सबसे कातील गौतमी पाटील हिच पिवोट म्युझिक प्रस्तुत “राणी एक नंबर” हे भन्नाट गाणं नुकतच प्रदर्शित झाल आहे. विशेष म्हणजे हे गाण बॉलिवूड स्टाईल आणि ग्राफ़िक्सचा वापर करून बनवलेलं आहे. तसेच गायिका सोनाली सोनवणे हिने या गाण्याला स्वरसाज दिला आहे. रोहन साखरे यांनी या गाण्याचे बोल लिहिले आहेत. तर कैलाश पवार यांच्या दिग्दर्शनाखाली तयार झालेल्या या गाण्याला प्रसिद्ध संगीतकार मोहन उपासनी यांनी संगीत दिलं आहे. संगीत नियोजन मोहन उपासनी आणि संकेत गुरव यांनी केले आहे. या गाण्याची कोरिओग्राफी गोपी बैरागी आणि निलेश भोर यांनी केले आहे. तसेच या गाण्याची प्रोजेक्ट हेड विनया सावंत आहे. तर गाण्याच्या पब्लिसिटी फॉरेवर पीआर ही कंपनी करत आहे.
गौतमी पाटील “राणी एक नंबर” गाण्याच्या प्रोसेसविषयी सांगते, “या गाण्याच्या नावातच “राणी एक नंबर” आहे. त्यामुळे तुम्हाला कळालचं असेल गाणं एक नंबरच असेल. खरच गाणं खूप सुंदर झालं आहे. मला या गाण्याच्या शूटला खूप मज्जा आली. मला खात्री आहे की तुम्हालाही हे गाणं खूप आवडेल. तुम्ही नक्कीच या गाण्यावर थिरकणार आहात. तसेच मी पिवोट म्यूजिकचे आणि संगीतकार मोहन उपासनी यांचे आभार मानते की त्यांनी मला या गाण्यात संधी दिली. माझी प्रेक्षकांना विनंती आहे की जस तुम्ही माझ्या इतर गाण्याला भरभरून प्रेम दिल तसच प्रेम “राणी एक नंबर” या गाण्याला द्या. राणी एक नंबर या गाण्यावर तुमचे सुंदर रील व्हिडिओ बनवा. आणि मला जरूर टॅग करा. तुम्हाला हे गाण कस वाटल हे आम्हाला कमेंट्सद्वारे जरूर कळवा.”
गायिका सोनाली सोनवणे “राणी एक नंबर” गाण्याच्या रेकॉर्डिंग विषयी सांगते, राणी एक नंबर हे गाणं कम्प्लीटली फीमेल सेंट्रिक गाणं आहे. एक मुलगी जेव्हा सेल्फ ऑब्सेसड आणि कॉन्फिडेंट आहे तर ती काय बोलेल याचा अभ्यास मी केला. आणि तशाच हरकती मी या गाण्यात घेतल्या आहेत. गाण्याची संपूर्ण टीम म्यूजिक स्टूडियोमध्ये उपस्थित होती. सगळ्यांनी मला प्रोत्साहन दिल. हे गाणं डान्सिकल आहे. त्यामुळे मी ते संपूर्ण एनर्जीने गाणं गायल आहे. मला गाणं गाताना खूप मज्जा आली. या गाण्याला प्रेक्षकांचा खूप सुंदर प्रतिसाद मिळतोय ते पाहून फार आनंद होत आहे.”
संगीतकार मोहन उपासनी गाण्याविषयी सांगतात,” एक नंबर हा शब्द माझ्या डोक्यात घोळत होता. त्या शब्दाला घेवून हे गाण करायचं मी ठरवल. आणि मी जेव्हा कंपोझिशन करायला बसलो. तेव्हा हे कॉम्बिनेशन जुळून येत होत. अशी ही सर्व गाण्याची सुरुवातीची प्रोसेस होती. या गाण्याला अप्रतिम प्रतिसाद मिळतोय. पिवोट म्यूजिक सर्व प्रेक्षकांसाठी नेहमीच उत्तमोत्तम गाणी घेवून आणण्याचा प्रयत्न करेल. राणी एक नंबर हे गाणं सध्या इंस्टाग्रामवर ट्रेंडिंगवर आहे. त्यामुळे मी खूप खुश आहे.”
पुणे- महाबळेश्वर ग्रामपंचायत हद्दीमध्ये जो टोल वसुली करत आहात तो महाबळेश्वर नगरपालिकेने त्वरित थांबवावा असा इशारा श्री क्षेत्र महाबळेश्वर ग्रामपंचायतीने दिला आहे . याबाबतचे पत्र महाबळेश्वर नगरपालिका मुख्याधिकारी यांना ग्रामपंचायत सरपंच यांनी दिले आहे . जोपर्यंत डचेस रस्ता वाहतुकीसाठी योग्य होत नाही तोपर्यंत नगरपालिकेच्या माध्यमातून होत असलेली श्रीक्षेत्र महाबळेश्वर ग्रामपंचायत हद्दीतील टोल वसुली थांबवावी अन्यथा आंदोलनाला तोंड देण्याची तयारी ठेवावी असे सरपंच यांनी म्हटले आहे
या पत्रात त्यांनी असेही म्हटले आहे कि गेली एक वर्ष रस्त्याची काम करत आहात त्यासाठी तो रस्ता वाहतुकीसाठी बंद ठेवला. एवढा प्रदीर्घ काळ आपण हा रस्ता बंद ठेवला परंतु अद्यापही वाहतूक सुरळीत होत नाही. रस्ता अरुंद केला आहे व साईट पट्ट्या भरल्या गेलेल्या नाहीत. त्यामुळे प्रचंड वाहतूक कोंडी होत आहे. यामुळे महाबळेश्वर पर्यटनाचे नाव आपल्या डीसाळ कारभारामुळे खराब होत आहे. त्यामुळेच या परिसरातील व्यवसाय करणाऱ्यांबरोबरच पर्यटकांना प्रचंड मानसिक त्रास आणि आर्थिक नुकसान होत आहे. याआधीही आपल्याला विविध माध्यमांच्याद्वारे, लोकप्रतिनिधींच्या द्वारे, आमदार, मंत्री महोदय यांच्यामार्फत अनेकदा विनवण्या करूनही आपण या रस्त्याच्या बाबत उदासीन भूमिकेत आहात. आपल्याला अतिशय नम्रपणे कळविण्यात येते की जोपर्यंत हा रस्ता वाहतुकीसाठी अनुकूल होत नाही. तोपर्यंत आपण श्रीक्षेत्र महाबळेश्वर ग्रामपंचायत हद्दीमध्ये जो टोल वसुली करत आहात. तो त्वरित थांबवावा नाहीतर आम्हाला पुढील कार्यवाहीसाठी कायदेशीर मार्गाने तसेच आंदोलनातून विरोधातील भूमिका घेण्यास प्रवृत्त करु नये.
पुणे : मुधमती संगीत विद्यालयाचे संचालक नचिकेत अनंत मेहेंदळे यांनी लिहिलेल्या ‘चक्रधार’ या पुस्तकाचे प्रकाशन रविवारी भावे हायस्कूल येथील प्र. ल. गावडे सभागृहात डॉ. माधुरी डोंगरे, पं. आनंद गोडसे, पं. रामदास पळसुले आणि पं. विजय दास्ताने, डॉ. दयानंद घोटकर यांच्या हस्ते झाले.
कार्यक्रमाची सुरुवात शिवस्तवनाने झाली. तन्मयी मेहेंदळे-कुलकर्णी यांनी शिवस्तवन सादर केले. नचिकेत मेहेंदळे यांचे शिष्य सिद्धार्थ कुंभोजकर, ओंकार जोशी यांनी चक्रधारवादन केले. साहिल पुंडलिक यांनी लेहऱ्याची पेटीवर साथ केली.सर्व मान्यवरांचा सत्कार नचिकेत मेहेंदळे व निवेदिता मेहेंदळे यांनी केला. अध्यक्षीय भाषण करतांना डॉ. माधुरी डोंगरे म्हणाल्या, नचिकेत मेहेंदळे यांनी अनेक विद्यार्थी घडविले आहेत. यांच्यासारखी विद्यार्थी घडविणारे शिक्षकांची पिढी तयार व्हावी. विद्यार्थ्यांनी आपल्या गुरुंच्या ज्ञानाचा पुरेपुर वापर करुन आपल्या पुढील पिढीला घडविण्यासाठी शिकले पाहिजे, असेही यावेळी त्या म्हणाल्या. तसेच पं. रामदास पळसुले यांनी चक्रधार आणि तबला यातील महत्व आपल्या मानतोगतातून व्यक्त केले आणि त्यांचे परममित्र नचिकेत मेहेंदळे यांच्याविषयी हृद्य भावना व्यक्त केल्या. पं. आनंद गोडसे म्हणाले, तबल्याचे शिक्षण देणारे पुस्तक बाजारपेठेत उपलब्ध नाही. मेहेंदळे यांनी संगीताचा पूर्ण अभ्यास करुन चक्रधार पुस्तक लिहिले आहे. हे पुस्तक विद्यार्थ्यांच्या कलेत नक्कीच भर टाकरणारे राहिल. मेहेंदळे सरांची शिकविण्याची पद्धत खुप सुंदर आहे. कोणताही ताल शिकविण्याबरोबरच आमच्यात मोठा आत्मविश्वास त्यांनी निर्माण केला. तबल्याच्या शिक्षणापासून ते मराठी भाषा शिकविण्याचे काम त्यांनी केले असल्याचे यावेळी त्यांच्या शिष्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. विद्यावाचस्पती डॉ. दयानंद घोटकर म्हणाले, तबल्यामधील काव्य, शब्द, साहित्य विविध प्रकारे मांडता येतात. तबल्याचा सूर आणि ताल एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. नचिकेत मेहेंदळे यांनी चक्रधार पुस्तकातून तबला वादनातील सौंदर्य उलगडले आहेत. यात तबला वादनात आपल्या कौशल्याचा शोध घेतला आहे. प्रस्ताविक नचिकेत मेहेंदळे यांनी केले. त्यांनी ‘चक्रधार’ पुस्तकाविषयी माहिती दिली. हे पुस्तक विद्यार्थ्यांना उपयोगी ठरेल. मुद्रक प्रसन्न परांजपे, टंकलेखक सिद्धेश साठे व तेजस जोशी, देवेश कलंत्री, वांगमय गोडबोले,यांचा यावेळी सत्कार करण्यात आला.या कार्यक्रमाचे संपूर्ण संयोजन व प्रस्तुती अनिकेत कुलकर्णी आणि निवेदिता मेहेंदळे यांची लाभली. या कार्यक्रमाचे खुमासदार सूत्रससंचालन व आभारप्रदर्शन सौ.तन्मयी मेहेंदळे-कुलकर्णी यांनी केले .यावेळी डॉ विद्या कुलकर्णी, कीर्तनकार ह भ प नंदकुमार मेहेंदळे आणि अनेक मान्यवर उपस्थित होते.
आमदार हेमंत रासने यांनी मुख्यमंत्र्यांना म्हटले आपल्या स्तरावरून यापूर्वी देण्यात आलेली परवानगी स्थगित करावी
“कोणी नवीन घर देत का घर” अशी लोकमान्यनगरवासीयांची अवस्था
स्वतःच हक्काचं, स्वप्नातलं घरं लवकर मिळावं म्हणून लोकमान्यनगरवासियांचा संताप
पुणे – आमदार हेमंत रासनेंच्या अनागोंदी कारभारामुळे “कोणी नवीन घर देत का घर” अशी लोकमान्यनगरवासीयांची अवस्था झाली आहे. पुणे लोकमान्यनगर बचाव कृती समितीच्या वतीने लोकमान्यनगर येथील रहिवासी एकत्र येवून लोकमान्यनगर बचावासाठी जोरदार निदर्शने करण्यात आली. यावेळी लोकमान्यनगर येथील सर्व कुटुंबासहित शेकडो रहिवाशांनी उपस्थित होते. गेली अनेक वर्षं चर्चेत असलेला लोकमान्यनगर पुनर्विकास सुरळीतपणे होऊ लागलेला असतानाच पुनर्विकास प्रक्रियेला स्थानिक आमदाराने हस्तक्षेप करून तात्पुरती स्थगिती मिळविल्याने त्यामुळे लोकमान्य नगरमधील ८०३ घरात राहणाऱ्या लोकांचा स्वप्नभंग झाला. सदरील लोक शेकडोच्या संख्येने रस्त्यावर उतरले होते. यावेळी स्थानिक लोकांनी म्हाडाच्या, शासनाच्या आणि आमदाराच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली.
सध्या या ठिकाणी अनियमित पाणीपुरवठा, मोडकळीस आलेलं बांधकाम, ड्रेंनेजची झालेली दुरवस्था अशा अनेक अडचणींचा सामना दैनंदिन जीवनात करावा लागत आहे. त्यात पुन्हा पुनर्विकासाला स्थगिती मिळाल्याने “घरचं झालं थोडं व्याही यांनी धाडलं घोडं” अशी अवस्था लोकमान्यनगरची झाली आहे. लोकमान्यनगर बचाव कृती समितीच्या वतीने म्हाडाचे संबंधित अधिकारी, मुख्यमंत्री कार्यालय यांच्याशी संपर्क साधत आहे.
लोकमान्यनगर येथे काही सोसायट्यांनी स्वतःचा विकसक नेमला, इमारती तयार झाल्या लवकरच रहिवासी रहावयास जाणार आहेत. यामध्ये मित्तल बिल्डर्सचे डॉ. नरेश मित्तल यांनी ४२, ४३, ४४, ४५ सदरील चारही मिळून सोसायटी झाली म्हाडाने करोडो रुपये घेवून परवानगी दिली. तरी देखील स्थगिती दिली आहे. त्याच बरोबर देशपांडे बिल्डर्स हे इमारत क्रमांक ३६, ३७, ३९ तसेच मानव बिल्डर्स इमारत क्रमांक ३४, ३५ जोगळे बिल्डर्स इमारत क्रमांक ११, ११ अ, १२ गौतम ढवळे आयकॉन डेव्हपर्स यांच्याकडे इमारत क्रमांक १,२,३,४ म्हाडाकडे परवानगीसाठी कायदेशीर कागदपत्रे देवून देखील म्हाडाने कामाला खीळ बसवली आहे. इमारत क्रमांक १५ व ५३ श्रीकांत उणेचा बिल्डर्स यांच्या म्हाडाकडे परवानगीसाठी अंतिम टप्प्यात आहे. तसेच इतर सोसायट्या देखील विविध बिल्डर बरोबर पुनर्विकासाठी चर्चा व प्रयत्नशील आहेत.
लोकमान्यनगर येथे सन १९६० ते १९६४ या चार वर्षात ५३ इमारती उभ्या राहिल्या आहेत. सध्या याठिकाणी ८०३ फ्लॅट धारक आहेत. त्याकाळात या सर्व इमारती लोड बेरिंगच्या करण्यात आल्या होत्या. सध्या प्रचंड मोठ्या प्रमाणावर नादुरुस्त झाल्या आहेत. त्याचबरोबर काही ठिकाणी सिमेंट प्लास्टर पडले असून भिंतींमध्ये झाडे उगवली आहेत. स्लॅब पडले असून काही स्लॅब गळत आहेत. तर भिंतीना चिरा पडल्या आहेत. काही इमारती तिरक्या झाल्या आहेत. अशा नरक यातना सोसत येथील रहिवाशी जीव मुठीत घेवून राहत आहेत. येथील सर्व इमारती कॉपरेटिव सोसायटी रजिस्टर झाल्या आहेत. त्यांचे प्रॉपर्टी कार्ड व नोंदणी झाली आहे. सेल डीड, लीस डीड, कन्व्हेन्स डिड झाले असून देखील म्हाडाच्या भोंगळ कारभारामुळे येथील नागरिक हवालदिल झाले आहेत.
शासनाकडून त्वरित दखल जो पर्यंत घेतली जात नाही. तो पर्यंत हा लढा चालूच राहणार असून हा लढा भविष्यात तीव्र होणार असल्याचे पुणे लोकमान्यनगर बचाव कृती समितीच्या वतीने सांगण्यात आले. यावेळी लोकमान्यनगर येथील अनेक रहिवाशी कुटुंबासहित मोठ्या संख्येने उपस्थित होते.
काय म्हटले आहे रासने यांनी मुख्यमंत्र्यांना दिलेल्या पत्रात वाचा जसेच्या तसे
मा. ना. श्री. देवेंद्रजी फडणवीस साहेब, मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य, मंत्रालय, मुंबई, ३२ मुख्यमंत्री सचिवालय दिनांक 15/5/25 मुख्यमंत्री ई. ऑफिस क्र. 834/828 महाराष्ट्र शासन मंत्रालय, मुंबई विषयः लोकमान्य नगर, पुणे येथील म्हाडा प्रकल्पाच्या एकात्मिक विकासास मान्यता देऊन, यापूर्वी दिलेल्या पुनर्विकास मंजुरीस स्थगिती देण्याबाबत. महोदय, सादर विनंती अशी की, पुणे शहरातील अत्यंत महत्त्वाचा आणि घनदाट लोकवस्ती असलेला लोकमान्य नगर परिसर म्हाडा प्रकल्प अंतर्गत येतो. सदर ठिकाणी सुमारे १६.५ एकर क्षेत्र असून, सध्या या ठिकाणी एकसंध नियोजनाअभावी तुकड्यांमध्ये पुनर्विकासाची प्रक्रिया सुरु आहे. यामुळे संपूर्ण परिसराचा विकास अर्धवट राहिला असून, नागरिकांना मूलभूत नागरी सुविधा, सुरक्षित व सुसज्ज निवास, तसेच चांगल्या दर्जाचा सामाजिक व पर्यावरणपूरक परिसर मिळण्यात अडथळे निर्माण झाले आहेत. याअगोदर संबंधित प्रकल्पासाठी स्वतंत्रपणे पुनर्विकासास मान्यता देण्यात आली होती. परंतु सद्यस्थितीत ही परवानगी संपूर्ण क्षेत्राच्या समन्वयित विकासास अडथळा निर्माण करत आहे. त्यामुळे याआधी दिलेली मान्यता रद्द करून तीव्र परिणामकारकता साधण्यासाठी संपूर्ण प्रकल्पाचा एकात्मिक, समग्र व नियोजनबद्ध पद्धतीने विकास करणे आवश्यक आहे.एकात्मिक विकास आराखडा लागू केल्यास नागरिकांना वेळेत दर्जेदार घरे, प्रशस्त परिसर, आवश्यक नागरी सुविधा, तसेच शाळा, आरोग्य केंद्रे, उद्याने, वाहतूक व पार्किंग व्यवस्था एकत्रितपणे मिळणे शक्य होईल. यामुळे केवळ रहिवाशांनाच नव्हे तर संपूर्ण पुणे शहरालाही भविष्यातील शहरी विकासाच्या दृष्टीने मोठा फायदा होईल. त्यामुळे आपणास विनम्र विनंती आहे की, तरी आपल्या स्तरावरून यापूर्वी दिलेल्या परवानगीस तत्काळ स्थगिती देण्यासाठी अमूस गृहनिर्माण यांना आदेशित करावे. आपला विश्वासू, हेमंत नारायण रासने आमदार, २१५ कसबा विधानसभा मतदारसंघ
न्यायाधीश बंडोपंत कुलकर्णी लिखित दोन पुस्तकांचे प्रकाशन
पुणे : न्यायदानाचे काम सोपे नसते. विविध रूढी, परंपरा, प्रथा यातून व्यक्तीची मानसिक धारणा तयार होते. परंतु न्यायासनावर बसल्यावर सर्व धारणा बाजूला ठेवून निष्पक्षपणे काम करावे लागते. अशा वेळी निर्णय घेताना अध्यात्माची जोड मिळाल्यास निर्णय घेणे सोपे जाते, असे प्रतिपादन मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती एन. के. जमादार यांनी केले. संतवाङ्मयावर आधारित बंडोपंत कुलकर्णी यांच्या पुस्तकांचा समाज व अभ्यासकांना निश्चित फायदा होईल, अशी टीप्पणही त्यांनी केली.
अनुबंध प्रकाशन प्रकाशित आणि न्यायाधीश बंडोपंत कुलकर्णी लिखित ‘मुक्तांची अभंग वाट’ आणि ‘ज्ञाना तू का जनी निळा, नामी गोरा?’ या पुस्तकांचे प्रकाशन न्यायमूर्ती एन. के. जमादार आणि महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाचे अध्यक्ष डॉ. सदानंद मोरे यांच्या हस्ते झाले. त्या वेळी न्यायमूर्ती एन. के. जमादार बोलत होते. पुणे जिल्हा व सत्र न्यायालयाचे प्रमुख जिल्हा न्यायाधीश एस. के. महाजन कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. प्रकाशक अनिल कुलकर्णी मंचावर होते. महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या माधवराव पटवर्धन सभागृहात रविवारी (दि. १७) कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
या वेळी बोलताना न्यायमूर्ती एन. के. जमादार यांनी बंडोपंत कुलकर्णी यांच्याशी बालपणापासून असलेला स्नेहबंध उलगडून दाखविला.
लेखनाविषयी बोलताना बंडोपंत कुलकर्णी म्हणाले, न्यायदानाच्या क्षेत्रात काम करत असताना गुरूंच्या आदेशाने मी अध्यात्माकडे वळलो त्यातूनच लिहिता झालो. संत साहित्याच्या शोधातून वाचन, साधना आणि अभ्यास या मार्गातून जे उमगले ते कागदावर उतरविले. संगीता बंडोपंत कुलकर्णी यांचा या वेळी विशेष सन्मान करण्यात आला. अनुबंध प्रकाशन संस्थेविषयी माहिती देत अनिल कुलकर्णी यांनी पुस्तकांच्या निर्मितीविषयी अवगत केले.
अध्यक्षपदावरून बोलताना जिल्हा न्यायाधीश एस. के. महाजन म्हणाले, संत साहित्य हे आयुष्यात वाटचाल कशी करावी या विषयी मार्गदर्शन करते. संसारात राहून कर्तव्यपूर्ती केली म्हणजे हरिनाम जपणे होय. बंडोपंत कुलकर्णी यांनी लिहिलेली पुस्तके वाचकांना मार्गदर्शक ठरतील.
डॉ. सदानंद मोरे म्हणाले, संत साहित्याचा योग्य तो अर्थ समाजापर्यंत पोहोचावा या हेतूने बंडोपंत कुलकर्णी अभ्यास, मनन, चिंतनातून लिहिते झाले आहेत. त्यांचे लिखाण स्वानुभूतीवर आधारित आहे. आपले अनुभव संतांच्या साहित्यातून पडताळून पाहत झालेले लिखाण उपयुक्त आहे. न्यायाधीशांना अध्यात्माची बैठक असणे आवश्यक आहे. संसाराची व्याख्या मर्यादेत बांधली गेली आहे, परंतु संतांच्या मते विशिष्ट पद्धतीने संसार करणे हाच परमार्थ आहे. अनेक न्यायमूर्ती व न्यायाधीशांनी उत्तममोत्तम साहित्यकृती निर्माण केल्या आहेत. योग्य निर्णय घेण्यासाठी त्यांनी वेळोवेळी संतसाहित्याचा अभ्यास केला आहे. ‘ठेवीले अनंते तैसेची रहावे’ ही ओवी बंडोपंत कुलकर्णी यांच्या लिखाणाचा आद्य प्रारंभबिंदू ठरली आहे. संत साहित्याकडे पाहण्याची वेगळी दृष्टी त्यांच्याकडे असून त्यांनी सगुण-निर्गुण द्वंद्वाचे उत्तम विवेचन केले आहे.
डॉ. जगन्नाथ पाटील, प्रा. डुंबरे यांनी मनोगत व्यक्त केले. तर सूत्रसंचालन डॉ. दीपक डोंगरे, ॲड. आशिष कंकाळ यांनी केले. आभार संजय पाटील यांनी मानले.
‘देशाच्या प्रगतीसाठी एकत्र येऊन काम करा’संस्कृती प्रतिष्ठान आयोजित गुणवंत विद्यार्थी गौरव समारंभ संपन्न
पुणे : देशाला २०४७ मध्ये महासत्ता बनवायची आहे. त्यासाठी आपण जे काही काम करु ते नियमाप्रमाणे करु, देशाच्या प्रगतीसाठी करु, ही भावना आपल्या आतून यायला हवी. करिअरसाठी जे क्षेत्र निवडाल तिथे चांगले काम करा, असे आवाहन करत स्वातंत्र्याबरोबर आलेल्या जबाबदारीचे भान ठेवा, असा मौलिक सल्ला आणि आवाहन भारतीय सैन्यदलाचे माजी लष्करप्रमुख मनोज नरवणे यांनी केले.
संस्कृती प्रतिष्ठान च्यावतीने गुणवंत विद्यार्थी गौरव समारंभ कोथरुड मधील यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात रविवारी सकाळी आयोजित करण्यात आला होता. यावेळी भारतीय सैन्यदलाचे माजी लष्करप्रमुख मनोज नरवणे प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते. यावेळी सातशे गुणवंत विद्यार्थ्यांना गौरविण्यात आले. केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या संकल्पनेतून सुरु झालेल्या या उपक्रमाचे यंदाचे हे २३ वे वर्षे होते. स्वामी विवेकानंद आणि पंतप्रधान मोदी यांचे पुस्तक, शैक्षणिक साहित्य आणि सन्मान चिन्ह असे सन्मानाचे स्वरूप होते. यावेळी व्यासपीठावर केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ, आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू केदार जाधव, सिने दिग्दर्शक-अभिनेते प्रवीण तरडे, पुणे श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष ब्रीजमोहन पाटील, मोनिका मोहोळ, हर्षाली माथवड, वासंती जाधव, संस्कृती प्रतिष्ठानचे व भाजपाचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
विद्यार्थी व पालकांना मार्गदर्शन करताना माजी लष्करप्रमुख मनोज नरवणे म्हणाले की, “ज्या क्षेत्रात असाल तिथे प्रामाणिकपणे, शिस्तीने काम केले तरी ते देशाच्या प्रगतीसाठी केलेले काम असेल. शिस्त नसेल तर त्या स्वातंत्र्याचा काहीही उपयोग नाही. स्वातंत्र्य मिळाल्यामुळेच आपण सर्व आपापल्या धर्माप्रमाणे आचरण करतो, आपल्या आवडीनुसार आवडत्या क्षेत्रात काम करतो. पण हे स्वातंत्र्य उपभोगताना त्याबरोबर आलेल्या जबाबदारीला विसरुन चालणार नाही.”
केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ म्हणाले की, ‘आपल्या तरुणांचे भवितव्य उज्ज्वल आहे. हीच तरुण पिढी भारताला पुढे नेईल. आपल्या देशाला सर्वोच्च स्थानी पोहचविण्याचे स्वप्न पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी पाहिले आहे. ते पूर्ण करण्यासाठी, ज्यांच्या मागे कोणी नाही, अशा एक लाख विद्यार्थ्यांना पुढे आणण्याचा आपला प्रयत्न आहे. या विद्यार्थ्यांना सोबत घेऊन आपल्याला भारताचे भविष्य उज्ज्वल करायचे आहे. गुणवंत विद्यार्थी प्रतिभावंत कसे होतील, यासाठी हा प्रयत्न आहे. ज्यांना मी २३ वर्षापूर्वी गुणवंत म्हणून वह्या दिल्या त्यांची मुले आज बक्षिसे घ्यायला आली आहेत’
सकारात्मक दृष्टिकोन ठेवला तर निश्चितच पुढे जाऊ शकतात. शिस्त डोक्याला लावा. शिस्त, सकारात्मक दृष्टिकोन, सकारात्मक मानसिकता यश मिळवून देईल, असे सांगत क्रिकेटपटू केदार जाधव याने आपल्या यशाचे रहस्य विद्यार्थ्यांना सांगितले. केदार जाधव म्हणाले की, दहावीनंतर मी व्यावसायिक क्रिकेटकडे वळालो. माझ्या क्षेत्रात बेस्ट व्हायचे आहे. ह्या ध्येयाने मी काम करत होतो. एके दिवशी स्नायूला दुखापत झाल्यामुळे मी छोट्या धावा घेत खेळत होतो. माझे प्रशिक्षक मला म्हणाले तु स्लो का खेळतोय. तेव्हा मी म्हणालो, हे माझे घरचे मैदान आहे. जेव्हा ताकद दाखवायची तेव्हा दाखवेल. त्यावेळी माझे प्रशिक्षक माझ्याकडे पाहून हसले. त्यानंतर प्रत्यक्ष मैदानात उतरल्यावर पहिला चेंडू मी सावधानतेने खेळलो. संरक्षणात्मक पवित्र्यात खेळलो. मात्र नंतर दुसऱ्याच चेंडूवर चौकार मारला.
प्रसिध्द अभिनेते प्रविण तरडे म्हणाले की, प्रयत्नातील सातत्याने तुम्ही यशाची पायरी चढू शकता. जबाबदारीने महाविद्यालयाची पायरी चढा. जे काही करायचे त्यासाठी आत्ताच ठरवा. तर तुम्ही यशस्वी व्हाल. स्वतः ला घडविण्यापेक्षा अवघड काही नाही. आपल्याला मिळालेल्या पुरस्कार मिळाल्यानंतर मुरलीधऱ मोहोळ यांनी पहिला सत्कार केला होता याची आठवण तरडे यांनी यावेळी सांगितली. सायबर सिक्युरिटी मध्ये काम करणा-या राधिका पानट या विद्यार्थीनीचा यावेळी सत्कार करण्यात आला.
श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष ब्रिजमोहन पाटील यांनी ड्रग्स, पार्टी यामुळे पुण्याची बदनामी झाली आहे याचा उल्लेख करत, नशेला, वाईट गोष्टींना निर्धाराने नाही म्हणण्याचे आवाहन केले. पुण्याचे कारभारी या नात्याने मोहोळ यांनी, पुढील पाच वर्षांत पुणे मनपा शाळा भौतिक व गुणवत्ता दृष्टीने सक्षम होण्यासाठी तसेच पुण्यामधील आठ विधानसभा मतदारसंघात समुपदेशन केंद्र सुरू करावेत. असे आवाहन केले
सुत्रसंत्रलन मिलिंद कुलकर्णी यांनी केले. हर्षल दारकुंडे यांनी गुणवंत विद्यार्थी सत्कार कार्यक्रमाचे सुत्रसंचलन केले.
मुंबई, दि. 17 ऑगस्ट श्रीमंत राजे रघूजी भोसले यांची ऐतिहासिक तलवार उद्या दिनांक 18 आँगस्ट रोजी मुंबईत दाखल होणार असून महाराष्ट्र शासनातर्फे मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर जोरदार स्वागत होणार आहे. तर संध्याकाळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत लोकार्पण सोहळा पार पडेल.
श्रीमंत राजे रघूजी भोसले यांची ऐतिहासिक तलवार महाराष्ट्र शासनाने लिलावात जिंकली असून नुकतीच सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार यांनी लंडन येथे ही तलवार ताब्यात घेतली, उद्या दि. 18 आँगस्टला ती मुंबईत दाखल होईल. विमानतळ प्राधिकरणाकडून आंतरराष्ट्रीय विमानतळ सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड.आशिष शेलार सकाळी 10 वाजता ही ऐतिहासिक तलवार स्वीकारतील. त्यानंतर विमानतळावरी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला अभिवादन करुन बाईक रँली काढून चित्ररथावर विराजमान करुन ही तलवार पु. ल. देशपांडे कला अकादमीकडे नेण्यात येईल.
दरम्यान, संध्याकाळी 6 वाजता सांस्कृतिक कार्य विभाग,पुरातत्व व वस्तुसंग्रहालये संचालनालय सांस्कृतिक कार्य संचालनालय, पु.ल. देशपांडे कला अकादमी तर्फे “सेना साहेब सुभा पराक्रम दर्शन” सोहळा आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमात श्रीमंत राजे रघूजी भोसले यांच्या ऐतिहासिक तलवार प्रदर्शनाचे उदघाटन व लोकार्पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होईल. या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार, संस्कृतिक कार्य व माहिती तंत्रज्ञान तथा पालक मंत्री, उपनगर जिल्हा ॲड. आशिष शेलार उपस्थित राहणार आहेत. तर श्रीमंत राजे रघूजी भोसले यांचे वंशज श्रीमंत मुधोजी राजे भोसले विशेष उपस्थिती राहणार असून सांस्कृतिक कार्य विभाग.सचिव डॉ. किरण कुलकर्णी, ( भा.प्र.से ) यांच्यासह स्थानिक खासदार अनिल देसाई, स्थानिक आमदार, महेश सावंत, यांनाही आमंत्रित करण्यात आले आहे.
उद्या, सोमवार, दि. १८ आँगस्ट २०२५, सायंकाळी ६:०० वाजता, पु.ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी, प्रभादेवी, मुंबई येते हा कार्यक्रम होणार असणार आहे. हा कार्यक्रम सर्वांसाठी खुला असणार आहे त्यामुळे सर्वांनी उपस्थित रहावे असे आवाहन,पुरातत्व व वस्तुसंग्रहालये संचालनालयाचे संचालक डॉ. तेजस मदन गर्गे, पु.ल.देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीच्या संचालक मीनल जोगळेकर आणि सांस्कृतिक संचनालयाचे संचालक विभिषण चवरे यांनी केले आहे. तलवारीचे प्रदर्शन
श्रीमंत सेना साहेब सुभा रघुजीराजे भोसले यांच्या इंग्लंडमधून आलेल्या तलवारीचे व बारा वारसा मानांकित गडकिल्ल्यांच्या माहितीचे प्रदर्शन, दि. १९ ते दि.२५ ऑगस्ट २०२५, सकाळी ११ ते सायं ७ दरम्यान, पुल देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी, प्रभादेवी, मुंबई येथील कला दालनात सुरू राहणार आहे. हे प्रदर्शन सर्वांसाठी विनामूल्य खुले राहणार आहे.
पुणे- हरविलेले ४१ मोबाईल शोधून पोलिसांनी ते मुळ मालकांना अर्थात तक्रारदारांना ७९ व्या स्वांतत्र दिनि परत केलेत . या मोबाईलची किंमत साधारतः ५ लाख रुपये असून ते विविध जिल्ह्यातुन तसेच विविध राज्यातून हस्तगत करुन तक्रादारदार यांना परत करण्यासाठी शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या सायबर पथकाने परिश्रम घेतले.
या संदर्भात पोलिसांनी सांगितले कि,’शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक, महेश बोळकोटगी यांच्या मार्गदर्शनाखाली सायबर कक्षाचे सपोनि संतोष पाटील, पोलीस अमंलदार तेजस चोपडे व आदेश चलवादी, यांनी शिवाजीनगर पोलीस ठाणे हद्दीत हरवलेल्या मोबाईलचा डेटा तयार करुन, त्याबाबत तांत्रिक तपास करुन/त्याचा वारंवार पाठपुरावा करुन हरवलेले मोबाईल फोन हे महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यात व तसेच इतर राज्यात वापरत असल्याचे निदर्शनास आले. सदरचे मोबाईल फोन वापरकर्त्याशी तसेच संबधीत पोलीस ठाणेस संवाद साधून हरवलेले एकुण ५ लाख रु.कि.चे एकुण ४१ मोबाईल फोन हस्तगत करण्यात यश मिळाले आहे. हस्तगत करण्यात आलेले मोबाईल फोन संबधीत तक्रारदार यांना शिवाजीनगर पोलीस स्टेशन येथे परीमंडळ ०१ चे पोलीस उपआयुक्त, कृषीकेश रावले व तसेच सहा. पोलीस आयुक्त, साईनाथ ठोंबरे यांचे हस्ते परत करण्यात आले. मोबाईल परत मिळाल्याने नागरिकांनी आनंद व्यक्त करुन पोलीसांचे आभार व्यक्त केले आहेत. पोलिसांनी असेही म्हटले आहे कि,’मोबाईल तात्काळ ऑनलाईन हरवल्याची पुणे पोलीसांचे punepolice.gov.in/LostFoundReg या वेबसाईटला प्रथम तक्रार नोंद करावी, नोंद करताना जवळचे पोलीस स्टेशनचे नाव त्यात सिलेक्ट करावे व आपले जवळच्या पोलीस स्टेशनला जावुन त्याची एक कॉपी द्यावी. त्यानंतर हरवलेले मोबाईल मधील त्याच नंबरचे नविन सिमकार्ड घेवुन ते चालु करुन घेतल्यानंतर शासनाचे https://www.ceir.gov.in/ (CEIR) या पोर्टलवर नोंद करावी. नोंद करताना सदर वेबसाईटवर अर्जदाराचे तक्रारीची प्रत, मोबाईल पावती तसेच ओळखपत्र याची PDF अपलोड करुन चालु केलेल्या मोबाईल वर OTP प्राप्त करुन समाविष्ठ (सबमिट) करावी. सदरची कामगिरी पोलीस आयुक्तअमितेश कुमार,सह पोलीस आयुक्त रंजनकुमार शर्मा, अपर पोलीस आयुक्त पश्चिम प्रादेशिक विभाग राजेश बनसोडे, पोलीस उप-आयुक्त परिमंडळ १ कृषीकेश रावले, सहा. पोलीस आयुक्त विश्रामबाग विभाग साईनाथ ठोंबरे यांचे मार्गदर्शनाखाली शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे वपोनि . महेश बोळकोटगी, पोनि (गुन्हे) धंनजय पिंगळे, सपोनि संतोष पाटील, मपोउप मनिषा वलसे, मपोहवा नलिनी क्षीरसागर, पोशि आदेश चलवादी, पोशि तेजस चोपडे, पोशि नवनाथ आटोळे यांनी केली आहे.
जगातील पहिली बॅटमॅन-प्रेरित एसयूव्ही व्यावसायिक वापरासाठी
किंमत ₹ 27.79 लाख | मर्यादित 300 युनिट्स
23 ऑगस्ट 2025 पासून बुकिंग सुरू
मुंबई- : वॉर्नर ब्रदर्स डिस्कव्हरी ग्लोबल कंझ्युमर प्रोडक्ट्स (WBDGCP) च्या सहकार्याने महिंद्रा इलेक्ट्रिक ओरिजिन एसयूव्ही BE 6 बॅटमॅन एडिशन सादर करते आहे. सध्या याची संख्या मर्यादित आहे. असं म्हणतात की, काही वाहने तुम्हाला एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेण्यासाठी असतात. तर काही तुम्हाला मनापासून भावतात, म्हणजेच ती तुमच्या मनाच्या जवळ असतात. BE 6 बॅटमॅन एडिशन ही निश्चितच दुसऱ्या श्रेणीत येते. क्रिस्टोफर नोलनच्या ‘द डार्क नाइट ट्रायोलॉजी’ या वॉर्नर ब्रदर्स पिक्चर्सला समीक्षकांनी चांगलेच उचलून धरले होते. त्यानेच प्रेरित होत सिनेमॅटिक वारसा आणि आधुनिक आलिशानपणा यांचे दुर्मिळ मिश्रण म्हणजे ही कार.
महिंद्रा अँड महिंद्रा लिमिटेडच्या ऑटो अँड फार्म सेक्टरचे चीफ डिझाईन अँड क्रिएटिव्ह ऑफिसर प्रताप बोस म्हणतात: “बीई 6 नेहमीच हटके आणि पुढचा विचार करते. बॅटमॅन एडिशनसह आम्हाला ग्राहकांना असे काहीतरी द्यायचे होते जे त्यांच्या जवळचे असेल. जे काही बनवायचे ते इतके आकर्षक बनवायचे की, ते असणे म्हणजे आपल्याकडे एखादी मौल्यवान गोष्ट असल्यासारखे वाटले पाहिजे. यावर काम करताना आम्ही अगदी छोट्यातल्या छोट्या तपशीलावरही लक्ष केंद्रित केले आहे. त्यामुळेच तुम्ही जेव्हा जेव्हा तिच्याकडे पाहाल तेव्हा तुम्हाला त्यात काहीतरी नवीन सापडेल.”
बॅटमॅनचे आकर्षण अनेक पिढ्यांना आहे. आजच्या पुढच्या पिढ्यांमध्येही ते दिसून येते. कॉमिक पुस्तके आणि अॅनिमेटेड मालिकांपासून ते ब्लॉकबस्टर चित्रपटांपर्यंत अनेक दशके हे पात्र महत्त्वाचे आहे. बुद्धिमत्ता, कौशल्य आणि टेक्नोसॅव्ही असलेला बॅटमॅन मुलं आणि मोठे अशा दोघांनाही आवडतो. BE 6 ची बॅटमॅन आवृत्ती ग्राहकांना याच वारशाचा आनंद देते. तसेच लोकप्रिय संस्कृतीतील सर्वांच्या लाडक्या व्यक्तिमत्त्वाशी जोडले जाण्याचा आनंद चाहत्यांना मिळतो.
या अनोख्या भागीदारीबद्दल वॉर्नर ब्रदर्स डिस्कव्हरी ग्लोबल कंझ्युमर प्रॉडक्ट्स, एपीएसीचे वरिष्ठ उपाध्यक्ष विक्रम शर्मा म्हणाले,“बॅटमॅन हा केवळ पॉप-कल्चर आयकॉन नाही – तर तो नावीन्य, सर्वसमावेशकता दाखवण्यासोबतच स्वतःच्या क्षमता ओळखण्याची प्रेरणा देतो. हेच धाडस रस्त्यावर अनुभवण्याची संधी आमचे हे सहकार्य देते – इलेक्ट्रिक पद्धतीने. या लिमिटेड एडिशन गाडीसह भारतातील बॅटमॅनचे चाहते आता प्रत्येक वेळी गाडी चालवताना बॅटमॅनचा थरार अनुभवू शकतात, हा माझा दावा आहे.”
या उत्पादनाच्या भारताच्या कनेक्शनबद्दल वॉर्नर ब्रदर्स डिस्कव्हरी साउथ एशियाचे वरिष्ठ संचालक, कंझ्युमर प्रॉडक्ट्स आनंद सिंग म्हणाले, “जगातील कोणत्याही देशापेक्षा बॅटमॅनचे सर्वाधिक आणि उत्साही चाहते भारतात आहेत. आणि त्याच आवडीला ही भागीदारी अशा प्रकारे जिवंत करते आहे. बॅटमॅनच्या कालातीत आकर्षणाला इलेक्ट्रिक मोबिलिटीची जोड देत आम्ही असे उत्पादन आणले आहे, ज्याला अत्याधुनिक तंत्रज्ञानाची जोड आहे.”
पॅक थ्री 79 किलोवॅट क्षमतेच्या व्हेरिएंटवर आधारित त्याच्या सर्व अनोख्या वैशिष्ट्यांसह BE6 बॅटमॅन एडिशनमध्ये स्वतःला झोकून द्या…यामुळे तुम्ही चकित तर व्हालच पण तुम्हाला प्रेरणा देखील मिळेल
बाह्य डिझाइनची वैशिष्ट्ये
बॅटमॅन एडिशनमधील कस्टम सॅटिन ब्लॅक कलर प्रीमियर
समोरच्या दारांवर कस्टम बॅटमॅन डेकल
आक्रमक, अॅथलेटिक स्टँडसाठी R20 अलॉय व्हील्स
अल्केमी गोल्ड-पेंटेड सस्पेंशन आणि सॅटिन ब्लॅक बॉडीच्या तुलनेत ब्रेक कॅलिपर बोल्ड, प्रीमियम कॉन्ट्रास्ट आहेत
“BE 6 × द डार्क नाइट”, मर्यादित आवृत्ती, गाडीचे बॅजिंग मागच्या बाजूला
द डार्क नाईट ट्रायॉलॉजीमध्ये दिसणारे बॅट चिन्ह, ठळकपणे लावले आहे:
o हब कॅप्स
o फ्रंट क्वार्टर पॅनल्स
o रिअर बंपर
o खिडक्या आणि मागची काच
· द डार्क नाइट ट्रायलॉजी बॅट एम्ब्लेम असलेले इन्फिनिटी रूफ
याच्या आतील आणि बाहेरची एवढी तपशीलवार माहिती ही आपल्या जवळची वस्तू वाटावी यासाठी आहे – जसे एसयूव्ही आणि ड्रायव्हर यांच्यातील नाते असते.
ही केवळ एसयूव्ही नाही तर त्यापेक्षा कैक पटीने काहीतरी जास्त आहे. बॅटमॅनच्या वारशातील ही एक संग्रहणीय कार आहे, जी आंतरराष्ट्रीय बॅटमॅन दिनाचे औचित्य साधत प्रदर्शित झाली. आणि ज्यांना त्यांच्या ड्रायव्हिंगसाठी एक आठवणीतली गोष्ट हवी आहे, त्यांच्यासाठीच ती राखीव आहे.
नोंदणीला सुरुवात: 23 ऑगस्ट 2025
वितरणाला सुरुवात: 20 सप्टेंबर 2025 — आंतरराष्ट्रीय बॅटमॅन डे
उपमुख्यमंत्री अजित पवार, मंत्री हसन मुश्रीफ, उदय सामंत, इंद्रनील नाईक, पोपटराव पवार यांची उपस्थिती
पुणे: महाराष्ट्र एनजीओ समितीचे राज्यस्तरीय अधिवेशन येत्या मंगळवारी (दि. १९ ऑगस्ट २०२५) सकाळी ९ ते ५ या वेळेत गणेश कला क्रीडामंच, स्वारगेट पुणे येथे आयोजित केले आहे. राज्यभरातील स्वयंसेवी संस्था मोठ्या संख्येने या अधिवेशनात सहभागी होणार आहेत, अशी माहिती महाराष्ट्र एनजीओ समितीचे राज्य अध्यक्ष डॉ. युवराज येडूरे यांनी पत्रकार परिषदेत दिली. प्रसंगी उपाध्यक्षा सारिका आटोळे, राज्य संपर्कप्रमुख संदीप बोटे, संजय भोसले, अश्विनी कसबे, कृष्णात पवार, रवीसागर हाळवणकर, वृषभ आमने, संजना चेंडे, पूजा खडसे, शीतल उगले आदी उपस्थित होते.
डॉ. युवराज येडूरे म्हणाले, “या अधिवेशनात महाराष्ट्रातील स्वयंसेवी संस्थेचे प्रतिनिधी एकत्रितपणे सहभागी होऊन महाराष्ट्रातील सामाजिक समस्या, विकास आणि समाजासाठी काम करण्याच्या शासनाच्या व कंपनीच्या सीएसआर निधीतून विविध उपक्रम राबवण्यासाठी चर्चा व ठराव करणार आहेत. अधिवेशनाच्या अध्यक्षस्थानी आदर्श ग्राम योजनेचे अध्यक्ष पोपटराव पवार असणार आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार, वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ, उद्योगमंत्री उदय सामंत, उद्योग राज्यमंत्री इंद्रनील नाईक, माजी गृहराज्यमंत्री बाळा नांदगावकर, आमदार रोहित पवार यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.”
“धर्मादाय आयुक्त अमोघ कलोती, विभागीय प्राप्तिकर अधिकारी नितीन वाघमोडे, टेंडर गुरुचे संचालक हर्षद बर्गे, महा सीएसआर डेव्हलपमेंट असोसिएशनचे अध्यक्ष प्रशांत मोरे, हार्टफुलनेस इन्स्टिट्यूटचे महाराष्ट्र व गोवा राज्य समन्वयक डॉ. अंजली बापट, नाशिक विभागीय समन्वयक डॉ. विकास देव अधिवेशनात मार्गदर्शन करणार आहेत. मंत्रालय समन्वय समिती सदस्य प्रा. डॉ. बापुसाहेब अडसुळ, एमआयटी राष्ट्रीय सरपंच संसदचे कार्याध्यक्ष योगेश पाटील, महाराष्ट्र पर्यावरण समन्वय समितीचे सल्लागार संजय भोसले, उद्योजक विक्रम उगले आदी उपस्थित राहणार आहेत,” असेही डॉ. येडूरे यांनी नमूद केले.
डॉ. युवराज येडूरे म्हणाले, “अनेक वर्षापासून प्रलंबित सामाजिक समस्यांवर चर्चा आणि उपाययोजना, स्वयंसेवी संस्थांच्या कामाचे व्याप्ती व त्यांचे महत्त्व आणि समाजावर होणारे परिणाम, अधुनिक जीवनशैली विकास कामांमध्ये स्वयंसेवी संस्थांची भूमिका, नवीन तंत्रज्ञान आणि संधी, तसेच सामाजिक क्षेत्राचे हक्काचे महामंडळ होण्यासाठी ठराव प्रेरित केले जाणार आहेत. तसेच महाराष्ट्रातील विविध सामाजिक प्रश्नांवर व शासन स्तरावर विविध ठराव मांडण्यात येणार आहेत. तसेच स्वयंसेवी संस्थांच्या शासकीय योजना, सीएसआर निधी, अर्थिक व कायदेशीर प्रक्रिया संदर्भात मार्गदर्शन करण्यात येणार आहे. महाराष्ट्रातील स्वयंसेवी संस्थांनी या अधिवेशनाला मोठ्या संख्येने उपस्थित राहावे.”
पुणे-फॉरेस्ट काउंटी, खराडी येथील स्वातंत्र्यदिन साजरा भव्यतेने आणि उत्साहात पार पडला. सकाळची सुरुवात झाली गॅलंट सिक्युरिटी सर्व्हिसच्या शिस्तबद्ध संचलनाने, त्यानंतर आपल्या ज्येष्ठ नागरिकांनी काढलेल्या अभिमानास्पद मार्चने – हा हृदयस्पर्शी क्षण दिवसाची दिशा ठरवणारा ठरला. ध्वजारोहणानंतर रंगतदार सांस्कृतिक कार्यक्रम सुरू झाला. लहानग्यांनी प्रोजेक्ट सिंदूर, केसरीवरील सादरीकरणाने सगळ्यांची मने जिंकली, तर ज्येष्ठ नागरिकांनी सादर केलेले हृदयस्पर्शी देशभक्तीपर गीत सर्वांना भावले. मनीष जोशींच्या जोशपूर्ण सूत्रसंचालनात मुलांसाठी घेतलेले मनोरंजक प्रश्नोत्तर सत्र प्रेक्षकांचे विशेष आकर्षण ठरले. कार्यक्रमातील खास ठळक मुद्दे होते दोन प्रभावी भाषणे – लहानग्या येशा सिंग हिने “शैक्षणिक गुणांपेक्षा नैतिक मूल्यांना अधिक महत्त्व द्यायला हवे का?” या विषयावर केलेले विचारमंथन आणि कृशव शुक्लाने सादर केलेले “भारताची संरक्षण आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील प्रगती” या विषयावरचे प्रभावी भाषण. त्यांच्या वयाच्या मानाने दोन्ही भाषणे असामान्य प्रगल्भतेची होती. संगीत आणि कवितेने देखील रंगत वाढवली – उन्नीकृष्णन आणि अक्षत यांचा गोड द्वंद्वगीताने प्रेक्षकांना पुन्हा एकदा ऐकण्यास भाग पाडले, आपल्या संगीत सेना आणि एफसी सदस्यांनी सादर केलेल्या देशभक्तीपर गीतांनी देशप्रेम जागवले, तर श्री. तरुण जैन यांची विनोदी कविता प्रेक्षकांना हशा पिकवणारी ठरली. देशभक्ती, कला आणि एकतेचा संगम असलेला हा दिवस – एक असा उत्सव ठरला जो कायम स्मरणात राहील!
पुणे: कथक नृत्याविष्काराची अनुभूती देणाऱ्या, तसेच ताल, लय व भाव यांचा मोहक संगम असलेल्या ‘आवर्तन २०२५’ कार्यक्रमाचे पुण्यात आयोजन केले आहे. ‘लयोम इन्स्टिट्यूट ऑफ आर्ट्स अँड मीडिया’च्या येत्या मंगळवारी (दि. १९ ऑगस्ट २०२५) सायंकाळी ६.३० वाजता यशवंतराव चव्हाण नाट्यगृह, कोथरूड पुणे येथे हा कार्यक्रम होणार आहे. १७० कथक नृत्यांगना मनमोहक नृत्याविष्कार सादर करणार आहेत, अशी माहिती प्रसिद्ध नृत्यांगना वेदांती भागवत महाडिक यांनी दिली.
या कार्यक्रमात वेदांती भागवत महाडिक यांच्यासह त्यांच्या शिष्यांकडून कथक नृत्यरचना सादर होणार आहेत. लयबद्ध पावले, ठेक्यांची नजाकत आणि भावनांच्या अभिव्यक्तीचा साज या कार्यक्रमात खुलणार आहे. कार्यक्रमात कथक गुरु पं. राजेंद्र गंगाणी यांची प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती लाभणार आहे. या नृत्यसंध्येला अभिजित पाटसकर (संवादिनी), सुनील अवचट (बासरी), मयूर महाजन (गायन), मुक्ता जोशी (नृत्य), यश सोमण (तबला) आणि अपूर्वा द्रविड (पखवाज) यांची साथसंगत लाभणार आहे.
“लयोम इन्स्टिट्यूट ऑफ आर्ट्स अँड मीडियाला यंदा १५ वर्षे पूर्ण होत आहेत. त्यानिमित्ताने ‘आवर्तन २०२५’ हा विशेष कार्यक्रम सादर होत आहे. कोथरूड, बाणेर, पाषाण, बालेवाडी या भागात असलेल्या संस्थेच्या शाखांमधील २०० विद्यार्थ्यांपैकी १७० विद्यार्थीनी नृत्य सादर करणार आहेत. त्यामध्ये शास्त्रीय बंदिशी, शिववंदना, गणेशवंदना, धृपद, चतुरंग, त्रिवट तराणा, ताल-तीनताल अशा शास्त्रीय कथक नृत्याचे अविष्कार रसिकांना पाहता येणार आहेत. मागील १५ वर्षात संस्थेतील चार मुलींना केंद्र सरकारची ‘सीसीआरटी’ शिष्यवृत्ती मिळाली आहे. तसेच राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील कथक स्पर्धांत मुलींना पारितोषिके मिळाली आहेत. ‘आवर्तन’सह लयोम इन्स्टिट्यूट’च्या रुक्मिणी स्वयंवर, बदलते चेहरे ह्या वैविध्यपूर्ण कथक कलाकृती संस्थेला लोकप्रिय करण्यात उपयुक्त ठरत आहेत,” असे वेदांती भागवत महाडिक यांनी नमूद केले.
बाजीराव पेशवे, मल्हारराव होळकर आणि राणोजी शिंदे यांच्या वेशभूषेत सहभागी होणार
थोरले बाजीराव पेशवे प्रतिष्ठान आणि इतिहास प्रेमी मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजन पुणे : थोरले बाजीराव पेशवे प्रतिष्ठान आणि इतिहास प्रेमी मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने थोरले बाजीराव पेशवे यांच्या ३२५ व्या जयंती सोहळ्यानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. सोमवार दिनांक १८ ऑगस्ट रोजी सकाळी ९ वाजता न्यू इंग्लिश स्कूल रमणबाग येथून शोभा यात्रेला प्रारंभ होणार आहे, अशी माहिती थोरले बाजीराव पेशवे प्रतिष्ठानचे सचिव कुंदनकुमार साठे यांनी दिली.
अश्वारूढ आणि विविध वेशभूषेत युवक सहभागी होणार असून सामूहिक महाराष्ट्र गीत आणि संचलनातून होणार थोरल्या बाजीरावांना मानवंदना देणार आहेत.
सोमवार, दि. १८ ऑगस्ट रोजी सकाळी ८ वाजता रमणबाग प्रशालेत इतिहास अभ्यासक मोहन शेटे यांचे व्याख्यान होणार आहे. व्याख्यानानंतर रमणबाग ते शनिवारवाडा अशी भव्य शोभायात्रा काढण्यात येईल.
या शोभायात्रेत चौघडा वादनासह अश्वारूढ युवक विशेष आकर्षण ठरणार असून ते बाजीराव पेशवे, मल्हारराव होळकर आणि राणोजी शिंदे यांच्या वेशभूषेत सहभागी होणार आहेत.
शनिवारवाडा येथे शोभायात्रेची सांगता होणार असून, तेथे उपस्थित सर्वजण महाराष्ट्र गीताचे सामूहिक गायन करतील. तसेच नेताजी सुभाषचंद्र बोस सैनिकी शाळेचे विद्यार्थी संचलन करून थोरल्या बाजीरावांना मानवंदना अर्पण करतील. भव्य शोभायात्रेत पुण्यातील अनेक नामांकित शाळांचा सक्रिय सहभाग राहणार आहे. त्यामध्ये रमणबाग प्रशाला, न्यू इंग्लिश मिडीयम स्कूल, न्यू इंग्लिश स्कूल (टिळक रोड), नु. म. वि., रेणुका स्वरूप, ज्ञानप्रबोधिनी (पुणे), ज्ञानप्रबोधिनी (निगडी), आर. सी. एम. गुजराती हायस्कूल, नेताजी सुभाषचंद्र बोस सैनिकी शाळा तसेच भाऊसाहेब हिरे हायस्कूल या शाळांचा समावेश आहे.
आंतरराष्ट्रीय कृष्ण भावनामृत संघाच्या (इस्कॉन) पुण्यातील कात्रज कोंढवा रस्ता आणि कॅम्प येथील मंदिर ; जन्माष्टमी निमित्त हजारो भक्तांनी केला भगवान श्रीकृष्णाला अभिषेक
पुणे : श्री गोपाळ कृष्ण भगवान की जय… हरे रामा हरे कृष्णा… राधे कृष्ण गोपाल कृष्ण… च्या जयघोषात कात्रज कोंढवा रस्ता आणि कॅम्प येथील इस्कॉन मंदिरात श्रीकृष्ण जन्माष्टमी महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. तब्बल तीन लाख भाविकांनी राधाकृष्णाचे दर्शन घेतले तर, हजारो भक्तांनी भगवान श्रीकृष्णाला अभिषेक केला. अभिषेकाच्या ठिकाणी वृंदावनातील नंदगाव येथील विविध मंदिरांचा आकर्षक देखावा तयार करण्यात आला होता.
संस्थापक आचार्य श्रील प्रभुपाद स्थापित आंतरराष्ट्रीय कृष्ण भावनामृत संघाच्या (इस्कॉन) मंदिरात श्रीकृष्ण जन्माष्टमी महोत्सव साजरा झाला. रत्नजडीत वस्त्रालंकारानी सजलेल्या राधाकृष्णाचे रुप पाहण्यासाठी भाविकांनी गर्दी केली होती. तसेच फुलांनी सजविलेल्या पाळण्यातील बालकृष्णाला पाळणा देत भाविकांनी जन्माष्टमी उत्सव थाटात साजरा केला. मंदिराचे अध्यक्ष राधेश्याम प्रभू, रेवतीपती प्रभू, जयदेव प्रभू या मंदिराच्या वरिष्ठ भक्त मंडळींसह विविध क्षेत्रातील मान्यवर यावेळी उपस्थित होते.
भगवंतांना हरे-कृष्ण महामंत्राच्या जयघोषात मंदिरातील भक्तवृंदातर्फे महाअभिषेक करण्यात आला. त्यानंतर भगवंतांना २५० प्रकारचे नैवेद्य दाखवून बरोबर रात्री १२ वाजता आरती करण्यात आली, अशी माहिती प्रवक्ते जनार्दन चितोडे यांनी दिली. उपाध्यक्ष संजय भोसले यांनी जन्माष्टमी महोत्सवाचे आध्यात्मिक तसेच सांस्कृतिक महत्त्व आणि इस्कॉन संस्थेच्या जगभरातील उपक्रमांबद्दल सांगितले. विशेष अतिथी कक्षातर्फे संपर्क प्रमुख अनंतगोप प्रभू आणि प्रसाद कारखानीस यांनी पाहुण्यांचे स्वागत केले. दर्शन आणि अभिषेकसाठी पुण्यातील सर्व आमदार, सामाजिक कार्यकर्ते, पोलिस दलातील वरिष्ठ अधिकारी तसेच पालिकेतील आयुक्त आणि उपायुक्त आले होते
मंदिरामध्ये जन्माष्टमी निमित्त आयोजित करण्यात आलेल्या ‘कृष्णसमर्पण’ सांस्कृतिक महोत्सवाचा समारोप झाला. महोत्सवात देशभरातून ८०० कलावंतांनी शास्त्रीय नृत्य, गायन, नाट्य, वादन करून त्यांची कला भगवंतांना समर्पित केली. श्रीकृष्ण जन्माष्टमी निमित्त मंदिरातील तिन्ही गाभाऱ्यातील श्री श्री राधा-वृंदावन चंद्र, जगन्नाथ-बलदेव-सुभद्रा आणि गौर-निताई यांच्या विग्रहांना आकर्षक वस्त्र-आभूषणांनी सजविण्यात आले होते. याच मंदिराच्या आवारात श्री बालाजी चे सुंदर मंदिर आहे. या सर्व मंदिरांवर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली होती.
इस्कॉन मंदिरात राधा-कृष्णांच्या पोशाखांवर गोमती आणि गोवर्धन पर्वताचे सुंदर डिझाइन
जन्माष्टमीनिमित्त, इस्कॉन मंदिरातील राधा आणि कृष्णांचे कपडे खूप खास असतात. कारागीर या कपड्यांवर अनेक महिने काम करतात. ते कपडे जरी, मोती आणि इतर सजावटीच्या वस्तूंनी बनवलेले असतात. दरवर्षी, भगवान श्रीकृष्णासाठी एका विशिष्ट थीमवर आधारित कपडे तयार केले जातात. मंदिराचे मुख्य पुजारी रूप गोस्वामी प्रभू आणि उत्सव प्रमुख कौस्तुभ प्रभू यांनी सांगितले की, यावर्षी देवाचे कपडे पूर्णपणे हाताने भरतकाम केलेले आहेत. या कपड्यांसाठी लागणारे साहित्य विविध देशांमधून मागवण्यात आले. जपानमधून मोती, ऑस्ट्रेलियातून स्टोन आणि अमेरिकेतून हिरे मागवण्यात आले.
जन्माष्टमीच्या दिवशी देवाचा विशेष अभिषेक करण्यात आला, ज्यामध्ये १५० लिटर रसाचा वापर करण्यात आला. यात विविध पदार्थांचे मिश्रण असते. हा अभिषेक २ तास चालला आणि यात २०० हून अधिक भक्तांनी सेवा दिली. या व्यतिरिक्त, राधा-कृष्णांचा ५० किलो फुलांनी अभिषेक करण्यात आला. मंदिराची सजावटीत गोवर्धन लीलेचे प्रदर्शन होते.
पुणे : राधे राधे… श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी… हाथी घोडा पाल की, जय कन्हैयालाल की… गोपालकृष्ण भगवान की जय… याचा जयघोष करत ढोलताशाच्या गजरात बालगोपाळांनी अभिनव अशी सायकल दहीहंडी फोडली. जेधे सोशल वेलफेअर फाऊंडेशन व इंद्राणी बालन फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने श्री शिवछत्रपती मित्र मंडळाच्या संयोजनातून शुक्रवार पेठेतील जेधे मॅन्शन, पंचमुखी मारुती मंदिर येथे या अभिनव सायकल दहीहंडीचे आयोजन केले होते.
बालगोपाळांनी ही अभिनव सायकल दहीहंडी फोडून आनंदोत्सव साजरा केला. या सायकल दहीहंडीतील २०० सायकलींचे मोफत वाटप भोर, राजगड, मुळशी तालुक्यातील रायरी, सोंडे माथाना, कोंदवाडी, मेटपिलावरे, पाली बुद्रुक, वाजेघर बुद्रुक, लव्ही बुद्रुक, खेचरे, कळमशेत, बेलावडे, मांदेडे आणि बावीसमैल या अतिदुर्गम भागात वसलेल्या गावांमधील विद्यार्थ्यांना व पुणे शहरातील मध्यवर्ती भागातील गरजू विद्यार्थ्यांना करण्यात आले. यावेळी सायकलींच्या मधोमध क्रेनला बांधलेली दहीहंडी सर्वांचेच लक्ष वेधून घेत होती. मृत्युंजय वाद्यपथक, गणेशा वाद्यपथक या दोन पथकांनी बहारदार ढोलवादन केले.
पुनीत बालन म्हणाले, “आजवर इंद्राणी बालन फाऊंडेशनतर्फे पुणे, सातारा व अन्य जिल्ह्यातील हजारो विद्यार्थ्यांना सायकल वाटप करण्यात आले. दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना अभ्यास आणि क्रीडा क्षेत्राशी निगडित ज्ञान मिळण्यास वेळ मिळावा, हा यामागचा उद्देश आहे. यंदा या अभिनव सायकल दहीहंडीच्या माध्यमातून २०० सायकलींचे वाटप करताना आनंद होत आहे.”
कृषिकेश रावले यांनी या उपक्रमाचे कौतुक केले. या उपक्रमातून सामाजिक बांधीलकी जपत गरजू मुलांना सायकल देऊन त्यांना मदतीचा हात दिला आहे. अतिशय विधायक पद्धतीने सण, उत्सव साजरा करण्याची ही पद्धत भावली. ग्रामीण भागातील या बालगोपाळांच्या चेहऱ्यावरील सायकल मिळाल्याचा आनंद सुखावणारा असल्याचे ते म्हणाले.
कान्होजी जेधे म्हणाले, “दरवर्षी काही नवीन करण्याचा आमचा ध्यास असतो. या उपक्रमातून आपण समाजाला कशी मदत करू शकू, याकडे जास्त कल असतो. समाजाचे आपण देणे लागतो, या भावनेतून गेल्यावर्षीपासून सायकल हंडीतून समाजातील गरजू मुलांच्या प्रवासाचा प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केला आहे.”