Home Blog Page 100

महापौर मंजुषा नागपुरे, धीरज घाटे आणि दुष्यंत मोहोळ यांच्यावर गुन्हे दाखल का केले नाही? काँग्रेसचा सवाल

पुणे:
भारतीय जनता पक्षाने पुण्याच्या शांतताप्रिय संस्कृतीला काळिमा फासण्याचे काम केले आहे. काँग्रेस भवनासमोर तथाकथित आंदोलनाच्या नावाखाली भाजप कार्यकर्त्यांनी जो हिंसाचार केला, तो अत्यंत निंदनीय आहे. या हिंसेला खतपाणी घालणारे पुणे भाजप शहराध्यक्ष धीरज घाटे, महापौर मंजुषा नागपुरे आणि युवा मोर्चा अध्यक्ष दुष्यंत मोहोळ यांच्यावर तातडीने गुन्हे दाखल करण्याची मागणी पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीने केली आहे.काँग्रेसचे नगरसेवक, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या बैठकीत पुढील रणनीती ठरवण्यात आली. यावेळी पोलिसांनी जाणूनबुजून आंदोलन चिघळवण्याचा प्रयत्न केल्याचा गंभीर आरोप काँग्रेस नेत्यांनी केला. तसेच, कालच्या आंदोलनात महापौर मंजुषा नागपुरे यांनी चिथावणीखोर भाषण केले असतानाही त्यांच्याविरोधात गुन्हा का दाखल झाला नाही, असा सवाल काँग्रेसने उपस्थित केला आहे. गुन्हा नोंदवण्यासाठी पोलिसांनी वेळ लावल्याचा आरोपही काँग्रेसने केला आहे. पुणे पोलिसांच्या भूमिकेविरोधात काँग्रेस उच्च न्यायालयात जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
कॉंग्रेसच्या प्रसिद्धी पत्रकातील मुख्य मुद्दे:

  • पूर्वनियोजित कट: भाजपचे कालचे आंदोलन हे लोकशाही मार्गाने नसून हिंसक उद्देशाने आखलेले होते. भाजप कार्यकर्त्यांनी स्वतःसोबत दगड आणले होते, याचे व्हिडिओ पुरावे समोर आले आहेत.
  • चिथावणीखोर नेतृत्व: पुण्याच्या प्रथम नागरिक असलेल्या महापौर मंजुषा नागपुरे यांनी संयम राखण्याऐवजी आंदोलनात सहभागी होऊन कार्यकर्त्यांना चिथावणी दिली. तसेच धीरज घाटे आणि दुष्यंत मोहोळ यांनी आपल्या प्रक्षोभक भाषणांद्वारे कार्यकर्त्यांना काँग्रेस भवनावर हल्ला करण्यास प्रवृत्त केले.
  • दगडफेकीचा खोटा बनाव: स्वतःच्या कार्यकर्त्यांनी दगडफेक करायची आणि त्याचे खापर काँग्रेसवर फोडायचे, हा भाजपचा ‘इव्हेंट’ फ्लॉप झाला आहे. काँग्रेस भवनाच्या आवारात घुसण्याचा प्रयत्न करणाऱ्या भाजप गुंडांनीच गोंधळ घातला आणि पत्रकारांनाही इजा पोहोचवली.

शहराध्यक्ष अरविंद शिंदे यांनी सांगितले की, काँग्रेस पोलीस आयुक्त कार्यालयावर मोर्चा काढून पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्या बदलीची मागणी करणार आहे. हा मोर्चा लवकरच पुणे स्टेशन येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून काढण्यात येणार आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ हे देखील या मोर्चात सहभागी होणार आहेत.

या घटनेबाबत प्रशांत जगताप म्हणाले की, काँग्रेस भवन परिसरातील घटना दुर्दैवी असून, त्यातून भाजप राजकीय दहशतवाद माजवत असल्याचे दिसते. पुणे पोलिसांनी पक्षपातीपणा केला आणि भाजपाच्या कार्यकर्त्यांना का अडवले नाही, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. मुख्य रस्ता दोन तास अडवल्याने आंदोलनाला हिंसक वळण मिळाल्याचेही त्यांनी नमूद केले.

जगताप यांनी सांगितले की, त्यांना मिळालेल्या एफआयआर कॉपीमधून महापौरांचे नाव वगळण्यात आले आहे. त्यांच्या प्रक्षोभक भाषणामुळे आंदोलनाला हिंसक वळण मिळाले होते. महापौरांचे नाव वगळण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी दबाव टाकला का, असा प्रश्नही जगताप यांनी विचारला. मुंबई उच्च न्यायालयात सर्व पुरावे घेऊन दाद मागणार असून, आमच्यावर खोटे गुन्हे दाखल करण्यात आल्याचेही ते म्हणाले. सीसीटीव्ही फुटेजमध्ये मंजुषा नागपुरे आंदोलनात उपस्थित असल्याचे दिसत आहे, असेही जगताप यांनी नमूद केले.

आंतरराज्यीय टोळी पकडून सव्वाचार कोटींचे मेफेड्रोन जप्त.


पुणे : खराडी येथे अमली पदार्थासह पकडलेल्या दोन संशयितांपासून धागा पकडत पोलिसांनी थेट राजस्थानमध्ये धडक कारवाई करीत मेफेड्रॉन (एमडी) तस्करी करणारी आंतरराज्यीय टोळी उद्ध्वस्त केली. या कारवाईत एक किलो ९६० ग्रॅम एमडी, रोख रक्कम, मोबाईल, चारचाकी वाहन आदी मिळून चार कोटी २७ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, सहा आरोपींना अटक करण्यात आली आहे.

ही माहिती गुन्हे शाखेचे पोलिस उपायुक्त निखिल पिंगळे आणि परिमंडळ सातचे पोलिस उपायुक्त सोमय मुंडे यांनी सोमवारी (ता. १६) पत्रकार परिषदेत दिली. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, खराडीतील इऑन फेज-२ जवळ तीन फेब्रुवारी रोजी पहाटे मोतीसिंह श्रवणसिंह राजपुरोहित (वय २८) आणि हरीश सुजनाराम देवासी (वय २२, रा. वाघोली) या दोघांना २७ ग्रॅम एमडीसह ताब्यात घेण्यात आले होते.

त्यांच्याकडून मुद्देमाल जप्त करून खराडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. तपासात दोघेही आरोपी राजस्थानमधील जोधपूर जिल्ह्यातील असून, ते तेथून एमडी मागवून शहरात विक्री करीत असल्याचे समोर आले.

त्यानंतर सात फेब्रुवारी रोजी वाघोली परिसरातून योगेश ऊर्फ मनीष विष्णोई (वय ३०, रा. जोधपूर) याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून १५१ ग्रॅम एमडी जप्त करण्यात आले. तसेच, त्याचा साथीदार सचिन ऊर्फ एस.के. विष्णोई याला हडपसर-मुंढवा परिसरातून ताब्यात घेतले. त्याच्याकडील चार लाख ६५ हजारांची रोकड आणि मोबाईल जप्त करण्यात आला.

या आरोपींच्या चौकशीत मांजरी बुद्रूक येथील अमित सुनील घुले (वय ४०) याचा सहभाग उघड झाला. त्याच्याकडून ३९८ ग्रॅम एमडी आणि वाहन असा एक कोटी दोन लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. दरम्यान, मुख्य सूत्रधार राजस्थानमध्ये असल्याची माहिती मिळाल्यानंतर पाच तपास पथके राजस्थानला रवाना करण्यात आली.

तेथे छापे टाकून मुख्य वितरक रतनलाल किष्णाराम जाट (वय २०) याला अटक केली. त्याच्याकडून दोन कोटी ७६ लाख रुपये किमतीचे एक किलो ३८४ ग्रॅम एमडी जप्त करण्यात आले. तसेच फरार आरोपी रामकरण जाट यालाही ताब्यात घेण्यात आले. या संपूर्ण कारवाईत एकूण एक किलो ९६० ग्रॅम एमडी, रोख रक्कम, मोबाईल, मोटार आदी मिळून चार कोटी २७ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

ही कारवाई पोलिस आयुक्त अमितेश कुमार, पोलिस उपायुक्त सोमय मुंडे, गुन्हे शाखेचे उपायुक्त निखिल पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. खराडीचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक संजय चव्हाण, प्रभारी निरीक्षक पंडित रेजितवाड यांच्यासह विविध पथकातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी कारवाईत सहभाग घेतला. पुढील तपास सहाय्यक निरीक्षक रवींद्र गोडसे करीत आहेत.

स्मार्ट मीटर बसविण्यात महाराष्ट्राचा देशात प्रथम क्रमांक

0

मुंबई, १६ फेब्रुवारी २०२६: ग्राहकांना अचूक बिलासोबत विविध सुविधा उपलब्ध करून देणारे ८७.५७ लाख अत्याधुनिक स्मार्ट मीटर बसवून महाराष्ट्राने देशात प्रथम क्रमांक मिळविला असून राज्याच्या या यशात महावितरणची ८५.८५ लाख स्मार्ट मीटरसह प्रमुख कामगिरी आहे, अशी माहिती महावितरणचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांनी दिली.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात राज्यात ऊर्जा परिवर्तन चालू आहे. सौर कृषी पंप बसविण्यासह विविध बाबतीत महाराष्ट्राने देशात ऊर्जा क्षेत्रात प्रथम क्रमांक मिळविला आहे. आता स्मार्ट मीटर बसविण्यातही महाराष्ट्र राज्य पहिल्या क्रमांकावर आले आहे.

शंभर टक्के अचूक बिल, ग्राहकांना दर तासाला मोबाईलवर विजेचा वापर समजण्याची सुविधा, सवलतीच्या वीजदराच्या काळात अधिक वीजवापराची उपकरणे वापरण्याचे नियोजन करणे व विजेचा वापर नियंत्रणात ठेवण्याची संधी असे अनेक लाभ असलेले स्मार्ट मीटर महावितरणकडून मोफत बसविण्यात येत आहेत. स्मार्ट मीटर बसविलेल्या घरगुती वीज ग्राहकांना दिवसाच्या वीज वापराबद्दल प्रती युनिट ८० पैसे टीओडी सवलतही देण्यात येत आहे. त्याच प्रमाणे औद्योगिक आणि वाणिज्यिक वीज ग्राहकांनाही सकाळी ९ ते सायंकाळी ५ या कालावधीतील वीज वापरासाठी वीजदरात सवलत देण्यात येत आहे. राज्यात ९ फेब्रुवारी ते २३ फेब्रुवारी या कालावधीत स्मार्ट मीटर जनजागृती पंधरवडा साजरा करण्यात येत आहे.

स्मार्ट मीटर बसविण्याच्या बाबतीत दि. १० फेब्रुवारीपर्यंतच्या ताज्या आकडेवारीनुसार ८७.५७ लाख स्मार्ट मीटरसह महाराष्ट्र देशात प्रथम क्रमांकावर असून बिहार (८६.४४ लाख) व उत्तर प्रदेश (८२.७५ लाख) ही राज्ये अनुक्रमे दुसऱ्या व तिसऱ्या स्थानावर आहेत.

विजेचा वापर कोणत्या वेळेला झाला त्यानुसार वीजदरात सवलत देण्याला टाईम ऑफ डे (टीओडी) सवलत म्हणतात. स्मार्ट मीटरमध्ये अशा प्रकारे वेळेनुसार वीजवापर मोजण्याची सुविधा आहे व ग्राहकांनाही त्यांच्या मोबाईल फोनमधील ॲपमध्ये दर तासाला आपल्या घरात अथवा कार्यालयात किती वीज वापर होत आहे, हे समजते. स्मार्ट मीटरमुळे घरगुती ग्राहकांनाही टीओडी सवलत सुरू केली आहे. राज्यातील ५४ लाख ४२ हजार घरगुती ग्राहकांना जुलै २०२५ ते जानेवारी २०२६ या सात महिन्यांच्या मासिक वीजबिलामध्ये तब्बल ५१ कोटी ४२ लाख रुपयांचा लाभ झाला आहे. याखेरीज या कालावधीत लघुदाब वर्गवारीतील औद्योगिक ग्राहकांना १०६ कोटी ८९ लाख रुपये, वाणिज्यिक ग्राहकांना ४३ कोटी रुपये, सार्वजनिक पाणीपुरवठ्यासाठी ७ कोटी ३० लाख रुपये तर अन्य ग्राहकांना ६ कोटी ७० लाख रुपये टीओडी सवलत लाभ झाला आहे. याची एकूण रक्कम २१५ कोटी ३५ लाख रुपये होते. उच्चदाब ग्राहकांना या कालावधीत दिवसाच्या वीजवापराबद्दल १३४९ कोटी रुपयांचा टीओडी लाभ मिळाला असून त्यामध्ये औद्योगिक ग्राहकांचा वाटा ११०५ कोटी रुपये आहे.

स्मार्ट मीटर बसविलेल्या ग्राहकांनी मोबाईल फोनमध्ये ॲप डाऊनलोड करून त्यामध्ये आपला वीजवापर नियमित तपासावा, असे आवाहन महावितरणतर्फे करण्यात आले आहे.

स्मार्ट मीटरच्या बाबतीत स्वयंचलित पद्धतीने वीजवापराचे रिडींग नोंदविले जाते. त्यामुळे ग्राहकाला वीजवापराचे अचूक बिल मिळते. राज्यात स्मार्ट मीटरचा वापर वाढत आहे व त्याचबरोबर बिलिंगच्या तक्रारी कमी होत आहेत. राज्यात बिलिंगच्या तक्रारीचे प्रमाण अर्धा टक्क्यावर आले आहे. त्यामुळे स्मार्ट मीटरमुळे वीजबिल वाढते या तक्रारीत तथ्य नसल्याचे स्पष्ट होते.

स्मार्ट मीटरमुळे वीजदरात वाढ होईल, असाही एक गैरसमज निर्माण झाला होता. तथापि, राज्यात स्मार्ट मीटर बसविण्यास सुरुवात केल्यानंतर महावितरणने पंचवार्षिक वीजदर निश्चितीसाठी महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाकडे दाखल केलेल्या याचिकेत वीजदर कमी करण्यासाठी परवानगी मागितली आहे. त्यामुळे ग्राहकांना स्मार्ट मीटर मोफत मिळण्यासोबतच त्याचा अप्रत्यक्ष बोजाही पडणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे.

राज्यात सर्व विद्युत फीडरवर स्मार्ट मीटर बसविण्यात आले असून त्यांची संख्या ३०,१६४ आहे तर राज्यात २.८० लाख डिस्ट्रिब्युशन ट्रान्सफॉर्मर्सवर स्मार्ट मीटर बसविण्यात आले आहेत. त्यामुळे वीज वितरण प्रणालीतील विजेचा नेमका वापर समजण्यास मदत होत आहे. याच्या आधारे वीज वितरण प्रणालीचे प्रभावी व्यवस्थापन करणे, वीजगळती रोखणे आणि प्रभावी एनर्जी ऑडिटसाठी मदत होणार आहे. विजेच्या मागणीचा पॅटर्न अचूक ओळखून त्यानुसार पुरवठ्याचे नियोजन करण्यासाठी ही आकडेवारी अत्यंत उपयुक्त आहे. आगामी काळात ग्राहकांना ज्या सवलती मिळतील त्या स्मार्ट मीटरमध्ये वेळेच्या आधारे झालेल्या वीजवापराच्या अचूक नोंदीच्या आधारावर असतील. त्यामुळे ग्राहकांकडे स्मार्ट मीटर असणे गरजेचे आहे.

स्मार्ट मीटरचे लाभ –
• शंभर टक्के अचूक बिल
• ग्राहकाला दर तासाला मोबाईलवर वीजवापर समजतो
• दिवसाच्या वीजवापरसाठी वीजदरात टीओडी सवलत
• ग्राहकाला वीज वापरावर नियंत्रण ठेवणे आणि वापराचे नियोजन करण्याची सुविधा

‘विजाभज’आश्रम शाळेतील १०० विद्यार्थी पुण्याहून इस्रो भेटीसाठी विमानाने रवाना

पुणे : राज्यातील विविध ‘विजाभज’आश्रमशाळांमधून गुणवत्ता परीक्षेद्वारे १०० विद्यार्थ्यांची इस्रो भेटीकरिता निवड करण्यात आली असून पुढच्या वर्षी यापेक्षा अधिक विद्यार्थ्यांना इस्रो भेटीची संधी उपलब्ध करुन देण्यात येईल, असे प्रतिपादन इतर मागास बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे यांनी केले. इस्रो भेटीद्वारे विद्यार्थ्यांनी अंतराळ विज्ञानाचे ज्ञान मिळविण्यासह आपल्यात वैज्ञानिक दृष्टीकोन रुजवावा, असे आवाहनही त्यांनी केले.

इतर मागास बहुजन कल्याण विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या “विज्ञान प्रेरणा अभियान” अंतर्गत विजाभज आश्रमशाळांमधील १०० गुणवंत विद्यार्थ्यांना भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इस्रो) येथे सहादिवशीय विशेष शैक्षणिक विज्ञान सहलीचे २० फेब्रुवारी २०२६ पर्यंत आयोजन करण्यात आले असून आज लोहगाव विमानतळ येथे त्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला, त्यांनतर विद्यार्थी विमानाने रवाना झाले. यावेळी इतर मागास बहुजन कल्याण विभागाचे संचालक प्रशांत शिर्के, प्रादेशिक उपसंचालक खुशाल गायकवाड, सहायक संचालक प्रदीप संकपाळ, सीआयएसएफचे वरिष्ठ कमांडट प्रताप पुंडे, आश्रमशाळेचे पदाधिकारी, शिक्षकवृंद आदी उपस्थित होते.

मंत्री सावे म्हणाले, या विद्यार्थ्यांना इस्रो येथे भेट देऊन उपग्रह निर्मिती, प्रक्षेपण तंत्रज्ञान, प्रत्यक्ष रॅाकेटचे प्रक्षेपण पाहणे आणि अंतराळ संशोधन प्रकल्पांविषयी प्रत्यक्ष माहिती घेण्याची संधी मिळणार आहे. तसेच विज्ञानविषयक कार्यशाळा आणि शास्त्रज्ञांशी, तज्ज्ञांशी संवादाच्या माध्यमातून त्यांना अनुभवाधारित शिक्षणाचा लाभ होणार आहे. ग्रामीण विद्यार्थ्यांना राष्ट्रीय स्तरावरील वैज्ञानिक संस्थांशी जोडणे, त्यांचा आत्मविश्वास वाढविणे आणि उच्च शिक्षणाच्या संधींबाबत जागरूकता निर्माण करणे हा या उपक्रमाचा प्रमुख उद्देश आहे. असा उपक्रम विभागामार्फत पहिल्यांदाच राबविण्यात येत आहे. विद्यार्थ्यांनी भेटीचे अनुभवावर आधारित निबंध लिहावेत, यामधून उत्कृष्ट निबंधाला बक्षीस देण्यात येईल.

ते पुढे म्हणाले, ग्रामीण भागातील आश्रमशाळेच्या विद्यार्थ्याना दर्जेदार शिक्षण घेतांना अडचणी येऊ नये, याकरिता वस्तीगृह, सोलारच्या माध्यमातून 24 तास वीज, कपडे धुण्याकरिता वाशिंग मशीन अशा पायाभूत सुविधा उपलब्ध सुविधा करुन देण्यात येत आहे, शिक्षण घेवून राष्ट्राचे उत्कृष्ट नागरिक होईल, अशा विश्वास श्री. सावे यांनी व्यकत केला.

९८० शाळांतून निवडलेले १०० गुणवंत विद्यार्थी
राज्यातील ९८० विजाभज आश्रमशाळांमधून इयत्ता ९ वी व ११ वीच्या विद्यार्थ्यांची गुणवत्ता परीक्षा घेण्यात आली. त्यातून ५० विद्यार्थी व ५० विद्यार्थीनी अशा एकूण १०० विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली आहे.

सहलीचे नियोजन :
विद्यार्थी १५ फेब्रुवारी ते २० फेब्रुवारी या कालावधीत पुणे, बेंगलुरू, त्रिवेंद्रम, कन्याकुमारी या शहरातील विविध ठिकाणांना भेटी देणार आहेत. त्यानुसार आज पुणे – पिंपरी-चिंचवड सायन्स पार्क व नॅशनल वॉर मेमोरियल येथे भेट. १६ फेब्रुवारी पुणे – भारतीय विज्ञान शिक्षण व संशोधन संस्था (IISER) येथे प्रयोगाधारित विज्ञान कार्यशाळा व शास्त्रज्ञांशी संवाद साधला. तसेच १७ फेब्रुवारी रोजी बंगळुरू – विश्वेश्वरय्या औद्योगिक व तंत्रज्ञान संग्रहालय, हिंदुस्तान विमान निर्मिती वारसा संग्रहालय व लालबाग वनस्पती उद्यान भेट. १८ फेब्रुवारी रोजी तिरुवनंतपुरम (थुंबा) – भारतीय अंतराळ संशोधन संस्था केंद्र, उपग्रह प्रदर्शन विभाग व प्रक्षेपण तंत्रज्ञान गॅलरी भेट; रॉकेट प्रक्षेपणाचे अवलोकन. तसेच नेपियर संग्रहालय व कोवलम समुद्रकिनारा भेट आणि १९ फेब्रुवारी रोजी कन्याकुमारी-पद्मनाभपुरम राजवाडा, विवेकानंद शिला स्मारक, तिरुवल्लुवर पुतळा, गांधी स्मारक तसेच सूर्यास्त दर्शन घेणार आहेत.

धनश्री केंद्रे: इतर मागास बहुजन कल्याण विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या “विज्ञान प्रेरणा अभियान” अंतर्गत पुण्याहून इस्रो भेटीसाठी विमानाने जात आहे. आमच्या आयुष्यातील अविष्मरणीय क्षण आहे. याबद्दल मंत्री अतुल सावे यांचे मनापासून आभार मानते.

दिपक पवार: इतर मागास बहुजन कल्याण विभाग, शिक्षक, आई-वडीलांमुळेच आम्हाला इस्रो भेटीची सुवर्णसंधी मिळाली आहे. यासंधीचे जीवनात निश्चित उपयोग होईल.

राष्ट्रीय नैसर्गिक शेती फेडरेशनची पंढरपूर येथे स्थापना

पुण्यातील सोशल रिस्पॉन्सिबिलिटी, राष्ट्रीय कर्तव्य अभियान समूहाचा पुढाकार
पुणे : रासायनिक खते व कीटकनाशकांच्या प्रभावामुळे भारतातील ३० टक्के जमिनी नापिक झाल्या आहेत, देशात दरवर्षी पंधरा लाख पेक्षा अधिक नागरिकांना कॅन्सर सारखा गंभीर आजार होत आहे. शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी, ग्रामीण रोजगार निर्मितीसाठी अथवा  पर्यावरण संतुलनासाठी नैसर्गिक शेतीची लोकचळवळ उभारणी करणे काळजी गरज आहे. यासाठी संत गजानन महाराज प्रगट दिनाचे निमित्त साधून, पुण्यातील सोशल रिस्पॉन्सिबिलिटी, राष्ट्रीय कर्तव्य अभियान समूहाच्या माध्यमातून, सदगुरु दुंडा महाराज (देगलूरकर) मठ पंढरपूर येथे राष्ट्रीय नैसर्गिक शेती फेडरेशन ची स्थापना करण्यात आली.

या वेळी कृषी भूषण तात्या मगर, राष्ट्रीय कर्तव्य अभियानाचे मुख्य विजय वरुडकर, संघ जिल्हा कार्यवाह प्रताप टपले, सोशल रिस्पॉन्सिबिलिटी समूहाचे संचालक आचार्य ज्ञानेश्वर शिंदे, खुशालचंद मोरे, सुरेश घाडगे,  पांडुरंग बरळ, दत्तात्रय हरळे, गजानन मगर, नानासाहेब जाधव, हनमंत जाधव, कलप्पा भतगुणकी, उदय मुळे, विठ्ठल क्षीरसागर, अरुण जगताप, प्रताप देशमुख, शुभम अडबाल, डॉ बापु तारसे इतर शेतकरी उपस्थित होते.

सोशल रिस्पॉन्सिबिलिटी समूह गेली १२ वर्षा पेक्षा अधिक काळ सामाजिक क्षेत्रात कार्यरत आहे. आज पर्यंत सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या राज्यातील ३०००  पेक्षा अधिक सामाजिक संस्था, १००० पेक्षा अधिक गोशाळा गोपालक, ५००० पेक्षा अधिक कीर्तनकार यांची बांधणी करण्यात आली आहे.  मागील वर्षी महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून ५००० पेक्षा अधिक शेतकऱ्यांना नैसर्गिक शेती विषयी प्रशिक्षण पूर्ण करण्यात आले होते.

ग्रामीण स्वावलंबन विषयी काम करतांना गट शेतीतून कृषी उद्योग विकसित करणे हा हेतू ठेऊन राष्ट्रीय नैसर्गिक शेती फेडरेशन कार्यरत असणार आहे. भविष्यात उद्योगांचे दाईत्व आलेल्या सीएसआर प्रकल्पांची जोडणी ग्राम समस्या निवारणासाठी व नैसर्गिक शेती प्रकल्प गतिशील करण्यासाठी सोशल रिस्पॉन्सिबिलिटी समूह प्रयत्नशील असेल, असे विजय वरुडकर यांनी सांगितले.

प्रांत, जिल्हा व तालुका स्तरावर संयोजक समिती स्थापन करून गाव, गोशाळा, शेतकरी गट अथवा बचत गट यांना केंद्र करून नैसर्गिक शेती प्रकल्पांची बांधणी व प्रशिक्षण सत्र आयोजन केले जाईल असे सांगण्यात आले.

कृषी भूषण तात्या मगर यांनी सांगितले की,  रासायनिक खत बी बियाणांवर दर वर्षी दीड लाख करोड पेक्षा अधिक रुपयांचे अनुदान केंद्र सरकार देत आहे. त्या एवजी शेतकऱ्यांना देशी गोवंश पालनासाठी, नैसर्गिक शेतीसाठी आर्थिक अनुदान सरकार नी द्यावे. ज्या मुळे खऱ्या अर्थाने शेती विकास होईल.

ज्ञानेश्वर शिंदे म्हणाले की गेली एक वर्ष आम्ही या फेडरेशनच्या बांधणी व कामकाज विषयी विचार विनिमय करत आहोत. महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल महामहीम आचार्य देवव्रत हे सच्चे गोभक्त व नैसर्गिक शेती चे प्रवर्तक आहेत. आम्ही लवकरच माननीय राज्यपाल यांची भेट घेऊन नैसर्गिक शेती प्रकल्पांची पुढील वाटचाल आपणास कळवू.

राष्ट्रीय नैसर्गिक शेती फेडरेशन लोक चळवळीसोबत जुडण्यासाठी ७५८८९५४५८० या क्रमांक वर संपर्क साधावा अशी माहिती देण्यात आली.

भावभावना व्यक्त करण्याचे कविता उत्तम माध्यम : सुनील वेदपाठक

२१ व्या गुंफण सद्‌भावना साहित्य संमेलनाचा समारोप

पुणे : कवितेचे अवकाश विस्तीर्ण आहे. मनातील भावभावना व्यक्त करण्याचे कविता हे सशक्त माध्यम आहे, असे मत निवृत्त मुख्य न्यायाधीश सुनील वेदपाठक यांनी व्यक्त केले.

गुंफण अकादमी, कराड आणि भारतीय शिक्षण संस्था, कोथरूड यांच्या संयुक्त विद्यमाने रविवारी (दि.१५) आयोजित करण्यात आलेल्या २१व्या गुंफण सद्‌भावना साहित्य संमेलनाच्या समारोप समारंभात सुनील वेदपाठक बोलत होते. संमेलन कोथरूडमधील जे. पी. नाईक शिक्षण आणि विकास केंद्राच्या संकुलात आयोजित करण्यात आले होते. संमेलनाच्या अध्यक्षा प्रा. डॉ. सुनंदा शेळके, भारती विद्यापीठाचे सहकार्यवाह डॉ. महादेव सगरे, ज्येष्ठ साहित्यिक डॉ. संजय बोरुडे, ज्येष्ठ ग्रामीण साहित्यिक बबन पोतदार, भोगावती कारखान्याचे संचालक बी. ए. पाटील, भारतीय शिक्षण संस्थेचे सदस्य सचिव डॉ. जयसिंग कळके, गुंफण अकादमीचे अध्यक्ष डॉ. बसवेश्वर चेणगे मंचावर होते.

यावेळी गुंफण पुरस्कारांचे वितरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यात निवृत्त पोलीस उपधीक्षक अनिल पाटील (साहित्य), आपुलकी प्रतिष्ठान (सामाजिक), शाहीर रंगराव पाटील (सांस्कृतिक), ओमप्रकाश कोयटे (सहकार भूषण), युवराज गाडवे (उद्योगरत्न), प्रा. डॉ. विजयंता भुरले (शिक्षणरत्न), संदेशकुमार नवले (सद्‌भावना), विठ्ठल जाधव (पत्रकारिता) यांचा गौरव करण्यात आला. पुरस्कारार्थींच्या वतीने ओमप्रकाश कोयटे, राजेंद्र यादव यांनी मनोगत व्यक्त केले.

याचप्रमाणे प्रेमलाताई चव्हाण राज्यस्तरीय विनोदी कथा स्पर्धेतील विजेत्यांना गौरविण्यात आले. प्रथम – योगेश शिंदे (शेजारी(ण)), द्वितीय – वीरेंद्र पतकी (चिता), तृतीय – डॉ. प्रभाकर शेळके (कंदुरी … एक मुंढी चार पाय) यात यांचा समावेश आहे.

डॉ. महादेव सगरे म्हणाले, कृत्रिम बुद्धिमत्तेविषयी सध्या चर्चा ऐकायला मिळते. हे आधुनिक तंत्रज्ञान साहित्य क्षेत्राच्या दृष्टीने उपयोगी आहे की घातक हे भविष्यात ठरणार आहे.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुजीत शेख यांनी केले तर आभार स्वाती बाजारे यांनी मानले.

खडकी स्टेशन ते औंध रोड पर्यंत सिमेंट रस्त्यासाठी आर्थिक तरतूद करा – सुनील माने

औंध (प्रतिनिधि) : खडकी स्टेशन, औंध रोड या रस्त्यावर वाहतुकीच्या समस्या असल्याने वाहनचालकांना मोठ्या प्रमाणावर त्रास सहन करावा लागत आहे. या त्रासातून वाहनधारकांची मुक्तता होण्यासाठी खडकी स्टेशन ते ब्रेमेन चौक  हा रस्ता चांगल्या प्रतीचा तयार करण्यासाठी हा रस्ता संपूर्ण सिमेंटचा करणे गरजेचे आहे, तसेच पादचाऱ्यांच्या सोयीसाठी रस्त्याच्या दोन्ही बाजूला फुटपाथ करावे. अशी मागणी राष्ट्रवादी कॉँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेश सरचिटणीस, प्रवक्ते सुनील माने यांनी केली आहे.  या मागणीचे पत्र त्यांनी आज महापालिकेच्या पथ विभागाचे मुख्य अभियंता रमेश वाघमारे यांना दिले. याबाबत त्यांनी या रस्त्यांच्या कामाला लवकरात लवकर सुरुवात करण्याचे आश्वासन दिले.

सुनील माने यांनी दिलेल्या पत्रात म्हटले आहे की, ब्रेमन चौक ते औंध रोड आंबेडकर चौक या रस्त्यावर वाहतुकीच्या अनेक समस्या आहेत. यामुळे वाहनचालकांना त्रास सहन करावा लागत आहे. या रस्त्याची दुरुस्ती करावी याबाबत मी पुणे यापूर्वी २४ नोव्हेंबर रोजी पुणे महानगरपालिकेचे तत्कालीन पथविभागाचे मुख्य अभियंता अनिरुद्ध पावस्कर यांना  दिले होते. यानंतर २५ नोव्हेंबर रोजी वाहतूक विभागाचे अतिरिक्त पोलिस आयुक्त मनोज पाटील यांना पत्र दिले होते.  माझ्या या पत्रानुसार २८ नोव्हेंबर रोजी वाहतूक पोलिस व पथ विभागाच्या अधिकाऱ्यांसह ब्रेमेन चौक ते खडकी स्टेशन या रस्त्याची आम्ही संयुक्त पाहणी केली होती. या पाहणी दरम्यान ब्रेमन चौक ते खडकी स्टेशन परिसरात जागोजागी रस्ता खराब असल्याचे तसेच काही ठिकाणी रस्त्याचे फक्त डांबरीकरण असल्याचे लक्षात आले. या संयुक्त पाहणीत हा रस्ता प्राधान्यक्रमाने सिमेंट काँक्रीटचा करणे गरजेचे आहे, तसेच लोकांच्या सुविधेसाठी रस्त्याच्या दोन्ही बाजूला फुटपाथ करावेत यावर एकमत झाले होते. त्या संदर्भात आधी झालेल्या चर्चेनुसार कृपया या रस्त्यासाठी लवकरात लवकर आर्थिक तरतूद करावी अशी मागणी त्यांनी या पत्राद्वारे केली आहे. या मागणीवर सकारात्मकता दाखवत लवकरात लवकर या रस्त्याचे काम सुरू करण्याचे आश्वासन मुख्य अभियंता रमेश वाघमारे यांनी दिले.

भक्ती धावले ठरली देशभक्त ‘केशवराव जेधे करंडका’ची मानकरी

श्री शिवाजी मराठा सोसायटीच्या वतीने आयोजित चौथी आंतरमहाविद्यालयीन राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धा

पुणे : श्री शिवाजी मराठा सोसायटीच्या वतीने आयोजित आंतरमहाविद्यालयीन राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेत आबासाहेब गरवारे महाविद्यालयाची भक्ती धावले ही देशभक्त केशवराव जेधे करंडकाची मानकरी ठरली. संताजी महाविद्यालय येथील अनिकेत वनारे याने द्वितीय तर मुंबई विद्यापीठचा यश पाटील याने तृतीय क्रमांक पटकाविला. स्पर्धेचे यंदा चौथे वर्ष होते.

स्पर्धेचे उद्घाटन सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठतील तत्त्वज्ञान विभागाचे विभागप्रमुख प्रा.डॉ. हरीश नवले यांच्या हस्ते झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री शिवाजी मराठा सोसायटीचे सहसचिव विकास गोगावले होते. स्पर्धेचे पारितोषिक वितरण पुणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष आणि महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषदेचे माजी उपाध्यक्ष विजय कोलते यांच्या हस्ते झाले. शुक्रवार पेठेतील समाजभूषण बाबूराव उर्फ अप्पासाहेब जेधे कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय येथे ही स्पर्धा झाली. यावेळी श्री शिवाजी मराठा सोसायटीचे उपाध्यक्ष राजेंद्र जगताप, नियामक मंडळाचे अध्यक्ष सत्येंद्र कांचन, खजिनदार जगदीश जेधे, सुनील जगताप, बाळासाहेब गायकवाड, तानाजी घारे, संग्राम कोंडे, महाविद्यालयाच्या प्राचार्य प्रा.डॉ. दिपाली आर. पाटील, संयोजक समिती सदस्य डॉ. अमित गोगावले आणि संयोजक समितीतील सर्व सदस्य उपस्थित होते.

विजय कोलते म्हणाले, तुमच्या मनातील विचार नेमक्या शब्दात सांगता येणे ही कला जमली पाहिजे. महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी आपली गुणवत्ता विकसित करण्याचे काम महाविद्यालयीन जीवनात करायचे असते. बोलणे ही खूप मोठी कला आहे. शिक्षकांनी देखील पुस्तक यातील अभ्यासाव्यतिरिक्त चरित्रगाथा सांगितल्या पाहिजेत. विद्यार्थ्यांनी उत्तम व्यक्त होऊन बोलले पाहिजे, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

प्रा.डॉ. हरीश नवले यांनी वक्तृत्व कलेचा इतिहास सांगितला आणि सॉक्रेटिस, प्लेटो आणि ॲरिस्टॉटल यांचे संवाद या विषयावर सविस्तर भाष्य केले. वक्त्याच्या अंगी आचरण विषयक नितीशास्त्र, भावनात्मक आवाहन करण्याची क्षमता आणि तर्कसंगत युक्तिवाद करण्याचे गुण असणे आवश्यक आहे असे सांगून वक्तृत्वाकडे समाजपरिवर्तनाचे साधन म्हणून पाहिले पाहिजे असे मत व्यक्त केले. विकास गोगावले यांनी मनोगत व्यक्त केले.

स्पर्धेत पाच उत्तेजनार्थ पारितोषिके देण्यात आली. यामध्ये अभय आळशी, मुंबई विद्यापीठ मुंबई. नितीन गागरे, संस्कार मंदिर संस्थेचे कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालय पुणे, प्रणव मोहोकार, सीओइपी पुणे, अनुष्का चौधरी, एआयएसएसएमएस आणि तनिष्का जाधव सीओईपी पुणे हे उत्तेजनार्थ विजेते ठरले.

स्पर्धेचे परीक्षण डॉ. योगेश बोराटे (वृत्त व संज्ञापन विभाग रानडे इन्स्टिट्यूट, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुणे), प्रा.डॉ. पांडुरंग कंद (आबासाहेब गरवारे महाविद्यालय) आणि प्रा. स्वामीराज भिसे (टी.जे महाविद्यालय, खडकी) यांनी केले. स्पर्धेतील प्रथम क्रमांकाच्या विजेत्याला ११,१११ रु., द्वितीय क्रमांकाला ७,७७७ रु., तृतीय क्रमांकाला ५,५५५ रु. आणि उत्तेजनार्थ क्रमांकाला १,१११ रु. रोख आणि स्मृतीचिन्ह व प्रमाणपत्र देण्यात आले. स्पर्धेच्या उद्घाटन समारंभाचे डॉ. दिपाली आर. पाटील यांनी प्रास्ताविक केले. प्रा.डॉ. अमित गोगावले यांनी सूत्रसंचालन केले. प्रा.डॉ. विशाल गायकवाड यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला तर प्रा.डॉ. दीपक सुरवसे यांनी आभार मानले. पारितोषिक वितरण समारंभाचे सूत्रसंचालन प्रा.डॉ. संतोष यादव यांनी केले. प्रमुख पाहुण्यांचा परिचय प्रा.डॉ. रजनी जरांडे यांनी करून दिला तर आभार प्रदर्शन प्रा. शितल वाघमारे यांनी केले.

गुरु तेग बहादुर : भारताच्या धर्मस्वातंत्र्य परंपरेचे प्रतीक

भारताच्या इतिहासात धर्मस्वातंत्र्य, मानवी मूल्ये आणि सर्वधर्मसमभाव यांसाठी दिलेल्या सर्वोच्च त्यागांमध्ये गुरु तेग बहादुर यांचे बलिदान अग्रक्रमाने स्मरणात राहते. त्यांच्या ३५० व्या शहीदी वर्षानिमित्त त्यांच्या जीवनकार्याचा आणि संदेशाचा स्मरणोत्सव देशभर साजरा करण्यात येत आहे.

सन १६७५ च्या सुमारास तत्कालीन परिस्थितीत काही भागांमध्ये धार्मिक तणाव निर्माण झाला होता. अशा वेळी पीडित घटकांनी संरक्षण व मार्गदर्शनासाठी गुरु तेग बहादुर यांच्याकडे धाव घेतली. त्यांनी कोणत्याही एका धर्मापुरते मर्यादित न राहता, प्रत्येकाला आपल्या श्रद्धेनुसार जगण्याचा अधिकार आहे, हा मूलभूत संदेश दिला. धर्मस्वातंत्र्याचे रक्षण हीच खरी मानवसेवा आहे, या भूमिकेतून त्यांनी अन्यायासमोर न झुकता तत्त्वनिष्ठ भूमिका घेतली.

दिल्ली येथे त्यांना अटक करून धर्मांतराचा दबाव टाकण्यात आला; परंतु त्यांनी आपल्या तत्त्वांशी तडजोड न करता शांत, संयमी आणि धैर्यपूर्ण भूमिका कायम ठेवली. १९ नोव्हेंबर १६७५ रोजी त्यांना सार्वजनिकरीत्या शहीद करण्यात आले. हे बलिदान केवळ एका समुदायासाठी नव्हे, तर सर्वांच्या धार्मिक स्वातंत्र्यासाठी दिलेले महान योगदान म्हणून इतिहासात नोंदले गेले आहे. त्यामुळेच त्यांना “हिंद दी चादर” — म्हणजेच भारताच्या संरक्षणाची चादर — अशी गौरवपूर्ण उपाधी लाभली.

त्यांच्या सोबत भाई मती दास, भाई सती दास आणि भाई दयाला यांनीही अद्वितीय धैर्य दाखवत सर्वोच्च बलिदान दिले. त्यांच्या त्यागामुळे मानवाधिकार, श्रद्धेचे स्वातंत्र्य आणि नैतिक धैर्य यांचे महत्त्व अधोरेखित झाले.

यानंतर गुरु गोविंद सिंह यांनी धर्म, शौर्य आणि संघटन यांचा संदेश अधिक बळकट केला. त्यांच्या चार साहिबजाद्यांचेही बलिदान भारतीय इतिहासातील प्रेरणादायी अध्याय मानले जाते. या घटनांनी अन्यायाविरुद्ध उभे राहण्याची आणि मूल्यांसाठी संघर्ष करण्याची प्रेरणा पुढील पिढ्यांना दिली.

गुरु तेग बहादुर यांच्या शहीदीच्या स्मरणार्थ देशातील विविध गुरुद्वारांमध्ये कीर्तन, प्रवचन, सामुदायिक सेवा उपक्रम व आरोग्य शिबिरे आयोजित केली जात आहेत. पुणे येथील गुरुद्वारा गुरु नानक दरबार, कॅम्प तसेच इतर गुरुद्वारा समित्यांच्या वतीनेही शहीदी दिवसानिमित्त विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात आले. आरोग्य तपासणी शिबिरे, नेत्र तपासणी तसेच महिलांसाठी विशेष आरोग्य मार्गदर्शन शिबिरांचे आयोजन करून समाजोपयोगी कार्य करण्यात आले असून नागरिकांनी त्याचा लाभ घेतला आहे. श्री गुरु तेग बहादूर साहिबच्या जीवनावर आधारित एक लाख पुस्तिका मोफत वितरण करण्यात आल्या आहेत.

३५० व्या शहीदी वर्षानिमित्त महाराष्ट्र शासनाच्या वतीने नवी मुंबई येथे दि. २८ फेब्रुवारी व १ मार्च २०२६ रोजी “हिंद-दी-चादर” या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या माध्यमातून गुरु तेग बहादुर यांचे त्याग, शौर्य आणि मानवतेचा संदेश समाजातील सर्व घटकांपर्यंत पोहोचविण्याचा उद्देश आहे.

गुरु तेग बहादुर यांचे जीवन आपल्याला सांगते की, कोणत्याही परिस्थितीत मानवी मूल्ये, सहिष्णुता आणि परस्पर आदर या तत्त्वांचा त्याग करू नये. धर्मस्वातंत्र्य आणि सामाजिक सलोखा यांसाठी दिलेले त्यांचे बलिदान भारतीय संस्कृतीतील सहअस्तित्वाच्या परंपरेचे तेजस्वी प्रतीक म्हणून सदैव स्मरणात राहील.

चरणजितसिंग साहनी: ‘हिंद-दी-चादर’कार्यक्रम राज्यस्तरीय समन्वय समितीचे अशासकीय सदस्य तथा अध्यक्ष, गुरुद्वारा गुरुनानक दरबार, कॅम्प, पुणे

संकलन: जिल्हा माहिती कार्यालय, पुणे

अतिउच्चदाब उपकेंद्रात पुन्हा बिघाड,भोसरी व पिंपरीतील वीजपुरवठ्यावर परिणाम

महावितरणकडून वीज ग्राहकांना सहकार्याचे आवाहन

पुणे : महापारेषण कंपनीच्या २२० के.व्ही. भोसरी अतिउच्चदाब उपकेंद्रातील ८० एमव्हीए (MVA) क्षमतेच्या अतिउच्चदाब रोहित्रामध्ये रविवारी (दि.१५) रात्री ११.१० वाजेच्या सुमारास अंतर्गत बिघाड झाला आहे. परिणामी या अतिउच्चदाब रोहित्रावर अवलंबून असलेला ८० एमव्हीएचा वीजभार बाधित झाला असून भोसरी व पिंपरी विभागातील वीज ग्राहकांवर त्याचा परिणाम होणार आहे. त्यामुळे महावितरणने या भागातील वीजग्राहकांना सहकार्याचे आवाहन केले आहे.

बाधित भागाची नावे-

•             एस ब्लॉक

•             जे ब्लॉक

•             डी २ ब्लॉक

•             एफ २ ब्लॉक

•             टी ब्लॉक

•             इंद्रायणीनगर

•             भोसरीगाव

•             जलवायू विहार

•             गंधर्व नगरी

•             सेक्टर ६,४

•             नेहरू नगर

•             संत तुकाराम नगर

•             दापोडी

•             कासारवाडी

पर्यायी व्यवस्थेसाठी युद्धपातळीवर प्रयत्न

दि. ०२ फेब्रुवारी,२०२६ महापारेषण कंपनीच्या  याच २२० के.व्ही. भोसरी अतिउच्चदाब उपकेंद्रातील ८० एमव्हीए (MVA) क्षमतेच्या अतिउच्चदाब रोहित्र अंतर्गत बिघाड झाला होता. त्यावेळी देखील महावितरणच्या भोसरी व पिंपरी  विभागामार्फत पर्यायी व्यवस्थेच्या माध्यमातून वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न  करण्यात आले होते.

सद्यस्थितीत देखील महावितरणच्या भोसरी व पिंपरी  विभागामार्फत पर्यायी व्यवस्थेच्या माध्यमातून वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न  सुरुच आहेत. दिवसभरात इतर वीजवाहिन्यांवर अतिरिक्त भार टाकून वीजपुरवठा सुरु करण्यात यश आले. परंतु, अतिरिक्त भारामुळे वीजपुरवठ्यात व्यत्यय येऊ शकतो. त्यावरही महावितरणकडून त्वरित उपाय योजना करण्यात येईल.

वीज ग्राहकांना सहकार्याचे आवाहन

अचानक उद्भवलेल्या या वीज संकटावर मात करण्यासाठी महावितरणचे प्रयत्न युद्धपातळीवर सुरू आहेत. अशावेळी वीज ग्राहकांनीही महावितरणला सहकार्य करावे, विजेचा वापर काटकसरीने करावा असे आवाहन महावितरण प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

बाणेर-बालेवाडी-सुस-म्हाळुंगे-पाषाण-सुतारवाडी-सोमेश्वरवाडी परिसरातील विविध विकासकामे तातडीने मार्गी लावा

पुणे – प्रभाग क्र.०९ बाणेर-बालेवाडी-सुस-म्हाळुंगे-पाषाण-सुतारवाडी-सोमेश्वरवाडी परिसरातील विविध विकासकामे तातडीने मार्गी लावण्याकरीता नगरसेवक बाबुरावआप्पा चांदेरे व नगरसेवक अमोल बालवडकर यांनी आयुक्त पुणे महानगरपालिका नवल किशोर राम यांची प्रत्यक्ष भेट घेऊन प्रभाग क्र.०९ करीता आगामी मनपाच्या अर्थसंकल्पामध्ये तरतुद तातडीने उपलब्ध करुन देण्यासंदर्भात निवेदन दिले.

यावेळी बाणेर-बालेवाडी-सुस-म्हाळुंगे-पाषाण-सुतारवाडी-सोमेश्वरवाडी परिसरातील प्रलंबित मुख्य रस्ते पुर्ण करण्याकरीता, मुख्य रस्त्यांलगतचे नविन पदपथ व अपुर्ण पदपथ विकसित करण्यासाठी, पाषाण तलाव पर्यटन विकसन करीता, सुस-म्हाळुंगे परिसरातील ड्रेनेज लाईन, रस्ते, पथदिवे विकसित करण्यासाठी, बाणेर-बालेवाडी परिसरातील उद्याने व मैदाने विकसित करण्याकरीता, परिसरातील स्वच्छता व दैनंदिन कचरा समस्या सोडवण्यासाठी नविन BRC गाड्या, घंटागाडी, गार्डन वेस्ट वेहिकल उपलब्ध करुन देण्याकरीता, निधी उपलब्ध करुन द्यावा अशी मागणी यावेळी मा.महापालिका आयुक्त यांच्याकडे करण्यात आली.

माझी जीभ कापायची असेल तर खुशाल कापा पण भाजपाला एक्सपोज करणे मी थांबणार नाही: हर्षवर्धन सपकाळ

देशातील ज्वलंत प्रश्नावरून जनतेचे लक्ष दुसरीकडे वळवण्यासाठी टिपू सुलतानच्या मुद्द्यावरून भाजपाची नौटंकी.

मुंबई, दि. १६ फेब्रुवारी २०२६

अदानी-अंबानी आणि अमेरिकेचे भले करणाऱ्या, संविधान बदलू पाहणाऱ्या भाजपला मी एक्सपोज करतो म्हणून भाजपाला माझी जीभ कापायची असेल तर खुशाल कापा, पण मी थांबणार नाही, भाजपाचा पर्दाफाश करतच राहणार असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी ठणकावून सांगितले आहे.

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ पुढे म्हणाले की, भाजपा आमदार व नेत्यांनी “माझी जीभ कापून आणणाऱ्याला बक्षीस जाहीर केले आहे, माझी जीभ कापल्यानंतर जर भारतीय शेतकर्‍यांचे अमेरिकेतून होणार्‍या आयातीपासून संरक्षण होणार असेल, ही अन्यायकारक ट्रेड-डील रद्द होऊन शेतमालाला भाव मिळणार असतील, शेतकरी कर्जमुक्त होणार असेल, भाजप हिंदू-मुस्लिम द्वेषाला खतपाणी घालणार नसेल, चीनने बळकावलेला भूभाग परत मिळणार असेल तर माझी जीभ नक्की कापा.

सपकाळ पुढे म्हणाले की, मी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल काहीही चुकीचे बोललो नाही. छत्रपती शिवाजी महाराज यांची किर्ती महान आहे, चंद्र जसा वाढत जातो तशीच महाराजांची किर्ती आणखी वाढत जावी, याबाबत दुमत नाही. परंतु भारतीय जनता पक्षाने माझ्या विधानाचा “ध” चा “मा” करून महाराष्ट्र पेटवण्याचा प्रयत्न केला, दंगली घडवण्याचा प्रयत्न केला, यामागचे कारस्थान समजून घेतले पाहिजे. एपस्टिन फाईल्समध्ये बरंच काही दडलेलं आहे, त्यावरून जनतेचे लक्ष विचलित करणे हा एक भाग आहे तर अमेरिकेबरोबरच्या व्यापार करारामुळे भारतातील शेतकऱ्यांचे जीवन उद्ध्वस्थ होणार आहे, महाराष्ट्रातही अनेक ज्वलंत प्रश्न आहेत. या सर्व मुद्द्यावर भाजपा सरकारकडे उत्तर नाही म्हणून या प्रश्नांवर भाजपाला पडदा टाकायचा आहे, यासाठी हा सर्व खटाटोप सुरु आहे, असेही हर्षवर्धन सपकाळ म्हणाले.

टिपू सुलतानांचे वंशज भाजपमध्ये गेल्यास त्यांनाही पदे दिली जातील:हर्षवर्धन सपकाळांचा पलटवार

सावरकरांच्या सहा सोनेरी पाने, या पुस्तकाचाही उल्लेख

संविधानातच टिपू सुलतानची प्रतिमा


मुंबई-काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी भाजपवर तीव्र टीका करत भाजपला संविधान बदलायचे आहे, असा गंभीर आरोप केला आहे. सोमवारी बुलढाणा येथे माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी विविध मुद्द्यांवर भूमिका स्पष्ट केली. विशेषतः भाजप आणि टिपू सुलतान यांच्याभोवती सुरू असलेल्या वादावर त्यांनी भाष्य केले. भाजप संविधानातील महापुरुषांविषयी कायम आक्षेप घेत असल्याचा आरोप करत, टिपू सुलतानाबाबतही भाजपचे धोरण तस्सेच असल्याचे त्यांनी म्हटले.
\सपकाळ यांनी सांगितले की, भाजप नेते देवेंद्र फडणवीस हे टिपू सुलतानांविरोधात सातत्याने बोलतात. मात्र राज्यातील नगरपालिका आणि महानगरपालिका निवडणुकांदरम्यान काही ठिकाणी फडणवीस आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या सभांमध्ये स्टेजच्या पार्श्वभूमीवर टिपू सुलतानाचे चित्र लावलेले दिसले, असा दावा त्यांनी केला. राजकीय सोयीनुसार भूमिका बदलण्याचे हे उदाहरण आहे, असे ते म्हणाले. पुढे ते म्हणाले की, उद्या टिपू सुलतानांचे वंशज भाजपमध्ये दाखल झाले तर त्यांनाही मोठी पदे दिली जातील, अशी टीकाही त्यांनी केली.

सहा सोनेरी पाने, या पुस्तकाचा उल्लेख करत सपकाळ यांनी स्वा. सावरकर यांच्या लिखाणावरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले. या पुस्तकात छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल चुकीचे लिहिलेले असल्याचा आरोप त्यांनी केला. शिवाजी महाराजांच्या सज्जनपणाला विकृती म्हणण्याचे धाडस करण्यात आले आहे. स्वराज्य स्थापन होणारच होते; पण कावळा बसायला आणि डांग तुटायला जसे होते, तसे शिवाजी महाराज आले, असा उल्लेख त्या पुस्तकात आहे, असे ते म्हणाले. अशा विचारांना भाजप मान्यता देते, असा आरोपही त्यांनी केला. गोंधळ निर्माण करणे हे भाजपचे धोरण असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

शिवाजी महाराजांविषयी आपली भूमिका स्पष्ट करताना सपकाळ म्हणाले की, शिवाजी महाराज अद्वितीय आहेत आणि त्यांचे कार्य व कर्तृत्व अनुपम आहे. ते रयतेचे राजे होते आणि त्यांच्या विषयी कोणतेही चुकीचे विधान आपण केलेले नाही. दोन वेगवेगळ्या कालखंडातील महापुरुषांबद्दल प्रश्न विचारण्यात आला होता, त्या संदर्भात आपण मत मांडले, असे त्यांनी सांगितले. राज्यात सध्या जाती-धर्मात तेढ निर्माण होत असल्याने सर्व महापुरुषांचे फोटो समकक्ष पातळीवर लावावेत का, असा प्रश्न विचारण्यात आला होता. त्या अनुषंगाने आपण बोललो, असे त्यांनी स्पष्ट केले.
दोघांचे फोटो एकत्र लावले तर त्यात गैर नाही

सपकाळ पुढे म्हणाले की, शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची संकल्पना दिली आणि ते बहुजनांचे हिरो आहेत. त्यांच्या प्रेरणेनेच टिपू सुलतानांनी कार्य केले, असे ऐतिहासिक संदर्भ आहेत. त्यामुळे दोघांचे फोटो एकत्र लावले तर त्यात गैर नाही, असे आपण मत व्यक्त केले होते. मी कुठेही शिवाजी महाराजांचा अपमान केलेला नाही. मात्र माझ्या वक्तव्याचा विपर्यास करून ‘ध’चा ‘मा’ करण्यात आला, असे त्यांनी सांगितले. आपले वक्तव्य चुकीच्या पद्धतीने सादर करण्यात आले, अशी खंत त्यांनी व्यक्त केली.

संविधानाच्या संदर्भात बोलताना सपकाळ म्हणाले की, भारताच्या संविधानात प्रकरण 16 मध्ये प्रशासनाचा भाग सुरू होतो त्या ठिकाणी टिपू सुलतान आणि झाशीच्या राणीची प्रतिमा आहे. त्या चित्राच्या अनुषंगाने प्रशासनाचा मसुदा लिहिला गेला आहे. देशाच्या जडणघडणीत ज्यांचे योगदान आहे, अशा व्यक्तींची चित्रे संविधानात स्थान मिळालेले आहे. मात्र भाजप या बाबींवरही आक्षेप घेत असल्याचे त्यांनी नमूद केले. भाजप याविरोधात बोलतच राहणार, कारण त्यांना संविधान बदलायचे आहे, असा गंभीर आरोप त्यांनी पुन्हा केला.

भाजपवर दुटप्पी भूमिकेचा आरोप

एकूणच, टिपू सुलतान आणि शिवाजी महाराज यांच्या तुलनेवरून निर्माण झालेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर सपकाळ यांनी आपली भूमिका सविस्तरपणे मांडली. आपण केलेले वक्तव्य संदर्भासह समजून घ्यावे, अशी विनंती त्यांनी केली. संविधानातील महापुरुषांविषयी आदर राखणे आवश्यक असल्याचे सांगत त्यांनी भाजपवर दुटप्पी भूमिकेचा आरोप केला. या वक्तव्यामुळे राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा आरोप-प्रत्यारोपांची ठिणगी पडली असून, आगामी काळात हा वाद आणखी तापण्याची चिन्हे दिसत आहेत.

जनकल्याण समितीतर्फे दादा लाड आणि महंत भारतभूषणदासजी महाराज यांना ‘श्रीगुरुजी पुरस्कार’ प्रदान

पुणे,: “समाजाच्या प्रत्येक क्षेत्रात परिवर्तनाचे अनेक यशस्वी प्रयोग वैयक्तिक पातळीवर सुरू आहेत. मात्र, हे प्रयोग केवळ व्यक्तीपुरते मर्यादित न राहता समाजव्यापी होण्याची गरज आहे. तसे झाल्यास अशा प्रयोगांतूनच खऱ्या अर्थाने व्यवस्था परिवर्तन घडून येईल,” असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सहसरकार्यवाह अतुल लिमये यांनी शनिवारी येथे केले.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जनकल्याण समितीतर्फे आयोजित ‘पूजनीय श्रीगुरुजी पुरस्कार’ प्रदान सोहळ्यात ते बोलत होते. यावेळी प्रसिद्ध उद्योगपती डॉ. अभय फिरोदिया मुख्य पाहुणे म्हणून उपस्थित होते. कार्यक्रमात संशोधन क्षेत्रासाठीचा पुरस्कार दादा लाड यांना, तर समाजप्रबोधन क्षेत्रासाठीचा पुरस्कार आचार्य श्री महंत भारतभूषणदासजी महाराज यांना प्रदान करण्यात आला. शाल, सन्मानपत्र, सन्मानचिन्ह आणि एक लाख रुपये असे पुरस्काराचे स्वरूप आहे. समितीचे अध्यक्ष डॉ. अजित मराठे यांनी प्रास्ताविक केले, तर कार्यवाह राजन गोऱ्हे यांनी स्वागत केले.

अतुल लिमये म्हणाले, “समाजाचे शासनावरील अवलंबित्व वाढत चालले असून, यामुळे समाज अपंग बनण्याची भीती आहे. हे अवलंबित्व कमी करण्यासाठी समाज बदलवणाऱ्या यशस्वी प्रयोगांचा अनुकरणीय आराखडा तयार करून आदर्श कार्यप्रणाली विकसित करणे आवश्यक आहे. विकसित भारताच्या दिशेने जाण्यासाठी हे कार्य अनिवार्य आहे.”

“आजकाल अनेक लोक हिंदुत्वाबद्दल मनात कटुता बाळगून असल्याचे चित्र दिसत आहे,” असे मत अभय फिरोदिया यांनी व्यक्त केले. ते म्हणाले, “भारतातील बौद्ध, जैन, शीख आणि वैदिक यांची एकत्रित परंपरा म्हणजेच हिंदुत्व होय. हिंदू धर्म ही एक जीवनपद्धती आणि विचारधारा असून, तिला प्रत्यक्ष कृतीत आणण्याची प्रक्रिया म्हणजे हिंदुत्व होय. जनकल्याण समिती समाजाच्या सक्षमीकरणासाठी कार्य करणाऱ्या लोकांना संघटित आणि कार्यान्वित करण्याचे महत्त्वपूर्ण कार्य करत आहे.” “मूल्यांची समज म्हणजेच धर्म होय. जोपर्यंत आजची पिढी नैतिक मूल्यांची कास धरून चालेल, तोपर्यंत धर्म अबाधित राहील,” असेही फिरोदिया यांनी नमूद केले.

भारतभूषण महाराज म्हणाले, “सनातन परंपरा आपल्याला जीवन जगण्याची कला शिकवते. समाजाला वैभवशाली बनविण्यासाठी व्यावहारिक कार्याबरोबरच आत्मिक शांतीसाठीही प्रयत्न करणे आवश्यक आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मूल्यमापन बाहेर राहून करता येणार नाही, त्यासाठी संघात प्रत्यक्ष सहभागी व्हावे लागेल.

दादा लाड यांनी कापूस हे शेतकऱ्यांच्या आत्महत्येचे नव्हे, तर वैभवाचे पीक असल्याचे मत व्यक्त केले. ते म्हणाले, “विदर्भातील आत्महत्यांना दुर्दैवाने कापूस पिकाशी जोडले गेले. वास्तव पाहता, संपूर्ण जगाला कापडाची देणगी देणाऱ्या भारताचे कापूस हे मुख्य नगदी पीक आहे. कापसाचे उत्पन्न वाढवायचे असेल, तर बोंडाचे वजन वाढणे गरजेचे आहे. मी कापूस पिकाची ‘गळफांदी’ काढून ‘फळफांदी’ लांबवण्याचे तंत्र विकसित केले. यामुळे कापसाच्या एका बोंडाचे वजन १० ग्रॅमपर्यंत वाढले आणि पर्यायाने एकरी उत्पन्न ४ ते ५ क्विंटलवरून थेट १५ क्विंटलपर्यंत पोहोचले.”

चिंचवडच्या पूर्वांचल छात्रावासमधील विद्यार्थ्यांनी संपूर्ण वंदे मातरम सादर केले. सेवा भारती संस्थेचे पश्चिम महाराष्ट्र प्रांताचे सचिव प्रदीप सबनीस यांनी आभार प्रदशर्न आणि प्रा. डॉ. प्रांजली देशपांडे यांनी सूत्रसंचालन केले.
  • एक कोटींची देणगी ः
    जनकल्याणाच्या कामाला प्रोत्साहन देणे मदत करणे, असे महत्त्वपूर्ण काम जनकल्याण समिती करत आहे. समाजाच्या उत्कर्षाचे हे फार मोठे साधन आहे, अशा शब्दात जनकल्याण समितीच्या कार्याचा गौरव डॉ. अभय फिरोदिया यांनी केला आणी या कार्यासाठी एक कोटी रुपयांची देणगी देत असल्याचे जाहीर केले.

हर्षवर्धन सपकाळांच्या विरोधात मराठा ठोक मोर्चा आक्रमक:तोंडाला काळे फासणाऱ्याला एक लाखांचे बक्षीस जाहीर

सोलापूर -कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी शनिवारी केलेल्या वादग्रस्त विधानचे पडसाद आता उमटण्यास सुरू झाले आहे. सपकाळ यांनी टिपू सुलतानला छत्रपती शिवाजी महाराजांच्या समकक्ष मानले गेले पाहिजे, असे विधान केले होते. यावर आता मराठा ठोक मोर्चा आक्रमक झाल्याचे दिसून येत आहे. हर्षवर्धन सपकाळ यांच्या तोंडाला काळे फासणाऱ्यास 1 लाख रुपयांचे बक्षीस जाहीर करण्यात आले आहे. मराठा ठोक मोर्चाचे सोलापूर येथील समन्वयक महेश डोंगरे यांनी हे बक्षीस जाहीर केले आहे.

सोलापूर येथील मराठा ठोक मोर्चाने हर्षवर्धन सपकाळ यांच्यावर जोरदार हल्लाबोल केलया आहे. हर्षवर्धन सपकाळ यांच्यामुळेच कॉंग्रेस संपली. त्यांच्या तोंडाला जो कोणी काळे फासेल त्याला एक लाखांचे बक्षीस देणार. तसेच हर्षवर्धन सपकाळ यांना मराठा समाज रस्त्यावर फिरू देणार नसल्याचा देखील महेश डोंगरे यांनी इशारा दिला आहे.

काय आहे प्रकरण?

मालेगाव महापालिकेतील उपमहापौरांच्या दालनात टिपू सुलतानचा फोटो लावण्यात आला होता. यावर हिंदुत्ववादी संघटनांनी आक्षेप घेतला. त्यानंतर तो फोटो हटवण्यात देखील आता. मात्र, याच वादानंतर हर्षवर्धन सपकाळ यांनी बुलढाणा येथे बोलताना वादग्रस्त विधान केले. टिपू सुलतान यांना देखील छत्रपती शिवाजी महाराजांच्या समकक्ष मानले गेले पाहिजे, असे विधान त्यांनी केले. ज्याप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराजांनी शौर्य आणि स्वराज्य असा विचार दिला, अगदी त्याच प्रमाणे टिपू सुलतान यांनी त्याच समकक्ष काम केले, असे सपकाळ म्हणाले होते.

माझ्या वक्तव्याची मोडतोड- हर्षवर्धन सपकाळ

दरम्यान, वादग्रस्त विधान केल्यानंतर आता हर्षवर्धन सपकाळ यांनी एक्सवर ट्विट करत म्हटले की, माझ्या वक्तव्याची मोडतोड करून ‘ध’ चा ‘मा’ करून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना राज्यात दंगली घडवायच्या आहेत, असा आरोप सपकाळ यांनी केलया आहे.