Home Blog Page 638

काकडे,मानकर, रुपाली पाटलांसारख्यांची नाराजी महायुतीला मानवेल काय ?

पुणे- मनोज जरांगे पाटलांचे आंदोलन आणि आता निवडणुकीतही जरांगे पाटलांची चळवळ सुरु असताना भाजपमधील माजी खासदार संजय काकडे,तसेच राष्ट्रवादी अजितदादा गटाचे दीपक मानकर आणि रुपाली पाटील अशा रथी महारथींची नाराजी महायुतीतील भाजपा आणि अजितदादा गटाने ओढवून घेतल्याने पुण्यातील निवडणुकीत महायुतींच्या उमेदवारांना फटका बसू शकतो असा अंदाज राजकीय समीक्षकांनी वर्तविला आहे.

भाजपा सहयोगी राज्यसभा सदस्य अशीच गणना असतानाही माजी खासदार संजय काकडे यांनी गेल्या १० वर्षात अगदी नोटबंदी पासून मराठा आरक्षणाच्या मुद्द्यापर्यंत आणि महापालिकेच्या निवडणुकीपर्यंत प्रत्येक वेळी भाजप मध्ये हिरारीने उभे राहून पक्षासाठी झोकून काम केले.पण प्रत्यक्षात त्यांच्या वाट्याला अवहेलनाच आली असा त्यांच्याच कार्यकर्त्यांकडून दावा केला जातोय आता अजितदादा देखील रुपाली चाकणकर यांची तत्परतेने फेर निवड झाल्याने नाराजीचे बळी ठरत आहेत. दीपक मानकर यांनी अजितदादा गटाचे शहर अध्यक्ष पद घेऊन शरद पवार गटाशी वाईट पणा स्वीकारत अजितदादांचा गट सक्षम करण्यासाठी जोरदार मेहनत घेतली. मनसेची वाघीण अशी प्रतिमा असलेल्या रुपाली पाटील अजितदादा गटात येऊन अनेक वर्षे झाली पण त्यांच्या ही पदरी निराशाच पडल्याचा समीक्षकांचा दावा आहे. एकीकडे भाजपा च्या विद्यमान आमदारांच्या बद्दल असलेली नाराजी त्यात संजय काकडे यांना कायमच २ हात दूर ठेवणारी राजनीती आता निवडणुकीत मतदारांच्या करवी आपले रंग निश्चित दाखवेल असे म्हटले जाते आहे. भाजपचे शहर अध्यक्ष धीरज घाटे कायम काकडे यांचे समर्थक राहिले आहेत पण त्यांनी देखील आयत्या वेळी सोयीस्कर भूमिका घेतल्याची टीका होते आहे. एकूणच मराठा आणि बहुजन समाजाची भाजपा आणि आता अजितदादा गटाच्या बाबतीतली नाराजी देखील वाढत चालल्याचे चित्र आहे.या सर्वांचा निवडणुकीवर काय परिणाम होईल हे आता मतदानापूर्वीच दिसणार आहे हे निश्चित .

निवडणुक आयोगाने पश्चिम बंगालच्या पोलीस महासंचालकांना बदलले; मग रश्मी शुक्लांना का हटवित नाही?

मविआच्या मतदारांची नावे यादीतील वगळण्याचे भाजपा-शिंदे सेनेचे षडयंत्र; हिम्मत असेल तर समोर येऊन लढा: नाना पटोले

महाविकास आघाडीच्या शिष्टमंडळाने घेतली मुख्य निवडणूक अधिका-यांची भेट.

मुंबई, दि. १८ ऑक्टोबर २०२४
विधानसभा निवडणूक निष्पक्ष व पारदर्शक झाली पाहिजे, मतदान वाढले पाहिजे असे निवडणूक आयोग सांगत असते पण निवडणूक आयोगाच्या कामातच पारदर्शकता व निष्पक्षपातीपणा दिसत नाही. सत्ताधारी पक्षाच्या इशाऱ्यावर अधिकारी काम करत आहेत. ऑनलाईन फॉर्म ७ च्या माध्यमातून मविआच्या मतदारांची नावे मोठ्या प्रमाणात मतदार यादीतून वगळली जात आहेत, यामागे एकनाथ शिंदे व देवेंद्र फडणवीस आहेत असा गंभीर आरोप करून रडीचा डाव खेळू नका, हिम्मत असेल तर आमने सामने लढा, असे आव्हान महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी दिले आहे.
शिवालय येथे पत्रकार परिषदेत बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले पुढे म्हणाले की, भारतीय जनता पक्ष व त्यांचे सहकारी पक्ष पराभवाच्या भितीने षडयंत्र करत आहेत. निवडणूक आयोग मोदीशाह यांच्या इशाऱ्यावर काम करत आहे. हे लोकशाहीला काळीमा फासणारे आहे, आयोगाच्या कामात सरकारचा हस्तक्षेप होता कामा नये. सरकारी योजनांची माहिती देण्याच्या नावाखाली राज्यात ५० हजार योजना दूतांना ५० हजार रुपयांवर नियुक्त केले असून हे योजनादूत भाजपा विचारांचे आहेत व ते भाजपाचा प्रचार करत आहेत. जनतेच्या पैशाने सुरु असलेला हा भाजपचा प्रचार तात्काळ बंद करा.
पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांची नियुक्ती व त्यांना दिलेली मुदतवाढ ही असंवैधानिक व बेकायदेशीर आहे त्यांना हटवण्याची मागणी काँग्रेस पक्षाने केली पण त्यांना बदलू शकत नाही असे आयोग सांगतो पण याच निवडणूक आयोगाने पश्चिम बंगालच्या निवडणुकीवेळी मात्र तिथल्या पोलीस महासंचालकांना बदलले. पश्चिम बंगाल व महाराष्ट्रासाठी वेगळे कायदे आहेत का, असा प्रश्न नाना पटोले यांनी विचारला आहे.
विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यावेळी म्हणाले की, लोकसभा निवडणुकीत ज्या मतदारसंघात मविआला जास्त मते पडली त्या मतदारसंघात साधारणपणे १० हजारावर मते कमी करण्याचे षडयंत्र सुरु आहे. भाजपा युती विधानसभा निवडणूक जिंकू शकत नाही म्हणून फॉर्म–७ चा गैरवापर केला जात आहे म्हणून फॉर्म ७ घेणे बंद करा व पुन्हा असे प्रकार होणार नाहीत याची दक्षता घ्या. मतदार ओळखपत्रातही अनेक चुका आहेत. मतदारांनीही आपले नाव मतदार यादीत आहे का याची खात्री करावी, असे आवाहनही वडेट्टीवार यांनी केले आहे. निवडणुका जाहिर झाल्या त्यावेळी सरकारने काढलेले सर्व जीआर व महामंडळाच्या नियुक्त्या रद्द कराव्यात अशी मागणी निवडणूक आयोगाकडे केली असल्याचेही वडेट्टीवार यांनी सांगितले.
शिवसेनेचे खा. अनिल देसाई यावेळी म्हणाले की, ८५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना घरातच मतदान करु देण्याचा निर्णय योग्य आहे पण त्यात पारदर्शकता असली पाहिजे. हे मतदान होताना सर्व पक्षाचे बीएलए असल्याशिवाय मतदान घेऊ नये. जागरुकतेने मतदानाचा हक्क बजावावा, कोणाच्याही दबावाखाली मतदान होऊ नये. मुंबईत प्रत्येक मतदारसंघात ४५०० हजार असे ज्येष्ठ मतदार आहेत तर इतर शहरात ते ६ हजारांपेक्षा जास्त आहेत. त्यामुळे हे मतदान योग्य पद्धतीने व पारदर्शक झाले पाहिजे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यावेळी म्हणाले की, फॉर्म नंबर ७ ऑनलाईन भरण्याची पद्धतच चुकीची आहे. या माध्यमातून प्रत्येक मतदारसंघातून ५ हजार मतदारांची हेराफेरी केली जात आहे. जिवंत असलेले मतदार मृत दाखवले आहेत. निवडणूक ज्या पद्धतीने राबविली जात आहे तेच मुळात संशयास्पद आहे. एका घरातील पाच माणसांची नावे वेगवेगळ्या मतदारसंघात दाखवली आहेत. मतदार यादीची प्रिंट अत्यंत खराब आहे, त्यात अनेक चुका आहेत. डीजिटल इंडिया म्हणता आणि साधी मतदारयादी सुद्धा स्वच्छ व सुबक छापता येत नाही असे आव्हाड म्हणाले.
या पत्रकार परिषदेला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विरोधी पक्षनेते विधानसभा विजय वडेट्टीवार, CWC सदस्य व प्रदेश कार्याध्यक्ष नसीम खान, काँग्रेसचे विधान परिषदेतील गटनेते सतेज बंटी ऊर्फ पाटील, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खा. अनिल देसाई, राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरदचंद्र पवार) आ. जितेंद्र आव्हाड, प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष संघटन व प्रशासन नाना गावंडे आदी उपस्थित होते.
या पत्रकार परिषदेनंतर महाविकास आघाडीच्या शिष्टमंडळाने राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोकलिंगम यांची भेट घेऊन मागण्यांचे निवेदन सादर केले. या शिष्टमंडळात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विधानसभेतील विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार, विधान परिषदेतील विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे, प्रदेश काँग्रेसचे कार्याध्यक्ष व काँग्रेस वर्किंग कमिटीचे सदस्य नसीम खान, विधान परिषदेतील काँग्रेस पक्षाचे गट नेते सतेज ऊर्फ बंटी पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते माजी मंत्री जितेंद्र आव्हाड, शिवसेना खा. अनिल देसाई, प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष संघटन व प्रशासन नाना गावंडे यांचा समावेश होता.

संवादिनी वादनातून उमटले बंदिशीचे बोल

पुणे : गायकी अंगाने सादर झालेल्या बंदिशी आणि विविध रागांनी परिपूर्ण संवादिनी वादनाने रसिकांची सायंकाळ सुरांच्या वर्षावात चिंब झाली. निमित्त होते भारतीय संगीत प्रसारक मंडळाच्या गांधर्व महाविद्यालय, पुणे अंतर्गत असलेल्या संवादिनी प्रेमी मंडळातर्फे (सप्रेम) आयोजित संवादिनी वादनाच्या विशेष मैफलीचे.
या मैफलीत गोवा येथील सुप्रसिद्ध संवादिनी वादक पंडित राया कोरगावकर आणि बंगळुरू येथील सुप्रसिद्ध संवादिनी वादक पंडित रवींद्र कातोटी यांचे एकल संवादिनी वादन झाले. कार्यक्रमाचे आयोजन गांधर्व महाविद्यालयातील विष्णू विनायक स्वरमंदिरात करण्यात आले होते. प्रसिद्ध उद्योजक संजय चितळे यांच्यासह गांधर्व महाविद्यालयाचे प्राचार्य पंडित प्रमोद मराठे, उपप्राचार्या परीणिता मराठे, विश्वस्त अच्युत मेढेकर यांची प्रमुख उपस्थिती होती. संवादिनी वादन क्षेत्रातील अनेक कलाकारांनी या मैफलीत आवर्जून उपस्थिती लावली.
मैफलीची सुरुवात राया कोरगावकर यांनी राग गावतीमधील पंडित रामाश्रय झा यांनी रचलेल्या ‌‘आस लागी तुम्हारे चरण‌’ आणि ‌‘हमरी पार करो साई झांझरी नैय्या‌’ या बंदिशी गायकी अंगाने सादर करून केल्या. संवादिनीतून फक्त सुरच नव्हे तर शब्दही उमटतात हे ऐकून रसिक मंत्रमुग्ध झाले. त्यानंतर राया कोरगावकर यांनी स्वत: रचना केलेला आडाचौताल रागातील तराणा अतिशय प्रभावीपणे सादर केला. ठुमरी वादनाने कोरगावकर यांनी आपल्या मैफलीची सांगता केली. त्यांना गोवा येथील तुकाराम गोवेकर (तबला), सुनाद कोरगावकर (संवादिनी) यांनी समर्पक साथ केली.
कार्यक्रमाच्या उत्तरार्धात पंडित रवींद्र कातोटी यांनी मैफलीची सुरुवात श्याम कल्याण राग ऐकवून केली. रागाचा विस्तार त्यातील बारकावे संवादिनी वादनातून सहजपणे उलगडून दाखवित कातोटी यांनी रसिकांची वाहवा मिळवली. राग जयजयवंतीचे बहारदार सादरीकरण रसिकांना विशेष भावले. पुरंदरदास यांच्या कर्नाटकी रागसंगीतात स्वरबद्ध केलेल्या रचनेचा हिंदुस्थानी शास्त्रीय संगीतावर आधारित स्वरार्थ सादर करून पंडित कातोटी यांनी रसिकांना मोहित केले. पंडित कातोटी यांनी आपल्या मैफलीची सांगता सुरेल भैरवी वादनाने केली. ऋषिकेश जगताप (तबला) तर तेजस कातोटी (संवादिनी) यांनी समर्पक साथ केली.
कलाकारांचा सत्कार संजय चितळे, अच्युत मेढेकर यांनी केला. कलाकारांची ओळख व निवेदन पंडित प्रमोद मराठे यांनी केले तर संजय चितळे यांचा सन्मान प्रसिद्ध संवादिनी वादक सुधीर नायक यांनी केला.

शिवसेना नेत्या डॉ. नीलम गोऱ्हे यांनी घेतले मोरगावच्या श्री मयुरेश्वर गणपतीचं दर्शन

मोरगाव दि.१७: शिवसेना नेत्या तथा विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी तीर्थक्षेत्र मोरगाव ता. बारामती येथील मयुरेश्वराचे दर्शन घेऊन श्रींची विधिवत पूजा करत महावस्त्र, नैवेद्य, पुष्पहार अर्पण केला. तसेच गणपतींची आरती करून श्रीफळांचे तोरण अर्पण करण्यात आले. यावेळी देवस्थानच्या वतीने महावस्त्र व श्री मयुरेश्वर यांची प्रतिमा देऊन डॉ.गोऱ्हे यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी जेहलम जोशी, सुरेंद्र जेवरे शिवसेना जिल्हाप्रमुख यांसह देवस्थानचे पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी डॉ. गोऱ्हे यांनी, शेतकरी, महिला, युवक, विद्यार्थी या सर्वांना सुरक्षित आणि चांगलं जीवन मिळावं यासाठी प्रार्थना केली. तसेच मयुरेश्वराने याआधी अनेक संकल्प पूर्ण केलेले आहेत जे राहिले आहेत ते देखील लवकरच पूर्ण व्हावेत अशी गणराया चरणी प्रार्थना केली. याखेरीज राज्याच्या विधानसभा निवडणुकीत शंभर टक्के मतदान होण्यासाठी जनतेने निवडणूक आयोगाला सहकार्य करावे. निवडणूक आयोगाने देखील नागरिकांना योग्य सोयीसुविधा मिळण्यासाठी विशेष लक्ष दिले असल्याचे त्यांनी सांगितले.

बोपदेव घाटातील अंधाराची अन उजेडाची डॉ. नीलम गोऱ्हेंनी केली पाहणी

आवश्यक सोयीसुविधा उभारण्याबाबत ऊर्जा विभाग, महापालिका आणि पोलीस आयुक्तांकडे करणार पाठपुरावा

पुणे दि.१७: बोपदेव घाट व परिसरात सुरक्षेच्या दृष्टीने उभारण्यात आलेल्या पोलीस चौकीला शिवसेना नेत्या तथा उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी भेट देऊन पाहणी केली व आढावा घेतला. तसेच भविष्यात चुकीच्या घटना टाळण्यासाठी योग्य ती खबरदारी घेण्याबाबत पोलीसांना सूचना दिल्या. यावेळी वरिष्ठ पोलीस अधिकारी उपस्थित होते.

यावेळी डॉ. गोऱ्हे यांनी घाटातील रस्त्यांवर प्रचंड अंधार असल्याने प्रकाश खांब लावणे गरजेचे असून याबाबत ऊर्जा विभाग, महापालिके आणि पोलीस विभागाकडे पाठपुरावा करणार असल्याचे सांगितले. तसेच येथील चौकीत असणाऱ्या पोलिसांकरिता मोबाईल टॉयलेटची सोय, चौकीतील खिडक्यांना सुरक्षा जाळी आणि घाट क्षेत्रात मोबाईल नेटवर्क सुविधा वाढविणे यांकरिता पोलीस आयुक्तांकडे पाठपुरावा करणार असल्याचे त्यांनी सांगितले. याखेरीज पोलीस प्रशासनाकडून करण्यात आलेली सर्च लाईट व्यवस्था, ध्वनिक्षेपकाद्वारे करण्यात येणारी घोषणा आणि या भागात तैनात करण्यात आलेले दहा पोलिसांचे गस्ती पथकाबाबत डॉ. गोऱ्हे यांनी समाधान व्यक्त केले.

गुणीजान बंदिश स्पर्धेची अंतिम फेरी रंगणार शनिवारी

पुणे : गुणीजान रिसर्च आर्ट कल्चर अँड एज्युकेशन फाऊंडेशनतर्फे (ग्रेस) प्रसिद्ध हिंदुस्थानी शास्त्रीय गायक पद्मभूषण पंडित सी. आर. व्यास यांच्या 100व्या जयंतीनिमित्त देशपातळीवर घेण्यात आलेल्या गुणीजान बंदिश स्पर्धेची अंतिम फेरी शनिवारी (दि. 19) रंगणार आहे.
अंतिम फेरी 19 ऑक्टोबर रोजी दुपारी 2:30 वाजेपासून डॉ. श्रीराम लागू रंगावकाश, हिराबाग, पुणे (ज्योत्स्ना भोळे सभागृह आवार) येथे होणार आहे. उपउपांत्य फेरीसाठी महिला गटात 11 स्पर्धकांची तर पुरुष गटात 10 स्पर्धकांची निवड करण्यात आली होती. उपउपांत्य फेरीतील स्पर्धकांचे सादरीकरण गुरुवारी झाले. त्यातून उपांत्य फेरीसाठी प्रत्येक गटातून सहा स्पर्धकांची निवड करण्यात आली आहे.
ज्येष्ठ गायिका अभिनेत्री निर्मला गोगटे, पद्मश्री तालयोगी पंडित सुरेश तळवलकर, पद्मश्री पंडित उल्हास कशाळकर, पद्मभूषण पंडित साजन मिश्रा, पद्मश्री पंडित सतिश व्यास, पंडित सुहास व्यास, विदुषी अश्विनी भिडे-देशपांडे, विदुषी देवकी पंडित यांनी स्पर्धेचे परीक्षण केले.

महिला गटात निवड झालेले स्पर्धक : आद्या मुखर्जी, सोमदत्ता चॅटर्जी, युगंधरा केचे, नंदिनी गायकवाड, स्वाती तिवारी, तेजस्विनी वेर्णेकर

पुरुष गटात निवड झालेले स्पर्धक : इशान घोष, अथर्व वैरागकर, ऋषिकेश करमरकर, मेहेर परळीकर, दर्शन मेलमंकी, चैतन्य परब

पारितोषिक वितरण समारंभ रविवार, दि. 20 ऑक्टोबर 2024 रोजी सायंकाळी 6 वाजता डॉ. श्रीराम लागू रंगावकाश, हिराबाग, पुणे (ज्योत्स्ना भोळे सभागृह आवार) येथे आयोजित करण्यात आला असून पारितोषिक वितरण मान्यवर परीक्षकांच्या हस्ते होणार आहे.
देशपातळीवर आयोजित करण्यात आलेल्या गुणीदास बंदिश स्पर्धेतील सादरीकरण रसिकांसाठी खुले असून पुण्यातील संगीतप्रेमींनी आवर्जून उपस्थिती लावून स्पर्धकांचा उत्साह वाढवावा, असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.

सीमेवरील जिल्ह्यांनी आचारसंहितेच्या कालावधीत संशयीत वाहतूकीवर कडक नजर ठेवून कारवाई करावी-जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे

पुणे: पुणे जिल्ह्यासह सीमेवरील अहिल्यानगर, सोलापूर, ठाणे, सातारा व रायगड या जिल्ह्यांनी आपापल्या चेक पोस्टवर आचारसंहितेच्या कालावधीत संशयीत वाहतुकीवर कडक नजर ठेवून कारवाई करावी, अशा सूचना जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी केल्या.

विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर पुणे जिल्ह्याच्या सीमेवरील अहिल्यानगर, सोलापूर, ठाणे, सातारा व रायगड या जिल्ह्यातील जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क अधिकारी, उप जिल्हा निवडणूक अधिकारी, निवडणूक निर्णय अधिकारी यांची दूरदृश्य प्रणाली द्वारे आंतरजिल्हा सीमा आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी डॉ. दिवसे बोलत होते.

पुणे जिल्ह्याच्या संदर्भात डॉ. दिवसे म्हणाले, लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 साठी जिल्ह्याच्या सीमेवर तपासणी नाके (चेक पोस्ट) लावण्यात आलेल्या ठिकाणी पुन्हा ते लावण्यात यावेत. तसेच आवश्यकतेनुसार चेक पोस्टची जागा बदलण्यात यावी. चेक पोस्टवर सीसीटीव्ही कॅमेरे, छायाचित्रीकरण अनिवार्य करावे. येणारी वाहने ज्या जिल्ह्यात प्रवेश करतील त्या जिल्ह्यातील चेक पोस्टवर तपासणी करून संबंधित चेक पोस्ट ने अंतिम कारवाई करणे अपेक्षित आहे.

पुणे जिल्ह्यातील ताम्हिणी घाट, भोर परिसरातील पश्चिम भागात छुप्या रस्त्याने अंमली पदार्थ, गावठी दारूची वाहतूक होऊ नये यासाठी वारंवार तपासणी करण्यात यावी. तसेच जल, वायू या मार्गानेदेखील वाहतूक होऊ नये यासाठी तपासणीच्या सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या.

पुणे जिल्ह्यात 204 मावळ, 199 दौंड, 200 इंदापूर, 201 बारामती, 195 जुन्नर व 198 शिरूर या विधानसभा मतदारसंघाची हद्द शेजारील रायगड, अहिल्यानगर, सोलापूर, सातारा व ठाणे या जिल्ह्याशी जोडलेली आहे.
0000

इंडियन आयडॉल 15: स्नेहा शंकरची निवड-नेपोटिझम की अस्सल प्रतिभा?

भारताचा अत्यंत लाडका गायन रियालिटी शो इंडियन आयडॉल आपला 15 वा सीझन घेऊन, देशातले अनोखे आवाज घेऊन सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवर परत येत आहे. ऑडिशनमध्ये असामान्य गान प्रतिभा लाभलेले अनेक स्पर्धक समोर आले. अशीच एक स्पर्धक म्हणजे 18 वर्षांची स्नेहा शंकर.

स्नेहा शंकर ही भारतीय फिल्म संगीतकार आणि गायक राम शंकर यांची मुलगी आहे. राम शंकर यांनी प्रामुख्याने बॉलीवूडमध्ये काम केले आहे आणि आजही ते भारतीय संगीत क्षेत्रात योगदान देत आहेत. स्नेहाचा जन्म मुंबईत एका संगीतप्रेमी आणि गायकांच्या घराण्यात झाला. स्नेहाचे आजोबा स्व. श्री. शंकरजी एक प्रसिद्ध सूफी गायक होते, ते आपल्या शंभूजी या भावासोबत जोडीत गात असत. त्या दोघांनी मिळून ‘शंकर शंभू कव्वाल’ असे मोठे नाव कमावले होते. स्नेहा या स्पर्धेत आली, तेव्हा परीक्षकांनी तिला ओळखले पण विशाल ददलानीला तिने केलेली गाण्याची निवड पसंत पडली नाही. तिने सूफीपेक्षा वेगळे काही तरी गायला हवे होते असे त्याचे मत होते.

या विरुद्ध, बादशाह मात्र तिच्या एकंदर परफॉर्मन्सने खूप प्रभावित झाला आणि तिचे कौतुक करताना म्हणाला, “मी या आधी तुला कधीच ऐकलेले नाही. पण आज जेव्हा तू गायलीस आणि जेव्हा मला तुला मिळालेला वारसा समजला तेव्हा मला वाटले की तू योग्य गाणे निवडलेस. तू दिसतेस तर राम शंकरजींसारखीच, पण त्यांची परंपरा देखील पुढे नेणार असे वाटते आहे. जेव्हा विशाल सरांनी तुझ्या परफॉर्मन्सवर टिप्पणी केली तेव्हा मी मनातून घाबरलोच! माझे काही चुकते आहे का असे वाटू लागले, कारण मला तुझे गाणे फारच आवडले! असे गाणारे स्पर्धकच आम्हाला हवे आहेत. पण, विशाल सर म्हणाले तसे तू हे लवकर शिकले पाहिजे. असा विचार कर की एक रेषा आहे, जिच्या एका बाजूला सुरक्षितता आणि कम्फर्ट आहे. तू कम्फर्टच्या जितकी जवळ राहशील तितकी महानतेपासून दूर राहशील आणि महानतेच्या जवळ जाण्यासाठी तुला कम्फर्टपासून दूर जावे लागेल. हा तुझा कम्फर्ट झोन आहे. आणि येथे तुझी कामगिरी उत्तम आहे. तुझ्यात महान बनण्याची पूर्ण क्षमताही आहे. मला माहीत आहे, हे इंडियन आयडॉल आहे आणि तू शंकरचा वारसा घेऊन आली आहेस, पण जर तू हे करू शकली नाहीस तर दुसरे कोण करू शकणार?”

रेल्वे बुकिंग कालावधी कमी करण्याचा मोदी सरकारचा निर्णय एजंटसाठी की जनतेसाठी? -माजी आमदार मोहन जोशी

पुणे – रेल्वे तिकीट आरक्षणाचा (बुकिंग) कालावधी १२० दिवसांवरून ६० दिवसांवर आणण्याचा मोदी सरकारचा निर्णय सामान्य जनतेच्या सोयीचा नसून एजंटांच्या फायद्याचा आणि सरकारच्या नफेखोरीसाठी घेतलेला आहे, असा आरोप प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष, माजी आमदार मोहन जोशी यांनी केला आहे.

रेल्वे प्रवासाचे तिकीट बुकिंग १२० दिवस अगोदर करण्याची मुभा होती. तीर्थयात्रा, सहली, मंगलकार्य अशासाठी सामान्य प्रवासी १२० दिवस आधीच बुकिंग करून ठेवत असे. याचा फायदा त्यांना सवलत मिळविण्यासाठी आणि दीर्घ प्रवासाचे नियोजन करण्यासाठी होत असे. ही सवय लोकांच्या अंगवळणी पडली होती. रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी अचानकपणे बुकिंग चा कालावधी१२० दिवसांवरून ६० दिवसांवर आणला. मध्यमवर्गीय प्रवासी यामुळे नाराज झाले आहेत. कालावधी कमी केल्याने सरकारला सवलती द्याव्या लागणार नाहीत, मोदी सरकारची नफेखोरी चालू रहाणार आहे आणि एजंटांचे फावणार आहे, असे मोहन जोशी यांनी पत्रकात म्हटले आहे.

रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या या निर्णयाचा निषेध करतो. रेल्वे खात्याचा कारभार सामान्य माणसासाठी सोयीचा न रहाता वैष्णव यांच्या काळात अव्यवहार्य आणि मनमानी राहिलेला आहे, असे मोहन जोशी यांनी पत्रकात म्हटले आहे.

ज्येष्ठ नागरिकांची सवलत चालू ठेवा

वयाची साठी उलटलेल्या ज्येष्ठ नागरिकांना रेल्वे तिकीटात सवलत दिली जात होती. करोना साथीचे निमित्त करून मोदी सरकारने ती सवलत रद्द केली. ती सवलत अद्यापपर्यंत पुन्हा सुरू झालेली नाही. अनेक वर्ष ज्येष्ठ नागरिकांसाठी मिळत असलेली ही सवलत पुन्हा चालू करावी, अशी मागणी मोहन जोशी यांनी पत्रकात म्हटले आहे.

मुस्लिम समाजाचे आजचे आंदोलन स्थगित

पिंपरी पुणे (दि. १८ ऑक्टोबर २०२४) मुस्लिम समाजाच्या धार्मिक स्थळांवर होत असलेल्या भेदभावपूर्वक कारवाईच्या विरुद्ध तसेच कोणत्याही धर्मीयांची प्रार्थना स्थळे पाडू नये या प्रमुख मागणीसाठी आज शुक्रवारी (दि.१८ नोव्हेंबर) दुपारी पिंपरी महानगरपालिका भवन येथे मूक धरणे आंदोलन आयोजित केले होते. सदर आंदोलन प्रशासनाची झालेल्या सकारात्मक चर्चेमुळे पुढील दोन महिन्यांसाठी स्थगित करण्यात आलेले आहे.
महानगरवपालिक आयुक्त व पोलिस आयुक्त तसेच शिष्ठमंडळाशी झालेल्या चर्चेत खालील मागण्या मंजुर करण्यात आल्या आहेत.
१) मुस्लिम समाजाच्या तसेच अन्य कोणत्याही धार्मिक स्थळांवर (विकास कामांच्या आड येणाऱ्या स्थळांव्यतिरिक्त) कारवाई करण्यात येणार नाही.
२) मुस्लिम समाजाला दिल्या जात असलेल्या भेदभावपूर्वक वातावरणाची वस्तुस्थिती लक्षात घेता पुढील कालावधीमध्ये मुस्लिम धर्मियांची प्रार्थना स्थळे मदरसे, दफनभूमी इत्यादीसाठी पालिकेच्या वतिने विकास आराखड्यात जागा आरक्षित करून देण्यात येतील.
३) पिंपरी चिंचवड महानगरपालिका हद्दीत राहणाऱ्या मुस्लिम समाज बांधवांसाठी एकावेळी पाच हजार लोक सामावले जातील या क्षमतेचे सांस्कृतिक भवन अर्थात मुस्लिम कम्युनिटी सेंटर उभे करण्यात येईल.
४) महानगरपालिकेच्या उर्दू शाळेतील वर्ग संख्या वाढवण्यात यावी तसेच उर्दू शिक्षकांची नव्याने भरती करून यापूर्वीच्या व आताच्या शिक्षकांना कायम सेवेत सामावून घेण्यात येईल.
५) मुस्लिम समाजाकडून गेल्या अनेक वर्षापासून स्लॉटर हाऊस सुरू करण्याची मागणी आपणाकडे करण्यात येत असून यास आपण वेळोवेळी सहमती दर्शवलेली आहे. तरी सदर स्लॉटर हाऊस तात्काळ उभारण्यात येईल. तात्पुर्ती व्यवस्था लवकरच करु असेही अश्वासन दिले आहे.

या सकारात्मक चर्चे मुळे आज शुक्रवारी होणारे मूक धरणे आंदोलन रद्द केले आहे, याची नोंद घ्यावी अशी विनंती आंदोलनाचे आयोजक शहाबुद्दीन शेख, राहुल डंबाळे, याकुब शेख, युसुफ शेख, हाजी गुलाम रसुल, फजल शेख यांनी केली आहे.

बाणेर टेकडीवर पायी चालायला जाणाऱ्यांना लुटणारी टोळी जेरबंद

पुणे-बाणेर टेकडीवर पायी चालायला जाणाऱ्यांना लुटणाऱ्या एका १९ वर्षीय तरुणासह २ अल्पवयीन मुलांना चतुःश्रृंगी पोलिसांनी पकडून त्यांच्याकडून लुटीचा ऐवाझी हस्तगत केला आहे .

या संदर्भात पोलीसंनी सांगितले कि,’बाणेर पोलीस स्टेशनचे हद्दीमध्ये दिनांक-१३/१०/२०२४ रोजी १६/१५ वाजे चे सुमारास, बाणेर टेकडी, बाणेर पुणे. येथे वॉकींग करण्यासाठी गेलेल्या नागालँन्ड मधील महिला फिर्यादी नामे अबिनीयु खांन्गबुबो चवांग, वय-३६ वर्ष, धंदा-नोकरी, रा-रोहन निल अपार्टमेंन्ट, जी/ब्लॉक, फलॅट नं.१०१, औंध पुणे. मुळपत्ता-समजीरम गाव, जल्युकेई जि. पेरेन, राज्य-नागालँन्ड, या व त्यांची मैत्रीण नामे चिंगमलिऊ पामेई, अपर पामेई असे वॉकींग करुन परत जात असताना ०४ अनोळखी इसमांनी सदर ठिकाणी येवुन त्यांना शिवीगाळ करुन त्यांना लोखंडी हत्याराने मारहाण करुन त्यांचेकडील अॅपल कंपनीचा मोबाईल फोन, बर्डस, सॅक असा एकुण ५१,०००/-रुपये किंमतीचा मुददेमाल, जबरदस्तीने हिसकावुन घेवुन पळुन गेले होते त्याबाबत यातील फिर्यादी यांनी दिले तक्रारीवरुन चतुःश्रृंगी पोलीस स्टेशन, पुणे शहर, गु.र.नं. ८११/२०२४ भारतीय न्याय संहिता कलम-३०९ (६), ३५२,३ (५), महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम-३७ (१) (३) सह-१३५ प्रमाणे गुन्हा दाखल आहे.

दाखल गुन्हयाचे घटनास्थळी वरिष्ठांनी भेट देवुन दाखल गुन्हयाबाबत सुचना दिल्याने सदर गुन्हयाचा पुढील तपास हा वरिष्ठांचे मार्गदर्शनाखाली तपास पथकातील अधिकारी व अंमलदार करीत असताना तपास पथकातील अधिकारी/अंमलदार यांनी यातील आरोपीची गोपनीय बातमीदारामार्फत माहिती प्राप्त करुन यातील आरोपी नामे द्रापेत ऊर्फ विशाल प्रभाकर समुखराव, वय-१९ वर्ष, रा-कुंभार यांची चाळ, बोराडेवाडी, गोल्ड जिम समोर, वाघेश्वर कॉलनी, जाधवाडी चिखली पुणे. मुळपत्ता-मु.पो. म्हाळुंगी, ता. चाकुर, जि. लातुर व ०२ विधीसंघर्षीत बालक यांचा हददीत/परहददीत शोध घेवुन त्यांचा मोटार सायकलवर पाठलाग करुन त्यांना शिताफीतीने ताब्यात घेवुन त्यांना दाखल गुन्हयात अटक करुन त्यांचेकडुन दाखल गुन्हयात जबरदस्तीने हिसकावुन चोरुन नेलेला व गुन्हा करताना वापरलेली मोटार सायकल व लोखंडी धातुचा कोयता असा एकुण-०१,१०,७००/-रुपये किंमतीचा मुददेमाल हस्तगत केला आहे.

तसेच सदरची कामगिरी ही पोलीस आयुक्त पुणे शहर. अमितेशकुमार, सह पोलीस आयुक्त रंजनकुमार शर्मा, अपर पोलीस आयुक्त पुर्व प्रादेशिक विभाग पुणे शहर, मनोज पाटील, पोलीस उप-आयुक्त परिमंडळ-०४ पुणे शहर हिंम्मत जाधव, सहायक पोलीस आयुक्त खडकी विभाग, पुणे शहर अनुजा देशमाने, यांचे मार्गदर्शनाखाली बाणेर पोलीस स्टेशन पुणे शहर चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक, महेश बोळकोटगी, चतुः श्रृंगी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक, विजयानंद पाटील, तपास पथकाचे अधिकारी, पोलीस उप-निरीक्षक, प्रणिल चौगले, पोलीस हवालदार श्रीकांत वाघवले, पोलीस हवालदारबाबुलाल तांदळे, पोलीस हवालदारसुधाकर माने, पोलीस हवालदारइरफान मोमीन, पोलीस हवालदारबाबासाहेब दांगडे, पोलीस हवालदारश्रीधर शिर्के, यांनी केली आहे.

कार्यकर्त्यांच्या योगदानामुळे समाज समृद्ध होतो: डॉ. मनमोहन वैद्य

पुणे :

विवेकानंद केंद्राचे जीवनव्रती ज्येष्ठ कार्यकर्ते विश्वास लपालकर यांनी  तीस वर्षांत अरुणाचल प्रदेश आणि आसाम या प्रांतात दिलेल्या शैक्षणिक योगदानाचा,अनुभवांचा  आढावा घेणाऱ्या ‘अरुण रंग’  या पुस्तकाचे प्रकाशन   पुण्यात संघ परिवारातील मान्यवरांच्या   हस्ते झाले . विवेकानंद केंद्र कन्याकुमारी, महाराष्ट्र प्रांत मराठी प्रकाशन विभागाने हे पुस्तक प्रकाशित केले आहे.डॉ.मनमोहन वैद्य(अ.भा.कार्यकारिणी सदस्य,रा.स्व.संघ ),प्रदीप जोशी(सह प्रचारप्रमुख, रा.स्व.संघ ),भानुदास धाक्रस (अखिल भारतीय महासचिव, विवेकानंद केंद्र, कन्याकुमारी) या मान्यवरांच्या हस्ते हे प्रकाशन  गणेश सभागृह(न्यू इंग्लिश स्कूल,टिळक रस्ता ) येथे झाले.

विश्वास लपालकर यांनी १९८१ ते २०११ या तीस वर्षांत अरुणाचल प्रदेश आणि आसाम या प्रांतात शैक्षणिक उपक्रमांच्या संचालनादरम्यान तेथील जन-जीवनाचा घेतलेला अनुभव आणि त्यांना भेटलेल्या पालकांच्या,विद्यार्थ्यांच्या आठवणी यावर  ‘अरुण’ रंग’ हे पुस्तक आधारित आहे.विवेकानंद केंद्राचे जीवनव्रती, पश्चिम बंगाल आणि अंदमान प्रांताचे संघटक म्हणून विश्वास लपालकर यांनी योगदान दिले आहे.डॉ. गो. बं. देगलूरकर,अभय बापट (प्रांत प्रमुख,विवेकानंद केंद्र),किरण कीर्तने( प्रांत संचालक,विवेकानंद केंद्र),सुधीर जोगळेकर(सचिव,विवेकानंद केंद्र कन्याकुमारी, महाराष्ट्र प्रांत मराठी प्रकाशन विभाग) उपस्थित होते. पुस्तकाचे प्रकाशनानंतर  श्री.लपालकर यांच्याशी अनौपचारिक गप्पागोष्टीचे आयोजन करण्यात आले . शैलेंद्र बोरकर यांनी सूत्रसंचालन केले.सुधीर जोगळेकर यांनी प्रास्ताविक केले.सुनील कुलकर्णी,सौ.कांचन जोशी यांनी लपालकर यांची प्रकट मुलाखत घेतली.

डॉ. मनमोहन वैद्य म्हणाले,’ अरुणाचल मध्ये श्री. लपालकर यांच्या सारख्या कार्यकत्यांनी जिद्दीने प्रतिकूल परिस्थितीत योगदान केले.हे पुस्तक वाचून वाचकांच्या मनात ध्येय्य जागृती होऊ शकते.  या पुस्तकात अनुभवाचे बोल असल्याने त्याची शक्ती मोठी आहे.

   कार्यकर्त्यांच्या योगदानामुळे समाज समृद्ध होतो. समाजाला काही ना काही देत राहणे, हाच धर्म आहे. उपासना वेगळी असू शकते. हाच विचार भारताचा प्राण आहे. भारतातील समाज हा धर्मावर टिकलेला आहे. आध्यात्मिकता जागवून भारत घडवायचा आहे. त्यातून जीवन सार्थक होईल. 

भानुदास धाक्रस यांनी विवेकानंद केंद्राच्या कार्यात जीवनव्रतींचे योगदान उलगडून सांगितले. ते म्हणाले,’राष्ट्र बलशाली करण्याचे व्रत प्रत्येकाने घेतले पाहिजे. स्वामी विवेकानंदांचे विचार सर्वत्र पोहोचवले पाहिजे. त्याग, सेवा करीत मार्गक्रमण करावे.’

विश्वास लपालकर म्हणाले,’युवकांसाठी महाविद्यालयात काम करण्याची प्रेरणा एकनाथ रानडे यांनी दिली.अरुणाचल मध्ये लोकांचे मन फार मोठे आहे. त्याचा पदोपदी अनुभव घेतला आणी तिथेच काम करण्याचे ठरवले.विवेकानंद केंद्राच्या कामात लवचिकता आहे आणि आत्मीयता आहे.सातत्याने प्रवास करून कष्टप्रद काम केले कारण विवेकानंद केंद्रासाठी घराघरात प्रार्थना होते. विवेकानंद केंद्राचे काम समाजामुळेच उभे आहे.’

प्रदीप जोशी म्हणाले,’ कार्यकर्त्याच्या जीवनातील प्रसंगांचे पुस्तक होणे, ही महत्वपूर्ण घटना आहे. कोणताही डोंगराळ प्रदेशातील समाज आपल्या पासून वाटतो तितका दूर नाही,हे या पुस्तकातून लक्षात येते.या समाजाची प्रगती होताना पाहिली की निरलस कार्यकर्त्यांनी केलेल्या योगदानाची कल्पना येते. त्यातून सकारात्मक, सृजनात्मक शक्ती उभी राहत आहे. कार्यकर्त्यांची सर्वसमावेशकता अशा कामात उपयोगी पड़ते.

बलशाली समाज निर्मितीसाठी संस्कारक्षम ग्रंथ निर्मिती विवेकानंद केंद्र मराठी प्रकाशन विभागातर्फे केली जाते, अशी माहिती सुधीर जोगळेकर यांनी दिली. अरुण रंग हे या प्रकाशन विभागाचे १६६ वे पुस्तक आहे, असेही त्यांनी सांगितले.

७५ व्या वषा वर्षात पदार्पण केल्याबद्दल प्रदीप जोशी यांच्या हस्ते श्री. लपालकर आणि सौ. सुजाता लपालकर यांचा सत्कार केला.

स्वामी विवेकानंद यांच्या समग्र चरित्राच्या तिसऱ्या आवृत्तीचे प्रकाशनही करण्यात आले

बाबा सिद्दिकींच्या हत्येनंतर केंद्रीय यंत्रणेकडून शरद पवारांना झेड प्लस सुरक्षा घेण्याचा आग्रह

मुंबई–माजी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते बाबा सिद्दिकी यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. बाबा सिद्दिकींच्या हत्येनंतर केंद्रीय सुरक्षा यंत्रणा सावध झाली असून राज्यातील आढावा घेतला. यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांना झेड प्लस सुरक्षा देण्याबाबत निर्णय घेतला असल्याचे बोलले जात आहे. यासाठी सुरक्षा यंत्रणा शरद पवार यांच्याशी संपर्क साधणार आहे. दरम्यान, केंद्रीय यंत्रणांनी यापूर्वीही शरद पवारांना झेड प्लस सुरक्षा प्रदान केली होती, पण तेव्हा शरद पवारांनी सुरक्षा नाकारली होती.

काही दिवसांपूर्वी बाबा सिद्दिकी यांची वांद्रे पूर्व येथे रात्रीच्या सुमारास गोळ्या झाडून हत्या केली होती. बिश्नोई टोळीने या हत्येची जबाबदारी स्वीकारली होती. विधानसभा निवडणुकांच्या आधी घडलेल्या या घटनेमुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली होती. या घटनेमुळे केंद्रीय यंत्रणा सज्ज झाल्या असून त्यांनी राज्यातील सुरक्षेचा आढावा घेतला आहे.

या दरम्यान, केंद्रीय यंत्रणांकडून खासदार शरद पवार यांना झेड प्लस सुरक्षा घेण्याबाबत विनंती केली आहे. मात्र, शरद पवारांना धोका काय आहे? याबाबत कोणतही माहिती समोर आली नाही. फक्त शरद पवारांनाच या धोक्याबाबत माहिती देण्यात आल्याचे म्हटले जात आहे. त्यामुळे झेड प्लस सुरक्षाबाबत शरद पवार काय निर्णय घेतात, हे पहावे लागणार आहे.केंद्र सरकारने याआधी देखील झेड प्लस सुरक्षा दिली होती. मात्र, शरद पवार यांनी या सुरक्षेबाबत संशय व्यक्त करत ती सुरक्षा घेण्यास नकार दिला होता. झेड प्लस सुरक्षा म्हणजे निवडणुकीच्या काळात खात्रीलायक माहिती मिळवण्याची व्यवस्था असू शकते, असे शरद पवार त्यावेळी म्हणाले होते.

विधानसभा निवडणुकीदरम्यान पैशांचा गैरवापर रोखण्यासाठी मुंबई प्राप्तिकर विभागाने स्थापन केला 24×7 नियंत्रण कक्ष

नागरिक फोन, व्हॉट्सॲप किंवा टेक्स्ट मेसेज किंवा ईमेलद्वारे याबाबत माहिती कळवू शकतात

मुंबई, 17 ऑक्टोबर 2024

आगामी महाराष्ट्र राज्य विधानसभा निवडणूक, 2024 दरम्यान पैशांचा  गैरवापर  रोखण्यासाठी मुंबई प्राप्तिकर विभाग वचनबद्ध आहे. मुक्त आणि निष्पक्ष निवडणुका सुनिश्चित करण्यासाठी आणि निवडणुकीचे पावित्र्य कायम राखण्यासाठी, 24×7 कार्यरत असलेल्या निवडणूक खर्च देखरेख यंत्रणेचा समावेश असलेला नियंत्रण कक्ष मुंबई प्राप्तिकर विभागाने स्थापन केला आहे.  आदर्श आचारसंहिता लागू असेपर्यंत हा नियंत्रण कक्ष कार्यरत राहील.  हा नियंत्रण कक्ष कर्तव्यनिष्ठ जनतेला आणि राज्यातील नागरिकांना निवडणूक प्रचारासाठी वापरल्या जाणाऱ्या रोख आणि मौल्यवान वस्तूंबद्दल माहिती देण्यासाठी सक्षम बनवेल. खालील टोल फ्री क्रमांक, व्हॉट्सॲप नंबर किंवा टेक्स्ट मेसेज क्रमांक आणि ईमेलद्वारे नियंत्रण कक्षाला माहिती देता येईल :

टोल फ्री क्रमांक: 1800-221-510

व्हॉट्सॲप किंवा टेक्स्ट मेसेज क्रमांक: 8976176276/ 8976176776

ईमेल आयडी: mumbai.addldit.inv7@incometax.gov.in

नियंत्रण कक्षाचा पत्ता: खोली क्र.  316, तिसरा मजला, सिंधिया हाऊस, बॅलार्ड इस्टेट, मुंबई-400001

सुस्वरांनी रंगली राहुल देशपांडे यांची संगीत संध्या

देशप्रेमी मित्र मंडळातर्फे राहुल देशपांडे लाईव्ह इन कॉन्सर्टचे आयोजन
पुणे : विविध रागांनी सजलेले सूर, तबल्याची अप्रतिम साथ आणि कलाकारांच्या मंत्रमुग्ध करणाऱ्या सादरीकरणाला रसिकांची मनमुराद दाद अशा संगीत आणि सुरांच्या मिलापाने गायक राहुल देशपांडे यांची संगीत मैफल रंगली. 
देशप्रेमी मित्र मंडळाच्या वतीने कोथरूड मधील गांधी लॉन्स येथे राहुल देशपांडे लाईव्ह इन कॉन्सर्ट चे आयोजन करण्यात आले होते. सूर, ताल आणि लय यांनी नटलेल्या या मैफिलीमध्ये रसिकांनी राहुल देशपांडे यांच्या गायकीचा मनमुराद आनंद लुटला. निखिल पाठक, विशाल धुमाळ आणि प्रसाद जोशी यांनी राहुल देशपांडे यांच्या मैफिलीला साथ संगत केली. मंदार बलकवडे यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. केंद्रीय सहकार आणि विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. सोलवूड वेंचर्स  आणि मॅजेस्टिक लँडमार्क यांनी कार्यक्रमाच्या संयोजनासाठी सहकार्य केले. 
पुरिया धनश्री रागातील ‘पायलिया झंकार बाजे’ या गाण्याने राहुल देशपांडे यांनी आपल्या मैफिलीला सुरुवात केली. ‘पिया समझावत, समझत नाही पायलिया मोरे’ या गाण्याने रसिकांना मंत्रमुग्ध केले. पंडित वसंतराव देशपांडे यांनी अजरामर केलेली  बिंदिया ले गयी हमारी रे मछलिया जाये काही कोई मोरे छोटे देवर’ से या ठुमरी ने राहुल देशपांडे यांनी रसिकांची मने जिंकली. ‘बगळ्यांची माळ फुले अजुनी अंबरात भेट आपली का स्मरशी काय तो मनात’ या पंडित वसंतराव देशपांडे यांच्या अप्रतिम गाण्याचे सादरीकरण करून राहुल देशपांडे यांनी रसिकांना आपल्या सुमधुर स्वरांनी जिंकले.
राहुल देशपांडे म्हणाले, कोथरूड मधील या भागामध्ये मी प्रथमच इतक्या मोठ्या प्रमाणावर सांघिक कार्यक्रमाचे आणि तेही शास्त्रीय गाण्याच्या कार्यक्रमाचे आयोजन झालेले पाहत आहे. मंदार बलकवडे यांनी या कार्यक्रमाचे अत्यंत काटेकोरपणे आयोजन करून त्यांनी त्यांची संगीताविषयी आणि कलाकारांविषयी असलेले प्रेम दाखवून दिले आहे. शास्त्रीय संगीत लोकांच्या घराघरापर्यंत आणि विशेषता तरुणांपर्यंत पोहोचविण्यासाठी अशा प्रकारच्या भव्यदिव्य कार्यक्रमांचे आयोजन केले पाहिजे. आदिती द्रविड यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.