Home Blog Page 93

कोंढवा पोलीस ठाण्याकडून…दावत ए इफ्तार, पोलीस आयुक्त म्हणाले,’अजानकरीता मोबाईल अॅप वापरा

नमाजकरीता होणा-या अजानकरीता कौसरबाग सोसायटी कमिटीकडून मोबाईलवर वापरता येणारे ऑनलाईन अजान अॅप्लीकेशन वापरण्याचे आवाहन

पुणे -कोंढवा पोलीस ठाण्याकडून कोंढवा खुर्द येथे मरकजी बैतुल माल फाउंडेशन यांच्या सहकार्याने प्रतिवर्षाप्रमाणे पवित्र रमजान महिन्याच्या पाचव्या रोजा निमीत्त दावत ए इफ्तार चा सामाजिक सलोखा वृद्धींगत करणारा कार्यक्रम पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये पार पडला. या वेळेस पोलीस सह आयुक्त रंजनकुमार शर्मा, अपर पोलीस आयुक्त मनोज पाटील, पोलीस उपआयुक्त, परिमंडळ ०५, राजलक्ष्मी शिवणकर, पोलीस उप आयुक्त, विशेष शाखा, डॉ. संदिप भाजीभाकरे, पोलीस उपआयुक्त, वाहतुक शाखा हिम्मत जाधव, सहायक पोलीस आयुक्त, वानवडी विभाग नम्रता देसाई, तसेच बैतुल माल फाउंडेशनचे अल्ताफ मर्चट, आबीद सय्यद, हाजी तौसीफ शेख, कौसरबाग ट्रस्टचे अध्यक्ष सलीम शेख, मजहर मणियार, कौसरबाग मस्जिद मौलाना कारी अब्दुल्ला, जाहिदभाई शेख अध्यक्ष महाराष्ट्र अॅक्शन कमिटी, वसिमगाई बागवान, बासित शेख, नगरसेवक गफूर पठाण यांची प्रमुख उपस्थिती होती. याप्रसंगी कोढवा परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. या प्रसंगी पोलीस आयुक्त यांनी जमलेल्या नागरिकांसमोर केलेल्या भाषणात रमजान महिन्यामध्ये कोंढवा परिसरामध्ये नागरिकांना सायंकाळी उपवास सोडण्याकरीता मस्जिद परिसरात जाण्यासाठी वाहतुकीच्या अडचनींना सामोरे जावे लागु नये याकरीता पोलीस दलातर्फे जास्तीत जास्त सुरळीत वाहतुक ठेवण्याकडे आमचे अधिक लक्ष राहणार आहे.तसेच रमजान या पवित्र सणाच्य कालावधीमध्ये कोंढवा परिसरामध्ये जे गुन्हेगार प्रवृत्तीचे लोक आहेत आणि ते त्रास देत असतील त्यांची माहिती पोलीसांना दयावी त्यावर पोलीस दलाकडून अशा लोकांवर कठोर कारवाई करण्यात येईल अशी सुचना दिली आहे. रमजान या पवित्र सणामध्ये पोलीस कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी कटिबध्द असल्याबाबतचे ही त्यांनी सांगितले. तसेच युवकांमध्ये अंमली पदार्थाचे प्रमाण वाढत असून त्याबाबत त्यांनी चिंता व्यक्त केली असून अंमली पदार्थ शहरातून हद्दपार करण्याकरीता पोलीसांना सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे. सर्वोच्च न्यायलयाच्या आदेशाचे उल्लंघन होवू नये म्हणून नमाजकरीता होणा-या अजानकरीता कौसरबाग सोसायटी कमिटी यांचेकडून मोबाईलवर वापरता येणारे ऑनलाईन अजान अॅप्लीकेशन तयार केले. असून त्याचे उदघाटन पोलीस आयुक्त, पुणे शहर यांचे हस्ते करण्या आलेले आहे. हे अॅप वापरणेसाठी त्यांनी नागरीकांना आवाहन केले .
या कार्यक्रमाचे आयोजन पोलीस उप आयुक्त, परिमंडळ ५ राजलक्ष्मी शिवणकर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक कुमार घाडगे, पोलीस निरीक्षक (गुन्हे), नवनाथ जगताप, कोंढवा पोलीस ठाणे, पुणे शहर यांनी केले. कार्यक्रमांचे सुत्रसंचालन इस्माईल बागवान यांनी केले.

किरीट सोमैयांच्या ‘अतिरेकी आरोपांवर’ नाशिक पोलीस अधिक्षक व जिल्हाधिकारी यांनी खुलासा करावा

0

काँग्रेसची मागणी ..
सोमैयांनी ‘अतिरेक्यांची संख्येसह असणारी माहीती’ पोलीसांकडे का दिली नाही..?
पोलीस प्रशासन या बाबत अनभिज्ञ कसे? काँग्रेसचा सवाल
पुणे दि २४ फेब्रुवारी २६ :  माजी खासदार व भाजपचे वादग्रस्त नेते किरीट सोमैया हे मालेगांव (जि. नाशिक ) येथे जाऊन माध्यमांसमोर ‘बांगला देशी अतिरेकीं’ बद्दल संख्येसह नेमकी माहिती देत आहेत व प्रक्षोभक वक्तव्ये करत असल्याचे समोर येत आहे, हा प्रकार गंभीर असल्याने नाशिक  जिल्हा पोलीस व प्रशासनाने या गंभीर आरोपांबाबत तातडीने खुलासा करावा व कारवाई बाबत माहिती जारी करावी अशी मागणी प्रदेश काँग्रेस चे वरीष्ठ प्रवक्ते गोपाळदादा तिवारी यांनी केली.

ते पुढे म्हणाले की, भाजप नेते त्यांचे बॅाडी गार्ड यांनी वृत्तपत्रे प्रतिनिधीं व पत्रकारांना त्या विषयी प्रश्न विचारण्यास मज्जाव केल्याचे देखील टीव्ही चॅनेल वर पहायला मिळत असून, सोमैयांनी मालेगावमध्ये असलेल्या अतिरेकीकेंद्रा बद्दल जाहीर वक्तव्ये केलीत, त्या शिवाय ४,६०० बांगलादेशी अतिरेकी घुसल्याचा सनसनाटी आरोप देखील केला आहे.
या सर्व प्रकरणाची मालेगांव,  जिल्हा नाशिक प्रशासनाने, जिल्हा पोलीस अधीक्षक व जिल्हाधिकारी कार्यालयाने या बाबत सत्य वास्तवते बाबत तातडीने खुलासा करावा.. ही सर्व नेमकी माहिती किरीट सोमैयांचेकडे असतांना, ती संबंधित पोलीस व प्रशासकीय यंत्रणेकडे का दिली नाही ? असा सवाल ही काँग्रेस राज्य प्रवक्ते गोपाळदादा तिवारी यांनी विचारला.

संबंधित माहिती पोलीस प्रशासनास देण्याऐवजी ती स्वतः कडे ठेवल्याबद्दल किरीट सोमैयांना पोलीस प्रशासनाने तातडीने ताब्यात घेऊन, त्यांनी अतिरेकी अड्डा बाबत केलेल्या आरोपांची सखोल चौकशी करावी व वास्तवता जिल्हा प्रशासनाने पुढे आणावी.. अन्यथा साप साप म्हणून भूई थोपटून विशिष्ट धर्मा बद्दल भय, भिती, संशय व द्वेषाचे समाजात कलुषित वातावरण करू पाहणाऱ्या माजी खा. किरीट सोमैयांवर सामाजिक सलोखा व शांतता भंग करण्याच्या आरोपाखाली कारवाई करावी..अशी मागणी देखील प्रदेश काँग्रेस चे वरीष्ठ प्रवक्ते गोपाळदादा तिवारी यांनी केली.

मालेगाव बांगलादेशींचा अड्डा आणि अतिरेक्यांचे केंद्र:किरीट सोमय्यांचा आरोप.. दौऱ्यात बॉडीगार्डकडून पत्रकारांना धक्काबुक्कीने तणाव

0

मालेगाव -भाजपचे आक्रमक नेते किरीट सोमय्या यांच्या मालेगाव दौऱ्याने आज शहरात मोठी खळबळ उडवून दिली. “मालेगाव हे आता बांगलादेशी घुसखोरांचा अड्डा आणि अतिरेक्यांचे केंद्र बनले आहे,” असा घणाघाती आरोप करत सोमय्या यांनी स्थानिक प्रशासकीय यंत्रणेच्या कारवाईचा पाढाच वाचला. दरम्यान, या दौऱ्यात किरीट सोमय्यांच्या सुरक्षा रक्षकांनी पत्रकारांना केलेल्या धक्काबुक्कीमुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

भाजप नेते किरीट सोमय्या यांनी बांगलादेशी व रोहिंग्या मुस्लिमांना बनावट जन्मदाखले जारी करण्यावरून राज्यभर रान पेटवले आहे. याच निमित्ताने ते आज मालेगाव दौऱ्यावर आले होते. किरीट सोमय्या मालेगावात दाखल होताच प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनी त्यांना प्रश्नांची विचारणा करण्यासाठी घेरले. यावेळी प्रचंड गर्दी झाल्याने सोमय्यांच्या बॉडीगार्ड्सनी पत्रकारांना अक्षरशः ढकलण्यास सुरुवात केली. यावेळी सुरक्षा रक्षकांनी अरेरावीची भाषा वापरत धक्काबुक्की केल्याने पत्रकार आणि गार्ड्समध्ये तीव्र बाचाबाची झाली. या प्रकारामुळे उपस्थित पत्रकारांनी तीव्र संताप व्यक्त केला असून सोमय्यांच्या या दौऱ्याला गालबोट लागले.

घुसखोरांच्या मुद्द्यावर बोलताना सोमय्या यांनी आकडेवारीसह माहिती दिली. ते म्हणाले, “पोलिस, मनपा, जिल्हाधिकारी यांच्याशी माझी चर्चा झाली. एकूण चार विषयावर चर्चा झाली. SIR, मतदार साफसफाई मोहीम, जी नावं दिली आहेत ती नावे ताबडतोब मतदार यादीतून काढणे, जे दाखले रद्द केले ते नवे काढले यावर चर्चा झाली.
बोगस जन्म दाखले दिल्याप्रकरणी मालेगावात आतापर्यंत ४२ एफआयआर (FIR) दाखल झाले असून १०८३ जणांवर गुन्हे नोंदवण्यात आले आहेत. सुमारे ४४०० अवैध दाखले रद्द करण्यात आले असून आणखी २००० पुराव्यांची चौकशी सध्या सुरू आहे.” घुसखोरांना मदत करणाऱ्या ४० हून अधिक अधिकाऱ्यांवरही कारवाईची कुऱ्हाड कोसळल्याचे त्यांनी यावेळी नमूद केले. कारवाई संदर्भात मुख्यमंत्री वेळ देतील, असेही त्यांनी सांगितले.

“बोगस बांगलादेशी आणि बनावट जन्म दाखल्यांच्या रॅकेटला पायबंद घालण्यासाठी केंद्र सरकार पुढच्या संसदेच्या अधिवेशनात विशेष विधेयक सादर करणार आहे,” अशी महत्त्वाची माहिती सोमय्या यांनी दिली. “ज्यांचे दाखले रद्द झाले आहेत पण त्यांच्याकडे भारतात जन्मल्याचा ठोस पुरावा आहे, त्यांनीच पुन्हा अर्ज करावा,” असेही किरीट सोमय्या यांनी स्पष्ट केले.

सोमय्या यांनी आज पोलिस, महानगरपालिका आणि जिल्हाधिकारी यांच्याशी सविस्तर चर्चा केली. बोगस दाखल्यांच्या आधारे मतदार यादीत घुसलेल्यांची नावे तात्काळ वगळण्याचे आदेश देण्यात आले आहेत. मालेगावात सर्वाधिक बोगस अर्ज आले असून प्रशासकीय अधिकारी त्यांचे पितळ उघडे पाडत आहेत, ही कौतुकास्पद बाब आहे,” असेही ते म्हणाले. मालेगाव अतिरेक्यांचे केंद्र झालेले आहे. बोगस बांगलादेशींचा अड्डा झाले आहे, असा आरोपही सोमय्या यांनी केला.

दरम्यान, मालेगावच्या महापौर नसरीन बानो खालिद शेख यांनी आयुक्त रवींद्र जाधव यांना महापौर व महासभेच्या परवानगीशिवाय कोणतेही कागदपत्रे भाजप नेते किरीट सोमय्या यांना देवू नयेत अशा लेखी सूचना दिल्या आहेत. चौकशीत एकही रोहिंग्या किंवा बांगलादेशी आढळला नाही. त्यामुळे सोमय्या मालेगावला बदनाम करीत असून, अल्पसंख्याकांना लक्ष करीत असल्याचे मायनॉरिटी डिफेन्स कमिटीने म्हटले आहे. पहिल्याच महासभेत जन्मदाखल्यांचा विषय चर्चेत आला. महासभेने विशेष कमिटी स्थापन केली आहे. सोमय्या यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर महापौर नसरीन बानो यांनी आक्रमक पवित्रा घेत आयुक्तांना पत्र दिले.

अग्निशमन जवानांचे रखडलेले प्रशिक्षण २०२७ आधी पूर्ण व्हावे: नगरसेवक राघवेंद्र बाप्पु मानकर यांची मागणी

पुणे : शहराच्या सुरक्षेसाठी २४ तास कार्यरत असलेल्या अग्निशमन दलातील सुमारे ९० कर्मचाऱ्यांचे आवश्यक प्रशिक्षण रखडले असल्याची बाब समोर आली आहे. वेळेत प्रशिक्षण पूर्ण न झाल्यास निश्चित वयोमर्यादा उलटून अनेक जवान भविष्यातील पदोन्नतीपासून कायमचे वंचित राहण्याची चिंता संबंधित कर्मचाऱ्यांनी व्यक्त केली आहे. या पार्श्वभूमीवर नगरसेवक राघवेंद्र बाप्पु मानकर यांनी महापौर मंजुषा नागपुरे यांची भेट घेऊन प्रशिक्षण लवकरात लवकर पूर्ण करण्यात यावे, अशी मागणी केली.

अग्निशमन विभागातील अनेक कर्मचारी हे ४३ ते ५३ वयोगटातील आहेत. भविष्यातील पदोन्नतीसाठी आवश्यक शैक्षणिक अर्हता पूर्ण करण्यासाठी नागपूर येथील राष्ट्रीय अग्निशमन सेवा महाविद्यालयामार्फत विविध प्रशिक्षण कोर्सेस पूर्ण करणे बंधनकारक आहे. संबंधित प्रशिक्षणासाठी वयोमर्यादा निश्चित करण्यात आलेली असून, २०२७ पर्यंत प्रशिक्षण पूर्ण करण्यासाठी वयाची अट ५४ वर्षांपर्यंत शिथिल करण्यात आली आहे. मात्र, गेल्या काही वर्षांत पुरेशा संख्येने कर्मचारी प्रशिक्षणासाठी पाठविण्यात आले नसल्याने सुमारे ९० हून अधिक जवानांचे प्रशिक्षण अद्याप प्रलंबित आहे. यापैकी अनेक कर्मचाऱ्यांची वयोमर्यादा संपत आलेली असून ते प्रशिक्षण व पदोन्नतीपासून वंचित राहण्याची शक्यता निर्माण झाली आहे. हे प्रशिक्षण पूर्ण झाल्यास प्रशिक्षित मनुष्यबळही अग्निशमन दलास उपलब्ध होऊ शकणार आहे.

‘अग्निशमन दलाचे जवान आग, पूरस्थिती तसेच नैसर्गिक आपत्तीच्या वेळी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता नागरिकांचे प्राण व मालमत्ता वाचविण्याचे काम करतात. केवळ तांत्रिक कारणांमुळे भविष्यात त्यांच्या करिअरमध्ये अडथळे निर्माण होणे अन्यायकारक असल्याचे नगरसेवक राघवेंद्र बाप्पु मानकर यांनी नमूद केले. तसेच, महानगरपालिका हद्दीत नव्याने समाविष्ट झालेल्या गावांमध्ये भविष्यात नवीन अग्निशमन केंद्रे उभारली जाणार असून, त्यासाठी प्रशिक्षित मनुष्यबळाची आवश्यकता भासणार आहे. उपलब्ध अनुभवी मनुष्यबळाला भविष्यात पदोन्नतीच्या संधींत सामावून घेता यावे, यासाठी हे प्रशिक्षण अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहे.

वरील सर्व बाबींचा विचार करून, वयोमर्यादा संपत आलेल्या जवानांसाठी नागपूर येथील महाविद्यालयाची आवश्यक मान्यता घेऊन संबंधित प्रशिक्षण पुण्यातच आयोजित करण्यात यावे, तसेच २०२७ पूर्वी सर्व प्रलंबित प्रशिक्षण पूर्ण करण्यासाठी धोरणात्मक निर्णय घेण्यात यावा, अशी मागणी नगरसेवक राघवेंद्र बाप्पु मानकर यांनी महापौर मंजुषाताई नागपुरे यांच्याकडे केली.

यावर सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्वासन महापौर मंजुषा नागपुरे यांनी दिले असल्याचे राघवेंद्र बाप्पु मानकर
यांनी सांगितले. यावेळी मुख्य अग्निशमन अधिकारी देवेंद्र पोटफोडे व अग्निशमन दलाचे जवान उपस्थित होते.

‘बाई पण भारी देवा’ स्वतःला जोडणारा, स्वतःला उभा करणारा कार्यक्रम

तनुश्री गर्भसंस्कार परिवारातर्फे
१ मार्च रोजी विनामूल्य कार्यशाळेचे आयोज

पुणे, दि.२४ फेब्रुवारी: तनुश्री स्नेहमेळावा परिवाराद्वारे तनुश्री संस्कार साधना या नावाने स्त्रीला स्वतःला जोडणारा, स्वतःला उभा करणारा ‘बाई पण भारी देवा’ या अनोख्या थीमच्या माध्यमातून विनामूल्य कार्यशाळेचे अयोजन करण्यात आले आहे. या वर्षी मधुरा बाचल आणि झेलम चौबळ यांना तनुश्री ‘जन संस्कार पुरस्काराने’ सन्मानीत करण्यात येणार आहे. रविवार, दि.१ मार्च २०२६ रोजी सकाळी ८.३० ते दुपारी १२.३० वाजेपर्यंत न्यू सांगवी येथील साई चौक येथील संस्कृती लॉन्स मध्ये याचे आयोजन करण्यात आले आहे. अशी माहिती डॉ. सुप्रिया गुगळे आणि डॉ. तन्वी खाबिया (गुगळे) यांनी पत्रकार परिषदेत दिली.
डॉ. सुप्रिया गुगळे यांनी सांगितले की, ‘बाई पण भारी देवा’ हा सोहळा तिच्या अस्तित्वाचा गौरव, सामर्थ्याचा सन्मान आणि आत्मविश्वासाला नवी दिशा देण्यासाठी आहे. हा सोहळा स्त्री शक्तीला प्रणाम करण्यासाठी, तिच्या आत्मविश्वााला नवे पंख देण्यासाठी आणि तिच्या ‘मी’ ला पुन्हा उजाळा देण्यासाठी आहे.
डॉ. तन्वी खाबिया म्हणाल्या,“तनुश्री स्नेहमेळाव्याचे हे १३ वर्ष असून या वर्षी मधुरा बाचल आणि झेलम चौबळ यांना तनुश्री ‘जन संस्कार पुरस्काराने’ गौरविण्यात येणार आहे. सन्मानपत्र, स्मृतिचिन्ह, शाल व श्रीफळ असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. ‘बाई पण भारी देवा’ हा कार्यक्रम स्वतःशी जोडणारा, स्वतःला उभं करणारा प्रवास आहे. त्यामुळे या वर्षी अभिनेत्री शर्वरी जैमिनिस (बाई पण भारी देवा), कलाकार किशोर महाबोले आणि कलाकार अश्विनी कासार या शुभेच्छा देतील. तसेच मधुरा बाचल(स्त्री शक्तीचा गौरव), झेलम चौबळ (तिच कर्तृत्वाशाली नेतृत्व), डॉ. सुजाता पाटील (तिचं आरोग्य आणि आयुर्वेद), वीणा गोखले (देणे समाजाचे), हिमांशु बक्षी, उमा नेने (सुरेल साथ) या वेगवेगळया विषयांवर विचार मांडतील तसेच शुभांगी दामले, डॉ. सुनंदा रानडे, एसीपी अनुजा देशमाने या शुभेच्छा देतील. या कार्यक्रमाचे निवेदन वसुंधरा काशीकर या करतील.”
प्रत्येक स्त्रीला तिच्यातील दडलेली शक्ती, आत्मविश्वास आणि स्वाभिमान पुन्हा अनुभवता यावा यासाठी विविध उपक्रम, प्रेरणादायी सत्रे आणि सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. आयुर्वेद, संस्कार आणि सकारात्मक विचारांच्या बळावर स्त्रीने स्वतःला सक्षम केले तर तिच्याच हातून घडेल आणि सुंदर, सुदृढ आणि संस्कारित उद्याचे भविष्य हे या कार्यक्रमाचा मुख्य संदेश आहे.

इच्छुकांना सहभागी होण्यासाठी नाव नोंदणी विनामूल्य पण आवश्यक आहे. नोंदणी साठी मो.नं., ८००७२३२०११, +९१८००७१०५३०९ आणि +९१९११२२३१७१५ वर संपर्क साधावा.

डॉ. अनिल व डॉ. सुप्रिया गुगळे यांच्या कार्याचा अल्प परिचयः
डॉ. अनिल गुगळे व डॉ. सुप्रिया गुगळे हे गेल्या २९ वर्षापासून सांगवी येथे गर्भसंस्कार केंद्र यशस्वी रित्या चालवित आहेत. यांच्यातर्फे आयोजित गर्भसंस्कार कार्यक्रमात आतापर्यंत ६५०० पालकांनी सहभाग घेतला आहे. या मध्ये आईची शारीरिक, मानसिक आरोग्य वृध्दी व बाळ निरोगी, आनंदी व सुसंस्कारीत होण्यासाठी केली आहे. त्याचप्रमाणे तनुश्री ब्रम्ह मुहूर्त कार्यक्रम आयोजित केला जातो. यामध्ये आरोग्य संपन्न जीवनशैलीसाठी मार्गदर्शन केेले जाते. गेल्या ५ वर्षारंभा पासून २५ हजार कुटुंबाने ऑनलाईन कार्यक्रमाचा लाभ घेतला.गर्भ संस्कार व सकारात्मक मनाद्वारे नितिमान पिढी निर्माण करण्यासाठी पालकांना मदत केल्या जाते.

जुन्या आठवणी आणि नव्या कथा

मराठी भाषा गौरव दिनानिमित्त खास स्ट्रीम फेस्ट अल्ट्रा झकास मराठी ओटीटी वर

मुंबई,: येत्या २७ फेब्रुवारी रोजी साजऱ्या होणाऱ्या मराठी भाषा गौरव दिनानिमित्त मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय ओटीटी प्लॅटफॉर्म अल्ट्रा झकास मराठी ओटीटीने खास ‘मराठी भाषा गौरव दिन स्ट्रीम फेस्ट’ सादर करण्याची घोषणा केली आहे. मराठी भाषा, साहित्य, रंगभूमी आणि चित्रपटांचा समृद्ध वारसा डिजिटल माध्यमातून अनुभवण्याची ही एक खास संधी आहे.

फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यात रंगणाऱ्या या विशेष सोहळ्यात १९९० नंतरच्या दशकांतील गाजलेले आणि पिढ्यानपिढ्या लक्षात राहिलेले चित्रपट पुन्हा एकदा पाहता येणार आहेत. अल्ट्रा झकासच्या ४,०००+ तासांच्या लायब्ररीतून १,५०० पेक्षा अधिक चित्रपट आणि वेब सिरीज प्रेक्षकांसाठी उपलब्ध असतील. यात क्लासिक चित्रपट, गाजलेली नाटके, पुरस्कारप्राप्त ओरिजिनल वेब सिरीज, गाजलेल्या मालिका, बालकार्यक्रम आणि संस्कृतीशी नाते सांगणाऱ्या कथा यांचा समावेश असणार आहे.

‘मराठी भाषा गौरव दिन’ हा ज्येष्ठ कवी विष्णू वामन शिरवाडकर (कुसुमाग्रज) यांच्या जयंतीनिमित्त साजरा केला जातो. मराठी साहित्य आणि भाषेच्या समृद्ध परंपरेचा गौरव करण्याचा हा दिवस अल्ट्रा झकासच्या मराठी आशय जतन आणि डिजिटायझेशनच्या ध्येयाशी पूर्णतः सुसंगत ठरतो.

या ‘स्ट्रीम फेस्ट’मध्ये २५ निवडक चित्रपटांचा खास समावेश करण्यात आला असून विनोदी, कौटुंबिक, सामाजिक, थ्रिलर आणि भावनिक अशा विविध चित्रपटसृष्टीची ताकद प्रेक्षकांना अनुभवता येईल. या संग्रहातील काही चित्रपटांमध्ये मानसशास्त्रीय थरारपट काल रात्री १२ वाजता (१९९९) याचा समावेश आहे. अलका कुबल अभिनीत हा चित्रपट मराठीतील सुरुवातीच्या थरारपटांपैकी एक मानला जातो. आजोबा (२०१४) मध्ये उर्मिला मातोंडकर यांनी साकारलेली भूमिका आंतरपिढीतील नात्यांची हळवी गोष्ट सांगते. सोनाली कुलकर्णी अभिनीत कच्चा लिंबू (२०१७) हा चित्रपट तरुणांच्या भावविश्वावर आधारित संवेदनशील कथा मांडतो, तर किशोरी शहाणे अभिनीत खैरलांजीच्या माथ्यावर (२०१४) समाजातील महत्त्वाच्या प्रश्नांकडे लक्ष वेधतो. याशिवाय स्वर्गीय प्रिया मराठे आणि अलका कुबल यांचा विघ्नहर्ता महागणपती (२०१५), अतुल कुलकर्णी यांचा सुखांत (२०१०), उषा नाडकर्णी आणि विजय चव्हाण यांचा व्हॉट अ‍ॅन आयडिया मॅडम (२०११), आशुतोष राणा यांचा येडा (२०१३) तसेच दिलीप प्रभावळकर यांचा गोळा बेरीज (२०१२) हे चित्रपटही या फेस्टमध्ये पाहायला मिळणार आहेत.

मराठी भाषा गौरव दिनाच्या निमित्ताने खास दिग्दर्शक अनंत महादेवन यांचा आणि दिलीप प्रभावळकर व रोहिणी हट्टंगडी अभिनीत ‘आता वेळ झाली’ या चित्रपटाचा वर्ल्ड डिजिटल प्रीमियर आयोजित करण्यात आला आहे. तसेच प्रसाद ओक दिग्दर्शित आणि अभिनीत ‘वडा पाव’ ही २०२५ मधील हृदयस्पर्शी रोमँटिक कॉमेडीही या फेस्टचा भाग असणार आहे.

रंगभूमीचा वारसा जपण्यासाठी ‘रंगभूमी स्पॉटलाइट’ या विशेष विभागातून गाजलेली मराठी नाटकेही सादर केली जाणार आहेत. मच्छिंद्र कांबळी, विजय चव्हाण आणि लक्ष्मीकांत बेर्डे यांसारख्या दिग्गज कलाकारांच्या नाटकांचा यात समावेश आहे. ‘श्रीमंत दामोदर पंत’, ‘यदा कदाचित १ आणि २’ तसेच ‘जाऊबाई जोरात’ ही लोकप्रिय नाटके प्रेक्षकांना पाहता येतील.

या स्ट्रीम फेस्टमध्ये सौभाग्यवती सरपंचआयपीसीबेटर हाफ ची लव्ह स्टोरीजिलबीराख आणि खोताची वाडी या लोकप्रिय अल्ट्रा झकास ओरिजिनल्सनाही विशेष स्थान दिले जाणार आहे. या सगळ्या कलाकृतींमध्ये आपल्या परंपरेचा वारसा आणि आजच्या काळातील कथा सांगण्याची नवी शैली यांचा छान संगम दिसतो. त्यामुळे प्रेक्षकांना जुनी ओळख आणि नवीन अनुभव दोन्ही एकाच ठिकाणी पाहायला मिळतील.

मराठी भाषा गौरव दिनानिमित्त होणाऱ्या ‘या’ फेस्टबद्दल बोलताना, अल्ट्रा मीडिया अँड एंटरटेनमेंट प्रा. लि. चे सी.ई.ओ. श्री. सुशीलकुमार अग्रवाल म्हणाले, “मराठी भाषा ही आपल्या संस्कृतीची ओळख आहे. हा ‘मराठी भाषा गौरव दिन स्ट्रीम फेस्ट’ फक्त चित्रपट दाखवण्यापुरता नाही, तर मराठीपणाचा अभिमान साजरा करण्यासाठी आहे. जुन्या गाजलेल्या कलाकृतींपासून ते नव्या कथांपर्यंत मराठीची समृद्ध परंपरा जगभरातील प्रेक्षकांपर्यंत पोहोचवणे हे आमचे प्रथम उद्दिष्ट आहे.”

मराठी भाषा, मराठी संस्कृती आणि मराठी सिनेमा यांचा खास संगम अनुभवण्यासाठी या २७ फेब्रुवारीला ‘मराठी भाषा गौरव दिन स्ट्रीम फेस्ट’ जरूर अनुभवा, फक्त अल्ट्रा झकास मराठी ओटीटीवर.

शिवाय अल्ट्रा झकास प्लॅटफॉर्म Android, iOS, टॅब, वेब, Android TV, Fire TV, Jio Store आणि Cloud TV वर सहज उपलब्ध आहे. त्यामुळे प्रेक्षकांना याचा आनंद कधीही, कुठेही घेता येईल.

वारजे महामार्ग हायवे चौक ते मुठा नदी पर्यंत (कात्रज कडे) जाणारा १२ मीटर सर्विस डीपी रस्ता, काळाची गरज!

पुणे नगरसेवक स्वप्निल दुधाने यांनी आपल्या प्रभाग क्र. ३०, (कर्वेनगर-हिंगणे होम कॉलनी) येथील वारजे महामार्ग चौक ते मुठा नदी असा १२ मीटर डीपी सर्विस रस्ता विकसित करण्यात यावा, याकरिता प्रत्यक्ष ठिकाणी जाऊन पाहणी के ली.

पुणे मनपाचे पथ विभागाचे उपअभियंता, कनिष्ठ अभियंता आणि संबंधित बाधित जागा पुणे मनपाला हस्तांतरीत व्हावी, याकरिता कार्यरत असणाऱ्या मालमत्ता विभागाचे उपअभियंता आणि कनिष्ठ अभियंता यांच्यासह झालेल्या या पाहणीदरम्यान रस्ता बाधित नागरिक वर्गाशी सुसंवाद साधण्यात आला. वाढती लोकसंख्या आणि सम प्रमाणात वाढते शहरीकरण यासाठी रस्त्याचे महत्व नागरिकांना पटवून देताना प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले.

याप्रसंगी ओढयावरील पुलाचे काम काळाची गरज असून सदर कामाचा शुभारंभ करण्याबद्दल प्रशासनाला विनंती करण्यात आली. याबाबत मनपाचा आराखडा तयार करण्यात आला असून आज तांत्रिक अडचणी दूर करण्यात आल्या. वाढत्या लोकसंख्या आणि नागरीकरण या प्रमाणात लोकप्रतिनिधी आणि प्रशासन यांची जबाबदारी याबद्दल सकारात्मक चर्चा करण्यात आली असून प्रशासनानेही यावर सकारात्मक प्रतिसाद दिला असल्याने लवकरच सदर कामाचा श्रीगणेशा होईल, असा विश्वास वाटतो. असेही दुधाने यांनी म्हटले आहे.

लाडक्या बहिणींनो बँक खाते चेक करा!:जानेवारीचा हप्ता जमा होण्यास सुरुवात

0

मुंबई-मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांच्या खात्यात जानेवारी महिन्याचा हप्ता वर्ग करण्यास सुरुवात झाली आहे. महिला व बाल कल्याण विभागाने सोमवारपासून ही प्रक्रिया सुरू केली आहे. काल रात्रीपासून आतापर्यंत राज्यातील हजारो महिलांना हे पैसे मिळालेत.

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेंतर्गत पात्र लाभार्थी महिलांना दरमहा 1500 रुपयांचे अर्थसहाय्य केले जाते. फेब्रुवारी महिना संपत आला तरी या महिलांना अद्याप जानेवारी महिन्याचा निधी मिळाला नव्हता. त्यामुळे हा हप्ता केव्हा मिळणार? असा सवाल उपस्थित केला जात होता. अखेर गत 18 फेब्रवारी रोजी सामाजिक न्याय विभागाने महिला व बाल कल्याण विभागाला 98 कोटींचा निधी वर्ग केल्यानंतर हा हप्ता जारी करण्याचा मार्ग मोकळा झाला होता. त्यानुसार, सोमवार रात्रीपासून पात्र लाभार्थी महिलांना हा हप्ता मिळण्यास सुरुवात झाली आहे.

राज्य सरकारने गत डिसेबर महिन्याचा लाभ जानेवारीच्या 14 तारखेला दिला जारी केला होता. त्या अंतर्गत सुमारे 1 कोटी 60 लाख महिलांच्या खात्यात रक्कम वर्ग करण्यात आली होती. तत्पूर्वी, सरकारने सर्व लाभार्थ्यांना ई केवायसी करणे बंधनकारक केले होते. त्यात अनेकांची केवायसी चुकल्यामुळे त्यांचे नाव लाभार्थ्यांच्या यादीतून कापले गेले होते. त्यामुळे या योजनेतील पात्र लाभार्थ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात कमी झाली होती.
प्रस्तुत योजना जुलै 2024 रोजी सुरू झाली तेव्हा लाभार्थ्यांचा आकडा 2 कोटी 46 लाखांच्या आसपास होता. त्यानंतर सरकानरे 31 डिसेंबरपर्यंत ई केवायसीची प्रक्रिया पूर्ण करण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर 1 कोटी 90 लाख महिला लाभार्थ्यांनी ई केवायसी प्रक्रिया पूर्ण केली होती. त्यापैकी योग्य केवायसी असणाऱ्या 1 कोटी 60 लाख महिलांच्या खात्यात सरकारने डिसेंबर महिन्याचे पैसे पाठवले होते. यामुळे केवायसी चुकलेल्या महिलांमध्ये संतापाची लाट उसळली होती. त्यामुळे सरकारने या महिलांना 31 मार्चपर्यंत नव्याने ई केवायसी करण्याची मुदत दिली आहे. तसेच ही प्रक्रियाही सुटसुटीत केली आहे.

उल्लेखनीय बाब म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांना जुलै 2024 पासून जानेवारी 2026 पर्यंत एकूण 19 हप्त्यांची रक्कम मिळाली आहे.

कोणत्या महिला योजनेसाठी अपात्र?

ज्यांच्या कुटुंबाचे एकत्रित वार्षिक उत्पन्न अडीच लाख रुपयांपेक्षा अधिक आहे.ज्यांच्या कुटुंबातील सदस्य आयकरदाते आहेत.
ज्यांच्या कुटुंबातील सदस्य नियमित/कायम कर्मचारी/कंत्राटी कर्मचारी म्हणून सरकारी विभाग/उपक्रम/मंडळ/भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत आहेत किंवा सेवानिवृत्तीनंतर निवृत्तीवेतन घेत आहेत. परंतु बाह्य यंत्रणाद्वारे कार्यरत असलेले तथा स्वयंसेवी कामगार आणि कर्मचारी अपात्र ठरणार नाहीत.
सदर लाभार्थी महिलेने शासनाच्या इतर विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या आर्थिक योजनेद्वारे 1500 रुपयांपेक्षा जास्त लाभ घेतला असेल.
ज्यांच्या कुटुंबातील सदस्य विद्यमान किंवा माजी खासदार/आमदार आहे.
ज्यांच्या कुटुंबातील सदस्य भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या बोर्ड/कॉर्पोरेशन/बोर्ड/उपक्रमाचे अध्यक्ष/उपाध्यक्ष/संचालक/सदस्य आहेत.
ज्यांच्या कुटुंबातील सदस्यांची संयुक्तपणे पाच एकरपेक्षा जास्त शेतजमीन आहे.
ज्यांच्याकडे चारचाकी वाहने (ट्रॅक्टर वगळून) त्यांच्या कुटुंबातील सदस्यांच्या नावावर नोंदणीकृत आहेत.

महापालिकेत भाजपचा बिनविरोध पॅटर्न, महापौर, स्थायीसह सर्व समित्यांचे अध्यक्ष बिनविरोध, बिडकरांची रणनीती कामी

भाजपची एकहाती सत्ता, बिनविरोध निवडणुका आणि बिडकरांची अचूक रणनीती; पुणे महापालिकेत नवा पॅटर्न

महापौर ते स्थायी समिती अध्यक्ष… सर्वत्र बिनविरोध! पुणे पालिकेत नवा पॅटर्न; बिडकरांची रणनीती कामी

पुणे महापालिकेत सर्वच पदे बिनविरोध, बिडकरांची रणनीती यशस्वी

पुणे : पुणे महानगरपालिका निवडणुकीत पुणेकरांनी स्पष्ट बहुमत देत भारतीय जनता पार्टीला एकहाती सत्ता दिली. यानंतर झालेली महापालिकेतील सत्तास्थापनेची प्रक्रिया यंदा वेगळ्याच पद्धतीने पार पडली. तब्बल ११९ नगरसेवक निवडून आल्यानंतर महापौर, उपमहापौर, स्थायी समितीसह सर्व विषय समित्यांचे अध्यक्ष बिनविरोध निवडले जाणे, हा यंदाच्या कार्यकाळातील विशेष पैलू ठरला आहे.

महापौरपदी मंजुषा नागपुरे व उपमहापौरपदी परशुराम वाडेकर यांची बिनविरोध निवड करण्यात आली. पूर्वीच्या कार्यकाळात या पदांसाठी विरोधकांकडून उमेदवार उभे राहत असत; मात्र यंदा भाजपकडून सभागृह नेते गणेश बिडकर यांनी समन्वयाची रणनीती अवलंबत विरोधकांशी संवाद साधला. राष्ट्रवादीसह काँग्रेसनेही महापौर व उपमहापौर पदासाठी दिलेल्या उमेदवारांची माघार घेतली.

भाजपकडून सभागृह नेतेपदी ज्येष्ठ नगरसेवक गणेश बिडकर यांची नियुक्ती झाल्यानंतर त्यांनी विरोधी पक्षांतील नेत्यांशी सातत्याने संपर्क ठेवत निवडणूक प्रक्रिया निर्विघ्न पार पाडली. महानगरपालिकेमध्ये यंदा सर्व महत्त्वाच्या पदांची बिनविरोध निवड घडवून आणण्यात बिडकर यांच्या राजकीय रणनीतीची निर्णायक भूमिका राहिल्याचे स्पष्ट दिसून आले.

भाजपकडे मोठे बहुमत असतानाही विरोधकांकडून आपले उमेदवार देत प्रत्यक्ष निवडणूक घडवून आणण्याची शक्यता नाकारता येत नव्हती. मात्र बिडकर यांनी केवळ संख्याबळावर विसंबून न राहता संवादाचा मार्ग स्वीकारला. विविध पक्षांतील वरिष्ठ नेत्यांशी वैयक्तिक संपर्क, गटनेत्यांसोबत संवाद आणि समित्यांवरील प्रतिनिधित्वाचा समतोल साधण्याचा प्रयत्न या माध्यमातून त्यांनी वातावरण प्रत्यक्ष निवडणुकीपर्यंत जाण्यापासून रोखले.

आज स्थायी समिती अध्यक्षपदी श्रीनाथ भिमाले यांचीही बिनविरोध निवड झाली. राष्ट्रवादी काँग्रेसचे सुहास टिंगरे यांचा अर्ज वेळेत न भरल्याने अवैध ठरला आणि निवडणूक एकतर्फी झाली. याशिवाय विधी समिती अध्यक्षपदी स्वरदा गौरव बापट, शहर सुधारणा समिती अध्यक्षपदी स्मिता वस्ते, महिला व बालकल्याण समिती अध्यक्षपदी अल्पना गणेश वरपे, शिक्षण समिती अध्यक्षपदी अरुण राजवाडे, नाव समिती अध्यक्षपदी पल्लवी जावळे आणि क्रीडा समिती अध्यक्षपदी नारायण गलांडे यांची नियुक्ती करण्यात आली.

भाजपाच्या स्पष्ट बहुमतासोबतच संवाद आणि समन्वयावर आधारित व्यूहरचनेमुळे सर्व महत्त्वाच्या पदांची बिनविरोध निवड शक्य झाली. या प्रक्रियेत सभागृह नेते गणेश बिडकर यांच्या राजकीय कौशल्याची महत्त्वाची भूमिका असल्याचे बोलले जात आहे.

भाजपच्या विरोधात बोलतोस म्हणून पिस्तुल दाखवून धमकावले,मारले,पण अटक नाही: ६ हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांवर अखेर गुन्हा दाखल

पुणे- काँग्रेस प्रवक्ते हनुमंत पवार यांना मारहाण करून पिस्तुलाचा धाक दाखवल्याप्रकरणी तुषार दामगुडे आणि त्यांच्या साथीदारांविरुद्ध स्वारगेट पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. ही घटना सोमवारी सायंकाळी मित्रमंडळ चौकातील पदपथावर घडली.या प्रकरणी हनुमंत दिगंबर पवार (वय 41, रा. जाधवनगर, वडगाव बुद्रुक, पुणे) यांनी स्वारगेट पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादीनुसार, तुषार दामगुडे यांच्यासह बाळासाहेब गालफाडे, गौरव राठोड, श्रीनिवास निगडे, ऋषीकेश परदेशी आणि अभिमन्यू मैड यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दामगुडे आणि पवार हे सोमवारी सायंकाळी एका वृत्तवाहिनीच्या चर्चासत्रात सहभागी झाले होते. चर्चासत्र संपल्यानंतर सायंकाळी साडेपाचच्या सुमारास ते मित्रमंडळ चौकातील पदपथावर थांबले होते.त्यावेळी दामगुडे आणि पवार यांच्यात बाचाबाची झाली. दामगुडे यांनी पवार यांना तू भारतीय जनता पक्षाच्या विरोधात बोलतोस. तुला हर्षवर्धन सपकाळ यांचा एवढा पुळका का आहे? पुण्यात राहायचे असेल, तर नीट राहा, अशी धमकी दिली. त्यानंतर दामगुडे यांनी पिस्तूल दाखवून जिवे मारण्याची धमकी दिली आणि त्यांच्या साथीदारांसह पवार यांना मारहाण केली, असे फिर्यादीत नमूद आहे.

मित्रमंडळ चौकातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमध्ये पवार यांना मारहाण केल्याचा प्रकार कैद झाला आहे. या घटनेनंतर पवार यांनी स्वारगेट पोलिस ठाण्यात जाऊन दामगुडे यांच्याविरुद्ध तक्रार दिली. रात्री उशिरा या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून, सहायक पोलिस निरीक्षक शिरसाठ पुढील तपास करत आहेत.

याप्रकरणात काँग्रेस शिष्टमंडळाने पुणे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांची मंगळवारी भेट घेतली. काँग्रेस प्रवक्ते हनुमंत पवार यांना पोलिस संरक्षण द्यावे अशी मागणी यावेळी करण्यात आली आहे.

काँग्रेस प्रवक्ते हनुमंत पवार यांना हिंदुत्ववादी कार्यकर्ते तुषार दामगुडे आणि त्यांच्या साथीदारांकडून मारहाण

पोलीस आयुक्त साहेब अटक करणार कधी ?

पुणे-पुण्यात सोमवारी संध्याकाळी काँग्रेस प्रवक्ते हनुमंत पवार यांना हिंदुत्ववादी कार्यकर्ते तुषार दामगुडे आणि त्यांच्या साथीदारांनी मारहाण केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून, मारहाणीदरम्यान दामगुडे यांनी आपल्याला पिस्तुल दाखवून धमकावल्याचा गंभीर आरोप पवार यांनी केला आहे. या प्रकारामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली असून पोलिस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

पुण्यात सोमवारी ‘पुढारी न्यूज’च्या ‘धुरळा’ या चर्चासत्रात ‘शिवरायांचा अवमान, मराठी अस्मिता गपगुमान’ या विषयावर झालेल्या चर्चेनंतर, काँग्रेस प्रवक्ते हनुमंत पवार आणि हिंदुत्ववादी कार्यकर्ते तुषार दामगुडे यांच्यात कार्यालयाबाहेर जोरदार शाब्दिक वाद झाला. या वादाचे रूपांतर पुढे हाणामारीत झाले असून, तुषार दामगुडे आणि त्यांच्या 3-4 साथीदारांनी हनुमंत पवार यांना मारहाण केल्याचे समोर आले आहे. ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून, त्यामध्ये दामगुडे यांनीच सुरुवातीला हात उगारल्याचे स्पष्टपणे दिसत आहे.

मारहाणीच्या घटनेनंतर हनुमंत पवार यांनी प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, कार्यक्रम संपल्यावर मी कार्यालयातून बाहेर पडत होतो. यादरम्यान गेटबाहेर थांबलेल्या दामगुडे आणि त्यांच्या साथीदारांनी मला शिवीगाळ करुन बोलावले आणि तू भाजप- संघाला विरोध का करतो, हर्षवर्धन सपकाळ यांची बाजू का घेतो, असा जाब विचारत तुषार दामगुडेंनी मला पिस्तुल दाखवले. त्यानंतर हल्लेखोर पळून गेले.

काही दिवसांपूर्वी एका वृत्तवाहिनीवरील चर्चासत्रात तुषार दामगुडे यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्षांना केलेल्या शिवीगाळीचा हनुमंत पवार यांनी तीव्र विरोध केला होता. याच जुन्या वादाचा राग धरून दामगुडे यांनी सोमवारी पवार यांना ‘तू हर्षवर्धन सपकाळांची बाजू घेणारा कोण?’ असा जाब विचारत त्यांच्यावर हा हल्ला केला. पवार यांच्या दाव्यानुसार, मागील चर्चेतील ती शाब्दिक चकमकच या मारहाणीमागचे प्रमुख कारण ठरली असून, वैचारिक विरोधाचे रूपांतर अशा प्रकारे शारीरिक हिंसाचारात झाल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.

गुंड प्रवृत्तीच्या तुषार दामगुडेला तुरुंगात टाकावे- हर्षवर्धन सपकाळ

हर्षवर्धन सपकाळ यांनी ट्विट करत या घटनेचा निषेध केला आहे. ते म्हणाले, कॉंग्रेस पक्षाचे प्रवक्ते हनुमंत पवार यांना दैनिक पुढारी कार्यालय, मित्र मंडळ चौक पुणे येथे भाजप गुंड तुषार दामगुडे याने बंदुकीचा धाक दाखवत मारहाण केली आहे. या घटनेचा आम्ही निषेध करतो. देवेंद्र फडणवीस यांच्या आशिर्वादाने या मर्द मावळ्यांच्या महाराष्ट्रात गुंड मवाल्यांचं राज्य फोफावू पाहतंय. या महाराष्ट्र नासवणाऱ्या औलादींना अभय देण्याचे काम गृहमंत्री फडणवीसांनी करू नये, हा महाराष्ट्र तुम्हाला कधीही माफ करणार नाही, या गुंड प्रवृत्तीच्या तुषार दामगुडेला लगेच अटक करून तुरूंगात टाकण्यात यावे, त्याची खरी जागा तीच आहे, अशी मागणी सपकाळ यांनी केली आहे.

कात्रज घाटात पहाटे भीषण अपघात:लोखंडी पाईप आणि सळया भरून जाणाऱ्या ट्रकची बसला पाठीमागून जोरात धडक; चालकाचा मृत्यू

पुणे- मंगळवारी पहाटे चारच्या सुमारास पुण्यातील कर्जत घाट परिसरात भीषण अपघात घडला. कात्रज बोगद्याकडून नवले पुलाच्या दिशेने जाणाऱ्या महामार्गावर हा अपघात झाला. विशेषतः कर्जत न्यू टनेल येथून पुढे जांभुळवाडी दरी पुलादरम्यान ही धडक झाली. पहाटेची वेळ असल्याने रस्त्यावर वाहतूक तुलनेने कमी होती; मात्र अचानक झालेल्या या अपघातामुळे काही वेळातच परिस्थिती गंभीर बनली. लोखंडी पाईप आणि सळया भरून जाणाऱ्या ट्रकने समोर चाललेल्या बसला पाठीमागून जोरात धडक दिली. धडक इतकी तीव्र होती की काही क्षण परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले.

अपघातानंतर ट्रकचा पुढील केबिन पूर्णपणे चक्काचूर झाला. बसमधील प्रवाशांना या धडकेचा जबर धक्का बसला. प्राथमिक माहितीनुसार बसमधील चार ते पाच प्रवासी किरकोळ जखमी झाले. त्यांना तातडीने जवळच्या रुग्णालयात हलवण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. सुदैवाने बसमधील इतर प्रवासी सुरक्षित असल्याची माहिती समोर आली आहे. मात्र ट्रक चालक गंभीर जखमी झाला होता. त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले; परंतु उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली आहे.

ट्रकचा क्लीनर धडकेनंतर ट्रकमधील लोखंडी सळ्या आणि वाकलेल्या केबिनमध्ये अडकून पडला. त्यामुळे बचावकार्य करताना मोठे अडथळे निर्माण झाले. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले. अग्निशमन दलाच्या जवानांनी कटरच्या सहाय्याने केबिन कापून क्लीनरला बाहेर काढले. काही काळासाठी संपूर्ण परिसरात तणावपूर्ण वातावरण होते. बचावकार्य सुरळीत पार पाडण्यासाठी पोलिसांनी वाहतूक नियंत्रित करण्याचे काम हाती घेतले.

घटनास्थळी पोलिस, अग्निशमन दल तसेच राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे पथक तातडीने दाखल झाले. अपघातामुळे महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली. पहाटेची वेळ असूनही वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याचे चित्र दिसून आले. जांभुळवाडी दरी पुलाजवळ काही काळ वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती. पोलिसांनी पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन केले. अपघातग्रस्त वाहने बाजूला काढण्यासाठी आणि रस्ता मोकळा करण्यासाठी यंत्रणा युद्धपातळीवर काम करत होती.

दरम्यान, या अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. ट्रक चालकाचे नियंत्रण सुटले की ब्रेक निकामी झाले, याबाबत विविध शक्यता व्यक्त केल्या जात आहेत. मात्र अधिकृत माहिती तपासानंतरच स्पष्ट होईल, असे पोलिसांनी सांगितले. अपघाताच्या पार्श्वभूमीवर महामार्गावरील सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. पहाटेच्या वेळीही वेग आणि निष्काळजीपणा जीवघेणा ठरू शकतो, याची जाणीव या घटनेने करून दिली आहे. पोलिसांकडून पुढील तपास सुरू असून घटनेचा सविस्तर अहवाल लवकरच समोर येण्याची अपेक्षा आहे.

आजपासून ट्रम्प यांच्या इमर्जन्सी टॅरिफची वसुली बंद:₹16 लाख कोटी परत करावे लागू शकतात; कोर्टाने 3 दिवसांपूर्वी बंदी घातली

0

अमेरिकन सरकार आजपासून राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी लादलेल्या आपत्कालीन शुल्काची (टॅरिफ) वसुली थांबवेल. अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाने 3 दिवसांपूर्वी हे टॅरिफ बेकायदेशीर ठरवले होते.

अमेरिकेच्या यूएस कस्टम अँड बॉर्डर प्रोटेक्शन (CPB) ने एका निवेदनात म्हटले आहे की-
1977 च्या आंतरराष्ट्रीय आपत्कालीन आर्थिक अधिकार कायद्यांतर्गत (International Emergency Economic Powers Act – IEEPA) लादलेल्या शुल्काची वसुली मंगळवारी रात्री 12 वाजून 1 मिनिटापासून (भारतीय वेळेनुसार सकाळी 10:30 वाजता) थांबवली जाईल. एजन्सीने आयातदारांना (इम्पोर्टर्स) निर्देश दिले आहेत की या शुल्काशी संबंधित सर्व कोड त्यांच्या कार्गो सिस्टिममधून काढून टाकले जातील.

पेन व्हार्टन बजेट मॉडेलच्या अर्थशास्त्रज्ञांनुसार, न्यायालयाच्या या निर्णयामुळे अमेरिकन सरकारला 175 अब्ज डॉलर (15.75 लाख कोटी रुपये) पेक्षा जास्त कमाई परत करावी लागू शकते.
रॉयटर्सनुसार, IEEPA अंतर्गत लादलेल्या टॅरिफमुळे अमेरिकेला दररोज 50 कोटी डॉलर (4,500 कोटी रुपये) पेक्षा जास्त कमाई होत होती. आता हे रद्द केल्यामुळे कंपन्या परताव्याची (रिफंड) मागणी करू शकतात.
ट्रम्प म्हणाले- सर्वोच्च न्यायालयाने मला पूर्वीपेक्षा जास्त अधिकार दिले आहेत

ग्लोबल टॅरिफ रद्द केल्यानंतर सोमवारी राष्ट्राध्यक्ष ट्रम्प म्हणाले की, या निर्णयामुळे उलट त्यांची ताकद आणखी वाढली आहे. त्यांनी त्यांच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘ट्रुथ सोशल’वर लिहिले की, सर्वोच्च न्यायालयाने नकळत त्यांना पूर्वीपेक्षा जास्त अधिकार दिले आहेत.

ट्रम्प म्हणाले की, ते काही काळ ‘सुप्रीम कोर्ट’ लहान अक्षरात लिहितील, कारण त्यांना या निर्णयाबद्दल आदर राहिलेला नाही. त्यांनी या निर्णयाला मूर्खपणाचा आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर फूट पाडणारा म्हटले.

तरीही ट्रम्प यांचे म्हणणे आहे की, या निर्णयामुळे हे स्पष्ट झाले आहे की ते इतर कायद्यांनुसार शुल्क (टॅरिफ) लावण्याच्या त्यांच्या अधिकाराचा अधिक वापर करू शकतात. न्यायालयाने उर्वरित शुल्कांना (टॅरिफ) कायदेशीररीत्या बळकट केले आहे आणि आता ते त्यांची अधिक कठोरपणे अंमलबजावणी करू शकतात.

ट्रम्प यांनी असेही सांगितले की, ते परवान्यासारख्या (लायसन्स) पद्धतींचा वापर करून देशांविरुद्ध कठोर पावले उचलू शकतात. त्यांनी दावा केला की न्यायालयाने इतर सर्व शुल्कांना (टॅरिफ) मंजुरी दिली आहे आणि अशा शुल्कांची संख्या खूप जास्त आहे.

वसूल केलेले शुल्क (टॅरिफ) परत मिळेल की नाही याची माहिती नाही

हा निर्णय सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाच्या तीन दिवसांपेक्षा जास्त वेळेनंतर लागू केला जात आहे. या तीन दिवसांत शुल्क (टॅरिफ) का वसूल केले जात होते, हे एजन्सीने सांगितले नाही. ज्या लोकांकडून पैसे घेतले गेले आहेत, त्यांना ते परत मिळतील की नाही, हे देखील स्पष्ट केले नाही.

हा आदेश फक्त IEEPA कायद्यांतर्गत लावलेल्या शुल्कांना (टॅरिफ) लागू होईल. तर, राष्ट्रीय सुरक्षेच्या नावाखाली ‘कलम 232’ अंतर्गत आणि अनुचित व्यापार प्रकरणांच्या ‘कलम 301’ अंतर्गत लावलेले शुल्क (टॅरिफ) सुरूच राहतील आणि या निर्णयाचा त्यांच्यावर कोणताही परिणाम होणार नाही.

CBP ने सांगितले आहे की ते व्यापाराशी संबंधित लोकांना पुढील माहिती अधिकृत संदेशांद्वारे देत राहील.

कॉम्रेड अंजलीताई महाबळेश्वरकर यांचे निधन:’लाल सलाम’च्या घोषणेत अखेरचा निरोप; मरणोत्तर नेत्रदानाचा आदर्श

0

सातारा -सातारा नगरपालिकेच्या माजी नगरसेविका व मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या ज्येष्ठ नेत्या कॉ. अंजलीताई महाबळेश्वरकर (89) यांचे रविवारी रात्री पुणे येथे दुःखद निधन झाले. कॉ. अंजलीताई महाबळेश्वरकर या त्यांची कन्या गौरी देशपांडे महाबळेश्वरकर यांच्याकडे पुणे येथे अलीकडेच राहायला गेल्या होत्या. माकपचे ज्येष्ठ नेते कॉ. प्रभाकर महाबळेश्वरकर यांच्या त्या पत्नी होत्या.

त्यांच्या पार्थिवावर सातारा येथे आज सकाळी कैलास स्मशानभूमी, संगम माहुली येथे गॅस दाहिनीमध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले. कोणतेही धार्मिक विधी करण्यात आलेले नसून मरणोत्तर त्यांनी नेत्रदान केले होते. त्यांचे पार्थिव उचलताना व माहुली येथे ‘कॉम्रेड अंजलीताई महाबळेश्वर को लाल सलाम’ अशा घोषणांनी परिसर दुमदुमून गेला होता. त्यांच्या पश्चात दोन नातू जावई एक विवाहित मुलगी गौरी असा परिवार आहे.

त्यांच्या निधनाबद्दल अनेकांनी शोक व्यक्त केला आहे. सातारचे नगराध्यक्ष अमोल मोहिते, माजी नगराध्यक्ष डॉ. अच्युत गोडबोले, माजी उपनगराध्यक्ष व विद्यमान नगरसेवक शंकर माळवदे व इतर अनेकांनी अंत्यदर्शन घेतले. मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे राष्ट्रीय नेते अशोक ढवळे यांनी त्रिपुरा इथून शोक संदेश पाठवला व कॉम्रेड अंजलीताई महाबळेश्वरकर यांच्याबरोबरच्या व त्यांच्या चळवळीच्या अनेक आठवणींना उजाळा दिला.

मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष व जनवादी महिला संघटना यांना गेल्या महिन्यातच त्यांनी प्रत्येकी एक एक लाख रुपये देणगी दिली होती. सातारा नगर परिषदेच्या राजकारणात या एकमेव विरोधी पक्षनेत्या त्या कालावधीत होत्या आणि आपल्या म्हणण्याशी व तत्वांशी त्या नेहमीच आग्रही राहिल्या. जनवादी महिला संघटना, अंगणवाडी कर्मचारी संघटना, घरेलू कामगार संघटना, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष यांच्याशी त्या नेहमीच सक्रिय राहिल्या होत्या. अगदी अलीकडेच त्यांना मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या नेत्या वृंदा करात, मरियम बूटवाला ढवळे, अशोक ढवळे हे भेटून गेले होते व प्रकृतीची चौकशी केली होती.

शिक्षणाचा वारसा जपत माजी विद्यार्थ्यांची आजी विद्यार्थ्यांना शैक्षणिक भेट

कर्मवीर भाऊसाहेब हिरे हायस्कूलच्या माजी विद्यार्थ्यांचा आनंद मेळा उत्साहात

पुणे : शाळेच्या आठवणींनी ओथंबलेले क्षण, मैत्रीचा जिव्हाळा आणि कृतज्ञतेची भावना घेऊन कर्मवीर भाऊसाहेब हिरे हायस्कूलच्या माजी विद्यार्थ्यांनी पुन्हा एकदा आपल्या शाळेच्या अंगणात पाऊल ठेवत आनंद मेळ्याचे आयोजन केले. शिक्षणाचा वारसा पुढे नेत माजी विद्यार्थ्यांनी आजी विद्यार्थ्यांना वही, पेन, पेन्सिल व विविध शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्याकरिता दिंडी काढली. यासोबतच शाळेच्या विकासासाठी १ लाख रुपयांची देणगी देत संस्थेबद्दलची आपली कृतज्ञता व्यक्त केली.

अखिल भारतीय मराठी शिक्षण परिषदेच्या पर्वती येथील शाळेत हा कार्यक्रम उत्साहात पार पडला. कार्यक्रमासाठी प्रमिला ताई गायकवाड, अजय आबा पाटील, मुख्याध्यापक माने सर व माजी मुख्याध्यापक संजय भैलुमे सर यांनी मार्गदर्शन केले. तसेच बहुजन मुलांसाठी शिक्षणाची दारे खुली करणारे कर्मवीर भाऊसाहेब हिरे आणि उत्तमराव पाटील यांना रांगोळीच्या माध्यमातून चलचित्र साकारून अनोखी श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. हा संपूर्ण उपक्रम हिरे हायस्कूल माजी विद्यार्थी संघ यांच्या पुढाकाराने आयोजित करण्यात आला.

शाळेच्या प्रार्थनेने कार्यक्रमाची सुरुवात झाली. वर्गातील तासांत शिक्षकांशी गप्पा मारत जुन्या आठवणींना उजाळा देण्यात आला. शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा मानपत्र देऊन सन्मान करण्यात आला. मधल्या सुट्टीनंतर मैदानावर कबड्डी, खो-खो, लंगडी अशा खेळांनी वातावरणात उत्साहाची भर पडली आणि माजी विद्यार्थ्यांनी आपल्या सुवर्णकाळाचा पुन्हा एकदा अनुभव घेतला. शिक्षणाबद्दलची निष्ठा, शिक्षकांविषयी आदर आणि समाजाप्रती बांधिलकी यांचे सुंदर दर्शन या आनंद मेळ्यातून घडले.