Home Blog Page 97

पुढील पिढ्यांच्या सुरक्षित भविष्यासाठी धोरणात्मक बदल आवश्यक- डॉ. नीलम गोऱ्हे”

0

वेल्स संसद भेटीत महाराष्ट्र प्रतिनिधी मंडळाचा सहभाग; शाश्वत विकास आणि जागतिक बदलांच्या पार्श्वभूमीवर दीर्घकालीन नियोजनावर चर्चा

मुंबई, दि. २० फेब्रुवारी २०२६ : इंग्लंडमधील वेल्स संसद (सिनेड) येथे महाराष्ट्र विधिमंडळाच्या प्रतिनिधीमंडळाने दिलेल्या भेटीदरम्यान महाराष्ट्र विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी शाश्वत विकास आणि भविष्योन्मुख धोरणांच्या संदर्भात महत्त्वपूर्ण विचार मांडले.

आपल्या समारेपाच्या भाषणात डॉ. गोऱ्हे म्हणाल्या की, गेल्या काही दशकांमध्ये जग मोठ्या वेगाने बदलले आहे. १९४४ ते १९९० या कालखंडात लोकशाही, विकास आणि कल्याणकारी राज्यव्यवस्थेला चालना देण्याचा प्रयत्न झाला; परंतु १९९० नंतर जागतिकीकरण, तंत्रज्ञानातील झपाट्याने वाढ, स्थलांतर आणि अस्मितांच्या राजकारणामुळे जगाचे स्वरूप बदलले. सहस्त्रक विकास उद्दिष्टांपासून शाश्वत विकास उद्दिष्टांपर्यंतचा प्रवास हा मानवकेंद्री विकासाचा महत्त्वाचा टप्पा असल्याचे त्यांनी नमूद केले.

त्या पुढे म्हणाल्या की, भविष्यातील आव्हानांचा सामना करण्यासाठी विविध देशांमध्ये ‘फ्युचर कमिशनर’ नेमण्याची प्रक्रिया सुरू आहे. भारतातही २०४७ पर्यंतचे विकास ध्येय निश्चित करण्यात आले असून केंद्र व राज्य सरकारांकडून त्याचा कालांतराने आढावा घेतला जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शाश्वत विकास उद्दिष्टांबाबत विशेष आग्रह धरला असून दरवर्षी भारत सरकारकडून शाश्वत विकास उद्दिष्टे अहवाल सादर केला जातो, असे त्यांनी सांगितले.

महाराष्ट्रातही भविष्योन्मुख नियोजनासाठी स्वतंत्र आयुक्त नेमण्याबाबत चर्चा सुरू असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि सर्व पक्षीय नेत्यांशी चर्चा करून योग्य धोरण ठरविण्याचा प्रयत्न करण्यात येईल, असे त्यांनी स्पष्ट केले. नैसर्गिक आपत्ती, पर्यावरणीय बदल आणि स्त्री-पुरुष समानता यांसारख्या मुद्द्यांच्या पार्श्वभूमीवर पुढील पिढ्यांच्या सुरक्षित भविष्यासाठी अशा यंत्रणेची गरज असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.

यानंतर महाराष्ट्र विधिमंडळाच्या प्रतिनिधीमंडळाने वेल्स संसद परिसराची पाहणी करून तेथील कामकाजाची माहिती घेतली. या अभ्यासदौऱ्यात दोन महत्त्वपूर्ण विषयांवर व्याख्याने आयोजित करण्यात आली होती.

वेल्स सरकारच्या शाश्वत विकास उद्दिष्ट विभागाचे प्रमुख लॉइड हॅरिस यांनी वेल्स सरकार सात प्रमुख उद्दिष्टांनुसार शाश्वत विकासासाठी कशाप्रकारे काम करत आहे याचे सविस्तर सादरीकरण केले.
समृद्धी, आरोग्य, समानता, सामाजिक समन्वय, संस्कृती व भाषा जतन आणि जागतिक उत्तरदायित्व या घटकांवर विशेष भर देण्यात येत असल्याचे या सादरीकरणातुन समोर आले.

दुसऱ्या सत्रात फ्युचर जनरेशन कमिशनर डेरेक वॉकर यांनी “Managing Change” या विषयावर मार्गदर्शन केले. सरकार, विधिमंडळ आणि स्थानिक स्वराज्य संस्था यांच्या समन्वयातून धोरणांची अंमलबजावणी कशी केली जाते, याची उदाहरणांसह माहिती त्यांनी दिली. कामगार कल्याण, आरोग्य सुधारणा, अन्नसुरक्षा जनजागृती आणि पुनर्वापर (recycling) उपक्रमांमध्ये वेल्सने साधलेली प्रगती त्यांनी स्पष्ट केली.
कार्यक्रमादरम्यान विशेष म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त सभागृहात अभिवादन करण्यात आले. महाराष्ट्र विधानपरिषद सभापती राम शिंदे, उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे तसेच वेल्स संसद अधिकाऱ्यांनी महाराजांना वंदन केले. या चर्चासत्रात महाराष्ट्रातील आमदार आणि पीठासीन अधिकाऱ्यांनी सक्रिय सहभाग नोंदवला.

‘हिंद-दी-चादर’कार्यक्रमासाठी पुणे महानगरपालिकेकडून संपूर्ण सहकार्य-महापौर मंजुषा दीपक नागपुरे

पुणे, दि.२०: #श्रीगुरुतेगबहादुर साहिबजी यांच्या ३५० व्या शहीदी समागम शताब्दी वर्षानिमित्त २८ फेब्रुवारी व १ मार्च २०२६ रोजी #खारघर येथे आयोजित #हिंददीचादर’ कार्यक्रमासाठी महानगरपालिकेच्यावतीने सहकार्य करण्यात येईल, असे प्रतिपादन पुणे महानगर पालिकेच्या महापौर मंजुषा दीपक नागपुरे यांनी केले.

शीख समाजाचे
नववे गुरू श्री गुरू तेग बहादूरजी यांनी ‘मानवता’ आणि ‘धार्मिक स्वातंत्र्य’ या मूल्यांचे रक्षण करण्यासाठी स्वतःच्या प्राणांची आहुती दिली, तो इतिहास आजही आपल्याला प्रेरणा देतो. “श्रद्धेसाठी स्वतःचे शीश अर्पण करणे” अशी घटना जागतिक इतिहासात विरळच आहे. त्यांच्या याच बलिदानामुळे त्यांना कृतज्ञतेने ‘हिंद दी चादर’ म्हटले जाते.

श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या ३५० व्या शहीदी समागमाचा भव्य कार्यक्रम २८ फेब्रुवारी २०२६ व ०१ मार्च २०२६ रोजी नवी मुंबईतील खारघर येथे आयोजित करण्यात आलेला आहे. या कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर पुणे महानगरपालिका येथील श्री छत्रपती शिवाजी महाराज सभागृह येथे बैठक आयोजित करण्यात आली.

यावेळी ‘हिंद-दी-चादर’कार्यक्रम राज्यस्तरीय समन्वय समितीचे अशासकीय सदस्य तथा कॅम्प येथील गुरुद्वारा गुरुनानक दरबारचे अध्यक्ष चरणजितसिंग साहनी, बंजारा समाजाच्या कविता दिलीप राठोड, रमेश चव्हाण,जीतएल चांदवाणी,असांजा तसेच शीख, सिकलकर, बंजारा, लबाना, सिंधी, महोयाल, वाल्मिकी, उदासीन, भगत नामदेव (वारकी) या नऊ समाजातील प्रतिनिधी उपस्थित होते.

बैठकीत कार्यक्रमास जाण्याकरिता बसेसची व्यवस्था करण्यात यावी, बसेस सोबत रुग्णवाहिका व प्रथमोपचार पेटीची व्यवस्था करावी. पीएमपीएमएलच्या बसेसवर जनजागृती करण्याकरिता कार्यक्रमाचे जाहिरात फलक लावण्यात यावेत आदी सूचना करण्यात आल्या.

महापौर नागपुरे म्हणाल्या, पुणे महानगरपालिकेकडून बैठकीत करण्यात आलेल्या केलेल्या सूचनेच्या अनुषंगाने तात्काळ पूर्तता करण्यात येईल आणि हा कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता संपूर्ण सहकार्य करण्यात येईल.

उप महापौर श्री.वाडेकर म्हणाले, ‘हिंद कि चादर ‘ या परिवारात सर्व माझे मित्र असून त्यांना सदर कार्यक्रम चांगल्या पद्धतीने पार पाडण्याकरिता योग्य ते सहकार्य करण्यात येईल तसेच या कार्यक्रमासाठी त्यांनी शुभेच्छा दिल्या.

या बैठकीकरिता
आरोग्यप्रमुख नीना बोराडे, मा. उपायुक्त (परिमंडळ क्र.१), माधव जगताप, उपायुक्त (परिमंडळ क्र.२) श्री संतोष वारुळे, उपायुक्त (परिमंडळ क्र.४), अरविंद माळी, मा. उपायुक्त (घनकचरा व्यवस्थापन) श्री अविनाश सकपाळ, उपायुक्त (झोनिपू), संदीप खलाटे, मुख्य कामगार अधिकारी नितीन केंजळे आदी उपस्थित होते. बैठकीचे सूत्रसंचालन मा. उपायुक्त (माहिती व जनसंपर्क) तुषार बाबर यांनी केले.

कलाकार कट्टा,हटविण्यामागील राजकारण उघड, सह्यांची मोहीम सुरू…

पुणे: शहरातील गुडलक चौकातील ऐतिहासिक कलाकार कट्टा स्थलांतरित करण्याच्या हालचालींविरोधात आज राष्ट्रवादी चित्रपट व सांस्कृतिक विभागाच्या वतीने सकाळी १० ते रात्री ८ या वेळेत भव्य सह्यांची मोहीम राबविण्यात आली . पुण्याच्या सांस्कृतिक अस्मितेचे प्रतीक असलेल्या या कलाकार कट्ट्यावर गदा आणण्याचा कोणताही प्रयत्न आम्ही ठामपणे हाणून पाडू. असे मत राष्ट्रवादी सांस्कृतिक विभागाचे प्रदेशाध्यक्ष बाबासाहेब पाटील म्हणाले,
आमच्याकडे प्राप्त झालेल्या माहितीनुसार, स्थानिक भाजपचे काही नगरसेवक महापालिका आयुक्तांवर प्रचंड दबाव आणून हा कलाकार कट्टा हटवण्याचा प्रयत्न करत आहेत. एवढ्यावरच न थांबता, कलाकार कट्ट्याच्या मागील बाजूस असलेल्या बंगल्याच्या प्रस्तावित रीडेव्हलपमेंट प्रकल्पाला मोठे फ्रंटेज व व्यावसायिक लाभ मिळावा यासाठी कट्टा हटवण्याची घाई सुरू असल्याची माहिती स्थानिक कलाकार व नागरिकांकडून मिळत आहे. जर ही बाब खरी असेल, तर हा प्रकार केवळ सांस्कृतिक वारशावर घाला नसून थेट व्यावसायिक स्वार्थासाठी पुण्याच्या अस्मितेची केलेली तडजोड आहे.
पुणेकरांच्या भावनांशी खेळ करून, कलाकारांच्या व्यासपीठावर बुलडोझर चालवण्याचा डाव आम्ही सहन करणार नाही. भाजपच्या धोरणांविरोधात शहरात वाढत असलेल्या रोषाला घाबरून सांस्कृतिक ठिकाणे लक्ष्य केली जात आहेत का? असा सवालही नागरिक उपस्थित करत आहेत.
या सह्यांच्या मोहिमेला युवक-युवती, ज्येष्ठ नागरिक, कलाकार, साहित्यिक आणि सर्वसामान्य पुणेकरांचा उत्स्फूर्त व प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. हा केवळ निषेध नाही, तर पुण्याच्या सांस्कृतिक स्वाभिमानाचा जाहीर एल्गार आहे.
आमची ठाम भूमिका —
“कलाकार कट्टा हटविण्याचा कोणताही डाव आम्ही उधळून लावू!”
पुण्याच्या सांस्कृतिक ओळखीवर आघात करणाऱ्यांना जनतेसमोर उभे करूनच हा लढा संपेल.
बाबासाहेब पाटील: प्रदेशाध्यक्ष-
राष्ट्रवादी चित्रपट व सांस्कृतिक विभाग,

पंडीत दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्यात २२७ उमेदवारांची निवड

0

पुणे, दि. २०: कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाच्या पुणे कार्यालयामार्फत भोर, मुळशी, पुरंदर व हवेली तालुक्यामध्ये मंगळवारी (१७ फेब्रुवारी) पंडीत दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्यात २२७ उमेदवारांची निवड करण्यात आली आहे, अशी माहिती सहायक आयुक्त सुरेश वराडे यांनी दिली आहे.

मुळशी तालुक्यात सिम्बॉयसिस सेंटर फॉर ट्रेनिंग इन अॅडवान्स मॅन्युफॅक्चरिंग टेक्नॉलॉजिस, सिम्बॉयसिस कम्युनिटी कॉलेज, दारवली येथे एकूण ७९ बेरोजगार उमेदवार, भोर तालुक्यातील सरदार कान्होजी जेधे शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, मांढरदेवी रोड येथे एकूण १९, भारतीय जैन संघटनेचे कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, वाघोली येथे एकूण ५८, तसेच पुरंदर तालुक्यातील क्रांतिकारक उमाजी नाईक शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था दिवे येथे एकूण ७१ बेरोजगार उमेदवारीची निवड करण्यात आली आहे. यावेळी एकूण ५८ उद्योजकांनी प्रत्यक्ष उपस्थित राहून उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या आहेत, अशी माहिती श्री. वराडे यांनी दिली आहे.

शंकराचार्य म्हणाले- मुले जन्माला घालण्याने समाज वाढत नाही:सिंहाची गर्जना ऐकूनच कुत्रे पळून जातात

0

मोहन भागवत म्हणाले होते- हिंदूंनी 3 मुले जन्माला घालावीत

सनातन धर्माचे ज्ञान नसल्यामुळे संख्या वाढवण्याबद्दल बोलतात

आपसातील कलहामुळेही होतो विनाश


वाराणसी: शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांनी लोकसंख्येच्या मुद्द्यावर सुरू असलेल्या चर्चेवर विधान केले आहे. ते म्हणाले- मूल जन्माला घालण्याने समाज कमी होत नाही किंवा वाढतही नाही. समाज आपली संस्कृती, सभ्यता आणि धर्मावर टिकून राहिल्याने दीर्घकाळ टिकतो आणि पुढे जातो. या विषयावर त्यांच्याकडून कोणताही उपदेश दिला जात नाही.
अविमुक्तेश्वरानंद सरस्वती म्हणाले- त्यांच्याकडून धर्मशास्त्रांची अवहेलना केली जात आहे. असे होऊ नये की आपण जास्त मुले जन्माला घालू आणि एक दिवस एखादी प्रभावी व्यक्ती येऊन आपल्या मुलांना समजावून धर्म परिवर्तन करून टाकेल. पीक आपण पिकवू आणि कापणी दुसरा कोणीतरी करेल, म्हणून केवळ संख्या वाढवून काम चालत नाही.

मुलाला इतके संस्कार द्या. इतके दृढ बनवा की तो कोणत्याही परिस्थितीत धर्माची पताका घेऊन पुढे जात राहील. 100 तारे तेवढा प्रकाश देत नाहीत, जेवढा एक चंद्र उगवताच अंधार दूर होतो. तुम्ही एक मूल करा किंवा चार, ही तुमची स्वतःची निवड आहे. यात कोणतेही बंधन नाही. देवकी आणि वासुदेवाने 8 अपत्ये जन्माला घातली, तेव्हाच देवाचा अवतार झाला.अशा परिस्थितीत कोणी किती मुले जन्माला घालावीत, हे पालकांवरच सोडून द्यावे.

भगवान श्रीकृष्णाचे वंशज यादव यांना कोणत्याही बाहेरील शत्रूने मारले नव्हते, तर ते आपापसातील संघर्षामुळेच नष्ट झाले होते. जेव्हा संख्या खूप जास्त होते आणि शिस्त व एकता राहत नाही, तेव्हा समाज आतून कमकुवत होऊ शकतो. संख्या वाढल्यास अनेकदा लोक आपापसात भांडून मरतात.

म्हणून संख्येबद्दल तेच लोक बोलतात, ज्यांना आपल्या सनातन धर्माच्या खोलीचे खरे ज्ञान नाही.

मौलाना शहाबुद्दीन रजवी बरेलवी यांच्यावर शंकराचार्यांनी म्हटले- त्यांच्या बोलण्यावर आपण का जावे? आपल्याला आपल्या घराची चिंता करायची आहे. संख्याबळाने कोणीही जिंकू शकत नाही. कुत्र्यांची संख्या सर्वात जास्त असते, पण जसा एक सिंह गर्जना करतो, तसे सर्व पळून जातात.

हिंदू असोत वा मुस्लिम. जर ते केवळ संख्या वाढवून काम होते असे समजत असतील, तर ते योग्य नाही. अनेकदा संख्या वाढल्यावर लोक आपापसातच भांडून मरतात.

आता मोहन भागवत यांनी सांगितलेल्या महत्त्वाच्या गोष्टी वाचा…

भारतात राहणारे मुस्लिमही हिंदूच

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (RSS) सरसंघचालक मोहन भागवत 17 आणि 18 फेब्रुवारी रोजी लखनऊ दौऱ्यावर होते. यावेळी मोहन भागवत यांनी सामाजिक सलोख्याशी संबंधित विषयांवर बैठक घेतली होती. यात त्यांनी समाजातील विविध स्तरांतील लोकांना उत्तरे दिली होती.

मोहन भागवत यांनी समाजाला जातींमध्ये विभागण्यावर आणि विभागले जाण्यावर चिंता व्यक्त केली होती. ते म्हणाले – आपल्याला जातीच्या भानगडीत पडायचे नाही. ही जात अशी गोष्ट आहे, जी आपण अनेक दशकांपासून संपवण्याचा प्रयत्न करत आहोत. पण ही जात काही जात नाही.

हिंदूंच्या घटत्या लोकसंख्येमुळे भविष्य धोक्यात

भागवत म्हणाले – आता जे कोणी मुले लग्न करत आहेत. त्यांना सांगा की किमान तीन मुले जन्माला घालावीत. विवाहाचा उद्देश सृष्टी पुढे जावी हा असावा, वासनापूर्ती नाही. याच भावनेतून कर्तव्य बोध येतो.

भारतात राहणारे मुस्लिमही हिंदूच आहेत, ते काही अरबमधून आलेले नाहीत. घरवापसीचे काम वेगाने व्हायला हवे. जे लोक हिंदू धर्मात परत येतील, त्यांची काळजीही आपल्याला घ्यावी लागेल. घुसखोरांना शोधून काढणे, हटवणे आणि परत पाठवणे आवश्यक आहे. त्यांना रोजगार देऊ नये.

प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेत निर्बंधांचा आरोप चुकीचा,ग्राहकांच्या रक्षणासाठीच महावितरणकडून दक्षता

0


मुंबई, २० फेब्रुवारी २०२६ –
प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेत घराच्या छतावर सौर ऊर्जानिर्मिती प्रकल्प बसविण्याच्या क्षमतेच्या बाबतीत महावितरणने निर्बंध लादल्याचा सौरऊर्जा प्रकल्प पुरवठादारांचा आरोप चुकीचा आहे. अधिक क्षमतेची रास्त गरज असलेल्या वीज ग्राहकांना महावितरणकडून तपासणीनंतर मंजुरी देण्यात येत आहे. सामान्य घरगुती ग्राहकांसाठी केंद्र सरकारने सुरू केलेल्या या योजनेत पुरवठादारांच्या दबावामुळे ग्राहकांचे नुकसान होऊ नये, यासाठी महावितरणकडून दक्षता घेण्यात येत आहे.

प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजना ही सामान्य घरगुती ग्राहकांसाठी आहे. तथापि, नियमित घरगुती वीज पुरवठ्याच्या गरजेपेक्षा खूप जास्त क्षमतेचा सौरऊर्जा प्रकल्प बसवायचा, केंद्र सरकारकडून अनुदान घ्यायचे, नंतर त्या कनेक्शनचे रुपांतर वाणिज्यिक कनेक्शनमध्ये करून अनुदानाचा गैरफायदा घ्यायचा, असे प्रकार घडल्याचे महावितरणच्या निदर्शनास आले.

महावितरणकडे अशा तक्रारी आल्या होत्या की, वीज ग्राहकांचा विजेचा वापर कमी असल्याने त्यांची एक किंवा दोन किलोवॅटच्या प्रकल्पाची गरज असताना पुरवठादारांकडून त्यांच्यावर अधिक क्षमतेचा प्रकल्प बसविण्यासाठी दबाव आणण्यात येत आहे. यामुळे गरज नसताना संबंधित घरगुती ग्राहकावर जास्त क्षमतेच्या प्रकल्पाच्या खर्चाचा बोजा पडतो. हे ध्यानात घेऊन महावितरणने ग्राहकांचा प्रत्यक्ष विजेचा वापर किती आहे हे ध्यानात घेऊन त्यानुसार स्वयंचलित व्यवस्थेत विजेच्या मंजूर भाराला (लोड) मान्यता देण्याची व्यवस्था केली. त्यानुसार त्या ग्राहकाला सौर ऊर्जानिर्मिती प्रकल्प बसविता येतो. तथापि, ग्राहकाच्या नियमित वीज वापरापेक्षा खूप जास्त क्षमतेचा सौरऊर्जा प्रकल्प बसविण्याची मागणी आली तर त्यासाठी महावितरणच्या यंत्रणेकडून स्थल निरीक्षण करून रास्त मागणी असल्याचे स्पष्ट झाल्यावर मंजुरी देण्यात येईल.

मंजूर भारापेक्षा अधिक क्षमतेच्या सौरप्रकल्पाची मागणी झाली तर स्थल निरीक्षण करावे, यासाठी महावितरणच्या व्यवस्थापनाने संबंधित यंत्रणेला आदेश दिले आहेत.

प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेत केंद्र सरकारकडून एक किलोवॅट क्षमतेच्या प्रकल्पासाठी ३० हजार रुपये, दोन किलोवॅटच्या प्रकल्पासाठी ६० हजार रुपये तर तीन किलोवॅटच्या प्रकल्पासाठी ७८ हजार रुपये अनुदान मिळते. प्रकल्पासाठीचा बाकीचा खर्च वीज ग्राहकाने करायचा असतो. या प्रकल्पातून निर्माण होणाऱ्या विजेतून ग्राहकाची घरगुती विजेची गरज भागेल व काही अतिरिक्त वीज निर्माण झाली तर ती महावितरणला विकून लाभ होईल, अशी ही योजना आहे. या योजनेचा उद्देश्य महिना तीनशे युनिटपर्यंत वीज वापरणाऱ्या घरगुती ग्राहकांना दिलासा देण्याचा आहे.

योजनेच्या अंमलबजावणीत महावितरणची देशात आघाडी

प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेसाठी महावितरण ही महाराष्ट्रासाठीची नोडल एजन्सी आहे. ही योजना फेब्रुवारी २०२४ मध्ये सुरू झाली. गेल्या दोन वर्षात राज्यात ४.५३ लाख वीज ग्राहकांना योजनेचा लाभ झाला असून त्यांची एकत्रित सौरऊर्जानिर्मिती क्षमता १,७२२ मेगावॅट आहे. या ग्राहकांना ३,१६२ कोटी रुपये अनुदान मिळाले आहे. या योजनेच्या अंमलबजावणीत महाराष्ट्र राज्य देशात दुसऱ्या क्रमांकावर आहे.

या योजनेचा वापर करून महावितरणने संपूर्ण गाव सौर ऊर्जेवर चालविण्यासाठी सौरग्राम योजना सुरू केली असून आतापर्यंत १७ गावे सौरग्राम झाली आहेत. तसेच राज्य सरकारने या योजनेत वीज ग्राहकाला मिळणाऱ्या अनुदानात स्वतःकडून भर घालून दारिद्र्य रेषेखालील अथवा गरीब अशा पाच लाख कुटुंबांना अत्यंत कमी रकमेत योजनेचा लाभ मिळवून देणारी स्मार्ट योजना सुरू केली आहे.

शिवजयंतीनिमित्त स्वच्छतेचा संकल्प – ‘स्वच्छता पर्व पुरस्कार’चा भव्य शुभारंभ

पुणे:

आज १९ फेब्रुवारी, शिवजयंतीच्या पावनदिनी पुणे महानगरपालिका घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या वतीने ‘स्वच्छ पुणे संकल्प’ अंतर्गत ‘स्वच्छता पर्व पुरस्कार’ या अभिनव स्वच्छता स्पर्धेचा शुभारंभ करण्यात आला.

ही स्पर्धा प्रभाग, शाळा, महाविद्यालये, रुग्णालये, बाजारपेठा, हॉटेल्स व गृहनिर्माण सोसायट्या यांच्यात राबविण्यात येणार असून, शहरातील स्वच्छता, पर्यावरणपूरक सवयी आणि नागरिकांचा सक्रिय सहभाग वाढविणे हा यामागील मुख्य उद्देश आहे.

या कार्यक्रमाला महापौर मंजुषा दीपक नागपुरे, उपमहापौर . परशुराम वाडेकर, सभागृह नेते गणेश बीडकर, विरोधी पक्षनेते . निलेश निकम, महापालिका आयुक्त नवल किशोर राम, अतिरिक्त आयुक्त (ज) श्रीमती पवनीत कौर, उपायुक्त (घनकचरा व्यवस्थापन) .lअविनाश सकपाळ, उपायुक्त परिमंडळ दोन संतोष वारोळे, सहाय्यक उपआयुक्त कैलास केंद्रे तसेच विविध क्षेत्रीय कार्यालयाचे अधिकारी-कर्मचारी आणि शाळा, महाविद्यालये, रुग्णालये, सामाजिक संस्था, हॉटेल्स व सोसायट्यांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याच्या आदर्शांना अभिवादन करत, स्वच्छ-हरित-सुंदर पुण्यासाठी एकजुटीने पुढे जाण्याचा निर्धार ‘स्वच्छता पर्व पुरस्कार’च्या माध्यमातून अधिक दृढ करण्यात आला.

देशातील अगदी तळागाळातील माणसापर्यंत एआय साधने पोहोचणे आवश्यक: टाटा सन्सचे अध्यक्ष एन चंद्रशेखरन

0

लवकरच एआय बहुतेक सर्व क्षेत्रांमध्ये मानवी क्षमतेला मागे टाकून पुढे जाईल : एंथ्रोपिक चे मुख्य कार्यकारी अधिकारी दारिओ आमोदेई यांचा इशारा

नवी दिल्ली, 19 फेब्रुवारी 2026

भारत मंडपममध्ये झालेल्या इंडिया इम्पॅक्ट एआय शिखर परिषद 2026 च्या उच्चस्तरीय उद्घाटन सोहळ्यात जगभरातील आघाडीचे नेते व उच्च तंत्रज्ञान क्षेत्रातील नामवंत कंपन्यांचे मुख्य कार्यकारी अधिकारी एकत्रित उपस्थित होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते हा उद्घाटन सोहळा पार पडला. जबाबदारीच्या भावनेतून नवोपक्रम, वैज्ञानिक प्रगति व कृत्रिम बुद्धिमत्ता अर्थात एआयचे भवितव्य आकारण्यासाठी आंतरराष्ट्रीय सहकार्याची आवश्यकता यावर शिखर परिषदेचा भर राहील असे या सोहळ्यातून स्पष्ट झाले. 

लोकशाहीकरण, व्याप्ती व सार्वभौमत्व यावर भारताचे एआय धोरण आधारित असल्याचे केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स व माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनी स्पष्ट केले. उपयोजन, प्रारूपे, गणना, प्रतिभा आणि ऊर्जा (अप्लिकेशन्स , मॉडेल्स, कंप्यूट, टॅलेंट, एनर्जी) या एआय क्षेत्रातील पाच स्तरांबद्दल भारताचा सर्वसमावेशक दृष्टिकोन असून आरोग्यसेवा, कृषी, शिक्षण व सार्वजनिक सेवा क्षेत्रातील एआयच्या वास्तविक वापरावर भर देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. 

टाटा सन्सचे अध्यक्ष एन चंद्रशेखरन यांनी भावीकाळातील पायाभूत सुविधा अर्थात बुद्धिमत्तेचा पाया अशा शब्दात एआयचे वर्णन केले. परिवर्तन घडवण्याची एआयची क्षमता पूर्वीच्या काळात वाफेचे इंजिन, वीज आणि इंटरनेटने घडवलेल्या क्रांतीसारखी असल्याचे त्यांनी सांगितले. भारताच्या डिजिटल पायाभूत सुविधा विकासात झालेल्या प्रगतीवर त्यांनी भाष्य केले. चिप्स व संबंधित यंत्रणेपासून ऊर्जा व उपयोजनापर्यंत धोरणात्मक राष्ट्रीय क्षमतेतील सुधारणा एआयमुळे  विकसित होणार आहे, असे त्यांनी स्पष्ट केले. 

एआय क्षेत्रातील अपार संधींबद्दल माहिती देताना ते म्हणाले की, एआय ही भविष्यातील सर्वात महत्वाची पायाभूत सुविधा असेल, ती बुद्धिमत्तेसाठी आवश्यक असणारी पायाभूत सुविधा असेल. देशातील प्रत्येक नागरिकाला एआयचा उपयोग होईल यासाठी प्रयत्न केले पाहिजेत, असे त्यांनी सांगितले. केवळ देशातील नव्हे तर संपूर्ण जगातील सर्वात तळागाळातील नागरिकाच्या आवाक्यात एआय साधने मिळावीत, यासाठी प्रयत्न केले पाहिजेत असे प्रतिपादन त्यांनी केले. आपण एका महत्वाच्या टप्प्यावर आहोत, आताच्या काळात अपार बुद्धिमत्ता उपलब्ध आहे, पण खरी गरज आहे विश्वास, नेतृत्वगुण व मानवी क्षमतेची, असे ते म्हणाले .

एंथ्रोपिक चे मुख्य कार्यकारी अधिकारी दारिओ आमोदेई यांनी वर्ष 2023 मध्ये  ब्लेचली पार्क इथे झालेल्या पहिल्या एआय सुरक्षितता शिखर परिषदेपासून वेगाने झालेल्या एआय विकासाचा आढावा घेतला व गेल्या अडीच वर्षात हा वेग प्रचंड वाढला असल्याचे अधोरेखित केले. गेल्या दशकात एआय विकासाचा वेग प्रचंड  प्रमाणात वाढत गेला आहे आणि लवकरच सर्व क्षेत्रांमध्ये मानवी क्षमतेला मागे टाकून पुढे जाईल असा इशारा त्यांनी यावेळी दिला. 

“गेल्या दहा वर्षांत ए आय विकासाचा वेग प्रचंड प्रमाणात वाढत चालला आहे आणि त्या वाटेवर आपण आता खूप पुढे आलो आहोत. आपण आता ‘डेटा सेंटर मधील अतिबुद्धिमत्तेचे केंद्रीकरण’ म्हणजेच,  लवकरच बहुतेक सर्व लोकांपेक्षा खूप जास्त बुद्धिमान, सक्षम व अतिमानवी वेगाने समन्वय साधणारे ए आय एजंट तयार होतील, या परिस्थितीच्या अगदी जवळ आलो आहोत. या पातळीवरील उच्च क्षमतेमुळे रोगांवरील रामबाण उपाय, गरिबीचे निर्मूलन, आणि अधिक चांगले जग निर्माण करण्याच्या अद्भुत संधी उपलब्ध होतील, परंतु त्यातून काही धोकेही संभवतात. हे सर्व इतके वेगाने होईल की यातून मिळणारी समृद्धी सर्वांना उपभोगता यावी व जबाबदारीने वापरता यावी यासाठी तसेच समाजाची मोडणारी घडी पुन्हा नीट बसविण्यासाठी जगभरातील कंपन्या व सरकारांना एकत्रितपणे प्रयत्न करावे लागतील.” ते म्हणाले. 

आपल्या भाषणात गुगलचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुंदर पिचाई यांनी कृत्रिम बुद्धिमत्तेला “आयुष्यातील सर्वात मोठा तंत्रज्ञानात्मक बदल” असे संबोधले आणि वैज्ञानिक शोधांना वेग देण्याच्या त्याच्या क्षमतेवर प्रकाश टाकला. ते म्हणाले, “कृत्रिम बुद्धिमत्ता हा आयुष्यातील सर्वात मोठा तंत्रज्ञानात्मक बदल आहे. आपण अतिवेगवान प्रगती आणि नव्या शोधांच्या उंबरठ्यावर उभे आहोत, जे उदयोन्मुख अर्थव्यवस्थांना जुने तांत्रिक अंतर झपाट्याने भरून काढण्यास मदत करू शकतात. परंतु हा परिणाम निश्चित किंवा आपोआप घडणारा नाही. सर्वांसाठी उपयुक्त अशी कृत्रिम बुद्धिमत्ता विकसित करायची असेल, तर आपण धाडसाने पुढे जावे, जबाबदारीने तिचा वापर करावा आणि या निर्णायक क्षणी एकत्रितपणे कार्य करावे. डिजिटल दरी ही कृत्रिम बुद्धिमत्तेची दरी बनू देता कामा नये.”

संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस अँटोनियो गुटेरेस यांनी ग्लोबल साऊथमधील  राष्ट्रांमध्ये पहिल्या कृत्रिम बुद्धिमत्ता शिखर परिषदेचे आयोजन केल्याबद्दल भारताच्या नेतृत्वाचे कौतुक  केले. त्यांनी अधोरेखित केले की कृत्रिम बुद्धिमत्तेचे भविष्य काही मोजक्या देशांनी किंवा खाजगी हितसंबंधांनी ठरवता कामा नये. संयुक्त राष्ट्र महासभेने उचललेल्या दोन महत्त्वाच्या पावलांचात्यांनी उल्लेख केला.ते म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्तेसंदर्भात 40 जागतिक तज्ज्ञांचे  स्वतंत्र आंतरराष्ट्रीय वैज्ञानिक पॅनेल स्थापन करणे आणि सर्वसमावेशक, बहु-हितधारक सहभाग सुनिश्चित करण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता प्रशासनावरील जागतिक संवाद सुरू करणे. मानवी नियंत्रण आणि उत्तरदायित्व जपणाऱ्या मार्गदर्शक तत्त्वांची आवश्यकता व्यक्त करत ते म्हणाले, “कृत्रिम बुद्धिमत्तेचे भविष्य काही मोजक्या देशांनी ठरवू नये किंवा काही अब्जाधीशांच्या इच्छेवर सोडू नये. मानवी स्वायत्तता, मानवी देखरेख आणि मानवी उत्तरदायित्व जपणारी संरक्षक तत्त्वे आवश्यक आहेत. कृत्रिम बुद्धिमत्ता सर्वांसाठी सुलभ असली पाहिजे. म्हणूनच मी विकसनशील देशांमध्ये मूलभूत क्षमता उभारण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेसाठी जागतिक निधी स्थापन करण्याचे आवाहन करीत आहे. खरा परिणाम म्हणजे जीवनमान उंचावणारे आणि पृथ्वीचे संरक्षण करणारे तंत्रज्ञान; त्यामुळे प्रतिष्ठा हे  मूलभूत मूल्य ठेवून आपण सर्वांसाठी कृत्रिम बुद्धिमत्ता उभारूया.”

बीजभाषण करताना फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी वेगाने वाढणाऱ्या तांत्रिक स्पर्धेच्या युगात सार्वभौम, स्वतंत्र आणि सहयोगात्मक कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञान  विकासाचे महत्त्व अधोरेखित केले. भारताच्या डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधांच्या क्रांतीचा संदर्भ देत त्यांनी सध्याच्या कृत्रिम बुद्धिमत्ता परिवर्तनाशी त्याची तुलना केली. त्यांनी कृत्रिम बुद्धिमत्तेला भू-राजकारण, आर्थिक शक्ती आणि जागतिक संतुलन घडविणारे धोरणात्मक क्षेत्र असे संबोधले. भारत आणि युरोप यांनी स्वीकारलेल्या पूरक मार्गांचा उल्लेख करत ते म्हणाले, “सर्वात महागडी कृत्रिम बुद्धिमत्ता सर्वात हुशार असेलच असे नाही. योग्य उद्देशाने आणि उत्कृष्ट तज्ज्ञांनी तयार केलेली प्रणालीच खऱ्या अर्थाने सक्षम ठरते. नवोन्मेष आणि जबाबदारी, तंत्रज्ञान आणि मानवता यांचा समतोल साधणारे देशच कृत्रिम बुद्धिमत्तेचे भविष्य घडवतील. कोणताही देश केवळ परदेशी कंपन्यांनी त्यांची मॉडेल्स विकावीत आणि नागरिकांचा डेटा डाउनलोड करावा, एवढ्यापुरताच बाजार म्हणून राहण्यास मर्यादित नाही. नवोन्मेष, स्वातंत्र्य आणि धोरणात्मक स्वायत्ततेचा मार्ग पुढे आहे आणि भारत व फ्रान्स मिळून हे भविष्य घडवतील.”

शिखर परिषदेच्या उद्घाटन सत्रात जागतिक राजकीय नेते, बहुपक्षीय संस्था आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील अग्रणी व्यक्तींच्या सहभागामुळे परिषदेचे महत्त्व अधोरेखित झाले. परस्परांशी अधिक जोडल्या गेलेल्या आणि वेगाने बदलणाऱ्या जगात कृत्रिम बुद्धिमत्तेचा पुढील प्रवास निश्चित करणारे व्यासपीठ म्हणून या शिखर परिषदेची ओळख अधोरेखित झाली.

एमआयटी डब्ल्यूपीयूतील २८० वर्गांमध्ये उलगडलाछत्रपती शिवाजी महाराजांचा गौरवशाली वारसा


देशात प्रथमच अनोखा प्रयोगः किल्ल्यांचे प्रदर्शन, रक्तदान शिबिर, ग्रंथ प्रदर्शन
डब्ल्यूपीयूत छत्रपती शिवाजी महाराजांची ३९६ वीं जयंती साजरी

पुणे, दि. १९ फेब्रुवारी: छत्रपती शिवाजी महाराजांनी लोककल्याण केंद्रीत सुशासन, न्यायनिष्ठ प्रशासन आणि स्वराज्याची अढळ निष्ठा याचा केवळ उपदेश केला नाही, तर आपल्या कृतीतून त्यांचा आदर्श समाजासमोर ठेवला, म्हणून पावणेचारशे वर्षानंतर ही त्यांच्या विचारांची ज्वाला विझलेली नाही. उलट ती आजच्या पिढीच्या रक्तात आत्मसन्मान, संघर्षशीलता आणि राष्ट्र निष्ठेचे स्फूरण निर्माण करत आहेत. काळ बदलला तरीही शिवाजी महाराजांचा गौरवशाली वैचारिक वारसा आजही तितकाच जिवंत तेजस्वी आणि जाज्वल्य आहे. अशी भावना एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीमध्ये शिकणार्‍या परराज्यातील विद्यार्थ्यांनी व्यक्त केली.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या ३९६ व्या जयंतीनिमित्त एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीच्या वतीने विनम्र कृतज्ञतेचा मानाचा मुजरा करुन त्यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण केले.
शिवाजी महाराजांचे मोठेपण, कर्तृत्व एका देशापुरते किंवा राज्यापुरतेच मर्यादित नाही, तर ते वैश्विक पातळीवरील आहे. त्यांचा हाच जीवन संदेश विद्यार्थ्यांना कळावा या उद्देशाने एमआयटी डब्ल्यूपीयूचे कार्याध्यक्ष डॉ. राहुल विश्वनाथ कराड यांच्या मार्गदर्शनात देशात प्रथमच अनोखा उपक्रम राबविण्यात आला. विद्यापीठातील २८० क्लास रुममध्ये इतिहास अभ्यासकांनी ९० मिनीटे छत्रपती शिवाजी महाराज यांचा इतिहास मांडला. प्रत्येकी ५-५ विद्यार्थ्यांनी ‘आजच्या समकालीन काळात छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूल्य, निती व गुणांची कालातीत प्रासंगिकता’ या विषयावर विचार मांडले.
तसेच यावर्षी एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी मध्ये १२ ऐतिहासिक किल्ल्यांची सखोल माहिती देणारे प्रदर्शन, रक्तदान शिबिर (शेकडो विद्यार्थ्यांनी रक्तदान केले.)े आणि महाराजांवर प्रकाशित ग्रंथ प्रदर्शनांचा विद्यार्थ्यांनी लाभ घेतला.
एमआयटी डब्ल्यूपीयूचे संस्थापक अध्यक्ष विश्वधर्मी प्रा.डॉ. विश्वनाथ दा. कराड यांच्या शुभआर्शीवादाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
तत्पूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. आर.एम.चिटणीस, माईर्सचे कुलसचिव डॉ. रत्नदीप जोशी, डब्ल्यूपीयूचे कुलसचिव प्रा. गणेश पोकळे, पीस स्टडीजचे डॉ. मिलिंद पात्रे, डॉ. हितेश जोशी, आणि शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थ्यांनी पुष्प अर्पण करुन अभिवादन केले.
यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांची युद्धनीती, न्यायव्यवस्था, प्रशासन व्यवस्था, कृषीनिती अर्थनीती, शिवकालीन सागरी सामर्थ्य, शैर्य, धैर्य आणि चातुर्थ, लोकाभिमुख ध्येय धोरणे, भविष्यवेधी विकासदृष्टी, पर्यावरणपूरक विकासाचा वस्तूपाठ व अस्मितेचा वारसा जपणे, छत्रपती शिवाजी महाराजांनी प्रत्येकाच्या मनात धैर्य, शैर्य, आत्मविश्वास, स्वाभिमान आणि स्वराज्याची ज्योत पेटविणे. यांसारख्या मुद्यांवर विचार मांडण्यात आले.
तसेच तनिष्का पवार, प्रसाद शिंदे आणि शंभुराजे नितीन बानुगडे-पाटील या विद्यार्थ्यांनी महाराजांच्या जीवन चरित्रावर विचार मांडले.
या वेळी प्रताप पुंडे, गौरंग माने, हर्षल दुधाळ, राजस शिंदे, प्रथमेश राऊत, पर्णिका तिवारी आणि निरंजन मानकर या स्टूडन्ट कॉन्सिलच्या विद्यार्थी प्रतिनिधींनी सक्रीय सहभाग घेतला होता.

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती दिनानिमित्त पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने काँग्रेस भवन येथे शिवजयंती साजरी.

पुणे – छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने आज काँग्रेस भवन येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास शहराध्यक्ष अरविंद शिंदे यांच्यासह महिला पदाधिकाऱ्यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी शहराध्यक्ष अरविंद शिंदे म्हणाले की, ‘‘१८७० मध्ये सत्यशोधक महात्मा ज्योतिबा फुले यांनी प्रथम पुण्यामध्ये शिवजंयती सार्वजनिकरित्या साजरी केली. तेव्‍हा पासून आजपर्यंत आपण आनंदाने आणि उत्याहाने सर्व जाती धर्माचे लोक एकत्र येऊन आपल्या राजाला शिवजंयती निमित्त अभिवादन करीत असतो. महाराजांचा इतिहास आपणा सर्वांना ज्ञात आहे, तरीही सध्याच्या परिस्थितीला अनुसरून त्यांच्या कार्य कर्तृत्वातील असंख्य बाबी आपण आजही व्‍यवहारात आणणे अत्यंत आवश्यक आहे. मुळात लोकांचे राज्य म्हणून महाराजांनी स्वराज्याची निर्मिती केली. १८ पगड जाती, १२ बलुतेदार समाज हा स्वराज्याचा मावळा म्हणून ओळखला जायचा. परंतु आज काही संकोचित मनोवृत्तीने महाराजांच्या या मावळ्यांना विविध जाती आणि धर्मांच्या आधारे विखुरण्याचा घाट घातला आहे. शिवाजी महाराजांचे शेतकऱ्यांविषयींचे धोरण, महिलांविषयी असलेला आदर, व्‍यापाराला चालना देणारी व्‍यवहारिकता असे असंख्य गुण झाकळून त्यांच्या व्‍यक्तिमत्वाविरोधी असणारे कृत्य सत्येत बसलेली मनुवादी वृत्ती करताना दिसत आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे कार्य कर्तृत्व संकुचित करून त्यांचा इतिहास पुसण्याचे कार्य जोमाने सुरू आहे. याला आळा घालण्यासाठी व महाराजांचा सत्य इतिहास जतन करून पुढच्या पिढ्यांना तो बहाल करण्यासाठी आपल्याला त्यांचे मावळे बनून हा लढा अखंड सुरू ठेवला पाहिजे. कोणत्याही प्रक्षोभणांना, धमक्यांना अथवा हल्ल्यांना भिक न घालता महाराजांचे वैचारिक वारस म्हणून त्यांना अभिप्रेत असणारे स्वराज्य पुन्हा नव्‍याने उभारण्यासाठी वैचारिक कृतीशिलतेची तलवार हाती घेऊन मनुवादी वृत्ती मुळापासून उखडून काढली पाहिजे.’’
यावेळी शहराध्यक्ष अरविंद शिंदे यांच्या समवेत महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे खजिनदार ॲड. अभय छाजेड, नगरसेवक अविनाश साळवे, प्रशांत जगताप, अश्विनी लांडगे, उपाध्यक्ष अजित दरेकर, प्राची दुधाने, कामगार नेते सुनिल शिंदे, महिला अध्यक्षा स्वाती शिंदे, प्रियंका रणपिसे, सिमा सावंत, सुंदर ओव्‍हाळ, कांचन बालनायक, युवक अध्यक्ष सौरभ अमराळे, उस्मान तांबोळी, ॲन्थोनी जेकब, द. स. पोळेकर, बाळासाहेब अमराळे, राज अंबिके, गौरव बाळिंदे, फैय्याज शेख, सुरेश नांगरे, संदिप मोकाटे, सेवादलाचे लतेंद्र भिंगारे, फिरोज शेख, संतोष देसाई, मंगेश मोहिते, गोरख भालेकर, आदित्य ओव्‍हाळ, अमित कांबळे आदीसंह असंख्य काँग्रेसजण उपस्थित होते.

शिवजयंती निमित्त शिवरायांना सरदारांच्या वंशजांकडून मानवंदना

पुणे : तिरुपती बालाजीची फुलांची आकर्षक सजावट असलेला जिजाऊ मॅांसाहेब शहाजी महाराज शिवज्योत मुख्य स्वराज्यरथ…एकापाठोपाठ येणारे सरदारांचे, मावळ्यांचे, वीर मातांचे स्फुर्ती देणारे ९६ स्वराज्यरथ…महाराणी ताराराणी शौर्य पथकातील ५१ रणरागिणींच्या मर्दानी खेळांची चित्तथरारक मानवंदना…५१ रणशिगांची ललकारी…नादब्रह्म ट्रस्ट ढोल ताशा पथकाचा रणगजर…सनई-चौघडयांचे मंगलमय सूर…लाखोंच्या संख्येने पारंपरिक पोशाखात उपस्थित महिला…आणि शिवभक्तांनी केलेला जय शिवाजी जय भवानीचा जयघोष अशा पवित्र वातावरणात शिवकाल पुन:श्च एकदा पुण्यामध्ये अवतरला.निमित्त होते, शिवजयंती महोत्सव समिती पुणे तर्फे लालमहाल येथून आयोजित शिवजन्मोत्सव स्वराज्यरथ सोहळा या भव्यदिव्य मिरवणुकीचे. मिरवणूकीचे उद्घाटन नागरी विमान वाहतूक केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, महापौर मंजुषा नागपुरे, उपमहापौर परशुराम वाडेकर, समितीचे संस्थापक अध्यक्ष अमित गायकवाड, पोलीस उपायुक्त कृषीकेश रावले,आमदार हेमंत रासने तसेच सर्व स्वराज्यघराण्यांचे प्रतिनिधी यांच्या शुभहस्ते झाले. यावेळी श्रीमंत दगडुशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टचे अध्यक्ष सुनील रासने तसेच सर्व स्वराज्यघराण्यांचे प्रतिनिधी यांच्या हस्ते लालमहालातील जिजाऊंच्या पुतळयाला पुष्पहार घालून जिजाऊ मॅांसाहेब शहाजी महाराज शिवज्योत रथावरील शिवज्योत प्रज्वलन करीत मिरवणुकीला सुरुवात झाली.मिरवणुकीचे यंदा १४ वे वर्ष आहे.भारताच्या इतिहासातील शिवकालीन युध्दकला सादर करणाऱ्या ५१ रणरागिनींच्या औरंगासुर मर्दिनी भद्रकाली रणरागिनी महाराणी ताराराणी शौर्य पथक मर्दानी युध्दकला सादर केली. नादब्रह्म ढोल ताशा पथकाच्या जल्लोषपूर्ण वादनाने वातावरण मंत्रमुग्ध झाले. सोहळ्याचे आयोजन समितीचे प्रवर्तक संस्थापक अध्यक्ष अमित गायकवाड, सचिन पायगुडे, रवींद्र कंक, शंकर कडू, नीलेश जेधे, गोपी पवार, समीर जाधवराव, प्रवीणभैय्या गायकवाड, किरण शितोळे, मोहन पासलकर, मयुरेश दळवी यांसह असंख्य स्वराज्यबांधवांनी केले होते. या स्वराज्यरथांचा सहभाग मिरवणुकीत मानाचा मुख्य रथ जिजाऊ मॅांसाहेब शहाजी महाराज शिवज्योत रथाच्या नेतृत्वाखाली सरसेनापती वीर बाजी पासलकर, सरदार कान्होजी नाईक जेधे, सरदार कृष्णाजी नाईक बांदल, सरनौबत सेनापती येसाजी कंक, नरवीर तानाजी मालुसरे, अटकवीर सरदार मानाजी पायगुडे, कान्होजी नाईक कोंडे, बाबाजी ढमढेरे, पिलाजीराव सणस, हैबतराव शिळीमकर, त्र्यंबकराव नाईक निंवगुणे, सरदार करंजावणे देशमुख, सरदार चांगोजी कडु, अढळराव बाबाजी डोहर धुमाळ, सुर्याजी काकडे, सरसेनापती हंबीरराव मोहिते, संताजी घोरपडे, सरदार महाप्राक्रमी गोदाजीराजे जगताप, सरनोबत सिधोजी थोपटे, झुंजारराव मरळ, शितोळे सरकार, तोरणा किल्लेदार गोंदाजी भुरूक, सरनोबत नागोजीराव कोकाटे, श्रीमंत माने सरकार, सरदार हिरोजी इंदलकर, श्रीमंत सरदार राऊतराव ढमाले, श्रीमंत सुभेदार खंडोजी माणकर, श्रीमंत सरदार दयाजीराव मारणे गंभीरराव, सप्तसहस्त्री सरदार नावजी बलकवडे, वीर माता धाराऊ गाडे, समुद्रस्वामी दर्यासारंग सरखेल कान्होजी आंग्रे, सरदार शिवाजी इंगळे, हिंमतबहाद्दर विठोजी चव्हाण, भोई बांधव, श्रीमंत राजे जाधव व राजे जाधवराव, गरुड घराणे, चंद्रवंशी (भोपतराव) श्रीमंत सरदार लुखजीराव घारे, महाशक्तीशाली सरदार संभाजी काटे, सरदार निंबाळकर घराणे, जगद्गुरु संतश्रेष्ठ संत तुकाराम महाराज भक्ती शक्ती स्वराज्यरथ, श्रीमंत हरजीराजे महाडीक, महाशक्तीशाली रणमर्द सरदार संभाजी कोंढाळकर, सरनोबत पिलाजी गोळे, सरदार प्रतापराव गुजर, सरदार वाघोजी तुपे, श्रीमंत पिलाजीराव राजेशिर्के, श्रीमंत महाराज छत्रसाल बुंदेला, श्रीमंत धार राजेपवार, श्रीमंत गायकवाड सरकार, श्रीमंत महाराज महादजी शिंदे सरकार, गुप्तहेर प्रमुख बर्हिजी नाईक, शिवरत्न शिवाजी काशीद जीवाजी महाले, सरदार जीवाजी सुभानजी रणनवरे, सरदार मल्हारजी तुकोजी निगडे, शुरवीर एकोजी शिरोळे, शुरवीर शेलार मामा, राजेश्री सरदार हांडे, श्रीमंत भोईटे, सरदार मांढरे, स्वराज्यनिष्ठ येसाजी कामठे, श्रीमंत हरजीराजे बर्गे, शिवरायांचे शिलेदार डिंबळे, श्रीमंत तापकीर सरदार, वीर सरदार मालोजी भिलारे, पानीपत वीर महादजी माळवदकर, पानीपत वीर महादजी व दादजी हरपळे, प्रतापगड युध्दवीर सहस्त्री सरदार कोडांजी वरखडे, दक्षिण दिग्वीजय वीर मानाजी मोरे, सरलष्कर खंडोजी दरेकर, स्वराज्याचे शिलेदार कुंजीर, स्वराज्यनिष्ठ शेळके, सरदार फडतरे, राजे साळुंखे चालुक्य राजवंश, स्वराज्यनिष्ठ सरदार बाबर, सिंहगड वीर विठोजी कारके, दुर्ग अजिंक्यतारा वीर किल्लेदार मानाजी साबळे, शुरवीर सावंत स्वराज्यघराणे, सरदार मंबाजी नाईक सोनवणे, सरदार थोरात, सरदार वाबळे, प्रतापगड युध्दवीर सहस्त्री सरदार रामजी पांगारे, स्वामीनिष्ठ खंडो बल्लाळ चिटणीस, सरदार काळे, वीर बाजीप्रभु देशपांडे यांचे स्वराज्यरथ आपआपला गौरवशाली इतिहास मांडत सहभागी झाले.

शिवरायांच्या अश्वारूढ स्मारकावर हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी….ईशान अमित गायकवाड यांवी सलग १५ व्या वर्षी शिवजयंती १९ फेब्रुवारीला शिवाजीनगर येथील एसएसपीएमएस संस्थेच्या प्रांगणातील शिवरायांच्या विश्वातील पहिल्या भव्य अश्वारुढ स्मारकावर हेलीकॅाप्टर मधून पुष्पवृष्टी केली . या अनोख्या इतिहासाच्या पार्श्वभूमीकर ईशान गायकवाड म्हणाले, आपल्या महाराष्ट्रात जन्मलेल्या प्रत्येकावर शिवरायांचे संस्कार हे लहानपणीच झाले असतात. शिवाजी महाराज म्हणले की आपसुकच आपण जय म्हणतो. माझे हे परमभाग्य आहे की शिवरायांच्या विश्वातील पहिल्या स्मारकावर मी सलग १३ वर्षे पुष्पवृष्टी करतो आहे. १९ फेब्रुवारीला विश्ववंदनीय शिवरायांच आणि आमच्या गायकवाड स्वराज्यपरिवाराचे हे एक भावनिक नात निर्माण झाल आहे. श्रीमंत मालोजीराजे छत्रपती आणि पुणे पोलीस यांचे विशेष आभारही ईशानने यावेळी मानले. हेलीकॅप्टर पुष्पवृष्टीचे संकल्पक अमित गायकवाड म्हणाले, आपण पुणेकर भाग्यवान आहोत. करवीर संस्थानाचे राजर्षि शाहू छत्रपती आणि त्यांचे पुत्र राजाराम छत्रपती यांनी शिवरायांचे हे स्मारक पुणे येथे निर्माण केल. शिवरायांचा एकसंध ओतीव काम केलेला हा विश्वातील एकमेव भव्यदिव्य पुतळा आहे. १६ जून १९२८ साली ह्या स्मारकाचे अनावरण झाले होत.पुतळ्याचे वजन तब्बल ८००० किलो आहे. शिवरायांच्या चित्तथरारक इतिहासा सारखाचा ह्या स्मारक निर्मितीचा इतिहास चित्तथरारक आहे.फोटो ओळ : शिवजयंती महोत्सव समिती पुणे तर्फे लालमहाल येथून शिवजन्मोत्सव स्वराज्यरथ सोहळा या भव्यदिव्य मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये सहभागी स्वराज्यरथ.. उपस्थित मान्यवर. मर्दानी खेळ सादर करताना कलाकार.

चंद्रकांतदादा पाटील यांचा विशेष पुढाकारातून पुण्यातील दिव्यांग बांधवांना मिळणार कृत्रिम अवयव

समाजातील दिव्यांग बांधवांना स्वावलंबी बनवण्यासाठी आणि त्यांच्या जीवनात नवी उमेद निर्माण करण्यासाठी राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री ना. चंद्रकांतदादा पाटील यांच्या पुढाकारातून आणि तर्क फाऊंडेशन, भारत विकास परिषद, फ्युप्रो, मिशेलिन आणि समुत्कर्ष सोशल फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक २० फेब्रुवारी रोजी मोफत कृत्रिम अवयव वितरण सोहळ्याचे आयोजन करण्यात येणार आहे. नोव्हेंबर २०२५ मध्ये राबवण्यात आलेल्या तपासणी शिबिरातून निवड झालेल्या पुण्यातील लाभार्थ्यांना या सोहळ्यात प्रत्यक्ष अवयवांचे वाटप केले जाणार आहे. या उपक्रमाचा मुख्य उद्देश दिव्यांग व्यक्तींची गतिशीलता वाढवणे आणि त्यांना आत्मसन्मानाने जगण्यास मदत करणे हा आहे.केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील, खासदार मेधाताई कुलकर्णी आणि पुणे महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांच्या प्रमुख उपस्थितीत दिनांक २० फेब्रुवारी २०२६ रोजी दुपारी ०४.३० वाजता कोथरुड मधील थरकुडे दवाखाना येथे हा अवयव प्रदान सोहळा संपन्न होणार आहे.

ऊर्जा संपन्नेबाबत पुण्यात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषद दिमाखदात संपन्न

देशातील ‘सीजीडी’ क्षेत्राच्या विस्तारासाठी जागतिक नवकल्पनांवर भर

पुणे: पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू नियामक मंडळ (PNGRB) आणि महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेड (MNGL) यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले होते, ऑक्सफर्ड गोल्फ रिसॉर्ट येथे आयोजित या परिषदेचा मुख्य विषय “भारतातील सीजीडी (सिटी गॅस डिस्ट्रिब्युशन) वाढीला चालना देण्यासाठी जागतिक नवकल्पनांचा लाभ” यावर विशेष भर देण्यात आला.परिषदेतील विविध पॅनेल चर्चा सत्र मध्ये PNGRB, MNGL, गेल, इंद्रप्रस्थ गॅस लिमिटेड (IGL), MGL, टोरॅंट गॅस, भारत पेट्रोलियम (BPCL), अल्ट्रा गॅस अँड एनर्जी आणि आयनॉक्स इंडिया यांसारख्या प्रमुख संस्थांचे प्रमुख प्रतिनिधी सहभागी झाले होते. यामध्ये प्रामुख्याने सीजीडी वाढीला गती देणे, supply chain, सुरक्षा बळकट करणे, नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर आणि भारताला नैसर्गिक वायू-आधारित अर्थव्यवस्था’ बनवण्याच्या दृष्टीने करावयाचे प्रयत्न यावर सखोल मार्गदर्शन करण्यात आले. दोन दिवसीय परिषदेत मॅकिन्से अँड कंपनी, ग्रीन पॉवर इंटरनॅशनल, ऑटोमोटिव्ह रिसर्च असोसिएशन ऑफ इंडिया (ARAI), थिंक गॅस, कॉम्पॅक, गेल (GAIL) आणि प्राज इंडस्ट्रीजमधील मान्यवरांनी विशेष सादरीकरणे केली. यावेळी त्यांनी गॅस क्षेत्रातील जागतिक स्तरावर होणारे बदल आणि भारतातील संधी यावर महत्त्वपूर्ण प्रकाश टाकला.या परिषदेत प्रसिद्ध अर्थतज्ज्ञ विजय केळकर यांची विशेष उपस्थिती आणि मार्गदर्शन लाभले.पीएनआरजीबीच्या अंजनी कुमार तिवारी यांनीही उपस्थित राहून सर्वांना मार्गदर्शन केले. तसेच, परिषदेत ग्रीन पॅावर, डीएमएच, एआरएआय, थिंक गॅस, युरोटेक, कॅाम्पॅक, गेल, प्राज इंडस्ट्रीज, एबीबी आदी कंपन्यांच्या प्रमुख प्रतिनिधीनी सहभागी होऊन आपले विचार मांडले.

छत्रपती शिवरायांच्या मार्गावर चालणे हाच विकासाचा खरा मार्ग-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

0

पुणे – छत्रपती शिवरायांनी दिलेला मार्ग हाच सर्वांगीण विकासाचा मार्ग आहे. त्यांच्या कार्याचा हा आदर्श जगासमोर ठेवण्यासाठी २०३० साली छत्रपती शिवाजी महाराजांची ४०० वी जयंती भव्य आणि जागतिक स्तरावर साजरी केली जाईल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.किल्ले शिवनेरीवर आयोजित शिवजन्मोत्सव सोहळ्याप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री सुनेत्रा पवार, सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड. आशिष शेलार, आमदार शरद सोनवणे, माजी आमदार अतुल बेनके, कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत वाघमारे, जिल्हा पोलीस अधीक्षक संदीपसिंह गिल्ल, उपवनसंरक्षक आशिष ठाकरे, अभिनेता रितेश देशमुख, मराठा सेवा संघाचे प्रदेशाध्यक्ष विजय घोगरे आदी उपस्थित होते. छत्रपती शिवाजी महाराज नसते तर आज भारताचा इतिहास आणि भूगोलही वेगळा असता असे नमूद करून फडणवीस म्हणाले. अनेक राजे-रजवाडे मोगलांच्या आधीपत्याखाली काम करत असताना आई जिजाऊंनी घडविलेल्या छत्रपती शिवरायांनी रयतेचे स्वराज्य स्थापन करून हिंदुस्थानाला नवी दिशा दिली. छत्रपती शिवरायांनी १८ पगड जातींच्या मावळ्यांना एकत्र करून स्वराज्याची स्थापना केली. ‘हे माझे राज्य नसून रयतेचे राज्य आहे,’ अशी भूमिका त्यांनी घेतली. देव, देश आणि धर्मासाठी लढा देण्याची प्रेरणा देत त्यांनी सामान्य जनतेला मोगलांच्या जोखडातून मुक्त करण्याचे कार्य केले. त्यांच्या राज्यात समता, सन्मान, न्याय आणि स्त्रीसुरक्षा यांना प्राधान्य होते. शेतकरी समाधानी राहील, अन्याय-अत्याचार होणार नाहीत, अशी राज्यव्यवस्था त्यांनी उभी केली, असे मुख्यमंत्री म्हणाले. राज्यकारभारात विविध सुधारणा करताना शिवाजी महाराजांनी सुमारे ५० प्रकारचे कर रद्द करून सुटसुटीत करप्रणाली निर्माण केली. पाणी, जंगल यांचे नियोजन केले. भविष्यातील धोका ओळखून समुद्रमार्गे होणाऱ्या आक्रमणांना रोखण्यासाठी जलदुर्ग उभारले. पोर्तुगीजांवर विजय मिळवून पश्चिम किनारपट्टी सुरक्षित केली. छत्रपतींच्या कारकिर्दीत समुद्रमार्गे आक्रमण करण्याची हिंमत कुणालाही झाली नाही, अशा शब्दात त्यांनी महाराजांचे द्रष्टेपण मांडले. शिवरायांच्या पराक्रमाची साक्ष राज्यातील गड किल्ले देत असल्याचे नमूद करीत श्री. फडणवीस पुढे म्हणाले, पंतप्रधानांच्या पुढाकाराने शिवनेरीसह छत्रपती शिवाजी महाराजांचे १२ किल्ले जागतिक वारसा स्थळ म्हणून नामांकित झाले असून २७ देशांनी एकमताने त्यास मान्यता दिली आहे. सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी संबंधित प्रमाणपत्र स्वीकारले. त्यामुळे शिवरायांचे किल्ले आता अधिकृतपणे जागतिक वारसा स्थळ म्हणून गौरवले गेले आहेत. शिवरायांच्या कार्याची साक्ष असलेले राज्यातील सर्व किल्ले अतिक्रमणमुक्त करण्याचा निर्णय शासनाने घेतला असल्याचे त्यांनी सांगितले.मराठा सेवा संघाच्या निवेदनावर राज्य सरकार सकारात्मक काम करेल, तसेच मांडण्यात आलेल्या सर्व मुद्द्यांवर विचार करण्यात येईल, अशी ग्वाही देऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राज्यातील आणि जगभरातील शिवप्रेमींना शिवजयंतीच्या शुभेच्छा दिल्या.*शिवरायांच्या विचारावर चालणारा बलशाली महाराष्ट्र घडवू- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे*उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराज हे युगपुरुष होते. त्यांच्या दूरदृष्टीतून उभे राहिलेले स्वराज्य आजही सुशासनाची प्रेरणा देते. शिवरायांच्या विचारांवर चालत बलशाली व स्वाभिमानी महाराष्ट्र घडविण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला.महाराजांनी जलव्यवस्था, अर्थकारण व पर्यावरण रक्षणाच्या संकल्पना चारशे वर्षांपूर्वीच राबवल्या. ‘शिवराई’ ही चलन व्यवस्था त्यांच्या दूरदृष्टीचे प्रतीक असल्याचे त्यांनी नमूद केले. राज्यातील गड-किल्ल्यांचे जतन व संवर्धन अधिक वेगाने करण्यात येईल. बाळासाहेब ठाकरे जन्मशताब्दी वर्षानिमित्त किल्ले स्वच्छता व जतन मोहीम राबविण्यात येणार आहे.शेतकऱ्यांप्रती महाराजांच्या संवेदनशील धोरणांचा उल्लेख करत बळीराजाला सक्षम करण्यासाठी सरकार कटिबद्ध असल्याचे त्यांनी सांगितले. स्त्रीसन्मानाची परंपरा जपत ‘लाडकी बहीण’ योजनेद्वारे महिलांना सक्षम करण्यात येत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. जुन्नर तालुका व शिवनेरी किल्ला परिसराच्या विकासाला प्राधान्य देऊन प्रलंबित मागण्या मार्गी लावण्यात येतील, असे उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले.*शिवनेरी किल्ला विचार आणि कार्याचे प्रेरणास्थळ-उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार*श्रीमती पवार म्हणाल्या, दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासाठी शिवनेरी किल्ला, ही शिवजन्मभूमी केवळ ऐतिहासिक स्थळ नव्हते, तर ते त्यांच्या विचारांचे आणि कार्याचे प्रेरणास्थळही होते. पवित्र शिवनेरी किल्ल्याविषयी केवळ जिव्हाळाच नव्हता, तर या शिवजन्मभूमीचे सौंदर्य वाढावे, तिचा ऐतिहासिक वारसा जपला जावा आणि भावी पिढ्यांना अभिमानाने दाखवता यावा, यासाठी त्यांनी सातत्याने प्रयत्न केले. त्यांच्या पुढाकारातून ‘किल्ले शिवनेरी विकास आराखडा’ साकार झाला आणि या परिसराच्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देण्यात आला.गेल्या वर्षी युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत किल्ले शिवनेरीचा समावेश झाला आहे. त्यापूर्वीच शिवजन्मभूमी शिवनेरीसह राज्यातील गडकोटांच्या जतन-संवर्धनासाठी त्यांनी निधीची तरतूद केली होती.केवळ शिवनेरी किल्ल्यापुरते मर्यादित न राहता, शिवजन्मभूमी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जुन्नर तालुक्याला पर्यटन तालुका म्हणून विकसित करण्याचा संकल्प त्यांनी ध्यासाने घेतला होता आणि त्या दिशेने ठोस पावले उचलली होती.गेल्या अर्थसंकल्पात आग्रा येथे महाराजांच्या पराक्रमाची साक्ष देणारे शिवस्मारक उभारण्याचा निर्धार, पानिपत येथे मराठा शौर्य स्मारक तसेच संगमेश्वर येथील छत्रपती संभाजी महाराजांच्या स्मारकाचा समावेश आहे, असा संकल्प करण्यात आला होता.किल्ले रायगड विकास आराखडा व स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराजांचे बलिदान स्थळ तुळापूर आणि समाधी स्थळ वढू बुद्रुक येथे स्मारकाचे काम अत्यंत वेगाने सुरु असून ही सर्व कामे प्रगतीपथावर आहेत. या प्रत्येक स्मारकातून भावी पिढ्यांना प्रेरणा, स्वाभिमान आणि राष्ट्रनिष्ठेचा संदेश मिळत राहणार आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्यातील प्रत्येक घटकाची काळजी घेण्याची शिकवण आपल्याला दिली असून त्याच विचारांवर आणि रयतेचं राज्य’ या संकल्पनेवर राज्य सरकार पुढे वाटचाल करीत आहे. शिवछत्रपतींच्या स्वप्नातील सुजलाम सुफलाम, न्याय आणि समृद्ध स्वराज्य घडवण्यासोबतच यापुढेही महाराष्ट्राच्या सर्वांगिण विकासासाठी राज्य सरकार कटिबद्ध राहील, असा विश्वास श्रीमती पवार यांनी व्यक्त केला.आमदार श्री. सोनवणे यांनी आपले विचार व्यक्त केलेप्रारंभी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत शिवजन्मस्थानी पारंपरिक वेशातील महिलांनी शिवरायांची महती सांगणारा पाळणा गायिला. राष्ट्रगीत तसेच ‘गर्जा महाराष्ट्र माझा’ या राज्यगीताची धून पोलीस बँड पथकाने वाजवून सलामी दिली. त्यानंतर पोलीस पथकाने बंदुकीच्या तीन फैरी झाडून छत्रपती शिवरायांना मानवंदना दिली. यावेळी जिल्हा परिषद शाळच्या लहान विद्यार्थ्यांच्या पथकाने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनातील प्रसंग सुंदर पद्धतीने सादर केले.त्यानंतर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी बाल शिवाजी व माॅं जिजाऊंच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण केला. आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेची पालखी वाहीली. यावेळी मुख्यमंत्री यांच्या हस्ते प्रगत प्रगतशील शेतकरी स्व. पंकज वामन, खारखर येथील टाटा कॅन्सर रुग्णालयाचे विभाग प्रमुख डॉ. विनोद सीताराम हांडे, लेफ्टनंट अजिंक्य मेहेर, माजी पंचायत समिती सभापती शिवाजीराव खैरे आणि उपलेफ्टनंट श्रुतिका ताथवडे यांना शिवनेर भूषण पुरस्कार प्रदान करण्यात आले.कार्यक्रमास उपविभागीय अधिकारी  गोविंद शिंदे, मराठा सेवा संघाचे पदाधिकारी यांच्यासह शिवभक्त उपस्थित होते.

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त भव्य पदयात्रा उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न

पुणे : भारत सरकारचे युवा कार्यक्रम आणि खेळ मंत्रालय, भारत सरकारच्या निर्देशानुसार जिल्हा प्रशासन, क्रीडा विभाग आणि पुणे महानगरपालिका यांच्या समन्वयाने शिवजयंती दिनानिमित्त ‘मेरा युवा भारत” भव्य पदयात्रेचे उत्साहपूर्ण वातावरणात आयोजन करण्यात आले. पुणे महानगरपालिकेच्या महापौर मंजुषा नागपुरे यांच्या हस्ते झेंडा दाखवून पदयात्रेचा शनिवार वाडा येथून शुभारंभ करण्यात आला.यावेळी उपमहापौर परशुराम वाडेकर, क्रीडा उपसंचालक युवराज नाईक, जिल्हा क्रीडा अधिकारी जगन्नाथ लकडे, शिक्षण उपायुक्त वसुंधरा बारवे, मनपा उपायुक्त संदीप खलाटे, जिल्हा प्रशासनाच्या वतीने तहसीलदार स्मिता माने,अर्जुन पुरस्कार प्राप्त काकासाहेब पवार, भारतीय खो खो संघाचे कर्णधार प्रतीक वायकर तसेच शिक्षण, पर्यटन, क्रीडा, आरोग्य व पोलीस विभागाचे अधिकारी उपस्थित होते.महापौर श्रीमती नागपुरे म्हणाल्या, छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार आपण अंगीकारले पाहिजेत. शिवजयंती ही औपचारिक मिरवणूक न राहता ती तरुण पिढीला महाराजांच्या विचारांशी जोडणारी, सगळ्यांमध्ये सांघिक भावना निर्माण करणारी ठरावी. आपले सण- परंपरा सर्वांनी एकत्र येऊन साजरे केले पाहिजेत. सर्व महानुभाव, युगपुरुषांच्या जयंती एकत्र येऊन साजरे करुया सर्वांमध्ये सांघिक भावना निर्माण होऊन शिवरायांचे विचार आचरणात यावेत, असा संकल्प यानिमित्ताने करुया, असे त्या म्हणाल्या.युवा पिढीने थोरा मोठ्यांचा वारसा जतन करावा, तरुण पिढीमध्ये ऊर्जा नवसंकल्पना जागृत करण्याच्या उद्देशाने या पदयात्रेचे आयोजन करण्यात आल्याचे श्री. लकडे यांनी प्रास्ताविकात सांगितले.या पदयात्रेचा शनिवार वाडा येथून शुभारंभ होऊन एस एस पी एम शाळेजवळील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याजवळ समारोप करण्यात आला. ढोल ताशांच्या गजरात आणि जय भवानी, जय शिवाजी, हर हर महादेव, छत्रपती शिवाजी महाराज की जय अशा घोषणांनी संपूर्ण परिसर दुमदुमून गेला. पदयात्रेत पारंपरिक वेशभूषेत राष्ट्रीय छात्र सेना, राष्ट्रीय सेवा योजना, उच्च शिक्षण, तंत्रशिक्षण, व्यवसाय शिक्षण, सावित्रीबाई फुले विद्यापीठाच्या सुमारे २ हजार विद्यार्थी- विद्यार्थीनी सहभाग घेतला.यावेळी शिवप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.