहतूक परिस्थिती सुधारण्यासाठी करण्यात येणाऱ्या उपाययोजनांबाबत सविस्तर सादरीकरण केले. तसेच मुख्य अभियंता राजेश बनकर आणि प्रकल्प विभागाचे मुख्य अभियंता दिनकर गोजारे यांनी एका वर्षाच्या कालावधीत राबविण्यात येणाऱ्या उपयोजनांची माहिती दिली.

यावेळी पोलीस अतिरिक्त आयुक्त मनोज पाटील यांनी वाहतूक शिस्त, अंमलबजावणी आणि तंत्रज्ञानाच्या वापराबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. तसेच आयआयटीएम (IITM) संस्थेच्या प्रतिनिधींनी पुणे शहरातील हवेच्या गुणवत्तेबाबत (Air Quality) महत्त्वपूर्ण माहिती सादर केली.

कार्यशाळेमध्ये स्वच्छ हवा (Clean Air) या विषयाचे विशेष महत्त्व अधोरेखित करण्यात आले. खासगी वाहनांचा वापर कमी करून सार्वजनिक वाहतूक, बस व मेट्रोचा वापर वाढविल्यास उत्सर्जन व प्रदूषणात लक्षणीय घट होऊ शकते, यावर सखोल चर्चा झाली. यासोबतच पुणे शहरात जे. एम. रोड, एफ. सी. रोड यांसारखे अधिक रस्ते पादचारी, सायकलस्वार आणि सार्वजनिक जीवनासाठी अनुकूल ‘स्ट्रीट्स’ म्हणून विकसित करण्याची गरज व्यक्त करण्यात आली.

दुपारच्या सत्रामध्ये विविध राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय संस्थांच्या तज्ज्ञांनी शहरी वाहतूक व्यवस्थेतील सर्वोत्तम पद्धती (best practices) मांडल्या. सेंट्रल रोड रिसर्च इन्स्टिट्यूट (CRRI), Oasis Designs, Design Point (अहमदाबाद), तसेच RKD संस्थेच्या प्रतिनिधींनी अंमलबजावणीयोग्य उपाययोजनांबाबत आपले अनुभव सादर केले.

याच सत्रामध्ये नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ अर्बन अफेअर्स (NIUA), नवी दिल्ली या संस्थेमार्फत UrbanShift उपक्रमांतर्गत पुणे महानगरपालिकेसोबत Transit Oriented Development (TOD) संदर्भात सुरू असलेल्या कामाची माहिती देण्यात आली. TOD साठी मार्गदर्शक तत्त्वे (Guidelines) विकसित करणे, स्टेशन एरिया प्लॅन तयार करणे आणि शिवाजीनगर मेट्रो स्टेशन परिसरात पायलट प्रकल्प राबविणे हे या उपक्रमाचे मुख्य उद्दिष्ट असल्याचे सांगण्यात आले.

याच अनुषंगाने वाहतूक नियोजक निखिल मिजार यांनी TOD या विषयावर पुण्यातील प्रतिष्ठित बांधकाम व्यावसायिक व वास्तुविशारदांसोबत संवाद साधला. या चर्चेमध्ये मेट्रो स्टेशनच्या परिसरातील विकास व विशेषतः पुनर्विकास (Redevelopment) या विषयांवर सविस्तर विचारमंथन करण्यात आले. या संवादात CREDAI, MBVA, NAREDCO, AESA तसेच IIA या संस्थांचे तज्ज्ञ सहभागी झाले असून, खासगी क्षेत्राच्या दृष्टीकोनातून TOD अंमलबजावणीसाठी उपयुक्त सूचना मांडण्यात आल्या.

या कार्यशाळेदरम्यान विविध हितधारकांनी (stakeholders) मांडलेल्या सूचना व कल्पना नोंदविण्यात आल्या असून त्या स्टेशन एरिया मोबिलिटी प्लॅनमध्ये समाविष्ट करण्यात येणार आहेत.

तसेच पुणे महानगरपालिकेसोबत जवळून काम करणाऱ्या विविध संस्थांच्या प्रतिनिधींनी आणि Global Traffic Solutions संस्थेचे श्री प्रताप भोसले यांनीही प्रत्यक्ष अंमलबजावणीयोग्य उपायांवर सादरीकरण केले.

संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मुख्य अभियंता (प्रकल्प) दिनकर गुजारे आणि वाहतूक नियोजक निखिल मिजार यांनी केले.

अशा स्वरूपाच्या कार्यशाळा प्रत्येक विभागाने नियमितपणे आयोजित कराव्यात तसेच पुणे महानगरपालिकेतील सर्व अभियंत्यांनी या कार्यशाळेचा लाभ घेऊन येणाऱ्या वर्षात महानगरपालिकेची उद्दिष्टे पूर्ण करण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करावेत, असे आवाहन यावेळी करण्यात आले

गुरु तेग बहादुर सिंह यांच्या ३५० व्या शहीद महोत्सवानिमित्त पुण्यात चित्ररथाचे स्वागत

पुणे, दि. १७ फेब्रुवारी २०२६ : गुरु तेग बहादुर यांच्या ३५० व्या शहीद महोत्सवानिमित्त त्यांच्या जीवनचरित्रावर आधारित चित्ररथाचे आज सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ परिसरात उत्स्फूर्त स्वागत करण्यात आले. हा चित्ररथ नुकताच पाषाण येथे दाखल झाला असून विविध ठिकाणी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले.

सकाळी ११.३० वाजता पाषाण येथील भैरवनाथ मंदिर वस्ती येथे चित्ररथासमोर कार्यक्रम संपन्न झाला. त्यानंतर सुस रोडवरील साई चौक येथे रथ थांबवून नागरिकांना दर्शनाची संधी देण्यात आली.
लमाणतांडा पाषाण बाधित वस्ती येथे सुमारे तीन तास चित्ररथ थांबविण्यात आला. या ठिकाणी मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते. तसेच परिसरातील चौकांमध्ये रथ लावून ‘हिंद दी चादर ‘ कार्यक्रमाच्या अनुषंगाने जनजागृती करण्यात आली.

यानंतर औंध येथील जिजामाता चौक (परिहार चौक), औंध गुरुद्वारा, नीलकंठेश्वर मंदिर तसेच छत्रपती शिवाजी महाराज स्मारक येथे रथ लावून कार्यक्रम पार पडले. खडकी येथे मुख्य बाजारपेठ, शिवाजी महाराज स्मारक व खडकी गुरुद्वारा येथेही चित्ररथासमोर विविध धार्मिक व प्रेरणादायी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले.

या प्रसंगी श्री. गणेशजी कलापुरे, श्री. विशालजी मेघावत, श्री. संदीपजी तुपे, औंध गुरुद्वाराचे विश्वस्त श्री. पंपीनदर सिंग मान, औंध गुरुद्वाराचे पुजारी बाबाजी सिंग, खडकी गुरुद्वारा श्री गुरु सिंह सभा येथील मनमोहन सिंग (ग्यानीजी), बोपोडी संयोजक श्री. अक्षयजी मुरडे, श्री. अक्षय भेगडे आदी मान्यवर उपस्थित होते.

अग्निवीर भरती मेळावा खडकी येथे आयोजित

0

पुणे, दि. 17: बॉम्बे इंजिनिअर ग्रुप आणि खडकी, पुणे येथे युनिट मुख्यालय कोटा अंतर्गत अग्निवीर भरती मेळावा 23 फेब्रुवारी 2026 ते 25 फेब्रुवारी 2026 या कालावधीत आयोजित करण्यात येणार आहे.
या भरती मेळाव्यात अग्निवीर (जनरल ड्युटी), अग्निवीर (तांत्रिक), अग्निवीर (ट्रेड्समन – 10 वी व 8 वी उत्तीर्ण) तसेच अग्निवीर खेळाडू (खुला प्रवर्ग) पदांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. अग्निवीर खेळाडू पदासाठी केवळ मुख्यालय बॉम्बे इंजिनिअर ग्रुप अँड सेंटर, जनरल स्टाफ (क्रीडा) शाखेद्वारे प्रायोजित उमेदवारांनाच सहभागाची परवानगी असेल.

भरतीचे वेळापत्रक पुढील प्रमाणे राहील. 23 फेब्रुवारी 2026 अग्निवीर (सामान्य कर्तव्य) – मराठा प्रवर्ग.

दि. 24 फेब्रुवारी अग्निवीर (सामान्य कर्तव्य) – शिख (मजहबी व रामदासी) व मुस्लिम, अग्निवीर (तांत्रिक) – अखिल भारतीय सर्व वर्ग (AIAC), अग्निवीर (ट्रेड्समन – १०वी व ८वी उत्तीर्ण) – एआयएसी, संगीतकार (खुला वर्ग), शेफ, ड्रेसर, स्टिवर्ड, सपोर्ट स्टाफ, वॉशरमन, हाऊस कीपर,मेस कीपर इत्यादी पदांसाठी

दि. 25 फेब्रुवारी 2026 रोजी अग्निवीर खेळाडू (खुला वर्ग) – फुटबॉल, पोहणे, हॉकी, व्हॉलीबॉल, रोइंग, बॉक्सिंग, कबड्डी, बास्केटबॉल, सेलिंग, कुस्ती, क्रॉस कंट्री, हँडबॉल, ट्रायथलॉन, वेटलिफ्टिंग व जिम्नॅस्टिक्स (फक्त मुख्यालय बॉम्बे इंजिनिअर ग्रुप आणि केंद्र, जनरल स्टाफ (क्रीडा)द्वारे प्रायोजित उमेदवारांसाठी).

खेळाडू उमेदवारांचे प्राथमिक मूल्यांकन दि. 16 फेब्रुवारी 2026 पासून जनरल स्टाफ (क्रीडा) शाखेमार्फत नियुक्त प्रिलिम बोर्ड ऑफ ऑफिसर्सद्वारे करण्यात येणार आहे. अंतिम टप्प्यात शारीरिक तंदुरुस्ती चाचणी व शारीरिक मापन चाचणीसाठी केवळ शिफारस केलेल्या उमेदवारांनाच परवानगी दिली जाईल.

सर्व उमेदवारांसाठी प्रवेशद्वार दररोज सकाळी 5 ते 8 वाजेपर्यंत खुले राहील. सकाळी 8 वा. नंतर कोणालाही प्रवेश दिला जाणार नाही. पात्र उमेदवारांची प्राथमिक तपासणी शारीरिक तंदुरुस्ती चाचणी, सॉफ्टवेअर नोंदणी आणि शारीरिक मापन चाचणी केली जाईल. पात्र उमेदवारांनी आवश्यक कागदपत्रांसह उपस्थित राहावे.

अग्निपथ योजनेअंतर्गत सेवा अटी व भरती प्रक्रियेबाबत अधिक माहितीसाठी www.bsakirkee.org या अधिकृत संकेतस्थळास भेट द्यावी, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी, पुणे यांनी केले आहे.

शहीद संतोष जगदाळे यांच्या कन्येला पुणे महापालिकेत शासकीय सेवा; डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या पाठपुराव्याला यश

​मुंबई/पुणे:

२२ एप्रिल २०२५ रोजी पहलगम (जम्मू-काश्मीर) येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात वीरमरण आलेले शहीद संतोष जगदाळे यांच्या कुटुंबाला आज मोठा दिलासा मिळाला आहे. जगदाळे कुटुंबातील एकमेव कमावत्या व्यक्तीचे छत्र हरपल्याने निर्माण झालेल्या संकटाच्या काळात, त्यांच्या कन्या आसावरी जगदाळे यांना पुणे महानगरपालिकेत शासकीय सेवेत सामावून घेण्याचा मार्ग आता मोकळा झाला असून, त्यांना नियुक्ती देण्याचे आदेश निर्गमित होत आहेत.

शहीद संतोष जगदाळे यांच्या निधनानंतर जगदाळे कुटुंब उघड्यावर पडले होते. या घटनेची गांभीर्याने दखल घेत विधान परिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी २५ मे २०२५ रोजी जगदाळे कुटुंबाची सांत्वनपर भेट घेतली होती. कुटुंबाची हलाखीची परिस्थिती आणि व्यथा जाणून घेतल्यानंतर, डॉ. गोऱ्हे यांनी २७ मे २०२५ रोजी तत्कालीन मुख्यमंत्री श्री. एकनाथजी शिंदे यांना पत्र लिहून आसावरी जगदाळे यांना विशेष बाब म्हणून शासकीय सेवेत सामावून घेण्याची विनंती केली होती.

डॉ. गोऱ्हे यांच्या पत्राच्या अनुषंगाने १९ जून २०२५ रोजी नगरविकास विभागाने पुणे महानगरपालिकेला प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना दिल्या होत्या. मात्र, या प्रक्रियेत अनेक तांत्रिक आणि प्रशासकीय अडचणी निर्माण झाल्या होत्या. या अडचणींमुळे नियुक्ती लांबणीवर पडत असताना डॉ. गोऱ्हे यांनी खचून न जाता सातत्याने पाठपुरावा केला. त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांच्या वारंवार बैठका घेतल्या आणि सकारात्मक प्रस्ताव तयार करण्यासाठी प्रशासनावर दबाव निर्माण केला.

सध्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री तथा नगरविकास मंत्री ना. श्री. एकनाथजी शिंदे यांनी या प्रकरणात संवेदनशीलतेने लक्ष घातले. तांत्रिक अडचणी असूनही एका शहीद कुटुंबाच्या पाठीशी उभे राहण्याची भूमिका त्यांनी घेतली. डॉ. गोऱ्हे यांच्या सततच्या पाठपुराव्याला आणि मुख्यमंत्री शिंदे यांच्या सकारात्मक निर्णयाला आज यश आले असून आसावरी यांना नोकरी प्राप्त होत आहे.

​”संतोष जगदाळे यांनी देशासाठी बलिदान दिले, त्यांचे जाणे ही न भरून निघणारी हानी आहे. त्यांच्या बलिदानाची परतफेड आपण करू शकत नाही, मात्र त्यांच्या कुटुंबाला वाऱ्यावर सोडणे ही आपली संस्कृती नाही. आसावरीला नोकरी मिळवून देण्यासाठी तांत्रिक अडचणींमुळे थोडा विलंब झाला, त्याबद्दल आम्ही जगदाळे कुटुंबाच्या भावनेशी सहमत आहोत. मात्र, आज तिला नियुक्ती मिळत असल्याचा समाधान आहे.

उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी पुन्हा एकदा सिद्ध केले आहे की, ते केवळ राज्याचे प्रमुख नसून खऱ्या अर्थाने ‘लाडक्या बहिणीचे राखणदार’ आहेत.”
​या निर्णयामुळे जगदाळे कुटुंबाला आर्थिक स्थैर्य लाभणार असून, एका वीरपुत्राच्या बलिदानाचा सन्मान शासनाकडून करण्यात आला आहे.

ओबीसी असल्याने मला टार्गेट केले:मालेगावच्या उपमहापौरांचा आरोप; म्हणाल्या- संविधानात टिपू सुलतान यांचा उल्लेख, त्यांच्या सैन्यात प्रमुख अधिकारी ब्राह्मण

मालेगाव -मालेगावातील उपमहापौरांच्या दालनातील छायाचित्र प्रकरण पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आले आहे. उपमहापौर शान-ए-हिंद निहाद अहमद यांनी दालनाच्या दुरुस्तीनंतर टिपू सुलतान यांचा फोटो पुन्हा लावण्यात येईल, अशी स्पष्ट भूमिका जाहीर केल्यानंतर शहरातील राजकीय वातावरण पुन्हा तापू लागले आहे. यापूर्वी तणाव वाढू नये म्हणून प्रशासनाने तो फोटो हटवला होता. मात्र स्वागत समारंभात बोलताना उपमहापौरांनी आपली भूमिका बदललेली नसल्याचे सांगितले. इंग्रजांविरुद्ध लढलेल्या योद्ध्याचे छायाचित्र लावण्यात चुकीचे काय, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

या वादात आता नव्या आरोप-प्रत्यारोपांची भर पडली आहे. मी ओबीसी वर्गातून आलेली आहे, म्हणून मला टार्गेट केले जात आहे, असा आरोप शान-ए-हिंद यांनी केला. संविधानात टिपू सुलतान यांचा उल्लेख आहे, असे सांगत त्यांनी आंदोलन करणाऱ्यांवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले. ज्यांचा उल्लेख संविधानात आहे, त्यांच्याविरोधात आंदोलन करण्यास परवानगी कशी दिली जाते? असा सवाल त्यांनी केला. तसेच संविधानात ज्यांचा फोटो आहे, तो हटवण्याचा अधिकार भाजप किंवा इतरांना कोणी दिला? असे म्हणत त्यांनी थेट राजकीय विरोधकांवर निशाणा साधला.

उपमहापौरांनी पुढे टिपू सुलतान यांच्या सैन्यरचनेचा उल्लेख करत नवा मुद्दा मांडला. त्यांच्या म्हणण्यानुसार, टिपू सुलतान यांच्या सैन्यातील अनेक प्रमुख अधिकारी ब्राह्मण होते. त्यामुळे त्यांच्याबाबत एकांगी चित्र रंगवले जात असल्याचा आरोप त्यांनी केला. दालनात फोटो लावल्यानंतर त्यांच्या कार्याची माहिती अनेकांना कळाली, असे सांगत त्यांनी आपल्या निर्णयाचे समर्थन केले. या विधानामुळे वाद अधिकच चिघळण्याची शक्यता आहे.

दरम्यान, या प्रकरणाची पार्श्वभूमीही तितकीच गाजलेली आहे. शान-ए-हिंद यांनी उपमहापौरपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर काही दिवसांतच दालनात टिपू सुलतान यांचे छायाचित्र लावण्यात आले होते. त्यानंतर विविध राजकीय पक्ष आणि हिंदुत्ववादी संघटनांनी आक्षेप घेत आंदोलनाची भूमिका घेतली. सोशल मीडियावर दालनातील व्हिडीओ व्हायरल झाल्याने प्रकरण अधिकच गाजले. कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून प्रशासनाने हस्तक्षेप करून फोटो हटवण्याचे आदेश दिले आणि परिस्थिती तात्पुरती शांत झाली.

मात्र आता उपमहापौरांच्या नव्या घोषणेमुळे वाद पुन्हा उफाळण्याची चिन्हे दिसत आहेत. काहींनी त्यांच्या भूमिकेला पाठिंबा दर्शवला आहे, तर काहींनी आंदोलन पुन्हा सुरू करण्याचे संकेत दिले आहेत. शहरात शांतता राखण्याचे मोठे आव्हान प्रशासनासमोर उभे राहिले आहे. एकूणच, दालनातील एका छायाचित्रावरून मालेगावच्या राजकारणात पुन्हा एकदा उकळी आली असून पुढील काही दिवसांत या वादाचे नवे राजकीय पडसाद उमटण्याची शक्यता नाकारता येत नाही.

नाठाळाचे माथी हाणू काठी । म्हणत काँग्रेस प्रदेशाध्यक्षांनी भाजपच्या खोडसाळपणाचा निषेध करत व्यक्त केली दिलगिरी

भाजपच्या खोडसाळपणामुळे काही शिवप्रेमी बांधवांच्या भावना दुखावल्या गेल्या, त्याबद्दल मी मनःपूर्वक खेद व्यक्त करतो. माझ्या शब्दाचा गैरवापर केल्या बद्दल शिवप्रेमींप्रती दिलगीरी व्यक्त करतो. कोणाच्याही भावनांना ठेच पोहोचवण्याचा माझा हेतू नव्हता.

मुंबई- काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी टिपू सुलतानची छत्रपती शिवाजी महाराजांशी केलेल्या तुलनेविषयी अखेर दिलगिरी व्यक्त केली आहे. भाजप व त्यांच्या पिलावळींकडून माझ्या विधानाचा विपर्यास करण्यात आला. मी त्यांचा तीव्र शब्दांत निषेध करतो. त्यांच्या गलिच्छ खोडसाळपणामुळे काही शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या गेल्या, त्याबद्दल मी मनःपूर्वक खेद व्यक्त करतो. दिलगिरी व्यक्त करतो. कुणाच्याही भावनांना ठेच पोहोचवण्याचा माझा हेतू नव्हता, असे त्यांनी म्हटले आहे.

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचे ट्विट

शिवप्रेमी बंधू-भगिनींनो, सप्रेम नमस्कार

सरकारी कार्यालयांमध्ये विविध महापुरुषांचे फोटो एकत्र लावल्याने समाजात तेढ निर्माण होणार नाही, तर ऐक्याचा संदेश जावा, या आशयाचे माझे ७० सेकंदांचे वक्तव्य होते. दुर्दैवाने, त्या विधानातील एका शब्दाचा संदर्भ तोडून जाणीवपूर्वक विपर्यास करण्यात आला. सोशल मीडियावर दिशाभूल करणाऱ्या मोहिमा चालवून मी जे बोललोच नाही ते माझ्या तोंडी घालण्यात आले आणि छत्रपती शिवाजी महाराजांची तुलना केली, असा चुकीचा समज निर्माण करण्यात आला. भारतीय जनता पक्ष आणि त्यांच्या पिलावळीकडून हा अपप्रचार नियोजनपूर्वक पसरवण्यात आला. त्याआधारे राज्यात धार्मिक तेढ निर्माण करून दंगली घडवण्याचा प्रयत्न झाला हे आपण पुण्यात पाहिले आहे.

मी पुन्हा एकदा स्पष्ट आणि ठामपणे सांगतो, छत्रपती शिवाजी महाराजांचा पराक्रम अद्वितीय आहे. ते माझे आदर्श, प्रेरणास्थान आणि स्वाभिमान आहेत. त्यांच्या तुलनेचा प्रश्नच उद्भवत नाही,मी केलेली नाही. टिपू सुलतानांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श आणि त्यांच्याकडून प्रेरणा घेऊन इंग्रजाविरूद्ध लढा दिल्याचे मी म्हटले होते. त्यांच्या योगदानाची दखल घेत थेट भारताच्या संविधानामध्ये देखील त्यांची तसबीर आहे त्यांच्या प्रतिमेच्या संदर्भात समाजात तणाव वाढू नये, सर्वांनी परस्पर सन्मान आणि बंधुभाव जपावा, हा माझ्या वक्तव्याचा गाभा होता. इतिहासावर मतभेद असू शकतात; मात्र त्यावर संयत, अभ्यासपूर्ण चर्चा व्हावी आणि समाजात संघर्ष निर्माण होऊ नये,जात-धर्म-पंथावर ध्रुवीकरण अजिबात खपवून घेता कामा नये,हीच भूमिका मी मांडली होती.
प्रकरणी भाजपचा तीव्र शब्दात निषेध करतो त्यांच्या गलिच्छ खोडसाळपणामुळे काही शिवप्रेमी बांधवांच्या भावना दुखावल्या गेल्या, त्याबद्दल मी मनःपूर्वक खेद व्यक्त करतो. माझ्या शब्दाचा गैरवापर केल्या बद्दल शिवप्रेमींप्रती दिलगीरी व्यक्त करतो. कोणाच्याही भावनांना ठेच पोहोचवण्याचा माझा हेतू नव्हता.

शिवजयंती दोन दिवसांवर आली आहे, आपण सर्वांनी गैरसमज दूर ठेवूया, अपप्रचाराला बळी पडू नका. छत्रपती शिवाजी महाराजांनी दिलेला स्वराज्य, सहिष्णुता आणि लोककल्याणाचा मार्ग स्वीकारून परस्पर आदर, ऐक्य आणि समन्वयाने महाराष्ट्र घडवूया ही नम्र विनंती. आणी पुढे भाजपाच्या विखारी, खोडसाळ अपप्रचाराविरुद्ध लढत राहू भाजपच्या विकृतीला व ट्रेड-दिल व जेफ़री एपस्टीन घोटाळा चव्हाट्यावर आणत राहू!

कठीण वज्रास भेदूं ऐसे
भले तरि देऊं कासेची लंगोटी ।
नाठाळाचे माथी हाणू काठी ।
मायबापाहूनि बहु मायावंत ।
करूं घातपात शत्रूहूनि ॥
अमृत तें काय गोड आम्हांपुढें ।
विष तें बापुडें कडू किती ॥

मुंबईत PM मोदी फ्रान्सचे अध्यक्ष मॅक्रॉन यांना भेटले:भारत-फ्रान्समध्ये 3.25 लाख कोटींचा करार, भारताला मिळणार 114 राफेल

मुंबई –

पंतप्रधान मोदी आणि फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्यातील बैठक मुंबईतील लोकभवन येथे सुरू झाली आहे. या भेटीदरम्यान दोन्ही नेत्यांनी एकमेकांना आलिंगन दिले. या चर्चेचा उद्देश भारत आणि फ्रान्समधील भागीदारी आणखी मजबूत करणे हा आहे.

या बैठकीदरम्यान भारत आणि फ्रान्समध्ये अंदाजे ₹३.२५ लाख कोटींचा मोठा संरक्षण करार होण्याची शक्यता आहे. मूल्याच्या बाबतीत हा भारताचा आतापर्यंतचा सर्वात मोठा लष्करी करार मानला जात आहे. या कराराअंतर्गत भारताला ११४ राफेल लढाऊ विमाने मिळतील.

या बैठकीत संरक्षण, सागरी सहकार्य, इंडो-पॅसिफिक रणनीती, उदयोन्मुख तंत्रज्ञान, कृत्रिम बुद्धिमत्ता आणि जागतिक मुद्द्यांवर चर्चा केली जाईल.

दोन्ही नेते सायंकाळी 5:15 वाजता भारत-फ्रान्स इनोव्हेशन इयर 2026 चे उद्घाटन करतील. यासोबतच दोन्ही देशांतील उद्योजक, स्टार्टअप संस्थापक, संशोधन तज्ञ आणि नवनिर्मितीशी संबंधित लोकांना संबोधित करतील.
राष्ट्राध्यक्ष मॅक्रॉन 17 ते 19 फेब्रुवारीपर्यंत भारताच्या दौऱ्यावर असतील. यावेळी ते दिल्लीतील AI इम्पॅक्ट समिटमध्येही सहभागी होतील.
राष्ट्राध्यक्ष झाल्यानंतर मॅक्रॉन चौथ्यांदा भारतात पोहोचले

राष्ट्राध्यक्ष झाल्यानंतर मॅक्रॉन यांचा हा चौथा भारत दौरा आहे. यापूर्वी ते मार्च 2018 मध्ये पहिल्यांदा भारतात आले होते. त्यानंतर ते सप्टेंबर 2023 मध्ये G20 शिखर परिषदेसाठी आणि जानेवारी 2024 मध्ये प्रजासत्ताक दिन सोहळ्यात प्रमुख पाहुणे म्हणून आले होते.

भारत आणि फ्रान्स यांच्यात 1998 पासून धोरणात्मक भागीदारी आहे आणि दोन्ही देश संरक्षण, तंत्रज्ञान, अंतराळ आणि ऊर्जा यांसारख्या क्षेत्रांमध्ये एकत्र काम करतात. हा दौरा देखील याच सहकार्याला पुढे नेण्याच्या दृष्टीने महत्त्वाचा मानला जात आहे.

भारताला 24 सुपर राफेल फायटर जेट मिळतील

भारत आणि फ्रान्समधील राफेल करारातील सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे यापैकी २४ विमाने ‘सुपर राफेल’ असतील. या प्रगत जेट विमानांना F-5 आवृत्ती म्हटले जात आहे, जी फ्रान्सची कंपनी दसॉ एव्हिएशन बनवत आहे.

सध्या भारतीय हवाई दलाकडे जी राफेल विमाने आहेत, ती F-3 प्रकारची आहेत आणि त्यांना 4.5 जनरेशनची लढाऊ विमाने मानले जाते. यात स्टेल्थ वैशिष्ट्ये आणि अणुबॉम्ब वाहून नेण्याची क्षमता देखील आहे. नवीन करारामध्ये मिळणारी बहुतेक जेट विमाने F-4 आवृत्तीची असतील, जी अधिक प्रगत प्रणाली आणि अद्ययावित तंत्रज्ञानासह येतील.

असे सांगितले जात आहे की युरोपियन मानकांनुसार F-5 राफेलला आणखी प्रगत श्रेणीत ठेवले जात आहे. ही सध्या विकासाच्या टप्प्यात आहेत. योजनेनुसार F-4 जेट विमानांची डिलिव्हरी २०२८-२९ पासून सुरू होईल, तर २०३० नंतर मिळणारी जेट विमाने F-5 म्हणजेच सुपर राफेल असतील.

या करारानंतर, फ्रान्सव्यतिरिक्त, भारत त्या निवडक देशांमध्ये सामील होईल ज्यांच्याकडे इतक्या प्रगत क्षमतेची राफेल लढाऊ विमाने असतील. यामुळे हवाई दलाची ताकद आणि तंत्रज्ञान पातळी या दोन्हीमध्ये मोठी वाढ होईल असे मानले जात आहे.

व्हीआयपींच्या बंदोबस्तासाठी स्वतंत्र पोलिसांची नेमणूक करावी  

सुनील माने यांचे मुख्यमंत्र्याना पत्र

पुणे : पुणे शहरातील वाढती गुन्हेगारी, वाढलेल्या वाहतूक समस्या या पार्श्वभूमीवर पोलिसांना गुन्ह्यांची उकल करण्यासाठी पुरेसे मनुष्यबळ तसेच वेळ उपलब्ध होत नाही. त्याचप्रमाणे व्हीआयपींच्या स्वागतासाठी विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, पोलिस आयुक्त यांसारख्या लोकसेवकांचा कामाचा वेळ जात आहे. त्यामुळे व्हीआयपींच्या बंदोबस्तासाठी स्वतंत्र पोलिसांची नेमणूक करावी अशी मागणी राष्ट्रवादी कॉँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेश सरचिटणीस, प्रवक्ते सुनील माने यांनी राज्याचे मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे. यासंदर्भातले पत्र त्यांनी ई मेलद्वारे पाठवले आहे.

सुनील माने यांनी दिलेल्या पत्रात म्हटले आहे की, पुणे शहरात दिवसेंदिवस वाढणारी वाहने आणि उपलब्ध असणारे रस्ते यांच्या व्यस्त प्रमाणामुळे प्रचंड मोठ्या प्रमाणावर वाहतुकीच्या समस्या निर्माण होत आहेत. त्याचप्रमाणे शहरात खून, मारामारी, चोरी, सायबर गुन्हे वाढत आहेत. शहरातील वाढती गुन्हेगारी हा ही एक चिंतेचा विषय आहे. मुंबई पाठोपाठ पुणे ही राज्यातील महत्वाचे शहर बनत चालले असल्यामुळे व्हीआयपी दौऱ्यात सातत्याने वाढ होत आहे. गत वर्षीचा विचार करता गेल्या वर्षी झेड प्लस सुरक्षा असणाऱ्या ३३४ व्यक्तिंना, झेड सुरक्षा असणाऱ्या ९८ जणांना, वाय प्लस दर्जाच्या ९६९ जणांना तर वाय सुरक्षा असणाऱ्या २५ लोकांना पोलिसांना सुरक्षा पुरवावी लागली. व्हीआयपी दर्जाच्या व्यक्तींच्या बंदोबस्ता सोबत ‘कॅन्व्हॉय’ साठी सुद्धा गाड्या पुरवाव्या लागतात. पोलिस प्रशासनाकडे गुन्ह्यांची उकल करण्यासाठी पुरेसे मनुष्यबळ उपलब्ध होत नसल्याने पोलिसांवर ताण येत आहे. गुन्हेगारीला अटकाव करण्यासाठी पोलीस यंत्रणेवरील ताण कमी करून बंदोबस्त आणि या गोष्टींसाठी नेहमीच्या पोलीस दलाचा वापर न करता त्यासाठी स्वतंत्र व्यवस्था करण्याची पुणे शहराला गरज आहे.

व्हीआयपी बंदोबस्त व स्वागतासाठी विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, पोलिस आयुक्त यांचा सतत वेळ जातो. यामुळे सर्वसामान्य जनतेच्या कामाचा वेळ वाया जातो. लोकसेवकांचा हा वाया जाणारा हा वेळ टाळण्यासाठी पुणे शहराच्या वाहतुकीसाठी स्वतंत्र पोलिस आयुक्त नेमावा, तसेच व्हीआयपी बंदोबस्तासाठी स्वतंत्र पोलिस व्यवस्था करावी अशी मागणी मी सरकारकडे  सातत्याने करत आहे. याबाबत पुण्याचे पालकमंत्री आजितदादा असताना त्यांना ११ डिसेंबर २०२३ साली व्हीआयपी बंदोबस्तासाठी स्वतंत्र पोलिस नेमावेत व पुण्यासाठी स्वतंत्र वाहतूक आयुक्त नेमावा यासाठी १३ डिसेंबर २०२३, २५ डिसेंबर २०२४ रोजी पत्र दिले होते. आपल्यालाही पुण्यासाठी स्वतंत्र वाहतूक पोलिस आयुक्त नेमावा यासाठी ६ मार्च आणि १३ ऑगस्ट २०२५ रोजी पत्र दिले होते. तरी कृपया आपण याबाबत लक्ष घालून व्हीआयपी बंदोबस्तासाठी स्वतंत्र पोलिस नेमावेत तसेच पुण्यासाठी स्वतंत्र वाहतूक पोलिस आयुक्त ही नेमावा अशी विनंती त्यांनी या पत्राद्वारे केली आहे.  

दुसरे प्रशासकीय अधिकारी मराठी साहित्य संमेलन शनिवार-रविवारी

पुणे महानगरपालिका, यशदा आणि संवादतर्फे आयोजन

पुणे : पुणे महानगरपालिका, यशदा आणि संवाद, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने दुसरे प्रशासकीय अधिकारी मराठी साहित्य संमेलन शनिवार दि. २१ व रविवार दि. २२ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत पुण्यात आयोजित करण्यात आहे. संमेलन बालगंधर्व रंगमंदिरात आयोजित करण्यात आले असून संमेलनाचे यंदाचे दुसरे वर्ष आहे, अशी माहिती यशदाचे अतिरिक्त महासंचालक शेखर गायकवाड, यशदाचे अतिरिक्त जिल्हाधिकारी राजीव नंदकर, संवाद, पुणेचे अध्यक्ष सुनील महाजन यांनी आज (दि. १६) पत्रकार परिषदेत दिली. पुणे महापालिका मराठी भाषा संवर्धन समितीच्या सचिव आशा उबाळे उपस्थित होत्या.

तेलंगणाचे अतिरिक्त पोलिस महासंचालक महेश भागवत संमेलनाचे अध्यक्ष असून पुणे महापालिकेचे आयुक्त नवल किशोर राम स्वागताध्यक्ष आहेत. यशदाचे महासंचालक निरंजनकुमार सुधांशू संमेलनाचे मुख्य संयोजक असून विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार सहसंयोजक आहेत.

संमेलनाचे उद्‌घाटन शनिवार, दि. २१ रोजी सकाळी १०:३० वाजता महापौर मंजुषा नागपुरे आणि उपमहापौर परशुराम वाडेकर यांच्या उपस्थितीत होणार आहे. संमेलनात शासकीय अधिकाऱ्यांच्या उत्कृष्ट साहित्यकृतीला वाङ्‌मय पुरस्कार देऊन गौरविले जाणार आहे.

दुपारी १२ वाजता ‘शासकीय अधिकाऱ्यांच्या साहित्य लेखनातील आव्हाने’ या विषयावर परिसंवाद आयोजित करण्यात आला असून यात ९५व्या अखिल भारतीय मराठी साहित्‍य संमेलनाचे अध्यक्ष भारत सासणे, केंद्रीय उच्च शिक्षा मंत्रालयातील अतिरिक्त सचिव आनंद पाटील, नवी दिल्लीच्या महाराष्‍ट्र सदनातील निवासी आयुक्त सुशील गायकवाड यांचा सहभाग असणार आहे.

दुपारी १:३० वाजता महाराष्ट्राबाहेरील महाराष्ट्रीयीन प्रशासकीय अधिकाऱ्यांचे अनुभवकथन ऐकता येणार आहे. यात तेलंगणाचे अतिरिक्‍त पोलिस महासंचालक महेश भागवत, भुवनेश्वरचे महापालिका आयुक्त राजेश पाटील, राष्‍ट्रीय कौशल्‍य विकास महामंडळाचे सल्लागार ज्ञानेश्वर मुळे, ओरिसा पशुसंवर्धन विभागाचे संचाकल विजय कुलांगे, बिहार राज्य रस्ते विकास मंडळाचे व्यवस्‍थापकीय संचालक कपिल शिरसाट, एनआयए विभागाचे पोलिस अधीक्षक प्रतीक ठुबे, आयकर आयुक्त सुरेन्द्रकुमार मानकोसकर यांचा सहभाग असणार आहे.

दुपारी ३ वाजता ‘शासकीय अधिकारी मराठी साहित्य संमेलनाची भूमिका व आव्हाने’ या विषयावर पहिले संमेलनाध्यक्ष, यशदाचे अतिरिक्त महासंचालक शेखर गायकवाड यांच्या मुलाखतीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आली असून त्यांच्याशी यशदातील अतिरिक्त जिल्हाधिकारी राजीव नंदकर संवाद साधणार आहेत.

दुपारी ४ वाजता अभिजात मराठी भाषा व प्रशासन या विषयावर परिसंवाद आयोजित करण्यात आला असून यात ९१व्या अखिल भारतीय मराठी साहित्‍य संमेलनाचे अध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख, मराठी भाषा विभागाचे संचालक किरण कुलकर्णी, पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील, अहिल्यानगरचे मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी यांचा सहभाग असून त्यांच्याशी किशोर मासिकाचे संपादक किरण केंद्रे संवाद साधणार आहेत.

शासकीय अधिकाऱ्यांनी लिहिलेल्या पुस्तकांचा प्रकाशन सोहळा सायंकाळी ५ वाजता आयोजित करण्यात आला आहे. सायंकाळी ५:१५ वाजता कविसंमेलन आयोजित करण्यात आले असून यात निवृत्त सनदी अधिकारी दिलीप पांढरपट्टे, अतिरिक्‍त आयुक्‍त वैशाली पतंगे, अतिरिक्त जिल्हाधिकारी सतीश राऊत, उपसचिव लीना संखे, उपजिल्हाधिकारी गणेश मरकड, अतिरिक्त जिल्हाधिकारी मनिषा कुंभार, उपजिल्हाधिकारी वैशाली राजमाने, पीएमआरडीच्या सहआयुक्त मोनिका सिंग, निवृत्त मुख्याधिकारी विद्या पोळ, यशदातील माध्यम व प्रकाशन विभागातील व्यंकटेश कल्याणकर, यशदातील सहायक प्राध्यापक किरण धांडे यांचा सहभाग असणार आहे.

सायंकाळी ६:१५ वाजता भारत सासणे यांच्या कथेवर आधरित ‘मुर्गा’ हा लघुपट दाखविला जाणार असून पटकथा व संवाद लेखन राजेश जोशी यांचे असून किरण लद्दे दिग्दर्शक आहेत.

रविवार, २२ जानेवारी रोजी सकाळी १० वाजता ‘स्पर्धा परीक्षा संधी, समस्या व आव्हाने’ या विषयावर पोलिस सेवेतील प्रशिक्षणार्थी बिरदेव डोणे, महसूल विभागातील सोनल सोनकवडे, उपजिल्हाधिकारी शुभम पाटील, सोनल सूर्यवंशी, प्रसाद चौघुले बोलणार आहेत. अतिरीक्त जिल्हाधिकारी राजीव नंदकर सत्र संचालक आहेत.

सकाळी ११ वाजता ‘माझे वाचन आणि लेखन’ या विषयावर अपर मुख्य सचिव विकास खारगे, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका आयुक्त श्रावण हार्डीकर, निवृत सनदी अधिकारी सुनील पाटील, उप महासंचालक पौर्णिमा गायकवाड, साहित्य अकादमी बाल साहित्य पुरस्कार विजेते व तहसीलदार आबा महाजन, राज्य कर उपायुक्त अंजली ढमाळ बोलणार आहेत.

दुपारी १२ वाजता ‘प्रशासकीय अधिकारी व साहित्य निर्मिती’ या विषयावरील परिसंवादात विभागीय आयुक्त चंद्रकांत पुलकुंडवार, सीजीएसटीच्या अतिरिक्त आयुक्त वैशाली पतंगे, बालभारतीच्या संचालक अनुराधा ओक, उपमुख्य कार्यकारी अधिकारी सोनाली इरपळे-घुले, राज्य कर उपआयुक्त अंजली ढमाळ यांचा सहभाग असणार आहे.

दैनंदिन प्रशासकीय कामकाजात घडणाऱ्या विनोदाबाबत यशदाचे अतिरिक्त महासंचालक शेखर गायकवाड, निवृत्त कृषी उपसंचालक नाथ राणे, सत्यशील गुर्जर, निवृत्त पोलिस अधिकारी राजेंद्र भामरे बोलणार आहेत.

दुपारी २:३० वाजता ‘कृत्रिम बुद्धिमत्ता-साहित्य क्षेत्रातील आव्हाने’ या विषयावरील परिसंवादात कार्पोरेट प्रशिक्षक सुनील पाटील, मुकुंद नाडगौडा, एससीईआटीचे उपसंचालक विकास गरड बोलणार आहेत.

दुपारी ४ वाजता यशदातील अतिरिक्त महासंचालक शेखर गायकवाड, अतिरिक्त जिल्हाधिकारी राजीव नंदकर, वाडिया महाविद्यालयातील प्रा. सचिन सानप हे ‘अधिकारी साहित्य संमेलनाची दिशा व भवितव्य’ या विषयावर बोलणार आहेत.

सायंकाळी ५ वाजता संमेलनाचा समारोप समारंभ आयोजित करण्यात आला आहे. 

बारामती येथील लियरजेट 45 (व्हीटी-एसएसके) च्या अपघाताच्या तपासाबाबत विमान अपघात तपास संस्थेने दिली माहिती

नवी दिल्ली, 17 फेब्रुवारी 2026

बारामती येथे 28 जानेवारी 2026 रोजी झालेल्या लियरजेट 45 विमान व्हीटी-एसएसके च्या अपघाताची सविस्तर चौकशी विमान अपघात तपास संस्था करत असून ही चौकशी विमान (अपघात आणि घटनांचा तपास) नियम, 2017 आणि आंतरराष्ट्रीय नागरी विमान वाहतूक संघटनेच्या (आयसीएओ) परिशिष्ट 13 मधील आंतरराष्ट्रीय मानके आणि शिफारस केलेल्या पद्धतींनुसार काटेकोरपणे केली जात आहे.

या विमानात दोन स्वतंत्र फ्लाइट रेकॉर्डर बसविण्यात आले होते. अपघाताच्या वेळी हे दोन्ही रेकॉर्डर दीर्घकाळ तीव्र उष्णतेच्या संपर्कात आले आणि आगीमुळे त्यांचे नुकसान झाले.

एल3- कम्युनिकेशन्स यांनी तयार केलेला डिजिटल फ्लाइट डेटा रेकॉर्डर, विमान अपघात तपास संस्थेच्या प्रयोगशाळेत यशस्वीरीत्या डाउनलोड करण्यात आला. तर हनीवेल कंपनीने तयार केलेल्या कॉकपीट व्हॉइस रेकॉर्डरची सध्या विस्तृत तांत्रिक तपासणी सुरु आहे. डेटा पुनर्प्राप्तीसाठी विशेष तांत्रिक सहाय्य मिळविण्यासाठी उत्पादन करणाऱ्या देशाच्या मान्यताप्राप्त प्रतिनिधीकडून मदत मागविण्यात आली आहे.

ही चौकशी समावेशी, वस्तुनिष्ठ आणि पुराव्यांवर आधारित व्हावी यासाठी विमान अपघात तपास संस्था सर्व विहित तांत्रिक आणि प्रक्रियात्मक प्रोटोकॉलचे पालन करत आहे. संपूर्ण पारदर्शकतेसाठी संस्थेची वचनबद्धता कायम असून चौकशी दरम्यान योग्य वेळी पुढील माहिती सामायिक केली जाईल.

विमान अपघात तपास संस्थेने सर्व संबंधित घटकांना कोणत्याही प्रकारचे तर्कवितर्क टाळावेत  आणि प्रस्थापित कार्यपद्धतीनुसार चौकशी प्रक्रिया सुरळीतपणे पार पडू द्यावी अशी विनंती केली आहे.

उदयोन्मुख खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी “सुपर सनी मंथ” क्रीडा महोत्सव, सनी निम्हण यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजन

“सुपर सनी मंथ” क्रीडा महोत्सव १८ फेब्रुवारी ते ८ मार्च दरम्यान रंगणार

पुणे, १७ फेब्रुवारी २०२६: युवा सामाजिक कार्यकर्ते आणि नगरसेवक सनी विनायक निम्हण यांच्या वाढदिवसानिमित्त सोमेश्वर फाउंडेशनच्या वतीने “सुपर सनी मंथ” या क्रीडा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.

यावेळी नगरसेवक सनी विनायक निम्हण म्हणाले, “माझ्या वाढदिवसानिमित्त दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आम्ही ‘सुपर सनी मंथ’ (Super Sunny Month) मोठ्या उत्साहात साजरा करत आहोत. क्रीडा, कला, आनंद आणि सकारात्मकतेचा हा सोहळा आता आपल्या सर्वांच्या जिव्हाळ्याचा विषय बनला आहे.

मला सांगायला अत्यंत आनंद होत आहे की, दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आयोजित सर्व क्रीडा स्पर्धांना खेळाडू आणि क्रीडाप्रेमींकडून अतिशय जोरदार आणि सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे. सर्व स्पर्धांची नावनोंदणी अतिशय उत्साहात होत आहे.

“आजच्या तरुणाईसमोर अनेक आव्हाने आहेत. व्यसनाधीनतेपासून दूर राहून खेळ आणि व्यायामाकडे वळणे ही काळाची गरज आहे. ‘सुपर सनी मंथ’च्या माध्यमातून प्रत्येक युवकाला आपली प्रतिभा दाखवण्याची संधी मिळावी आणि आपल्या परिसरातून राज्य व राष्ट्रीय पातळीवरील खेळाडू घडावेत, हीच माझी मनापासून इच्छा आहे.”
या क्रीडा महोत्सवाच्या माध्यमातून परिसरातील गुणवान व उदयोन्मुख खेळाडूंना व्यासपीठ उपलब्ध होणार असून त्यांना पुढील स्पर्धांसाठी प्रोत्साहन मिळणार आहे. विविध क्रीडा प्रकारांमध्ये होणाऱ्या स्पर्धांमुळे तरुणांना आपली कौशल्ये सादर करण्याची संधी मिळणार आहे.समाजामध्ये व्यसनमुक्तीचा संदेश देण्यासाठी आणि तरुणांमध्ये व्यायामाची आवड निर्माण करण्याच्या उद्देशाने या स्पर्धा आयोजित करण्यात आल्याचे सनी निम्हण यांनी सांगितले आहे. या माध्यमातून गुणवान व उदयोन्मुख खेळाडूंना प्रोत्साहन मिळणार आहे.

पुणे जिल्हा हौशी अॅथलेटिक संघटनेच्या मान्यतेने पुणे व पिंपरी चिंचवड शहरास जोडत व्यसनमुक्तीचा संदेश देणारी पुणे ट्वीन सिटी मॅरेथॉन, रन फॉर अमृतकाल स्पर्धेचे आयोजन ८ मार्च रोजी करण्यात आले आहे. स्पर्धेचे हे तिसरे वर्ष आहे. ही मॅरेथॉन स्पर्धा २१ किमी, १० किमी, ५ किमी आणि ३ किमी प्रकारात होणार आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ येथे पहाटे ५ वाजता सुरू होणाऱ्या या स्पर्धेमध्ये १०,००० हुन अधिक धावपटूंनी आपला सहभाग निश्चित केला आहे. या मॅरेथॉन मधील सर्व सहभागी धावपटूंना टी शर्ट, गुडी बॅग, पदक, ई टायमिंग प्रशस्तिपत्रक, वैद्यकीय सुविधा विनामूल्य देण्यात येणार आहेत. तसेच या स्पर्धेसाठी ५,५०,००० रुपयांची पारितोषिक देण्यात येताल. या स्पर्धेची तांत्रिक नियोजन यश रायकर पाहणार आहेत. इच्छुक स्पर्धकांना या स्पर्धेची नांव नोंदणी दि.५ मार्चपर्यंत www.sunnynimhan.com या संकेतस्थळावर करता येईल.

जिल्हास्तरीय १४ वर्षांखालील मुले आणि मुलीसाठी आंतर शालेय निमंत्रित व्हॉलिबॉल स्पर्धेचे आयोजन करण्यात आलेले आहे. डेक्कन जिमखाना मैदानावर ही स्पर्धा बुधवार, १८ फेब्रुवारी आणि गुरुवार, १९ फेब्रुवारी रोजी रंगणार आहे, युवा खेळाडूंना प्रोत्सहाण देण्याच्या सनी विनायक निम्हण यांच्या धोरणानुसार होणा-या या स्पर्धत एकूण ६०,००० रुपयांची बक्षिसे, प्रशस्तिपत्रक आणि विजेत्यांना चषक देण्यात येणार आहेत. यामध्ये प्रत्येक सामना जिंकणा-या संघास रुपये १००० आणि हरणा-या संघास रुपये ५०० रुपये उत्तेजनार्थ देण्यात येणार असून या स्पर्धेचे हे आकर्षण ठरले आहे. सर्व सहभागी स्पर्धकांना प्रशस्तीपत्र देण्यात येणार

विनर्स कराटे असोसिएशनच्या मान्यतेने व सहकार्याने राज्यस्तरीय कराटे चॅम्पियनशिप २०२६ चे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेत राज्यभरातील सुमारे ८०० कराटेपडूंनी आपला सहभाग निश्चित केला असल्याची माहिती सेनसेई संतोष पवार यांनी दिली. मुले व मुलीसाठी या स्पर्धा १ मार्च रोजी सुस रोड येथील सनी वर्ल्ड येथे होणार आहेत. या स्पर्धा ६, ८, १०, १२, १४ वर्षाखालील आणि १४ वर्षावरील मुले व मुलीसाठी होतील. स्पर्धेत एकूण १,५०,०००रुपयांची पारितोषिके, प्रशस्तिपत्रक आणि पदके चषक देण्यात येणार आहेत.

सोमेश्वर चषक २०२६ बॅडमिंटन स्पर्धेचे आयोजन २१ आणि २२ फेब्रुवारी रोजी करण्यात आले आहे. द लाईफ स्पोर्टस्, सोमेश्वर वाडी, पाषाण येथे या स्पर्धा ९, ११, १३, १५, १७ वर्षे वयोगटात मुले आणि मुलींच्या गटात, तर वरीष्ठ गटात पुरुष व महिलांसाठी एकेरी व दुहेरीच्या स्पर्धा रंगणार आहेत. मंत्रेशी सागर यांच्या मार्गदर्शनाखाली या स्पर्धा होत असून स्पर्धेत एकूण ५०,००० रोख पारितोषीकांसह सर्व सहभागी खेळाडूंना प्रशस्तीपत्र देण्यात येणार आहेत.

कॅरम असोसिएशन ऑफ पुणे यांच्या मान्यतेखाली पुणे जिल्हास्तरीय कॅरम स्पर्धेचे आयोजन करण्यात आहे. हि स्पर्धा रुक्मिणी हॉल या ठिकाणी १८ व १९ फेब्रुवारी २०२६ रोजी रंगणार आहे. सुशील गुजर यांच्या मार्गदर्शनाखाली हि स्पर्धा होत असून स्पर्धेत एकूण ६०,००० रोख पारितोषीकांसह खेळाडूंना प्रशस्तीपत्र व करंडक देण्यात येणार असल्याचे कॅरम असोसिएशन ऑफ पुणेचे अध्यक्ष भरत देसडला यांनी सांगितले.

जिल्हास्तरीय पिकलबॉल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून यामध्ये २०० हुन अधिक अधिक खेळाडू आपले कौशल्य पणाला लावणार आहे.
हि स्पर्धा २१ व २२ फेब्रुवारी २०२६ या दिवशी द लाईफ स्पोर्टस्, सोमेश्वर वाडी, पाषाण या ठिकाणी होणार आहे. ब्रिजमोहन सिंग यांच्या मार्गदर्शनाखाली हि या स्पर्धा होत असून एकूण ८५,००० रोख पारितोषीकांसह खेळाडूंना प्रशस्तीपत्र व करंडक देण्यात येणार आहेत.

पुणे जिल्हा मेट्रोपॉलिटन टेनिस संघटना(पीएमडीटीए) यांच्या मान्यतेखाली जिल्हास्तरीय १२ व १४ वर्षांखालील टेनिस स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून यामध्ये १५० हुन अधिक खेळाडू झुंजणार आहेत. हि स्पर्धा २१ व २२ फेब्रुवारी २०२६ या दिवशी सुस रोड येथील सनी वर्ल्ड टेनिस कोर्ट येथे पार पडणार आहे.

पुणे डिस्ट्रिक्ट चेस सर्कल यांच्या मान्यतेखाली सोमेश्वर करंडक खुल्या व विविध वयोगटातील एक दिवसीय रॅपिड बुद्धिबळ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. हि स्पर्धा रविवार, १ मार्च रोजी, गोविंद गार्डन मंगल कार्यालय पाषाण या ठिकाणी होणार आहे. हि बुद्धिबळ स्पर्धा ७,१०,१२ व १५ वर्षाखालील व खुल्या गटात पार पडणार आहे. राजेंद्र कोंडे यांच्या मार्गदर्शनाखाली हि स्पर्धा होत असून स्पर्धेत एकूण १,००,००० रोख पारितोषीकांसह खेळाडूंना प्रशस्तीपत्र व करंडक देण्यात येणार आहेत.

विशेष फुटपाथ दुरुस्ती अभियानाचे उद्घाटन

क्षेत्रीय कार्यालयांमध्ये ‘जागल्या’ संकल्पना राबविण्यात येणार
पुणे- पुणे महानगरपालिका पथ विभागामार्फत प्रभाग१२, लकाकी रोड, मॉडेल कॉलनी येथे विशेष फुटपाथ दुरुस्ती अभियानाचा शुभारंभकरण्यात आला . छत्रपती शिवाजीनगर विधानसभा मतदार संघाचे आमदार सिद्धार्थ शिरोळे, महापौर मंजुषा नागपुरे, सभागृह नेते गणेश बिडकर, मा. महापालिका आयुक्त नवल किशोर राम व प्रभागातील स्थानिक नगरसेवक यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी पुणे महानगरपालिकेचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. सदर अभियानाच्या अंतर्गत फुटपाथवर असलेले विद्युत खांब, फलक, डीपी बॉक्स इत्यादी अडथळे फुटपाथच्या कडेस घेण्यात येणार आहे. फुटपाथ पादचाऱ्यांकरिता समतल करण्यात येणार आहे.
तसेच सदर अभियानाअंतर्गत शिवाजीनगर परिसरातील लकाकी रोड, थोरात चौक ते वेताळबाबा चौक हे दोन रस्ते प्राधान्याने हाती घेतलेले आहेत. या दोन्ही रस्त्याची अंदाजित लांबी १४०० मीटर इतकी असुन, या दोन्ही रस्त्याच्या दुतर्फा असणाऱ्या अस्तित्वातील पदपथाची योग्य प्रकारे दुरूस्ती करून सदरचे पदपथ आदर्शरित्या विकसित करण्यात येतील व त्यानंतर त्या धर्तीवर संपुर्ण पुणे शहरात सदरचे फुटपाथ दुरूस्ती अभियान राबविण्यात येणार आहे. या अभियानामुळे नागरिकांकरिता उत्तम दर्जाचे व समपातळीत असणारे फुटपाथ कोणत्याही अडथळ्या शिवाय वापरणे शक्य होणार आहे.
फुटपाथ दुरुस्ती अभियानाचे उद्घाटन करताना महापौर सौ. मंजुषा दीपक नागपुरे यांनी महापालिकेच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या ‘जागल्या’ या संकल्पनेची माहिती दिली. ‘जागल्या’ या संकल्पनेच्या अंतर्गत सर्व क्षेत्रीय कार्यालयांमध्ये ‘जागल्या’ कर्मचारी नियुक्त करण्यात येणार आहे. सदर कर्मचाऱ्याने आपल्या कार्यक्षेत्रात रोज एक ते दोन तास पायी चालून परिसरातील फुटपाथवर असलेल्या अडथळ्यांच्या नोंदी, आवश्यक दुरूस्ती इत्यादी माहिती घेऊन संबंधित अधिकाऱ्याला माहिती सादर करावयाची आहे. त्यानुसार पदपथावरील अडथळे दूर करून आवश्यक त्या उपाययोजना करण्यात येतील. विशेष फुटपाथ दुरुस्ती अभियान आणि ‘जागल्या’ संकल्पनेमुळे पादचाऱ्यांना चालणे सुलभ होईल, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.

श्री पूज्य गुरुदेवश्री राकेशजी यांच्या परिवर्तनकारी सत्संगाचे पुण्यात आयोजन…..

पुणे – श्रीमद् राजचंद्रजी यांचे भक्त,आध्यात्मिक मार्गदर्शक,आणि आत्मज्ञानी गुरु व श्रीमद् राजचंद्र मिशन धरमपूरचे संस्थापक पूज्य गुरुदेवश्री राकेशजी यांच्या परिवर्तनकारी सत्संगाचे आयोजन येत्या दि.२० आणि २१ फेब्रुवारी रोजी करण्यात आले आहे.स्वारगेट येथील श्री गणेश कला क्रीडामंच येथे रात्री ८ ते १० या कालावधीत होणार आहे.

युवकांचे प्रेरणास्थान म्हणून ओळखले जाणारे पूज्य गुरुदेवश्री राकेशजी हे जगातील सुमारे ९६ युवक केंद्रामधून सत्संग,साधना,सेवा,संस्कृती, आणि क्रीडा या क्षेत्राच्या माध्यमातून युवकांना उच्च ध्येय गाठण्यासाठी मार्गदर्शन करीत आहेत.तसेच श्रीमद् राजचंद्र डिव्हाईन टच या देश विदेशातील २५२ केंद्रांच्या माध्यमातून बालमनावर संस्कार करण्याचे कार्य करीत आहेत. मुख्य म्हणजे श्रीमद् राजचंद्र मिशन धरमपूर संस्था जगातील २०६ केद्राच्या माध्यमातून कार्यरत आहे.

पूज्य गुरुदेवश्री राकेशजी हे जगातील अभ्यासकांना
धर्मयात्रांच्या माध्यमातून दर्शन, अनुभूती आणि माहिती याचा लाभ देत आहेत.तसेच धर्मयात्रे दरम्यान साधक यांना ते सत्संग , साधना,प्रतिष्ठा,पदार्पण आदि माध्यमातून मार्गदर्शन करीत आहेत.भावनिक, मानसिक आणि आध्यात्मिक आरोग्यावर सत्संगाचा सकारात्मक प्रभाव अनुभवण्यासाठी सर्वांनी दोन दिवसीय कार्यक्रमात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे अशी विनंती आयोजकांनी केली आहे.

महिलाच्या आर्थिक सक्षमीकरणाला एआयची जोडमिळाल्यास त्यांचा शाश्वत विकास शक्य-विजया रहाटकर

0

‘इंडिया एआय इम्पॅक्ट समिट-2026’मध्ये महिला समृध्दीचा निर्धार

नवी दिल्ली, दि. १६ : आजच्या वेगाने बदलणाऱ्या तंत्रज्ञानाच्या युगात आर्टिफिशियल इंटेलिजन्स (एआय) हे केवळ एक तांत्रिक साधन नसून शिक्षण, प्रशासन आणि उद्योग क्षेत्राचा केंद्रबिंदू ठरत आहे. आगामी काळात एआयमुळे रोजगाराच्या संधी आणि स्वरूप मोठ्या प्रमाणात बदलणार असून महिलांनी या तंत्राच्या केवळ ‘वापरकर्त्या’ म्हणून न राहता संशोधक आणि निर्माते होऊन नव्या परिवर्तनाचे नेतृत्व करावे. महिलाच्या आर्थिक सक्षमीकरणाला एआयची जोड मिळाल्यास त्यांचा शाश्वत विकास होउ शकेल असा आशावाद राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांनी आज येथे व्यक्त केला.

दिल्लीतील भारत मंडपम येथे आयोजित ‘इंडिया एआय इम्पॅक्ट समिट’मध्ये आज दुपारी राष्ट्रीय महिला आयोग , आंतरराष्ट्रीय दूरसंचार संघटना आणि संयुक्त राष्ट्र प्रशिक्षण व संशोधन संस्था (युनिटार) या संस्थांच्या संयुक्त विद्यमाने एआय आणि आर्थिक शक्ती – महिला नेतृत्वातील समृद्धीची रूपरेषा या विषयावर आयोजित विशेष सत्राचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी समारोपीय भाषणात त्या बोलत होत्या. मंचावर युनिटारच्या संचालिका (समृद्धी विभाग) मिहोको कुमामोटो, आंतरराष्ट्रीय दूरसंचार संघाच्या (आयटीयू) प्रादेशिक संचालिका (आशिया-पॅसिफिक) अत्सुको ओकुदा, माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे प्रधान सचिव तथा महासंचालक ब्रिजेश सिंह आणि संगीतकार निर्माता कार्तिक शाह उपस्थित होते.

या समिटमधील चर्चासत्र हा केवळ संवाद नसून ती एक चळवळ आहे. भारतीय महिलांनी नेहमीच परिवर्तनाचे नेतृत्व केले आहे, असा दाखला देऊन श्रीमती रहाटकर पुढे म्हणाल्या, एआय सारख्या नव्या तंत्रज्ञानातही महिला मागे राहणार नाहीत. त्यासाठी त्यांना अनुरुप प्रक्षिशण व योग्य अशी इको स्टिटीम दिली जाईल. महिलांची केवळ भागीदारी अपेक्षित नसून त्यांच्याकडे या तंत्राची मालकी आली पाहिजे. त्यासाठी महिलांना ‘एआय साक्षरता’ प्राप्त होणे अत्यावश्यक आहे. यामध्ये डेटा संरक्षण, डिजिटल नीतिमत्ता आणि सायबर सुरक्षेची सखोल समज आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले. केवळ घोषणांऐवजी प्रत्यक्ष अंमलबजावणीवर भर देत सूक्ष्म व लघुउद्योगांना जागतिक पुरवठा साखळीशी जोडण्याचे आवाहन करुन राष्ट्रीय महिला आयोग त्यासाठी कृतीशील प्रयत्न करेल, असा विश्वास त्त्यांनी दिला.

या सत्रात श्री. ब्रिजेश सिंह यांनी महिलांना भेडसावणाऱ्या डिजिटल धोक्यांवर प्रकाश टाकला. एआयची निर्मिती प्रामुख्याने पुरुषप्रधान मजकूर आणि डेटाच्या आधारे झाल्याने त्यामध्ये संवेदनशीलता, न्याय आणि समतेचा अभाव दिसून येतो. ही प्रणाली केवळ कार्यक्षमतेच्या ‘हायपर-ऑप्टिमायझेशन’वर लक्ष केंद्रित करते, ज्याचा विपरित परिणाम महिलांच्या सुरक्षिततेवर होत आहे. आकडेवारीनुसार, ‘डीपफेक’ तंत्रज्ञानाच्या ९१ टक्के बळी महिलाच आहेत, जे अत्यंत धक्कादायक आहे. महिलांविरोधात होणारे अत्याचार, डीपफेकसारखे प्रकार यावर निश्चित आणि प्रभावी नियंत्रण ठेवण्यासाठी आपण काही बाबी नक्की करु शकतो. सोशल मीडिया कंपन्यांनी ‘सेफ हार्बर’ नियमांचा आधार घेत जबाबदारी झटकू नये, असे सांगत त्यांनी ‘प्लॅटफॉर्म जबाबदारी’वर भर दिला. मुळात हा विषय प्लॅटफॉर्मच्या जबाबदारीचा आहे. जिथे प्लॅटफॉर्म जबाबदारी स्वीकारत नाहीत, तिथे सरकारने हस्तक्षेप करणं आवश्यक आहे. भारतामध्ये २०२१ मधील नियमांनुसार पीडित व्यक्तींना नोडल अधिकाऱ्यांकडे तक्रार करण्याची सुविधा आहे आणि ठराविक कालावधीत आक्षेपार्ह सामग्री हटविणे कंपन्यांना बंधनकारक आहे. तसेच एआय-निर्मित प्रतिमांवर ‘वॉटरमार्क’ सक्तीचे करण्याची गरजही त्यांनी यावेळी व्यक्त केली .

युनायटेड नेशन्स इन्स्टिट्यूट फॉर ट्रेनिंग अँड रिसर्चच्या मिहोको कुमामोटो यांनी आपले विचार मांडताना क्षमता बांधणी आणि आंतरराष्ट्रीय सहकार्यावर भर दिला. यामुळे महिलांना एआय-आधारित जागतिक संधींचा लाभ घेता येईल. यामुळे महिलांचा सर्वांगीण विकास होईल असा विश्वास व्यक्त करुन त्या म्हणाल्या, युनीटारला भारत सरकार, राष्ट्रीय महिला आयोग, आंतरराष्ट्रीय दूरसंचार संघ, तसेच इतर संयुक्त राष्ट्र भागीदारांसोबत व्यावहारिक समृध्दीसाठी एआय हे उदिष्ट ठेऊन पुढील कार्यक्रम अंमलात आणण्याची इच्छा आहे. हे कार्यक्रम स्थानिक वास्तवावर आधारित असतील, महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणाला बळ देतील आणि इतर देशांना उपयोगी पडेल असे पुराव्यावर आधारित मॉडेल उभारतील. म्हणूनच, जेव्हा ग्लोबल साउथमधील कृत्रिम बुद्धिमत्तेची कथा लिहिली जाईल, तेव्हा महिलांचा उल्लेख तळटीपेत न राहता, सामायिक आणि सर्वसमावेशक समृद्धीच्या मुख्य अध्यायाच्या लेखिका म्हणून त्यांची नोंद होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

इंटरनॅशनल टेलिकम्युनिकेशन युनियनच्या अत्सुको ओकुडा यांनी द्वितीय आणि तृतीय शहरांमधील महिलांसाठी डिजिटल समावेशकता वाढवण्याची आणि डिजिटल दरी कमी करण्याची गरज अधोरेखित केली. एआय नवसंशोधनाचे रूपांतर महिलांच्या प्रत्यक्ष आर्थिक सक्षमीकरणात करण्यासाठी एक ‘प्रॅक्टिकल रोडमॅप’ तयार करण्याबाबत भारताने पुढाकार घ्यावा असेही सांगितले.

एआय संगीत निर्माते कार्तिक शाह यांनी सर्जनशील आणि डिजिटल अर्थव्यवस्थेत महिलांसाठी असलेल्या वाढत्या संधींबाबत यावेळी माहिती दिली. एआय मुळे कला क्षेत्रात होऊ शकणा-या बदलामुळे त्यांनी महिलांना या तंत्रामुळे पाठबळ लाभणार असल्याचे त्यांनी सांगितले. श्रीमती मिहोको कुमामोटो यांनी मॉडरेटर म्हणून सत्राची जबाबदारी सााभाळली.

सत्राच्या प्रारंभी महिला सक्षमीकरणाचा संदर्भ असलेली एआय वर आधारित चित्रफित दाखविण्यात आली. या सत्राचे संचालन सलोनी लखिया यांनी केले. श्रीमती आकांक्षा यांनी सहभागी वक्त्यांचा परिचय करुन दिला.