Home Blog Page 639

भोर येथील विक्रम दादासाहेब गायकवाड या तरुणाच्या हत्येची महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती जमाती आयोगाकडून गंभीर दखल – आयोगाचे उपाध्यक्ष ॲड. धर्मपाल मेश्राम

पुणे दि. १: भोर तालुक्यातील उत्रोली येथील विक्रम दादासाहेब गायकवाड या अनुसूचित जातीमधील उच्चशिक्षित तरुणाची झालेली निर्घृण हत्या ही अत्यंत निंदनीय व मनाला क्लेश देणारी निघृण घटना असून महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती जमाती आयोगाने या घटनेची अत्यंत गंभीर दखल घेतली असल्याचे आयोगाचे उपाध्यक्ष तथा सदस्य ॲड. धर्मपाल मेश्राम यांनी सांगितले. शांतता सलोखा टिकवणे ही शासन, प्रशासन व संपूर्ण जनतेची देखील जबाबदारी आहे, असेही ते म्हणाले.

बारामती येथे माध्यम प्रतिनिधींशी शुक्रवारी (२८ फेब्रुवारी) संवाद साधताना ते बोलत होते.

ते पुढे म्हणाले, विक्रम गायकवाड या तरुणाची दि. ८ फेब्रुवारी रोजी हत्या झाल्याची घटना घडली. त्या अनुषंगाने भोर येथे त्याचे आई, बहीण, भाऊ, काका आणि परिसरातील लोकांशी भेट घेऊन चर्चा केली. तसेच अतिरिक्त पोलीस आयुक्त गणेश बिरादर, भोर प्रांताधिकारी विकास खरात, जिल्ह्याचे समाज कल्याण सहाय्यक आयुक्त विशाल लोंढे आणि तपास अधिकारी पोलीस उपअधीक्षक तानाजी बर्डे यांच्यासोबत बैठक घेऊन या प्रकरणाबाबत चर्चा केली.

विक्रम याच्या परिवारावर झालेला अन्याय आयोग खपवून घेणार नाही असे सांगून त्यांनी पुढे सांगितले, या प्रकरणात विक्रमच्या परिवाराने संपूर्ण पोलीस तपासावर शंका व्यक्त केली आहे. विक्रमचा नोंदणीकृत पद्धतीने विवाह झाला होता त्या मुलीच्या संपूर्ण परिवारावर विक्रमच्या कुटुंबीयांचा आक्षेप आहे. या हत्येच्या अनुषंगाने अनुज उर्फ बाबू मल्हारी चव्हाण (वय २४ वर्षे) हा आरोपी स्वतः पोलीसांसमोर हजर झाला असून पोलिसांनी त्याला संशयित आरोपी म्हणून ताब्यात घेतले असून हाच आरोपी असल्याच्या प्राथमिक निष्कर्षाप्रत पोलीस पोहोचलेले आहेत. तथापि, हा ‘ऑनर किलिंग’चा प्रकार असावा अशा पद्धतीची शंका घेत मृतक विक्रम गायकवाड यांच्या कुटुंबीयांनी मुलीच्या परिवारावर आक्षेप घेतला आहे.

या प्रकरणाच्या अनुषंगाने तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष भरत नारायण शिवतारे यांच्याशी देखील चर्चा केली असून त्यांनी ४ ते ८ फेब्रुवारीपर्यंतचा संपूर्ण घटनाक्रम कथन केला. यामध्ये तपासामध्ये अक्षम्य कुचराई झाल्याचे आपले निरीक्षण असल्याचे त्यांनी सांगितले.

या प्रकरणाचा तपास स्वतः पोलीस अधीक्षक यांनी धुरा सांभाळत करावा, असे स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत. तसेच ७ तारखेपर्यंत या प्रकरणाचा सखोल तपास करून तपशीलवार अहवाल आयोगासमोर सादर करावा, भोर उपविभागीय अधिकारी, समाजकल्याण प्रादेशिक उपायुक्त तसेच जिल्ह्याचे समाज कल्याण सहाय्यक आयुक्त यांनीही आपला स्वतंत्र अहवाल सादर करावा असेही निर्देश दिल्याचे ॲड. मेश्राम यांनी सांगितले.

सामाजिक न्याय विभागाला नियमानुसार ४ लाख १२ हजार २५० रुपयांची रक्कम विक्रमच्या आईच्या खात्यामध्ये जमा करण्याचे निर्देश देण्यात आले असून चार्जशीट दाखल केल्यानंतर पुढची उर्वरित तेव्हढीच रक्कम त्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यात येईल. तसेच परिवारातील एका व्यक्तीस राज्य शासनाच्यावतीने नोकरी देण्यात येईल. त्या अनुषंगानेही निर्देश आजच्या आढावा बैठकीत देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

तलावांच्या सुशोभीकरणासाठी दोन कोटी रुपये खर्च करणार

तलावालगत असलेल्या उद्यानामध्ये लाकडाची बाके बसविणार
पाण्याचे कारंजे उभारणार
भिंतींचे रंगकाम केले जाणार
पदपथ तयार केले जाणार
तलावाला सीमाभिंत बांधणार
तलावात कचरा टाकण्यास बंदी

पुणे : पुणे शहरातील कात्रज, पाषाण, पेशवे तसेच मॉडेल कॉलनी येथील तलावांचे सुशोभीकरण केले जाणार असून यासाठी दोन कोटी रुपयांचा निधी खर्च केला जाणार आहे.

पाषाण तलावासाठी ४१ लाख ८८ हजार रुपये, कात्रज तलावासाठी ४१ लाख ८८ हजार रुपये आणि मॉडेल कॉलनी तलावासाठी ४९ लाख ४२ हजार लाख रुपये खर्च केले जाणार आहेत. तसेच, पेशवे तलावासाठी ४९ लाख रुपयांच्या निविदा काढण्यात आल्या होत्या. त्याला मान्यता देण्याचे प्रस्ताव महापालिकेच्या स्थायी समितीसमोर सादर करण्यात आले होते. त्याला स्थायी समितीच्या बैठकीत या प्रस्तावास मान्यता देण्यात आली आहे.या प्रकल्पात तलावाच्या परिसरात झाडे लावणे, काँक्रीटचे रस्ते तयार करणे, कचऱ्याची योग्य विल्हेवाट लावणे आणि तलावाभोवती जॉगिंग ट्रॅक बांधणे असे प्रस्तावित आहे. तलावांजवळ कचरा टाकणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाणार आहे. केंद्र सरकारच्या स्वच्छ भारत अभियानांतर्गत ही कामे केली जाणार आहेत. यासाठी निविदा प्रक्रिया राबविण्यात आली असून, महापालिकेच्या स्थायी समितीच्या बैठकीत या निविदांना मान्यता देण्यात आली.महापालिकेच्या वतीने दर वर्षी शहरातील जलपर्णी काढण्यासाठी खर्च केला जातो. तसेच, तलावांच्या स्वच्छतेसाठीदेखील खर्च होतो. केंद्र सरकारच्या स्वच्छ भारत मोहिमेंतर्गत महापालिकेला दोन कोटी रुपयांचा निधी तलावांच्या सुशोभीकरणासाठी महापालिकेला मिळाला होता. त्यामधून शहरातील चार तलावांच्या सुशोभीकरणाचे काम केले जाणार आहे. घनकचरा व्यवस्थापन विभागाने याच्या निविदा काढल्या होत्या.

ड्रेनेजमुळे पाणी दूषित होत असल्याने, तलाव स्वच्छ करण्याचे काम महापालिकेने हाती घेतले आहे. २०१७ मध्ये, महापालिकेने कात्रज तलावात येणाऱ्या प्रक्रिया न केलेल्या पाण्यासाठी ड्रेनेज यंत्रणा तयार केली. शिवाय, महापालिकेकडून सध्या दररोज दोन दशलक्ष लिटर क्षमतेचा सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प बांधला जात आहे. पुणे शहर राहण्यासाठी सुंदर आणि प्रदूषणमुक्त करण्याचा प्रयत्न केला जात आहे. हवेची गुणवत्ता ढासळत असताना या प्रकल्पांमुळे पर्यावरणाचे संतुलन राखण्यास मदत होणार आहे, असे या प्रस्तावांमध्ये म्हटले आहे.

वृद्धेश्वर सिद्धेश्वर मंदिर हे पुनवडी ते पुण्यनगरी या समृद्ध प्रवासाचे साक्षीदार-उपमुख्यमंत्री अजित पवार

पुणे: श्री वृद्धेश्वर सिद्वेश्वर मंदिर हे पुणेकरांचे श्रद्धास्थान असलेले देवस्थान आहे. राजमाता जिजाऊंनी बालशिवबा यांना सोबत घेऊन सोन्याचा नांगर फिरवून पुण्याची स्थापना केली. त्यावेळचे पुनवडी ते आताचे पुणे या समृद्ध प्रवासाचे साक्षीदार हे श्री  वृद्धेश्वर सिद्धेश्वर मंदिर असल्याचे गौरवोद्गार उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काढले.

शिवाजीनगर मधील श्री वृद्धेश्वर सिद्धेश्वर देवस्थान ट्रस्ट तर्फे मंदिर परिसरातील दुमजली अभ्यासिका बांधकामाचे भूमिपूजन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी आमदार सिद्धार्थ शिरोळे, पुणे मनपा आयुक्त राजेंद्र भोसले, माजी स्थायी समिती अध्यक्ष बाळासाहेब बोडके, ट्रस्टचे अध्यक्ष हनुमंत बहिरट पाटील, सचिव सुधीर दुर्गे, खजिनदार शशिकांत भोसले, विश्वस्त महेश दुर्गे, संजय सातपुते आदी उपस्थित होते. यावेळी अजित पवार यांनी महादेवाचे दर्शन देखील घेतले.

अजित पवार म्हणाले, वृद्धेश्वर सिद्धेश्वर मंदिराला ऐतिहासिक व पौराणिक महत्व असून शिल्पकलेचा उत्तम नमुना आहे. धार्मिक कार्यासोबत सामाजिक सेवेचे सातत्य या ट्रस्टने कायम ठेवले आहे. पुणे हे जागतिक पटलावर महत्वाचे शहर म्हणून ओळखले जावे, असे काम करूया. पुरातन वास्तूंशी आपण भावनिकपणे जोडले गेले आहोत. त्यामुळे त्या पुढच्या पिढीपर्यंत टाकाव्या हा प्रयत्न करायला हवा, असेही त्यांनी सांगितले.

हनुमंत बहिरट पाटील म्हणाले, विश्वस्त मंडळाने मंदिराच्या परिसराचा विकास करण्यावर भर दिला आहे. समाजातील अनेक व्यक्तींना एकत्र आणून देवस्थानचे विकास करण्याचे उद्दिष्ट भविष्यातही साध्य करण्यात येणार आहे. त्यातील एक भाग म्हणून अभ्यासिका उभारण्यात येत असून पुढील वर्षभरात अभ्यासिकेच्या उभारणीचे काम पूर्ण होणार आहे. पुरातनपणा जपत नवीन सुद्धा देण्याचा प्रयत्न असल्याचे त्यांनी सांगितले.

आज समाजाला शुद्ध प्रबोधनाची गरज:प्रा.डॉ. श्रीपाल सबनीस

प्राचार्य रमणलाल शहा लिखित ‘छत्रपती शिवाजी महाराज एक युग प्रवर्तक सेनानी’ या ग्रंथाचे प्रकाशन

पुणे : जातीच्या जाणीवेने लिहिलेला इतिहास बाधित होतो. जातीयवाद समर्थनीय नाही. जितका ब्राह्मणांमध्ये जातिवाद आहे तितकाच मराठा आणि इतर जातीत देखील जातीयवाद पहायला मिळतो. त्यामुळे इतिहास अभ्यासून विवेकाने शिकवावा लागतो. आज संस्कृती बिघडली आहे. राजकारण रसातळाला गेले आहे. आजच्या काळात समाजाला शुद्ध प्रबोधनाची गरज आहे, असे मत अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष प्रा.डाॅ. श्रीपाल सबनीस यांनी व्यक्त केले.

प्राचार्य रमणलाल शहा लिखित छत्रपती शिवाजी महाराज एक युग प्रवर्तक सेनानी या ग्रंथाचे प्रकाशन महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या माधवराव पटवर्धन सभागृहात झाले. दीपलक्ष्मी नागरी सहकारी पतसंस्थेच्या वतीने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी भारती विद्यापीठाचे कुलपती डॉ.शिवाजीराव कदम, अर्थतज्ञ अभय टिळक, लेखक प्राचार्य रमणलाल शहा, उत्कर्ष प्रकाशनचे सुधाकर जोशी, महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या प्रमुख कार्यवाहक सुनिताराजे पवार, कार्यवाह शिरीष चिटणीस यावेळी उपस्थित होते.

प्रा.डॉ. श्रीपाल सबनीस म्हणाले, ब्राह्मण किंवा अभिजनांनी इतिहास चुकीचा लिहिला असे नाही. बहुजनांनी देखील चुकीचा इतिहास लिहिलेला आहे. अभिजन, बहुजन हा वेडेपणा आहे. गुण आणि दोष दोन्हीकडे आहेत. सर्व देशातील महापुरुष, सर्व धर्मातील संत, सर्व देशातील ज्ञान विज्ञान अध्यात्म या सर्वांच्या बेरजेवरच मानवधर्माचे भले होणार आहे. विष पेरणीच्या कालखंडात दुभंग वातावरणात रमणलाल शहा यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या वरील पुस्तक लिहून आदर्श निर्माण केला आहे, असेही त्यांनी सांगितले.

स्वारगेट येथे तरुणीवर बसमध्ये अत्याचार झाला. अशा घटना घडत असतील तर हा शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र कसा? छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श आहे का ? असा विचार करायला हवा. राजकारणांचे रयतेवर प्रेम नाही. राजकारण्यांवर रयतेचे प्रेम नाही तरीही लोकशाही चालू आहे याला लोकशाही म्हणायची का? असा प्रश्न श्रीपाल सबनीस उपस्थित केला.

डॉ. शिवाजीराव कदम म्हणाले, समाजाचे चारित्र्य घडविण्यासाठी पुस्तके आवश्यक आहेत. शिवाजी महाराज हे समाजासाठी दीपस्तंभासारखे आहेत. त्यामुळे त्यांच्यावरील पुस्तके सातत्याने यायला हवीत. लोक पुस्तके वाचतात आणि त्याचा फायदाही समाजाला होतो.  प्रा. शहा यांना लेखन करण्याकरिता घरामध्ये पोषक वातावरण करावे, त्यामुळे त्यांना आगामी काळात साहित्य निर्मिती करता येईल, असेही त्यांनी सांगितले. 

रमणलाल शहा म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविणे आवश्यक आहे. त्यासाठी प्राध्यापक आणि शिक्षक यांना तो आधी समजावून देण्याचा प्रयत्न मी आयुष्याच्या शेवटच्या काळापर्यंत करणार आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी मराठा या शब्दाला ओळख दिली. खेडूत तरुणांमधून त्यांनी मावळे उभे केले. ते चारित्र्यवान निष्कलंक राजे होते, असेही त्यांनी सांगितले. सुनीता राजे पवार, सुधाकर जोशी, अभय टिळक यांनी मनोगत  व्यक्त केले. सुजित शेख यांनी सूत्रसंचालन केले. नेहा शहा – दावडा यांनी आभार मानले. 

राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत विशेष तपासणी मोहिमेचा शुभारंभ

पुणे-राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत विशेष तपासणी मोहिमेचा शुभारंभ व राज्यस्तरीय मेळाव्याचे उद्घाटन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते औंध येथे करण्यात आले. शालेय शिक्षणमंत्री दादाजी भुसे (ऑनलाईन), सार्वजनिक आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर उपस्थित होते.प्रत्येक बालकाचे आरोग्य व उज्ज्वल भविष्याची जबाबदारी शासन पूर्ण निष्ठेने पार पाडत आहे. राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत बालकांना सशक्त व निरोगी जीवनाची हमी देण्याचे कार्य हे या मोहिमेतून सर्वांनी मिळून यशस्वी करुया,असे आवाहन उपमुख्यमंत्री श्री. पवार यांनी केले.

राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत राज्यातील ० ते १८ वर्षापर्यंतची बालके, किशोरवयीन मुला-मुलींची सर्वांगीण आरोग्यतपासणी करण्यात येणार आहे. जनजागृतीसाठी तयार करण्यात आलेले पोस्टर,बोधचिन्ह, ॲनेमियामुक्त भारत मोहीम पोस्टर्स व फ्लिप बुकचे अनावरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.‘निरोगी बालपण आणि सुरक्षित भविष्य’ या संकल्पनेवर आधारित राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम अंतर्गत विशेष तपासणी मोहीम आयोजित करण्यात आली आहे. राज्यातील ० ते १८ वर्षापर्यंतची बालकांची आरोग्य विषयक तपासणी करण्यात येणार आहे. बालकांमधील आजाराचे वेळेत निदान करुन त्यांच्यावर उपचार करण्यात येणार असून त्यांना आगामी काळात निरोगी व सुरक्षित आरोग्य जगता येणार आहे. त्यामुळे मुख्याध्यापक, शिक्षक, पालक तसेच आरोग्य विभागाच्या पथकांनी मिळून काटेकोरपणे नियोजन करावे. अतिशय नीटनिटके, पारदर्शक आणि लोकांप्रती उपयुक्त अशाप्रकाची कामे करुन ही मोहीम यशस्वी करण्याकरीता सर्वांनी प्रयत्न करावे, यामाध्यमातून आगामी काळात आरोग्यसंपन्न पिढी निर्माण करण्याचे काम करुया, असेही सार्वजनिक आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर म्हणाले.राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत विशेष तपासणी मोहिमेच्या शुभारंभप्रसंगी पुणे महानगर पालिकेचे आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील, आरोग्य सेवा संचालक डॉ. नितीन अंबाडेकर, शहरी आरोग्य सेवा संचालक डॉ. स्वप्नील लाळे, अतिरिक्त संचालक डॉ. बबिता कमलापूरकर आदी उपस्थित होते.

भारतातील विद्यार्थ्यांसाठी असलेली सर्वात मोठी रोबोटिक्स स्पर्धा; ६० संघांचा सहभाग

पुणे : शाळा आणि ज्युनियर कॉलेज विद्यार्थ्यांसाठी आयोजित भारतातील सर्वात मोठी रोबोटिक्स स्पर्धा ‘फर्स्ट टेक चॅलेंज इंडिया चॅम्पियनशिप २०२४-२५’ चे उद्घाटन आज विश्‍वकर्मा विद्यापीठच्या वतीने श्री शिव छत्रपती क्रीडांगण, बॉक्सिंग स्टेडियम, म्हाळुंगे, पुणे येथे अत्यंत उत्साहात पार पडले. या ऐतिहासिक स्पर्धेत देशभरातून ६० संघ आणि कझाकस्तान, श्रीलंका, युएई येथून ६ आंतरराष्ट्रीय संघ सहभागी झाले आहेत.

स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी विश्‍वकर्मा विद्यापीठचे कुलगुरू डॉ. सिद्धार्थ जाबडे, पद्मश्री प्रमोद कळे (पूर्व डायरेक्टर, इस्रो), Circanaचे विश्वनाथ शास्त्री आणि प्रगती चौहान, RTXचे अमित सावर्कर, बजाज ऑटोचे विकस साव्हनी, जॉन डिअरचे महेश मसूरकर, TMFचे सजीत चाकिंगल यांच्यासह विविध शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

डॉ. सिद्धार्थ जाबडे यांनी उद्घाटनप्रसंगी सांगितले, “फर्स्ट टेक चॅलेंज इंडिया चॅम्पियनशिपमध्ये सहभागी होणारे विद्यार्थी केवळ रोबोटिक्सच नाही, तर शालेय जीवनातही उत्कृष्टता साधतात. ही स्पर्धा त्यांना आत्मविश्वास, तांत्रिक ज्ञान आणि जीवन कौशल्ये मिळविण्याची संधी देतो. यावर्षीपासून विश्‍वकर्मा विद्यापीठ विद्यार्थ्यांना शिष्यवृत्त्या देण्याचा निर्णय घेतला आहे.”

Circanaचे विश्वनाथ शास्त्री म्हणाले, “तंत्रज्ञान, डेटा आणि अ‍ॅनालिटिक्समधील जागतिक नेत्याच्या रूपात, Circana ही स्पर्धा पुढे नेण्यासाठी तत्पर आहे. या स्पर्धेने विद्यार्थ्यांच्या सर्जनशीलतेला वाव दिला आहे आणि आम्ही भविष्यातील तंत्रज्ञान विशेषज्ञांना गती देण्यासाठी तसेच सहकार्य, नवकल्पना आणि शाश्वत उपायांचा विचार वाढवण्यासाठी यामध्ये सहभागी होऊ इच्छितो.”

या वर्षीच्या स्पर्धेची थीम ‘Dive’ Powered by Qualcomm असून, खेळाचे आव्हान ‘Into the Deep’ Powered by RTX आहे. विद्यार्थ्यांनी त्यांच्या STEM (साइन्स, टेक्नॉलॉजी, इंजिनियरिंग आणि मॅथमॅटिक्स) कौशल्यांचा वापर करून समुद्राच्या गाभ्यातील जीवन अन्वेषण करण्यासाठी अत्याधुनिक रोबोट तयार केले आहेत.

स्पर्धेतील प्रत्येक सामना २ मिनिट ३० सेकंदांचा असतो, आणि संघ संलग्नतेच्या प्रारूपावर आधारित असतो. उच्च-प्रदर्शन करणारे संघ पात्रता सामन्यानंतर एकमेकांचे संयोजन करणारे संघ निवडतात आणि पुढे एलिमिनेशन राऊंडमध्ये उतरतात. अंतिम सामना २ मार्च २०२५ रोजी होईल, आणि विजेत्या संघाला ह्यूस्टन, USA येथील FIRST वर्ल्ड चॅम्पियनशिप मध्ये भारताचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळेल, जी १५ ते १९ एप्रिल २०२५ दरम्यान होईल.

ही स्पर्धा विविध पार्श्वभूमी असलेल्या विद्यार्थ्यांसाठी एक खुला मंच बनली आहे. ग्रामीण भागातील शाळा, राज्यशासन चालवलेल्या शाळा, तसेच आंतरराष्ट्रीय शाळांमधून सहभागी झालेल्या संघांचा समावेश आहे. विशेष म्हणजे, श्रवण अडचणी असलेल्या विद्यार्थ्यांच्या शाळेतील संघ आणि मुंबईतील सिग्नल स्कूलचे संघ देखील या स्पर्धेत सहभागी झाले आहेत. यामुळे ही स्पर्धा समावेशक, प्रवेशयोग्य आणि सर्व विद्यार्थ्यांना समान संधी देणारी ठरली आहे.

प्रत्येक सहभागी संघाला आयोजकांकडून अत्याधुनिक रोबोटिक्स किट प्रदान करण्यात आले आहेत. स्पर्धेतील यांत्रिकी आणि इलेक्ट्रॉनिक्सचे ज्ञान आवश्यक असले तरी, प्रशिक्षकांनी विद्यार्थ्यांना त्यांची किट योग्यरीत्या वापरण्याबाबत मार्गदर्शन केले आहे.

सामाजिकदृष्ट्या अधिक समावेशक होण्यासाठी, Qualcomm, John Deere, Dow, RTX, Bajaj Auto Ltd आणि InfinityX STEM Foundation या नफा न कमावणाऱ्या संस्थांनी २० रोबोटिक्स किट गरीब विद्यार्थ्यांसाठी प्रायोजित केली आहेत. यामुळे रोबोटिक्स क्षेत्रात अधिक विद्यार्थ्यांचा सहभाग वाढण्यास मदत होईल.

फर्स्ट टेक चॅलेंज इंडिया चॅम्पियनशिप २०२४-२५ विद्यार्थ्यांना तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात करिअर साधण्याच्या दिशेने प्रोत्साहित करणारी एक महत्त्वपूर्ण पायरी आहे. यामुळे विद्यार्थ्यांमध्ये टीमवर्क, समस्या सोडवण्याची क्षमता आणि तांत्रिक कौशल्यांचे महत्त्व अधिक स्पष्टपणे समजते. तसेच, ही स्पर्धा विद्यार्थ्यांना नव्या विचारधारांची दारे उघडून देत असताना, त्यांना भविष्यातील तंत्रज्ञ, अभियंते आणि नवप्रवर्तनकर्ते बनण्याची प्रेरणा देत आहे.

एमपीएससी लिपिक आणि कर सहाय्यक भरतीसाठी निवड यादी जाहीर झाल्याने विद्यार्थ्यांना दिलासा

निवड झालेल्या विद्यार्थ्यांनी सत्कार करत मानले आमदार हेमंत रासने यांचे आभार

पुणे (दि १): महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (MPSC) जानेवारी 2023 मध्ये संयुक्त गट ब आणि गट क भरतीसाठी 8169 पदांची जाहिरात प्रसिद्ध केली होती. या भरती अंतर्गत लिपिक/टंकलेखक 7007 आणि कर सहाय्यक 468 पदे भरण्यात येणार होती. मात्र, सर्व परीक्षा पूर्ण होऊनही तब्बल ६ महिने निवड यादी जाहीर झाली नव्हती. भरती प्रक्रियेत झालेल्या विलंबामुळे ७००० विद्यार्थ्यांचे भविष्य संकटात सापडले होते. मॅट कोर्टात दाखल याचिकेमुळे भरती रखडल्याने उमेदवारांमध्ये चिंता निर्माण झाली होती. हा प्रश्न सोडवण्यासाठी विद्यार्थ्यांनी आमदार हेमंत रासने यांची भेट घेत आपली व्यथा मांडली होती.

विद्यार्थ्यांच्या भावना लक्षात घेऊन आमदार हेमंत रासने यांनी राज्याचे मुख्यमंत्री मा.श्री. देवेंद्रजी फडणवीस यांना निवेदन सादर करून या प्रक्रियेस गती देण्याची विनंती केली. मुख्यमंत्र्यांनी तातडीने लक्ष घालत महाराष्ट्र लोकसेवा आयोगाला आवश्यक निर्देश दिल्याने न्यायालयीन प्रक्रियेत गती आल्याने अखेर निवड यादी जाहीर करण्यात आली आहे. आज निवड झालेल्या विद्यार्थ्यांनी हेमंत रासने यांची भेट घेऊन त्यांचा सत्कार केला तसेच राज्य सरकारचे आभार मानले.

आमदार हेमंत रासने यांची प्रतिक्रिया
“स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी विद्यार्थी अनेक वर्ष मेहनत घेतात. परंतु संपूर्ण परीक्षा पार पडून देखील भरती रखडल्याने विद्यार्थ्यांमध्ये चिंता होती. हा प्रश्न मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यापर्यंत पोहोचवून त्यावर तातडीने तोडगा काढण्यासाठी आम्ही प्रयत्नशील होतो. अखेर न्यायालयीन प्रक्रिया संपल्यानंतर निवड यादी जाहीर झाली आणि विद्यार्थ्यांना न्याय मिळाला. यापुढेही विद्यार्थ्यांच्या हक्कांसाठी मी कायम आग्रही राहीन”.

निवड झालेला विद्यार्थी ज्ञानेश्वर गोरे यांची प्रतिक्रिया
“या निर्णयामुळे आम्हा विद्यार्थांना दिलासा मिळाला असून भरती प्रक्रियेतील अत्यंत विलंबामुळे आमची मेहनत वाया जाण्याची भीती होती, परंतु आमदार हेमंत रासने यांची तत्परता आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून तातडीचे आदेश देऊन न्याय मिळवण्यात मदत केल्याने आमचा विश्वास पुन्हा जागृत झाला आहे. भविष्यात अशा प्रकारच्या विलंबांमुळे विद्यार्थ्यांना त्रास होऊ नये, याची काळजी सरकारने घ्यावी.

बहुजनांनो, छत्रपतींचा अपमान करणाऱ्या प्रवृत्तीविरोधात एकत्रित व्हा!

बसप प्रदेश महासचिव डॉ.हुलगेश चलवादींचे आवाहन 
दिनांक १ मार्च २०२५, पुणे:-

बहुजनांचे कैवारी, शौर्य, पराक्रम आणि स्वाभिमानाचे प्रतिक, हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करणाऱ्या प्रवृत्तींना पळवून लावण्यासाठी एकत्रित येण्याची गरज आहे. छत्रपती-फुले-शाहू-आंबेडकरांच्या पुरोगामी महाराष्ट्रात शिवाजी महाराजांबद्दल अपशब्द काढण्याची हिंमत कुणाची होतेच कशी? असा सवाल बहुजन समाज पक्षाचे प्रदेश महासचिव आणि पश्चिम महाराष्ट्र मुख्य प्रभारी डॉ.हुलगेश चलवादी यांनी शनिवारी (ता.१) उपस्थित केला.समाजविघातक विचारांना मंत्र्यांकडून मिळणारे ‘राजाश्रय’ याला कारणीभूत आहे का?, याचे विश्लेषण करण्याची वेळ आता राज्य सरकारवर आली आहे. महाराजांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणारा तथाकथित प्रशांत कोरटकर नावाचा इसम अद्याप ही फरार आहे, हे गृहखात्याचे अपयश आहे.राज्यातील बड्या पोलीस अधिकाऱ्यांसोबत असलेल्या संबंधांचा कोरटकरला फायदा होतोय का?, हे तपासण्याची आवश्यकता असल्याचे देखील डॉ.चलवादी म्हणाले.

वैचारिक लढा हा विचारांनी लढला जातो, धमक्या देवून, मारहाण करून नाही. प्रत्येकाला योग्य शब्दांमध्ये आपले मत समाजात ठेवण्याचा घटनादत्त अधिकार आहे. परंतु, कुणीही उठसूठ या अधिकाराचा दुरुपयोग करत सामाजिक वातावरण कलुषित करेल, असा त्याचा अर्थ होत नाही. महाराजांना आणि त्यांच्या बहुजन हितकारक विचारांना विरोध करणाऱ्या प्रवृत्ती, मानसिकतेवर वेळीच वेसण घालण्याची गरज आहे. बहुजन एकतेनेच हे शक्य आहे. एकत्रित येवून अशा ‘ राजकीय व्यावसायिक तथाकथितांना’ अद्दल घडवण्याची आवश्यकता आहे. राज्य सरकारने देखील अशांना तत्काळ बेड्या ठोकल्या पाहिजे, असे मत डॉ.चलवादी यांनी व्यक्त केले.

राज्यात सांस्कृतिक राजधानीत गुंडगिरीचा ‘हैदोस’मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या बस स्टॅन्ड मध्ये युवतीवर बलात्कार, कोयत्या गॅंगची दहशत, चैन स्नेचिंग, असुरक्षित महिला, मारहाण, चोऱ्यामाऱ्या, हत्या अशा नित्यदिनक्रमाने राज्याची सांस्कृतिक राजधानी हादरली आहे. पुण्यात गुंडगिरीने अक्षरश: हैदोस मांडला आहे. गृह खाते मात्र गप्प आहे. शिक्षणाचे माहेरघर असलेल्या या शहराची ही स्थिती बदलण्यासाठी आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वत: लक्ष घालण्याचे आवाहन डॉ.चलवादी यांनी केले आहे. सुसंस्कृत शहर अशी ओळख असलेल्या शहराला प्रशासकीय दुर्लक्षाच्या झळा बसत आहेत. गावगुंडांसह असामाजिक तत्वांना वेळीच ओळखून पोलिसांनी त्यांना बेड्या ठोकाव्यात आणि शहर गुन्हेगारीमुक्त करण्याच्या दिशेने पावले उचलण्याची गरज असल्याचे डॉ.चलवादी म्हणाले

रिव्होल्ट मोटर्सने नव्या RV BLAZEXचे अनावरण केले

●        सशक्त 4KW मोटरसह वेग आणि टॉर्कमध्ये अधिक सुधारणा!

●        मोबाइल कनेक्टिव्हिटी आणि IoT-सक्षम स्मार्ट फीचर्स – जिओ-फेन्सिंग, ओव्हर-द-एअर (OTA) अपडेट्स आणि बरेच काही

●        रिमूव्हेबल बॅटरी – अधिक कार्यक्षमतेसाठी आणि सोयीसाठी काढता येण्याजोगी बॅटरी

●        LED हेडलाइट्स आणि टेललाइट्स – CBS ब्रेकिंग सीस्टमसह उत्तम सुरक्षा

●        6-इंच LCD क्लस्टर – 4G टेलीमॅटिक्स आणि इनबिल्ट GPS सह

●        बुकिंग आजपासून सुरू; वितरण मार्च 2025 च्या पहिल्या आठवड्यापासून सुरू होणार

नवी दिल्ली, 25 फेब्रुवारी 2025 : भारताच्या इलेक्ट्रिक दुचाकी बाजारातील आपले नेतृत्व अधिक बळकट करत, रिव्होल्ट मोटर्स, भारतातील क्रमांक 1 इलेक्ट्रिक मोटारसायकल ब्रँडने RV BLAZEX ही उच्च-कार्यक्षमता, स्मार्ट आणि किफायतशीर इलेक्ट्रिक मोटारसायकल ₹1,14,990 (एक्स-शोरूम, संपूर्ण भारत) किमतीत लॉन्च केली आहे.

आधुनिक प्रवाशांसाठी खास डिझाइन केलेली RV BLAZEX ही मोटारसायकल 4KW पीक पॉवर मोटर, 150 किमीची विस्तारित रेंज आणि स्मार्ट IoT कनेक्टिव्हिटी यांसह सुसज्ज आहे. हरियाणाच्या मानेसर येथील रिव्होल्टच्या अत्याधुनिक उत्पादन केंद्रात तयार करण्यात आलेली ही नवीन मोटारसायकल भारतातील EV क्रांतीत ब्रँडचे नेतृत्व आणखी मजबूत करते.

लॉन्चप्रसंगी रत्तनइंडिया एंटरप्रायझेस लिमिटेडच्या अध्यक्षा, श्रीमती अंजली रत्तन म्हणाल्या, “रिव्होल्ट मोटर्समध्ये आम्ही नवकल्पना आणि शाश्वततेसाठी वचनबद्ध आहोत. RV BLAZEX ही शहरी आणि ग्रामीण प्रवाशांसाठी किफायतशीर  उच्च-कार्यक्षमता असलेली इलेक्ट्रिक मोबिलिटी सोल्युशन आहे. प्रगत कनेक्टिव्हिटी, उत्कृष्ट रेंज आणि अत्याधुनिक डिझाइनसह, ही लॉन्चिंग सर्वांसाठी शाश्वत गतिशीलता सुलभ करण्याच्या दिशेने एक मोठे पाऊल आहे.”

RV BLAZEX आता स्टर्लिंग सिल्व्हर ब्लॅक आणि इक्लिप्स रेड ब्लॅक या दोन आकर्षक रंगांमध्ये उपलब्ध आहे. ही मोटारसायकल स्टाईल आणि उपयुक्ततेचा परिपूर्ण संगम आहे. फ्रंट स्टोरेज बॉक्स आणि अंडर-सीट चार्जर कंपार्टमेंट यांसारखी वैशिष्ट्ये सोयीसाठी डिझाइन करण्यात आली असून, देखणेपणावर कोणतीही तडजोड करण्यात आलेली नाही.

RV BLAZEX हा 3.24 kWh लिथियम-आयन बॅटरीने (IP67 रेटेड) सुसज्ज असून, 85 kmph च्या टॉप स्पीडपर्यंत पोहोचतो. यामध्ये तीन रायडिंग मोड्स आणि रिव्हर्स मोड आहेत, जे सहज हाताळणीसाठी मदत करतात. सुरक्षितता आणि आराम सुनिश्चित करण्यासाठी – LED लायटिंग, CBS ब्रेकिंग, टेलीस्कोपिक फ्रंट फोर्क्स आणि ट्विन शॉक अॅब्झॉर्बर्स दिले आहेत. 6-इंच LCD डिजिटल क्लस्टरमध्ये 4G टेलीमॅटिक्स, GPS आणि IoT जसे की, मोबाइल कनेक्टिव्हिटी, जिओ-फेन्सिंग व OTA अपडेट्स फिचर्स आहेत.

RV BLAZEX चे खास वैशिष्ट्य म्हणजे, त्याची ड्युअल चार्जिंग क्षमता – फास्ट आणि स्टँडर्ड दोन्ही प्रकारचे चार्जिंग पारंपरिक 3-पिन सॉकेटद्वारे सहज करता येते. फास्ट चार्जिंगद्वारे केवळ 80 मिनिटांत 80% चार्जिंग पूर्ण होते, तर स्टँडर्ड होम चार्जिंगने हेच 3 तास 30 मिनिटांत साध्य होते. बाह्य चार्जिंग इन्फ्रास्ट्रक्चरची गरज नसल्याने, प्रत्येक रायडरसाठी हे रीचार्जिंग अधिक सोईस्कर आणि अडथळामुक्त ठरते.

RV BLAZEX ला 3 वर्षांची वॉरंटी (किंवा 45,000 किमी, यापैकी जे आधी येईल) मिळते. देशभरातील वाढत्या डिलरशिप नेटवर्कच्या समर्थनासह, Revolt उत्कृष्ट आफ्टर-सेल्स सेवा प्रदान करते, ज्यामुळे इलेक्ट्रिक वाहन स्वीकारणे अधिक सुलभ आणि विश्वासार्ह ठरते.

RV BLAZEX ची बुकिंग आजपासून सुरू होत आहे www.revoltmotors.com/book आणि अधिकृत डिलरशिप्सवर उपलब्ध असेल. डिलिव्हरी मार्च 2025 च्या पहिल्या आठवड्यात सुरू होणार!

उत्तराखंडमध्ये हिमस्खलनात 55 जण दबले(पहा फोटो, व्हिडीओ)


उत्तराखंडच्या चमोली जिल्ह्यात बद्रीनाथपासून सुमारे ३ किमीवर माणा गावाजवळ शुक्रवारी सकाळी ६.५५ वाजता हिमस्खलन झाले. त्यामुळे बाॅर्डर रोड ऑर्गनायझेशनचे (बीआरओ) ५५ मजूर बर्फात अडकले. घटनेच्या वेळी ते कंटेनरमध्ये झोपलेले होते. सायंकाळी उशिरापर्यंत सुरू असलेल्या बचाव मोहिमेनंतर ३३ मजुरांना बाहेर काढण्यात यश मिळाले. परंतु उशिरा पुन्हा बर्फवृष्टीमुळे बचाव पथकाला मोहीम राबवणे कठीण झाले. काळोख झाल्याने शोधमोहीम जवळपास थांबवावी लागली. बहुतांश मजूर उत्तर प्रदेश, पंजाब, जम्मू-काश्मीरमधील असल्याचे सांगण्यात आले.

हिमस्खलनाच्या घटनेची माहिती मिळताच माणा येथील लष्करी तळावरील क्विक रिस्पॉन्स टीमचे १०० हून जास्त जवान बचावकार्यात सहभागी झाले. त्यात डॉक्टर, रुग्णवाहिकेतील कर्मचारी व बचाव दलाचे सदस्य आहेत. सकाळी साडेअकरा वाजता बचाव दलाने पाच कंटेनरचा शोध घेऊन १७ मजुरांना सुरक्षित बाहेर काढले. त्यापैकी ४ जणांची प्रकृती गंभीर आहे. त्यावर लष्करी डॉक्टरांची निगराणी आहे. २२ मजुरांचा शोध सुरू आहे. लष्कराव्यतिरिक्त एनडीआरएफ, एसडीआरएफ, आयटीबीपीच्या पथकांना घटनास्थळी रवाना करण्यात आले आहे. परंतु दोन दिवसांपासून सुरू असलेल्या बर्फवृष्टीमुळे जोशीमठापासून पुढील मार्ग बंद आहे. त्यामुळे बचाव पथकांना पुढे जाणे कठीण झाले आहे. चमोलीचे जिल्हाधिकारी संदीप तिवारी म्हणाले, संततधार पाऊस व बर्फवृष्टीमुळे हेलिकॉप्टर पाठवण्यात अडचण आहे. बचाव टीम पायी मार्गक्रमण करत आहे. एसडीआरएफ आयजी रिधिमा अग्रवाल म्हणाल्या, एक टीम जोशीमठापासून रवाना झाली. लामबगड मार्ग ठप्प आहे.

सकाळचे सहा वाजलेले हाेते. बाहेर बर्फ काेसळत हाेता. छावणीत आम्ही सगळे मजूर आपापल्या कंटेनरमध्ये हाेताे. अचानक वेगळ्या प्रकारचा गडगडाट ऐकू आला. जणू एखादी विशाल गाेष्टी काेसळत हाेती. आधी पाण्याचा प्रवाह वाटला. परंतु काही क्षणांतच आवाज वाढला आणि हृदयाचे ठाेके वाढले. कुणीही बाहेर जाण्याची िहंमत करत नव्हता. आवाज वाढत हाेता. हादरे आणि भयंकर आवाज. मग लाेक ते पाहण्यासाठी बाहेर पडले. लगेच पळा-पळा असे ओरडू लागले. मी दार उघडले आणि पाहिले ताे डाेंगराच्या उंचावरून बर्फाचे विशाल थर आमच्या दिशेने वाहत येत हाेते. सर्वत्र गाेंधळ उडाळा. मजूर जमेल तिकडे पळाले. परंतु ताेपर्यंत बर्फाचा प्रवाह आमच्यावर काेसळला हाेता. मला वाटले मी हवेत उसळी घेतली. नंतरचे काही आठवत नाही. पुढे जवानांनी बर्फातून काढले.

चमोलीमध्ये माणा खिंड आहे. हे ठिकाण माणा गावापासून ५० किमीवर पुढे आहे. माणा ते तिबेटपर्यंत थेट रस्ता आहे. हा मार्ग सामरिकदृष्ट्या अतिशय महत्त्वाचा आहे. या खिंडीजवळ तिबेटमधील थोलिंग हे गाव आहे. अनेक शतकांपासून उत्तराखंड व तिबेटमधील ही एक मोठी बाजारपेठ म्हणून ओळखली जाते. दोन वर्षांपासून माणा गावातून माणा खिंडीपर्यंत महामार्ग रुंदीकरणाचे काम चालू आहे. त्यासाठी देशभरातून बीआरओचे मजूर येऊन काम करतात. ते दिवसभर महामार्ग रुंदीकरणाच्या कामानंतर रात्री माणातील प्रवेशद्वाराजवळील कंटेनरमध्ये विश्रांतीसाठी निघून जातात.

भारती विद्यापीठमध्ये वार्षिक राष्ट्रीय टेक्नो-कल्चरल फेस्ट ‘भारतीयम २०२५’ चे उद्घाटन

पुणे:

भारती विद्यापीठ  अभियांत्रिकी महाविद्यालय, पुणे येथे आज वार्षिक राष्ट्रीय स्तरावरील टेक्नो-कल्चरल फेस्ट ‘भारतीयम २०२५’ चे उद्घाटन करण्यात आले. प्रमुख अतिथी  ऋषिकेश धांडे (रीजन हेड – अकॅडमिक अलायंसेस, टीसीएस पुणे), सचिन भावसार (इंडस्ट्री को-पायलट्स फॉर मॅन्युफॅक्चरिंग लीड, टीसीएस पुणे) आणि डॉ. विवेक सावजी (कुलगुरू, भारती विद्यापीठ) यांच्या हस्ते उद्घाटन पार पडले. या प्रसंगी डॉ. राजेश प्रसाद (प्राचार्य), डॉ. सचिन चव्हाण (उप-प्राचार्य), डॉ. सुनिता जाधव (उप-प्राचार्य), डॉ. प्रमोद जाधव, डॉ. कुलदीप पाटील (भारतीयम २०२५, संयोजक) तसेच डॉ. सुधीर कदम, डॉ. आय. ए. शेख आणि प्रा. गजानन भोळे (समन्वयक, भारतीयम २०२५) उपस्थित होते.

भारतीयममध्ये विविध अभियांत्रिकी शाखांमधील १८ तांत्रिक स्पर्धा आणि १२ सांस्कृतिक स्पर्धांचा समावेश आहे. या सर्व स्पर्धांसाठी १२०० हून अधिक विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते विद्यापीठाच्या वार्षिकनियतकालिक  ‘जिनर ‘चे प्रकाशनही करण्यात आले. यावेळी विद्यापीठाचे सुवर्णपदक विजेते आणि क्रीडा क्षेत्रातील सुवर्णपदक विजेत्यांचा सन्मान करण्यात आला. स्वागतपर भाषण डॉ. सचिन चव्हाण यांनी केले आणि भारतीयमच्या दोन दिवसांच्या कार्यक्रमाचे संक्षिप्त विवरण दिले. तर डॉ. प्रमोद जाधव (संयोजक, भारतीयम २०२५) यांनी आभारप्रदर्शन केले.

प्रमुख अतिथी ऋषिकेश धांडे म्हणाले, “टेकफेस्ट केवळ नाविन्यपूर्ण कल्पनांचे प्रदर्शन नसून, सहकार्याची भावना निर्माण करण्याचे व्यासपीठ आहे, जिथे प्रत्येकाने संवाद साधणे, सादरीकरण करणे आणि एकसंघपणे कार्य करणे शिकले पाहिजे. शिक्षण हे केवळ वैयक्तिक बुद्धिमत्तेपुरते मर्यादित नसून, अशा कार्यक्रमांमध्ये सहभाग घेतल्याने आपल्या दृष्टीकोनाची मांडणी, इतरांसोबत सहकार्य आणि संपूर्ण संघाच्या यशासाठी योगदान देण्याची कला विकसित होते.”

सचिन भावसार यांनी विद्यार्थ्यांना संबोधित करताना सांगितले, “नेहमी उत्सुक राहा, प्रयत्नशील राहा आणि प्रश्न विचारण्यास कधीही घाबरू नका.कारण सर्वात मोठी शोधयात्रा ज्ञानाच्या शोधातूनच सुरू होते. टेकफेस्टमध्ये किमान सहभाग तरी घ्या, कारण त्यातून तुमच्या समस्या सोडवण्याच्या आणि संवाद कौशल्यांना धार येते, जे तांत्रिक मुलाखतींमध्ये आत्मविश्वासाने स्वतःच्या कल्पना मांडण्यासाठी मदत करते. या कार्यक्रमांचे सहकार्यपूर्ण वातावरण टीमवर्क आणि नेतृत्व कौशल्य विकसित करण्यास मदत करते, जे व्यावसायिक जगतात अत्यंत महत्त्वाचे ठरते.”

कुलगुरू डॉ. विवेक सावजी यांनी विद्यार्थ्यांना संदेश देताना सांगितले, “हा उपक्रम  आपल्याला हे जाणवून देते की आपण केवळ व्यक्ती नाही, तर भविष्य घडवणाऱ्या उत्साही विचारवंतांचा एक समुदाय आहोत. पुढील काळात, केवळ स्वतःच्या विकासावर लक्ष केंद्रित न करता, इतरांनाही पुढे नेण्याचा प्रयत्न करा, संधी निर्माण करा आणि एकत्र येऊन दीर्घकालीन प्रभाव निर्माण करा. प्रत्येक आव्हानात एक संधी दडलेली असते, आणि त्या क्षणांचे आपण असामान्य काहीतरी घडवण्यासाठी कसे रूपांतर करतो, हे आपल्या हातात आहे. शिक्षण हे केवळ वर्गातील ज्ञानापुरते मर्यादित नसून, त्या ज्ञानाचा उपयोग समाजाच्या उन्नतीसाठी कसा करता येईल, याकडेही लक्ष दिले पाहिजे.”

डॉ. राजेश प्रसाद (प्राचार्य, भारती विद्यापीठ अभियांत्रिकी महाविद्यालय) यांनी संस्थेच्या उल्लेखनीय रँकिंग, पुरस्कार आणि यशांविषयी माहिती दिली. ते म्हणाले, “या टेकफेस्टला यशस्वी करण्यासाठी तुम्ही दाखवलेल्या समर्पण, सर्जनशीलता आणि टीमवर्कबद्दल मला अभिमान वाटतो. प्रत्येक विद्यार्थी आणि प्राध्यापक सदस्यांचे मनःपूर्वक आभार! एकत्रित प्रयत्नांमधून आपण मोठे यश मिळवू शकतो, हे तुम्ही सिद्ध केले आहे.”

गजा मारणे आता संपणार ? त्याची आलिशान फॉर्च्यूनर गाडी जप्त हि तर सुरुवात

पुणे-केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या निकटवर्तीय तरुणासोबत पंगा घेणे गुंड गजा मारणे याला चांगलेच महागात पडले आहे. या प्रकरणात कोथरूड पोलिसांनी गुंड गजा मारणे त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करून त्याला अटकही केली आहे. गजा मारणे सध्या पोलीस कोठडीत आहे. त्याच्याकडे सुरू असलेल्या चौकशीतून नवीन माहिती समोर आली आहे. तसेच या संपूर्ण प्रकरणात गजा मारणेने गुन्हा घडला त्या दिवशी वापरण्यात आलेली आलिशान फॉर्च्यूनर गाडीही पोलिसांनी जप्त केली आहे.केंद्रीय मंत्र्यांच्या कार्यकर्त्याला नडल्याने गजा आणि त्याची टोळी आता संपणार काय ? असा प्रश्न गुन्हेगारी आणि राजकीय वर्तुळातून उपस्थित झाला तर नवल वाटणार नाही.

१९ फेब्रुवारी या दिवशी आरोपी गजा मारणे हा ३५ जणांसोबत छावा सिनेमा पाहण्यासाठी गेला होता. यावेळी यातील अनेक जण दुचाकी वर होते तर गजा मारणे हा फॉर्च्यूनर गाडीत होता. सिनेमा पाहून परत येत असताना कोथरूडच्या भेलकेनगर चौकात देवेंद्र जोग या तरुणासोबत गजा मारणे त्याच्यासोबत असलेल्या काही तरुणांचे भांडण झाले. आणि त्यानंतर आरोपींनी देवेंद्र जोग याला लाथा बुक्क्यांनी बेदम मारहाण केली. इतकेच नाही तर कमरपट्ट्याने देखील मारहाण केली. आणि हा संपूर्ण प्रकार सुरू असताना गजा मारणे स्वतः त्या ठिकाणी उपस्थित होता आणि त्यानेच आरोपींना पीडित तरुणाला मारहाण करण्यासाठी उसकावल्याचे पोलिसांनी कोर्टात सांगितले होते. अधिक तपासासाठी गजा मारलेला तीन मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

दरम्यान गजा मारणे त्याच्यासोबत सिनेमा पाहण्यासाठी केलेले सर्वच जण पोलिसांच्या रडारवर आहेत. पोलिसांनी यापूर्वीच अटक केलेल्या आरोपींच्या दुचाकी जप्त केल्या आहेत. तर आता त्या दिवशी गजा मारणे वापरत असलेली फॉर्च्यूनर गाडी देखील पोलिसांनी जप्त केली आहे. ही गाडी गजा मारणे याने दुसऱ्याच व्यक्तीच्या नावावर घेतली असल्याचे पोलिसांनी सांगितले. दरम्यान यातील आरोपीचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी आठ ठिकाणचे सीसीटीव्ही ताब्यात घेतले आहे. आणि त्या माध्यमातून इतर आरोपींचा शोध सुरू आहे.

दरम्यान या संपूर्ण प्रकरणात पोलिसांनी गुंड गजा मारणेसह ओम तीर्थराम धर्मजिज्ञासू (३५), किरण कोंडिबा पडवळ (३१) आणि अमोल विनायक तापकीर (३५, तिघे रा. शास्त्रीनगर, कोथरूड) या चौघांना अटक केली आहे. तर गजा मारणे याचा भाचा श्रीकांत ऊर्फ बाब्या संभाजी पवार, रुपेश मारणे हे दोघे पसार आहेत. मारहाण केल्याप्रकरणी देवेंद्र पुरुषोत्तम जोग (३३, रा. मयूर कॉलनी, कोथरूड) यांनी फिर्याद दिली आहे.फिर्यादी देवेंद्र जोग हे आयटी अभियंता असून भाजपचे कार्यकर्ते आहेत. त्यांना मारहाण झाल्यावर कोथरूड पोलिसांनी सुरुवातीला मारहाणीची कलमे दाखल केली होती. मात्र, प्रकरणाचे गांभीर्य लक्षात आल्यावर त्यामध्ये आरोपींविरोधात खुनाच्या प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्ह्याचे कलम वाढवण्यात आले. जोग हे १९ फेब्रुवारी रोजी घरी जाताना रस्त्यावर गर्दी असल्याने ते बाजूला थांबले होते. त्यावेळी गाडीचा धक्का लागल्याच्या कारणावरून चौघांनी त्यांना लाथाबुक्क्यांनी, पट्ट्याने बेदम मारहाण केली. त्यामध्ये त्यांना जबर दुखापत झाली. त्याबाबत त्यांनी वडिलांसोबत कोथरूड पोलिस ठाण्यात जात फिर्याद नोंदवली. त्यानंतर पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजनुसार आरोपींच्या मुसक्या आवळल्या.

आरोपी आम्हीच पकडल्याचा गणेश गव्हाणे यांचा दावा

गुनाट गावातील गणेश गव्हाणे यांनी सांगितले की, तीन दिवस आरोपी गाडे याचा शोध पोलिस आणि गुनाट ग्रामस्थ घेत होते. गुरुवारी रात्री १० वाजता आरोपीची चाहूल लागली होती. आम्ही आरोपी ताब्यात घेतला तेव्हा पोलिस अधिकाऱ्यांना कॉल केला अन् पोलिस यंत्रणा तत्काळ आली. गुनाट गावातील क्रिकेट सामने भरवले जातात, तेथील चंदनवस्ती आहे, तिथं आरोपी फिरत होता. आरोपीला मी स्वतः पाहिलं अन् तो पळत असताना मी त्याला पकडलं. त्यानंतर मी माझ्या संपर्कात असलेल्या पोलिस पाटलांना कळवलं, असे गव्हाणे यांनी सांगितले.

पुणे-स्वारगेट एसटी स्थानकात मंगळवारी पहाटे २६ वर्षीय तरुणीवर बलात्कार करून फरार झालेला आरोपी दत्तात्रय गाडे यास गुरुवारी मध्यरात्री अटक करण्यात पोलिसांना यश आले. शिरूर तालुक्यातील मूळ गुनाट गावात तो लपलेला होता. दाेन दिवस अन्नपाण्यावाचून उसाच्या शेतात व डाेंगर, नदीपात्रात फिरत राहिल्याने ताे प्रचंड दमला हाेता. गुरुवारी रात्री एका शेतातील घरात पाणी पिण्यास आल्यावर त्याने शरण जाण्याची तयारी असल्याचे सांगितले हाेते. मात्र, त्यानंतर ताे ज्या दिशेने पळून गेला तिथे पाठलाग करत पोलिसांनी नदीपात्रातील चारीतून त्याला गुरुवारी मध्यरात्री दीड ते दाेन वाजेच्या सुमारास अटक केली. दरम्यान, शुक्रवारी सायंकाळी त्याला पुणे न्यायालयात हजर केले असता १५ दिवसांची कोठडी सुनावण्यात आली.गुनाट गावाच्या परिसरात उसाची माेठी शेती असल्याने बिबट्याचा वावरदेखील आहे. पाेलिसांना दाट उसाच्या क्षेत्रात फिरण्यास काही निर्बंध हाेते. श्वानाची मदत घेऊनही त्यांना आराेपीचा माग काढता आला नव्हता. त्यामुळे दाेन ड्राेनच्या साहाय्याने तपासणी करण्यात येत हाेती. अंधाराचा फायदा घेत दत्ता गाडे हा नदीपात्रातील चारीतून बाहेर येत बहिरट नावाच्या एका कुटुंबाचे घरी पाणी पिण्यासाठी गेला. त्या वेळी त्यांनी तुला पाेलिस शाेधत आहेत, तू पाेलिसांकडे हजर हाे, असे सांगितले. यावर आराेपीने मी उद्या हजर हाेणार असल्याचे सांगत ताे पुन्हा शेताच्या बाजूने पळून गेला हाेता. हे पोलिसांना समजले. त्यांनी ग्रामस्थांच्या मदतीने आराेपीचा पाठलाग सुरू केला. गुन्हे शाखेचे पथक दुसऱ्या बाजूला शाेध घेत होते. मात्र आरोपी स्वारगेट पोलिसांच्या हाती लागला. आराेपीने गुन्ह्याची कबुली दिली.

प्रेमविवाहानंतर आरोपीस सात वर्षांचा मुलगा:तरीही समलैंगिक संबंध ठेवून कमवायचा पैसे, आराेपी गाडेच्या चौकशीत धक्कादायक खुलासे

पुणे-स्वारगेट एसटी स्थानकातील तरुणीवरील बलात्कार प्रकरणात अटक करण्यात आलेला आरोपी दत्तात्रय गाडे याने प्रेमविवाह करून सुखाने संसार सुरू केला होता. त्याला सात वर्षांचा मुलगादेखील आहे. मात्र, आरोपीची गुन्हेगारी पार्श्वभूमी असल्याने तो कामधंदा करत नव्हता. त्यामुळे पत्नीशी व कुटुंबीयांशीही त्याचे सातत्याने वाद सुरू होते. त्याचा भाऊ शेती करतो. मात्र, आरोपी शेतीकडेही लक्ष न देता विविध ठिकाणी फिरत होता. गेल्या काही महिन्यांपासून तो समलैंगिक संबंध ठेवत होता. यातून त्याला काही प्रमाणात आर्थिक उत्पन्न मिळत असल्याची धक्कादायक बाब पोलिस तपासात समोर आली आहे.घटनेच्या दिवशी दुपारी दोन ते अडीच वाजेच्या सुमारास स्वारगेट पोलिसांचे एक पथक थेट त्याच्या घरी चौकशीस आल्यानंतर त्यांनी आरोपीसारखे साधर्म्य असलेल्या भावाला उचलून तपास सुरू केला. ही माहिती आरोपीलादेखील समजली. कधीही न बोलणाऱ्या चुलत भावाचा त्याला फोन आला. या वेळी त्याने घरी आई पडल्याचे सांगितल्याने आरोपीला संशय आला व त्याने त्याचा फोनच बंद करून पलायन केले. याचदरम्यान गुन्हे शाखेचे पथक व स्वारगेट पोलिसांनी आरोपीच्या गावाच्या परिसरातील शेताकडे तो गेल्याची माहिती मिळाल्याने शोध सुरू केला. पोलिसांची १६ ते १७ पथके, ग्रामस्थ, पोलिस पाटील, गावातील तरुणांच्या मदतीने शोधमोहीम हाती घेण्यात आली. त्याचसोबत जवळपासच्या पाच ते सहा गावांतील ग्रामस्थांनाही बोलावून पोलिसांनी साडेतीन हजार लोकांची बैठक घेत त्यांना शोधमोहिमेस सहकार्य करण्याचे आवाहन केले

श्रीगोंदा, दौंड, स्वारगेट, अहिल्यानगर भागात तो बसस्थानक, रेल्वेस्थानक येथेदेखील यापूर्वी फिरल्याचे स्पष्ट झाल्याने संबंधित ठिकाणी पोलिसांनी शोधमोहीम सुरू केली होती. त्याचे मित्र, नातेवाइकांची मुक्काम ठिकाणेदेखील पोलिसांनी शोधून काढली होती.आरोपी सापडत नसल्याने पोलिसांनी त्याच्या मोबाइलचे तांत्रिक विश्लेषण करत वर्षभरात तो नेमका कुठे कुठे फिरलेला आहे, त्याने कुणाला अधिक प्रमाणात संपर्क केला, त्याचे मित्र-मैत्रिणी कोण आहेत, त्याची स्वभाववैशिष्ट्ये काय आहेत, यावरून त्याचा सविस्तर अहवाल तयार केला होता. पंढरपूर, उज्जैन, शिर्डी, शनिशिंगणापूर आदी ठिकाणी तो मागील काही काळात गेल्याचे दिसून आल्याने पोलिसांनी या ठिकाणी पोलिस पथके पाठवण्याची तयारी केली होती.

गुनाट गावाच्या परिसरातील १०० ते १५० एकर परिसरात घनदाट ऊस क्षेत्र असल्याने पोलिसांना तपासकामात अडचणी येत होत्या. याचा फायदा घेऊन आरोपी सुरुवातीला उसाच्या शेतात मळकट कपडे, अनवाणी पायाने आतल्या भागात फिरत राहिल्याने पोलिसांना तो सापडला नाही. या कालावधीत तो शेतातील ऊस व टोमॅटो खाऊन राहत होता. परंतु पाणी व भूक अधिक लागल्याने तो शेतातून बाहेर पडल्यावर सुरुवातीला दोन ग्रामस्थांना दिसला.

मानाच्या “ पुणे श्री २०२५” चा कमलेश आचरा ” मानकरी.

पुणे. लोकमान्य नगर.. द हिंदू फाउंडेशन आणि माजी नगरसेवक धनंजय विष्णू जाधव मित्र परिवाराच्या वतीने पुणे जिल्हा हौशी शरीर सौष्ठव संघटना आणि पुणे डिस्ट्रिक्ट बॉडी बिल्डिंग असोसिएशनच्या सहकार्याने लोकमान्य नगर. सदाशिव पेठ येथे झालेल्या जिल्हास्तरीय शरीर सौष्ठव स्पर्धेत बॉडी बिल्डिंग जिमचा कमलेश आचरा हा मानाच्या “पुणे श्री २०२५ चा मानकरी ठरला.
वुमेन्स फिजिक श्री २०२५.”ची मानकरी माय टी फिटनेस जिमची यशोदा भोर ठरली. तर “आमदार हेमंतभाऊ रासने श्री २०२५” चा किताब ए बी एस जिमचा आकाश दडमल” याने पटकावला.
देशात एका जिल्हास्तरीय स्पर्धेत पाच टायटल देणारी, स्पर्धेत पाच लाख रुपयांची पारितोषिके देणारी, सर्वात जास्त स्पर्धक सहभागी असणारी देशातील हि एकमेव शरीर सौष्ठव स्पर्धा संपन्न झाली.
पुणे श्री २०२५ चा मानकरी ठरलेल्या कमलेश आचरा यास मानाची आकर्षक ट्रॉफी, रोख रक्कम २५५५५/- (पंचवीस हजार पाचशे पंचावन्न रुपये ) चा धनादेश, मानाचा बेल्ट आणि प्रमाणपत्र.
“ना. चंद्रकांतदादा पाटील द हिंदू श्री २०२५ चा मानकरी जी एस फिटनेस जिमचा विशाल सुरवसे” यास आकर्षक ट्रॉफी, रोख रक्कम १११११/- (अकरा हजार एकशे अकरा रुपये ) चा धनादेश, मानाचा बेल्ट आणि प्रमाणपत्र.
ना. मुरलीधर मोहोळ मेन्स फिजिक्स श्री २०२५ रोहन गोगावले ” यास आकर्षक ट्रॉफी, रोख रक्कम १११११/- (अकरा हजार एकशे अकरा रुपये ) चा धनादेश, मानाचा बेल्ट आणि प्रमाणपत्र.
“ना. माधुरीताई मिसाळ वुमेन्स फिजिक श्री २०२५.
ची मानकरी ठरलेल्या यशोदा भोर हिस आकर्षक ट्रॉफी, रोख रक्कम १११११/- (अकरा हजार एकशे अकरा रुपये ) चा धनादेश, मानाचा बेल्ट आणि प्रमाणपत्र. आणि “आमदार हेमंतभाऊ रासने श्री २०२५ चा मानकरी ठरलेल्या ए बी एस जिमचा आकाश दडमल” यास आकर्षक ट्रॉफी, रोख रक्कम १११११/- (अकरा हजार एकशे अकरा) रुपयाचा धनादेश, मानाचा बेल्ट आणि प्रमाणपत्र आमदार हेमंत रासने यांच्या हस्ते देउन गौरवण्यात आले.
स्पर्धेत एकूण पाच लाख रुपयाची वेगवेगळी बक्षीसे धनादेशा द्वारे देण्यात आली.
बॉडी बिल्डरचे ५५ किलो ते ८० किलो वरील असे सात गट. मेन्स फिजिक चे दोन गट आणि वूमेन्स फिजिक चा एक अशा १० गटात अनुक्रमे १ ते १० क्रमांक विजेत्यातील प्रथम क्रमांक विजेत्यास ५५५५/- (पाच हजार पाचशे पंचावन्न रुपये ) पासून ते दहाव्या क्रमांक विजेत्यास १३३३/-
( एक हजार तीनशे तेहतीस ) रुपयाचा धनादेश, अप्पर ट्रॅक, टीशर्ट
प्रोटीन आणि प्रमाणपत्र देण्यात आले.

         "बेस्ट पोझर" ठरलेल्या ऋषिकेश भोसले आणि मोस्ट इंप्रूव्हड चा मानकरी ठरलेल्या वर्ल्ड ऑफ फिटनेस जिमचा निलेश धोंडे या दोघा पारितोषिक विजेत्यास ५५५५/- (पाच हजार पाचशे पंचावन्न रुपये ) चा धनादेश, आकर्षक ट्रॉफी देउन गौरवण्यात आले. 
          स्पर्धेत सहभागी झालेल्या १९० शरीर सौष्ठव पटूस टी शर्ट आणि प्रमाणपत्र देण्यात आली. 
     स्पर्धेतील प्रमुख बक्षीस वितरण कसबा मतदार संघाचे आमदार हेमंत रासने यांच्या हस्ते झाले. तसेच माजीनगरसेवक राजेश येनपुरे, दिपक पोटे, दिलीप काळोखे,  स्मिता वस्ते,   भाजप पदाधिकारी गणेश घोष, पुणे बार असोसिएशन चे अध्यक्ष झंजाड, प्रमोद कोंढरे, भाजपा कसबा मंडल अध्यक्ष राजेंद्र काकडे. उमेश शाह, उदय लेले, शैलेश लडकत, विशाल पवार, माधव साळुंके, संजय गावडे, महेंद्र चव्हाण, सुरज लोखंडे, राजेश धोत्रे, प्रशांत हरसुले, राजाभाऊ देशमुख, पृथ्वीराज भिंताडे, जयंत देशपांडे, श्रेयस रासने, सचिन जामगे, डॉ पराग नवलकर, बंडोपंत फडके, रामा एरंडे आणि विविध क्षेत्रातील पदाधिकारी यांच्या हस्ते पारितोषिके वितरण करण्यात आली. 
      स्पर्धेचे आयोजन मा. नगरसेवक धनंजय विष्णू जाधव यांनी केले होते. 

स्पर्धेत सूत्रसंचालन राजेंद्र नांगरे आणि शंतनू खिलारे यांनी केले.
मुस्तफा पटेल, प्रशांत जगताप. नवनाथ शिंदे. सागर येवले. दिलीप धुमाळ यांनी पंच म्हणून काम पाहिले.
आभार प्रदर्शन रवींद्र कांबळे यांनी केले.