पुणे, ता. 23 : आगामी पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर मान्सूनपूर्व कामांना गती देण्यासाठी सर्व संबंधित घटकांची तातडीने बैठक घ्यावी, आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेचा आढावा घ्यावा, प्रभाग आणि क्षेत्रीय स्तरावर आपत्ती व्यवस्थापन टीमचे सूक्ष्म नियोजन करावे, असे आदेश महापौर मंजूषा नागपुरे यांनी मंगळवारी प्रशासनाला दिले.
पूर व्यवस्थापनासाठी अतिरिक्त मनुष्यबळ पुरवावे, आपत्ती निवारणासाठी प्रभागस्तरीय टीम तयार करावी व त्यांना ‘एनडीआरएफ’ मार्फत प्रशिक्षण द्यावे, अशी सूचनाही त्यांनी केली.
महापौर नागपुरे यांनी मंगळवारी आपत्ती व्यवस्थापन आणि पावसाळापूर्व कामांसंदर्भात बैठक घेतली. या वेळी स्थायी समितीचे अध्यक्ष श्रीनाथ भिमाले, विरोधी पक्षनेते ॲड. नीलेश निकम, आयुक्त नवलकिशोर राम, उपायुक्त माधव जगताप व ज्ञानेश्वर खंडारे तसेच अधिकारी उपस्थित होते.
या बैठकीत महापौरांनी महापालिकेने आतापर्यंत पाणी साचणारी व पूरस्थिती ओढवणाऱ्या ठिकाणी (क्रॉनिक स्पॉट्स) पालिकेने केलेल्या कामाचा आढावा घेत सूचना केल्या.राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन निधीतून होत असलेली कामे वेळेत पूर्ण करण्याची सूचना देत नागपुरे म्हणाल्या,‘ पावसाळा काही महिन्यांवर येऊन ठेपला असून पुण्यात पूरस्थिती ओढावत असल्याने प्रशासनाची तयारी असणे आवश्यक आहे. यासाठी महापालिका, जलसंपदा विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग, महामेट्रो, महावितरण, पीएमआरडीए, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, कॅन्टोन्मेंट बोर्ड यांची तातडीने एकत्रित बैठक घ्यावी.
नागपुरे म्हणाल्या, “ओढे, नाल्यांची सफाई, कल्व्हर्टची दुरुस्ती व रिटेनिंग वॉलची कामे वेळेपूर्वी पूर्ण करावीत. गरजेनुसार पावसाळी वाहिन्यांंच्या आराखड्यात सुधारणा करावी. नाल्यांचे मॅपिंग पूर्ण करावे. धोकादायक वाडे, इमारतींचे सर्वेक्षण करून नोटीसा देण्यात याव्यात. झाडांच्या धोकादायक फांद्या तातडीने काढून घ्याव्यात,‘अलिकडे कमी वेळेत अधिक पाऊस होऊन पूरस्थिती ओढवण्याचे प्रमाण वाढले आहे त्यामुळे जलद प्रतिसाद तुकड्यांची (क्यूआरटी) नियुक्ती करावी, गरजेप्रमाणे सेवकसंख्या वाढवावी, शहरासह समाविष्ट गावातील पूर व्यवस्थापनासाठी अधिकचे मनुष्यबळ द्यावे, प्रभावी आपत्ती व्यवस्थापनासाठी कर्मचाऱ्यांना राष्ट्रीय आपत्ती निवारण दलामार्फत (एनडीआरएफ) प्रशिक्षण द्यावे, अशी सूचनाही महापौर नागपुरे यांनी केली.
महापौरांनी प्रशासनाला केलेल्या सूचना
प्रभाग आणि क्षेत्रीय कार्यालय स्तरावर आपत्ती व्यवस्थापनाचे नियोजन करा
क्विक रिस्पॉन्स टीम अद्यायावत करा
पूरप्रवण भागात नागरी संरक्षण दलामार्फत नागरिकांना प्रशिक्षण द्या. – आपत्कालीन निवारा केंद्रांची व्यवस्था करा – पूरप्रवण भागामध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवा
मुंबई-भाजप पदाधिकारी तुषार दामगुडे यांनी काँग्रेस प्रवक्ते हनुमंत पवार यांना करण्यात आलेल्या मारहाणीची आपल्याला कोणतीही खंत वाटत नसल्याचे स्पष्ट केले आहे. हनुमंत पवार यांनी मला यापूर्वी धमकी दिली होती. काल मी त्यांना त्यांच्याच भाषेत प्रत्युत्तर दिले, असे ते म्हणालेत.
तुषार दामगुडे व हनुमंत पवार सोमवारी एका मराठी वृत्तवाहिनीवर राजकीय विश्लेषक म्हणून चर्चा करण्यासाठी गेले होते. तेथून परत आल्यानंतर दामगुडे यांनी आपल्या सहकाऱ्यांसह हनुमंत पवार यांना मारहाण केली. या घटनेचे राज्याच्या राजकीय वर्तुळात तीव्र पडसाद उमटत असताना दामगुडे यांनी आपल्याला आपल्या कृत्याचा कोणताही पश्चाताप होत नसल्याचे स्पष्ट केले. ते मंगळवारी एका वृत्तवाहिनीशी बोलताना म्हणाले, काँग्रेस प्रवक्ते हनुमंत पवार यांनी मला पूर्वी धमकी दिली होती. एका डिबेट शोमध्ये त्यांनी मला जातिवाचक शिवीगाळही केली होती. त्या घटनेची पुनरावृ्त्ती काल पुन्हा घडली. त्यामुळे मी त्यांना त्यांच्याच भाषेत प्रत्युत्तर दिले.
हनुमंत पवार ज्या विचारसरणीतून येतात ते पाहता त्यांना ठोस प्रत्युत्तर देण्याची गरज होती. काँग्रेस पक्षाच्या काळात देशात अनेक गंभीर घटना घडल्या होत्या. आपण त्याची नोंद घ्यायला हवी. चर्चासत्रात हनुमंत पवार यांनी मला उद्देशून तू पेशव्यांची पैदास आहेस, तू नाना फडणीस यांची पैदास आहेत. मी छत्रपती शिवाजी महाराज यांचा अनुयायी आहे अशा स्वरुपाचे विधान केले होते, असे ते म्हणाले. मी नक्षलवादी भागात काम करतो. त्यामुळे माझ्याकडे कायदेशीर परवान्यासह बंदूक आहे. ही बंदूक स्वतःच्या सुरक्षेसाठी बाळगणे मला गरजेचे वाटते. या प्रकरणी पोलिसांत गुन्हा दाखल झाला असून, ते या प्रकरणी योग्य तो तपास करतील असा मला विश्वास आहे. मी माझे शस्त्र पोलिसांकडे सोपवले आहे, असेही तुषार दामगुडे यांनी यावेळी बोलताना सांगितले आहे.
दुसरीकडे, काँग्रेस प्रवक्ते हनुमंत पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे या प्रकरणी योग्य ती कारवाई करण्याची मागणी केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून आम्हाला मोठ्या अपेक्षा होत्या. पण त्यांनी आपल्या मातृसंघटनेच्या संस्कारांना जागून गृहमंत्रीपदाच्या कर्तव्याकडे दुर्लक्ष केलेहे पाहून मला खंत वाटते. त्यांच्याकडून आम्हाला आरोपींवर कठोर कारवाईची अपेक्षा आहे. पण पोलिसांनी त्यांना केवळ ताब्यात घेऊन नोटीस बजावून सोडून दिले. ही गंभीर बाब आहे. अशा प्रकरणांत संबंधितांवर कठोर शिक्षा होणे आवश्यक असते, असे पवार म्हणाले.
तुषार दामगुडेंना स्वतःच्या संरक्षणासाठी पिस्तूल देण्यात आले आहे की, इतरांना दमदाटी करण्यासाठी दिले आहे याचीही या प्रकरणी चौकशी झाली पाहिजे. आमचा जीव गेल्यानंतर किंवा आमच्या कुटुंबीयांवर संकट ओढावल्यानंतरच पोलिस या प्रकरणी कारवाई करणार का? असा सवालही हनुमंत पवार यांनी या प्रकरणी उपस्थित केला आहे.
यश चोपड़ा फाउंडेशन (YCF), ही यश राज फिल्म्स ची सामाजिक बांधिलकी जपणारी संस्था, साथी प्रोग्राम 2026 च्या शुभारंभाची घोषणा करत आहे. हा वर्षभर चालणारा कल्याणकारी उपक्रम असून, चित्रपटसृष्टीतील कामगार आणि त्यांच्या कुटुंबियांना सातत्यपूर्ण व संरचित सहाय्य देण्याचा उद्देश यामागे आहे. एकदाच दिल्या जाणाऱ्या मदतीपलीकडे जाऊन, मूलभूत गरजा पूर्ण करणे आणि जीवनमान उंचावणे हा या कार्यक्रमाचा केंद्रबिंदू आहे.
2026 मध्ये हा कार्यक्रम नोंदणीकृत चित्रपटसृष्टीतील कामगार आणि त्यांच्या कुटुंबीयांना सहाय्य देईल. यामध्ये अन्नसुरक्षा बळकट करण्यासाठी मासिक घरगुती मदत, औषधे व वैद्यकीय तपासण्या यांसह आरोग्यसेवा सहाय्य, मुलांच्या शिक्षण व शालेय गरजांसाठी मदत, तसेच वार्षिक मूळगावी जाण्यासाठी आवश्यक प्रवास सहाय्य यांचा समावेश आहे. 60 वर्षे व त्यापुढील वयाचे निवृत्त चित्रपट कामगार आणि दिव्यांग व्यक्तींवर विशेष भर देण्यात आला आहे, कारण त्यांच्या आरोग्यविषयक गरजा अधिक असून उत्पन्नाची साधने मर्यादित असतात.
साथी प्रोग्राम साठी पात्रतेमध्ये मान्यताप्राप्त संघटनांमध्ये नोंदणीकृत सक्रिय चित्रपट कामगार, कमी उत्पन्न असलेली कुटुंबे, शाळा किंवा महाविद्यालयात शिक्षण घेणारी मुले असलेली कुटुंबे, तसेच सातत्याने वैद्यकीय उपचारांची गरज असलेले ज्येष्ठ कामगार यांचा समावेश आहे.
साथी प्रोग्राम 2026 अंतर्गत वर्षभराच्या सहाय्याला अधिक बळकटी देण्यासाठी काही महत्त्वपूर्ण सुधारणा करण्यात आल्या आहेत. यामध्ये प्रत्येक लाभार्थ्यासाठी वार्षिक सहाय्य रकमेतील वाढ, वैयक्तिक गरजांनुसार मदत देण्यासाठी लवचिक लाभ संरचना, तपासणी व उपचारांसाठी आरोग्यसेवांना अधिक प्राधान्य, तसेच लाभ सहज मिळावेत यासाठी सुलभ डिजिटल वितरण प्रणाली यांचा समावेश आहे.
साथी प्रोग्राम 2026 च्या माध्यमातून यश चोप्रा फाउंडेशन भारतीय सिनेमाच्या पडद्यामागील कणा असलेल्या कामगार आणि त्यांच्या कुटुंबियांप्रती आपली बांधिलकी पुन्हा अधोरेखित करत आहे, आणि त्यांना सन्मानपूर्वक व सातत्यपूर्ण सहाय्य देत आहे.
साथी प्रोग्राम 2026 विषयी अधिक माहितीसाठी yashrajfilms.com/ycf या संकेतस्थळाला भेट द्या.
पुणे : जागतिक मराठी भाषा गौरव दिनाच्या निमित्ताने गुडलक हॉटेल परिसरातील ऐतिहासिक ‘कलाकार कट्टा’ला नटसम्राट डॉ. श्रीराम लागू यांचे नाव देण्यात यावे, अशी मागणी राष्ट्रवादी चित्रपट व सांस्कृतिक विभागाचे प्रदेशाध्यक्ष बाबासाहेब पाटील यांनी महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांच्याकडे केली आहे.यावेळी राष्ट्रवादी चित्रपट व सांस्कृतिक विभागाचे प्रदेशाध्यक्ष बाबासाहेब पाटील, माजी नगरसेविका रूपाली ठोंबरे पाटील, नगरसेविका प्रिया गदादे तसेच राष्ट्रवादी सांस्कृतिक विभागाचे शहराध्यक्ष अशोक जाधव उपस्थित होते. राष्ट्रवादी चित्रपट व सांस्कृतिक विभाग प्रदेशाध्यक्ष बाबासाहेब पाटील म्हणाले कि आम्ही पुणे महानगरपालिकेचे आयुक्त, महापौर, सभागृहनेते तसेच विरोधी पक्षनेते यांना स्वतंत्र निवेदन सादर केले असून, जागतिक मराठी भाषा गौरव दिनाच्या औचित्य साधून या मागणीवर सकारात्मक आणि तातडीने निर्णय घ्यावा, अशी विनंती केली आहे.गुडलक हॉटेल परिसर आणि आजचा ‘कलाकार कट्टा’ हा केवळ एक बसण्याचा कट्टा नसून मराठी रंगभूमी, साहित्य आणि सांस्कृतिक चळवळींचा साक्षीदार आहे. फर्ग्युसन कॉलेज रोड परिसर हा शिक्षण आणि कलेचा केंद्रबिंदू राहिला असून, अनेक दिग्गज व्यक्तिमत्त्वांच्या कर्तृत्वाने हा भाग समृद्ध झाला आहे.समस्त कलाप्रेमी पुणेकरांना माहिती आहे की, याच ठिकाणी डॉ. श्रीराम लागू ‘पीडीए’च्या नाटकांच्या तालमी संपल्यानंतर उशिरापर्यंत तरुण रंगकर्मींसोबत कला, समाज आणि विचारांवर चर्चा करत असत. त्यांच्या सखोल व्यासंगातून आणि जागतिक दृष्टिकोनातून मराठी आधुनिक रंगभूमीला नवी दिशा मिळाली. त्याच सांस्कृतिक परिघात डॉक्टर जब्बार पटेल आणि डॉक्टर मोहन आगाशे यांसारखी मान्यवर मंडळी सक्रिय होती. त्यामुळे या ठिकाणाचे ऐतिहासिक आणि सांस्कृतिक महत्त्व अधोरेखित होते. मराठी भाषा, मराठी रंगभूमी आणि मराठी संस्कृतीचा जागतिक स्तरावर गौरव करणाऱ्या डॉ. लागू यांच्या स्मरणार्थ कलाकार कट्ट्याचे नामकरण करणे, हीच जागतिक मराठी भाषा गौरव दिनाला खरी अभिवादन ठरेल. यामुळे नव्या पिढीला प्रेरणा मिळेल आणि पुण्याच्या सांस्कृतिक इतिहासाला योग्य तो मान मिळेल. राष्ट्रवादी चित्रपट व सांस्कृतिक विभागाच्या वतीने केलेली ही मागणी गांभीर्याने विचारात घेऊन तातडीने मान्यता द्यावी, अन्यथा व्यापक लोकचळवळ उभारली जाईल, असा इशाराही देण्यात आला आहे.
मुंबई-उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघातातील निधनानंतर आता या प्रकरणाला नवे वळण लागले आहे. “अजित दादांचा अपघात हा अपघात नसून घातपात आहे,” असा खळबळजनक दावा त्यांचे पुतणे आणि आमदार रोहित पवार यांनी केला असून, या तपासातील ‘व्हीसीआर’ (VSR) कंपनीच्या रेकॉर्डबाबत त्यांनी अत्यंत धक्कादायक माहिती समोर आणली आहे. विमानाच्या रेकॉर्डमध्ये मोठी बनवाबनवी सुरू असून यंत्रणांची एकमेकांशी मिलीभगत असल्याचा आरोप रोहित पवार यांनी सोशल मीडिया पोस्टद्वारे केला आहे.
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा गत २८ जानेवारी रोजी बारामतीजवळ विमान अपघातात निधन झाले होते. या दुर्घटनेत अजित पवारांसह पाच जणांचा मृत्यू झाला होता. या अपघात प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी चौकशीची मागणी लावून धरली आहे. आता याच चौकशीच्या प्रक्रियेवर त्यांनी गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.
स्व.अजित दादांच्या अपघातातील विमानाच्या चौकशीच्या निमित्ताने रोहित सिंगला काल पायलट म्हणून चौकशीसाठी बोलवण्यात आल्याची माहिती मिळत असून काल रोहित सिंग देशात आला होता. तसेच VSR कडे विमानाच्या ५००० तासांपैकी केवळ १८०० ते २००० तासांचा रेकॉर्ड उपलब्ध असून उर्वरित ३००० तासांचे…
अजित दादांच्या अपघातातील विमानाच्या चौकशीच्या निमित्ताने रोहित सिंगला काल पायलट म्हणून चौकशीसाठी बोलवण्यात आल्याची माहिती मिळत असून काल रोहित सिंग देशात आला होता. तसेच VSR कडे विमानाच्या ५००० तासांपैकी केवळ १८०० ते २००० तासांचा रेकॉर्ड उपलब्ध असून उर्वरित ३००० तासांचे रेकॉर्डस उपलब्धच नसल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. या मिसिंग रेकॉर्डची हेराफेरी, बनवाबनवी VSR ला करता यावी यासाठी चौकशी जाणूनबुजून लांबवली जात आहे का? असा प्रश्न रोहित पवार यांनी उपस्थित केला आहे. महाराष्ट्राचा लोकनेता गेला असताना अपघाताला जबाबदार कंपनीच्या मालकाला केवळ पायलट म्हणून चौकशीसाठी बोलावले जात असेल तर याचा अर्थ काय घ्यायचा ? दादांच्या अपघाताच्या गुन्हेगारी अँगलची चौकशी CID करत असताना VSR चा मालक भारतात आला असेल तर DGCA ने CID ला कळवणे आवश्यक का समजले नाही? अशी विचारणाही रोहित पवार यांनी केली.
DGCA आणि VSR ची मिलीभगत, यंत्रणांचा एकमेकांशी असलेला विसंवाद बघता, अजित दादांची यांच्या लेखी किती किंमत आहे हे कळून चुकले ….केंद्र आणि राज्य सरकार थोडे गांभीर्य दाखवेल, अशी अपेक्षाही रोहित पवार यांनी व्यक्त केली. यापूर्वीही रोहित पवार यांनी पत्रकार परिषदा घेऊन ब्लॅक बॉक्सची माहिती, अपघातग्रस्त विमानाच्या कंपनीच्या मालकाची माहिती, त्यांना असलेले कथित राजकीय वरदहस्त याबाबत त्यांनी सातत्याने चर्चा केली आहे. त्यांच्या मते या विमानाची एकूण क्षमता ५ हजार तास उडण्याची होती. जेव्हा अजित पवारांना हे विमान देण्यात आले, तेव्हा त्याची क्षमता संपत आली होती. केवळ १०-१५ तास शिल्लक होते. त्यामुळे असे विमान अजित पवारांना दिलेच नव्हते पाहिजे. तसेच हे विमान ८ हजार तासांहून अधिक काळ उडवले गेल्याची शक्यता असल्याचे रोहित पवारांनी वर्तवली होती. त्यातच, आता त्याचा रेकॉर्डच उपलब्ध नसल्याचा दावा त्यांनी केला आहे.
अमृतसरच्या गुरू महालात शिख धर्मीयांचे सहावे गुरू हरगोबिंदजी आणि माता नानकी देवी यांच्यापोटी 1 एप्रिल 1678 रोजी तेग बहादुर यांचा जन्म झाला. त्यांचे पालनपोषण होताना गुरू पुत्र झाल्याने त्यांना अनेक सुखसुविधा होत्या तशीच शिख गुरुंच्या त्यागाची, समर्पणाची आणि समाजसेवेचीही परंपरा होती ते पंजाबमध्ये अमृतसरमध्येच वाढले. ते दीर्घकाळ अध्ययन, चिंतन, मनन करित मात्र त्याचवेळी ते उत्तम सैनिक आणि कुशल योद्धेही बनले. त्यांनी अनेक प्रसंगी युद्धात शत्रुसैन्यात घुसून शत्रुसैन्याचा पाडाव केला मात्र त्यांना युद्धामुळे येणारे दुख: आणि त्रास याची कल्पना आल्यावर त्यांना युद्धाबद्दल चीड निर्माण झाली. सततची युद्धे किती अर्थहीन आहेत याबद्दल त्यांनी त्यांच्या बाणीमध्येही लिहून ठेवले आहे.
गुरू तेगबहादुर स्वधर्माचे निश्चितच अभिमानी होते मात्र ते कोणत्याही धर्माचा द्वेष करीत नव्हते. इस्लामचे नाव घेणारे इस्लामचा मूळ संदेश सत्तेच्या स्वार्थापोटी बाजुला ठेवून अत्याचार करित आहेत ही त्यांची भावना होती. धर्माच्या नावावर अत्याचार कोणीच करू नये. ही त्यांची भूमिका त्यांनी वेळोवेळी मांडली. पंजाबमध्ये आनंदपूर साहिब या नव्या गावाचे निर्माण त्यांनी केले. आज या गावाला जगभरात महत्त्व प्राप्त झाले आहे.
तेग बहादुरजी यांना हिंद की चादर असेही म्हटले जाते. धार्मिक स्वातंत्र्य आणि सौहार्द या तत्वांकरिता महान गुरू तेग बहादुर साहिब यांनी आपल्या प्राणांचे बलिदान केले. गुरू तेग बहादुरजी मानवाधिकारासाठी बलिदान करणारे जगातील पहिले हुतात्मा वर्णन कॅलिफोर्निया विद्यापीठातील जगातील विविध धर्मांचे अभ्यास करणारे जगप्रसिद्ध इतिहासकार डॉ. नोएल किंग यांनी केले आहे.
24 नोव्हेंबर 1675 या दिवशी औरंगजेबाच्या आज्ञेने त्यांच्या मारेकऱ्यांनी काश्मिरी पंडीतांवर होणाऱ्या अत्याचाराबाबत जाब विचारायला आलेल्या आणि त्यांच्या धर्मांतराच्या मागणीला विरोध करणाऱ्या गुरू तेग बहादुरजींचा दिल्लीच्या चांदणी चौकात अत्यंत क्रूरपणे शिरच्छेद केला. असे म्हणतात त्यांना औरंगजेबाने चमत्कार करून दाखवण्यास सांगितले त्यावेळी त्यांनी आपल्या गळ्यात एक चिठ्ठी लावली जेव्हा त्यांचा शिरच्छेद करण्यात आला आणि ती चिठ्ठी उघडण्यात आली त्यावेळी त्यात लिहिले होते, ‘शीश दिया, सर नहीं ’ म्हणजे मी बलिदान केले मात्र तत्वांशी तडजोड केली नाही.
काश्मीरात त्या काळातही काश्मिरी पंडीत महत्त्वाच्या पदांवर होते आणि बौद्धिक नेतृत्व करीत होते त्यामुळे त्यांच्यावर जबरदस्ती केली, अत्याचार केले, त्यांचे धर्मांतर केले तर इतरांवर जरब बसेल आणि धर्मांतर करणे सोपे जाईल असे मोघलांना वाटत असल्याने काश्मिरी पंडितांवर त्यांनी जबरदस्ती सुरू केली शिखांचे नववे गुरू तेव्हा दिल्लीच्या सत्तेला आव्हान देऊ शकत होते म्हणूनच यातून आपल्याला केवळ गुरू तेग बहादुरजींचा वाचवू शकतात या आशेने काश्मिरी पंडीत गुरुजींकडे आले. त्यांनी गुरुजींकडे मदतीची मागणी केली त्यावेळी नंतर शिखांचे दहावे गुरू झालेले गोबिंदसिंहही तिथे होते. गुरूजींनी कोवळ्या गोबिंद सिंहजीच्या काश्मिरी पंडितांसाठी तुमच्या शिवाय या बलिदानाला कोण योग्य आहे या प्रश्नावर जे उत्तर दिले आणि त्याची किंमत मोजली त्यातूनच गुरू तेगबहादुरजींनी आनंदाने मृत्यूला कवटाळले. त्याचा परिणाम असा झाला की उत्तरेत औरंगजेबाच्या सत्तेला हादरे बसायला सुरुवात झाली. शिखांनी सर्वत्र या क्रौर्याविरुद्ध अतिशय जबर प्रतिक्रिया व्यक्त केली आणि पंडितांवरच्या अत्याचारात खूप कमी आली तर दूर झालेले हिंदू-शिख एकत्र आले आणि एका अथनि काश्मिरी पंडीत समाजाला पुर्नजीवन मिळाले. त्याचवेळी उपखंडात असहिष्णूतेच्या लाटेला ओहोटी लागली आणि लोकांच्या मनात इतर धर्मात आदरभाव पून्हा रूजला.
सर्बप्रीत सिंह नावाचे प्रसिद्ध इतिहासकार आपल्या स्टोरी ऑफ द सिख्स मध्ये लिहितात, गुरूजींना 8 नोव्हेंबर 1665 ला जेव्हा अटक करून औरंगजेबासमोर आणण्यात आले तेव्हा आपली बाजू मांडतांना ते म्हणाले, माझा धर्म भलेही हिंदू नाही मी वेदांची श्रेष्ठता आणि मूर्तीपूजा मान्य करत नाही मात्र हिंदूंचा सन्मानाने जगण्याचा आणि धर्माचरण करण्याचा अधिकार मला मान्य आहे आणि त्यासाठी मी संघर्ष करेन तर बॅ.न.वि गाडगीळ शिखांचा इतिहास या आपल्या ग्रंथात लिहितात, “तेगबहादुर यांच्या बलिदानाने जे औरंगजेबाला होईल, असे वाटले होते ते झाले नाही. उलट काही वर्षे मोगल अंमलाविरुद्ध स्तब्ध असलेले लोकमत अधिक प्रबल आणि प्रक्षुब्ध झाले. या बलिदानाने केवळ शिखांतच नव्हे, तर सर्व हिंदू जाती-जमातींत एक प्रक्षोभकारक भावना निर्माण झाली.” सामान्यपणे काही लोक इच्छा असूनही प्रतिकार करू शकत नाही. काही प्रतिकाराला सुरूवात करतात आणि अडचणी येताच स्वीकारलेला मार्ग अव्यवहार्य आहे असे म्हणून प्रतिकार थांबवतात तथापि गुरू तेग बहादुरजींसारख्या काही व्यक्ती अशा असतात की, मिळालेली प्रेरणा आणि केलेल्या दृढनिश्चयांशी निष्ठावंत राहून अखेरपर्यंत, शेवटच्या श्वासापर्यंत, शेवटच्या रक्ताच्या थेंबापर्यंत प्रतिकार करत राहतात.
हिंदूंच्या अंधश्रद्धा आणि अवडंबारावर प्रहार करतानाच पारंपारिक मान्यतापेक्षा वेगळी मते असतानाही इतकेच काय मूर्तीपुजेला विरोध असूनही गुरूजींनी काश्मिरी पंडितांच्या जानवे आणि टिळ्यासाठी हसत हसत बलिदान केले असे त्याचे वर्णन केले जाते. सदाचरणाच्या संदर्भात गुरू तेग बहादुर एक नीडर योद्धे होते त्याचबरोबर एक महान, विद्वान आध्यात्मिक नेते व कवि होते. त्यांची 115 कवणे ही गुरू ग्रंथ साहिब मध्ये समाविष्ट आहेत. दुर्बल, दुर्दैवी लोकांचे संरक्षक असलेले गुरू तेग बहादुर तोफांच्या तंत्रामध्ये कुशल म्हणून प्रसिद्ध होते. आधुनिक जगाने मानवाधिकाराचा मुद्दा मोठ्या प्रमाणात उचलला आहे मात्र याच्या कितीतरी आधी गुरू तेग बहादुरजी यांनी याचे उच्चारण केले होते. याचा आपल्याला अभिमान वाटायला हवा. शिवाय, आजकाल उपासना स्वातंत्र्य आणि विविध धर्म प्रणालींमधील संवाद यांची चर्चा सुरू असताना गुरू तेग बहादुर यांचे स्मरण अतिशय समायोचित आहेत.
गुरू तेग बहादुर यांची आसाम यात्रेबाबत एक महत्त्वाची आठवण आहे. त्याही काळात तेथे आदिवासी जमाती आणि राजसैन्यामध्ये संघर्ष सुरू झाला होता त्यावेळी स्वत: आसाममध्ये गेले होते आणि त्यांनी तेथील आदिवासी जमाती आणि राजसैन्य यांच्यामध्ये शांततेचे समझौते करण्याकरिता त्यांनी यशस्वी वाटाघाटी केल्या म्हणून त्यांना आजही तेथे शांततेचे दूत म्हणून ओळखले जाते. त्यांचेच नाव घेऊन तेथेच विविध जाती जमातींमध्ये पून्हा संघर्ष निर्माण करणे देशाला परवडणारे नाही. इतकेच काय आजच्या अशांत आणि हिंसक होऊ पाहणाऱ्या जगाला गुरू तेग बहादुर यांच्या शांततेच्या संदेशाची पूर्वी कधीही नव्हती इतकी गरज निर्माण झाली आहे.
माजी राष्ट्रपती ग्यानी झैलसिंह एका ठिकाणी म्हणतात संसार का इतिहास ऐसे शहीदोंसे भरा पडा है, जिन्होने अपने सिध्दातोंकी खातीर अपना जीवन बलिदान कर दिया. अपने रक्तकी धारासे नए रास्ते उजागर किए। लेकिन गुरू तेग बहादुर की शहीदी अनोखी और बेमिसाल है। गुरूजींनी अत्याचार आणि उन्मादाला विरोध म्हणून बलिदान केले हे सांगताना ग्यानी झैलसिंग पुढे म्हणतात, यह बेझिझक कहा जा सकता है कि, अगर मुसलमानोंपर अत्याचार होते और उन्हें नमाज पढने या उपासनाके अधिकारसे वंचित किया जाता तो गुरूजी उनकी रक्षा के लिए भी सहर्ष अपनी जान दे देते।(संदर्भ एक बेमिसाल शहिदी महाराष्ट्र शासन, मुंबई 16 जानेवारी 1976 पृष्ठ 3 ) पुढे काय झाले याला इतिहास साक्षी आहे.
मानवाधिकाराचा प्रश्न जगभर ऐरणीवर आला असताना गुरू तेग बहादुरजी यांच्या 350व्या बलिदान वर्षाच्या ज्याला पंजाबमध्ये शहिदी पूरब म्हटले जाते ज्याप्रमाणे जगभर अनेक उपक्रम राबविले जात आहे. त्याचप्रमाणे सरहद संस्थेने विविध उपक्रमांचे आयोजन केले आहे पैकी एक म्हणजे जेथे त्यांनी बलिदान केले त्याच दिल्लीमध्ये फेब्रुवारी 2026 मध्ये दुसर्या विश्व पंजाबी साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. मानवाधिकार हीच या साहित्य संमेलनाची कल्पना आहे. याला जगभरातील लेखक व विचारवंत उपस्थित राहणार आहे. ही त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल असा विश्वास वाटतो.
यंदाचे वर्ष शीख धर्माचे नववे गुरू, गुरू तेग बहादुरजी यांचे 350 वे बलिदान वर्ष आहे. नानकशाही कॅलेंडरप्रमाणे 24 नोव्हेंबर हा दिवस दरवर्षी गुरू तेग बहादुरजींचा हुतात्मा दिवस म्हणून पाळला जातो. श्री गुरु तेग बहादुर साहिबजी यांच्या ३५० व्या शहीदी समागम शताब्दी वर्षानिमित्त या वर्षी केंद्रसरकार, पंजाब सरकार आणि महाराष्ट्र सरकार यासह देशातील सर्व मुख्य राज्य सरकारांनी यानिमित्त विविध उपक्रम राबविण्याचे ठरविले आहे. पंजाबमध्ये आनंदपूर साहिब येथे 15 नोव्हेंबर ते 24 नोव्हेंबर 2025 या काळात मोठ्या कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले होते. नागपूर, नांदेड येथे ‘हिंद-दी-चादर’ कार्यक्रमाचे यशस्वीपणे आयोजन करण्यात आले आहे. आता २८ फेब्रुवारी व १ मार्च २०२६ रोजी खारघर, नवी मुंबई येथे भव्य ‘हिंद-दी-चादर’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे; या कार्यक्रमाचा सर्व समाजातील नागरिकांनी सहभागी होवून संगतीचा लाभ घ्यावा.
पुणे, दि.२४: कृषी पुरस्कार प्रस्तावांची प्रक्रिया अधिक सुलभ, वेळबद्ध, पारदर्शक व प्रभावी करण्याच्या दृष्टीने कृषी विभागामार्फत देण्यात येणाऱ्या पुरस्काराचे प्रस्ताव ऑनलाईन स्वरूपात स्वीकारण्यासाठी स्वतंत्र संगणकीय प्रणाली विकसित करण्यात आली आहे. ही प्रणाली कृषी विभागाच्या https://krishi.maharashtra.gov.in संकेतस्थळावर कृषी पुरस्कार टॅब मध्ये उपलब्ध आहे. जास्तीत जास्त शेतकरी, संस्था, गटांनी पुरस्कारासाठीचे अर्ज ऑनलाईनरित्या सादर करावेत, असे आवाहन कृषी विभागामार्फत करण्यात आले आहे.
राज्यामध्ये दरवर्षी शेती व पूरक क्षेत्रात अतुलनीय व उल्लेखनीय कार्य करणाऱ्या शेतकरी, महिला, व्यक्ती तसेच संस्थांना महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागामार्फत विविध पुरस्कार देण्यात येतात. कृषी पुरस्कारांसाठी सन २०२५ पासूनचे अर्ज ऑनलाईन सादर करण्याची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. या पुरस्कारांमध्ये डॉ. पंजाबराव देशमुख कृषिरत्न, वसंतराव नाईक कृषिभूषण, जिजामाता कृषिभूषण, वसंतराव नाईक शेतीमित्र, वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी, उद्यानपंडित पुरस्कार, कृषिभूषण (सेंद्रिय शेती), युवा शेतकरी पुरस्कार तसेच कृषी विभागातील अधिकारी व कर्मचारी यांच्यासाठीचा पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील कृषी सेवारत्न पुरस्कार इत्यादींचा समावेश आहे.
संगणकीय प्रणालीच्या माध्यमातून पुरस्कार प्रस्ताव सादरीकरण, तपासणी, मूल्यांकन तसेच अहवाल निर्मिती ही संपूर्ण प्रक्रिया डिजिटल स्वरूपात राबविणे शक्य होणार आहे. यामुळे मानवी हस्तक्षेप कमी होऊन पारदर्शकता वाढणार असून पुरस्कार प्रक्रियेची कार्यक्षमता, विश्वासार्हता व परिणामकारकता अधिक बळकट होणार आहे. या प्रणालीमुळे शेतकऱ्यांना घरबसल्या अर्ज सादर करता येणार आहे. ऑफलाईन चार प्रतींमधील प्रस्ताव तयार करण्यासाठी लागणारा वेळ व खर्च वाचून प्रस्ताव सादरीकरण जलदगतीने होणार आहे. एकदाच अपलोड केलेली कागदपत्रे पुन्हा-पुन्हा देण्याची आवश्यकता नाही. अर्ज कुठल्या टप्प्यावर आहे याची माहिती शेतकऱ्यांना सहज मिळणार आहे. छपाई, झेरॉक्स, प्रवास व पोस्ट खर्च कमी होणार असून आर्थिक भार कमी होणार आहे, असेही कृषी विभागाने कळविले आहे.
पुणे, दि.२४: जल जीवन मोहिमे अंतर्गत पाणीपुरवठा योजनांची भौतिक पूर्णता पूर्ण करून मंजूर पाणीपुरवठा योजनांची कामे विहित कालावधीत पूर्ण करून भौतिकदृष्ट्या कार्यान्वित करण्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी निर्देश दिले.
जल जीवन मोहिमेची प्रभावी अंमलबजावणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित जिल्हा पाणी व स्वच्छता मिशनची बैठकीत ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषददेचे मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत वाघमारे यांच्यासह महाराष्ट्र जीवन प्राधिकरण भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणा आदी अधिकारी उपस्थित होते.
श्री. डुडी म्हणाले, हर घर नल योजनेअंतर्गत प्रत्येक लाभार्थी कुटुंबाला नळाद्वारे पिण्याच्या पाण्याचा पुरवठा सुनिश्चित करण्यावर भर देण्यात आला. प्रलंबित एफएचटीसी असलेल्या योजनांना प्राधान्य देण्यात यावे.ज्या योजनांमध्ये नळ जोडणी अद्याप प्रलंबित आहेत, त्या योजना तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्या.
योजनांची अंमलबजावणी करतांना उद्भवणारे जमीन विषयक प्रश्न,पाणीपुरवठा योजना राबविताना येणाऱ्या भू-संपादन व परवानगीसंबंधी अडचणी तात्काळ समन्वयाने सोडवून कार्यवाही करावी. याबाबत सर्व यंत्रणांनी परस्पर समन्वय राखून जल जीवन मोहिमेची उद्दिष्टे वेळेत पूर्ण करण्याबाबत ठोस कार्यवाही करण्याचे जिल्हाधिकारी श्री. डुडी यांनी निर्देश दिले.
पुणे, दि. 24: श्रीक्षेत्र देहू येथे ०३ ते ०५ मार्च २०२६ या कालावधीत संत तुकाराम महाराज बीज सोहळा २०२६ आयोजित करण्यात आला आहे. या कालावधीत महाराष्ट्रासह इतर राज्यांतून मोठ्या संख्येने भाविक व वारकरी उपस्थित राहणार असल्याने इंद्रायणी नदीचे पाणी वापराबाबत प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात आल्या आहेत. त्यानुसार जिल्हादंडाधिकारी जितेंद्र डुडी यांनी मुंबई पोलीस अधिनियम, १९५१ मधील कलम ३३ (१)(ड) अन्वये प्राप्त अधिकारांनुसार खालील आदेश लागू केले आहेत.
देहू येथील इंद्रायणी नदीच्या दोन्ही तीरांवरील पाणी पिण्यासाठी व स्वयंपाकासाठी वापरण्यास सक्त मनाई राहील.नदीचे पाणी पिण्यास वापरू नये. भाविकांनी सार्वजनिक पिण्याच्या पाण्याच्या नळांचा वापर करावा. नदीपात्रात कपडे धुणे किंवा पाणी दूषित होईल असे कोणतेही कृत्य करू नये.
या आदेशाचे उल्लंघन केल्यास मुंबई पोलीस अधिनियम, १९५१ च्या कलम १३१ अन्वये कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असेही आदेशात स्पष्ट केले आहे.
पुणे, दि. 24: श्रीक्षेत्र देहू येथे ०३ ते ०५ मार्च २०२६ या कालावधीत संत तुकाराम महाराज बीज सोहळा संपन्न होत आहे. या निमित्त राज्यासह परराज्यातून मोठ्या संख्येने भाविक व वारकरी उपस्थित राहणार असल्याने प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी जितेंद्र डूडी यांनी मुंबई पोलीस अधिनियम, १९५१ च्या कलम ३३(१)(ठ) अन्वये प्राप्त अधिकारानुसार पुढीलप्रमाणे आदेश जारी केले आहेत.
यात्रा कालावधीत देहू नगरपंचायत हद्दीतील सार्वजनिक रस्त्यावर व सार्वजनिक जागेत संसर्गजन्य रोग्यांनीयेऊ नये. तसेच संबंधित क्षेत्रात कोणताही संसर्गजन्य रुग्ण आढळल्यास देहू नगरपंचायतीने तयार केलेल्या शेडमध्ये त्यांना राहणे बंधनकारक राहील. 0000
पुणे -कोंढवा पोलीस ठाण्याकडून कोंढवा खुर्द येथे मरकजी बैतुल माल फाउंडेशन यांच्या सहकार्याने प्रतिवर्षाप्रमाणे पवित्र रमजान महिन्याच्या पाचव्या रोजा निमीत्त दावत ए इफ्तार चा सामाजिक सलोखा वृद्धींगत करणारा कार्यक्रम पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये पार पडला. या वेळेस पोलीस सह आयुक्त रंजनकुमार शर्मा, अपर पोलीस आयुक्त मनोज पाटील, पोलीस उपआयुक्त, परिमंडळ ०५, राजलक्ष्मी शिवणकर, पोलीस उप आयुक्त, विशेष शाखा, डॉ. संदिप भाजीभाकरे, पोलीस उपआयुक्त, वाहतुक शाखा हिम्मत जाधव, सहायक पोलीस आयुक्त, वानवडी विभाग नम्रता देसाई, तसेच बैतुल माल फाउंडेशनचे अल्ताफ मर्चट, आबीद सय्यद, हाजी तौसीफ शेख, कौसरबाग ट्रस्टचे अध्यक्ष सलीम शेख, मजहर मणियार, कौसरबाग मस्जिद मौलाना कारी अब्दुल्ला, जाहिदभाई शेख अध्यक्ष महाराष्ट्र अॅक्शन कमिटी, वसिमगाई बागवान, बासित शेख, नगरसेवक गफूर पठाण यांची प्रमुख उपस्थिती होती. याप्रसंगी कोढवा परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. या प्रसंगी पोलीस आयुक्त यांनी जमलेल्या नागरिकांसमोर केलेल्या भाषणात रमजान महिन्यामध्ये कोंढवा परिसरामध्ये नागरिकांना सायंकाळी उपवास सोडण्याकरीता मस्जिद परिसरात जाण्यासाठी वाहतुकीच्या अडचनींना सामोरे जावे लागु नये याकरीता पोलीस दलातर्फे जास्तीत जास्त सुरळीत वाहतुक ठेवण्याकडे आमचे अधिक लक्ष राहणार आहे.तसेच रमजान या पवित्र सणाच्य कालावधीमध्ये कोंढवा परिसरामध्ये जे गुन्हेगार प्रवृत्तीचे लोक आहेत आणि ते त्रास देत असतील त्यांची माहिती पोलीसांना दयावी त्यावर पोलीस दलाकडून अशा लोकांवर कठोर कारवाई करण्यात येईल अशी सुचना दिली आहे. रमजान या पवित्र सणामध्ये पोलीस कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी कटिबध्द असल्याबाबतचे ही त्यांनी सांगितले. तसेच युवकांमध्ये अंमली पदार्थाचे प्रमाण वाढत असून त्याबाबत त्यांनी चिंता व्यक्त केली असून अंमली पदार्थ शहरातून हद्दपार करण्याकरीता पोलीसांना सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे. सर्वोच्च न्यायलयाच्या आदेशाचे उल्लंघन होवू नये म्हणून नमाजकरीता होणा-या अजानकरीता कौसरबाग सोसायटी कमिटी यांचेकडून मोबाईलवर वापरता येणारे ऑनलाईन अजान अॅप्लीकेशन तयार केले. असून त्याचे उदघाटन पोलीस आयुक्त, पुणे शहर यांचे हस्ते करण्या आलेले आहे. हे अॅप वापरणेसाठी त्यांनी नागरीकांना आवाहन केले . या कार्यक्रमाचे आयोजन पोलीस उप आयुक्त, परिमंडळ ५ राजलक्ष्मी शिवणकर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक कुमार घाडगे, पोलीस निरीक्षक (गुन्हे), नवनाथ जगताप, कोंढवा पोलीस ठाणे, पुणे शहर यांनी केले. कार्यक्रमांचे सुत्रसंचालन इस्माईल बागवान यांनी केले.
काँग्रेसची मागणी .. सोमैयांनी ‘अतिरेक्यांची संख्येसह असणारी माहीती’ पोलीसांकडे का दिली नाही..? पोलीस प्रशासन या बाबत अनभिज्ञ कसे? काँग्रेसचा सवाल पुणे दि २४ फेब्रुवारी २६ : माजी खासदार व भाजपचे वादग्रस्त नेते किरीट सोमैया हे मालेगांव (जि. नाशिक ) येथे जाऊन माध्यमांसमोर ‘बांगला देशी अतिरेकीं’ बद्दल संख्येसह नेमकी माहिती देत आहेत व प्रक्षोभक वक्तव्ये करत असल्याचे समोर येत आहे, हा प्रकार गंभीर असल्याने नाशिक जिल्हा पोलीस व प्रशासनाने या गंभीर आरोपांबाबत तातडीने खुलासा करावा व कारवाई बाबत माहिती जारी करावी अशी मागणी प्रदेश काँग्रेस चे वरीष्ठ प्रवक्ते गोपाळदादा तिवारी यांनी केली.
ते पुढे म्हणाले की, भाजप नेते त्यांचे बॅाडी गार्ड यांनी वृत्तपत्रे प्रतिनिधीं व पत्रकारांना त्या विषयी प्रश्न विचारण्यास मज्जाव केल्याचे देखील टीव्ही चॅनेल वर पहायला मिळत असून, सोमैयांनी मालेगावमध्ये असलेल्या अतिरेकीकेंद्रा बद्दल जाहीर वक्तव्ये केलीत, त्या शिवाय ४,६०० बांगलादेशी अतिरेकी घुसल्याचा सनसनाटी आरोप देखील केला आहे. या सर्व प्रकरणाची मालेगांव, जिल्हा नाशिक प्रशासनाने, जिल्हा पोलीस अधीक्षक व जिल्हाधिकारी कार्यालयाने या बाबत सत्य वास्तवते बाबत तातडीने खुलासा करावा.. ही सर्व नेमकी माहिती किरीट सोमैयांचेकडे असतांना, ती संबंधित पोलीस व प्रशासकीय यंत्रणेकडे का दिली नाही ? असा सवाल ही काँग्रेस राज्य प्रवक्ते गोपाळदादा तिवारी यांनी विचारला.
संबंधित माहिती पोलीस प्रशासनास देण्याऐवजी ती स्वतः कडे ठेवल्याबद्दल किरीट सोमैयांना पोलीस प्रशासनाने तातडीने ताब्यात घेऊन, त्यांनी अतिरेकी अड्डा बाबत केलेल्या आरोपांची सखोल चौकशी करावी व वास्तवता जिल्हा प्रशासनाने पुढे आणावी.. अन्यथा साप साप म्हणून भूई थोपटून विशिष्ट धर्मा बद्दल भय, भिती, संशय व द्वेषाचे समाजात कलुषित वातावरण करू पाहणाऱ्या माजी खा. किरीट सोमैयांवर सामाजिक सलोखा व शांतता भंग करण्याच्या आरोपाखाली कारवाई करावी..अशी मागणी देखील प्रदेश काँग्रेस चे वरीष्ठ प्रवक्ते गोपाळदादा तिवारी यांनी केली.
मालेगाव -भाजपचे आक्रमक नेते किरीट सोमय्या यांच्या मालेगाव दौऱ्याने आज शहरात मोठी खळबळ उडवून दिली. “मालेगाव हे आता बांगलादेशी घुसखोरांचा अड्डा आणि अतिरेक्यांचे केंद्र बनले आहे,” असा घणाघाती आरोप करत सोमय्या यांनी स्थानिक प्रशासकीय यंत्रणेच्या कारवाईचा पाढाच वाचला. दरम्यान, या दौऱ्यात किरीट सोमय्यांच्या सुरक्षा रक्षकांनी पत्रकारांना केलेल्या धक्काबुक्कीमुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
भाजप नेते किरीट सोमय्या यांनी बांगलादेशी व रोहिंग्या मुस्लिमांना बनावट जन्मदाखले जारी करण्यावरून राज्यभर रान पेटवले आहे. याच निमित्ताने ते आज मालेगाव दौऱ्यावर आले होते. किरीट सोमय्या मालेगावात दाखल होताच प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनी त्यांना प्रश्नांची विचारणा करण्यासाठी घेरले. यावेळी प्रचंड गर्दी झाल्याने सोमय्यांच्या बॉडीगार्ड्सनी पत्रकारांना अक्षरशः ढकलण्यास सुरुवात केली. यावेळी सुरक्षा रक्षकांनी अरेरावीची भाषा वापरत धक्काबुक्की केल्याने पत्रकार आणि गार्ड्समध्ये तीव्र बाचाबाची झाली. या प्रकारामुळे उपस्थित पत्रकारांनी तीव्र संताप व्यक्त केला असून सोमय्यांच्या या दौऱ्याला गालबोट लागले.
घुसखोरांच्या मुद्द्यावर बोलताना सोमय्या यांनी आकडेवारीसह माहिती दिली. ते म्हणाले, “पोलिस, मनपा, जिल्हाधिकारी यांच्याशी माझी चर्चा झाली. एकूण चार विषयावर चर्चा झाली. SIR, मतदार साफसफाई मोहीम, जी नावं दिली आहेत ती नावे ताबडतोब मतदार यादीतून काढणे, जे दाखले रद्द केले ते नवे काढले यावर चर्चा झाली. बोगस जन्म दाखले दिल्याप्रकरणी मालेगावात आतापर्यंत ४२ एफआयआर (FIR) दाखल झाले असून १०८३ जणांवर गुन्हे नोंदवण्यात आले आहेत. सुमारे ४४०० अवैध दाखले रद्द करण्यात आले असून आणखी २००० पुराव्यांची चौकशी सध्या सुरू आहे.” घुसखोरांना मदत करणाऱ्या ४० हून अधिक अधिकाऱ्यांवरही कारवाईची कुऱ्हाड कोसळल्याचे त्यांनी यावेळी नमूद केले. कारवाई संदर्भात मुख्यमंत्री वेळ देतील, असेही त्यांनी सांगितले.
“बोगस बांगलादेशी आणि बनावट जन्म दाखल्यांच्या रॅकेटला पायबंद घालण्यासाठी केंद्र सरकार पुढच्या संसदेच्या अधिवेशनात विशेष विधेयक सादर करणार आहे,” अशी महत्त्वाची माहिती सोमय्या यांनी दिली. “ज्यांचे दाखले रद्द झाले आहेत पण त्यांच्याकडे भारतात जन्मल्याचा ठोस पुरावा आहे, त्यांनीच पुन्हा अर्ज करावा,” असेही किरीट सोमय्या यांनी स्पष्ट केले.
सोमय्या यांनी आज पोलिस, महानगरपालिका आणि जिल्हाधिकारी यांच्याशी सविस्तर चर्चा केली. बोगस दाखल्यांच्या आधारे मतदार यादीत घुसलेल्यांची नावे तात्काळ वगळण्याचे आदेश देण्यात आले आहेत. मालेगावात सर्वाधिक बोगस अर्ज आले असून प्रशासकीय अधिकारी त्यांचे पितळ उघडे पाडत आहेत, ही कौतुकास्पद बाब आहे,” असेही ते म्हणाले. मालेगाव अतिरेक्यांचे केंद्र झालेले आहे. बोगस बांगलादेशींचा अड्डा झाले आहे, असा आरोपही सोमय्या यांनी केला.
दरम्यान, मालेगावच्या महापौर नसरीन बानो खालिद शेख यांनी आयुक्त रवींद्र जाधव यांना महापौर व महासभेच्या परवानगीशिवाय कोणतेही कागदपत्रे भाजप नेते किरीट सोमय्या यांना देवू नयेत अशा लेखी सूचना दिल्या आहेत. चौकशीत एकही रोहिंग्या किंवा बांगलादेशी आढळला नाही. त्यामुळे सोमय्या मालेगावला बदनाम करीत असून, अल्पसंख्याकांना लक्ष करीत असल्याचे मायनॉरिटी डिफेन्स कमिटीने म्हटले आहे. पहिल्याच महासभेत जन्मदाखल्यांचा विषय चर्चेत आला. महासभेने विशेष कमिटी स्थापन केली आहे. सोमय्या यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर महापौर नसरीन बानो यांनी आक्रमक पवित्रा घेत आयुक्तांना पत्र दिले.
पुणे : शहराच्या सुरक्षेसाठी २४ तास कार्यरत असलेल्या अग्निशमन दलातील सुमारे ९० कर्मचाऱ्यांचे आवश्यक प्रशिक्षण रखडले असल्याची बाब समोर आली आहे. वेळेत प्रशिक्षण पूर्ण न झाल्यास निश्चित वयोमर्यादा उलटून अनेक जवान भविष्यातील पदोन्नतीपासून कायमचे वंचित राहण्याची चिंता संबंधित कर्मचाऱ्यांनी व्यक्त केली आहे. या पार्श्वभूमीवर नगरसेवक राघवेंद्र बाप्पु मानकर यांनी महापौर मंजुषा नागपुरे यांची भेट घेऊन प्रशिक्षण लवकरात लवकर पूर्ण करण्यात यावे, अशी मागणी केली.
अग्निशमन विभागातील अनेक कर्मचारी हे ४३ ते ५३ वयोगटातील आहेत. भविष्यातील पदोन्नतीसाठी आवश्यक शैक्षणिक अर्हता पूर्ण करण्यासाठी नागपूर येथील राष्ट्रीय अग्निशमन सेवा महाविद्यालयामार्फत विविध प्रशिक्षण कोर्सेस पूर्ण करणे बंधनकारक आहे. संबंधित प्रशिक्षणासाठी वयोमर्यादा निश्चित करण्यात आलेली असून, २०२७ पर्यंत प्रशिक्षण पूर्ण करण्यासाठी वयाची अट ५४ वर्षांपर्यंत शिथिल करण्यात आली आहे. मात्र, गेल्या काही वर्षांत पुरेशा संख्येने कर्मचारी प्रशिक्षणासाठी पाठविण्यात आले नसल्याने सुमारे ९० हून अधिक जवानांचे प्रशिक्षण अद्याप प्रलंबित आहे. यापैकी अनेक कर्मचाऱ्यांची वयोमर्यादा संपत आलेली असून ते प्रशिक्षण व पदोन्नतीपासून वंचित राहण्याची शक्यता निर्माण झाली आहे. हे प्रशिक्षण पूर्ण झाल्यास प्रशिक्षित मनुष्यबळही अग्निशमन दलास उपलब्ध होऊ शकणार आहे.
‘अग्निशमन दलाचे जवान आग, पूरस्थिती तसेच नैसर्गिक आपत्तीच्या वेळी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता नागरिकांचे प्राण व मालमत्ता वाचविण्याचे काम करतात. केवळ तांत्रिक कारणांमुळे भविष्यात त्यांच्या करिअरमध्ये अडथळे निर्माण होणे अन्यायकारक असल्याचे नगरसेवक राघवेंद्र बाप्पु मानकर यांनी नमूद केले. तसेच, महानगरपालिका हद्दीत नव्याने समाविष्ट झालेल्या गावांमध्ये भविष्यात नवीन अग्निशमन केंद्रे उभारली जाणार असून, त्यासाठी प्रशिक्षित मनुष्यबळाची आवश्यकता भासणार आहे. उपलब्ध अनुभवी मनुष्यबळाला भविष्यात पदोन्नतीच्या संधींत सामावून घेता यावे, यासाठी हे प्रशिक्षण अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहे.
वरील सर्व बाबींचा विचार करून, वयोमर्यादा संपत आलेल्या जवानांसाठी नागपूर येथील महाविद्यालयाची आवश्यक मान्यता घेऊन संबंधित प्रशिक्षण पुण्यातच आयोजित करण्यात यावे, तसेच २०२७ पूर्वी सर्व प्रलंबित प्रशिक्षण पूर्ण करण्यासाठी धोरणात्मक निर्णय घेण्यात यावा, अशी मागणी नगरसेवक राघवेंद्र बाप्पु मानकर यांनी महापौर मंजुषाताई नागपुरे यांच्याकडे केली.
यावर सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्वासन महापौर मंजुषा नागपुरे यांनी दिले असल्याचे राघवेंद्र बाप्पु मानकर यांनी सांगितले. यावेळी मुख्य अग्निशमन अधिकारी देवेंद्र पोटफोडे व अग्निशमन दलाचे जवान उपस्थित होते.
तनुश्री गर्भसंस्कार परिवारातर्फे १ मार्च रोजी विनामूल्य कार्यशाळेचे आयोजन
पुणे, दि.२४ फेब्रुवारी: तनुश्री स्नेहमेळावा परिवाराद्वारे तनुश्री संस्कार साधना या नावाने स्त्रीला स्वतःला जोडणारा, स्वतःला उभा करणारा ‘बाई पण भारी देवा’ या अनोख्या थीमच्या माध्यमातून विनामूल्य कार्यशाळेचे अयोजन करण्यात आले आहे. या वर्षी मधुरा बाचल आणि झेलम चौबळ यांना तनुश्री ‘जन संस्कार पुरस्काराने’ सन्मानीत करण्यात येणार आहे. रविवार, दि.१ मार्च २०२६ रोजी सकाळी ८.३० ते दुपारी १२.३० वाजेपर्यंत न्यू सांगवी येथील साई चौक येथील संस्कृती लॉन्स मध्ये याचे आयोजन करण्यात आले आहे. अशी माहिती डॉ. सुप्रिया गुगळे आणि डॉ. तन्वी खाबिया (गुगळे) यांनी पत्रकार परिषदेत दिली. डॉ. सुप्रिया गुगळे यांनी सांगितले की, ‘बाई पण भारी देवा’ हा सोहळा तिच्या अस्तित्वाचा गौरव, सामर्थ्याचा सन्मान आणि आत्मविश्वासाला नवी दिशा देण्यासाठी आहे. हा सोहळा स्त्री शक्तीला प्रणाम करण्यासाठी, तिच्या आत्मविश्वााला नवे पंख देण्यासाठी आणि तिच्या ‘मी’ ला पुन्हा उजाळा देण्यासाठी आहे. डॉ. तन्वी खाबिया म्हणाल्या,“तनुश्री स्नेहमेळाव्याचे हे १३ वर्ष असून या वर्षी मधुरा बाचल आणि झेलम चौबळ यांना तनुश्री ‘जन संस्कार पुरस्काराने’ गौरविण्यात येणार आहे. सन्मानपत्र, स्मृतिचिन्ह, शाल व श्रीफळ असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. ‘बाई पण भारी देवा’ हा कार्यक्रम स्वतःशी जोडणारा, स्वतःला उभं करणारा प्रवास आहे. त्यामुळे या वर्षी अभिनेत्री शर्वरी जैमिनिस (बाई पण भारी देवा), कलाकार किशोर महाबोले आणि कलाकार अश्विनी कासार या शुभेच्छा देतील. तसेच मधुरा बाचल(स्त्री शक्तीचा गौरव), झेलम चौबळ (तिच कर्तृत्वाशाली नेतृत्व), डॉ. सुजाता पाटील (तिचं आरोग्य आणि आयुर्वेद), वीणा गोखले (देणे समाजाचे), हिमांशु बक्षी, उमा नेने (सुरेल साथ) या वेगवेगळया विषयांवर विचार मांडतील तसेच शुभांगी दामले, डॉ. सुनंदा रानडे, एसीपी अनुजा देशमाने या शुभेच्छा देतील. या कार्यक्रमाचे निवेदन वसुंधरा काशीकर या करतील.” प्रत्येक स्त्रीला तिच्यातील दडलेली शक्ती, आत्मविश्वास आणि स्वाभिमान पुन्हा अनुभवता यावा यासाठी विविध उपक्रम, प्रेरणादायी सत्रे आणि सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. आयुर्वेद, संस्कार आणि सकारात्मक विचारांच्या बळावर स्त्रीने स्वतःला सक्षम केले तर तिच्याच हातून घडेल आणि सुंदर, सुदृढ आणि संस्कारित उद्याचे भविष्य हे या कार्यक्रमाचा मुख्य संदेश आहे.
इच्छुकांना सहभागी होण्यासाठी नाव नोंदणी विनामूल्य पण आवश्यक आहे. नोंदणी साठी मो.नं., ८००७२३२०११, +९१८००७१०५३०९ आणि +९१९११२२३१७१५ वर संपर्क साधावा.
डॉ. अनिल व डॉ. सुप्रिया गुगळे यांच्या कार्याचा अल्प परिचयः डॉ. अनिल गुगळे व डॉ. सुप्रिया गुगळे हे गेल्या २९ वर्षापासून सांगवी येथे गर्भसंस्कार केंद्र यशस्वी रित्या चालवित आहेत. यांच्यातर्फे आयोजित गर्भसंस्कार कार्यक्रमात आतापर्यंत ६५०० पालकांनी सहभाग घेतला आहे. या मध्ये आईची शारीरिक, मानसिक आरोग्य वृध्दी व बाळ निरोगी, आनंदी व सुसंस्कारीत होण्यासाठी केली आहे. त्याचप्रमाणे तनुश्री ब्रम्ह मुहूर्त कार्यक्रम आयोजित केला जातो. यामध्ये आरोग्य संपन्न जीवनशैलीसाठी मार्गदर्शन केेले जाते. गेल्या ५ वर्षारंभा पासून २५ हजार कुटुंबाने ऑनलाईन कार्यक्रमाचा लाभ घेतला.गर्भ संस्कार व सकारात्मक मनाद्वारे नितिमान पिढी निर्माण करण्यासाठी पालकांना मदत केल्या जाते.