Home Blog Page 95

ओसवाल बिल्डरने जागा बळकावण्याचा प्रयत्न केल्याने ज्येष्ठ नागरिकाची आत्महत्या

पुणे: येथील बाणेर भागात विकसित करण्यासाठी दिलेल्या मिळकतीच्या व्यवहारात फसवणूक झाल्याने एका सेवानिवृत्त अधिकाऱ्याने नियोजित गृहप्रकल्पातून उडी मारून आत्महत्या केली. या प्रकरणी ज्येष्ठाला आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या आरोपावरून दोन बांधकाम व्यावसायिकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नरेश उमाकांत महाजन (वय ६९, रा. अंबरनाथ पूर्व, जि. ठाणे) असे आत्महत्या केलेल्या ज्येष्ठाचे नाव आहे. त्यांचा मुलगा मयूर नरेश महाजन (वय ४१, रा. अंबरनाथ पूर्व, जि. ठाणे) यांनी बाणेर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. या फिर्यादीनुसार, बांधकाम व्यावसायिक जयंतीलाल ताराचंद ओसवाल (वय ५६) आणि रिषभ ओसवाल (वय ३०, दोघे रा. भवानी पेठ) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नरेश महाजन हे महावितरणमध्ये अधिकारी होते. त्यांनी बाणेर येथे एक जागा घेतली होती, जी त्यांनी ‘स्विटी असोसिएटस’चे जयंतीलाल ओसवाल यांना विकसित करण्यासाठी दिली होती. करारानुसार, विकसित केलेल्या जागेवर त्यांना सदनिका मिळणार होती. मात्र, ओसवाल यांनी कराराचे पालन केले नाही आणि त्यांना सदनिका दिली नाही. यामुळे महाजन नैराश्यात होते.

महाजन यांच्या जागेवर सात मजली गृहप्रकल्प साकारण्यात आला असून, त्याचे बांधकाम पूर्ण झाले आहे. १६ फेब्रुवारी रोजी महाजन बाणेर येथील या गृहप्रकल्पाच्या आवारात आले. त्यांनी कराराप्रमाणे सदनिका देण्याबाबत ओसवाल यांच्याकडे विचारणा केली. त्यावेळी बांधकाम व्यावसायिकांनी त्यांना मानसिक त्रास देऊन धमकावले, असा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे.

या घटनेनंतर नरेश महाजन यांनी नियोजित गृहप्रकल्पाच्या सातव्या मजल्यावर जाऊन तेथून उडी मारून आत्महत्या केली. मयूर महाजन यांच्या फिर्यादीनुसार, बांधकाम व्यावसायिकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, सहायक पोलीस निरीक्षक अनिल केकाण या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

पुण्यातील काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमुळे आज मला मनुवादी वृत्तीच्या विरोधातील पुढचा लढा लढण्यासाठी अधिक बळ मिळाले:हर्षवर्धन सपकाळ

पुणे महानगरपालिकेच्या निवडणुका पार पडल्यानंतर प्रथमच प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धनजी सपकाळ यांनी पुणे शहराला भेट दिली. तसेच मागील आठवड्यामध्ये मा. सपकाळ साहेब यांच्या वक्तव्‍याबाबत काँग्रेस भवन येथे भाजपाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी हिंसक मोर्चा काढून दगडफेक केली होती. या पार्श्वभूमीवर पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी सवांद साधण्याकरीता या मेळाव्‍याचे आयोजन केले होते. या मेळाव्‍यात जखमी कार्यकर्त्यांची विचारपूस व सत्कार प्रदेशाध्यक्ष मा. सपकाळ यांच्या हस्ते करण्यात आला.

पुणे शहर काँग्रेसचे अध्यक्ष अरविंद शिंदे यांनी मा. हर्षवर्धन सपकाळ यांचे स्वागत व सत्कार करून कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. यानंतर व पुणे मनपा गटनेते रामचंद्र उर्फ चंदूशेठ कदम व सर्व नवनिर्वाचित नगरसेवकांसह प्रदेशाध्यक्षांचा सत्कार केला.

यावेळी प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की, ‘‘मला लाज वाटते की, महाराष्ट्राचा मुख्यमंत्री राजकीय टिपणी आणि बदला घेण्याकरीता खोटे बोलतो. आपल्या महाराष्ट्राची आण-बाण-शान व स्वाभिमान असलेले छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल खोटे बोलण्याचे पातक जर देवेंद्र फडणवीस करीत असतील तर त्यांना आम्ही सोडणार नाही. आपल्या बाजूला शौर्य व इतिहास आहे. दुर्दैवाने फुटीर वादाचा इतिहास देखील आपल्याला थोड्या काळाचा आहे, परंतु एक लक्षात असू द्यात जे उडून गेले ते कावळे व जे उरले ते खरे मावळे. पुण्यात असलेल्या केंद्रातील एका मंत्र्याने तर आपल्या आजच्या मेळाव्‍याचे समजताच सर्व बैठका रद्द करून १०-१० मिनिटाला माहिती घेत होते. पुणे शहर काँग्रेसच्या मेळाव्‍याच धसका भाजपाच्या नेत्यांनी घेतलेला दिसून येतो. पुण्याच्या पावन भूमीमध्ये गाढवाचा नांगर फिरविण्याचे पातक इतिहासात करण्यात आले होते, याच मनुवादी विचारांचा माणूस आज महाराष्ट्राचा मुख्यमंत्री आहे. परंतु येणाऱ्या भविष्यकाळात स्वराज्य व सुराज्य निर्माण करण्यासाठी आपल्याला सोन्याचा नांगर फिरवायचा आहे. मनुवृत्ती ही गाढवाचा नांगर तर संविधान हे सोन्याचा नांगर आहे. पोलीसांनी सुध्दा लक्षात असू द्यावे त्यांचे ब्रीद वाक्य ‘सद रक्षणाय्‌ खल निग्रनाय्‌’ असे आहे. नव्‍या परिवर्तनाची सुरवात पुण्यातून झाली आहे आणि त्याची कास धरून आपल्याला पुढे जायचे आहे.’’

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या उपाध्यक्षा प्राची दुधाने यांनी केले तरी आभार माजी नगरसेवक अजित दरेकर यांनी मानले.

यावेळी मेळाव्‍यास काँग्रेसचे सर्व प्रमुख नेते, पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्यने उपस्थित होते.

अजित पवार विमान अपघाताचा प्राथमिक अहवाल २८ फेब्रुवारीपूर्वीच:केंद्रीय विमान वाहतूकमंत्री मुरलीधर मोहोळ

खासदार जनसंपर्क सेवा अभियानाला मोठा प्रतिसाद

पुणे शहराला देशातील सर्वोत्तम शहर बनवणार

केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांचा निर्धार

दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान दुर्घटना प्रकरणाचा तपास विमान अपघात तपास संस्था (एएआयबी) आणि नागरी विमान वाहतूक महासंचालनालय (डीजीसीए) करत आहे. नियमानुसार, एका महिन्यात (२८ फेब्रुवारी) त्यांचा प्राथमिक अहवाल प्रसिद्ध होईल. त्यातून अपघाताची वस्तुस्थिती आणि सत्य समोर येईल, असेही मुरलीधर मोहोळ यांनी सांगितले.

पुणे: पुणे शहराचा सर्वांगीण विकास करून त्याला देशातील सर्वोत्तम शहर बनवण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. नागरिकांच्या समस्या प्रत्यक्ष जाणून घेऊन त्या तातडीने सोडवण्यासाठी ‘खासदार जनसंपर्क सेवा अभियान’ हे एक प्रभावी माध्यम ठरत आहे, असे प्रतिपादन केंद्रीय नागरी विमान वाहतूक व सहकार राज्यमंत्री खासदार मुरलीधर मोहोळ यांनी केले.

गोखलेनगर येथील शहीद तुकाराम ओंबाळे क्रीडांगणावर आयोजित १६ व्या ‘जनता दरबारात’ ते बोलत होते. खासदार जनसंपर्क सेवा अभियानांतर्गत आयोजित या कार्यक्रमात मोहोळ यांनी नागरिकांचे प्रश्न ऐकून घेत त्यावर तातडीने तोडगा काढण्याचे निर्देश प्रशासनाला दिले. या प्रसंगी महापौर मंजूषा नागपुरे, स्थानिक आमदार सिद्धार्थ शिरोळे, उपमहापौर परशुराम वाडेकर, सभागृह नेते गणेश बिडकर यांसह पुणे महापालिका, पुणे पोलिस आणि केंद्र व राज्य सरकारच्या विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते. दर महिन्याच्या शेवटच्या रविवारी अशा प्रकारे जनता दरबार भरवून स्थानिक, राज्य आणि केंद्र स्तरावरील प्रलंबित प्रश्न मार्गी लावले जात आहेत.

‘पुणे शहराचा खासदार या नात्याने मी आणि पालकमंत्री सुनेत्रा पवार पुणेकरांचे प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्नशील आहोत. पुणेकरांनी दाखविलेला विश्वास महायुती सार्थ ठरवित आहे. नागरिकांना दैनंदिन जीवनात भेडसावणाऱ्या समस्यांचे निराकरण जनता दरबारच्या माध्यमातून केले जात आहे,’ असे मुरलीधर मोहोळ यांनी सांगितले.

‘शिवाजीनगर-हिंजवडी ही पीपीपी मॉडेलवरील देशातील पहिली मेट्रो लवकरच पुणेकरांच्या सेवेत येईल. या तेवीस किलोमीटरच्या मेट्रो मार्गिकेची चाचणी यशस्वी झाली आहे. पुण्यातील वनाज ते रामवाडी मेट्रो मार्गिकेचा वाघोलीपर्यंत आणि पिंपरी-चिंचवड ते स्वारगेट मेट्रो मार्गिकेचा कात्रजपर्यंत विस्तार होणार आहे. याशिवाय खडकवासला-खराडी आणि माणिकबाग ते नळस्टॉप या नवीन मार्गिकांना केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे. त्यामुळे सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सक्षम होऊन शहरातील वाहतूक कोंडी दूर होईल.’ असा विश्वास मोहोळ यांनी व्यक्त केला.

लोहगाव विमानतळाच्या धावपट्टी विस्तारीकरणासाठी ३२५ एकर जमीन ताब्यात घेण्याची प्रक्रिया सुरू आहे. तसेच, पुरंदर येथील नियोजित आंतरराष्ट्रीय विमानतळ हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारचा ‘ड्रीम प्रोजेक्ट’ असून त्याच्या भूसंपादनाला गती देण्यात आली आहे,’ असे मोहोळ यांनी सांगितले.


….

शासकीय अधिकाऱ्यांनी चांगले वाचन करणे गरजेचे : पुलकुंडवार

दुसऱ्या राज्यस्तरीय शासकीय अधिकारी मराठी साहित्य संमेलनाचा समारोप

पुणे (प्रतिनिधी) : शासकीय अधिकाऱ्यांकडून चांगली साहित्य निर्मिती होण्यासाठी त्यांनी अधिकाधिक चांगले वाचन केले पाहिजे अशी अपेक्षा विभागीय आयुक्त चंद्रकांत पुलकुंडवार यांनी व्यक्त केली.
दुसऱ्या राज्यस्तरीय शासकीय अधिकारी मराठी साहित्य संमेलनाच्या समारोप प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते.
याप्रसंगी व्यासपीठावर संमेलनाचे अध्यक्ष मिलिंद भागवत, माजी सहकार आयुक्त अनिल कवडे, यशदाचे अतिरिक्त महासंचालक शेखर गायकवाड, विभागीय आयुक्त चंद्रकांत पुलकुंडवार, गुजरातचे जीएसटीचे प्रधान आयुक्त सुरेंद्रकुमार मानकोसकर, संमेलनाचे निमंत्रक सुनील महाजन आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.
पुलकुंडवार यांनी शासकीय अधिकाऱ्यांच्या संमेलनाला शुभेच्छा दिल्या आणि म्हणाले, शासकीय अधिकाऱ्यांमध्येसुद्धा प्रतिभेची कमतरता नाही. त्यांच्याकडे अनुभवाचेही संचित आहे. त्यांनी या सगळ्याला अधिक चांगल्या सकस वाचनाची जोड दिली पाहिजे. त्यातूनच अधिक दर्जेदार आणि उत्तम साहित्य निर्मिती होऊ शकतील.
शासकीय अधिकाऱ्यांचे साहित्य संमेलन हे विचारांना स्फूर्ती देणारे संमेलन आहे असे गौरवोद्गार महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे माजी अध्यक्ष किशोर राजे निंबाळकर यांनी काढले.
निंबाळकर म्हणाले, दोन दिवस चाललेल्या या संमेलनात अनेक विषयांवर उहापोह करण्यात आला आहे. आपला देश विविध भाषा प्रांत यांनी नटलेला आहे. शासकीय अधिकाऱ्यांना या विविध भागांमध्ये काम करण्याची संधी मिळत असते. त्यांना ज्या ज्या भागात जाण्याची संधी मिळते त्यांनी त्या त्या ठिकाणच्या अनुभवांवर लेखन केले पाहिजे. विविध भाषांमधील पुस्तके देखील आपल्या भाषेत येणे गरजेचे आहे. मुलांनी मराठी भाषेतूनच शिक्षण घेणे गरजेचे आहे मात्र आजकाल स्टेटस सिम्बॉल म्हणून मुलांना इंग्रजी शाळेत टाकले जाते. परंतु हे बदल घडवण्याची सुरुवात शासकीय अधिकाऱ्यांनी केली पाहिजे. शासकीय अधिकाऱ्यांच्या संमेलनातून असे चांगले संदेश समाजापुढे जाणे आवश्यक आहे.
संमेलनाध्यक्ष मिलिंद भागवत यांनी दोन दिवस चाललेल्या संमेलनातील विविध उपक्रमांचा एकत्रित आढावा घेतला. या संमेलनातून आपण नेमके काय मिळवले याविषयी त्यांनी आपले विचार मांडले. हे संमेलन अधिक व्यापक स्वरूपात आपण पुढील वर्षी घेऊयात अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
यावेळी अनिल कवडे म्हणाले, शासकीय सेवा हे समाजसेवेचे उत्तम असे माध्यम आहे. माणसांना सर्वाधिक पाहण्याची अनुभवण्याची संधी शासकीय अधिकाऱ्यांना मिळत असते. या संधीचा उपयोग आपण कसा करतो हे शेवटी महत्त्वाचे आहे. प्रतिभेचे भावनेचे प्रकटीकरण संमेलनातून जसे आवश्यक आहे तसे आत्मचिंतन सुद्धा गरजेचे आहे. आपण काय कमावले आणि काय गमावले हे सुद्धा पहायला हवे. त्या परीक्षणावर साहित्याच्या माध्यमातून आपल्याला नेमकेपणाने बोट ठेवता यायला हवे. प्रबोधनाचा मार्ग हा साहित्य निर्मितीतून जातो हे लक्षात ठेवून चांगले आचार विचार समाजात रुजवण्यासाठी शासकीय अधिकाऱ्यांनी पुढाकार घेणे आवश्यक आहे.
चांगल्या पुस्तकांसाठी एक डिजिटल व्यासपीठ उभे करून शासकीय अधिकाऱ्यांना हवी असलेली पुस्तके वाचता किंवा ऐकता कशी येतील असा प्रयत्न आपण केला पाहिजे. आपण एकत्र येऊन काहीतरी चांगले करू शकतो हाच या संमेलनाचा मुख्य उपलब्धीचा भाग आहे.
राजीव नंदकर यांनी सूत्रसंचालन केले. संमेलनाचे निमंत्रक सुनील महाजन यांनी आभार मानले.


शासकीय मदतीसाठी प्रयत्न करणार
गेले दोन वर्षे हे संमेलन कोणत्याही शासकीय मदतीविना सुरू आहे. परंतु पुढील वर्षापासून या संमेलनाला शासकीय मदत मिळावी यासाठी आपण प्रयत्न करू अशी ग्वाही निंबाळकर यांनी दिली. चांगले विचार समाजात घेऊन जाण्याचे काम शासकीय अधिकाऱ्यांच्या माध्यमातून होत असेल तर त्याला प्रोत्साहन मिळणे गरजेचे आहे त्यासाठी मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन त्यांना शासकीय मदतीचे आवाहन करू असे निंबाळकर यांनी सांगितले.

पुण्यात एकाच वेळी ४२ ठिकाणी जल स्वच्छता मोहीम संपन्न

जल संवर्धनाच्या दिशेने संत निरंकारी मिशनचे पुण्यामध्ये विशाल स्वच्छता अभियान संपन्न-

पुणे, २२ फेब्रुवारी 2026 : जेव्हा सेवा हीच साधना ठरते आणि निसर्गाविषयी संवेदनशीलता जीवनाचा मूलमंत्र बनते, तेव्हा समाजाला नवी दिशा देणारे पवित्र संकल्प जन्माला येतात. मानवसेवा व लोककल्याणाच्या या दिव्य भावनेला साकार रूप देत संत निरंकारी मिशनच्या वतीने ‘प्रोजेक्ट अमृत’ अंतर्गत ‘स्वच्छ जल, स्वच्छ मन’ या अभियानाच्या चौथ्या टप्प्याचे आयोजन रविवार, 22 फेब्रुवारी 2026, सकाळी 8 ते 11 वाजेपर्यंत, परम श्रद्धेय सतगुरु माता सुदीक्षा जी महाराज एवं निरंकारी राजपिता रमीत जी यांच्या पावन मार्गदर्शनाखाली संपूर्ण भारतभर एकाच वेळी राबविण्यात आले.

या अभियाना अंतर्गत पुणे जिल्ह्यातील इंद्रायणी, मुळा, मुठा, भीमा, भामा, घोडनदी, पवना, वेळू, कुकरी, मिना, कऱ्हा, मांडवी, आनंदी या नद्यांसह शहरातील विविध तलाव अशा ४२ ठिकाणी ही मोहीम राबविण्यात आली. या अभियानांतर्गत पुण्यामध्ये मुळा मुठा नदीच्या विविध घाटांवर विशाल स्वच्छता मोहीम राबविण्यात आली.

संत निरंकारी मंडळाचे नंदकुमार झांबरे यांनी माहिती देताना सांगितले की, हा विशाल उपक्रम देशभरातील 1600 हून अधिक ठिकाणी तसेच पुण्यामध्ये ४२ ठिकाणी एकाच वेळी या अभियानाचे आयोजन करण्यात आले होते.

पाणी हे केवळ एक साधन नसून जीवनाचा आधार आणि ईश्वराची अमूल्य देणगी आहे त्याचे संरक्षण करणे हे प्रत्येक नागरिकाचे नैतिक कर्तव्य आहे हि जागृती समाजामध्ये निर्माण करणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे. संत निरंकारी मिशनने बाबा हरदेव सिंह जी यांच्या प्रेरणादायी शिकवणी आत्मसात करून सन 2023 मध्ये संस्कृती मंत्रालय, भारत सरकार यांच्या सहकार्याने ‘प्रोजेक्ट अमृत’ची सुरुवात केली होती. जलसंवर्धन हा उपक्रम केवळ एखाद्या दिवसापुरता किंवा मर्यादित मोहिमेपुरता न ठेवता, तो एक जीवनशैली, संस्कार आणि सेवाभाव म्हणून स्वीकारण्याची प्रेरणा बनेल — जिथे स्वच्छ जलातून स्वच्छ मन आणि स्वच्छ समाज घडू शकेल.

सतगुरु माताजींचा संदेश सदैव हाच राहिला आहे की, आपण ही पृथ्वी पुढील पिढ्यांसाठी अधिक सुंदर, स्वच्छ आणि संतुलित स्वरूपात जपून ठेवली पाहिजे. ‘स्वच्छ जल, स्वच्छ मन’ हे अभियान त्या पवित्र संकल्पाचे मूर्त स्वरूप आहे, जे समाजाला निसर्ग, समाज व आत्म्याशी जोडून करुणा, समतोल आणि सौहार्दपूर्ण भविष्याच्या दिशेने पुढे नेण्याचे काम करेल.

स्वछता अभियान संपन्न झाल्यानंतर त्याच ठिकाणी विशाल सत्संग चे देखील आयोजन करण्यात आले होते . त्यामधून बाहेरील स्वच्छतेबरोबरच मनाच्या आंतरिक शुद्धीचा संदेश आध्यात्मिक विचारधारेतून देण्यात आला.

शरद पवार यांची प्रकृती पुन्हा खालावली:डिहायड्रेशनमुळे अशक्तपणा, पुण्याच्या रुबी हॉल रुग्णालयात दाखल

0

पुणे:राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर पवार कुटुंबासह संपूर्ण राज्याला मोठा धक्का बसला आहे. या कठीण काळात कुटुंबाचा मुख्य आधारस्तंभ म्हणून खंबीरपणे उभे राहिलेले ज्येष्ठ नेते शरद पवार यांची प्रकृती पुन्हा एकदा काहीशी बिघडली आहे. त्यांना जाणवत असलेल्या प्रचंड अशक्तपणामुळे पुण्यातील रुबी हॉल क्लिनिकमध्ये उपचारांसाठी दाखल करण्यात आले आहे.
प्राथमिक माहितीनुसार, शरद पवार यांच्या शरीरातील पाण्याची पातळी कमी झाल्याने त्यांना अशक्तपणा जाणवत आहे. रुग्णालयात दाखल केल्यानंतर त्यांना सलाईन लावण्यात आली आहे. सध्या त्यांच्यावर लक्ष ठेवण्यासाठी डॉक्टरांची एक विशेष टीम तैनात करण्यात आली आहे. सध्या ते डॉक्टरांच्या देखरेखीखाली निरीक्षणाखाली आहेत.रुग्णालया प्रशासनाने सांगितले की, शरद पवार यांना आज सौम्य डिहायड्रेशनमुळे रुबी हॉल क्लिनिकमध्ये दाखल करण्यात आले. त्यांना द्रवपदार्थांची आवश्यकता आहे. त्यांची प्रकृती स्थिर आहे. ते २ दिवस रुबी हॉल क्लिनिकमध्ये राहतील आणि नंतर त्यांना घरी पाठवण्यात येईल.
काही दिवसांपूर्वीच शरद पवार यांनी रुबी हॉल रुग्णालयात पाच दिवस उपचार घेतले होते. त्यावेळी शरद पवारांना छातीत संसर्ग झाला होता त्यामुळे त्यांना खोकला आणि कफचा त्रास जाणवत होता. रुग्णालयात दाखल झाल्यानंतर त्यांच्या विविध वैद्यकीय तपासण्या करण्यात आल्या. सर्व तपासण्यांचे अहवाल समाधानकारक असल्याचे डॉक्टरांनी स्पष्ट केले होते. त्यांच्या ऑक्सिजनची पातळी आणि इतर जीवनावश्यक निकष सामान्य मर्यादेत असल्याचेही सांगण्यात आले होते.

प्रकृतीत सुधारणा झाल्याने पाच दिवसानंतर त्यांना घरी सोडण्यात आले होते आणि ते पुण्यातील निवासस्थानी विश्रांती घेत होते. मात्र, आज पुन्हा अशक्तपणा वाढल्याने खबरदारीचा उपाय म्हणून त्यांना पुन्हा रुग्णालयात दाखल करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

अजित पवार यांचे 28 जानेवारी रोजी बारामती येथे झालेल्या भीषण विमान अपघातात निधन झाले होते. त्याचा मोठा धक्का शरद पवारांसह त्यांच्या कुटुंबीयांना बसला होता. त्यांनी सुनेत्रा पवार, पार्थ पवार, जय पवार यांच्या भेटीगाठी घेऊन पवार कुटुंबाला सावरण्याचा प्रयत्न केला होता. अजित पवार यांच्या निधनानंतर शरद पवार सातत्याने श्रद्धांजली कार्यक्रम व भेटीगाठींमध्ये व्यस्त होते. यामुळे त्यांची दगदग वाढली होती. त्यातच गत काही दिवसांपासून प्रकृती बरी नसल्यामुळे त्यांनी सार्वजनिक कार्यक्रम टाळले होते.

राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन उद्यापासून:विरोधकांचा सरकारच्या चहापानावर बहिष्कार; अजित पवारांच्या अपघाताबाबत संशय

0

सत्ताधारी पक्ष मस्तीमध्ये असल्याची टीका,घरगुती डिजिटल मीटरचा विरोध,सोलार लाईट प्रकल्पात 12 हजार कोटींचा भ्रष्टाचार,महाराष्ट्र ‘उडता पंजाब’ होतोय का?
मुंबई:महाराष्ट्र राज्याच्याअर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आयोजित केलेल्या चहापान कार्यक्रमावर महाविकास आघाडीने (MVA) शब्दांत बहिष्कार टाकला आहे. “सत्ताधारी पक्ष बहुमताच्या मस्तीत असून लोकशाही आणि संविधानाचा कोणताही सन्मान राखला जात नाही. अशा ‘निर्लज्ज’ आणि ‘दुटप्पी’ वागणाऱ्या सरकारच्या चहापानाला आम्ही जाणार नाही,” असा घणाघात ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव यांनी आज पत्रकार परिषदेत केला.
भास्कर जाधव म्हणाले, आम्हा सर्वांना चहापानासाठी वैयक्तिकरित्या मुख्यमंत्री महोदयांचे पत्र आलेले आहे. परंतु, आम्ही त्या पत्रांवरून त्यांच्या चहापानाला जाणार नाहीत. सरकारच्या चहापानाला जाणार नाहीत, याचा अर्थ ही नेहमीचीच प्रथा पडलीये, असे आपल्याला वाटत असेल. तर तसे अजिबात नाही. मुळात सत्ताधारी पक्ष म्हणून सत्ताधारी पक्षाचे वर्तन हे सभ्यतेचे असावे लागते. लोकशाहीचा सन्मान करणारे आणि आपल्या देशाची राज्यघटना, डॉ. बाबसाहेब आंबेडकरांनी लिहिलेल्या संविधानाचा सन्मान करणारे अशा पद्धतीचे वर्तन, अशाप्रकारची सभ्य वागणूक ही सत्ताधारी पक्षाची असावी लागते. परंतु, प्रचंड बहुमत मिळाल्यामुळे सत्ताधारी पक्ष मस्तीमध्ये आहे. एक प्रकारचा माज आल्यासारखे सत्ताधारी पक्षाचे वर्तन आहे. जिथे मान सन्मान नाही, सभ्यता नाही, लोकशाहीचा सन्मान नाही, घटनेबद्दल आदर नाही अशा ठिकाणी आम्ही चहापानाला जाणार नसल्याचे भास्कर जाधव म्हणाले.

भास्कर जाधव यांनी अधिवेशनापूर्वीच अत्यंत गंभीर मुद्दा उपस्थित केला आहे. ते म्हणाले की, “राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा मृत्यू हा अपघात होता की घातपात? अशी ठाम शंका संपूर्ण महाराष्ट्राच्या मनात आहे. सरकार यावर कुठेही स्पष्ट नाही. त्यामुळे महाराष्ट्राच्या एका जबाबदार नेत्याचा घात की अपघात? अशाप्रकारची जेव्हा चर्चा असते, त्यामुळे आम्ही चहापानाला जायचे नाही, असा निर्णय घेतलेला आहे.”

सरकारच्या दुहेरी भूमिकेवर प्रहार करताना भास्कर जाधव यांनी शेतकरी आत्महत्या आणि वीजदराचा मुद्दा लावून धरला. ” राज्यात शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत आहेत. या आत्महत्या थांबायला तयार नाहीत. आम्ही वीजदर कमी करणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सभागृहात सांगितले होते. त्याचबरोबर घरगुती डिजीटल मीटर जबरदस्तीने लावणार नसल्याचे मुख्यमंत्री म्हणाले होते. परंतु, चार दिवसांपूर्वी मुख्यमंत्री महोदयांचे स्टेटमेंट ऐकले की, संपूर्ण देशात अशापद्धतीचे अदाणीचे डिजीटल मीटर लावणारे महाराष्ट्र देशातील पहिल्या क्रमांकाचे राज्य आहे म्हणून छाती बडवतात. त्यामुळे अशापद्धतीच्या दुहेरी वागणाऱ्या लोकांच्या चहापानाला जायचे नसल्याचे आम्ही ठरवले,” असे भास्कर जाधव म्हणाले.

भास्कर जाधव यांनी यावेळी बोलताना पीक विमा योजना आणिा सोलार लाईट प्रकल्पावरून सरकारवर टीका केली. “एक रुपयात पीकविमा दिला म्हणून सगळीकडे आपली पाठ थोपटवून घेतली. शेतकऱ्यांकडून 12 हजार कोटी रुपये गोळा केले. पण शेतकऱ्याला एक रुपयाचाही पीकविमा मिळालेला नाही आणि आता सरकारनेच ती योजना बंद केलेली आहे,” असे ते म्हणाले. “सोलार लाईटच्या संदर्भातही सरकारने खूप मोठा गाजावाजा केला, परंतु, सरकारच्या या सोलर लाईट प्रकल्पात 12 हजार कोटींचा भ्रष्टाचार झाल्याचे समोर आले आहे. त्यामुळे आम्हाला अशा सरकारच्या चहापानाला जाण्याचे स्वारस्य वाटत नाही,” असेही भास्कर जाधव म्हणाले.

राज्यातील कायदा व सुव्यवस्थेवर बोलताना भास्कर जाधव यांनी ड्रग्स तस्करीचा मुद्दा उचलला. “राज्याच्या कायदा व सुव्यवस्थेचा बोजवारा उडालेला आहे. हे राज्य आता उडता पंजाब होते की काय‌? अशी भीती वाटातायला लागलेली आहे. कारण या राज्यात ड्रग्स प्रचंड प्रमाणात विकले जात आहेत. राज्याच्या एका जबाबदार मंत्र्यांच्या जिल्ह्यात ड्रग्स फॅक्टरी मिळाली. याची संपूर्ण महाराष्ट्रात चर्चा झाली, परंतु कुठल्याही प्रकारची कारवाई झालेली नाही. त्यामुळे अशा सरकारच्या चहापानाला आम्ही जावे का? हा विचार आम्ही करतोय, असे भास्कर जाधव म्हणाले. एका बाजुला आम्हाला चहा पाजायचा आणि दुसरीकडे देशाच्या भावी तरुण पिढीला ड्रग्स द्यायचे, अशा पद्धतीचे हा विरोधाभास असल्यामुळे आम्ही चहापानाला जाणार नाही,” असे भास्कर जाधव म्हणाले.

पवार गटाच्या गैरहजेरीवर स्पष्टीकरण

या पत्रकार परिषदेला शरद पवार गटाचा एकही नेता उपस्थित नसल्याने चर्चांना उधाण आले होते. त्यावर स्पष्टीकरण देताना जाधव म्हणाले की “आमचा तिसरा मित्र पक्ष लवकरच पत्रकार परिषद संपण्यापूर्वी दाखल होतील. कामांमुळे आणि कम्युनिकेशन गॅप झाल्यामुहे त्यांना पोहोचण्यासाठी वेळ होतोय. परंतु आम्ही सगळे एकत्रच आहोत,” असे ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव यांनी पत्रकार परिषद सुरु होण्यापूर्वीच स्पष्ट केले.

आत्मचरित्र लिहिण्यास बंदी हि तर विचार स्वातंत्र्याची गळचेपी, स्वातंत्र्यावर गदा: अनंत गाडगीळ

0

मुंबई:
माजी लष्कर प्रमुखांच्या पुस्तकातील एका संदर्भाचा संसदेत उल्लेख झाल्यांनतर केंद्र सरकार या मुद्यावर / विषयावर हादरलेले-गोंधळले दिसू लागले आहे.परिणामी सरकारी कर्मचाऱ्यांपासून ते सैन्यदलातील कर्मचाऱ्यांपर्यंत सर्वांना निवृत्ती नंतर किमान २० वर्षे आत्मचरित्र व आठवणी लिहिण्यास बंदी घालण्याचा कायदा केंद्र सरकार लवकरच आणीत असल्याची बाब दिल्लीतील एका मोठ्या वृत्त समूहाने उघड केली आहे. किंबहुना नुकत्याच झालेल्या केंद्रीय मंत्रिमंड्ळाच्या बैठकीत अनुक्रमित विषय संपल्यावर या बाबीवर अनौपचारिक चर्चा झाल्याचीही माहिती सदर वृत्त समूहाने समोर आणली आहे. आत्मचरित्र व आठवणी यावर बंदी आणणे म्हणजेच व्यक्ती-विचार स्वातंत्र्याची गळचेपी करणे व गदा आणणे यासारखे आहे अशी खरमरीत टीका मा आमदार व काँग्रेसचे वरिष्ठ प्रवक्ते आर्की. अनंत गाडगीळ यांनी केली आहे.
भारतात सरकारी व सैन्यदलातील कर्मचाऱ्यांना ६० तर न्यायाधीशांना ६२ ते ६५ हे निवृत्तीचे वय आहे. आठवणी प्रसिद्ध करण्यासाठी निवृत्ती नंतर किमान २० वर्षाचे बंधन घातल्यास मुळात ८०-८५ वय गाठणाऱ्यांचे प्रमाण अल्प असणार. अश्या हीन विचारातून भा.ज.प ची असंवेदनशील प्रवृत्ती दिसून येते असा टोला गाडगीळ यांनी लगावला आहे. असा कायदा आणून भा. ज. प. प्रणित केंद्र सरकार जाणूनबुजून बचावात्मक पवित्र घेत असल्याचे स्पष्ट होते, असेही गाडगीळ यांनी म्हंटले आहे.

रेड जायंट मूव्हीजच्या ‘KHxRK’मुळे 47 वर्षांनंतर कमल हासन आणि रजनीकांत एकत्र

रेड जायंट मूव्हीजच्या आगामी चित्रपट ‘KHxRK’ मुळे भारतीय चित्रपटसृष्टी एक ऐतिहासिक क्षण अनुभवणार आहे. या चित्रपटाच्या माध्यमातून भारतीय सिनेमातील दोन सर्वात मोठे आणि प्रतिष्ठित दिग्गज कमल हासन आणि रजनीकांत, तब्बल 47 वर्षांनंतर पुन्हा एकत्र पडद्यावर झळकणार आहेत.

उल्लेखनीय बाब म्हणजे या दोन्ही महान कलाकारांनी शेवटचे एकत्र काम 1970 च्या दशकात केले होते. जवळपास पाच दशकांनंतर त्यांचे पुन्हा एकत्र येणे हे भारतीय चित्रपट इतिहासातील अत्यंत महत्त्वाच्या घटनांपैकी एक मानले जात आहे. कारण हा चित्रपट अशा दोन वारशांचा संगम आहे, ज्यांनी केवळ भारतातच नव्हे तर जागतिक स्तरावरही पिढ्यान्‌पिढ्या प्रेक्षकांवर खोल प्रभाव टाकला आहे.

सध्या या चित्रपटाची निर्मिती रेड जायंट मूव्हीज करत आहे. या दोन सिनेमाई दिग्गजांना एकत्र आणण्याचे स्वप्न या प्रोडक्शन हाऊसने साकार केले आहे. विशेष म्हणजे, या चित्रपटाकडे भव्यता, वारसा आणि उत्कृष्ट कथाकथनाचा उत्सव म्हणून पाहिले जात आहे.

या ऐतिहासिक क्षणाबद्दल रेड जायंट मूव्हीजच्या एका प्रवक्त्याने सांगितले,
“कमल हासन सर आणि रजनीकांत सर यांना या चित्रपटासाठी एकत्र आणणे हे आमच्यासाठी स्वप्नपूर्तीप्रमाणे आहे. या ऐतिहासिक क्षणाचा भाग होण्याचा आम्हाला अभिमान, कृतज्ञता आणि प्रचंड उत्साह वाटतो. हा भारतीय सिनेमासाठी भावनिक आणि ऐतिहासिक क्षण आहे. त्यांच्या अतुलनीय योगदानाचा आणि वारशाचा सर्वोत्तम पद्धतीने सन्मान करणे, हाच आमचा उद्देश आहे.”

या चित्रपटाचे दिग्दर्शन प्रसिद्ध दिग्दर्शक नेल्सन दिलीपकुमार करत आहेत. त्यांनी नुकत्याच आलेल्या ब्लॉकबस्टर जेलर मुळे प्रचंड यश मिळवत स्वतःला देशातील आघाडीच्या कमर्शियल दिग्दर्शकांमध्ये स्थान मिळवून दिले आहे. चित्रपटाचे संगीत सुप्रसिद्ध संगीतकार अनिरुद्ध रविचंदर यांनी दिले आहे, ज्यांचे संगीत अनेक ब्लॉकबस्टर चित्रपटांना नव्या उंचीवर घेऊन गेले आहे.

कमल हासन आणि रजनीकांत यांच्या दमदार अभिनयाने सजलेला ‘KHxRK’ हा चित्रपट तमिळ, तेलुगू आणि हिंदी अशा तीन भाषांमध्ये भव्य स्वरूपात प्रदर्शित होणार आहे.

चित्रपटाशी संबंधित इतर तपशील सध्या गुप्त ठेवण्यात आले असून, योग्य वेळी अधिकृतरीत्या जाहीर केले जातील. मात्र एवढे निश्चित आहे की ‘KHxRK’ भारतीय चित्रपटसृष्टीच्या इतिहासात एक अविस्मरणीय अध्याय जोडणार आहे.

पाकिस्तानने अफगाणिस्तानवर हवाई हल्ला केला, अनेकांचा मृत्यू

0


पाकिस्तानच्या लष्कराने रविवारी पहाटे अफगाणिस्तानच्या सीमेवरील भागात हवाई हल्ला केला. अल-जझीराच्या वृत्तानुसार, लष्कराने दावा केला की तहरीक-ए-तालिबान पाकिस्तान (TTP) आणि इस्लामिक स्टेटशी संबंधित सात छावण्या आणि ठिकाणांना लक्ष्य करण्यात आले. यात अनेक लोकांच्या मृत्यूची बातमी आहे.

सरकारने याला अलीकडील आत्मघाती हल्ल्यांनंतरचा प्रतिहल्ला म्हटले. पाकिस्तानच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने निवेदन जारी करून सांगितले की, ही कारवाई गुप्तचर माहितीवर आधारित आणि निवडक ऑपरेशन होती. पाकिस्तानने म्हटले की, त्याच्याकडे ठोस पुरावे आहेत की हे हल्ले अफगाणिस्तानच्या भूमीतून कार्यरत असलेल्या नेटवर्कने घडवून आणले.

हवाई हल्ल्याच्या काही तासांपूर्वी खैबर पख्तूनख्वाच्या बन्नू जिल्ह्यात सुरक्षा ताफ्यावर आत्मघाती हल्ला झाला, ज्यात दोन सैनिक, ज्यात एक लेफ्टनंट कर्नल देखील होते, मारले गेले.

सोमवारी बाजौरमध्ये स्फोटकांनी भरलेली गाडी सुरक्षा चौकीला धडकली. या हल्ल्यात 11 सैनिक आणि एका मुलाचा मृत्यू झाला. अधिकाऱ्यांनी हल्लेखोराला अफगाण नागरिक असल्याचे सांगितले.

यापूर्वी इस्लामाबादमध्ये जुम्मा नमाजादरम्यान शिया मशीद (इमामवाडा) मध्ये आत्मघाती हल्ला झाला होता. पाकिस्तानी वृत्तपत्र द डॉननुसार, या हल्ल्यात 31 लोकांचा मृत्यू झाला असून 169 जण जखमी झाले आहेत. या हल्ल्याची जबाबदारी इस्लामिक स्टेटने घेतली होती.

बदलापुरात ‘स्त्री बीज’ तस्करी टोळीचा पर्दाफाश:सूत्रधारासह तिघी गजाआड.

0

बदलापूर : येथे आंतरराज्यीय स्त्री बीज (एग सेल) तस्करी करणाऱ्या टोळीचा पोलिसांनी पर्दाफाश केला. गरिबी आणि आर्थिक विवंचनेतील ३०० महिलांच्या शरीराचा या टोळीने प्रत्येकी २० हजार रुपयांत सौदा केल्याचे प्राथमिक तपासात निदर्शनास आले आहे. यात मुख्य सूत्रधारासह तीन महिलांना अटक करण्यात आली असून बड्या डॉक्टरांचे कनेक्शन पोलिसांच्या रडारवर आहे. उल्हासनगर परिमंडळ ४ चे पोलिस उपायुक्त सचिन गोरेंनी सांगितले की, या टोळीचे धागेदोरे केरळ, तामिळनाडू, कर्नाटक आणि आंध्र प्रदेशपर्यंत पसरलेले आहेत.
बदलापूर उपजिल्हा रुग्णालयाच्या मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. ज्योत्स्ना सावंत यांच्याकडे पहिली तक्रार आली होती. त्यांनी पोलिसांना माहिती दिली. त्यावरून कारवाई झाली. आणि या काळ्या धंद्याची सूत्रधार सुलक्षणा गाडेकरसह (४४) तिच्या साथीदार अश्विनी चाबुकस्वार (२९) आणि मंजुषा वानखेडेला (४६) अटक करण्यात आली. पोलिसांनी सांगितले की, ही टोळी झोपडपट्टी आणि गरीब वस्त्यांमधील महिलांना गाठून २० हजार रुपयांचे आमिष दाखवत असे. त्यानंतर सुलक्षणा स्वतःच्या घरातच महिलांना इंजेक्शन्स टोचून त्यांच्या शरीरात स्त्री-बीजांची अनैसर्गिक वाढ घडवून आणत होती. मग महिलांना विविध आयव्हीएफ केंद्रांत नेऊन बेकायदेशीर शस्त्रक्रियेने अंडाशय बाहेर काढले जात होते. एका अंडाशयासाठी टोळी लाखांची कमाई करत असताना पीडित महिलांच्या हाती २० हजारच ठेवले जात असत. पोलिसांना मुख्य आरोपी सुलक्षणा गाडेकरच्या व्हॉट्सअॅप चॅटमध्ये अंडाशय विक्रीचे सर्व व्यवहार, कोणत्या हॉस्पिटलला किती बीजांडे पुरवली आणि त्या बदल्यात किती रक्कम मिळाली, याची माहिती मिळाली आहे. धक्कादायक म्हणजे, पीडित महिलांची संमती असल्याचे भासवण्यासाठी आरोपींनी खोट्या नावांनी अनेक बनावट प्रतिज्ञापत्रे तयार केली होती. यात वापरल्या जाणाऱ्या जीवघेण्या इंजेक्शनचे तपशील आणि व्यवहारांचे फोटो आता या गुन्हेगारांना न्यायालयाच्या पिंजऱ्यात उभे करण्यासाठी सर्वात मोठा पुरावा ठरणार आहेत.

एक्स्पर्ट व्ह्यू:
अ) वैद्यकीय देखरेखीशिवाय ‘एग हार्वेस्टिंग’ महिलांच्या जिवावर बेतण्याची भीती अशा इंजेक्शनचा काय परिणाम होतो ?

  • स्त्री-बीज विकसित करण्यासाठी वैद्यकीय देखरेखीखाली ‘हार्मोनल मेडिकेशन’ आवश्यक असते. तसे न झाल्यास ओव्हरीजवर ताण येऊन महिलेच्या आरोग्याला गंभीर धोका निर्माण होऊ शकतो.

ब) एकुणात या प्रक्रियेतील धोके काय आहेत ?

  • आयव्हीएफमध्ये एग हार्वेस्टिंग प्रक्रिया अत्यंत सूक्ष्म आणि तांत्रिक असते. अशा टोळ्यांमुळे संसर्गाचा आणि प्रजनन क्षमता कमी होण्याचा धोका असतो.

क) अशा टोळ्यांवर कडक कारवाईचा कायदा नाही का ?

  • आर्ट (सहायक प्रजनन तकनीक ) कायद्यानुसार अंडी गोठवणे आणि संकलन करणे यासाठी कडक नियमावली आहे. मात्र, नियम पाळण्यावर देखरेखीची प्रभावी यंत्रणा नाही.

बुधवार पेठेतील पापा शेख उर्फ बाबू भैय्या टोळीचा पर्दाफाश

पुणे: मानवी तस्करी, बोगस भारतीय ओळखपत्रे, जबरदस्तीने वेश्याव्यवसायात ढकलणे, असे आणि त्यास पूरक गुन्हे करणाऱ्या बुधवारातील स्थानिक टोळीचा पर्दाफाश झाला असून या टोळीच्या डोक्यावर कोणाचा हात आहे,त्यांचे भारताबाहेर कोणत्या गुन्हेगारांशी कसे व्यवहार होतात,बोगस आधार कार्ड, रेशन कार्ड आणि इतर बनावट भारतीय ओळखपत्रे कुठे, कशी बनविली जातात ,त्यामागे कोणी सूत्रधार आहे काय? या प्रश्नांची उकल पुणे पोलिसांनी सुरू केली आहे.

पोलिसांनी सांगितले की , बुधवार पेठ परिसरात पोलिसांनी काही दिवसांपूर्वी मोठी कारवाई केली. या कारवाईत 22 महिलांना ताब्यात घेण्यात आले असून, त्यापैकी 11 जणी बांगलादेशी नागरिक असल्याचे तपासात समोर आले.यापूर्वी देखील अशा प्रकारचे दोन छापे टाकण्यात आले होते त्यामध्येही 10 बांगलादेशी नागरिक सापडले.

बांगलादेशी महिलांकडे बोगस आधार कार्ड, रेशन कार्ड आणि इतर बनावट भारतीय ओळखपत्रे आढळली आहे. या प्रकरणी फरासखाना पोलिस ठाण्यात मानव तस्करी, जबरदस्तीने वेश्याव्यवसायात ढकलणे आणि अनैतिक व्यापार प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मात्र एवढ्या मोठ्या प्रमाणात या बांगलादेशी महिला पुण्यामध्ये कशा पद्धतीने दाखल होतात याबाबत पडलेला प्रश्न मागचे गुढ रहस्य आता पोलिसांनी उघड केले असल्याचे सांगितले जात आहे. या सर्व रॅकेटच्या मागे बाबू भैया उर्फ पापा शेख हा व्यक्ती असल्याचे समोर आले आहे. बाबू भैया उर्फ पापा शेख कोण?

पोलीस तपासातून समोर आलेल्या माहितीनुसार, या रॅकेटचा मुख्य सूत्रधार पापा शेख उर्फ बाबू भैया आहे. तो गेल्या 20 वर्षांपासून बुधवार पेठ परिसरात सक्रिय आहे. सुरुवातीला एका हॉटेलमध्ये छोटी-मोठी कामे करणारा हा व्यक्ती हळूहळू या क्षेत्रातील वेश्याव्यवसायाच्या बारकाव्यांशी परिचित झाला. त्याने कोलकाता मार्गे बांगलादेशमधून महिलांना पुण्यात आणण्यास सुरुवात केली आणि त्यांच्याकडून वेश्याव्यवसाय करून मोठी कमाई सुरू केली.

पापा शेखचे तीन विवाह झाले असून, त्यापैकी एक पत्नी बांगलादेशी आहे. त्याच्या तिन्ही पत्नी बुधवार पेठेतील एका भागात वर्चस्व राखून आहेत आणि त्या महिलांकडून वेश्याव्यवसाय करून घेतात. एखादी महिला पळून जाण्याचा प्रयत्न केल्यास त्यांना मारहाण करण्यात येते, अशी माहिती आहे. पापा शेखवर यापूर्वीही अशाच प्रकारच्या गुन्ह्यात गुन्हा दाखल असून, तो सध्या फरार आहे.

या प्रकरणी पापा शेखसह सुमित्रा कांबळे, राजेश कलीमनी, रणजीत पात्रा आणि रूपा शेख यांच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही संपूर्ण टोळी एकत्रितपणे हे रॅकेट चालवत असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.

आरोपींनी महिलांना ब्युटी पार्लर किंवा शिलाई काम मिळवून देण्याचे खोटे आमिष दाखवून, पैशाचे लालूच किंवा जबरदस्तीने वेश्याव्यवसायात ढकलले. कमाईतील मोठा हिस्सा स्वतःकडे ठेवला जात असे.

फरासखाना आणि खडक पोलिसांच्या संयुक्त पथकाने ही कारवाई करत ताब्यात घेण्यात आलेल्या 11 बांगलादेशी महिलांना लवकरच बांगलादेशला डेपोर्ट करण्याची प्रक्रिया सुरू आहे. पोलिसांनी या रॅकेटच्या इतर दलालांची आणि बांगलादेश सीमेवर बोगस कागदपत्रे तयार करणाऱ्यांची कसून चौकशी सुरू केली आहे.

बुधवार पेठ परिसरात अशा प्रकारच्या कारवाया गेल्या काही वर्षांत वाढल्या असून, पोलिसांनी अवैध वास्तव्य आणि मानव तस्करीला आळा घालण्यासाठी सातत्याने मोहीम राबवली आहे. या प्रकरणाने पुन्हा एकदा शहरातील वेश्याव्यवसाय आणि परदेशी महिलांच्या तस्करीच्या मुद्द्या समोर आला आहे.

‘कुरकुरे’ देण्याचे आमिष दाखवून चिमुकलीवर अत्याचार; पुणे रेल्वे स्थानकातील धक्कादायक घटना

0

माणुसकीला काळीमा फासतेय पुण्यातील गुन्हेगारी..

पुणे :कुटुंबीयासोबत प्लॅट फॉर्मवर झोपलेल्या चार वर्षांच्या मुलीचे कुरकुरे घेऊन देण्याच्या बहाण्याने अपहरण करत तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. मंगळवारी (ता.१७) या प्रकरणी मध्य प्रदेशमधील एका आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे.

या प्रकरणी लाेहमार्ग पाेलीसांनी आरोपी विराेधात गुन्हा दाखल केला आहे. याबाबत मुलीच्या आईने फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी पुणे रेल्वे स्टेशन येथे फलाट क्रमांक तीनवर मध्य प्रदेश मधील खंडवा येथे जाण्यासाठी एक मजुर कुटुंबीय जेवण करून फलाटवरच झाेपले हाेते. त्यावेळी रात्री दीड वाजण्याच्या सुमारास चार वर्षाच्या मुलीला एका व्यक्तीने कुरकुरे घेऊन देण्याच्या बहाण्याने फुस लावून तिच्या संमती शिवाय पळवून नेऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार केला.

रात्री दीड वाजता मुलीचे वडील हे लघुशंकेसाठी उठले असता त्यांना मुलगी दिसून आली नाही. त्यामुळे त्यानी सर्वांना जागे करत त्यांनी मुलीचा सर्वत्र शाेध घेतला; ती मिळून आली नाही. त्यामुळे त्यांनी याबाबतची माहिती पुणे लाेहमार्ग पाेलीसांना दिली. पाेलिसांनी रेल्वे फ्लाटवरील सीसीटीव्ही फुटेजची पाहणी केल्यानंतर, एक व्यक्ती चार वर्षीय मुलीस हाताला धरून तिला घेऊन जात असताना दिसला.आरोपी हा रेल्वे गाडीतील सामान उतरताना मदत करत हाेता. त्याला व मुलीला पाेलिसांनी रेल्वे परिसरात शाेध घेऊन सहा तासांनी पार्सल गेटजवळून शाेधून ताब्यात घेतले. पाेलिसांनी मुलीकडे विचारणा केल्यावर तिने ‘काका मला कुरकुरे घेऊन देताे असे म्हणून घेऊन गेला ‘अशी माहिती दिली. मुलीच्या कपड्यावर रक्ताचे डाग देखील दिसून आले व तिने तिच्या पाेटात दुखत असल्याचे सांगितल्याने पाेलिसांनी तिला वैद्यकीय चाचणीसाठी पाठवले, अशी माहिती पोलिसांनी दिली.

छत्रपती संभाजीनगर येथे अग्निवीर भरती रॅलीला सुरुवात

0

२० फेब्रुवारी ते १५ मार्च २०२६

औरंगाबाद (छत्रपती संभाजीनगर) कॅन्टोन्मेंट येथे २० फेब्रुवारी २०२६ ते १५ मार्च २०२६ दरम्यान मराठवाडा आणि महाराष्ट्राच्या लगतच्या भागातील तरुणांसाठी अग्निवीर भरती मेळावा सुरू झाला आहे. लष्कर आणि नागरी प्रशासनाने काटेकोर तयारी केली आहे. औरंगाबाद येथील तोफखाना ब्रिगेडच्या सहकार्याने आणि सहकार्याने या ठिकाणाचे नूतनीकरण आणि विकास करण्यात आला आहे. जिल्हाधिकारी, शिक्षण, वैद्यकीय विभाग आणि जिल्हा सैनिक मंडळ यांच्या नेतृत्वाखाली महानगरपालिका, जिल्हा प्रशासनाकडून अमूल्य सहकार्याने कडक पोलिस सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे. स्वच्छता, स्वच्छता, वैद्यकीय सेवा, वाहतूक, प्रथमोपचार, हलका नाश्ता आणि नोटरी आणि स्टेशनरी सपोर्ट यासारख्या अतिरिक्त सुविधांसाठी व्यापक व्यवस्था करण्यात आली आहे जेणेकरून उमेदवारांना रॅलीचे सुरळीत आणि त्रासमुक्त आयोजन करता येईल.

डिजिटलायझेशन मोहिमेनुसार, सर्व प्रक्रिया इलेक्ट्रॉनिक आणि गुणवत्तेवर आधारित आहेत.भारतीय सैन्यात निवडणूक ‘निष्पक्ष आणि पारदर्शक’ आणि केवळ गुणवत्तेवर होते. भारतीय सैन्यात निवड किंवा भरतीसाठी कोणत्याही टप्प्यावर कोणालाही लाच दिली जाऊ नये. उमेदवारांनी भरती एजंट म्हणून काम करणाऱ्या बेईमान व्यक्तींना बळी पडू नये.

शासकीय भाषा सुधारण्यासाठी शासनाने समिती नियुक्त करावी : महेश भागवत

अधिकाऱ्यांनो, चांगले काम करा, लिहिते व्हा अन्‌ लोकाभिमुखता जपा!महेश भागवत यांचे आवाहन ; दुसऱ्या शासकीय अधिकारी मराठी साहित्य संमेलनाचे उद्‌घाटन

पुणे : शासकीय साहित्य संमेलन होत आहे, त्याचा खूप आनंद आहे. खरंतर शासकीय अधिकारी हे सर्वाधिक माणसांशी रोज भेटत असतात. त्यांची कामे करत असतात. लोकांच्या अडचणी, समस्यांवर फुंकर घालत असतात. अधिकाऱ्यांकडे सहवेदना, कार्यक्षमता असते आणि त्यामुळे त्यांनी आपले काम चोख करायला हवे. भ्रष्टाचार होऊ नये हे लोकांना अभिप्रेत असते. कारण आता समाजाची सहनशक्तीची मर्यादा संपली आहे. म्हणून चांगली कामे करा, चांगले लिहा, लोकाभिमुखता जपा असा संदेश दुसऱ्या राज्यस्तरीय शासकीय अधिकारी मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष व तेलंगणा राज्याचे अतिरिक्त पोलिस महासंचालक महेश भागवत यांनी दिला. शासकीय भाषा समजण्यास अतिशय किचकट असते. अधिकाऱ्यांनाही ती कधीकधी कळत नाही. शासकीय भाषेत सुधारणा करण्यासाठी शासनाने समिती नियुक्त करावी, अशी सूचनाही त्यांनी केली.
पुणे महापालिका, यशदा व संवाद पुणे यांच्या वतीने दुसरे राज्यस्तरीय शासकीय अधिकारी मराठी साहित्य संमेलन बालगंधर्व रंगमंदिरात आयोजित करण्यात आले आहे. संमेलनाच्या उद्‌घाटनप्रसंगी भागवत यांनी अधिकारी वर्गाशी संवाद साधला. उपमहापौर परशुराम वाडेकर, अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष भारत सासणे, यशदाचे अतिरिक्त महासंचालक शेखर गायकवाड, अतिरिक्त जिल्हाधिकारी राजीव नंदकर, जीएसटी गुजरातचे प्रधान आयुक्त सुरेंद्रकुमार मानकोसकर, ओडिसा राज्यात काम करणारे मराठी सनदी अधिकारी विजय कुलंगे, मराठी भाषा विभागाचे प्रमुख किरण कुलकर्णी, संवाद पुणेचे प्रमुख सुनील महाजन मंचावर होते.

भागवत म्हणाले, पुणे विचारांचे ऊर्जेचे केंद्र आहे. येथे संमेलनाचे अध्यक्षपद भूषवताना आनंद होत आहे. ही निवड प्रशासनातील प्रशासकीय संवेदनाशीलतेची आहे. अधिकाऱ्यांना पुस्तके वाचण्यापेक्षा माणसांना अधिक वाचण्याची संधी मिळते. अधिकाऱ्यांना माणसे भेटायला येतात आणि त्यांना खूप काही शिकवतात. अधिकारी तेच साहित्यात उतरवतात. त्यामुळे ते साहित्य अस्सल वास्तववादी ठरते. अधिकाऱ्यांच्या लिखाणाचा फायदा समाजाला होतो.
मराठी तरुणांनी आयएएसमध्ये जावे यासाठी काम करत आहोत. मराठी विद्यार्थी आयएएस परिक्षेत देशात पहिल्या क्रमांकाने उत्तीण होत नाही याची खंत आहे. मराठी मुलांना स्पर्धा परीक्षेतील मुलाखतीचे बाळकडू द्यायला हवे. त्यासाठी आम्ही वरिष्ठ अधिकारी प्रयत्न करत आहोत, असेही भागवत म्हणाले.

एआयचा मराठी साहित्यावर काय परिणाम होणार या विषयी भागवत म्हणाले, एआयमुळे अनेकांच्या नोकऱ्या जातील, असा धोका आहे. पण एआयमध्ये संवेदना नाहीत. त्यांची भाषा तांत्रिक आहे. बोली भाषेचा त्यात वापर होणार नाही. पण एआयचा वापर करून आपण जुने ग्रंथ, पोथ्या जतन करू शकतो. एआयला देखील स्वीकारून उपयोगात आणले पाहिजे. धोका ओळखून आपणच त्यात पारंगत व्हावे, असा सल्लाही त्यांनी दिला.
आज पालक आपल्या मुलांना रिल्स बनविण्यात मदत करतात आणि तेच इतरत्र पाठवतात. रिल्स बनविण्यासाठी मदत न करता मुलांना रिअल हिरो बनविण्यासाठी मदत करणे अपेक्षित आहे, असेही भागवत यांनी सांगितले.
भारत सासणे म्हणाले, आपण या संमेलनामध्ये सातत्य ठेवले पाहिजे. कारण शासकीय अधिकारी हा बुध्दीमान वर्ग आहे. त्यांना दुष्काळ, शेतकरी आत्महत्या अशा सर्व प्रश्नांची जाण असते. त्यावर ते काम करू शकतात. त्यामुळे त्यांनी हे सर्व अनुभव पुस्तकरूपाने समोर आणावेत. साहित्याला त्यांचे मोठे योगदान होऊ शकते. शासकीय अधिकारी हे लेखक होतात, याला खूप मोठा इतिहास आहे, परंपरा आहे. लेखकांना साहित्यनिर्मितीसाठी फिरावे लागते तेवढे अधिकाऱ्यांना फिरावे लागत नाही. त्यांना खुर्चीत बसून सर्व काही मिळते.

सुरेंद्रकुमार मानकोस्कर म्हणाले, आज आपण मोबाईलमुळे वाचन कमी करत आहोत. पण अशा संमेलनामुळे पुन्हा पुस्तकांकडे वळता येते. म्हणून अशी संमेले होणे अत्यंत गरजेचे आहे.

परशुराम वाडेकर म्हणाले, सध्या अनेक अधिकारी चांगले लेखन करत आहेत. त्यामुळे त्यांनी लेखनात सातत्य ठेवून समाजासाठी योगदान द्यावे. सर्वसामान्य नागरिक त्यांच्याकडे व्यथा मांडत असतात, त्यामुळे त्यांना चांगले साहित्य निर्माण करण्यास वाव आहे.

शेखर गायकवाड म्हणाले, साहित्यात अधिकाऱ्यांचा खूप प्रभाव आहे. इंग्रजी आणि मराठी दोन्ही भाषांमध्ये अधिकाऱ्यांचे साहित्य पहायला मिळते. पु. ल. देशपांडे आकाशवाणीवर होते, तसेच वि. स. खांडेकर हे शिक्षक होते. त्यामुळे त्यांचे लेखन तर सर्वांना माहिती आहे. अधिकाऱ्यांना बेरकी, इरसाल माणसे भेटतात. त्यांच्याकडून खूप काही शिकायला मिळते. त्यातूनच साहित्य निर्मिती होऊ शकते. सरकारी जीआरची किचकट भाषा बदलायला हवी अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

राजीव नंदकर यांनी प्रास्ताविक केले. राजस्विनी थोरात यांनी सूत्रसंचालन केले. सुनील महाजन यांनी आभार मानले.
फोटो ओळ : शासकीय अधिकारी मराठी साहित्य संमेलनाच्या उद्‌घाटन प्रसंगी (डावीकडून) विजय कुलंगे, सुनील महाजन, शेखर गायकवाड, महेश भागवत, भारत सासणे, परशुराम वाडेकर, सुरेंद्रकुमार मानकोसकर, राजीव नंदकर.