Home Blog Page 94

आजपासून ट्रम्प यांच्या इमर्जन्सी टॅरिफची वसुली बंद:₹16 लाख कोटी परत करावे लागू शकतात; कोर्टाने 3 दिवसांपूर्वी बंदी घातली

0

अमेरिकन सरकार आजपासून राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी लादलेल्या आपत्कालीन शुल्काची (टॅरिफ) वसुली थांबवेल. अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाने 3 दिवसांपूर्वी हे टॅरिफ बेकायदेशीर ठरवले होते.

अमेरिकेच्या यूएस कस्टम अँड बॉर्डर प्रोटेक्शन (CPB) ने एका निवेदनात म्हटले आहे की-
1977 च्या आंतरराष्ट्रीय आपत्कालीन आर्थिक अधिकार कायद्यांतर्गत (International Emergency Economic Powers Act – IEEPA) लादलेल्या शुल्काची वसुली मंगळवारी रात्री 12 वाजून 1 मिनिटापासून (भारतीय वेळेनुसार सकाळी 10:30 वाजता) थांबवली जाईल. एजन्सीने आयातदारांना (इम्पोर्टर्स) निर्देश दिले आहेत की या शुल्काशी संबंधित सर्व कोड त्यांच्या कार्गो सिस्टिममधून काढून टाकले जातील.

पेन व्हार्टन बजेट मॉडेलच्या अर्थशास्त्रज्ञांनुसार, न्यायालयाच्या या निर्णयामुळे अमेरिकन सरकारला 175 अब्ज डॉलर (15.75 लाख कोटी रुपये) पेक्षा जास्त कमाई परत करावी लागू शकते.
रॉयटर्सनुसार, IEEPA अंतर्गत लादलेल्या टॅरिफमुळे अमेरिकेला दररोज 50 कोटी डॉलर (4,500 कोटी रुपये) पेक्षा जास्त कमाई होत होती. आता हे रद्द केल्यामुळे कंपन्या परताव्याची (रिफंड) मागणी करू शकतात.
ट्रम्प म्हणाले- सर्वोच्च न्यायालयाने मला पूर्वीपेक्षा जास्त अधिकार दिले आहेत

ग्लोबल टॅरिफ रद्द केल्यानंतर सोमवारी राष्ट्राध्यक्ष ट्रम्प म्हणाले की, या निर्णयामुळे उलट त्यांची ताकद आणखी वाढली आहे. त्यांनी त्यांच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘ट्रुथ सोशल’वर लिहिले की, सर्वोच्च न्यायालयाने नकळत त्यांना पूर्वीपेक्षा जास्त अधिकार दिले आहेत.

ट्रम्प म्हणाले की, ते काही काळ ‘सुप्रीम कोर्ट’ लहान अक्षरात लिहितील, कारण त्यांना या निर्णयाबद्दल आदर राहिलेला नाही. त्यांनी या निर्णयाला मूर्खपणाचा आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर फूट पाडणारा म्हटले.

तरीही ट्रम्प यांचे म्हणणे आहे की, या निर्णयामुळे हे स्पष्ट झाले आहे की ते इतर कायद्यांनुसार शुल्क (टॅरिफ) लावण्याच्या त्यांच्या अधिकाराचा अधिक वापर करू शकतात. न्यायालयाने उर्वरित शुल्कांना (टॅरिफ) कायदेशीररीत्या बळकट केले आहे आणि आता ते त्यांची अधिक कठोरपणे अंमलबजावणी करू शकतात.

ट्रम्प यांनी असेही सांगितले की, ते परवान्यासारख्या (लायसन्स) पद्धतींचा वापर करून देशांविरुद्ध कठोर पावले उचलू शकतात. त्यांनी दावा केला की न्यायालयाने इतर सर्व शुल्कांना (टॅरिफ) मंजुरी दिली आहे आणि अशा शुल्कांची संख्या खूप जास्त आहे.

वसूल केलेले शुल्क (टॅरिफ) परत मिळेल की नाही याची माहिती नाही

हा निर्णय सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाच्या तीन दिवसांपेक्षा जास्त वेळेनंतर लागू केला जात आहे. या तीन दिवसांत शुल्क (टॅरिफ) का वसूल केले जात होते, हे एजन्सीने सांगितले नाही. ज्या लोकांकडून पैसे घेतले गेले आहेत, त्यांना ते परत मिळतील की नाही, हे देखील स्पष्ट केले नाही.

हा आदेश फक्त IEEPA कायद्यांतर्गत लावलेल्या शुल्कांना (टॅरिफ) लागू होईल. तर, राष्ट्रीय सुरक्षेच्या नावाखाली ‘कलम 232’ अंतर्गत आणि अनुचित व्यापार प्रकरणांच्या ‘कलम 301’ अंतर्गत लावलेले शुल्क (टॅरिफ) सुरूच राहतील आणि या निर्णयाचा त्यांच्यावर कोणताही परिणाम होणार नाही.

CBP ने सांगितले आहे की ते व्यापाराशी संबंधित लोकांना पुढील माहिती अधिकृत संदेशांद्वारे देत राहील.

कॉम्रेड अंजलीताई महाबळेश्वरकर यांचे निधन:’लाल सलाम’च्या घोषणेत अखेरचा निरोप; मरणोत्तर नेत्रदानाचा आदर्श

0

सातारा -सातारा नगरपालिकेच्या माजी नगरसेविका व मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या ज्येष्ठ नेत्या कॉ. अंजलीताई महाबळेश्वरकर (89) यांचे रविवारी रात्री पुणे येथे दुःखद निधन झाले. कॉ. अंजलीताई महाबळेश्वरकर या त्यांची कन्या गौरी देशपांडे महाबळेश्वरकर यांच्याकडे पुणे येथे अलीकडेच राहायला गेल्या होत्या. माकपचे ज्येष्ठ नेते कॉ. प्रभाकर महाबळेश्वरकर यांच्या त्या पत्नी होत्या.

त्यांच्या पार्थिवावर सातारा येथे आज सकाळी कैलास स्मशानभूमी, संगम माहुली येथे गॅस दाहिनीमध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले. कोणतेही धार्मिक विधी करण्यात आलेले नसून मरणोत्तर त्यांनी नेत्रदान केले होते. त्यांचे पार्थिव उचलताना व माहुली येथे ‘कॉम्रेड अंजलीताई महाबळेश्वर को लाल सलाम’ अशा घोषणांनी परिसर दुमदुमून गेला होता. त्यांच्या पश्चात दोन नातू जावई एक विवाहित मुलगी गौरी असा परिवार आहे.

त्यांच्या निधनाबद्दल अनेकांनी शोक व्यक्त केला आहे. सातारचे नगराध्यक्ष अमोल मोहिते, माजी नगराध्यक्ष डॉ. अच्युत गोडबोले, माजी उपनगराध्यक्ष व विद्यमान नगरसेवक शंकर माळवदे व इतर अनेकांनी अंत्यदर्शन घेतले. मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे राष्ट्रीय नेते अशोक ढवळे यांनी त्रिपुरा इथून शोक संदेश पाठवला व कॉम्रेड अंजलीताई महाबळेश्वरकर यांच्याबरोबरच्या व त्यांच्या चळवळीच्या अनेक आठवणींना उजाळा दिला.

मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष व जनवादी महिला संघटना यांना गेल्या महिन्यातच त्यांनी प्रत्येकी एक एक लाख रुपये देणगी दिली होती. सातारा नगर परिषदेच्या राजकारणात या एकमेव विरोधी पक्षनेत्या त्या कालावधीत होत्या आणि आपल्या म्हणण्याशी व तत्वांशी त्या नेहमीच आग्रही राहिल्या. जनवादी महिला संघटना, अंगणवाडी कर्मचारी संघटना, घरेलू कामगार संघटना, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष यांच्याशी त्या नेहमीच सक्रिय राहिल्या होत्या. अगदी अलीकडेच त्यांना मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या नेत्या वृंदा करात, मरियम बूटवाला ढवळे, अशोक ढवळे हे भेटून गेले होते व प्रकृतीची चौकशी केली होती.

शिक्षणाचा वारसा जपत माजी विद्यार्थ्यांची आजी विद्यार्थ्यांना शैक्षणिक भेट

कर्मवीर भाऊसाहेब हिरे हायस्कूलच्या माजी विद्यार्थ्यांचा आनंद मेळा उत्साहात

पुणे : शाळेच्या आठवणींनी ओथंबलेले क्षण, मैत्रीचा जिव्हाळा आणि कृतज्ञतेची भावना घेऊन कर्मवीर भाऊसाहेब हिरे हायस्कूलच्या माजी विद्यार्थ्यांनी पुन्हा एकदा आपल्या शाळेच्या अंगणात पाऊल ठेवत आनंद मेळ्याचे आयोजन केले. शिक्षणाचा वारसा पुढे नेत माजी विद्यार्थ्यांनी आजी विद्यार्थ्यांना वही, पेन, पेन्सिल व विविध शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्याकरिता दिंडी काढली. यासोबतच शाळेच्या विकासासाठी १ लाख रुपयांची देणगी देत संस्थेबद्दलची आपली कृतज्ञता व्यक्त केली.

अखिल भारतीय मराठी शिक्षण परिषदेच्या पर्वती येथील शाळेत हा कार्यक्रम उत्साहात पार पडला. कार्यक्रमासाठी प्रमिला ताई गायकवाड, अजय आबा पाटील, मुख्याध्यापक माने सर व माजी मुख्याध्यापक संजय भैलुमे सर यांनी मार्गदर्शन केले. तसेच बहुजन मुलांसाठी शिक्षणाची दारे खुली करणारे कर्मवीर भाऊसाहेब हिरे आणि उत्तमराव पाटील यांना रांगोळीच्या माध्यमातून चलचित्र साकारून अनोखी श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. हा संपूर्ण उपक्रम हिरे हायस्कूल माजी विद्यार्थी संघ यांच्या पुढाकाराने आयोजित करण्यात आला.

शाळेच्या प्रार्थनेने कार्यक्रमाची सुरुवात झाली. वर्गातील तासांत शिक्षकांशी गप्पा मारत जुन्या आठवणींना उजाळा देण्यात आला. शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा मानपत्र देऊन सन्मान करण्यात आला. मधल्या सुट्टीनंतर मैदानावर कबड्डी, खो-खो, लंगडी अशा खेळांनी वातावरणात उत्साहाची भर पडली आणि माजी विद्यार्थ्यांनी आपल्या सुवर्णकाळाचा पुन्हा एकदा अनुभव घेतला. शिक्षणाबद्दलची निष्ठा, शिक्षकांविषयी आदर आणि समाजाप्रती बांधिलकी यांचे सुंदर दर्शन या आनंद मेळ्यातून घडले.

राजेश पांडे भाजपा प्रदेश सरचिटणीस पदी; बावनकुळेंच्या नंतर चव्हाणांचे शिलेदार म्हणून राजेश पांडे पुन्हा फिल्डवर

पुणे, दि. २४ : भारतीय जनता पक्षाच्या संघटनात्मक बांधणीत मोलाचे योगदान देणारे, पुणे पुस्तक महोत्सवाचे मुख्य संयोजक आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे विश्वासू असलेले राजेश पांडे यांची पक्षाच्या प्रदेश सरचिटणीस पदी नियुक्ती करण्यात आली आहे. पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस (संघटन) बी. एल. संतोष यांच्या उपस्थितीत पक्षाचे अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी याबद्दल अधिकृत घोषणा केली. राजेश पांडे यांना चंद्रशेखर बावनकुळे अध्यक्ष असतांना लोकसभा निवडणुकी दरम्यान सरचिटणीस म्हणून जबाबदारी देण्यात आली होती. आता भाजपचे नवे अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या सरचिटणीस टीममध्येही राजेश पांडे यांची वर्णी लागली आहे.

राजेश पांडे यांच्यासह निरंजन डावखरे , योगेश सागर , संजय कुटे , माधवी नाई आणि सुनील राणे हे सरचिटणीस म्हणून रवींद्र चव्हाण यांच्यासोबत काम करतील.

भाजपचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस असलेले राजेश पांडे ४० वर्षांहून अधिक काळ सामाजिक, शैक्षणिक आणि राजकीय क्षेत्रात सक्रिय असून अभ्यासू, मितभाषी, उत्तम संघटक आणि नावीन्यपूर्ण लोकसहभाग उपक्रम राबविणारे अशी पांडे यांची ओळख आहे. यानिमित्ताने राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विचारांच्या मुशीत वाढलेला, विद्यार्थी चळवळीत तयार झालेला कुशल संघटक आणि निष्ठावान चेहऱ्याला पक्षाने संधी दिली अशी भावना भाजपच्या कार्यकर्त्यांमधून उमटत आहे.
राजेश पांडे यांच्या सामाजिक कामाची सुरुवात अभाविप मधून झाली. गेल्या चाळीस वर्षांहून अधिक काळ ते सामाजिक राजकीय जीवनात सक्रिय असून भाजपच्या पक्ष रचनेत उत्कृष्ट संघटन कौशल्य, पक्ष योजनांमध्ये युवक आणि लोकसहभागांचे ‘गिनीज विक्रम’ आणि पुणे पुस्तक महोत्सवाच्या व्यापक यशामुळे राजेश पांडे यांचे नाव संपूर्ण महाराष्ट्रासह राष्ट्रीय पातळीवर देखील ओळखले जाते. मूळचे खान्देशी असलेले पांडे यांनी उत्तर महाराष्ट्रानंतर पश्चिम महाराष्ट्रातही पक्षाची आणि विचार परिवाराची पाळेमुळे घट्ट रोवण्यात, विविध समाजघटकांना पक्षाशी जोडण्यात आणि तळागाळातील कार्यकर्त्यांना बळ देण्यात अतिशय महत्त्वाची भूमिका बजावली आहे.
महाराष्ट्रातील तीन प्रमुख विद्यापीठांच्या व्यवस्थापन परिषदांवर सदस्य म्हणून त्यांनी काम केले. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात त्यांच्या पुढाकाराने राबवलेले उपक्रम गिनीज विश्व विक्रम म्हणून नोंदवले गेले आहेत. त्यात युवा सहभाग आणि लोक प्रबोधन केंद्रस्थानी राहिले. शिक्षण, आरोग्य, रोजगार, क्रीडा, सहकार आणि सांस्कृतिक वारसा संवर्धन या क्षेत्रांत त्यांनी शहरी आणि ग्रामीण भागात विविध उपक्रम राबवले आहेत.
संघटनात्मक पातळीवर काम करत असतानाच सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रातही त्यांनी आपला वेगळा ठसा उमटवला आहे. त्यांच्याच पुढाकाराने आणि नेतृत्वाखाली पुण्यात गेल्या तीन वर्षांपासून आयोजित करण्यात येत असलेल्या ‘पुणे पुस्तक महोत्सवाने’ जागतिक स्तरावर आपली ओळख निर्माण केली आहे. वाचन संस्कृती रुजवण्यासाठी अत्यंत भव्य प्रमाणात आयोजित केलेल्या या महोत्सवाने १५ हुन अधिक विश्वविक्रम नोंदवून एक अभूतपूर्व ऐतिहासिक यश संपादन केले आहे. विशेष म्हणजे हे सर्व करत असतांना पुणे आणि पश्चिम महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक नियोजनाचीही जबाबदारी त्यांनी लीलया पार पाडली. त्यांच्या याच कार्याची आणि पक्षनिष्ठेची दखल घेत पक्षाचे नेते देवेंद्र फडणवीस आणि रवींद्र चव्हाण यांनी त्यांच्यावर पुन्हा एकदा ही मोठी जबाबदारी सोपवल्याचे बोलले जात आहे.

राजेश पांडे यांच्यासारख्या अभ्यासू, अनुभवी आणि उत्तम संघटन कौशल्य असलेल्या नेत्याची सरचिटणीस पदी झालेली नियुक्ती पश्चिम महाराष्ट्रात आणि पर्यायाने संपूर्ण राज्यात कार्यकर्त्यांना नवी ऊर्जा देणारी ठरेल, असा विश्वास भाजपा कार्यकर्त्यांकडून व्यक्त केला जात आहे.

“मी गेली ४० वर्ष सामाजिक जीवनात सक्रिय आहे. माझ्यासारख्या एका सामान्य कार्यकर्त्यावर विश्वास ठेवून पक्षाने पुन्हा एकदा सरचिटणीस पदाची मोठी जबाबदारी सोपवली, याबद्दल मी पक्षाचे केंद्रीय नेतृत्व, प्रदेशाध्यक्ष मा. रविंद्रजी चव्हण आणि विशेषतः राज्याचे विकासपुरुष मुख्यमंत्री मा. देवेंद्र फडणवीस यांचा मनःपूर्वक आभारी आहे. पक्षाची संघटनात्मक बांधणी असो वा कोणतेही सांस्कृतिक कार्य असो पक्षाने आणि वरिष्ठांनी नेहमीच मला काम करण्याचे स्वातंत्र्य दिले आणि पाठीवर कौतुकाची थाप दिली आहे. यावेळी मा. चंद्रकांतदादा पाटील, मा. चंद्रशेखरजी बावनकुळे यांचेही मोलाचे मार्गदर्शन वेळोवेळी मिळत असते. आगामी काळात देखील पक्षाचा विचार तळागाळातील प्रत्येक घटकापर्यंत पोहोचवण्यासाठी आणि संघटना अधिक भक्कम करण्यासाठी नव्या ऊर्जेने आणि निष्ठेने मा. चव्हाण साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करत राहील.” – राजेश पांडे, सरचिटणीस, भाजपा

महापालिकेच्या उत्पन्नवाढीसाठी प्रयत्नशील राहणार,स्थायी समिती अध्यक्ष श्रीनाथ भिमाले यांची ग्वाही

0

पालिकेवर ताण न येता नवे प्रकल्प आणणार

पुणे –
‘शहराच्या विकासासाठी सध्या सुरू असलेले प्रकल्प वेळेत मार्गी लावणे. महापालिकेवर आर्थिक ताण येऊ न देता विविध मार्गातून निधी उभारून नवे प्रकल्प आणणे. करवाढ न करता पुणेकरांना दिलासा देतानाच महापालिकेच्या उत्पन्नवाढीसाठी प्रयत्न करण्याला माझे प्राधान्य राहील,’असे महापालिकेच्या स्थायी समितीचे नूतन अध्यक्ष श्रीनाथ भिमाले यांनी सोमवारी स्पष्ट केले.

अध्यक्षपदाचा पदभार स्वीकारल्यानंतर भिमाले यांनी माध्यमांशी संवाद साधला. ​स्थायी समितीच्या अध्यक्षपदी संधी दिल्याबद्दल मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील, नगरविकास राज्यमंत्री माधुरीताई मिसाळ, महापौर मंजूषा नागपुरे, सभागृह नेते गणेश बीडकर, शहराध्यक्ष धीरज घाटे यांसह सर्वांचा आभारी आहे,असे भिमाले म्हणाले. वरिष्ठ नेत्यांशी चर्चा करून पुणेकरांची गरज लक्षात घेऊन नवनवे प्रकल्प आणले जातील, असेही त्यांनी नमूद केले.

पुण्यासह लगतच्या परिसराच्या विकासाचे ‘व्हिजन’ मुख्यमंत्री फडणवीस यांनी मांडले आहे. महापालिकेच्या माध्यमातून त्याला गती देण्याचा माझा प्रयत्न राहील. २०१७ ते २०२२ मध्ये महापालिकेवर भाजपची सत्ता असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या माध्यमातून पुण्यासाठी अनेक प्रकल्प आले. निधी मिळाला. शहरात ३२ किलोमीटर मेट्रो धावत आहे. मेट्रोचा विस्तार केला जात आहे. समान पाणीपुरवठा प्रकल्प आता अंतिम टप्प्यात आहे. जायका, विमानतळ विस्तारीकरण,ई बस खरेदी आदी प्रकल्प वेगाने पुढे नेले जात आहेत,असे भिमाले म्हणाले.
‘विविध प्रकल्पांसाठी राज्य शासनाकडून महापालिकेला १०००-१२०० कोटी रुपये येणे आहे. तातडीने हा निधी मिळावा, यासाठी पाठपुरावा केला जाईल. उत्पन्नवाढीसाठी विविध प्रकारे प्रयत्न केले जातील. समाविष्ट २३ गावांमधून बांधकाम व विकास शुल्कातूनही पालिकेला निधी मिळेल. करवाढ न करता पुणेकरांना दिलासा देण्याची आमची भूमिका असेल. आगामी अर्थसंकल्पात पुणेकरांना दिलासा देणाऱ्या अनेक चांगल्या कल्पना मांडल्या जातील.असे भिमाले यांनी सांगितले.

‘आगामी काळात महापालिकेवर आर्थिक ताण न येता नवे प्रकल्प आणण्याचे माझे नियोजन आहे. त्यासाठी केंद्र व राज्य शासनाची आर्थिक मदत, सीएसआर तसेच ‘पीपीपी’ च्या माध्यमातून निधी उभारला जाईल. समाविष्ट गावांबाबत दुजाभाव केला जाणार नाही. त्यांना पायाभूत सुविधांसाठी पुरेसा निधी दिला जाईल वर्षभराचा विचार नव्हे तर पूर्ण पाच वर्षांचा विचार करून आम्ही विकासकामांचे नियोजन करणार आहोत,’असेही भिमाले यांनी नमूद केले.

भिमाले सन 2002 मध्ये सॅलिसबरी पार्क परिसरातून पुणे महानगरपालिकेत पहिल्यांदा नगरसेवक झाले. त्यानंतर सन 2012, 2017 आणि 2026 असे या भागाचे महानगरपालिकेमध्ये प्रतिनिधित्व करीत आहेत. सन 2017 मध्ये त्यांनी सभागृह नेते म्हणून जबाबदारी पार पडली.

कॅम्पसमधूनच राजकारणाची नवी पिढी निर्माण होईल:खासदार अनुराग सिंह ठाकूर

१५ व्या भारतीय छात्र संसदेचा समारोप.

पुणे, २३ फेब्रुवारी: धोरणनिर्मिती, प्रशासन आणि सार्वजनिक सेवेतील गुंतागुत समजून तरुणांनी राजकीयदृष्ट्या कुशल, प्रशासन जाणकार आणि सामाजिक दृष्ट्या संवेदनशील बनविण्यासाठी कॅम्पसमधूनच एक नवी पिढी निर्माण होऊ शकते. राजकारणाला शुद्ध करण्यासाठी नवीन आणि सक्षम प्रतिभावान युवकांनी राजकारणात प्रवेश करावा. असे आवाहन लोकसभा खासदार व माजी केंद्रीय मंंत्री अनुराग सिंह ठाकूर यांनी केले.
एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी, पुणे आणि एमआयटी स्कूल ऑफ गव्हर्नमेंट, पुणे यांच्या वतिने आयोजित करण्यात आलेल्या १५ व्या भारतीय छात्र संसदेच्या समारोप प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. यावेळी माजी खासदार व ज्येष्ठ पत्रकार शाहिद सिद्दीकी आणि राज्यसभा खासदार डॉ. संदीप कुमार पाठक हे सन्मानीय पाहुणे म्हणून उपस्थित होते. तसेच एमआयटी डब्ल्यूपीयूचे कार्यकारी अध्यक्ष आणि छात्र संसदेचे संस्थापक डॉ. राहुल विश्वनाथ कराड, कुलगुरू डॉ. आर.एम. चिटणीस आणि सीएओ डॉ. प्रसाद खांडेकर उपस्थित होते.
यावेळी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी १५व्या भारतीय छात्र संसदेला पाठविलेल्या शुभेच्छा पत्राचे वाचन करण्यात आले.
अनुरागसिंह ठाकूर म्हणाले, लोकशाही, नेतृत्व आणि सार्वजनिक धोरण याबरोबरच केवळ एआय नैतिकतेची उपेक्षा करु शकत नाही. २१ व्या शतकात कॅम्पस मधून कॅबिनेटमध्ये जाण्याचा विचार करत असाल तर एआय नैतिकतेशी जुळवून घेतले पाहिजे.  मानवीय दृष्टीकोनासाठी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तंत्रज्ञानाची शक्ती म्हणजे एआयची शक्ती यावर शिखर परिषदेचे आयोजन केले होते.
गेल्या १० वर्षांमध्ये शिक्षण क्षेत्रात आमूलाग्र बदल घडला आहे. यामध्ये आयआयटी, आयएमएम, कॉलेज, युनिव्हर्सिटी यांच्या संख्येत वृद्धि झाली आहे. आत्मनिर्भर भारतासाठी सेमीकंडक्टर, हेल्थकेअर व अन्य क्षेत्रातील अतुलनीय वृद्धी होत आहे. विरोधकांना राजकारण करावयाचे असेल तर तर्क आणि तथ्यांच्या आधारे राजकारण करावे.
शाहिद सिद्दीकी म्हणाले, विश्वगुरू बनण्यासाठी युवकांनी स्वतःला सशक्त बनवा. तंत्रज्ञानाच्या युगात कृत्रिम बुद्धिमत्तेवर अवलंबून राहू नये. युवकांनी केलेल्या आंदोलनामुळेच या देशात परिवर्तनाची लाट आली आहे. त्यात जेपी मुव्हमेंट सारख्या अनेक चळवळीचा सहभाग आहे. युवकांनी जाती-पातीच्या भिंती तोडून देश विकासासाठी कार्य करावे. देशाला बदलायचे असेल तर सर्वात प्रथम युवकांनी मानसिकता बदलावी. लोकशाही म्हणजे देशातील सर्व नागरिकांना एक सारखा न्याय, कायदे आणि एकसारखी वागणूक आहे.
डॉ. संदीपकुमार पाठक म्हणाले, कॅम्पस टू कॅबिनेट बद्दल अनेक गैरसमज आहेत. विद्यापीठांमध्ये निवडणूका होणे गरजेचे असून येथील होणार्‍या डिबेटच्या माध्यमातून उत्कृष्ट नेते तयार होतील. मूल्याधिष्ठित राजकारण गरजेचे असून देशाचे भविष्य निश्चित आहे. त्यातूनच विकास होईल. देशातील सर्व शिक्षण संस्थेच्या तत्परतेच्या माध्यमातूनच देशाचे भविष्य घडू शकते.
डॉ. राहुल विश्वनाथ कराड म्हणाले, करप्शन, कास्टीझम, कम्युनलायझेशन आणि कलोनियल माइंड सेट बदलणे गरजेचे आहे. भारतीय छात्र संसद ही लोकशाहीमध्ये नेतृत्वाची संधी प्रदान करणारा एक उपक्रम आहे. राजकारणाचे प्रशिक्षण देणारी ही पहिली शैक्षणिक संस्था आहे. आमचा प्रयत्न चांगल्या आणि सुशिक्षित तरुणांना राजकारणात आणण्याचा आहे.  
विद्यार्थी दिपक कुमार पांडे, पूर्वी गंजीवाले, प्रताप पुंडे, उदय शर्मा, नेहाली चावडीकर यांनी आपले मांडले.
कुलगुरू डॉ. आर.एम.चिटणीस यांनी स्वागत पर भाषण केले.
प्रा.डॉ.  गौतम बापट यांनी सूत्रसंचालन केले.

स्पा सेंटरवर कारवाई; बिल्डिंगवरून उडी मारल्याने महिलेचा मृत्यू, पुरुष जखमी

पुणे- विमानतळ परिसरातील अहिल्यानगर रोडवरील सिटी स्पेस बिल्डिंगमधील ‘द रुट्स स्पा’ येथे स्पाच्या आडून सुरू असलेल्या वेश्याव्यवसायावर विमानतळ पोलिसांनी सोमवारी दुपारी साडेतीनच्या सुमारास छापा टाकला. या कारवाईदरम्यान पोलिसांना पाहून दोघेजण दुसऱ्या मजल्यावरील गॅलरीतून खाली उतरून पळण्याचा प्रयत्न करताना पडून जखमी होऊन एका महिलेचा मृत्यू झाला तर एक पुरुष जखमी झाला आहे.

जखमींमध्ये स्पा मॅनेजर हुसेन शेख याचा पाय मोडला असून पश्चिम बंगालची मुळची रहिवासी असलेली ३० ते ३५ वयोगटातील एक महिलेच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने तिचा मृत्यू झाला. पुरुषावर ससून जनरल हॉस्पिटल येथे उपचार सुरू असल्याची माहिती पोलिस उपायुक्त सोमय मुंडे यांनी दिली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधित स्पामध्ये वेश्याव्यवसाय सुरू असल्याची माहिती मिळाल्यानंतर बनावट ग्राहक पाठवून खात्री करण्यात आली.

त्यानंतर वरिष्ठ पोलिस निरीक्षक गोविंद जाधव यांच्या पथकाने पंचासमक्ष कारवाई केली. काचेचा दरवाजा तोडून आत प्रवेश केल्यानंतर चार महिला व चार पुरुष आढळून आले. याप्रकरणी उशिरापर्यंत विमान नगर पोलीस ठाण्यात येथे गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. पुढील तपास सुरू आहे.

विमान अपघातात प्रचंड वाढ:आता एअर ॲम्ब्युलन्स क्रॅश, सर्व जणांचा मृत्यू

0

रांचीहून दिल्लीला जात होते विमान
रांची- झारखंडहून दिल्लीला जाणारे एक चार्टर्ड विमान चत्रामध्ये कोसळले. विमानात असलेल्या सर्व 7 लोकांचा मृत्यू झाला. रेडबर्ड कंपनीचे बीचक्राफ्ट किंग एअर B90L हे एक एअर ॲम्ब्युलन्स होते.सोमवारी संध्याकाळी 7:11 वाजता विमानाने रांचीहून उड्डाण केले, 7:34 वाजता विमानाचा संपर्क तुटला. थोड्या वेळाने विमान झारखंडच्या चतरा जिल्ह्यातील समरियाच्या जंगलात कोसळले.

विमानात कॅप्टन विवेक विकास भगत (पायलट), कॅप्टन सबराजदीप सिंग (सह-पायलट), संजय कुमार (रुग्ण), अर्चना देवी (नातेवाईक), धुरू कुमार (नातेवाईक), विकास कुमार गुप्ता (डॉक्टर), सचिन कुमार मिश्रा (पॅरामेडिकल स्टाफ) हे होते.
रांची येथील देवकमल हॉस्पिटलचे सीईओ, अनंत सिन्हा यांनी पीटीआयला सांगितले की, एअर ॲम्ब्युलन्सची व्यवस्था एका रुग्णाने केली होती. ते म्हणाले, “लातेहार जिल्ह्यातील चंदवा येथील रहिवासी असलेले रुग्ण संजय कुमार (41) यांना 16 फेब्रुवारी रोजी 65 टक्के भाजलेल्या अवस्थेत रुग्णालयात आणण्यात आले होते. रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते.

सिन्हा यांनी पुढे सांगितले की, कुटुंबीयांनी त्यांना चांगल्या उपचारांसाठी दिल्लीला नेण्याचा निर्णय घेतला. रुग्णाला सुमारे 4.30 वाजता रुग्णालयातून दिल्लीसाठी नेण्यात आले. सायंकाळी झालेल्या विमान अपघातात रुग्णासोबत प्रवास करणाऱ्या सर्व लोकांचा मृत्यू झाला.
डीजीसीएने सांगितले की, विमानाने सकाळी 7:10 वाजता रांची येथून उड्डाण केले होते. सकाळी 7:30 वाजता विमानाने खराब हवामानामुळे मार्ग बदलण्याची (डायव्हर्जन) परवानगी मागितली. त्यानंतर काही वेळातच विमानाचा कोलकाता एअर ट्रॅफिक कंट्रोलशी संपर्क आणि रडार कनेक्शन तुटले. नंतर विमान कोसळले.

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे याच वर्षी जानेवारीमध्ये विमान अपघातात निधन झाले होते. बारामती विमानतळावर लँडिंग करत असताना त्यांचे चार्टर्ड विमान कोसळले. ते 66 वर्षांचे होते. या अपघातात पवार यांचे सुरक्षा कर्मचारी, दोन पायलट आणि एक महिला क्रू मेंबर यांच्यासह 5 लोकांचा मृत्यू झाला होता.

पायलटने बारामती विमानतळावर लँडिंग करण्याचा प्रयत्न केला होता, परंतु धावपट्टी स्पष्ट दिसत नसल्याने त्याने विमान पुन्हा उंचीवर नेले. पहिला प्रयत्न अयशस्वी झाल्यानंतर बारामतीच्या रनवे-11 वर पुन्हा लँडिंग करण्याचा प्रयत्न करण्यात आला. यावेळी विमान धावपट्टीवर पोहोचण्यापूर्वीच कोसळले आणि त्याला आग लागली.

12 जून 2025: अहमदाबादमध्ये एअर इंडियाचे विमान कोसळले, 241 प्रवाशांचा मृत्यू
गेल्या वर्षी जूनमध्ये अहमदाबादमध्ये एअर इंडियाचे बोइंग 787 ड्रीमलाइनर विमान क्रॅश झाले होते. यात 12 क्रू मेंबर्ससह 242 लोक होते. फक्त एका प्रवाशाला वगळता इतर सर्व 241 लोकांचा जीव गेला होता.

या अपघातात गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रूपाणी यांचेही निधन झाले होते. विमान ज्या इमारतीला धडकले, तिथे अहमदाबादच्या सिव्हिल हॉस्पिटलचे डॉक्टर राहतात.

रोहित पवार यांना विधानसभेत अश्रू अनावर:म्हणाले – अजितदादा पवार नावाचा जादूगार सबंध महाराष्ट्राला हसवत हसवत गेला

मुंबई : अजित पवारांच्या शोकप्रस्तावावर बोलताना आमदार रोहित पवार यांना आज विधानसभेत अश्रू अनावर झाले. अजितदादा पवार नावाचा जादूगार संबंध महाराष्ट्राला हसवत हसवत गेला. दादांच्या जाण्याने राज्याच्या राजकारणातील मिश्कीलपणा गेला. ते नेहमीच मला माझ्या शर्टचे वरचे बटण लावण्यास सांगत. आता 40-50 वर्षांनंतर कधी दादांची वर भेट झाली, तर मी हे बटण त्यांच्यापुढे लावेन. तोपर्यंत हे बटण असेच खुले असेल. यामुळे त्यांची रोज आठवण येईल, असे ते म्हणाले. यावेळी त्यांनी सुनेत्रा पवार यांना सर्वोतपरी मदत करण्याची ग्वाहीही दिली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत अजित पवारांचा शोकप्रस्ताव मांडला. त्यावर बोलताना आज अनेक नेते भावूक झाले. यात अजित पवारांचे पुतणे तथा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांचाही समावेश होता. रोहित यांना अजित पवारांच्या आठवणी सांगताना आज सभागृहाच्या पटलावर अश्रू अनावर झाले. यावेळी त्यांनी अजितदादांच्या अपघातासाठी दोषी असणाऱ्यांना तुरुंगात पाठवल्याशिवाय स्वस्थ बसणार नसल्याचा निर्धारही बोलून दाखवला.

रोहित पवार आपल्या काकांची आठवण सांगताना म्हणाले, एकदा अजितदादा मला म्हणाले होते की, रोहित तुझ्या झिपऱ्या फार वाढल्यात. त्या कमी कर. दादा गेले, त्या दिवशी मी त्यांना आदरांजली म्हणून मी माझे केस कापले. अजितदादा मला नेहमी म्हणायचे की, तुझे शारीरीक वजन वाढत आहे. शारीरीक वजन कमी कर व राजकीय वजन वाढव. मी त्यावर फक्त हो असे म्हणायतो. मी अजितदादांना शब्द तो. माझी हेअरस्टाईल ही अशीच ठेवेन. शारीरीक वजन कमी करून राजकीय वजन वाढवेन.

तोपर्यंत मी माझे वरचे बटण लावणार नाही. ते पुढे म्हणाले, अजितदादा मला नेहमी म्हणायचे, रोहित तुझे शर्टचे वरचे बटन लावत जा. पण मी एक मात्र सांगतो, आजपासून 40-50 वर्षांनंतर मी जेव्हा अजितदादांना भेटण्यास जाईन तोपर्यंत मी हे बटण लावणार नाही. कारण, हे बटण मला रोज तुमची आठवण देत राहील. माझी वर त्यांच्याशी भेट होईन तेव्हा त्यांच्यापुढेच मी हे बटन लावेन. तोपर्यंत माझा हा लढा असाच सुरू राहील. मी त्यांच्यापुढे ताठ मानेने उभा राहीन. त्यावेळी काका माझ्या पाठीवर हात ठेवून म्हणेल, लढलास बरं का.

या गोष्टी ऐकण्यासाठी मी हा लढा सुरू ठेवला आहे. दादांच्या अपघातासाठी जो कुणी दोषी असेल, मग तो कितीही का मोठा असेना, त्याला तुरुंगात टाकल्याशिवाय व शिक्षा दिल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही. काकी (सुनेत्रा पवार), तुमच्या राजकीय प्रवासात तुमच्या पुतण्याची ज्यावेळी गरज लागेल, त्यावेळी मी तयार असेन, असेही रोहित पवार यावेळी बोलताना म्हणाले.

रोहित पवार यांनी यावेळी अजित पवारांवर झालेल्या आरोपांवरही भाष्य केले. ते म्हणाले, दादांबरोबर काम करत असताना त्यांच्याविषयी काही बिनबुडाच्या गोष्टी बोलल्या जायच्या. तेव्हा दादांना खूप वाईट वाटायचे. जनतेच्या विकासाचे राजकारण करत असताना त्यांच्यावर नको – नको ते आरोप झाले. ज्या दादांनी आयुष्यभर स्वच्छतेचा आग्रह धरला त्यांच्या अंगावर आरोपाचे डाग उडवले गेले. त्यावेळी ते किती अस्वस्थ व्हायचे हे आम्हा सगळ्यांना माहिती आहे. विशेष म्हणजे, यातील एकही आरोप या मंडळींना सिद्ध करता आला नाही. उलट ज्यांनी त्यांच्यावर आरोप केले त्यांनीच नंतरच्या काळामध्ये त्यांची प्रशंसा केली हे आपण सर्वांनी पाहिले.

मी विनंती करतो की, आज दादा आपल्यामध्ये नाहीत. त्यांच्यावर झालेले आरोप कधीच सिद्ध झाले नाही. ते आरोप असू शकतात किंवा राजकीय भाषण असू शकते. त्यामुळे त्यांच्यावरील डाग पुसता आले तर पुसा. देवेंद्र फडणवीस हे दादांचे जिवलग मित्र म्हणून ओळखले जातात. त्यांना मी विनंती करतो की हे सगळे खोटे आरोप एका गाठोड्यात भरून समुद्रात टाकून दिले, तर मग ती खऱ्या अर्थाने आदरांजली म्हणता येईल, असे रोहित पवार म्हणाले

बौद्ध धम्म हा मनःशांती ते विश्वशांती चा प्रतीक ~ केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले

0

बुद्धगया : भगवान गौतम बुद्धांनी आखिल मानवजातीच्या कल्याणासाठी दिलेला बौद्ध धम्म हा मनःशांती तून विश्वशांती चा आदर्श जीवनमार्ग आहे.बौद्ध धम्म विश्वशांतीचे प्रतीक आहे असे प्रतिपादन रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना.रामदास आठवले यांनी केले.

बुद्धगया येथील बौद्धांचे जागतिक सर्वोच्च श्रद्धास्थान असणाऱ्या महाबोधी महाविहार येथील पवित्र
बोधीवृक्षाखाली जागतिक बौद्ध भिक्खू संमेलन भदंत हर्षबोधी यांनी आयोजित केले होते.त्यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून ना. रामदास आठवले बोलत होते.यावेळी भारतातील अनेक बौद्ध भिक्खू तसेच नेपाळ; श्रीलंका; जपान; तैवान; व्हिएतनाम; कंबोडिया; लाओस; मलेशिया; सिंगापूर ; तिबेट; थायलँड आदी जगभरातील अनेक देशांतून बौद्ध भंते या बौद्ध संमेलनास उपस्थित होते.

महामानव बोधिसत्व डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला बौद्ध धम्माची दीक्षा दिली.बौद्ध धम्म मानवतेचा विज्ञानवादी समतेचा न्यायाचा धम्म असल्यानेच डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध धम्माची दीक्षा घेऊन भारतात धम्मचक्र पुन्हा एकदा प्रवर्तित केले.असे ना. रामदास आठवले म्हणाले.

महाबोधी वृक्षाखाली भगवान बुद्धांना ज्ञानप्राप्ती झाली.त्यामुळे बोधिवृक्ष हा वैश्विक स्तरावर ज्ञानाचे प्रतीक आहे.महाबोधी महाविहार हे बौद्धांचे सर्वोच्च जागतिक श्रद्धास्थान आहे. त्यामुळे महाबोधी महाविहार चे सर्व व्यवस्थापन बौद्धांच्या ताब्यात द्यावे.महाबोधी महाविहार विश्वस्त ट्रस्ट चे चेअरमन आणि सर्व सदस्य बौद्ध असावेत. त्याबाबत बिहार सरकारने त्वरीत निर्णय घेऊन महाबोधी महाविहार बौद्धांच्या ताब्यात द्यावे अशी लाखो बौद्धांची आणि आपली मागणी आहे. या मागणीसाठी आपण यापूर्वीच प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि बिहार चे मुख्यमंत्री नितीश कुमार तसेच राज्यपाल मोहम्मद आरिफ खान यांची आपण भेट घेतली होती.आता उद्या पटना येथे बिहार चे मुख्यमंत्री नितीश कुमार यांची पुन्हा आपण भेट घेणार असल्याचे ना .रामदास आठवले यांनी यावेळी जाहीर केले.
बौद्ध संमेलनपूर्वी ना. रामदास आठवले यांनी महाबोधी महाविहार येथे भगवान बुद्धांचे मनोभावे दर्शन घेतले. यावेळी भगवान बुद्धांच्या पवित्र अस्थिकलशाचे शिरसावंद्य दर्शन न. रामदास आठवले यांनी घेतले.

नेपाळमध्ये बस महामार्गावरून नदीत कोसळली, 18 ठार:25 जखमी

0

काठमांडू:नेपाळमधील धादिंग जिल्ह्यात सोमवारी रात्री उशिरा एक बस महामार्गावरून नदीत कोसळली. नेपाळी माध्यमांनुसार, या अपघातात 18 लोकांचा मृत्यू झाला, तर 25 जण जखमी झाले आहेत. मृतांमध्ये एक पुरुष आणि एक महिला परदेशी नागरिकांचा समावेश आहे. मात्र, ते कोणत्या देशाचे होते आणि त्यांची नावे अद्याप समोर आलेली नाहीत. पोलिस दल (APF) नुसार, आतापर्यंत 17 मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. नंतर आणखी एका प्रवाशाच्या मृत्यूची पुष्टी झाली, त्यामुळे मृतांचा आकडा 18 वर पोहोचला. अपघातात जखमी झालेल्या लोकांना वाचवून वेगवेगळ्या रुग्णालयांमध्ये दाखल करण्यात आले आहे. आतापर्यंत मृत आणि जखमींची ओळख पटलेली नाही.

बस (Ga 1 Kha 1421) पोखराहून काठमांडूकडे जात होती, तेव्हा काही कारणास्तव चालकाचे बसवरील नियंत्रण सुटले आणि बस त्रिशूली नदीत कोसळली. हा अपघात धादिंग जिल्ह्यातील बेनिघाट रोरांग परिसरात रात्री सुमारे 1:30 वाजता झाला. सध्या पोलिस अपघाताच्या इतर कारणांचीही चौकशी करत आहेत.

हवामान विभागाचा 7 जिल्ह्यांना ‘येलो अलर्ट’,विदर्भात पावसाचा धुमाकूळ, तर कोकणात आंबा धोक्यात

0

मुंबई:
रविवारी मध्यरात्रीपासून विदर्भातील नागपूर, भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यांत विजांच्या कडकडाटासह जोरदार अवकाळी पावसाने हजेरी लावली. या पावसामुळे काढणीला आलेल्या रब्बी पिकांचे मोठे नुकसान होण्याची शक्यता निर्माण झाली असून, दुसरीकडे कोकणात सोसाट्याच्या वाऱ्यासह आलेल्या पावसामुळे आंबा उत्पादक शेतकरी हवालदिल झाला आहे.
भारतीय हवामान विभागाने २३ आणि २४ फेब्रुवारी रोजी राज्याच्या अनेक भागांत पावसाचा अंदाज वर्तवला आहे. मराठवाड्यातील नांदेड, लातूर, धाराशिव, हिंगोली तर विदर्भातील गडचिरोली आणि चंद्रपूर या जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज असून येथे ‘येलो अलर्ट’ जारी करण्यात आला आहे. मध्य महाराष्ट्रातील सोलापूर आणि निफाड परिसरातही ढगाळ वातावरणासह हलक्या पावसाची शक्यता आहे.

विदर्भात पावसाचा हाहाकार; नागपूर जलमय

नागपूर शहरात रविवारी मध्यरात्री जोरदार वारे आणि विजांच्या कडकडाटासह पावसाने झोडपून काढले. सोसाट्याच्या वाऱ्यामुळे शहरात अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडली आहेत. मनिष नगर परिसरातील अंडरपासमध्ये गुडघाभर पाणी साचल्याने वाहनधारकांची मोठी कोंडी झाली.
भंडाऱ्यात पहाटे ५ वाजल्यापासून पावसाचा जोर वाढला. याचा फटका चना, तूर, मूग आणि उडीद या कडधान्यांसह फुलोऱ्यावर आलेल्या भाजीपाल्याला बसला आहे. मात्र, उन्हाळी भात पिकासाठी हा पाऊस लाभदायक असल्याचे बोलले जात आहे.

गोंदिया जिल्ह्यातील गोरेगाव, देवरी आणि सालेकसा तालुक्यात सोमवारी सकाळपासून पावसाच्या सरी कोसळत आहेत. येथेही बागायतदार शेतीला फटका बसण्याची भीती व्यक्त होत आहे.

कोकणात ‘हापूस’ संकटात

रत्नागिरी जिल्ह्यात रविवारी झालेल्या अवकाळी पावसाने आंबा बागायतदारांची झोप उडवली आहे. सध्या आंब्याच्या झाडांना मोठ्या प्रमाणावर मोहोर आला असून काही ठिकाणी फळेही लागली आहेत. मात्र, वादळी वाऱ्यामुळे मोहोर आणि कोवळी फळे गळून पडल्याने उत्पादनात मोठी घट होण्याची शक्यता आहे.

निफाडमध्ये राज्यातील निचांकी तापमानाची नोंद

निफाड येथे राज्यातील निचांकी तापमानाची नोंद झाली. निफाड येथे 11.6 सेल्सिअस तापमान नोंदवले गेले. मुंबईतील सांताक्रूझ येथे राज्यातील उच्चांकी तापमानाची नोंद झाली. सांताक्रूझ येथे 36.3 अंश सेल्सिअस तापमान नोंदवले गेले. दुपारी उन्हाचा चटका आणि रात्री पाऊस अशा विचित्र हवामानामुळे नागरिकांच्या आरोग्यावरही परिणाम होत असून मुंबईतील वायू प्रदूषण धोकादायक पातळीवर पोहोचले आहे.

पाकिस्तानस्थित जैश-ए-मोहम्मदचे तीन सदस्य काश्मीर मध्ये ठार मारले..

0

दहशतवादी एका टेकडीच्या पायथ्याशी असलेल्या मातीच्या घरात लपलेले आढळले आणि त्यांनी जवळ येणाऱ्या शोध पथकांवर गोळीबार केला, ज्यामुळे जोरदार चकमक सुरू झाली, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. अधिकाऱ्यांनी सांगितले की परिसरात शोध मोहीम अजूनही सुरू आहे.


श्रीनगर- जम्मू आणि काश्मीरच्या किश्तवार जिल्ह्यात रविवारी सुरक्षा दलांशी झालेल्या चकमकीत पाकिस्तानस्थित दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मदचे तीन सदस्य ठार झाले, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.

सुरक्षा दलांनी विशिष्ट गुप्तचर माहितीवर कारवाई केल्यानंतर चतरू पट्ट्यातील पासरकुटच्या सामान्य भागात “त्राशी-१” ऑपरेशन अंतर्गत ही चकमक झाली. अधिकाऱ्यांनी सांगितले की प्राथमिक मूल्यांकनातून असे दिसून येते की ठार झालेल्या दहशतवाद्यांपैकी एक सैफुल्लाह आहे, जो जैश-ए-मोहम्मदचा वरिष्ठ कमांडर आहे जो जवळजवळ पाच वर्षांपूर्वी जम्मू आणि काश्मीरमध्ये घुसला होता.
सैफुल्लाहने सुरक्षा दलांवर अनेक प्राणघातक हल्ल्यांचा सूत्रधार असल्याचे मानले जाते, ज्यामध्ये जुलै २०२४ मध्ये चार सैनिक मारले गेले होते. तो यापूर्वी अनेक चकमकींमधून पळून जाण्यात यशस्वी झाला होता.

अधिकाऱ्यांच्या मते, अतिरेकी डोंगराच्या पायथ्याशी असलेल्या एका मातीच्या घरात लपले होते. शोध पथके जवळ येताच त्यांनी गोळीबार केला, ज्यामुळे जोरदार चकमक सुरू झाली. गोळीबारादरम्यान इमारतीला आग लागली आणि ती पूर्णपणे जळून खाक झाली, ज्यामुळे मृतदेह ओळखता येत नव्हते.

चकमकीच्या ठिकाणाहून दोन एके-४७ रायफल आणि दारूगोळा जप्त करण्यात आला. तिसऱ्या दहशतवाद्याचा मृतदेह आणि एक शस्त्र संध्याकाळी उशिरा सापडले. फॉरेन्सिक तपासणीद्वारे मृतांची ओळख पटवण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

जम्मू-काश्मीर पोलिस आणि सीआरपीएफच्या समन्वयाने काउंटर-इंटेलिजन्स फोर्स डेल्टाच्या जवानांनी ही कारवाई केली. लष्कराच्या व्हाईट नाईट कॉर्प्सने सांगितले की, कठीण भूभाग आणि हवामान परिस्थितीत सकाळी ११ वाजताच्या सुमारास संपर्क पुन्हा स्थापित झाला, ज्यामुळे अतिरेक्यांना निष्क्रिय करण्यात आले.

ओसवाल बिल्डरने जागा बळकावण्याचा प्रयत्न केल्याने ज्येष्ठ नागरिकाची आत्महत्या

पुणे: येथील बाणेर भागात विकसित करण्यासाठी दिलेल्या मिळकतीच्या व्यवहारात फसवणूक झाल्याने एका सेवानिवृत्त अधिकाऱ्याने नियोजित गृहप्रकल्पातून उडी मारून आत्महत्या केली. या प्रकरणी ज्येष्ठाला आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या आरोपावरून दोन बांधकाम व्यावसायिकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नरेश उमाकांत महाजन (वय ६९, रा. अंबरनाथ पूर्व, जि. ठाणे) असे आत्महत्या केलेल्या ज्येष्ठाचे नाव आहे. त्यांचा मुलगा मयूर नरेश महाजन (वय ४१, रा. अंबरनाथ पूर्व, जि. ठाणे) यांनी बाणेर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. या फिर्यादीनुसार, बांधकाम व्यावसायिक जयंतीलाल ताराचंद ओसवाल (वय ५६) आणि रिषभ ओसवाल (वय ३०, दोघे रा. भवानी पेठ) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नरेश महाजन हे महावितरणमध्ये अधिकारी होते. त्यांनी बाणेर येथे एक जागा घेतली होती, जी त्यांनी ‘स्विटी असोसिएटस’चे जयंतीलाल ओसवाल यांना विकसित करण्यासाठी दिली होती. करारानुसार, विकसित केलेल्या जागेवर त्यांना सदनिका मिळणार होती. मात्र, ओसवाल यांनी कराराचे पालन केले नाही आणि त्यांना सदनिका दिली नाही. यामुळे महाजन नैराश्यात होते.

महाजन यांच्या जागेवर सात मजली गृहप्रकल्प साकारण्यात आला असून, त्याचे बांधकाम पूर्ण झाले आहे. १६ फेब्रुवारी रोजी महाजन बाणेर येथील या गृहप्रकल्पाच्या आवारात आले. त्यांनी कराराप्रमाणे सदनिका देण्याबाबत ओसवाल यांच्याकडे विचारणा केली. त्यावेळी बांधकाम व्यावसायिकांनी त्यांना मानसिक त्रास देऊन धमकावले, असा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे.

या घटनेनंतर नरेश महाजन यांनी नियोजित गृहप्रकल्पाच्या सातव्या मजल्यावर जाऊन तेथून उडी मारून आत्महत्या केली. मयूर महाजन यांच्या फिर्यादीनुसार, बांधकाम व्यावसायिकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, सहायक पोलीस निरीक्षक अनिल केकाण या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

पुण्यातील काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमुळे आज मला मनुवादी वृत्तीच्या विरोधातील पुढचा लढा लढण्यासाठी अधिक बळ मिळाले:हर्षवर्धन सपकाळ

पुणे महानगरपालिकेच्या निवडणुका पार पडल्यानंतर प्रथमच प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धनजी सपकाळ यांनी पुणे शहराला भेट दिली. तसेच मागील आठवड्यामध्ये मा. सपकाळ साहेब यांच्या वक्तव्‍याबाबत काँग्रेस भवन येथे भाजपाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी हिंसक मोर्चा काढून दगडफेक केली होती. या पार्श्वभूमीवर पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी सवांद साधण्याकरीता या मेळाव्‍याचे आयोजन केले होते. या मेळाव्‍यात जखमी कार्यकर्त्यांची विचारपूस व सत्कार प्रदेशाध्यक्ष मा. सपकाळ यांच्या हस्ते करण्यात आला.

पुणे शहर काँग्रेसचे अध्यक्ष अरविंद शिंदे यांनी मा. हर्षवर्धन सपकाळ यांचे स्वागत व सत्कार करून कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. यानंतर व पुणे मनपा गटनेते रामचंद्र उर्फ चंदूशेठ कदम व सर्व नवनिर्वाचित नगरसेवकांसह प्रदेशाध्यक्षांचा सत्कार केला.

यावेळी प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की, ‘‘मला लाज वाटते की, महाराष्ट्राचा मुख्यमंत्री राजकीय टिपणी आणि बदला घेण्याकरीता खोटे बोलतो. आपल्या महाराष्ट्राची आण-बाण-शान व स्वाभिमान असलेले छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल खोटे बोलण्याचे पातक जर देवेंद्र फडणवीस करीत असतील तर त्यांना आम्ही सोडणार नाही. आपल्या बाजूला शौर्य व इतिहास आहे. दुर्दैवाने फुटीर वादाचा इतिहास देखील आपल्याला थोड्या काळाचा आहे, परंतु एक लक्षात असू द्यात जे उडून गेले ते कावळे व जे उरले ते खरे मावळे. पुण्यात असलेल्या केंद्रातील एका मंत्र्याने तर आपल्या आजच्या मेळाव्‍याचे समजताच सर्व बैठका रद्द करून १०-१० मिनिटाला माहिती घेत होते. पुणे शहर काँग्रेसच्या मेळाव्‍याच धसका भाजपाच्या नेत्यांनी घेतलेला दिसून येतो. पुण्याच्या पावन भूमीमध्ये गाढवाचा नांगर फिरविण्याचे पातक इतिहासात करण्यात आले होते, याच मनुवादी विचारांचा माणूस आज महाराष्ट्राचा मुख्यमंत्री आहे. परंतु येणाऱ्या भविष्यकाळात स्वराज्य व सुराज्य निर्माण करण्यासाठी आपल्याला सोन्याचा नांगर फिरवायचा आहे. मनुवृत्ती ही गाढवाचा नांगर तर संविधान हे सोन्याचा नांगर आहे. पोलीसांनी सुध्दा लक्षात असू द्यावे त्यांचे ब्रीद वाक्य ‘सद रक्षणाय्‌ खल निग्रनाय्‌’ असे आहे. नव्‍या परिवर्तनाची सुरवात पुण्यातून झाली आहे आणि त्याची कास धरून आपल्याला पुढे जायचे आहे.’’

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या उपाध्यक्षा प्राची दुधाने यांनी केले तरी आभार माजी नगरसेवक अजित दरेकर यांनी मानले.

यावेळी मेळाव्‍यास काँग्रेसचे सर्व प्रमुख नेते, पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्यने उपस्थित होते.